Monday, December 5, 2011

स्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )


गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस  म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती.  जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली. योद्धा, संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी विवेकानंद.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सर्वच स्तरांतील लोकांचे जीवन गतिमान झाले आहे. जीवनात अचानक आलेल्या या गतीमुळे सर्वसामान्यांची स्थिती भांबावल्यासारखी झाली आहे. ज्ञानार्जन करू पाहणार्‍या तरुणांची स्थितीही याहून वेगळी नाही. अशा स्थितीत मनाला स्थैर्य देऊन आपल्या प्रगतीला सहाय्यक ठरणार्‍या विचारांची निकड आहे. अशावेळी ‘फोटोग्राफिक मेमरी’साठी प्रसिद्ध असलेल्या स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्या मदतीला धावून येतात. म्हणूनच  विवेकानंदांच्या शक्तीदायी विचारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. नोबेल परितोषिक विजेते आणि विख्यात विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ‘‘तुम्हाला जर भारत जाणून घ्यायचा असेल, तर विवेकानंदांचा अभ्यास करा. त्यांच्यात सर्वच सकारात्मक आहे, नकारात्मक काहीही नाही.’’

सकारात्मक विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. सकारात्मक विचारामुळे जीवनाचे नंदनवन होऊ शकते, परंतु केवळ सकारात्मक विचार उपयोगाचे नसून, माणसाला आपल्या ध्येयाची निश्‍चितीही करता आली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘‘एखादे ध्येय निश्‍चित केलेला मनुष्य शंभर चुका करीत असेल, तर ध्येय नसलेला मनुष्य दहा हजार चुका करतो.’’ तात्पर्य असे की, ध्येयामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, परंतु असे असले, तरी ध्येयाची निवड देखील महत्त्वाची बाब असते.

स्वामी विवेकानंदांच्या जीवन वाङ्‌मयातून आपल्याला उच्च ध्येयमार्गासाठीची दिशा मिळते.स्वामी विवेकानंदांचे जीवन पाहा. गुरुदेव रामकृष्णांच्या प्रयाणानंतर स्वामीजींनी संपूर्ण भारताचे भ्रमण केले आहे. भारत म्हणजे काही केवळ कागदावरचा नकाशा नाही. भारत म्हणजे भारतातले लोक. इथली गावं, इथल्या नद्या, पर्वत, इथे होऊन गेलेले ऋषीमुनी, इथले तत्त्वज्ञान आणि खूप काही... जोवर आपण खरा भारत समजून घेत नाही, तोवर तिच्याप्रती मनात भक्तीभाव निर्माण होणे कसे शक्य आहे? एखाद्या व्यक्तीप्रती प्रेम किंवा तिरस्कार तेव्हाच निर्माण होते, जेव्हा आपल्याला तिच्या गुण-दोषांची ओळख होते. देशाच्या बाबतीतही हेच तत्त्व लागू आहे. आपण इतिहास वाचलेला असतो. इतिहासातील आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाने आपला ऊर अभिमानाने भरून येतो. हा अनुभव आपल्या सार्‍यांचाच आहे. म्हणूनच केवळ प्राचीन भारत ग्रंथातून अभ्यासून न थांबता स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण वर्तमान भारत पायी फिरून अनुभवला.शेवटी स्वामीजी देशाच्या दक्षिण टोकाला- कन्याकुमारी येथे आले. तिथल्या श्रीपाद शिलेवर की, जिथे देवी पार्वतीने कैलासातल्या शिवशंकरासाठी एका पायावर तपश्‍चर्या केली होती, तिथे २५, २६ आणि २७ डिसेंबर १८९२ या तीन दिवस-रात्री त्यांनी ध्यान केलं.

हा पहिला सन्यासी होता की, ज्याने आपल्याला वैयक्तिक मोक्ष अथवा मुक्ती मिळावी म्हणून ध्यान साधना केली नाही. भारताला पुन्हा तिचं गतवैभव कसे मिळवता येईल हा त्यांच्या ध्यानाचा केंद्रबिंदू होता.एकेकाळी वैभवावर असलेल्या या देशाचे भग्नावशेष त्यांनी जागोजागी भ्रमणकाळात पाहिले होते. पाश्‍चात्य देशातील लोकांना जेव्हा कपडे घालण्याचीही बुद्धी नव्हती. तेव्हा या देशात एक प्रगल्भ संस्कृती नांदत होती, हेही त्यांना माहीत होते, परंतु आज मात्र भारत गुलामीत होता. भारताचा स्वाभिमान ब्रिटिशांनी पायदळी तुडवला होता. दारिद्र्याने आणि लाचारीने कळस गाठला होता. जातीभेद स्पृशास्पृशतेसारख्या घातक रूढींनी उच्छाद मांडला होता.

अज्ञानाचा अंध:कार गडद झालेला होता. अशा स्थितीतून पुन्हा भारताचे उत्थान घडवून आणायचे तर काय करावे लागेल हा त्यांच्या ध्यानाचा विषय होता. अखेर एक शक्तिशाली विचार घेऊन स्वामीजी त्या शिलेवरून उठले. आपण आत्मविश्‍वास गमावलेला आहे, त्यामुळेच आजची अधोगती झाली. या देशाला पुन्हा आत्मविश्‍वास मिळवून देणे हे विवेकानंदांच्या जीवनाचे ध्येय बनले. जगावर राज्य करणार्‍या लोकांच्या देशात जाऊन आमच्या देशाचा तरुण विजय मिळवतो, ही घटना समस्त भारतीयांना आत्मविश्‍वास देणारी ठरली. यातूनच खर्‍या अर्थाने भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाला बळ मिळाल्याचा इतिहास आहे.

स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहायची दृष्टी दिली.

स्वामी विवेकानंद म्हणजे साक्षात घनिभूत देशभक्ती. त्यांचा युवा पिढीवर प्रगाढ विश्‍वास होता. भारताच्या पुनरुत्थानच्या कार्यासाठी युवकच पुढे येतील, असा त्यांना विश्‍वास होता. देशभक्तीचे मूर्तीमंत प्रतीक असणारे स्वामी विवेकानंद केवळ भारतासाठीच प्रेरक आहेत असे मात्र बिलकुल नाही. संपूर्ण जगात सुख-शांती नांदण्यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन लाखमोलाचे ठरले होते. म्हणूनच तर सार्‍या जगासाठी असा काय संदेश स्वामीजींनी दिला होता, तेही समजून घेतले पाहिजे. अन्यथा मोठा गोंधळ होईल.

दोन वर्षांपूर्वी जपानचे पंतप्रधान भारतात आले होते. संसदेला संबोधित करताना पंतप्रधान ऍबे सिंझो म्हणाले की, जपान भारताचा ऋणी आहे. कारण जपानचे शिल्पकार तेनशिन ओकाकुरा यांनी स्वामी विवेकानंद यांच्यापासून प्रेरणा घेतली होती. ते पुढे असे म्हणाले की, जगाचे नेतृत्व करण्यासाठी जपान आणि भारत या दोन्ही देशांनी पुढाकार घेतला पाहिजे.‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन’ या विख्यात पुस्तकाचे लेखक आणि नामवंत इतिहासकार सॅम्युअल हंटिग्टन म्हणतात की, जगात तिसरे महायुद्ध झालेच तर ते एकांतिक विचारधारा मानणार्‍या धर्मीयांकडून होईल. माझाच धर्म खरा या दुराग्रहामुळे होईल. यातून वाचण्याचा एकच मार्ग असेल, तो म्हणजे भारतीय मार्ग अर्थात हिंदू विचारधारा. आकाशातून पडणारे पाणी शेवटी या ना त्या मार्गाने समुद्राला मिळते. त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही ईश्‍वराची उपासना केली तरी ते अंती एकाच ईश्‍वराला पोचते, अशी भारतीय विचारधारा आहे. हाच हिंदू विचार अर्थात वेदांत हा भावी जगाचा मार्ग असणार आहे असे स्वामी विवेकानंद म्हणतात. हाच विचार आहे की, जो जगात शांती आणू शकतो, परंतु यासाठी हा विचार सांगणारा देश दुर्बल असून, चालणार नाही.

भारताने गेल्या दहा हजार वर्षांत कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही. कारण दुसर्‍यांना पायदळी तुडविणे हा भारताचा स्वभाव नाही, परंतु जगाला शांतीचा आणि शाश्‍वत मार्ग दाखवायचा असेल, तर भारताने बलशाली झालेच पाहिजे. त्याला पर्याय नाही. भारताला बलशाली करण्याच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलणे हेच आपल्यासमोरचे सर्वोच्च ध्येय असू शकते. तुम्ही विद्यार्थी असा की, शिक्षक, शिपाई असा की, अधिकारी, शेतकरी असा की, सौनिक तुम्ही कोणीही असा, आपले सर्वोच्च ध्येय भारत पुनरुत्थानाच्या कार्यात योगदान देणे हेच असू द्या. स्वामी विवेकानंदांच्या शब्दांत सांगायचे तर आगामी काळात हे राष्ट्र हेच तुमचे दैवत असू द्या. एकदा ध्येय ठरले की, कार्य करण्याची दिशा आपोआप गवसून जाईल.

संघटित कार्य करण्याचा मंत्र स्वामीजींनी दिला आहे. संघटित कार्यात सहभागी झाल्याने आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाचा वेग वाढतो. विवेकानंदांच्या शब्दांत, करावयास लागा म्हणजे कळून येईल की, तुमच्यात किती प्रचंड सामर्थ्य आहे. व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी शक्तीदायी विचारांची सोबत आवश्यक असते. विवेकानंदांचे शक्तीदायी विचार तरुणांपर्यंत आणि जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी विवेकानंद केंद्र कन्याकुमारीतर्फे १५० व्या जयंतीच्या निमित्ताने आगामी ३ वर्षे विविध उपक्रमांची योजना करण्यात आली आहे. आज देशभरात विविध ठिकाणी या ‘सार्ध शती समारोहा’ची सुरुवात होत आहे.

स्वामी विवेकानंद यांची १५० वी जयंती २०१३ साली असून त्यानिमित्त १२ जानेवारी २०११ ते १२ जानेवारी २०१४ या कालावधीत विवेकानंदांचे शक्तीदायी विचार समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रमांची योजना करण्यात आली आहे. महाविद्यालयीन युवकांसाठी ‘सिंहनाद’ हा राज्यव्यापी वक्तृत्त्च विकास कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमांतर्गत आगामी ३ वर्षांत लहान, मोठी अशी एक़ूण १५० पुस्तके प्रकाशित करण्यात येणार असून ती माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. माणूस घडविणारे आणि राष्ट्रभक्ती चेतविणारे विवेकानंदांचे विचार अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या या उपक्रमास शुभेच्छा.
 

***************************************************
आजपासून स्वामी विवेकानंदांचे शक्तिशाली विचार येथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. यानिमित्ताने मला स्वत:ला पुन्हा एकदा या विचारांचे सानिध्य मिळावे हा हेतू आहे. १९६३ साली स्वामी विवेकानंदांची जन्मशताब्दी होती. त्या आधी एक वर्ष - १९६२ साली चीन कडून आपला दारूण पराभव झाला होता. त्यानंतर देशातील तरुण पिढीत आलेले नैराश्य दूर करण्याचे महत्वाचे काम स्वामी विवेकानंदांच्या ' Rousing Call To Hindu Nation ' या पुस्तकाने केले होते.

कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार माननीय एकनाथजी यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे संकलन या पुस्तकातून केले होते. त्यांत तत्त्वज्ञान आहे, धर्म आहे, समाज शास्त्र आहे, कला, शिल्पकला आणि संगीतसुद्धा आहे. ज्यात आपल्या उज्ज्वल भूतकाळाचे वैभव आणि आपल्या सध्याच्या अवनतीची मीमांसा आहे; जे विचार आपल्याला भवितव्यासाठी कार्य करण्याची प्रेरण देतील अशाच विचारांची निवड या पुस्तकात केल्याचे माननीय एकानाथजींनी म्हटले आहे. स्वामीजींचा संदेश, त्याचा कोणत्याही प्रकारे अर्थ न लावता जसाच्या तसा त्यांच्याच भाषेत मांडण्यात आले आहेत. अधिकृत रीत्या प्रकाशित साहित्यातूनच हे विचार संकलित केले आहेत.
विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाने 'हिंदुतेजा, जग रे !' या नावाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. पुढील वर्षी स्वामी विवेकानंदांच्या जन्माला १५० वर्षे होत आहेत; त्यानिमित्ताने...
' तमोगुणाचा त्याग करा. ' तमोगुणातून अनेक अपप्रवृत्तींचा जन्म होतो. मूर्खपणा, भोळ्या समजुती, मनाची क्षुद्रता, परस्पर कलह, लहान सहन गोष्टींवरून परस्परांशी तुटणे या त्या अपप्रवृत्ती होत. या अनिष्ट वृत्ती टाकून देऊन ऐक्य आणि संघटनेच्या महाशिलेवर आपण एका महाशक्तीची उभारणी केली पाहिजे. आपल्या सर्वांच्या इच्छाशक्ती एकवटून आपल्या भूताकालापेक्षाही अधिक वैभवशाली असा भविष्यकाळ आपण निर्मिला पाहिजे. 

- स्वामी विवेकानंद

पुढील लिंकवर क्लिक करा...
 तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा
 स्वामी विवेकानंदांचा संदेश

वसुधैव कुटुम्बकम्‌

विवेकानंद विचारांचा वाहक - नरेंद्र मोदी

स्वामी विवेकानंद : संगम अध्यात्म आणि विज्ञानाचा

आर्य आणि अनार्य

विवेकानंद साहित्य संमेलन २०१३

सावरकरांच्या जीवनात स्वामी विवेकानंद

विवेकानंदांच्या विचारांचेऔचित्य

विवेकानंद, विज्ञान आणि धर्म

जमशेटजी टाटा यांचे स्वामी विवेकानंदांना पत्र

स्वामी विवेकानंदांचे विविध पैलू

‘धर्म सोडायचंय मला...!’ वादाच्या निमित्ताने...

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा

 

1 comment:

  1. Chhan sir yanchya visharatun khup kahi shikayala milate...so keep it up...
    Sir ani ho Aplya blog var pagereview (एकूण पृष्टदृश्ये) he Kase aad karatat...

    ReplyDelete

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी