Monday, June 14, 2021

श्री रामजन्मभूमी ट्रस्ट, आरोप आणि वास्तव

 नेमके काय आहे प्रकरण

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर हे शक्य तितके भव्य दिव्य व्हावे, ही समस्त रामभक्तांची भावना आहे. यासाठी जन्मभूमीलगतचे काही भूखंड ट्रस्टने खरेदी केल्या आहेत. त्यातील १.२ एकर भूमीच्या खरेदीसंदर्भात आरोप झाला आहे. आरोपाची कथानक अशा रीतीने रचण्यात आली आहे की प्रथमदर्शनी घोटाळा झालेला असावा, असे वाटू शकते.

 आम आदमी पक्षाच्या संजय सिंह आणि समाजवादी पार्टीच्या पवन पांडेय यांनी आरोप केला की, “राम मंदिरासाठी जमीन खरेदीत घोटाळा झाला आहे. १८ मार्च २०२१ रोजी पाच मिनिटांपूर्वी जी जमीन दोन कोटीत विकली गेली तीच जमीन ट्रस्टने १८.५ कोटी रुपयांत खरेदी केली. पाचच मिनिटांत जमीन १६.५ कोटी रुपयांनी महाग झाली. या दोन्ही व्यवहारात डाॅ. अनिल मिश्रा हे साक्षीदार आहेत. इत्यादि.’’ परंतु, ही माहिती अर्धसत्य आहे. नितीन त्रिपाठी या अभ्यासकाने आरोप करणाऱ्यांची लबाडी नेमकेपणाने पकडली आहे.

 आरोप करणाऱ्यांनी १८ मार्च रोजी दोन व्यवहार झाल्याचे म्हटले आहे. तिसरा व्यवहार आरोप करणाऱ्यांनी लपवला आहे. वास्तविक पाहता तिसरा व्यवहार १८ मार्च रोजी सर्वात आधी झाला. या व्यवहारानुसार, कुसुम पाठक व हरीश पाठक यांचे सुल्तान अंसारी बिल्डर आणि पार्टनरसोबत दोन कोटी रुपयाला विक्रीचा जो करार होता तो निरस्त करण्यात आला.

 समाजायला सोपे व्हावे म्हणून क्रमाने विषय समजून घेऊया.

 1 - सन २०१९ मध्ये पाठक यांनी ही जमीन दोन कोटी रुपयांत सुल्तान अन्सारी बिल्डर व अन्य ८ भागीदारांना विकण्यासंबंधी करार रजिस्टर्ड केला. या प्रकरणी ५० लाख रुपये देण्यात आले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या वेळी अद्याप श्री रामजन्मभूमी संबंधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागलेला नव्हता. अर्थातच त्या वेळी अयोध्येतील जमीनाचे दर खूप कमी होते.

2 – दि. १८ मार्च २०२१ रोजी पाठक यांनी हा करारनामा रद्द केला. हा करार रद्द झाल्याशिवाय पाठक यांना ही जमीन विकता येणार नव्हती.

3 – मग त्याच दिवशी म्हणजे १८ मार्च रोजी त्यांनी ही जमीन सुल्तान अन्सारी बिल्डरला याच दराने म्हणजे २ कोटी रुपयांना विकली.

4 – मग सुल्तान अन्सारी यांच्याकडून ही जमीन ट्रस्टने १८.५ कोटी रुपयांत खरेदी केली.

 दोन वर्षांपूर्वीची गोष्ट निराळी होती. तेव्हा म्हणजे राममंदिर होईल की नाही याची काहीही खात्री नसताना त्या जमिनीचा दोन कोटी रुपयांत व्यवहार झाला. आता सर्वोच्च न्यायालयाने निसंदिग्धपणे श्री रामजन्मभूमीच्या बाजूने निकाल दिला आहे. त्या ठिकाणी जगातील सर्वात मोठे धार्मिक श्रद्धा केंद्र साकारले जाणार आहे. त्या भूमीशी जोडून असलेल्या १.२ एकर भूमीच्या दरात प्रचंड वाढ होणे नैसर्गिक आहे. ती भूमी १८.५ कोटी रुपयांत खरेदी करणे काहीही चुकीचे नाही. रियल इस्टेटमध्ये जमिनीच्या किंमती कशा रीतीने वाढतात किंवा कमी होतात याचे सामान्य ज्ञान असलेला कोणीही हा व्यवहार योग्य आहे असेच म्हणेल.

 जमिनीचे व्यवहार हे असेच होतात. ही काॅमन प्रॅक्टिस आहे. बिल्डर लोक २५ ते ३० टक्के रक्कम देऊन शेतकऱ्यांकडून दीर्घ काळासाठी लॅन्ड अॅग्रीमेंट करतात. मग ते ही जमीन खरेदी करू शकेल अशी पार्टी शोधत राहातात. शेतकऱ्याने करार करून ठेवला असल्याने बिल्डरला आधी ठरलेल्या दरातच विकण्यासाठी तो बांधील असतो. दरम्यान, जमिनीचे दर वाढतात. बिल्डरला योग्य पार्टी मिळताच तो सौदा करतो. खरेदीदार पार्टीची विवशता किंवा मजबुरी असते की त्याला बिल्डरकडूच खरेदी करावी लागते. कारण बिल्डरने शेतकऱ्याशी करार केलेला असतो. मग रजिस्ट्री करण्याच्या दिवशी बिल्डर हा आधीचा करार रद्द करतो आणि प्राॅपर्टी जुन्या दरानेच खरेदी करतो. आणि नव्या दराने पार्टीला विकून टाकतो.

 जमिनींच्या व्यवहारात प्राॅपर्टी डीलिंगची एक सामान्य प्रॅिक्टस आहे. शहरात बिल्डर लोक असेच अॅग्रीमेंट करतात आणि मग जमीन डेव्हलप करून दर वाढवून विकतात. ओरिजनल पार्टीला आधी ठरलेलाच दर मिळतो, बिल्डरला यात प्रचंड नफा असतो. ही त्यांच्या रिस्कची वसुली असते.

 हिंदु समाजाचा तेजोभंग करणे, हेच काम जे करत आले त्यांनी श्री रामजन्मभूमी मंदिर ट्रस्टवर आरोप केले आहेत. सर्वच आरोप सत्य नसतात. सेंट्रल विस्टा असो, लहान मुलांचे लस दुसऱ्या देशांना का पाठवले असे विचारणे असो वा राफेल आदी.. या सर्व विषयांवर आरोप असे केले गेले की क्षणभर शंका यावी. सत्य सर्वांसमोर आहे. आता रामजन्मभूमी ट्रस्टवर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रकार परिषद घेऊन आरोप करणे  टूलकिटचाच भाग आहे का, माहीत नाही. याची चौकशी झाली पाहिजे.

 क्षुद्र राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कोणी देशाच्या श्रद्धास्थानाशी संबंधीत ट्रस्टवर संशयाचे धुके आणत असेल तर हे गंभीर आहे. हिंदुत्वाला बदनाम करणाऱ्या शक्तींची आजवरची प्रचारशैली पाहा. नॅरेटिव्ह किंवा कथानक अशा रीतीने पुढे आणले जाते की सामान्य माणसाला प्रथमदर्शनी कथानक सत्य वाटू लागते. रामजन्मभूमी ट्रस्टवर झालेले आरोप केवळ बदनामी करण्यासाठी केले आहेत, यात काही संशय नाही. कोणीही कोठेही भ्रष्टाचार किंवा फसवणूक केली असेल तर संबंधितांवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु, हिंदुंचा तेजोभंग करणे एवढ्याच उद्देशाने पुन्हा पुन्हा खोटे आरोप होत असतील तर कायदेशीर मार्गाने स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त झाला पाहिजे.

 केदारनाथ ढगफुटीच्या वेळी नरेंद्र मोदी यांच्यासंबंधी अशीच खोटी बातमी चालवली गेली. नंतर संबंधीत मीडिया हाऊसने क्षमा मागितली. कठुआ प्रकरणीही असेच कथानक रचले गेले. अनेक महिने खोट्या बातम्यांचा रतीब घातला गेला. मुख्य आरोपी त्या दिवशी कठुआपासून शेकडो किलोमीटर दूर असल्याचे एटीएमच्या सीसीटीव्हीमुळे सिद्ध झाले. अशी शेकडो उदाहरणे आहेत. रामजन्मभूमीवर मंदिर होऊ नये यासाठी आकाशपाताळ एक करणाऱ्यांनी आता आणखी एक आघात केला आहे.

  ‘आरोप आम्हाला नवीन नाहीत, आम्ही त्याची चिंता करत नाही, तुम्हीही करू नका. आता काहीच सांगायचे नाही. या प्रकरणाचा अभ्यास करण्यात येईल.’, असे ठामपणे ट्रस्टचे महासचिव आणि ज्येष्ठ प्रचारक चंपत राय म्हणाले ते बरेच झाले. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या संस्कृतीसाठी, या राष्ट्रासाठी समर्पित केले आहे, असे त्यागी लोक लोक श्री रामजन्मभूमी ट्रस्टवर आहेत. तीन दशकांहून अधिक काळ समर्पित भावनेने रा. स्व. संघाच्या माध्यमातून कार्य करणारे डाॅ. अनिल मिश्रा यांनी ट्रस्टचे प्रतिनिधी म्हणून भूमी खरेदीचा व्यवहार केला आहे. ट्रस्टचे काम कोणा एका व्यक्तीच्या इच्छेने चालत नाही. निर्णय प्रक्रियेत सर्वांचा सहभाग असतो. संघाचे हे संस्कार आहेत. जन्मभूमीलगत मोकळी असलेली जेवढी भूमी बाजारभावाने घेता येईल, ती घ्यायची आणि होता होईल तेवढे भव्य दिव्य जन्मभूमी मंदिर उभारायचे, ही हिंदू समाजाची भावना आहे. ट्रस्टने तेच काम केले आहे. या गैरव्यवहार नाही किंवा घोटाळाही नाही.

-       -  सिद्धाराम भै. पाटील

----------

ही माहिती शेअर करण्यासाठी वा कापी पेस्ट करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही.

Friday, January 8, 2021

विनाकारण माहोल का खराब कोण करत आहे ?


मुस्लिमांची संख्या जास्त आहे त्या भागातून रॅली काढू नका, अशी ही बातमी आहे.

सर्वसामान्य माणूस या बातमीकडे कसा पाहातो? अरे हे योग्यच आहे की. मुस्लिमबहुल भागातून रॅली का काढायची? विनाकारण माहोल का खराब करायचा ?. यामागे एक भावना असते की विनाकारण वाद नको. यामुळे गंगा जमनी तहजीब धोक्यात येईल. समाजाची एकता उसवली जाईल. वरवर पाहता हा विचार योग्यच आहे, असे वाटू शकते.
परंतु, इतका वरवरचा विचार करून सोडून देण्यासारखा हा विषय नाही, असा विचार करणारा एक मोठा वर्गही देशात आहे. तो वेगळ्या पद्धतीने विचार करतो.
मुस्लिम इलाख्यातून रॅली का काढायची नाही? देशाच्या कोणत्याही भागातून रॅली काढण्याचा हक्क घटनेने दिला आहे की नाही? मुस्लिम इलाख्यातून रॅली काढायचा नाही, ही मागणी मान्य झाली तर उद्या हिंदूंनीही अशीच भूमिका घेतली तर? तर काय होईल? हिंदू इलाख्यात मशिदी नकोत, हिंदू इलाख्यात बांगचा आवाज ऐकायला येऊ नये, अशी मागणी लोकांनी करायला सुरूवात झाली तर देशात ऐक्य राहील काय? असा विचार करणारा एक मोठा वर्ग देशात तयार हाेत आहे.
येथे मला एक उदाहरण आठवते. गुजरातमधील डांग जिल्ह्यातील ही घटना आहे. या वनवासी भागात फार मोठ्या प्रमाणात मतांतर झाले आहे. वनवासी बांधवांना प्रलोभने दाखवून, त्यांच्या गरीबीचा गैरफायदा घेऊन त्यांना ख्रिस्ती बनवण्यात आले आहे. कांॅग्रेस सत्तेत असताना भवानीशंकर नियोगी आयोग नेमला होता. त्यामध्ये याबद्दल फार विस्तृत माहिती आहे. ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांनीही याबद्दल पुष्कळ लेखन केले आहे.
डांग जिल्ह्यातील एका गावात मतांतर झाल्याने ख्रिश्चन बनलेल्यांची संख्या अधिक झाली. त्या गावामध्ये एका मतांतर न केलेल्या व्यक्तीने आपल्या मालकीच्या जागेत मंदिर उभारण्याचे ठरवले. गाव ख्रिश्चनबहुल आहे आणि त्यामुळे तुम्हाला येथे आता नव्याने मंदिर बांधता येणार नाही, अशी भूमिका तेथील ख्रिश्चनांनी घेतली. तेथे यावरून दंगल उसळली. दोन दशकांपूर्वीची ही गोष्ट आहे. देशातील मुख्य वृत्तपत्रे आणि टीव्ही मीडियातील बहुतेकांनी तेथे हिंदुंनाच जातीयवादी ठरवले. ख्रिस्तीबहुल भागात मंदिर बांधायची गरजच काय, अशी भूमिका घेण्यात आली.
अशीच एक घटना कोरोना काळात घडली. तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यातील एका गावातली ही घटना. ख्रिस्ती झालेल्यांची संख्या त्या गावात ५२ टक्के आहे. त्या गावातील एका मंदिराच्या आवारात भारतमातेची मूर्ती स्थापित करण्यात आली. तेथील काही ख्रिस्ती लोकांनी पोलिसांत तक्रार दिली. रस्त्यावरुन जाताना ही मूर्ती दृष्टीस पडते आणि त्यामुळे आमच्या भावना दुखावतात, अशी ती तक्रार होती. लगेच पोलिसांनी कारवाई करत भारतमातेची मूर्ती कापडाने झाकून टाकली. मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्यावर मूर्ती मुक्त झाली.
आपल्या देशात लाखो गावांमध्ये आजही हिंदू बहुसंख्येने आहेत. जेथे हिंदू बहुसंख्येने आहेत तेथे मशिदी आणि चर्च उभारायला नको, अशी भूमिका हिंदू समाजाने कधी घेतली आहे का? शहरांमधील कोणत्याही हिंदू भागात मशिदी, चर्च उभारू नका, म्हणून कोणत्या हिंदूने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे का? समजा असे निवेदन दिले तर तसे करणे योग्य होईल का? असे प्रश्न विचारणारा एक वर्ग समाजात तयार झाला आहे.
असे प्रश्न निर्माण होतातच कशाला? हे समजून घेतले पाहिजे.
जगात एकमेव माझाच रिलीजन किंवा मजहब खरा आहे. इतर सर्व लोकांनी मतांतर करून माझ्याच रिलीजन वा मजहबचा स्वीकार केला पाहिजे, असा विचार एकांतिक रिलीजनकडून शेकडो वर्षांपासून मांडण्यात आला आहे. दुसऱ्या धर्माचे अस्तित्वच स्वीकारायचे नाही, हा तो विचार आहे. जगभरात होणाऱ्या धर्मांतराच्या मागे हाच एकांतिक विचार आहे. मुस्लिम आणि ख्रिस्ती पंथांमध्ये हा संकुचित विचार प्रबळ आहे. संपूर्ण जग ख्रिस्ती बनले पाहिजे किंवा संपूर्ण जग दार उल इस्लाम बनले पाहिजे, असा विचार त्या त्या पंथांतील प्रमुख गटांकडून राबवण्याचा प्रयत्न होत असतो. यातूनच धर्मांतर, जिहाद वगैरे प्रकार पुढे येतात. आमच्या इलाख्यातून इतर धर्मियांची रॅली नको, गणपतीची मिरवणूक नको, आमच्या गावात मंदिर नको… वगैरे मागणीमागे माझाच एकमेव धर्म खरा हा संकुचित विचार आहे.
हिंदू हा समावेशक धर्म आहे. सर्वच धर्म सत्य आहेत. कोणत्याही मार्गाने तुम्ही इश्वरापर्यंत पोहोचू शकता. ईश्वर कणाकणांत आहे. ईश्वर एक आहे पण तो अनेक रूपातून व्यक्त होतो, हा हिंदू विचार आहे. हिंदू धर्म हा इतर धर्मांचे, रिलीजनचे, पंथांचे अस्तित्व मान्य करतो. मुस्लिम आणि ख्रिश्चन पंथातील विचारी लोकांनीही इतर धर्मांचे अस्तित्व मान्य करावे, यातूनच जगात शांती नांदेल, असे आवाहन स्वामी विवेकानंद यांनी केले होते.
थोडक्यात, गंगा जमनी तहजीब वाढायची असेल, समाजातील एकता वाढीस लागायची असेल तर आमच्या इलाख्यातून रॅली नको.. वगैरे भूमिका न घेता आम्ही रॅलीवर पुष्पवृष्टी करू.. आपण गुण्यागोविंदाने नांदू. मुस्लिम इलाख्यातून जाणाऱ्या मिरवणुका, रॅली यांचे स्वागत करू. सहकार्य करू अशी भूमिका घेतली पाहिजे. यामुळे मूळत:च सहिष्णू असणाऱ्या हिंदूंच्या मनात मुस्लिम समाजाविषयी शतपटीने प्रेमाची भावना निर्माण होईल. हिंदू मुस्लिम एकता ही समस्या राहाणार नाही. राजकीय लोक गैरसमज निर्माण करण्यासाठी पुढे येतील. त्यांना दूर करा. हिंदू – मुस्लिम यांनी एकमेकांचा आदर करणे हीच खरी मानवता आहे. ती वाढली पाहिजे. परंतु, ती वनवे असणार नाही. आमच्या इलाक्यात येऊ नका, असा फुटीर विचार करून विश्वासाचे वातावरण तयार होऊ शकत नाही.
सिद्धाराम
080121

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी