Tuesday, January 20, 2009

अडाणी निरक्षर की जागरूक साक्षर



मकरंद मुळे


गझलकार सुरेश भट यांच्या एका गझलेच्या ओळी थोड्या बदलून "पुन्हा पुन्हा चूक तीच ती आम्ही करीत गेलो,
"त्यांचाच' खुनी हात परत धरत गेलो।।
आपली सामूहिक स्थिती यापेक्षा फारशी वेगळी नाही. घटना घडतात. आक्रोश होतो. चर्चा होते. श्रद्धांजलीच्या सभा होतात आणि आता होर्डिंग्जही लागतात, परंतु अजूनही आपल्या देशाचा नेमका शत्रू कोण? आपल्याला कोणाला धडा शिकवायचा आहे ? याबद्दल आपण अज्ञानी आहोत. अडाणीपणाची ही स्थिती सार्वत्रिक आहे. माध्यमे, नोकरशहा, राजकारणी, बुद्धिवंत, स्वयंसेवी संस्था (एनजीओ) व निधर्मी (?) आदी त्यांच्या निहित स्वार्थासाठी (वेस्टेड इंटरेस्ट) व वैयक्तिक अजेंड्यासाठी मिशनरी, इस्लामिक व कम्युनिस्ट दहशतवादाबाबत निरक्षर राहू इच्छितात. सर्वसामान्य भारतीय त्याच्या रोजच्या जगण्याच्या संघर्षात इतका गुरफटलेला आहे की, या निरक्षरतेविषयी त्याला काही सोयरसुतक नाही आणि म्हणून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर दहशतवाद या शब्दामागे "स्वदेशी' शब्द हेतूत: लिहितात. दिशाभूल करणारा नवा शब्द "कॉईन' करून स्थापित करण्याची बौद्धिक चूक करू शकतात. गैरसमज पसरविणारी वैचारिक खेळी करतात, याला त्याच परिभाषेत सणसणीत प्रत्युत्तर देण्याचे धाडस करण्यात आपण असमर्थ आहोत. आपली बौद्धिक उदासिनता याला कारणीभूत आहे. खरे तर कुमार केतकर यांच्या "स्वदेशी दहशतवाद' यातील बुद्धिभेद उघड करणे फारसे अवघड नाही. मुळातच दहशतवाद हा भारतीय भूमीतला नाही. ही भूमी दहशतवादाची बळी ठरलेली आहे. परकीयांनी साम्राज्य विस्तार, धर्म विस्तार व कम्युनिझमचा पगडा यासाठी भारतात दहशतवाद आणला. रशिया, चीन, युरोप, अमेरिका, इंग्लंड व इस्लामिक देशांतून आलेला हा दहशतवाद यत्किंचितही निर्बुद्ध नाही. या दहशतवादाने मूळनिवासी, बहुजन-अभिजन, दलित-दलितेतर, अल्पसंख्याक, आर्य-अनार्य, नेशन इन मेकिंग, निधर्मीवाद, धर्मनिरपेक्षता वंचित-शोषित अशी अ-भारतीय परिभाषा बेमालूमपणे रूढ केली आहे. केतकरसारख्या प्रभृतींनी ती प्रचलित केली आहे. याचा आधार घेऊन या परकीय दहशतवादाने भारतीय सण, परंपरा, संस्कृती, उत्सव, मान्यता यांवर पाश्चिमात्त्य मापदंडाच्या आधारे टीका करून सामाजिक विद्वेष पसरविला. प्रलोभने, धाकधपट याद्वारे छुपे धर्मांतर सुरू केले. भारतीय समाजाची मानसिकता लक्षात घेऊन या दहशतवादाने सेवेचा मुखवटा धारण केलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपले तत्त्वज्ञान मांडण्यास सुरुवात केली. या स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) इंग्रजी प्रसारमाध्यमांनी सामाजिक नेतृत्व बहाल केले आहे. दहशतवाद, तत्त्वज्ञान म्हणून रुजला, कारण एक प्रचंड अर्थकारण, दुसरे "जुने जाऊ द्या मरणा लागोनी' ही वृत्ती, तिसरे परक्यांचे आकर्षण, चौथे इतिहासाकडे दुर्लक्ष, पाचवे वैचारिक-बौद्धिक क्षेत्राविषयी अनास्था, सहावे भ्याड व तडजोडी वृत्ती आणि सातवे "स्व'त्वाचा शोध नाकारणे हे आहे.
ज्यांना तत्त्वज्ञानाच्या रूपात दहशतवाद सांगणे अवघड असते किंवा कळत नाही; पण ज्यांना मरण्याची, मारण्याची भाषा कळते त्यांच्या हातात बंदूक-बॉम्ब देणे सोपे असते. त्यांचे पंथीय, भाषिक, जातीय अहंकार जागवून त्यांच्या तत्कालीन गरजा पूर्ण करून आपल्याला हवे ते कृत्य करून घेता येते. इथे कुमार केतकर यांच्या परिभाषेतील स्वदेशी दहशतवाद पुढे येतो. हा "स्वदेशी' दहशतवादी "केवळ जन्माने' भारतीय असतो. त्याचे केवळ "डोमिसाईल' भारतीय असते. तो "काया वाचा मनाने' परकीय झालेला असल्यानेच तो भारतविरोधी दहशतवादी कृत्य करू शकतो. किंबहुना, तो अनेकदा धर्मांतरित असतो; ज्याची नोंद झालेली नसते. हे सर्व सविस्तरपणे लिहिण्याचे कारण कुमार केतकर यांनी आसाममध्ये नुकत्याच झालेल्या स्फोटांचा संदर्भ घेऊन लोकसत्तेच्या अग्रलेखात स्वदेशी दहशतवादाची चर्चा केली आहे. ज्या भारताच्या भूभागाचा संदर्भ कुमार केतकर देतात तो पूर्वांचल मिशनरी कारवाया व बांग्लादेशी घुसखोरीने त्रस्त आहे. स्वातंत्र्यापासून "नेहरू डॉक्टरीन'चे कुमार केतकर चाहते आहेत. त्या "नेहरू डॉक्टरीननेच पूर्वांचलावर जाणीवपूर्वक अन्याय केला आहे. याच जवाहरलाल यांनी जम्मू-काश्मीर प्रश्न युनोत नेला. पूर्वांचल व जम्मू-काश्मीरमध्ये फुटिरतावाद जोपासला गेला. हा फुटिरतावाद राजकारण्यांनी सत्तेसाठी वापरला, हाच फुटिरतावाद आता दहशतवादाच्या रूपात थैमान घालत आहे. याला "स्वदेशी' हे विशेषण लावणे म्हणजे भारतविरोधकांच्या हाती कोलित देणे आहे. हे न कळण्याइतके केतकर साहेब निरागस नाहीत. तरीही कुमारजी असे लिहितात म्हणजे ते दहशतवादाबद्दल सोईने निरक्षर राहू इच्छितात. प्रत्येकाच्या अशा सोईच्या भूमिकांमुळेच दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी "राष्ट्रीय भूमिका' तयार होत नाही. दहशतवादाला धर्म नसतो, असा कंठशोष बेंबीच्या देठापासून करायचा आणि त्याचवेळी "स्वदेशी' दहशतवादाचे पिल्लू सोडून द्यायचे या दुटप्पीपणाने समूहमन घडत नाही, ते गोंधळते. असे गोंधळलेले नागरिक "मला काय त्याचे?' या मानसिकतेत जातात व कर्तव्य विसरतात. या पार्श्वभूमीवर आणखी काही बातम्या पाहूया.
दि. 31 डिसेंबरच्या "हिंदुस्थान टाईम्स'ने वर्षभरातील काही प्रमुख घटना प्रकाशित केलेल्या आहेत. यात या इंग्रजी दैनिकाने ओरिसातील चर्चवरील हल्ला याची नोंद घेतली आहे, पण समाजसेवक स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची मिशनरी पुरस्कृत निर्घृण हत्या हिंदुस्थान टाईम्सला नोंदवावी असे वाटले नाही. दि. 1 जानेवारी 09 च्या "दि टाईम्स ऑफ इंडिया'च्या पहिल्या पानावर रशिया येथून हनिमूनसाठी आलेल्या दांपत्याने "लॉंग किस' देऊन नववर्षाचे स्वागत केल्याचे छायाचित्र प्रकाशित केले आहे. मात्र त्याच रात्री ठाण्यातील शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन दहशतवादाच्या विरोधात राष्ट्रगीत गायन करून नव्या वर्षाचे स्वागत केल्याची बातमी छापावीशी वाटली नाही. मंगलोर (कर्नाटक) येथे चर्चवर हल्ला झाल्याची, ख्रिश्चनांना मारहाण झाल्याची बोंब एकमुखाने प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडियाने दणदणीतपणे मारली, परंतु "न्यू लाईफ ख्रिश्चन सेक्ट'च्या घटनाविरोधी कारवायांविषयी माहिती देण्याची हिंमत कोणी केली नाही. या सेक्टने "सत्यदर्शिनी' या पुस्तिकेचे मंगलोर, उडपी, चिकमंगळूर परिसरात मोठ्या प्रमाणात वाटप केले होते.
या पुस्तिकेतून हिंदू देवदेवतांची विटंबना करण्यात आली होती.या सेक्टने अनधिकृत प्रार्थनास्थळे (चर्च) उभारली आहेत. मंगलोरमधील संघर्ष पोलीसविरुद्ध न्यू लाईफ असा झाला होता. ज्याला तथाकथित "नॅशनल मिडिया'ने आपल्या मालकांशी एकनिष्ठता राखून हिंदू-ख्रिश्चन दंगल असे स्वरूप दिले होते. प्रत्यक्षात न्यू लाईफच्या प्रार्थनास्थळातून पोलिसांवर दगडफेक झाली होती. मिशनरी समर्थकांनी जनजीवन विस्कळीत केले होते. पोलिसांनी या प्रार्थनास्थळावर कारवाई केल्यावर त्यांना अवैध शस्र मिळाली होती.
दि. 27 डिसेंबर रोजी "द इंडियन एक्स्प्रेस' या दैनिकाने ओरिसातील कंधमहाल येथील हुतात्मा स्वामी लक्ष्मणानंद यांच्या हत्येविषयी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी "हेडिंग'म्हणून प्रकाशित केली होती. अतिशय सविस्तर असलेल्या या बातमीत सीआयडीने कॉंग्रेसचे राज्यसभा सदस्य राधाकांत नायक यांना सबळ पुराव्याच्या आधारे स्वामीजींच्या हत्येसाठी दोषी ठरविले असल्याचे म्हटले आहे. इंडियन एक्स्प्रेसने या बातमीचा सलग तीन दिवस पाठपुरावा केला आहे. स्वाभाविकच ही बातमी देणे म्हणजे सेक्युलॅरिझमच्या विरोधात जाणे ठरले असते हे जाणून अन्य सर्व माध्यमांनी ही बातमी दुर्लक्षित केली. हा सर्व घटनाक्रम माध्यमे दहशतवाद व राष्ट्रविरोधी कारवायांना पुष्ट करत आहेत हे दर्शविणारा आहे.
ईमेलद्वारा दोन बातम्या स्वरूपातील माहिती मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर एकमेकांना मोठ्या संख्येने पाठविल्या जात आहेत. यातील एक मेल दहशतवाद्यांनी ताज हॉटेलमध्ये 60तास ओलीस ठेवलेल्या व नंतर ठार केलेल्या स्री, पुरुष, लहान मुलांशी केलेल्या विकृत अमानवी व्यवहाराची इत्यंभूत माहिती देणारा आहे. डोळे काढणे, बोट कापणे, नख उपटणे, स्रियांच्या गुप्तांगात गोळ्या घालणे, पाशवी बलात्कार करणे, केस उपटणे, ओलिसांवर विशेषत: मूल व स्रियांवर लघवी करणे, त्वचा खेचणे, कान-नाक यासह अन्य अवयव कापणे अशी माणुसकीला काळीमा फासणारी ही कृत्ये आहेत. मेलमधील माहितीनुसार या दुर्दैवी नागरिकांना "अधिकृत मृत' घोषित करणाऱ्या डॉक्टरांनी व त्यांची प्रेते शवागारात ठेवणाऱ्यांनी ही माहिती दिली असल्याचे म्हटले आहे. या माहितीच्या आधारे दै. सामना व दै. लोकमत व्यतिरिक्त कुठल्याही "मोठ्या' वृत्तपत्राने बातमी दिलेली नाही. कुठल्याही वृत्तवाहिनीला ही ब्रेकिंग न्यूज वाटलेली नाही. विशेष म्हणजे ही बातमी (मेल) अतिरंजित, कपोलकल्पित असल्याचे कुठल्याही शासकीय यंत्रणेने अद्याप म्हटलेले नाही. दुसरी मेल दक्षिणेतील एका नागरिकाने सर्व वाहिन्यांना पाठविलेली आहे. वािहन्यांनी 60 तास बातमी दिली ती ताज, ओबेराय येथील धुमश्चक्रीची, छत्रपती शिवाजी टर्मिंनस या सर्वसामान्य माणसाच्या रेल्वेस्थानकाकडे दुर्लक्ष करण्यात आले.
ज्यांना यापूर्वी देशातील कुठल्याही दहशतवादी कृत्याची झळ पोचली नव्हती, ज्यांना स्फोटात मरणाऱ्या भारतीयांच्या रक्ताची किंमत नव्हती अशा उच्चभ्रूंचे दु:ख ग्लोरीफाय करण्यात धन्यता मानली. ही सर्व उदाहरणे "त्यांचाच' खुनी हात परत धरत गेलो, याची साक्ष देतात.
"बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो...'
हे समाजवादी स्वप्नरंजन वास्तवात परावर्तित करायचे असेल तर भारतीय संस्कृतीशी ओळख करून घ्यावी लागेल. आपल्या मूळांचा शोध घ्यावा लुागेल. (बॅक टू रुटस्‌) असा प्रयत्नपूर्वक शोध अरुणाचल प्रदेशातील तरुणांनी नुकताच घेतला आहे. चार हजार तरुण-तरुणींनी स्वधर्म युवा महोत्सवात भाग घेतला होता. (इंडिजीनस्‌ युथ फेस्टिव्हल) अरुणाचलात 1952 साली पहिले चर्च उभारले गेले आहे. त्यानंतर धर्मांतराला सुरुवात झाली. 1980 नंतर ख्रिस्ती धर्मप्रसारक आक्रमक झाले आणि त्यांनी अरुणाचलात थैमान घातले. याच्याविरोधात 1986 साली पासीघाट येथे तालुम रुकबो यांनी "दोन्थी पोलो येलम केवांग' या नावाने साकार उपासना पद्धती सुरू केली. दोन्थी पोलो याचा अर्थ सूर्यचंद्र असा आहे. दद्य जिल्ह्यात 450पेक्षा अधिक ठिकाणी गांगीर (आदि), न्योदर नाम्लो (न्यीटी), मेदर नेलो (आपातामी), इंगतोंगहोम (तांगसा, तुक्सा, नॉवटे) अशा विविध भाषांतून उपक्रम सुरू झाला आहे. राज्यात विविध जनजातींच्या स्वधर्म संघटनात समन्वय असावा यासाठी "इंडिजीनस फेथ ऍन्ड कल्चरल सोसायटी ऑफ अरुणाचल प्रदेश' ही समिती कार्यरत आहे. या समितीतर्फे युवा महोत्सव होतो. यंदाच्या युवा महोत्सवात अरुणाचल राज्यातील 15 जिल्ह्यांतील 16 जनजातींच्या युवक-युवती सहभागी झाल्या होत्या. या महोत्सवात स्वधर्म रक्षणात युवकांचा सहभाग, बांग्लादेशी घुसखोरी, चीनचे छुपे आक्रमण या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. समाजावरील संकट, राष्ट्रावरील आक्रमणाला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. स्वधर्म रक्षणासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याचा संकल्प झाला. धर्मांतरांवर कायद्याने बंदी आणण्याची मागणी केली गेली. भारतीय संस्कृतीच्या शत्रूंना इशारा देण्यात आला. अरुणाचलातील तरुणाईने प्रतिकूल परिस्थितीतही आपला शत्रू ओळखला आहे. दहशतवादाविरुद्ध साक्षरता अभियान सुरू केलेले आहे. अज्ञानाचे आवरण काढून राष्ट्रीय विचारांचे ज्ञानदीप प्रज्वलित केले आहेत.
वाचकहो, आता आपण निरक्षर, अडाणी राहणार की साक्षर होऊन शत्रूची ओळख करून घेणार ? हा कळीचा मुद्दा आहे.
mak2244@gmail.com
9869296109

Monday, January 19, 2009

पत्रकारांची कार्यशाळा


सोलापुरातील शिवस्मारक येथे शनिवार, दि। 17 जानेवारी 2009 रोजी "पत्रकारितेतील नवे प्रवाह' या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. पत्रकारांमध्ये उत्साह आणि स्फूर्ती आणणारा हा उपक्रम ठरला।
पत्रकार प्रशिक्षित असतो तेव्हा तो अधिक कुशलतेने आपले दायित्व पार पाडू शकतो, परंतु विडंबना तेव्हा होते, जेव्हा पत्रकार जुना होतो. मात्र, तो अप्रशिक्षित राहतो. जुना असल्यामुळे त्याला वाटू लागते की, आपल्याला सारं काही येतं. माहिती आणि अनुभवाच्या स्तरावर ते खरंही असतं, परंतु व्यवस्थित प्रशिक्षण आणि वैचारिक स्पष्टतेअभावी त्याच्या व्यक्तिमत्त्वात एक साचलेपण येऊ लागतं. अशा वेळी प्रवाही न राहलेल्या साचल्या पाण्याचे जे होते, ते पत्रकाराचे होणे अगदी स्वाभाविकच आहे म्हणूनच प्रशिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते।
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची धुरा दशरथ वडतिले यांच्याकडे आल्यापासून सोलापुरातील पत्रकारितेने जणू कात टाकली आहे. सोलापुरातील पत्रकारांमध्ये संघभाव निर्माण झाला आहे. एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आत्मविश्वासाला गुणवत्तेची जोड असेल तर विधायकता येते, हे ध्यानात घेऊन संघातर्फे खास पत्रकारांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. सोलापूर विद्यापीठ जनसंज्ञापन विभाग आणि पत्रकार संघाने आयोजिलेली शनिवारची कार्यशाळा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरली।
शहर-जिल्ह्यातील पत्रकारांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, जळगाव, लातूर, धाराशिव, धुळे, नगर, कोल्हापूर आदी भागातील पत्रकारितेचे विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले होते. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दीर्घकाळ प्रभावीपणे काम करीत असलेले डॉ. समीरण वाळवेकर व प्रसाद काथे यांच्या सत्रांनी कार्यशाळेला एका उंचीवर नेऊन ठेवले. पत्रकारितेत नव्याने येऊ घातलेल्या संकल्पना सुलभपणे सांगण्याची हातोटी समीरण यांच्याकडे आहे।
पत्रकारांना घडविण्याच्या प्रक्रियेत बदल होणे आवश्यक आहे. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना केवळ कालबाह्य अभ्यासक्रम शिकविणे उचित होणार नाही. सगळ्याच वाहिन्या या उदात्त ध्येयाने नाही, तर व्यावसायिक उद्देशाने सुरू करण्यात आल्या आहेत. आता माध्यमकर्मींना तंत्रज्ञानाची भाषा समजून घ्यावीच लागेल. मुद्रित क्षेत्रातील अनुभवी मंडळी इलेक्ट्रानिक माध्यमांत येण्यास तयार नाहीत, हे दुर्दैवी चित्र आहे. विद्यापीठांनी पत्रकारिता अभ्यासक्रम अद्ययावत केला पाहिजे, असे विचार वाळवेकर यांनी मांडले।
दुर्दैवाने इलेक्ट्रानिक मिडियाला समर्पित असा अभ्यासक्रम कोठेही शिकविण्यात येत नाही. दीड ते दोन लाख रूपये शुल्क भरून सर्वसामान्य विद्यार्थी या कोर्सेससाठी जाणे कठीण आहे. त्यामुळे या क्षेत्रात कच्च्या मालाची अर्थात नवोदित क्षमतावान पत्रकारांची निकड जाणवते. लोकांनी आपली निवड सुधारायला हवी. माध्यमांवर सरकारने नाही तर जनतेने अंकुश ठेवायला हवा, असे विचार प्रसाद काथे यांनी व्यक्त केले. सोलापुरातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी अध्यक्षस्थान भूषविले. अध्यक्षीय भाषणांतून काही प्रमाणात पत्रकारांमध्ये ध्येयवाद जागविण्याचा प्रयत्न झाला।
संतोष पवार, प्रवीण सकपाळ, दीपक होमकर सारख्या तरुण पत्रकारांनी कार्यशाळेतील सत्रांमध्ये समन्वयकाची भूमिका यशस्वीपणे बजावली. पत्रकारितेत येणाऱ्या नव्या प्रवाहाशी कसे जुळवून घ्यायचे आणि एक पत्रकार म्हणून स्वत:चा विकास कसा करायचा याबद्दलची शिदोरी साऱ्या तरुण पत्रकारांना या कार्यशाळेतून निश्चितच मिळाली.कार्यकुशलता अंगी बाणवण्याच्या दृष्टीने कार्यशाळा यशस्वी झाली, असा भाव बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता, परंतु कार्यशाळेत वैचारिक स्पष्टतेच्या अंगाने विचारमंथन झाले असते तर कार्यशाळा आणखी सार्थक ठरली असती असे वाटते।
26/11 च्या घटनेबद्दल बरीच चर्चा झाली. या घटनेत सरकार कसे निष्क्रिय होते. प्रशासकीय स्तरावर ताळमेळ कसा नव्हता. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचा बेजबाबदारपणा आणि त्यामुळे त्यांची गच्छंती कशी झाली? याची चर्चा झाली. मात्र, या देशात अतिरेकी हल्ले का होतात? जिहादी मानसिकतेचे मूळ कोठे आहे? राज्यकर्ते गठ्ठा मतांकरिता दहशतवादाला पाठिशी कसे घालतात? वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार राज्यकर्त्यांच्या या ढोंगी धर्मनिरपेक्षतेकडे दुर्लक्ष का करतात? घटनेनुसार सर्वधर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारण्यात आले असतानाही गोरगरीब हिंदूंचे धर्मांतरण करण्यात येते, यामुळे समाजात असंतोष निर्माण होतो. अशावेळी अल्पसंख्यकांच्या बाजूनेच बातमीदारी का करण्यात येते? यामागे परकीय षडयंत्र असते का? अशा या देशाला छळणाऱ्या महत्त्वपूर्ण विषयांबाबत पत्रकार म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? याचा ऊहापोह झाला असता, तर यशस्वी झालेली ही कार्यशाळा आणखी परिपूर्ण यशस्वी झाली असती, असे वाटते।

१९ जनुअरी २००९ पान ४ , तरुण भारत। सोलापुर

Sunday, December 28, 2008

सारखी लायकी


सारखी लायकी नको बढायकी
कुणी कुणासंग भांडायचं न्हाय
गावकीत अमुच्या ठरलच हाय ।।धृ।।

जमीन जुमला अन्‌ गोठ्यातली गाय
कर्जापाण्यापायी इकायची न्हाय
मौजेत पुख्खा ताडीन्‌ माडी
आल्यागेल्याबरूबर प्यायाचं न्हाय ।।1।।

इठुरखुमाईच्या भक्तीशिवाय
गावून डोलून त्या भजनात काय
सरसी करायला तालासुरांची
डोस्क्यात टाळ कुणी घालायची न्हाय ।।2।।

गावोगावी वर्ग सुरूच हाय
केंद्राबिगर गाव सोभायचं न्हाय
आपल्याच गावात ऱ्हायाचं थाटात
भिवूनशान्‌ आता भागायचं न्हाय ।।3।।

Tuesday, December 23, 2008

समर्थ भारत


जगात सर्वात कार्यक्षम आणि सर्वात वजनाने हलकी, लहान लढाऊ विमान भारताने विकसित केले आहे।
कांची पीठातर्फे चालवली जाणारी चेन्नई येथील शंकर नेत्रालय हे आधुनिकता आणि सेवा यात आशिया खंडात सर्वप्रथम आहे।
मुंबई उपनगरीय रेल्वे दररोज 59 लाख प्रवाशांची वाहतूक करते। जगातली ही सर्वाधिक संख्या आहे.
1077 उपनगरीय रेल्वे केवळ 288 ट्रॅकवर धावतात, ही आश्चर्यजनक किमया आहे।
जगातली पहिली 4 stroke gear scooter बजाज कंपनीने 25 जुलै 1991 रोजी बाजारात आणली।
जय हिंद! जय हिंद की सेना॥ भारताची भूदल सेना (1 कोटी 10 लाख) जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे।
जय हिंद! जय हिंद की सेना॥ भारताची भूदल सेना (1 कोटी 10 लाख) जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे।
"जयपूर फुट' artificial limbs of Jaipur जगात प्रसिद्ध आहे।
भारतात 5195 औद्योगिक कंपन्या असून जगात भारत यात दुसऱ्या क्रमांकावर आहे।
संस्कृत ही प्राचीन भारतीय भाषा संगणकासाठी सर्वाधिक उपयुक्त असल्याचे जगाने मान्य केले आहे।
पाणिनी व्याकरणाची तत्वे सांकेतिक भाषेतून आज software निर्मितीत वापरली जातात।
अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही संस्था जगातील अग्रगण्य संस्थांत गणली जाते।
जगातील सर्वात मोठे टपाल खाते भारतात आहे।
सोलापूर वालचंद कॉलेजमधील प्रा। सयाजीराव गायकवाड (वय 35) यांनी विज्ञानाला अज्ञात असलेल्या 10 वनस्पती शोधल्या आहेत.
कॅन्सरवर effective painkiller चा शोध भारतातील प्रा। अश्रु सिन्हा व त्यांच्या सहकाऱ्यांनी लावला.
अभिनव बिंद्रा यांनी 600 पैकी 600 गुण मिळवून नेमबाजीत जागतिक विक्रम केला आहे।
रेल्वे नेटवर्किंग आणि अधिक सुरक्षित प्रवास यातही भारत सर्वप्रथम आहे।
जगात 8 व्या नंबरची लोकप्रिय व्यक्ती नारायणमूर्ती (Infosys चे अध्यक्ष) असून ते जनसेवेसाठी उत्पन्नातील 12 कोटी रुपये दरवर्षी राखून ठेवतात।
लता मंगेशकर यांनी 1991 पर्यंत 20 भारतीय भाषांतून 30 हजार गाणी ध्वनिमुद्रित केली होती।
जगात सर्वाधिक सिमेंट उत्पादन करणारा देश भारत आहे।
जपान, अमेरिकेनंतर super computer बनवणारा भारत हा एकमेव देश आहे।
स्वत:ची उपग्रह प्रक्षेपण क्षमता असणाऱ्या जगातल्या 6 देशांत भारताचा समावेश आहे। इतर देशांचे उपग्रह भारत भाडेतत्वावर प्रक्षेपित करतो.
जगातली सगळ्यात मोठी चित्रपट सृष्टी भारतात असून सर्वात जास्त चित्रपट भारतात बनविले जातात।
UNESCO कडून पुस्तकांची राजधानी म्हणून 2003 साली दिल्लीची निवड करण्यात आली।
विनोद धाम हे Hardware (pentium) चे पिता म्हणविले जातात।
Hotmail चे निर्माते साबिर भाटिया हे भारतीयच।
जगातली पहिली महिला विमानचालक भारतीय आहे।
जगात सर्वाधिक सायकली भारतात निर्माण केल्या जातात। हीरो सायकली दरवर्षी 60 लाख या संख्येत तयार केल्या जातात.
जगात सर्वश्रेष्ठ हातपंप India Mark 2 भारताने विकसित केले आहे।
India Mark 2 ची दरवर्षी 1 लाख पंपनिर्मिती केली जाते। जगातील अनेक देशांना निर्यातही केल्या जातात.
जर येथील लोक संगठित, प्रशिक्षित आणि मोठ्या ध्येयाने प्ररित केले तर लोकसंख्या ही समस्या नव्हे आपले बलस्थान बनेल।
भारतात प्रति हेक्टर कृषि भूमीवर 5।5 लोक अशी स्थिती आहे. जपानमध्ये हे प्रमाण 30.2, युरोपात 5.9 आहे.
आम्ही भारताचे ऋणी आहोत, कारण त्यांनीच आम्हाला गणित शिकवलं, नसता आजचे वैज्ञानिक शोध लागलेच नसते। - -अल्बर्ट आईन्स्टाइन
जगातल्या कोणत्याही देशापेक्षा भारतातली भूमी दुपटीहून अधिक उपजाऊ आहे।वर्षातून तीन पिके घेण्यासाठी आवश्यक वातावरणही भारतातच आहे.
यज्ञवेदी तयार करणाऱ्या प्राचीन ऋषींनी भूमितीतील अनेक प्रमेये शोधून काढली।
शून्याचा शोध भारताने लावला।

Monday, December 22, 2008

राष्ट्रभक्ती ले हृदय में


राष्ट्रभक्ती ले हृदय में हो खडा यदी देश सारा
संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा ।।धृ।।

क्या कभी किसने सुना है, सूर्य छिपता तिमीर भय से
क्या कभी सरिता रूकी है, बांध से वन पर्वतोंसे
जो न रूकते मार्ग चलते, चीर कर सब संकटोंको
वरण करती कीर्ती उनका, तोडकर सब असूर दल को
ध्येय मंदीर के पथीक को, कंटकों का ही सहारा ।।1।।

हम न रूकने को चले है, सूर्य के यदि पुत्र है तो
हम न हटने को बढे है, सरित की यदी प्रेरणा तो
चरण अंगद ने रखा है, आ उसे कोई हटा दे
दहकता ज्वालामुखी यह आ उसे कोई बुझा दे
मृत्यू की पीकर सुधा हम चल पडेंगे ले दुधारा ।।2।।

ज्ञान के विज्ञान के भी, क्षेत्र में हम बढ पडेंगे
नील नभ के रूप के नव, अर्थ भी हम कर सकेंगे
भोग के वातावरण में, त्याग का संदेश देंगे
त्रास के घन बादलोंसे, सौख्यकी वर्षा करेंगे
स्वप्न यह साकार करने, संघटित हो हिंदू सारा ।।3।।

विजय की यदि प्रेरणा ले, चल पडेंगे हम सभी
संकटोंके दल यहां से, भाग जाएंगे सभी
संघटन के सूत्र मे हम, हृदय जोडेंगे तभी
मातृभूको हम सजाएँ, वैभवोंसे हम सभी
परम वैभव प्राप्त करने, संचरित हो केंद्र धारा ।।4।।

Saturday, December 13, 2008

गायी गोपालक संघास

मदरशातून जप्त केलेल्या गायी

गोपालक संघास देण्याचा आदेश

सोलापूर : जोडभावी पेठेतील चिराग अली तकियाजवळील मदरशातून जप्त केलेले 58 बैल आणि 11 गायी सांभाळ करण्यासाठी गोपालक संघाकडे देण्याचा आदेश न्याय दंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिला.
सोलापूर जिल्ह्यातील अशाप्रकारचा हा पहिलाच निकाल आहे. 58 बैल खाटकांना देण्याची मागणी न्यायालयाने गुरुवारी फेटाळली होती. 9 डिसें.ला बकरी ईददिवशी बेकायदा कत्तलींसाठी आलेल्या या जनावरांची हिंदुत्ववादी संघटनांनी सुटका केली. नंतर पोलिसांनी ही जनावरे कोंडवाड्यात ठेवली होती. आज न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. त्याचबरोबर 8 जनावरांची कत्तल ही टळली.
मदरशातून मुक्त करण्यात आलेल्या गायी-बैलांचा सांभाळ करण्याची तयारी गोपालक संघाने अर्जाद्वारे न्यायालयासमोर दाखवली होती. न्यायालयाने गुरुवारी यावरील निर्णय राखून ठेवला होता. शुक्रवारी संध्याकाळच्या सत्रात न्यायाधीश डागा यांनी हा निकाल दिला. गोपालक संघाच्या वतीने ऍड. कणबसकर, ऍड. म्हाळस व रमा कणबसकर यांनी काम पाहिले, तर विरोधी बाजूने ऍड. कोथिंबिरे यांनी काम पाहिले.
पोलीस निरीक्षक काणे यांनी गोपालक संघाच्या गोशाळेस भेट देऊन पाहणी केली. गायी-बैलांचा सांभाळ करण्याची व्यवस्था गोपालक संघाकडे असल्याची खात्री काणे यांनी करून घेतली. तसा अहवाल न्यायालयाकडे सादर केला. त्यानंतर न्यायालयाने निकाल दिला. गोपालक संघ गायी-बैलांचा मालक नाही, असा युक्तिवाद ऍड. कोथिंबिरे यांनी केला. गोपालक संघ ही सामाजिक संस्था आहे. संस्थेकडे गायी-बैलांना सांभाळण्यासाठी पुरेशी जागा आहे. गायी-बैलांच्या संरक्षणाची व्यवस्था आहे, अशी बाजू न्यायालयापुढे मांडण्यात आली.
कायदेशीर तरतुदी
प्राणीरक्षण कायदा अधिनियम 6 नुसार गायी-बैल आणि म्हशींच्या कत्तलींवर पूर्णपणे बंदी आहे. 15 वर्षे वयापर्यंतचा बैल शेतीसाठी उपयुक्त असल्याने, त्याच्या कत्तलीवरही बंदी आहे. काही कारणाने बैल शेतीकामासाठी उपयुक्त नसेल तरच बैलांची कत्तल करण्यास परवानगी आहे. (गायीच्या नव्हे); परंतु अशा बैलांची कत्तल करण्याआधी पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. कत्तल करण्यासाठी परवानगी दिलेल्या बैलाच्या शरीरावर खूण करून कोणत्या कत्तलखान्यात कत्तल करण्यात येणार आहे. याची निश्चितीही संबंधित अधिकारी करतात. या कायद्याचा भंग करणाऱ्यास 1 हजार रुपये दंड किंवा 1 वर्षे कारावास किंवा दोन्ही शिक्षा एकाच वेळी होऊ शकतात।

दै। तरुण भारत, पान ५, १३ दिसम्बर २००८

Monday, December 8, 2008

बापूसाहेब नावाचा दीपस्तंभ



अरुण करमरकर, मुंबई, हिंदुस्थान समाचार

पूर्णवेळ समाजकार्य करणाऱ्या प्रचारक कार्यकर्त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील परंपरा अत्यंत समृद्ध आहे। ऐन उमेदीच्या वयात व्यक्तिगत आकांक्षा आणि निजी जीवनाची उभारणी (आजच्या परिभाषेत करिअर) पूर्णपणे बाजूला सारून नि:संगपणाच्या वाटेवर काही पावले चालण्याची प्रेरणा आजवर हजारो तरुणांंच्या मनात जागविण्यात ही संघ परंपरा यशस्वी ठरली आहे. अगदी प्रारंभीच्या काळात अनेकांनी याच वाटेवर आपली मार्गक्रमणा अखंडितपणे करून आपली जीवनयात्रा संपन्न केली. तर अन्य अनेकांनी काही वर्षांनंतर प्रचारकी दिनक्रम थांबवून व्यक्तिगत जीवनाचा मार्ग पत्करला. मात्र व्यक्तिगत जीवनाकडेही त्यांनी साधना म्हणूनच पाहिले. प्रचारकी जीवनाच्या काळात प्राप्त केलेल्या जीवनदृष्टीच्या प्रकाशातच प्रत्येक पाऊल टाकण्यात आणि आपल्या कौटुंबिक जीवनाचा प्रत्येक पैलू घडविण्यात इतिकर्तव्यता मानली. चं.प. तथा बापूराव भिशीकर हे अशा तपस्वी व्यक्तिमत्त्वांपैकीच एक.

एकूण 93 वर्षांच्या आयुष्यातील 5-6 वर्षे बापूसाहेब संघाचे प्रचारक राहिले। त्यानंतरच्या 65 वर्षांमध्येही प्रचारकी मानसिकतेचा एक क्षणासाठीही त्यांनी कधी विसर पडू दिला नाही. सामूहिकता, अनामिकता, साधनसुचिता, गुणग्राहकता, मूल्यांबाबतच्या निष्ठा, प्रथमपुरुषी एकवचनी वृत्तीतून स्वत:प्रती कठोर आणि अन्यांप्रति क्षमाशीलतेचे औदार्य या साऱ्या बाबींचा विकटस्पर्श त्यांच्या वृत्तीप्रवृत्तींनी सतत जोपासून ठेवला. संघाच्या वाट्याला आलेल्या संघर्षात साहस, संयम आणि दृढनिष्ठेने सामोरे जाणाऱ्या आघाडीच्या फळीतले स्वयंसेवक ही भूमिकाही कधी सोडली नाही. विभाजनपूर्व कराची- सिंध भागात त्यांनी संघप्रचारक म्हणून काम केले, तो काळ तर सतत संघर्षाचा आणि जोखमीचा. नंतरही पत्रकार- संपादक या नात्याने ज्या तरुण भारतच्या उभारणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली त्यालाही (तरुण भारतला) सतत संकटांनी घेरलेल्या वातावरणातच वाटचाल करावी लागत आली. तशाही स्थितीत सत्य जपत आणि स्वत्वाशी तडजोड न करता त्यांनी तरुण भारत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला आणि लौकिकप्राप्त बनवला. पुढे ज्यांनी पत्रकार-स्तंभलेखक-लेखक म्हणून मानमान्यता मिळविली, अशा अनेकांना लिहिते करण्याचे श्रेय बापूसाहेबांच्याच नावावर लिहिले जाते. आणीबाणी आली, हुकुमशाहीचा बेजुमान वरवंटा लोकशाही मूल्यांना चिरडत निघाला, वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या चिंधड्या उडवल्या गेल्या. सुमार बुद्धीचे आणि कर्तृत्वाचे सरकारी अधिकारी सेन्सॉरशिपच्या नावाखाली वृत्तपत्राच्या कार्यालयात बसून मुजोर हडेलहप्पी करू लागले. अशा अत्यंत विपरित परिस्थितीत मोठ्या कुशलतेने पण खंबीरपणे मोजक्याच पत्रकारांनी वृत्तपत्रस्वातंत्र्याची नौका हाकत ठेवली. बापूसाहेबांचे नाव अशा पत्रकार/ संपादकांच्या यादीत अग्रभागी तळपले. संघविचारावरील अतूट, अविचल निष्ठा आणि अस्सल पत्रकाराची तटस्थता यांच्यातील समतोल सांभाळण्याचे कौशल्य त्यांच्या ठायी होते. अनिष्ट, अनौचित्यावर कठोर प्रहार करताना त्यांची लेखणी कधीच थरथरली नाही, पण भाषेचे साधन, सौष्ठव, सभ्यता, शालीनता, यांच्या मार्यादांचाही त्यांनी कधी अतिक्रम केला नाही.

शाश्वत नीतिमूल्ये, सुसंस्कार यांचा पाझर तर त्यांच्या लेखणीतून अखंड स्त्रवत असे. संपादकीय आणि विविध विषयांवर विविध नियतकालिकांमधून त्यांनी दीर्घकाळ केलेले स्तंभलेखन असो. साध्या, सोप्या, सुगम आणि नेमक्या शब्दांमध्ये अर्थगर्भ लिखाण कसे करावे याचा आदर्श वस्तुपाठच बापूसाहेबांचे लेखन साकार करीत आले. म्हणूनच सध्याच्या काळात पत्रकारितेत फोफावलेल्या सवंगपणाने आणि उथळपणाने ते व्यथित होत असत. दोनच वर्षांपूर्वी राष्ट्रीय पत्रकारिता न्यासातर्फे देण्यात येणारा ज्येष्ठ पत्रकाराचा नामवंत पुरस्कार त्यांना सांगली येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्या ज्येष्ठ पत्रकार बापूराव लेलेंचे सहकारी, समकालीन या नात्यानेच बापूसाहेब भिशीकर संपादक म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरले. त्यामुळे बापूराव लेलेंच्या नावाचा पुरस्कार बापूसाहेब भिशीकर यांना हा एक अपूर्व समसमा संयोग होता. त्या समारंभात बापूसाहेबांनी केलेल्या भाषणामधून त्यांनी आजच्या पत्रकारितेवर केलेले भाष्य अतिशय मोलाचे होते. नव्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाने प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात केलेल्या क्रांतीचे त्यांनी आपल्या भाषणातून मुक्तपणे स्वागत केले, पण त्याचबरोबर यांत्रिक झगमगाटाने दीपून न जाण्याचा, पत्रकारितेच्या मूलमंत्रांचा विसर पडू न देण्याचा संदेशही आजच्या पत्रकारांना देण्यास ते विसरले नाहीत. एखाद्या मोठ्या समारंभात बापूसाहेबांनी केलेले बहुधा ते शेवटचेेच मोठे भाषण असावे. व्यक्तिगत संवादातून आजच्या साऱ्या ज्वलंत विषयांवर मनोज्ञ चर्चा करण्याचा क्रम आणि उत्साह मात्र त्यांनी अखेरच्या क्षणांपर्यंत टिकविला हे विशेष. त्यांच्यापाशी बसून ही उत्साही उद्‌बोधक चर्चा करण्याचे भाग्य मला अगदी अलीकडच्या दिवसांपर्यंत लाभत राहिले.
सध्याच्या राजकीय, सामाजिक वातावरणाबाबतची त्यांच्या मनात दाटून राहिलेली खंत त्यांच्या गप्पांमधून जाणवत असे, पण तरीही त्यांचा सूर आणि त्यांच्या वृत्ती कधीही निराशावादाकडे झुकल्या नाहीत हे विशेष। कार्यकर्त्यांमधील अभ्यासूवृत्ती, व्यासंग कमी होत चालल्याबद्दल जशी त्यांच्या मनात व्यथा होती, तशीच अनौपचारिक स्नेहसंबंध, परस्परसंवाद, संपर्क आणि त्यातून परस्परांबद्दल निर्माण होणारा विश्वास यांना ओहोटी तर लागली नाही ना ही शंका त्यांना भेडसावत असे. अडवाणी- अटलजी यांच्याविषयी सरसंघचालकांनी दिलेल्या मुलाखतीवरून प्रसारमाध्यमांनी माजवलेला गदारोळ, अडवाणी यांनी जिनांविषयी, पाकिस्तान दौऱ्यात, काढलेल्या उद्‌गारांच्या विषयावरून स्वयंसेवकांच्या वर्तुळात निर्माण झालेले अस्वस्थतेचे वातावरण, अन्यान्य राजकीय पक्षांबरोबरच भारतीय जनता पक्षातही प्रसंगी अनुभवाला येणारे निराशाजनक प्रसंग अशा अतिशय नाजूक विषयांबाबत त्यांनी प्रत्यक्ष चर्चेत तेसच पत्रांच्या द्वारे केलेले मार्गदर्शन माझ्यासाठी सदैव पथदर्शक राहील.

नव्वदी उलटल्यानंतरही शरीर मनाची सर्व गात्रे बऱ्यापैकी सक्षम स्थितीत राहिली हा अर्थातच त्यांच्या सात्विक आणि तपस्वी जीवनशैलीचा परिणाम होता। शेवटपर्यंत त्यांची लेखणी लिहिती होती हे विशेष. पत्रकार या नात्याने राजकारणावर जितक्या अधिकारवाणीने ते बोलू- लिहू शकत, तितक्याच किंबहुना त्यापेक्षा कांकणभर जास्तच अधिकाराने ते अध्यात्म सांगत- लिहित राहिले. हा अधिकार त्यांना अर्थातच व्यासंगाने आणि तपश्चर्येने प्राप्त झाला होता.

सर्वार्थाने बापूसाहेब "एक दीपस्तंभ' या विशेषणाला पात्र ठरतात. पत्रकार म्हणून स्वयंसेवक म्हणून आणि माणूस म्हणूनही त्यांचे जीवन सदैव दीपस्तंभासारखेच मार्गदर्शन करीत राहील, यात शंका नाही.


ऋषी संपादक : बापूसाहेब भिशीकर


ऋषी संपादक :
बापूसाहेब भिशीकर

पत्रकाराचे लेखन कसे असावे, याबाबत लोकमान्य टिळक यानी एके ठिकाणी लिहून ठेवले आहे की, पत्रकाराची लेखणी ही धीरगंभीर नदीच्या प्रवाहासारखी असावी. तिच्या प्रवाहाला खळखळीचा वेग नसावा पण कोठे तुंबूनही राहता कामा नये. थोडक्यात तिला कोठेतरी पोहोचण्याची घाई नसावी आणि वाया घालवायला वेळही नसावा. या साऱ्या वर्णनाची प्रचीती बापूराव यांच्या लेखनातून नेहेमी येते.

रात्रंदिवस आपण रहात असलेली जमीन आपल्याला केवळ वजनापुरताच आधार देत असते असे नव्हे तर पावलोपावली आपल्याला सांभाळून घेत असते. "अतिपरिचयात अवज्ञा' असल्याने आपल्याला त्या आधाराची किंमत कळत नाही. ऋषीमुनी जेंव्हा त्या पायाखालच्या जमिनीबाबत बोलतात, तेंव्हा "पादस्पर्शम्‌ क्षमस्व मे' असे उद्‌गार काढूनच पुढचे बोलायला सुरुवात करतात. आज या पायाखालच्या जमिनीची आठवण येण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात गेली सत्तर वर्षे ज्यांनी आपल्या राष्ट्रवादी चिंतन, पत्रकारितेतून प्रखर लेखन आणि संतवाङ्‌मयातून महाराष्ट्रातील फार मोठ्या वर्गाला जमिनीचा आधार वाटावा, अशी जीवनमूल्यांची बैठक दिली, त्या श्री.बापूराव भिशीकर यांचे सोमवारी वयाच्या 93 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
ज्या वेळी सिंधमध्ये पाकिस्तान निर्मितीच्या प्रक्रियेची धग सामान्य हिंदूला बसण्यास सुरुवात झाली होती, त्या काळात तेथे जावून संघाचे प्रचारक म्हणून काम केलेले बापूराव, महाराष्ट्रात तरुण भारत वाढावा व त्याच्या अधिकाधिक आवृत्त्या निघाव्या म्हणून आणिबाणीसारख्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संपादक म्हणून काम करणारे बापूराव आणि गेली तीस वर्षे संतवाङ्‌मयाच्या माध्यमातून संस्कार बांधणीचा एक नवा अध्याय रचणारे बापूराव असा त्यांचा बहुआयामी परिचय महाराष्ट्रातील तीन पिढ्यांना आहे.गेली तीस वर्षे बापूराव प्रामुख्याने संतवाङ्‌यावर व जीवनमूल्ये मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संस्कारप्रक्रियेवर लिहित आहेत. पण त्यांचा हा एकमेव परिचय नाही. आपल्या समाजाची आणि देशाची उभारणी ही प्रखर राष्ट्रवादाच्या आधारे व्हावी, यावर ते जवळजवळ सत्तर वर्षे लिहीत आहेत. 1948साली महात्मा गांधी यांची हत्या झाल्यावर संघावर बंदी आली, त्यामुळे ती उठवण्यासाठी भूमिगत राहून आपले म्हणणे प्रखरपणे मांडत राहणे हे काम त्यानी केले व त्यासाठी आवश्यक ती किंमतही मोजली. ते सहा महिने कारावसातही होते. बापूराव हे एम ए होते, येवढाच परिचय करून दिला तर तो उल्लेख "बायोडाटा' सारखा वाटेल पण सत्तर वर्षापूर्वीच्या नागपूरच्या डॉ. केशव बळिराम हेडगेवार हे संघ कामाची आधार शीला रचत असतानाच्या वातावरणात "जे करू ते अत्युत्कृष्ट करू' असे म्हणून जीवन देण्यास तयार झालेली जी तरुळमंडळी होती, त्यात बापूराव यांचा समावेश होता, त्यामुळे त्या काळात सायकलवरून दररोज काही मैल जावून शाखा घेणे हा त्यांचा दिनक्रम होता, त्याच प्रमाणे एम ए परीक्षा द्यायची असेल तर तेथे असलेले सुवर्णपदक हे आपल्या अभ्यासाने आपल्याकडेच आले पाहिजे, असे ठरविणाऱ्या तरुणांच्यापैकी ते होते, त्यामुळे त्यांच्या सुवर्णपदक मिळवण्यास राष्ट्रउभारणीच्या कामात पायाभूत होण्याची उंची आहे. त्याच वेळी त्यांच्या कामाच्या विरोधकांनी त्यांच्यावर जेंव्हा हल्ला करून त्यांचे काम बंद पाडण्याचा जेंव्हा प्रयत्न झाला, तेंव्हा हल्ला करण्यासाठी आलेल्या पन्नास जणांशी दोन होत करून सर्व शक्तिनिशी त्यातून निसटण्याचे कौशल्यही त्यानी दाखवले आहे. पण मराठी मनावर त्यांच्या लेखनाची जी छाप आहे ती प्रखर पण संयमित लेखकाची.
दैनिक वृत्तपत्रांच्या विषयांची व्याप्ती ही मोठी असते. तेथे धारदार टीकेचीही आवश्यकता असते पण हळुवार संवादाचीही आवश्यकता असते. या दोन्ही कसोट्यांचा बापूराव यांचे लेखक हे वस्तुपाठ आहेत, याची प्रचीती कालपर्यंत त्यांचे लेखन वाचताना येते. अलिकडे त्यानी राजकीय संदर्भ असलेले लेखन कमी केले होते. तरीही अतिरेक्यांचे देशात व सीमावर्ती प्रदेशात होणारे हल्ले, ईशान्य भारतातील पंचमस्तंभीयांचा प्रश्र्न, सत्तेवर असणाऱ्या त्या त्या वेळच्या राज्यकत्यार्ंची "कच खाऊ भूमिका' ही त्याना अस्वस्थ करायची आणि नव्वदी ओलांडल्यानंतरच्या वयातही ते धारदार लेखन करीत. असे असले तरी त्याना टीका करताना "आपल्या विचाराच्या विरोधकाचा कोठेही संबंध आला तर लगेच कर टीका' सरधोपट मार्ग स्वीकारण्याची वेळ त्यांच्यावर कधी येत नाही. त्यांचे लेखन येवढे संयमित असते की, कोणत्याही कारणाने अस्वस्थ झालेल्या कोणालाही मन शांत करून घ्यायचे असेल तर त्यानी बापूराव भिशीकर यांचा कोणताही लेख वाचावा.
अडतीस साली म्हणजे अवघ्या तेविसाव्या वर्षी बापूराव सिंधमध्ये प्रचारक म्हणून गेले. त्या काळी पाकिस्ताननिर्मितीची धग सामान्य माणसास जाणवण्यास सुरुवात झाली होती. त्या काळात त्यानी पाच वर्षे काम केले. त्यांच्या त्या वेेळच्या कामाचा त्यानी संघात आणलेले माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी अतिशय गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. 1943 मध्ये सिंधमधून आले आणि संघाच्या कार्यकर्त्यामंडळींनी सुरु केलेल्या नवयुग विद्यालयाचे मुख्याध्यापक झाले. या काळात बापूराव यानी संघाच्या कामावर बरेच लेखन केले. काही काळ ते एका साप्ताहिकाचे संपादकही होते. 1949 मध्ये त्यावेळचे संघाचे वरीष्ठ पदाधिकारी श्री बाळासाहेब देवरस यांच्या पुढाकाराने श्री.ग.त्र्यं.माडखोलकर यांचा तरुणभारत हा नरकेसरी या संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आला. त्यात संपादक म्हणून काम करत असलेले श्री.माडखोलकर यांचे सहकारी म्हणून बापूराव काम करू लागले. वृत्तपत्राच्या संपादक विभागाच्या कामाचे सर्व प्रकारचे अनुभव त्याना येथे घेता आले. 1957 मध्ये तरुणभारतची पुण्यात आवृत्ती काढण्यात आली व त्याचे संपादक म्हणून श्री ग वि केतकर यांनी जबाबदारी स्वीकारली. 1963 मध्ये त्यानी पुणे तरुणभारतची संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकालात पुणे तरुणभारत हे संपूर्ण मराठवाडा, नाशिक विभाग, कोल्हापूर, सोलापूर, कोकण या भागात सर्वात अधिक गावी जाणारे दैनिक म्हणून पसरू शकले. त्याकाळी दैनिकांचे कमाल खप हे एक ते दीड लाख या घरात असत आणि बापूराव यांनी निवृत्तीच्या वेळी जेंव्हा तरुणभारतची जबाबदारी हस्तांतरीत केली, तेंव्हा त्यात तरुण भारतचा समावेश असे. त्या अतिशय प्रतिकूल काळात तरुणभारतची प्रगती कशी झाली किंवा कोणत्या समस्या उभ्या राहिल्या हा स्वतंत्र अध्याय आहे. पण एक गोष्ट खरी की, महाराष्ट्रात फार मोठा जनसंपर्क, नवनवीन विषय हाताळण्यासाठी परिश्रमी सहकारी मंडळींनी केलेले सहकार्य आणि प्रतिकूल परिस्थितीला न डगमगण्याची संघभावना हे तरुणभारतच्या यशाचे रहस्य आहे. त्यात आणिबाणीतील दहशतवादाचे वातावरण आणि वृत्तपत्रावरील प्रसिद्धिपूर्वतपासणीची बंधने हा सारा वेदनाकर विषय असायचा.
रस्त्यावर सायकलला दिवा नसणे किंवा डबलसीट नेणे अशा स्वरुपाच्या गुन्ह्यावर कारवाई करणाऱ्या पोलीस मंडळीवर अचानक वृत्तपत्रावर प्रसिद्धीपूर्व बंधने हाताळण्याची वेळ आली होती, त्यामुळे रात्रीअपरात्री बापूराव यांच्या घरी जावून दरडवायलाही ही मंडळी मागेपुढे बघत नसत. त्याकाळात त्यावेळच्या सरकारची अशी इच्छा असायची की, कोणत्याही कारणाने का होईना तरुण भारत बंद पडावा, त्यासाठी अधिकाधिक अपमामित करण्याचा सपाटा सरकारने लावला होता. हा हेतू लक्षात आल्यावर अपमानाची पर्वा न करता तरुण भारत चालू ठेवण्याचा चंग त्यावेळच्या जबाबदार मंडळींनी बांधला आणि त्याला यशही मिळाले. पुण्याच्या एका आवृत्तीतून नंतर महाराष्ट्रात सुरु झालेल्या चार आवृत्त्या आजही आपल्या संकल्पसिद्धिसाठी जिद्दीने उभ्या आहेत.

त्या काळातील सरकारी बंधनामुळे राजकीय विरोध करणारा एखादा जरी शब्द कच्च्या प्रुफात दिसला तरी कार्यालयावर हत्यारी पोलीसांचा बंदोबस्त वाढायचा. पण या प्रतिकूलतेतून मार्ग काढण्यासाठी बापूराव यानी तरुणांशी संवाद करून त्यावर लेखन करण्याचा एक निराळाच मार्ग स्वीकारला आणि त्यातून एका नव्या लेखन प्रकारालाच सुुरुवात झाली. आणिबाणीचा एक सर्वात मोठा परिणाम म्हणजे तरुणांमध्ये अशाश्र्वततेची भावना निर्माण झाली होती. भारतासारख्या खंडप्राय देशात कोणी एक हुकुमशहा उभा राहतो आणि देशातील कोट्यवधी तरुणांपुढे अनिश्र्चिततेचे प्रश्र्न चिन्ह निर्माण करतो,असे वातावरण तयार झाले होते.यातून सावरण्यासाठी त्यानी भक्कम जीवनमूल्यांच्या आधारे आणि त्यांच्याच घरच्यांशी संवाद करून त्याना आत्मविश्र्वास निर्माण करण्यावर त्यानी भर दिला.दर आठवड्याला या विषयावर एक लेख साप्ताहिक अंकात असे आणि त्याला महाराष्ट्रात फार मोठा वाचक वर्ग असे. आजूबाजूच्या परिस्थितीने अस्वस्थ झालेल्या प्रत्येकाला काही तरी म्हणायचे असायचे आणि बापूराव त्यांची वेदना व्यक्त करत. प्रत्येकाची वेदना निराळी असली तरीही त्याचे स्वरुप प्रातिनिधिक असे. त्याला कधी जीवनातील उदाहरणाचा दृष्टांत दे तर कधी संत वाङमयाचा आधार दे, यातून सुरु झालेला तो संवाद आजही सुरु आहे.
1978साली बापूराव निवृत्त झाले.त्यांच्या निरोपसमारंभाच्या अध्यक्षपदी त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार होते. गेल्या पन्नास वर्षात जे फार थोडे लक्षात राहण्यासारखे निरोप समारंभ झाले, त्यात त्या कार्यक्रमाचा समावेश करावा लागेल. बापूराव यांच्या वृतस्थ जीवनावर शरदराव यानी केलेले विवेचन हे आजही अनेकांच्या स्मरणात असेल.
बापूराव निवृत्त झाले म्हणजे वृत्तपत्राच्या दररोजच्या धबडग्याच्या कामातून बाजूला झाले येवढेचे काय ते. पण दररोजचे लेखन, ग्रंथनिर्मिती, नव्या नव्या लोकांशी संवाद आणि कूट वाटणाऱ्या समस्या त्याच्यावरील उपायासह सोप्या भाषेत मांडणे हे त्यांचे काम कालपर्यंत अविरतपणे सुरु होतेे. त्यानी त्यांचे बरेच व्याप कमी केल्यावरही पंचवीस गं्र्रथांची निर्मिती झाली आहे. त्यांच्या गं्रथांच्या यादीत सर्वात वरचा क्रमांक लागतो तो म्हणजे संघजीवनावरील वाङ्‌मयाचा. डॉ.हेडगेवार आणि श्रीगुरुजी यांच्या जीवनावर लिहिण्याचा अधिकार फार थोड्याना प्राप्त झाला आहे आणि तो अधिकार त्यागाने प्राप्त झाला आहे. बापूराव यांचे लेखन लक्ष लक्ष संघस्वयंसेवकांच्या दररोजच्या वाचनात आहे. संघटना जीवनात अनेक प्रसंग असे असतात की, जेथे संघटना वाढणाऱ्या, काम वाढणाऱ्या आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणाऱ्या परामर्षाची आवश्यकता असते, अशावेळी बापूराव हे आधारवड वाटतात. गेली तीस वर्षे संतवाङमयांचा वेध घेत त्यानी राष्ट्रबांधणीच्या आपल्या ध्येयाच्या कामात भर टाकली आहे. भारतातील संतांनी ईश्र्वरी आराधनेच्या माध्यमातून राष्ट्रउभारणीचे काम केले आहे आणि तेच काम आपल्याला पुढे न्यायचे आहे हा श्री गुरुजींचा विचार बापूराव यानी कदाचित काही हजार लेखातून पुढे नेला. सकाळ, पुढारी, तरुण भारत अशा दैनिकातून कधी साप्ताहिक सदर तर कधी दैनंदिनी सदर यातून तो मांडला. बापूराव यांच्या आजपर्यंतच्या लेखांची सर्व प्रकाराच्या लेखाचे संकलन करणे हा कदाचित स्वतंत्र कामाचा विषय होईल. अर्थात त्यांच्या या कामात प्रामुख्याने सौ. कुसुमताई आणि मुले, सूनबाई, नातवंडे या साऱ्यांचा त्यांच्या त्यांच्या परीने सहभाग आहे.
बापूराव यांचे मार्गदर्शन हे कार्यकर्त्यांना ईश्र्वरीप्रसादाची अनुभूती देऊन जात असे. बातूसाहेबांनी निर्माण केलेल्या वाङमयातूनही ही अनुभूती येऊ शकते.
कै. बापूसाहेब भिशीकर यांना तरुण भारत परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

मोरेश्वर जोशी, पुणे प्रतिनिधी

चं. प. भिशीकर यांचे निधन


तरुण भारतचे माजी संपादक

चं. प. भिशीकर यांचे निधन
सोलापूर: पुणे तरुण भारतचे माजी संपादक आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक चंद्रशेखर परमानंद तथा बापूसाहेब भिशीकर यांचे सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील हराळी ज्ञानप्रबोधिनी केंद्रात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात कन्या डॉ. स्वर्णलता भिशीकर आणि पुत्र आनंद हे आहेत.
सोमवार दि. 8 डिसेंबर रोजी पुणे येथे सायंकाळी त्यांच्यावर अंत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यंसंस्कारासाठी पुण्याकडे रवाना करण्यात आले आहे.
अल्प परिचय: बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. एम.ए. पर्यंतचे शिक्षण नागपूरमध्ये झाले. 1938 ते 1943 या कालावधीत विभाजनपूर्व सिंध प्रांतात- कराची येथे संघ प्रचारक म्हणून कार्य केले. संघबंदी काळात कारावास. नागपूर तरुण भारतमध्ये सहसंपादक, पुणे तरुण भारतचे प्रारंभी कार्यकारी संपादक व नंतर प्रमुख संपादक. आणीबाणीच्या काळात उमेद वाढविणारे लेखन. प्रारंभापासून 1979 पर्यंत पुणे तरुण भारतमध्ये 15 वर्षे "हितगुज' हे अत्यंत लोकप्रिय सदर. संतवाङमयावर प्रवचने. पू. स्वामी माधवनाथ यांचा अनुग्रह. दै. सकाळमध्ये दोन वर्षे भक्तीरंग आणि भक्तिगंगा ही दैनिक सदरे. वरील दोन्हीचीही पुस्तके भारतीय विचार साधनेतर्फे प्रकाशित. लेखन व सामाजिक-राष्ट्रीय जागरण कार्याबद्दल अनेक पुरस्कार. विश्व हिंदू परिषद, ज्ञान प्रबोधिनी-सोलापूर, विवेक विचार (विवेकानंद केंद्राचे मराठी मासिक) इ. कार्यांना वैचारिक मार्गदर्शन. समर्थांच्या स्फूट रचनांवर अलीकडेच 700 पानी ग्रंथ प्रकाशित.

Monday, December 1, 2008

मोदी जिंकले...


मोदी जिंकले,

मीडिया हरली !


गेल्या वर्षी याच डिसेंबर महिन्यात मीडियाने मोदीविरोधी वातावरण निर्माण केले होते। परंतु मोदी जिंकले... त्यावेळी लिहिलेला हा लेख...


गुजरातेत भारतीय जनता पक्षाला खणखणीत बहुमत मिळाले आहे. त्यामुळे ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांना सणसणीत चपराक बसली आहे, परंतु नाक कापले तरी *** शिल्लक आहे! अशा वृत्तीने सेक्युलर मुखंड वागताना दिसत आहेत.
नरेंद्र मोदी हे निष्कलंक आहेत. प्रामाणिक आहेत. क्षमतावान आहेत. कुशल संघटक आहेत. प्रखर देशभक्त आहेत. भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ आहेत. प्रशासनावर त्यांची भारी पकड आहे. इस्लामी अतिरेक्यांचे ते यमदूत आहेत. हिंदुत्वावर त्यांची श्रद्धा आहे. ते अष्टावधानी आहेत. ते उत्तम वक्ते आहेत. ते तत्त्वज्ञ आणि विचारवंत आहेत. नरेंद्र मोदी हे उत्तम लेखक आणि कवी आहेत... ही यादी आणखीही लांबविता येईल, परंतु असे असतानाही केवळ हिंदुत्व द्वेषावर पोषण झालेल्या मीडियातल्या स्वयंघोषित विचारवंतांनी मोदींचा दुस्वास केला आणि करीत आहेत. अशा कावळ्यांच्या शापाने काहीही फरक पडत नाही हेच खरे.
भारतीय जनता पक्ष जेव्हा केव्हा सत्तेत येईल तेव्हा नरेंद्र मोदी हे निश्चित पंतप्रधान बनतील. बनू शकतील असे माझे म्हणणे नाही - ते पंतप्रधान बनतीलच! कारण ती क्षमता त्यांच्यात आहे. हा निष्कर्ष कदाचित अनेकांना रुचणारा नसेलही, परंतु सत्याकडे आपण किती काळ दुर्लक्ष करू शकतो? तुमच्या आमच्या म्हणण्याने विदूषक लालूप्रसाद तत्त्वज्ञ बनणार नाही आणि अब्दुल करीम तेलगी काही धर्मराज बनणार नाही.
खूप कमी लोकांना माहीत असेल की, दिल्ली येथील भाजपाचे मुख्यालय 11, अशोका रोडच्या मागे एका छोट्या खोलीत नरेंद्र मोदी कितीतरी वर्षे राहात होते. त्यांच्यासोबत होते भाजपाचे दुसरे महासचिव गोविंदाचार्य. त्यांच्या खोलीत एकच फोन होता. त्यांचे अंथरूण जमिनीवरच असायचे. नरेंद्र मोदींच्या कार्यालयाचा दरवाजा सताड उघडा असायचा...
नरेंद्र मोदी हे विद्यार्थी दशेत असताना नवनिर्माण आंदोलनात त्यांनी केलेले युवा संघटन पाहून लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी त्यांची पाठ थोपटली होती. हा तरुण पुढे देशाचे नेतृत्व करेल असे संकेतही त्यांनी दिले होते. साधेपणा, नम्रता, प्रामाणिकपणा यांचे संस्कार त्यांच्यावर स्वयंसेवक आणि प्रचारक राहिल्याने आहेतच, परंतु मीडियाने त्यांची प्रतिमा मग्रूर आणि सहकाऱ्यांशी फटकून वागणारा, कोणालाही दाद न देणारा अशी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. गुजरातेतील विजय हा भाजपाचा विजय नसून तो नरेंद्र मोदींचा आहे, हिंदुत्वाचा विजय नसून तो मोदित्वाचा विजय आहे, असे तारे तोडण्याचाही प्रयत्न जोरकसपणे सरू आहे. काहीही करून उलट्या बोंबा मारण्याचाच हा प्रयत्न आहे.
नरेंद्र मोदी यांचे पाय जमिनीवर असतात. भगवद्‌गीतेत भगवंताने सांगितलेली स्थितप्रज्ञ पुरुषाची सर्व लक्षणे त्यांच्यात दिसतात. संघटित कार्याला ते प्राधान्य देतात. गुजरातेत मतदान होण्यापूर्वी दोन महिने नरेंद्र मोदी यांनी एक लाख 30 हजार भाजपा कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेतली होती. प्रत्येक बूथचे नियोजन होते. स्वत: नरेंद्र मोदी यांच्याकडेही एका बूथची जबाबदारी होती. कार्यकर्त्यांच्या स्तरावर वावरणारा हा नेता व्यक्तिकेंद्री आहे, असा अपप्रचार करणे हा अपप्रचार करणाऱ्या बुद्धिजीवींचा खुजेपणाच म्हटला पाहिजे.
खूप कमी राजकीय नेते असे असतात की, जे केंद्रीय राजकारणाच्या मुख्य धारेत नसतात, मात्र केंद्रीय राजकारण त्यांच्याभोवती घुटमळत असते. अशा नेत्यांत नरेंद्र मोदी यांचे नाव अग्रस्थानी आहे. 57 वषार्र्ंचा हा ताठ कण्याचा नेता देशाच्या पंतप्रधानपदी यावा, असे भारतातील कोट्यवधी लोकांना वाटते. संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे नरेंद्र मोदी हे विचार आणि तत्त्वांशी प्रामाणिक असतात, मग बहुमत काहीही असो. हा कणखरपणाच त्यांच्या यशाचे गमक आहे.
नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी आले तर साऱ्या मुसलमानांचा ते सफाया करतील, असा गैरसमज पसरवण्यात येतो, मात्र त्यात तथ्य नाही. एक खरे की नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आले तर ते मुस्लिमांचा पर्सनल लॉ रद्द करतील, काश्मिरात अनिश्चित काळासाठी आणीबाणी आणतील, 370 कलम रद्द करतील, आयोध्येत भव्य राममंदिराचे निर्माण करतील. दररोज सकाळी 8 वाजल्यापासूनच लॅपटॉवर बसून प्रशासन हाकणारा हा नेता भारताला वैभवावर नेईल.
विचारांसाठी, आदर्शांसाठी कार्य करा- कोणा व्यक्तीसाठी नव्हे, या स्वामी विवेकानंदांच्या संकेतानुसार वाटचाल करणारा हा नेता आहे. आपण ओबीसी आहोत, असा बाऊ त्यांनी कधी केला नाही. सोनियाबेनप्रमाणे नरेंद्र मोदी हे टपकलेले नेते नाहीत. लोकशाही पद्धतीने त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे.
""मी 7 ऑक्टोबर 2001 रोजी सी.एम. बनलो नाही. मी मूलत: सी.एम.च आहे. मी आज सी.एम. आहे. पुढेही सदैव सी.एम. राहीन. माझ्या दृष्टीने सी.एम. म्हणजे कॉमन मॅन.'' नरेंद्र मोदींच्या या मोजक्या शब्दांत खूप अर्थ भरलेला आहे.
अत्यंत कठीण समयी धीराने आणि संयमाने वागणारा हा नेता आज विजयश्री गळ्यात पडलेली असतानाही तेवढाच शांत आणि संयमी आहे. विजयश्री खेचून आणणारा योद्धा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे त्रिवार अभिनंदन!
-सिद्धाराम भै. पाटील
दि. 24 डिसेंबर 2007, दै. तरुण भारत पान 4

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी