Thursday, May 28, 2020

भारत आता सावरकर मार्गाने पुढे जातोय; गांधी-नेहरूंचा मार्ग केंव्हाच मागे सुटलाय

चीन, पाकिस्तानसाठी 
गांधी नव्हे सावरकर, आंबेडकर नीती हवी 
याची जाण आजच्या नेतृत्वात आहे. 
हा नवा भारत आहे. 
देशासाठी जे जे उपयुक्त ते ते अंगीकार करणे 
अन् जे जे घातक ते विषवत. 
कोणीही महापुरुष देशापेक्षा मोठा नाही. 
देश आहे म्हणून आपण आहोत. 
हा सावरकर विचार आहे. 
हा शाश्वत विचार आहे. 
तारणारा आहे.  
सर्व समावेशक आहे; पण भोंगळ नाही.

२७ मे - नेहरू पुण्यतिथी
२८ मे - सावरकर जयंती

अनेक विद्वानांनी यानिमित्ताने या दोन्ही नेत्यांची तुलना करण्याचा प्रयत्न आपापल्या आउटलेटवरून केला.

मीही स्वतःला असे करण्यापासून आवरणार नाही. मी लहान असताना मला नेहरुही आवडायचे अन् सावरकरही.

पुढे वाचन वाढत गेलं.
त्यातून माझी स्वतः ची मते बनत गेली.

माझ्या मते -

"नेहरू आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांमुळे आपले निर्णय चुकत गेले. परिणामी आपल्या मातृभूमीचे तुकडे पडले. काँग्रेसने फाळणी होऊ देणार नाही असे देशाला सांगितले. पण ऐनवेळी फाळणी स्वीकारली.  देशाचा विश्वासघात केला. दंगली घडवून ब्लॅकमेल करून भारताच्या भूमीवर आपण पाकिस्तान बनवू शकतो याची आणि काँग्रेसचे नेते भित्रे, पुळचट अन् नेभळट असल्याची जिनाला खात्री होती.

भारताच्या भूमीवर पाकिस्तान उगवले ते आपले पाप आहे, याची लाज आणि खंत काँग्रेसला कधीच वाटली नाही. उलट, येथील हिंदू, हिंदू संघटना यांना बदनाम कसे करता येईल, हेच धोरण रेटून चालवले. शालेय अभ्यासक्रमात काँग्रेसला अनुकूल तेवढेच शिकवत राहिले.

धर्माच्या नावावर मुस्लिमांसाठी पाकिस्तान, बांगलादेश रूपात या देशाची भूमी तोडून देण्यात आली. तरी लांगूलचालन करणे काँग्रेसने सोडले नाही. काँग्रेस पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २००६ मध्ये हद्द केली. जाहीर रित्या सांगितले की, या देशाच्या साधनसंपत्तीवर पाहिलं हक्क मुसलमानांचा आहे. बाटला हाऊस येथे जिहादी अतिरेकी मारले गेले म्हणून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना रडू कोसळले.

थोडक्यात, काँग्रेसने देशभक्त मुस्लीम नेतृत्व कधीच पुढे आणले नाही. तोंडी सेक्युलर तत्वाचा जप करत प्रत्यक्षात मात्र कट्टरवादी, जिहादी गटांना बळ पुरवले. इतिहास लेखन, पाठ्यपुस्तक आणि इतर माध्यमातून वैचारिक संभ्रमाला खतपाणी घातले. या देशाचा तेजोभंग होत राहील अशी नीती राबवली. स्वार्थ आणि काँग्रेस हे १९२० नंतर
 जणू समानार्थी बनले.

स्वतः चा स्तोम माजवत राहणे हे काैंग्रेसी नेत्यांचे व्यवच्छेदक लक्षण. माझ्या मते याला गांधीजी अपवाद नव्हते. अहिंसासारख्या व्यक्तिगत जीवनातील मूल्यांना ते देशावर लादू पाहत होते.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात काँग्रेसचे असे दोन पंतप्रधान होऊन गेले ज्यांनी स्वतःलाच "भारतरत्न" पुरस्काराने सन्मानित केलं -
१. जवाहरलाल नेहरू (१९५५)
२. इंदिरा गांधी (१९७१).

हे दोन्ही नेते निश्चितच महान होते. पण म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील उणीव दुर्लक्षित करता येणार नाही. कारण या बाबींमुळे देशाची अपरिमित हानी झाली आहे. यांनी स्वतः लाच पुरस्कार कसे दिले? त्यांना संकोच वाटला नाही का ? असे प्रश्न पडतात... असं कसं होऊ शकतं, याचं आश्चर्य वाटतं.

समजा, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ला भारतरत्न पुरस्कार द्यायचे ठरवले तर किती हलकल्लोळ माजेल. मीडियात कशा प्रतिक्रिया उमटतील ?
१९५५ आणि १९७१ मध्ये स्वतः लाच पुरस्कार देऊ केले म्हणून मीडियातून टीका टीपणी झाली होती का ? याचे संदर्भ मिळत नाहीत.

आता या पार्श्वभूमीवर
वि. दा. सावरकर यांचे जीवन पाहा.

स्वार्थाचा लवलेश नाही.
विचारांमध्ये स्पष्टता आहे.
देशासमोरील खऱ्या आव्हानांची जाणिव असल्यानेच तरुणांना सैन्य भरतीसाठी त्यांनी चळवळ चालवली. यामुळे सैन्यातील हिंदूं सैनिक प्रमाण २५ टक्क्यावरून ६७ टक्याच्या पुढे गेले.
सावरकर यांनी हे एकच कार्य केले असते तरी ते सर्व काँग्रेस नेत्यांच्या एकत्रित कार्यापेक्षा ते महान गणले गेले असते.

सैन्यातील तरुणांची भरती झाली नसती तर कदाचित खंडित भारताचा आजचा नकाशा आता आहे त्याहून खूप आक्रसलेला असला असता.

सावरकर आणि त्याग हे समानार्थी शब्द आहेत. सावरकर आणि तप हे एकच शब्द आहेत.
तुजसाठी मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण
हे तत्त्व भारतीयांनी स्वीकारली असती तर मातृभूमीची फाळणी झाली नसती. दंगलखोर आणि हा देश दार उल इस्लाम करण्याची मनसुबे जोपासणाऱ्या जिहादी शक्ती यांना पायबंद घालण्यात अपयश आल्यानेच या भारतभूमीवर पाकिस्तान उगवला.
देश तोडू पाहणाऱ्या शक्तींना वेसण घालण्याची क्षमता केवळ सावरकर विचारात आहे; गांधी आणि नेहरूंचे विचार फेल ठरले आहेत. देशाने याचा अनुभव घेतला आहे. त्याची फार मोठी किंमत दिली आहे.

आपण सावरकर विचाराने चाललो तर एक दिवस सांस्कृतिक गुलामीत गेलेले आपले बांधवही पुन्हा आपल्या पूर्वजांची संस्कृती अभिमानाने अंगीकार करतील. राष्ट्रांच्या इतिहासात शे - पाचशे वर्षे फार नाहीत. शक्ती आणि संघटन याची कास धरू तर एक दिवस पवित्र सिंधू नदी पुन्हा या भूमीचा भाग होईल.

सुदैवाने आज देशाचे नेतृत्व अशा लोकांच्या हाती आहे की जे या देशाच्या महापुरुषांच्या मध्ये भेदभाव करत नाहीत. त्यांच्यासाठी कोणीच अस्पृश्य नाहीत.

त्यांच्यासाठी महात्मा गांधी वंदनीय आहेत.
नेहरू महापुरुष आहेत.
आंबेडकर, सावरकर प्रत: स्मरणीय आहेत.

गांधींची कोणती मूल्ये आज घ्यायची
अन् सावरकर, आंबेडकरांची कोणते विचार अमलात आणायचे याची योग्य जाण या नेत्यांमध्ये आहे.

चीन, पाकिस्तानसाठी गांधी नव्हे सावरकर, आंबेडकर नीती हवी याची जाण आजच्या नेतृत्वात आहे.
हा नवा भारत आहे.
देशासाठी जे जे उपयुक्त ते ते अंगीकार करणे अन् जे जे घातक ते विषवत.
कोणीही महापुरुष देशापेक्षा मोठा नाही.
देश आहे म्हणून आपण आहोत.
हा सावरकर विचार आहे.
हा शाश्वत विचार आहे.
तारणारा आहे. 
सर्व समावेशक आहे; पण भोंगळ नाही.

भारत यापुढे
सावरकरांच्या मार्गानेच चालेल...
सावरकर हे
काळाच्या पुढे शंभर वर्षे असतात...
सावरकरांनी जे १०० वर्षांपूर्वी सांगितले ते या देशातील लोकांना आता पूर्णपणे समजले आहे.
तसे नसते तर या देशातील लकांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या सरकारला इतक्या तगड्या बहुमताने सत्ता दिली नसती.

तगड्या बहुमतमुळे आणि सावरकर नितीमुळेच तर ३७० हटले. काश्मीर खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाले. सैन्यात आत्मविश्वास वाढला. सर्जिकल स्ट्राईक होऊ लागले.

असो. सर्वांना स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंतीनिमित्त शुभेच्छा. सावरकर अभ्यास करण्यासाठी अनेक तरुणांनी पुढे यावे हे नम्र आवाहन.

- सिद्धाराम भै. पाटील

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी