Thursday, June 4, 2020

शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिन

शिवराज्याभिषेक दिनाला 
हिंदू साम्राज्य दिन असे म्हणतात. कारण...

🚩 सर्वसामान्य जनता जेव्हा त्रस्त झाली होती, तेव्हा एक धर्मात्मा पुढे आला - त्यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी धर्मरक्षण केले.

🚩 प्राचीन महाकाव्यांमध्ये वर्णन केलेली आदर्श राजाची सर्व लक्षणं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात होती.

🚩 छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते. कारण ते हिंदू होते. अमेरिकेतील थोर विचारवंत लीसा मिलर म्हणतात, "जो इतर धर्मांचे अस्तित्व मानतो तो हिंदू. या दृष्टीने पाहिले तर आज जग हिंदू बनत आहे". (इतर धर्मांचे अस्तित्व मान्य न करणारे एकांतीक धर्म सदैव धर्मांतर घडवून आणण्यासाठी धडपडतात. स्वतःच्या धर्मियांची संख्या वाढविण्याचा खटाटोप करतात. हिंदू धर्म धर्मांतर घडवत नाही, कारण सर्व धर्म सत्य आहेत, अशी त्यांची धारणा असते.)

🚩 ईश्वर एक आहे आणि तो अनेक रूपातून व्यक्त होतो. तो चराचरात आहे. सर्वत्र आहे. कोणत्याही मार्गाने ईश्वरापर्यंत पोहोचता येते, हे हिंदू धर्माचे मर्म छत्रपती शिवाजी महाराज जाणून होते.

🚩 माझा धर्म सत्य आहे तसे इतरांचेही धर्म सत्य आहेत, ही प्रत्येक हिंदूची धारणा असते. स्वाभाविकच महराजांचीही अशीच धारणा होती. परंतु, ते हिंदू धर्माभिमानीसुद्धा होते.

🚩 धर्म व संस्कृतीवर होणाऱ्या आघातांबद्दल ते दक्ष होते. सद्गुणविकृतीला त्यांनी कधीच थारा दिला नाही.

🚩 नीतिमत्ता न पाळणाऱ्या शत्रूला मारताना प्रसंगी पारंपरिक नियम दूर सारले पाहिजे, त्याच्या पोटात वाघनखं खुपसली पाहिजेत, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं.

🚩 कोणी परधर्मी हिंदूंना बाटवून त्यांच्या रीलिजन मध्ये ओढत असेल तर त्याला धडा शिकवला पाहिजे, हे महाराजांनी दोन पाद्र्यांचे शिर धडावेगळे करून सांगितलं.

🚩 कोणी धर्मांध मंदिर उद्ध्वस्त करून तेथे त्याच्या उपासनेचा ढाचा बनवत असेल तर योग्य वेळी तो ढाचा दूर सारून तेथे पुन्हा मंदिर उभारले पाहिजे, हे त्यांनी दक्षिण स्वारीच्या वेळी कृतीतून दाखवून दिलं.

🚩 काही परिस्थितीत मुस्लिम बनलेल्या कोणाला पुन्हा हिंदू व्हायचं असेल तर त्याला सन्मानाने हिंदू होता आलं पाहिजे, याची व्यवस्था महाराजांनी निर्माण केली. तसे उदाहरण प्रस्तुत केले.

 🚩 महाराजांनी कधीही मशिद अथवा चर्च उद्ध्वस्त केले नाहीत. किंवा अन्य धर्मीयांचा छळ मांडला नाही.

🚩 महाराजांनी त्यांच्या काळात कधीही कोठेही मशिदी उभारल्या नाहीत. कोणी तसे सांगत असेल तर ते निराधार आहे. महाराजांनी कधीही कोणत्याही दर्गा वा मशिदीला नव्याने इनाम दिले नाही.

🚩 आपल्या भाषेवर होणारे परकीय शब्दांचे आक्रमणही परतवून लावले पाहिजेत, इतका सूक्ष्म विचार शिवराय करत होते. आणि त्यासाठी व्यवस्था निर्मितीही करत होते.

🚩 हिंदू असणं म्हणजे सर्वसमावेशक असणं. छत्रपती शिवराय हे असे हिंदू होते. त्यांना आपल्या धर्म व संस्कृतीचा अभिमान होता.

🚩 केवळ माझाच धर्म खरा, इतरांचे खोटे... इतकेच नाही तर इतरांचे धर्म नष्ट, भ्रष्ट केले पाहिजेत... मूर्तीपूजा करणाऱ्यांना आपल्या कळपात ओढले पाहिजे... अन्य धर्मीयांना आपल्या कळपात ओढताना त्यांची कत्तल करावी लागली तरी ते योग्यच आहे आणि या कार्यात मृत्यू आला तर आपल्याला स्वर्गात सुंदर स्त्रीया उपभोगायला मिळतील... इत्यादी प्रकारे विचार करणारे काही रानटी टोळ्या या जगात असू शकतात हे हजार वर्षांत कोणत्याही हिंदू राजाला ओळखता आले नाही. किंबहुना आजही बहुतांश लोकांना हे समजलेले नाही. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांना एकांतिक पंथातील धर्मांध टोळ्यांची नीती समजलेली होती. अतिशय मुत्सद्देगिरीने या संकटाला तोंड दिले पाहिजे याची त्यांना जाण होती.

🚩या सर्व मुद्द्यांचा विचार करता छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक होता. या सोहळ्याचे वर्णन हिंदू साम्राज्य दिन अशा शब्दात करणे यथार्थ आहे.

🚩रा. स्व. संघाच्या प्रमुख उत्सवात या दिनाला फार महत्त्व आहे. स्वतःला धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी म्हणणारे बुद्धिजीवी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून स्वतःला दूर ठेवत होते तेव्हापासून, किंबहुना त्या आधीपासून रा. स्व. संघ हिंदू साम्राज्य दिन साजरा करीत आहे.

🚩केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतवर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अलौकिक कार्य पोहोचवण्याचे काम संघ गेल्या ९५ वर्षांपासून करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची सतत उपेक्षा करत आलेल्या गटातील काही मंडळी आज-काल "हिंदू साम्राज्य दिन" या शब्दावलीवर आक्षेप घेत आहेत. केवळ वैचारिक संभ्रम निर्माण करण्याचा हेतू यामागे आहे. बाकी काही नाही.

- सिद्धाराम भै. पाटील
psiddharam.blogspot.com

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी