१९६९ च्या गुजरात दंगलीच्या वेळी जाफ़रभाई सरेशवाला अवघा पाच वर्षाचा पोरगा होता. सतत वर्ष दोन वर्षानंतर उसळणार्या दंगली तो बघतच होता, त्यांचे चटके भोगतच होता. पण नंतर जीवन उध्वस्त करणारी पुढली मोठी दंगल गुजरातमध्ये झाली, ती १९८५ सालात. तेव्हा तर संपुर्ण देशातच भाजपाची धुळधाण उडालेली होती आणि गुजरातमध्ये कॉग्रेसचे माधवसिंह सोलंकी मुख्यमंत्री होते. तेव्हा तर एकट्या अहमदाबाद शहरात सलग दोनशे दिवस म्हणजे सात महिने कुठल्या ना कुठल्या भागात संचारबंदी चालूच होती. संसदेत तर राजीव गांधींनी अफ़ाट बहूमत मिळवलेले होत. पण म्हणून गुजरातच्या मुस्लिमांना सुरक्षा लाभली नव्हती. दोन वर्षात गुजरातचा मुख्यमंत्री बदलला तरी हिंदू-मुस्लिम दंगली काही संपत नव्हत्या.