Wednesday, June 29, 2022

ऋषी बंकिमचंद्र चरित्र ग्रंथाचे सुनील देवधर यांच्या हस्ते प्रकाशन

बंकिमचंद्रांनी वंदे मातरम् मंत्र दिला, त्यातूनच स्वातंत्र्याची उर्मी जागली

‘ऋषी बंकिमचंद्र' ग्रंथाचे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटर येथे प्रकाशन करताना जटायु अक्षरसेवा प्रकाशन संस्थेचे संतोष जाधव, डेक्कन एज्युकेश सोसायटीचे धनंजय कुलकर्णी, वक्ते सुनील देवधर, लेखक मिलिंद सबनीस आणि प्रकृती केअरचे डॉ. ज्ञानोबा मुंडे.


पुणे | कृतज्ञता हा भारताचा स्थायीभाव आहे. कुटुंबातील आई ही कृतज्ञतेचे मूर्तीमंत रूप आहे. ऋषी बंकिमचंद्र यांनी भारत देशाला मातेच्या, आदिशक्तीच्या रूपात पाहिले. ‘वंदे मातरम्‌‍' हा मंत्र दिला. या महामंत्रातूनच स्वातंत्र्याची उर्मी जागली. वंदे मातरम् हा वंगभंग आंदोलनाचा आत्मा होता. यातूनच लाल, बाल आणि पाल यांचे नेतृत्व पुढे आले. बंकिमचंद्रांचे चरित्र प्रेरक आणि स्फूर्तीदायी असल्याने ते घराघरात पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन ईशान्य भारतातील नेते व अभ्यासक सुनील देवधर यांनी केले.

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ऐतिहासिक अॅम्फी थिएटरमध्ये जटायु अक्षरसेवा प्रकाशन संस्थेने आयोजित केलेल्या ऋषी बंकिमचंद्र या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे धनंजय कुलकर्णी, प्रकृती केअर फाउंडेशनचे डाॅ. ज्ञानोबा मुंडे जटायुचे संतोष जाधव आणि वंदे मातरम््चे अभ्यासक व ग्रंथाचे लेखक मिलिंद सबनीय यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि बंकिमचंद्र जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी देवधर म्हणाले, आपल्या पूर्वजांनी शाश्वत विचारांची मांडणी केली आहे. या विचारांना आचरणात आणणाऱ्या समाजाची आज आवश्यकता आहे. राष्ट्रीय विचारांची प्रभावी मांडणी होण्यासाठी तरुणांनी सोशल मीडिया योद्धा बनण्याची गरज आहे. हिंदूंचे सैनिकीकरण झाले पाहिजे, यासाठी शस्त्र म्हणून कायद्याचे प्राथमिक ज्ञान करून घ्या, माहिती अधिकार कायदा जाणून घ्या. 

लेखक मिलिंद सबनीस यांनी ग्रंथलेखनामागील भूमिका सांगितली. संतोष जाधव यांनी प्रास्ताविक तर डॉ. रवींद्र मिणियार यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन सिद्धाराम पाटील तर आभार अश्विनी चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता हिमानी नांदे यांनी गायलेल्या वंदेमातरम्‌‍ने झाली.

पवारांना पगडीचा राग येतो म्हणून पगडी घालूनच बोलणार

प्रारंभी देवधर यांचा बह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी हा ग्रंथ आणि पुणेरी पगडी देऊन सत्कार झाला. हा धागा पकडून देवधर म्हणाले, शरद पवार यांना पुणेरी पगडी पाहिली की राग येतो, असे ऐकिवात आहे. ते समाज तोडणारे नेते आहेत. त्यांना खूप राग यावा म्हणून मी पूर्णवेळ पगडी घालूनच बोलणार आहे, असे सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 

पुस्तकाचे नाव - ऋषी बंकिमचंद्र
लेखक - मिलिंद सबनीस
प्रकाशक - जटायु अक्षरसेवा
मूल्य - ५९९
सवलतीत - ४९९ (टपाल खर्चासह)

पुस्तक मागवण्यासाठी jataau.com/shop/rishi-bankim

9767284038 व्हाटस् अॅप क्रमांकावर संपर्क करूनही पुस्तक मागवू शकता.

Tuesday, May 10, 2022

ओळख वंदे मातरम् रचेत्या ऋषी लेखकाच्या चरित्राची / ऋषी बंकिमचंद्र

 

ऋषी बंकिमचंद्र
पाच पिढ्या लोटल्या. बंकिमचंद्रांबद्दल दोन ओळींचीच माहिती पुढे आली. वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले. आनंदमठ या ऐतिहासिक कादंबरीतील हे गीत आहे.. या त्या दोन ओळी. गेल्या 128 वर्षांत मराठी भाषेत एकही चरित्र ग्रंथ प्रकाशित झाला नाही.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आत्मा - वंदे मातरम्च्या रचेत्याचे प्रेरक चरित्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित करायचे जटायु अक्षरसेवाने ठरवले. ऋषी बंकिमचंद्र या नावाने ते प्रकाशित होत आहे. वंदे मातरम् आणि बंकिमचंद्र यांच्यावर दोन तपाहून अधिक काळ अभ्यास करणारे तपस्वी लेखक मिलिंद सबनीस यांच्या सिद्धहस्त लेखणीतून हे चरित्रग्रंथ साकार झाले आहे. या चरित्रग्रंथाची ओळख करून देणारा लेख येथे सादर आहे.


ग्रंथाचे नाव    : ऋषी बंकिमचंद्र
लेखक    : मिलिंद सबनीस
प्रकाशक     : जटायु अक्षरसेवा
पृष्ठे    : सुमारे 240
मूल्य    : 599/-
सवलत मूल्यात घरपोच मागवा    : 499/-
संपर्क    : 9767284038
UPI    : jataa108@uboi


एका अलौकिक स्फुरणाचे स्मरण


सुमारे बाराशे वर्षांच्या चिवट संघर्षानंतर भारतीय स्वातंत्र्यवीरांनी प्राप्त केलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2022 रोजी आपण साजरा करत आहोत. यानिमित्ताने त्या हजार-बाराशे वर्षांमध्ये भारताच्या राष्ट्रीय स्वाभिमानाची ज्योत प्रखरतेने तेवत ठेवण्यासाठी आपल्या सर्वस्वाचे समर्पण करणार्‍या हजारो वीरांचे, योद्ध्यांचे कृतज्ञतापूर्वक पुण्यस्मरण करणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. या कर्तव्याच्या अनुषंगाने ‘जटायु अक्षरसेवा’ या प्रकाशन संस्थेतर्फे ज्येष्ठ लेखक, अभ्यासक मिलिंद सबनीस यांनी लिहिलेले वंदे मातरमचे उद्गाते, आनंदमठकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे चरित्र प्रकाशित केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला केलेले हे अनोखे अभिवादन आहे, असे म्हटले पाहिजे. याबद्दल  या चरित्रग्रंथाच्या निर्मितीत पुढाकार घेतलेले सिद्धाराम पाटील आणि मिलिंद सबनीस यांचे हार्दिक अभिनंदन.

या उपक्रमाला अनोखे अभिवादन म्हणण्याची अनेक कारणे आहेत. 
सर्वात पहिले म्हणजे बंकिमचंद्र यांचे मराठीत प्रसिद्ध होत असलेले हे पहिलेच चरित्र आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे या पुस्तकाच्या शीर्षकाद्वारे बंकिमचंद्रांना लेखकाने सहर्ष आणि साभिमान प्रदान केलेली ‘ऋषी’ ही श्रेष्ठ उपाधी! बंकिमचंद्रांना राष्ट्र निर्माता आणि ऋषी या दोन विशेषणांनी गौरव केला तो महर्षी अरविंद यांनी! त्यासंदर्भात योगी अरविंदांनी ऋषी या संज्ञेची केलेली मीमांसा सबनीस यांनी आवर्जून या पुस्तकात नमूद केली आहे. अनोखेपणाचे तिसरे आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अर्थातच या पुस्तकातील मांडणीचा आशय आणि त्याद्वारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या देखण्या चरित्राचे उलगडलेले विविध विलोभनीय पैलू!

वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी अत्यंत प्रत्ययकारी कविता लिहिणार्‍या शालेय वयातील बंकिमचे साहित्यगुण त्यांचे गुरू, ज्येष्ठ साहित्यिक आणि संपादक ईश्वरचंद्र गुप्त यांनी ओळखले आणि त्यांनीच त्याला पद्याबरोबरच गद्य लेखनही सुरू कर, असा सल्ला दिला. गुरूच्या संदेशाशी बंकिमचंद्रांच्या लेखणीने पूर्ण इमान राखले. इतके की, ‘आधुनिक कादंबरीचे जनक’ असे अजरामर स्थानच तिने बंकिमचंद्रांना प्राप्त करून दिले. कादंबरी शिवाय कथा, विनोदी लेख, विज्ञान, टीकात्मक लेख, निबंध, ललित लेख असे गद्य वाङ्मयाचे जवळजवळ सर्व प्रकार बंकिमचंद्र यांनी अत्यंत प्रभावीपणे हाताळले. दोन पृष्ठांच्या निबंधापासून ते 434 पृष्ठांच्या महाकादंबरीपर्यंत विविध आकाराच्या विस्ताराचे त्यांचे लेखन तितकेच प्रभावी आणि प्रत्ययकारी असे. ‘बंगदर्शन’सारखे साहित्यिक नियतकालिक अत्यंत समृद्ध स्वरूपात सादर करून त्यांनी आपले संपादकीय नैपुण्यही अधोरेखित केले.

सामान्यतः कथा, कादंबरी, ललितलेख यासारखे साहित्य रंजनप्रधान आणि लोकप्रियतेचा अनुनय करणारे आढळते. मात्र बंकिमचंद्र यांच्या कादंबर्‍या विविध साहित्य रसांचा उत्तम परिपोष करतात आणि त्याचबरोबर प्रबोधन, सामाजिकता आणि राष्ट्रीयता यांचे जागरण, पराक्रम-वीरता यांचे संवर्धन, धर्माचा आधुनिक विचार-प्रसार तसेच जेत्यांनी लिहिलेल्या भ्रामक इतिहासाचा पर्दाफाश... यासारख्या राष्ट्रप्रेमी सामाजिकतेचेही संवर्धन करतात.

दुर्गेश नंदिनी या पहिल्या कादंबरीपासून कपालकुंडला, मृणालिनी, विषवृक्ष आदी सर्व कादंबर्‍यांचे अत्यंत धावते परंतु समर्पक रसग्रहण करीत मिलिंद सबनीस यांनी बंकिमचंद्र यांच्या लेखणीचे हे विशेष सोदाहरण उलगडून दाखवले आहेत. आर्य चाणक्याने जागवलेल्या एकराष्ट्रीयतेच्या प्रेरणेशी साधर्म्य दर्शवणारे, जवळीक साधणारे लेखन बंकिमदांनी केले असल्याचे अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण मिलिंद सबनीस यांनी नोंदवले आहे.

बंकिमचंद्रांनी इंग्रजी प्रशासनाची चाकरी पत्करली हे खरे; परंतु आपल्या देशभक्ती आणि राष्ट्रभावना तसेच तिचा आपल्या साहित्यातून प्रसार यांच्याआड ती नोकरी येऊ दिली नाही. तसेच नोकरीच्या माध्यमातून आलेली न्यायदानाची जबाबदारी निष्ठेने पार पाडताना ब्रिटीश अधिकार्‍यांना दंड, शिक्षा फर्मावतानाही कोणत्याही दडपणाचा दबाव बाळगला नाही. यामुळे अधिकार्‍यांची नाराजी त्यांना पत्करावी लागली. परंतु त्यांच्या कठोर कर्तव्यदक्ष कारभारामुळे आणि प्रतिमेमुळे त्यांच्या नोकरीवर शासनाकडून कधीच गदा आली नाही. सतत बदल्यांच्या रूपाने काही प्रमाणात त्याची शिक्षा त्यांना अनुभवावी लागली. पण तीही त्यांनी विनातक्रार सहन केली. मात्र आपला न्यायनिष्ठेचा बाणा त्यांनी सोडला नाही. त्यांच्या या समतोलाचेही उत्कृष्ट वर्णन मिलिंद सबनीस यांनी केले आहे.

उपासकाच्या रूपात बंकिमचंद्र हे विष्णूभक्त-वैष्णव होते. परंतु विष्णूची आराधना करतानाही त्यांनी दुष्टांचे निर्दालन आणि पृथ्वीच्या उद्धारासाठी कर्मयोगाचा संदेश देणार्‍या विष्णू रूपाचाच पुरस्कार आपल्या साहित्यातून केला. ‘आनंदमठ’मधील संन्यासी संतान (संथाळ) वैष्णवधर्मीच आहेत. या संतांनांच्या उठावाचे नेतृत्व करणारे वृद्ध संन्यासी सत्यानंद यांच्या तोंडी बंकिमदांनी अर्थपूर्ण वक्तव्याद्वारे वैष्णव धर्माचे उत्तम विश्लेषण मांडले आहे. स्वामी सत्यानंद म्हणतात, “खर्‍या वैष्णव धर्माचे लक्षण म्हणजे दुष्टांचे निर्दालन आणि या धरणीमातेचा उद्धार! कारण जगाचा पालनकर्ता विष्णू आहे. त्याने दहा अवतार घेऊन या जगाचा उद्धार केला. केसरी, हिरण्यकश्यपू, मधुकैटभ इत्यादी दैत्यांचा नाश त्यानेच केला. रावण, कंस आदी राक्षसांना त्यांनीच मारले. तोच जेता आणि पृथ्वीचा उद्धारकर्ता आणि तोच आहे संतानांचे इष्टदेवता... संतानांचा विष्णू केवळ शक्तीरूपी आहे...”

‘आनंदमठ’च्या माध्यमातून बंकिमदांनी एका बाजूने शक्तीच्या उपासनेचा आणि त्या शक्तीच्या अधिष्ठानावर इंग्रजांचे वर्चस्व झुगारून देणार्‍या चळवळीची प्रेरणा जागविली, तर दुसर्‍या बाजूने त्या चळवळीला सात्विक सामर्थ्य प्रदान करणारा ‘वंदे मातरम्’ हा पंचाक्षरी मंत्र उजागर केला. स्वाभाविकपणे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या चरित्रकथेचा सर्वात मोठा भाग ‘वंदे मातरम्’ने व्यापला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीची सारी इमारतच मुळी वंदे मातरमच्या भक्कम पायावर उभी राहिली आणि यशस्वी फलनिष्पत्तीकडे गेली.

वंदे मातरम् या गीताने काय काय आणि कोणा कोणाला प्रेरित केले याची सूची फार मोठी आहे. राष्ट्रयोगी महर्षी अरविंद, गुरूदेव रवींद्रनाथ टागोर, भगिनी निवेदिता, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अनेकानेक क्रांतीकारक यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत वंदे मातरमने प्रज्वलित केली. 1902 साली रवींद्रनाथ टागोर यांच्या घरी झालेल्या एका देशभक्त समूहाच्या बैठकीत ‘अनुशीलन समिती’ या क्रांतिकारक संघटनेची स्थापना झाली. योगी अरविंद घोष या बैठकीला उपस्थित होते. या संघटनेच्या नावातील ‘अनुशीलन’ या शब्दाचा स्वीकार बंकिमचंद्र यांच्या लेखातल्या शीर्षकातूनच केला गेला होता.

दक्षिणेचे वासुदेव बळवंत फडके म्हणून ओळखले जाणारे अल्लुरी सीताराम राजू या आदिवासी लढवय्या क्रांतीकारकांनी आनंदमठ वाचूनच संन्यास ग्रहण केला आणि ब्रिटीशांचे राज्य उलथवण्यासाठी सशस्त्र चळवळ हाती घेतली. कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि कलकत्ता युनिवर्सिटीचे कुलगुरू गुरूदास बॅनर्जी यांनी बंकिमचंद्र यांचा उल्लेख ‘ऋषी बंकिम’ असा केला होता. अनुशीलन समितीतर्फे ‘युगांतर’ हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते. त्या वृत्तपत्राचे संपादक पद काही काळ स्वामी विवेकानंद यांचे बंधू भूपेंद्रनाथ दत्त यांनी भूषवले होते. 1905च्या डिसेंबरमध्ये बनारस येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात भगिनी निवेदिता यांनी भारताचा जो ध्वज फडकवला (या ध्वजाची रचना स्वतः निवेदितांनी केले होते), त्यावर मध्यभागी ‘वंदे मातरम्’ ही अक्षरे रेखांकित केली होती. त्याआधी ऑगस्ट 1905 मध्ये वंगभंग विरोधी उभ्या राहिलेल्या चळवळीची प्रचारसभा कलकत्त्यात झाली. त्यासोबत वंदे मातरमचा उद्घोष उच्च स्वराने केला गेला. वंगभंगविरोधी चळवळ भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातला एक सुवर्णाध्याय आहे. त्या चळवळीचा मंत्रच मुळी वंदे मातरम हा होता. 1906 मध्ये बारिसाल येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात वंदे मातरमचा गजर करणार्‍या कार्यकर्त्यांवर इंग्रज पोलिसांनी लाठीहल्ला केला. ब्रिटीश शासनाच्या उरात वंदे मातरम या घोषणेने जणू धडकीच भरली होती.

1906 मध्येच वंगभंगाच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या सभेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी वंदे मातरम् मधोमध अंकित केलेलाच ध्वज फडकवला. एक वर्षानंतर 1907 मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताच्या प्रतिनिधी या नात्याने मादाम भिकाजी रुस्तम कामा यांनी जो ध्वज फडकवला त्यावरही ‘वंदे मातरम’ हेच शब्द होते.

एकोणीस वर्षांचा तरणाबांड खुदीराम बोस, लंडनमध्ये कर्झन वायलीवर गोळ्या झाडणारा तेजस्वी युवक मदनलाल धिंग्रा, रामप्रसाद बिस्मिल, अश्फाक उल्ला खान, राजेंद्र लाहीडी आदी क्रांतिकारकांनी वंदे मातरम्चा उद्घोष करीतच हौतात्म्य पत्करले. तर चितगाव येथील शस्त्रागारावर हल्ला करणारा सूत्रधार मास्टर सूर्यसेन यांची कथा तर अधिकच रोमांचक आहे. सूर्यसेनदांना फाशी देण्याच्या आदल्या रात्री 12 जानेवारी 1934 रोजी त्यांच्या कोठडीत नेत असताना ते वंदे मातरम्च्या घोषणा देत राहिले. त्यासाठी त्यांना अमानुष मारहाण जेलच्या अधिकार्‍यांनी केली. तरीही त्यांनी गर्जना थांबवली नाही. लाठ्यांच्या प्रहाराचा इतका वर्षाव त्यांच्यावर करण्यात आला की, शेवटी ते बेशुद्ध पडले. त्याच बेशुद्धावस्थेत त्यांना फासावर चढवण्यात आले. मिलिंद सबनीस यांनी वंदे मातरम्च्या प्रेरणेबाबतचा हा सारा तपशील अतिशय उद्बोधक रीतीने पुस्तकात नमूद केला आहे. नंदुरबारचा कोवळा किशोर शिरीषकुमार, कनकलता बरुआ ही आसामची बाल वीरांगणा यांनीही वंदे मातरम्च्या गजरातच ब्रिटीशांच्या गोळ्या झेलल्या.

वंदे मातरम् या नावाने वृत्तपत्रसृष्टीला ही भुरळ घातली. या नावाचे पहिले साप्ताहिक बंगालमध्ये सुरू झाले. त्याचे पहिले संपादक बिपिनचंद्र पाल तर नंतरचे अरविंद घोष! 1908 मध्ये पुण्यातून, 1909 मध्ये जिनिव्हा येथून (मादाम कामा व श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्रजीत सुरू केले), 1914 मध्ये स्वित्झर्लंड येथून, 1920 मध्ये दिल्लीहून (लाला लजपतराय - हिंदीतून) वंदे मातरम् नावाची वृत्तपत्रे निघाली. वंदे मातरम् या शब्दसमुच्चयाचे आणि त्यातून व्यक्त होणार्‍या भावनेचे सामर्थ्य असे वेगवेगळ्या क्षेत्रात प्रकट होऊ लागले ते साधारण विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापासून-1902 पासून. मात्र त्या सुप्त आणि सशक्त सामर्थ्याची जाणीव स्वतः बंकिमदांना मात्र त्या आधी किमान पंधरा वर्षांपासूनच स्पष्ट होती. 1890 मध्ये बंकिमचंद्र यांनी आपली कन्या शारदा कुमारीशी बोलताना, ‘एक दिवस तू पाहशील, दहा -वीस वर्षांच्या आतच या गीतामुळे सारा बंगाल पेटून उठेल. एकटा बंगालच काय, सारा हिंदुस्थान या गीतापासून स्फूर्ती घेईल. सारा देश एका सुरात हे गीत गाऊ लागेल...!’ या भाकितानंतर पंधरा वर्षांनी बंकिमदांचे हे शब्द अक्षरशः खरे ठरले.


बंकिमचंद्रांचेे भाचे शचिंद्रनाथ यांना तर त्यांनी म्हटले होते की, ‘माझे बाकी सारे लिखाण गंगेत बुडवले तरी चालेल; परंतु हे गीत मात्र शाश्वत ठरेल आणि देशाचे हृदय जिंकेल.’ केवढा प्रचंड आत्मविश्वास हा द्रष्टा लेखक आपल्या साहित्यकृतीबद्दल व्यक्त करीत होता!

आपल्या जन्मभूमीच्या मातीला माता स्वरूप बहाल करून देशभक्तीला मातृभक्तीचे रूप प्रदान करणारी उदात्तम भावना केवळ आणि केवळ भारतातच सर्वात प्रथम जन्माला आली, हे ऐतिहासिक सत्य आहे. वंदे मातरम् हे त्याच उदात्त भावनेचे स्फुरण आहे. याच स्फुरणाची प्रक्रिया आणि इतिहास अत्यंत मनोवेधक आहे. 1762 ते 1774 या काळात झालेल्या इंग्रज विरोधी संन्यासी-उठावाची पार्श्वभूमी कलकत्त्याच्या जवळच असलेल्या नैहाटी कांटलपाडा या आपल्या जन्मगावीच कार्तिक शुद्ध नवमी  7 नोव्हेंबर 1875 रोजी बंकिमचंद्रांना झालेले या बंगाली-संस्कृत मिश्र भाषेतील गीताचे स्फुरण, 1882 मध्ये त्या संन्यासी उठावावरच आधारलेल्या आनंदमठ या दिव्य कादंबरीत त्या गीताचा केलेला समावेश आणि मुख्यतः 1905 पासून वंगभंगाच्या चळवळीपासून थेट आजतागायत या पंचाक्षरी मंत्राने देशभक्त भारतीयांच्या हृदयाचा घेतलेला ठाव... हा सारा रोमहर्षक प्रवास अतिशय सुलभ भाषेत मराठी वाचकांसमोर साकार करणारे मिलिंद सबनीस आणि तो इतिहास पुस्तकरूपाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या उंबरठ्यापाशी सादर करणारे जटायु अक्षरसेवा हे दोन्ही शतशः अभिनंदनास पात्र आहेत. त्यांच्या या राष्ट्रकार्यास खूप खूप शुभेच्छा!

( ग्रंथ मागवण्यासाठी संपर्क : 9767284038)

- अरुण करमरकर!!!!

jataau.com/shop

Monday, June 14, 2021

श्री रामजन्मभूमी ट्रस्ट, आरोप आणि वास्तव

 नेमके काय आहे प्रकरण

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर हे शक्य तितके भव्य दिव्य व्हावे, ही समस्त रामभक्तांची भावना आहे. यासाठी जन्मभूमीलगतचे काही भूखंड ट्रस्टने खरेदी केल्या आहेत. त्यातील १.२ एकर भूमीच्या खरेदीसंदर्भात आरोप झाला आहे. आरोपाची कथानक अशा रीतीने रचण्यात आली आहे की प्रथमदर्शनी घोटाळा झालेला असावा, असे वाटू शकते.

 आम आदमी पक्षाच्या संजय सिंह आणि समाजवादी पार्टीच्या पवन पांडेय यांनी आरोप केला की, “राम मंदिरासाठी जमीन खरेदीत घोटाळा झाला आहे. १८ मार्च २०२१ रोजी पाच मिनिटांपूर्वी जी जमीन दोन कोटीत विकली गेली तीच जमीन ट्रस्टने १८.५ कोटी रुपयांत खरेदी केली. पाचच मिनिटांत जमीन १६.५ कोटी रुपयांनी महाग झाली. या दोन्ही व्यवहारात डाॅ. अनिल मिश्रा हे साक्षीदार आहेत. इत्यादि.’’ परंतु, ही माहिती अर्धसत्य आहे. नितीन त्रिपाठी या अभ्यासकाने आरोप करणाऱ्यांची लबाडी नेमकेपणाने पकडली आहे.

 आरोप करणाऱ्यांनी १८ मार्च रोजी दोन व्यवहार झाल्याचे म्हटले आहे. तिसरा व्यवहार आरोप करणाऱ्यांनी लपवला आहे. वास्तविक पाहता तिसरा व्यवहार १८ मार्च रोजी सर्वात आधी झाला. या व्यवहारानुसार, कुसुम पाठक व हरीश पाठक यांचे सुल्तान अंसारी बिल्डर आणि पार्टनरसोबत दोन कोटी रुपयाला विक्रीचा जो करार होता तो निरस्त करण्यात आला.

 समाजायला सोपे व्हावे म्हणून क्रमाने विषय समजून घेऊया.

 1 - सन २०१९ मध्ये पाठक यांनी ही जमीन दोन कोटी रुपयांत सुल्तान अन्सारी बिल्डर व अन्य ८ भागीदारांना विकण्यासंबंधी करार रजिस्टर्ड केला. या प्रकरणी ५० लाख रुपये देण्यात आले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या वेळी अद्याप श्री रामजन्मभूमी संबंधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागलेला नव्हता. अर्थातच त्या वेळी अयोध्येतील जमीनाचे दर खूप कमी होते.

2 – दि. १८ मार्च २०२१ रोजी पाठक यांनी हा करारनामा रद्द केला. हा करार रद्द झाल्याशिवाय पाठक यांना ही जमीन विकता येणार नव्हती.

3 – मग त्याच दिवशी म्हणजे १८ मार्च रोजी त्यांनी ही जमीन सुल्तान अन्सारी बिल्डरला याच दराने म्हणजे २ कोटी रुपयांना विकली.

4 – मग सुल्तान अन्सारी यांच्याकडून ही जमीन ट्रस्टने १८.५ कोटी रुपयांत खरेदी केली.

 दोन वर्षांपूर्वीची गोष्ट निराळी होती. तेव्हा म्हणजे राममंदिर होईल की नाही याची काहीही खात्री नसताना त्या जमिनीचा दोन कोटी रुपयांत व्यवहार झाला. आता सर्वोच्च न्यायालयाने निसंदिग्धपणे श्री रामजन्मभूमीच्या बाजूने निकाल दिला आहे. त्या ठिकाणी जगातील सर्वात मोठे धार्मिक श्रद्धा केंद्र साकारले जाणार आहे. त्या भूमीशी जोडून असलेल्या १.२ एकर भूमीच्या दरात प्रचंड वाढ होणे नैसर्गिक आहे. ती भूमी १८.५ कोटी रुपयांत खरेदी करणे काहीही चुकीचे नाही. रियल इस्टेटमध्ये जमिनीच्या किंमती कशा रीतीने वाढतात किंवा कमी होतात याचे सामान्य ज्ञान असलेला कोणीही हा व्यवहार योग्य आहे असेच म्हणेल.

 जमिनीचे व्यवहार हे असेच होतात. ही काॅमन प्रॅक्टिस आहे. बिल्डर लोक २५ ते ३० टक्के रक्कम देऊन शेतकऱ्यांकडून दीर्घ काळासाठी लॅन्ड अॅग्रीमेंट करतात. मग ते ही जमीन खरेदी करू शकेल अशी पार्टी शोधत राहातात. शेतकऱ्याने करार करून ठेवला असल्याने बिल्डरला आधी ठरलेल्या दरातच विकण्यासाठी तो बांधील असतो. दरम्यान, जमिनीचे दर वाढतात. बिल्डरला योग्य पार्टी मिळताच तो सौदा करतो. खरेदीदार पार्टीची विवशता किंवा मजबुरी असते की त्याला बिल्डरकडूच खरेदी करावी लागते. कारण बिल्डरने शेतकऱ्याशी करार केलेला असतो. मग रजिस्ट्री करण्याच्या दिवशी बिल्डर हा आधीचा करार रद्द करतो आणि प्राॅपर्टी जुन्या दरानेच खरेदी करतो. आणि नव्या दराने पार्टीला विकून टाकतो.

 जमिनींच्या व्यवहारात प्राॅपर्टी डीलिंगची एक सामान्य प्रॅिक्टस आहे. शहरात बिल्डर लोक असेच अॅग्रीमेंट करतात आणि मग जमीन डेव्हलप करून दर वाढवून विकतात. ओरिजनल पार्टीला आधी ठरलेलाच दर मिळतो, बिल्डरला यात प्रचंड नफा असतो. ही त्यांच्या रिस्कची वसुली असते.

 हिंदु समाजाचा तेजोभंग करणे, हेच काम जे करत आले त्यांनी श्री रामजन्मभूमी मंदिर ट्रस्टवर आरोप केले आहेत. सर्वच आरोप सत्य नसतात. सेंट्रल विस्टा असो, लहान मुलांचे लस दुसऱ्या देशांना का पाठवले असे विचारणे असो वा राफेल आदी.. या सर्व विषयांवर आरोप असे केले गेले की क्षणभर शंका यावी. सत्य सर्वांसमोर आहे. आता रामजन्मभूमी ट्रस्टवर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रकार परिषद घेऊन आरोप करणे  टूलकिटचाच भाग आहे का, माहीत नाही. याची चौकशी झाली पाहिजे.

 क्षुद्र राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कोणी देशाच्या श्रद्धास्थानाशी संबंधीत ट्रस्टवर संशयाचे धुके आणत असेल तर हे गंभीर आहे. हिंदुत्वाला बदनाम करणाऱ्या शक्तींची आजवरची प्रचारशैली पाहा. नॅरेटिव्ह किंवा कथानक अशा रीतीने पुढे आणले जाते की सामान्य माणसाला प्रथमदर्शनी कथानक सत्य वाटू लागते. रामजन्मभूमी ट्रस्टवर झालेले आरोप केवळ बदनामी करण्यासाठी केले आहेत, यात काही संशय नाही. कोणीही कोठेही भ्रष्टाचार किंवा फसवणूक केली असेल तर संबंधितांवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु, हिंदुंचा तेजोभंग करणे एवढ्याच उद्देशाने पुन्हा पुन्हा खोटे आरोप होत असतील तर कायदेशीर मार्गाने स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त झाला पाहिजे.

 केदारनाथ ढगफुटीच्या वेळी नरेंद्र मोदी यांच्यासंबंधी अशीच खोटी बातमी चालवली गेली. नंतर संबंधीत मीडिया हाऊसने क्षमा मागितली. कठुआ प्रकरणीही असेच कथानक रचले गेले. अनेक महिने खोट्या बातम्यांचा रतीब घातला गेला. मुख्य आरोपी त्या दिवशी कठुआपासून शेकडो किलोमीटर दूर असल्याचे एटीएमच्या सीसीटीव्हीमुळे सिद्ध झाले. अशी शेकडो उदाहरणे आहेत. रामजन्मभूमीवर मंदिर होऊ नये यासाठी आकाशपाताळ एक करणाऱ्यांनी आता आणखी एक आघात केला आहे.

  ‘आरोप आम्हाला नवीन नाहीत, आम्ही त्याची चिंता करत नाही, तुम्हीही करू नका. आता काहीच सांगायचे नाही. या प्रकरणाचा अभ्यास करण्यात येईल.’, असे ठामपणे ट्रस्टचे महासचिव आणि ज्येष्ठ प्रचारक चंपत राय म्हणाले ते बरेच झाले. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या संस्कृतीसाठी, या राष्ट्रासाठी समर्पित केले आहे, असे त्यागी लोक लोक श्री रामजन्मभूमी ट्रस्टवर आहेत. तीन दशकांहून अधिक काळ समर्पित भावनेने रा. स्व. संघाच्या माध्यमातून कार्य करणारे डाॅ. अनिल मिश्रा यांनी ट्रस्टचे प्रतिनिधी म्हणून भूमी खरेदीचा व्यवहार केला आहे. ट्रस्टचे काम कोणा एका व्यक्तीच्या इच्छेने चालत नाही. निर्णय प्रक्रियेत सर्वांचा सहभाग असतो. संघाचे हे संस्कार आहेत. जन्मभूमीलगत मोकळी असलेली जेवढी भूमी बाजारभावाने घेता येईल, ती घ्यायची आणि होता होईल तेवढे भव्य दिव्य जन्मभूमी मंदिर उभारायचे, ही हिंदू समाजाची भावना आहे. ट्रस्टने तेच काम केले आहे. या गैरव्यवहार नाही किंवा घोटाळाही नाही.

-       -  सिद्धाराम भै. पाटील

----------

ही माहिती शेअर करण्यासाठी वा कापी पेस्ट करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही.

Friday, January 8, 2021

विनाकारण माहोल का खराब कोण करत आहे ?


मुस्लिमांची संख्या जास्त आहे त्या भागातून रॅली काढू नका, अशी ही बातमी आहे.

सर्वसामान्य माणूस या बातमीकडे कसा पाहातो? अरे हे योग्यच आहे की. मुस्लिमबहुल भागातून रॅली का काढायची? विनाकारण माहोल का खराब करायचा ?. यामागे एक भावना असते की विनाकारण वाद नको. यामुळे गंगा जमनी तहजीब धोक्यात येईल. समाजाची एकता उसवली जाईल. वरवर पाहता हा विचार योग्यच आहे, असे वाटू शकते.
परंतु, इतका वरवरचा विचार करून सोडून देण्यासारखा हा विषय नाही, असा विचार करणारा एक मोठा वर्गही देशात आहे. तो वेगळ्या पद्धतीने विचार करतो.
मुस्लिम इलाख्यातून रॅली का काढायची नाही? देशाच्या कोणत्याही भागातून रॅली काढण्याचा हक्क घटनेने दिला आहे की नाही? मुस्लिम इलाख्यातून रॅली काढायचा नाही, ही मागणी मान्य झाली तर उद्या हिंदूंनीही अशीच भूमिका घेतली तर? तर काय होईल? हिंदू इलाख्यात मशिदी नकोत, हिंदू इलाख्यात बांगचा आवाज ऐकायला येऊ नये, अशी मागणी लोकांनी करायला सुरूवात झाली तर देशात ऐक्य राहील काय? असा विचार करणारा एक मोठा वर्ग देशात तयार हाेत आहे.
येथे मला एक उदाहरण आठवते. गुजरातमधील डांग जिल्ह्यातील ही घटना आहे. या वनवासी भागात फार मोठ्या प्रमाणात मतांतर झाले आहे. वनवासी बांधवांना प्रलोभने दाखवून, त्यांच्या गरीबीचा गैरफायदा घेऊन त्यांना ख्रिस्ती बनवण्यात आले आहे. कांॅग्रेस सत्तेत असताना भवानीशंकर नियोगी आयोग नेमला होता. त्यामध्ये याबद्दल फार विस्तृत माहिती आहे. ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांनीही याबद्दल पुष्कळ लेखन केले आहे.
डांग जिल्ह्यातील एका गावात मतांतर झाल्याने ख्रिश्चन बनलेल्यांची संख्या अधिक झाली. त्या गावामध्ये एका मतांतर न केलेल्या व्यक्तीने आपल्या मालकीच्या जागेत मंदिर उभारण्याचे ठरवले. गाव ख्रिश्चनबहुल आहे आणि त्यामुळे तुम्हाला येथे आता नव्याने मंदिर बांधता येणार नाही, अशी भूमिका तेथील ख्रिश्चनांनी घेतली. तेथे यावरून दंगल उसळली. दोन दशकांपूर्वीची ही गोष्ट आहे. देशातील मुख्य वृत्तपत्रे आणि टीव्ही मीडियातील बहुतेकांनी तेथे हिंदुंनाच जातीयवादी ठरवले. ख्रिस्तीबहुल भागात मंदिर बांधायची गरजच काय, अशी भूमिका घेण्यात आली.
अशीच एक घटना कोरोना काळात घडली. तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यातील एका गावातली ही घटना. ख्रिस्ती झालेल्यांची संख्या त्या गावात ५२ टक्के आहे. त्या गावातील एका मंदिराच्या आवारात भारतमातेची मूर्ती स्थापित करण्यात आली. तेथील काही ख्रिस्ती लोकांनी पोलिसांत तक्रार दिली. रस्त्यावरुन जाताना ही मूर्ती दृष्टीस पडते आणि त्यामुळे आमच्या भावना दुखावतात, अशी ती तक्रार होती. लगेच पोलिसांनी कारवाई करत भारतमातेची मूर्ती कापडाने झाकून टाकली. मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्यावर मूर्ती मुक्त झाली.
आपल्या देशात लाखो गावांमध्ये आजही हिंदू बहुसंख्येने आहेत. जेथे हिंदू बहुसंख्येने आहेत तेथे मशिदी आणि चर्च उभारायला नको, अशी भूमिका हिंदू समाजाने कधी घेतली आहे का? शहरांमधील कोणत्याही हिंदू भागात मशिदी, चर्च उभारू नका, म्हणून कोणत्या हिंदूने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे का? समजा असे निवेदन दिले तर तसे करणे योग्य होईल का? असे प्रश्न विचारणारा एक वर्ग समाजात तयार झाला आहे.
असे प्रश्न निर्माण होतातच कशाला? हे समजून घेतले पाहिजे.
जगात एकमेव माझाच रिलीजन किंवा मजहब खरा आहे. इतर सर्व लोकांनी मतांतर करून माझ्याच रिलीजन वा मजहबचा स्वीकार केला पाहिजे, असा विचार एकांतिक रिलीजनकडून शेकडो वर्षांपासून मांडण्यात आला आहे. दुसऱ्या धर्माचे अस्तित्वच स्वीकारायचे नाही, हा तो विचार आहे. जगभरात होणाऱ्या धर्मांतराच्या मागे हाच एकांतिक विचार आहे. मुस्लिम आणि ख्रिस्ती पंथांमध्ये हा संकुचित विचार प्रबळ आहे. संपूर्ण जग ख्रिस्ती बनले पाहिजे किंवा संपूर्ण जग दार उल इस्लाम बनले पाहिजे, असा विचार त्या त्या पंथांतील प्रमुख गटांकडून राबवण्याचा प्रयत्न होत असतो. यातूनच धर्मांतर, जिहाद वगैरे प्रकार पुढे येतात. आमच्या इलाख्यातून इतर धर्मियांची रॅली नको, गणपतीची मिरवणूक नको, आमच्या गावात मंदिर नको… वगैरे मागणीमागे माझाच एकमेव धर्म खरा हा संकुचित विचार आहे.
हिंदू हा समावेशक धर्म आहे. सर्वच धर्म सत्य आहेत. कोणत्याही मार्गाने तुम्ही इश्वरापर्यंत पोहोचू शकता. ईश्वर कणाकणांत आहे. ईश्वर एक आहे पण तो अनेक रूपातून व्यक्त होतो, हा हिंदू विचार आहे. हिंदू धर्म हा इतर धर्मांचे, रिलीजनचे, पंथांचे अस्तित्व मान्य करतो. मुस्लिम आणि ख्रिश्चन पंथातील विचारी लोकांनीही इतर धर्मांचे अस्तित्व मान्य करावे, यातूनच जगात शांती नांदेल, असे आवाहन स्वामी विवेकानंद यांनी केले होते.
थोडक्यात, गंगा जमनी तहजीब वाढायची असेल, समाजातील एकता वाढीस लागायची असेल तर आमच्या इलाख्यातून रॅली नको.. वगैरे भूमिका न घेता आम्ही रॅलीवर पुष्पवृष्टी करू.. आपण गुण्यागोविंदाने नांदू. मुस्लिम इलाख्यातून जाणाऱ्या मिरवणुका, रॅली यांचे स्वागत करू. सहकार्य करू अशी भूमिका घेतली पाहिजे. यामुळे मूळत:च सहिष्णू असणाऱ्या हिंदूंच्या मनात मुस्लिम समाजाविषयी शतपटीने प्रेमाची भावना निर्माण होईल. हिंदू मुस्लिम एकता ही समस्या राहाणार नाही. राजकीय लोक गैरसमज निर्माण करण्यासाठी पुढे येतील. त्यांना दूर करा. हिंदू – मुस्लिम यांनी एकमेकांचा आदर करणे हीच खरी मानवता आहे. ती वाढली पाहिजे. परंतु, ती वनवे असणार नाही. आमच्या इलाक्यात येऊ नका, असा फुटीर विचार करून विश्वासाचे वातावरण तयार होऊ शकत नाही.
सिद्धाराम
080121

Sunday, December 20, 2020

धन्य ते जीवन...

मा. गो. वैद्य यांच्यासोबत त्यांच्या घरी सिद्धाराम.


स्थळ : नागपुरातील मा. गो. वैद्य यांचे घर.
११ सप्टेंबर २०१९. सायंकाळची वेळ.
ही त्यांची शेवटची भेट ठरली.

९६ वर्षांच्या ज्ञानाच्या क्षेत्रातील या ऋषींना ‘ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी’ या ग्रंथासाठी एक लेख लिहिण्याची विनंती केली. ते म्हणाले, ‘आता सध्या मी एका ग्रंथावर काम करत आहे. साधारण फेब्रुवारी २०२० ला लेख देऊ शकेन. चालणार आहे का?’.
ग्रंथाचे प्रकाशन १९ जानेवारी २०२० ठरलेले असल्याचे मी सांगितले. त्यामुळे या ग्रंथात त्यांचे योगदान घेता आले नाही.
९६ वर्षांची व्यक्ती याही वयात इतके नियोजनबद्ध काम करते, हे मा. गो. यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे असेच होते.
एखाद्या विषयावर लेख लिहून पाहिजे असल्यास त्यांचा पहिला प्रश्न असायचा की लेख कधीपर्यंत हवा?.
सांगतिलेल्या दिवसापर्यंत शक्य असल्यास ते हो म्हणत, अन्यथा त्यांच्या नियोजनानुसार अमूक दिनांकापर्यंत चालणार आहे का, असे विचारत. ठरलेल्या दिनांकाच्या एक दोन दिवस आधी त्यांचा दूरध्वनी येणार. तुम्ही मागीतलेला लेख थोड्या वेळापूर्वी इ मेल केलाय. पाहून घ्या.
शंभरीकडे वाटचाल सुरू असतानाही वेळेचे इतके काटेकोर नियोजन... धन्य ते जीवन. ज्या व्यक्तींचा माझ्या आयुष्यावर अमीट ठसा उमटला त्यापैकी एक श्री. मा. गो. वैद्य.
इतके ज्ञानवृद्ध व्यक्तिमत्व पण माझ्यासारख्या सामान्य तरुणाला त्यांनी खूपच सलगीने वागवलं. शेवटच्या भेटीत शेजारी बसवून फोटो काढण्यास लावले. त्यांचे आत्मचरित्र आपुलकीने भेट दिले.

विवेकानंद केंद्र कार्यकर्ता आणि पत्रकार असल्याचा मला व्यक्तिश: आजवर खूप लाभ झाला. एरव्ही जे अशक्य होते अशा अनेक महान व्यक्तित्वांना भेटु शकलो. त्यांच्या स्नेहास पात्र राहू शकलो. याची धन्यता वाटते. पूर्वजन्म पुण्याईमुळेच विवेकानंद केंद्र कार्यकर्ता अन् पत्रकारिततेची संधी मिळाली असावी. पत्रकारितेची सुरूवात सोलापूर तरुण भारतमधून होणे आणि तेथे रविवार पुरवणी संपादक अशी संधी मिळणे यामुळे मा. गो. यांच्याशी स्नेहबंध जुळू शकले.
विवेक विचार मासिकाच्या जानेवारीच्या अंकात थोडं विस्तृत लिहीन.
हिंदुत्वाचे समर्थ भाष्यकार मा. गो. वैद्य यांच्या आत्मास सद्गती मिळो.

Sunday, October 25, 2020

वीरशैव आणि लिंगायत हे समानार्थी शब्द

Veershaiv Lingayat Hindu

वीरशैव लिंगायत हिंदूच या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी डावीकडून प्रा. गजानन धरणे, सिद्धाराम पाटील, शरद गंजीवाले, डाॅ. मल्लिकार्जुन शिवाचार्य, धर्मराज काडादी, राजेंद्र काटवे.


वीरशैव लिंगायत हिंदूच या पुस्तकाचे प्रकाशन 

सोलापूर : एखाद्या इमारतीचे खांब कापण्यासाठी कोणी येत असेल तर आपण स्वस्थ बसू शकत नाही. अगदी त्याच पद्धतीने हिंदू धर्मात असलेली आपली मुळं कापण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तर आपण स्वस्थ बसू शकत नाही. वीरशैव आणि लिंगायत हे समानार्थी शब्द आहेत. वीरशैव लिंगायत समाज हा हिंदूच आहे आणि वीरशैव लिंगायत समाजात धर्मरक्षणाची परंपरा आदी जगद्गुरूंपासून चालत आलेली आहे, असे प्रतिपादन बृहन्मठ होटगी मठाचे डाॅ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी केले. सिद्धाराम पाटील आणि अप्पासाहेब हत्ताळे यांनी लिहिलेल्या ‘वीरशैव लिंगायत हिंदूच!’ या लघु ग्रंथाचे प्रकाशन अक्कलकोट रोड येथील महास्वामी यांच्या कार्यालयात झाले. यावे‌ळी ते बोलत होते. जटायु अक्षरसेवा संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. 

जातवेद शिवाचार्य मुनींकडून महात्मा बसवेश्वर यांनी लिंगदीक्षा घेतली होती. मी शैव होतो आता वीरशैव झालो, असे खुद्द महात्मा बसवेश्वर यांनी आपल्या वचनातून सांगितले आहे. त्यामुळे मतभेद सोडून वीरशैव लिंगायत समाजाने एकसंध झाले पाहिजे, असे आवाहन महास्वामी यांनी यावेळी केले. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, हिंदू वीरशैव लिंगायत मंचचे प्रांत प्रमुख शरद गंजीवाले, धर्मजागरण प्रमुख हेमंत हरहरे, डाॅ. राजेंद्र हिरेमठ, राजेंद्र काटवे जिल्हा प्रमुख प्रा. गजानन धरणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

 आरक्षणाच्या आशेने धर्म सोडणे मान्य नाही : काडादी 

 आरक्षण मिळेल म्हणून धर्म मोडून काढणे कधीच योग्य नाही. वीरशैव िलंगायत समाज हा हिंदू धर्माचाच भाग आहे. त्यामुळे येत्या जनगणनेच्या वेळी धर्माच्या ठिकाणी हिंदू धर्म अशीच नोंद समाजबांधवांनी करावी, असे आवाहन श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केली. श्री. काडादी म्हणाले, “हजार वर्षे देशावर आक्रमणे झाली. तरीही आपण आपली संस्कृती जपून वाटचाल करत आहोत. लिंगायत समाजात इतकी वर्षे पंचाचार्य आणि बसवेश्वर हा वाद पेटत राहील असा प्रयत्न सुरू होता. हा वाद आता मिटतोय असे दिसताच आरक्षणाच्या या काळात शब्दछल करून ‘वीरशैव वेगळे आणि लिंगायत वेगळे’ असे राजकारणातील मंडळींनी सांगायला सुरूवात केली आहे. वीरशैव लिंगायत हे हिंदूच नाहीत असे सांगण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न गेल्या काही वर्षांत सुरू झाला आहे. लहान मुलाला चाॅकलेट दाखवले की ते मूल काही वेळासाठी संभ्रमित होते, तीच गत आरक्षण मुद्द्यावरून झाली आहे. आरक्षण नसल्याने समाजात भेदाची भावना निर्माण झाली आहे. आरक्षणारूपी चाॅकलेटच्या जवळ जाण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत. परंतु, धर्म मोडून काढणे योग्य होणार नाही. वीरशैव लिंगायत हिंदूच या पुस्तकाने समाजाची दिशाभूल दूर करण्याचे काम केले आहे.’’ 

 काय आहे पुस्तकात ? 

 महात्मा बसवेश्वर यांच्याआधी ३ हजार वर्षांपासून वीरशैव लिंगायत परंपरा प्रचलित होती, यासंबंधीचे शिलालेख व अन्य पुराव्यांची माहिती या पुस्तकात आहे. हिंदू धर्मातील ब्रह्मा, विष्णू आणि महेश या प्रमुख त्रिदेवांपैकी महेश अर्थात शिव उपासना इष्टलिंग रूपात करणारा समाज हिंदू आहे. शिवयोगी सिद्धराम, महात्मा बसवण्णा यांच्या वचनांचा आधार घेत वीरशैव लिंगायत समाज हा हिंदूच असल्याचे ३७ मुद्दे या पुस्तकात साधार मांडले आहेत. बृहन्मठ होटगीचे धर्मरत्न डाॅ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे.
9767284038 या क्रमांकावर व्हाटस् अॅप / एसएमएस करून पुस्तक मागवू शकता.
पृष्ठे ३६, मूल्य ३०/ 
पुढील लिंकवरूनही पुस्तक मागवता येईल

  

Saturday, July 25, 2020

भाऊ तोरसेकर यांचे अभिनंदन !

श्री. भाऊ तोरसेकर यांचे अभिनंदन !
फक्त तीन ते चार महिन्यात
त्यांच्या प्रतिपक्ष या युट्यूब वाहिनीची सदस्यसंख्या एक लाखावर पोहोचली आहे.
दृश्य संख्या 1 कोटी 19 लाख.

एखाद्या वैचारिक विषयावरील
युट्युब वहिनीला
शंभर-सव्वाशे दिवसात
इतके सदस्य मिळणे
ही बाब साधारण नाही.

पाठीमागे कोणतीही माध्यम संस्था नसताना
एखाद्या पत्रकाराला
अशी जनमान्यता मिळणे
हे महाराष्ट्रातील
पहिलेच उदाहरण ठरावे.

येथे उल्लेखनीय बाब म्हणजे
भाऊ यांना आपल्या ब्लॉगसाठी,
आपल्या युट्यूब वाहिनीसाठी
एका रुपयाची सुद्धा जाहिरात
करावी लागली नाही.

भेदक विश्लेषण, साठ वर्षांचा पत्रकारितेतील दांडगा अनुभव, सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत मांडण्याची शैली, प्रांजळपणा, मांडणीतील सातत्य, साधेपणा, निस्पृहता, दांडगी स्मरणशक्ती, तटस्थता, नवीन शिकण्याची जिद्द, परिश्रम, प्रसिद्धीने हुरळून न जाणे, स्वतःच्या मर्यादांची जाणीव, अभ्यासोनी प्रकट व्हावे या उक्तीचे पालन, सूक्ष्म निरीक्षण बुद्धी, निर्भिड स्वभाव आणि निरागसता...

यामुळेच महाराष्ट्राने
भाऊंना डोक्यावर घेतलं आहे.
भाऊ ( Ganesh Torsekar )
यांचे प्रबोधन कार्य असेच चालू दे...
मनापासून शुभेच्छा...

विशेष नोंद :
कथित पुरोगामी मंडळींनी पोसलेला बुद्धीच्या क्षेत्रातील दहशतवाद
मोडीत काढण्याचा मार्ग
प्रशस्त करण्याचे ऐतिहासिक काम
जोखीम पत्करून करणे
हे एक मोठे धाडस आहे.
असे धाडस
निस्पृहतेमधूनच
येत असते.
कमालीची निस्पृहता
ही भाऊंची ठळक ओळख आहे.

(एक लाख सदस्य संख्या झाल्यानिमित्ताने भाऊंचे मनोगत...
https://youtu.be/z2vSdR7tv3c)

--------------------
नोंदी सिद्धारामच्या...
psiddharam.blogspot.com

Thursday, July 23, 2020

व्यंकय्या नायडू यांचा निषेध करण्यापूर्वी...

व्यंकय्या नायडू यांचा निषेध
अवश्य झाला पाहिजे, परंतु
तुमच्यामध्ये "हे" धाडस असेल तरच...

छत्रपती उदयनराजे भोसले यांना
राज्यसभेत शपथ घेताना
"घोषणा देऊ नका", असे म्हटल्याने
महाराजांचा अपमान झाला,
असे सांगत
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
यांचा निषेध करण्यात येत आहे.
परंतु,
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी
म्हटले आहे की,
"आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला,
व्यंकय्या नायडूंनी उलट त्यांना थांबवलं,
पवारसाहेबांना विचारा काय झालं ?"
(https://youtu.be/e87EKLNExLM)

पवार साहेब याचे उत्तर देणार नाहीत.

गेल्या 10 वर्षात
शिवरायांची बदनामी करणारे एक पुस्तक
बिनधास्त विकले जात आहे.
त्या पुस्तकाच्या विरोधात
कोणी माई का लाल
आक्रमक झाल्याचे दिसला नाही.

"शिवाजीचे उदात्तीकरण" हे ते पुस्तक.
या पुस्तकात
अत्यंत नीच भाषेत
शिवाजी महाराजांची
पानोपानी अवमानाना करण्यात आली आहे.
शिवाजी महाराज यांच्यावर
आक्षेपार्ह आणि दर्जाहीन आरोप आहेत.

"महाराज हे महान नव्हते,
ते खंडणी गोळा करायचे",
अशी आक्षेपार्ह भाषा
या पुस्तकात आहे.

या पुस्तकात महाराजांविषयी
असे काही लिहिले आहे की
त्याचा या ठिकाणी
उल्लेख करणेही शक्य नाही.
या पुस्तकाची विक्री
गेल्या दहा वर्षापासून
आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे.
(http://shodh-bodh.blogspot.com/2012/07/blog-post_29.html?m=1)

या पुस्तका विरोधात काहीही न करता
आजवर मूग गिळून बसलेल्या लोकांना
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात
रान उठवण्याचा काय अधिकार ?
निषेधच करायचा असेल तर
"जय शिवाजी जय भवानी" म्हणण्यास
विरोध करणाऱ्या
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झाला पाहिजे.

शिवाजी महाराजांना
'जाणता राजा' म्हणू नका,
असे म्हणणाऱ्या
श्री. शरद पवार यांचा
कोणी कधी निषेध केला आहे काय ?

"नरेंद्र मोदी हे आजच्या
काळातील शिवाजी आहेत",
या पुस्तकावर तुटून पडणारे
शरद पवार यांना "जाणता राजा"
ही बिरुदावली वर्षानुवर्षे लावताना
विरोध का केला नाही ?

"तुम्ही छत्रपतींचे वारस असल्याचे पुरावे द्यावेत", असे म्हणत छत्रपतींच्या घराण्यावर
अविश्वास दाखवण्याचा प्रमाद करणाऱ्या
संजय राऊत यांच्या विरोधात
निषेधाची ही धार का दिसली नाही?

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
यांचा निषेध
अवश्य झाला पाहिजे.
परंतु,
निषेधासाठी वापरलेली आपली भाषा
स्वतः ला अभिमानाने मावळा म्हणवून घेता येईल अशीच आहे ना हे पाहीले पाहिजे.

थोडक्यात -
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आडोसा घेत कुरघोडीचे राजकारण करणे, हे आता सर्वच पक्षातील नेत्यांचे धोरण बनले आहे. शिवरायांचे आणि शंभुराजेंचे नाव घेणाऱ्या काही संघटना संबंधित व्यक्तीची जात, पक्ष, आणि विचारधारा पाहून निषेधाची तीव्रता आणि पातळी ठरवतात. वास्तविक पाहता या मंडळींना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांशी, तत्वांशी काही देणे घेणे नसते. आपले उपद्रवमूल्य कायम ठेवणे हाच काय तो उद्देश असतो.

काही संदर्भ :
1. https://www.google.co.in/amp/s/www.lokmat.com/nagpur/bjp-demands-ban-book-shivajiche-udattikaran-padadyamagache-vastav/amp/

Thursday, June 4, 2020

शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिन

शिवराज्याभिषेक दिनाला 
हिंदू साम्राज्य दिन असे म्हणतात. कारण...

🚩 सर्वसामान्य जनता जेव्हा त्रस्त झाली होती, तेव्हा एक धर्मात्मा पुढे आला - त्यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी धर्मरक्षण केले.

🚩 प्राचीन महाकाव्यांमध्ये वर्णन केलेली आदर्श राजाची सर्व लक्षणं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात होती.

🚩 छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते. कारण ते हिंदू होते. अमेरिकेतील थोर विचारवंत लीसा मिलर म्हणतात, "जो इतर धर्मांचे अस्तित्व मानतो तो हिंदू. या दृष्टीने पाहिले तर आज जग हिंदू बनत आहे". (इतर धर्मांचे अस्तित्व मान्य न करणारे एकांतीक धर्म सदैव धर्मांतर घडवून आणण्यासाठी धडपडतात. स्वतःच्या धर्मियांची संख्या वाढविण्याचा खटाटोप करतात. हिंदू धर्म धर्मांतर घडवत नाही, कारण सर्व धर्म सत्य आहेत, अशी त्यांची धारणा असते.)

🚩 ईश्वर एक आहे आणि तो अनेक रूपातून व्यक्त होतो. तो चराचरात आहे. सर्वत्र आहे. कोणत्याही मार्गाने ईश्वरापर्यंत पोहोचता येते, हे हिंदू धर्माचे मर्म छत्रपती शिवाजी महाराज जाणून होते.

🚩 माझा धर्म सत्य आहे तसे इतरांचेही धर्म सत्य आहेत, ही प्रत्येक हिंदूची धारणा असते. स्वाभाविकच महराजांचीही अशीच धारणा होती. परंतु, ते हिंदू धर्माभिमानीसुद्धा होते.

🚩 धर्म व संस्कृतीवर होणाऱ्या आघातांबद्दल ते दक्ष होते. सद्गुणविकृतीला त्यांनी कधीच थारा दिला नाही.

🚩 नीतिमत्ता न पाळणाऱ्या शत्रूला मारताना प्रसंगी पारंपरिक नियम दूर सारले पाहिजे, त्याच्या पोटात वाघनखं खुपसली पाहिजेत, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं.

🚩 कोणी परधर्मी हिंदूंना बाटवून त्यांच्या रीलिजन मध्ये ओढत असेल तर त्याला धडा शिकवला पाहिजे, हे महाराजांनी दोन पाद्र्यांचे शिर धडावेगळे करून सांगितलं.

🚩 कोणी धर्मांध मंदिर उद्ध्वस्त करून तेथे त्याच्या उपासनेचा ढाचा बनवत असेल तर योग्य वेळी तो ढाचा दूर सारून तेथे पुन्हा मंदिर उभारले पाहिजे, हे त्यांनी दक्षिण स्वारीच्या वेळी कृतीतून दाखवून दिलं.

🚩 काही परिस्थितीत मुस्लिम बनलेल्या कोणाला पुन्हा हिंदू व्हायचं असेल तर त्याला सन्मानाने हिंदू होता आलं पाहिजे, याची व्यवस्था महाराजांनी निर्माण केली. तसे उदाहरण प्रस्तुत केले.

 🚩 महाराजांनी कधीही मशिद अथवा चर्च उद्ध्वस्त केले नाहीत. किंवा अन्य धर्मीयांचा छळ मांडला नाही.

🚩 महाराजांनी त्यांच्या काळात कधीही कोठेही मशिदी उभारल्या नाहीत. कोणी तसे सांगत असेल तर ते निराधार आहे. महाराजांनी कधीही कोणत्याही दर्गा वा मशिदीला नव्याने इनाम दिले नाही.

🚩 आपल्या भाषेवर होणारे परकीय शब्दांचे आक्रमणही परतवून लावले पाहिजेत, इतका सूक्ष्म विचार शिवराय करत होते. आणि त्यासाठी व्यवस्था निर्मितीही करत होते.

🚩 हिंदू असणं म्हणजे सर्वसमावेशक असणं. छत्रपती शिवराय हे असे हिंदू होते. त्यांना आपल्या धर्म व संस्कृतीचा अभिमान होता.

🚩 केवळ माझाच धर्म खरा, इतरांचे खोटे... इतकेच नाही तर इतरांचे धर्म नष्ट, भ्रष्ट केले पाहिजेत... मूर्तीपूजा करणाऱ्यांना आपल्या कळपात ओढले पाहिजे... अन्य धर्मीयांना आपल्या कळपात ओढताना त्यांची कत्तल करावी लागली तरी ते योग्यच आहे आणि या कार्यात मृत्यू आला तर आपल्याला स्वर्गात सुंदर स्त्रीया उपभोगायला मिळतील... इत्यादी प्रकारे विचार करणारे काही रानटी टोळ्या या जगात असू शकतात हे हजार वर्षांत कोणत्याही हिंदू राजाला ओळखता आले नाही. किंबहुना आजही बहुतांश लोकांना हे समजलेले नाही. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांना एकांतिक पंथातील धर्मांध टोळ्यांची नीती समजलेली होती. अतिशय मुत्सद्देगिरीने या संकटाला तोंड दिले पाहिजे याची त्यांना जाण होती.

🚩या सर्व मुद्द्यांचा विचार करता छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक होता. या सोहळ्याचे वर्णन हिंदू साम्राज्य दिन अशा शब्दात करणे यथार्थ आहे.

🚩रा. स्व. संघाच्या प्रमुख उत्सवात या दिनाला फार महत्त्व आहे. स्वतःला धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी म्हणणारे बुद्धिजीवी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून स्वतःला दूर ठेवत होते तेव्हापासून, किंबहुना त्या आधीपासून रा. स्व. संघ हिंदू साम्राज्य दिन साजरा करीत आहे.

🚩केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतवर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अलौकिक कार्य पोहोचवण्याचे काम संघ गेल्या ९५ वर्षांपासून करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची सतत उपेक्षा करत आलेल्या गटातील काही मंडळी आज-काल "हिंदू साम्राज्य दिन" या शब्दावलीवर आक्षेप घेत आहेत. केवळ वैचारिक संभ्रम निर्माण करण्याचा हेतू यामागे आहे. बाकी काही नाही.

- सिद्धाराम भै. पाटील
psiddharam.blogspot.com

Thursday, May 28, 2020

भारत आता सावरकर मार्गाने पुढे जातोय; गांधी-नेहरूंचा मार्ग केंव्हाच मागे सुटलाय

चीन, पाकिस्तानसाठी 
गांधी नव्हे सावरकर, आंबेडकर नीती हवी 
याची जाण आजच्या नेतृत्वात आहे. 
हा नवा भारत आहे. 
देशासाठी जे जे उपयुक्त ते ते अंगीकार करणे 
अन् जे जे घातक ते विषवत. 
कोणीही महापुरुष देशापेक्षा मोठा नाही. 
देश आहे म्हणून आपण आहोत. 
हा सावरकर विचार आहे. 
हा शाश्वत विचार आहे. 
तारणारा आहे.  
सर्व समावेशक आहे; पण भोंगळ नाही.

२७ मे - नेहरू पुण्यतिथी
२८ मे - सावरकर जयंती

अनेक विद्वानांनी यानिमित्ताने या दोन्ही नेत्यांची तुलना करण्याचा प्रयत्न आपापल्या आउटलेटवरून केला.

मीही स्वतःला असे करण्यापासून आवरणार नाही. मी लहान असताना मला नेहरुही आवडायचे अन् सावरकरही.

पुढे वाचन वाढत गेलं.
त्यातून माझी स्वतः ची मते बनत गेली.

माझ्या मते -

"नेहरू आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांमुळे आपले निर्णय चुकत गेले. परिणामी आपल्या मातृभूमीचे तुकडे पडले. काँग्रेसने फाळणी होऊ देणार नाही असे देशाला सांगितले. पण ऐनवेळी फाळणी स्वीकारली.  देशाचा विश्वासघात केला. दंगली घडवून ब्लॅकमेल करून भारताच्या भूमीवर आपण पाकिस्तान बनवू शकतो याची आणि काँग्रेसचे नेते भित्रे, पुळचट अन् नेभळट असल्याची जिनाला खात्री होती.

भारताच्या भूमीवर पाकिस्तान उगवले ते आपले पाप आहे, याची लाज आणि खंत काँग्रेसला कधीच वाटली नाही. उलट, येथील हिंदू, हिंदू संघटना यांना बदनाम कसे करता येईल, हेच धोरण रेटून चालवले. शालेय अभ्यासक्रमात काँग्रेसला अनुकूल तेवढेच शिकवत राहिले.

धर्माच्या नावावर मुस्लिमांसाठी पाकिस्तान, बांगलादेश रूपात या देशाची भूमी तोडून देण्यात आली. तरी लांगूलचालन करणे काँग्रेसने सोडले नाही. काँग्रेस पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २००६ मध्ये हद्द केली. जाहीर रित्या सांगितले की, या देशाच्या साधनसंपत्तीवर पाहिलं हक्क मुसलमानांचा आहे. बाटला हाऊस येथे जिहादी अतिरेकी मारले गेले म्हणून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना रडू कोसळले.

थोडक्यात, काँग्रेसने देशभक्त मुस्लीम नेतृत्व कधीच पुढे आणले नाही. तोंडी सेक्युलर तत्वाचा जप करत प्रत्यक्षात मात्र कट्टरवादी, जिहादी गटांना बळ पुरवले. इतिहास लेखन, पाठ्यपुस्तक आणि इतर माध्यमातून वैचारिक संभ्रमाला खतपाणी घातले. या देशाचा तेजोभंग होत राहील अशी नीती राबवली. स्वार्थ आणि काँग्रेस हे १९२० नंतर
 जणू समानार्थी बनले.

स्वतः चा स्तोम माजवत राहणे हे काैंग्रेसी नेत्यांचे व्यवच्छेदक लक्षण. माझ्या मते याला गांधीजी अपवाद नव्हते. अहिंसासारख्या व्यक्तिगत जीवनातील मूल्यांना ते देशावर लादू पाहत होते.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात काँग्रेसचे असे दोन पंतप्रधान होऊन गेले ज्यांनी स्वतःलाच "भारतरत्न" पुरस्काराने सन्मानित केलं -
१. जवाहरलाल नेहरू (१९५५)
२. इंदिरा गांधी (१९७१).

हे दोन्ही नेते निश्चितच महान होते. पण म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील उणीव दुर्लक्षित करता येणार नाही. कारण या बाबींमुळे देशाची अपरिमित हानी झाली आहे. यांनी स्वतः लाच पुरस्कार कसे दिले? त्यांना संकोच वाटला नाही का ? असे प्रश्न पडतात... असं कसं होऊ शकतं, याचं आश्चर्य वाटतं.

समजा, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ला भारतरत्न पुरस्कार द्यायचे ठरवले तर किती हलकल्लोळ माजेल. मीडियात कशा प्रतिक्रिया उमटतील ?
१९५५ आणि १९७१ मध्ये स्वतः लाच पुरस्कार देऊ केले म्हणून मीडियातून टीका टीपणी झाली होती का ? याचे संदर्भ मिळत नाहीत.

आता या पार्श्वभूमीवर
वि. दा. सावरकर यांचे जीवन पाहा.

स्वार्थाचा लवलेश नाही.
विचारांमध्ये स्पष्टता आहे.
देशासमोरील खऱ्या आव्हानांची जाणिव असल्यानेच तरुणांना सैन्य भरतीसाठी त्यांनी चळवळ चालवली. यामुळे सैन्यातील हिंदूं सैनिक प्रमाण २५ टक्क्यावरून ६७ टक्याच्या पुढे गेले.
सावरकर यांनी हे एकच कार्य केले असते तरी ते सर्व काँग्रेस नेत्यांच्या एकत्रित कार्यापेक्षा ते महान गणले गेले असते.

सैन्यातील तरुणांची भरती झाली नसती तर कदाचित खंडित भारताचा आजचा नकाशा आता आहे त्याहून खूप आक्रसलेला असला असता.

सावरकर आणि त्याग हे समानार्थी शब्द आहेत. सावरकर आणि तप हे एकच शब्द आहेत.
तुजसाठी मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण
हे तत्त्व भारतीयांनी स्वीकारली असती तर मातृभूमीची फाळणी झाली नसती. दंगलखोर आणि हा देश दार उल इस्लाम करण्याची मनसुबे जोपासणाऱ्या जिहादी शक्ती यांना पायबंद घालण्यात अपयश आल्यानेच या भारतभूमीवर पाकिस्तान उगवला.
देश तोडू पाहणाऱ्या शक्तींना वेसण घालण्याची क्षमता केवळ सावरकर विचारात आहे; गांधी आणि नेहरूंचे विचार फेल ठरले आहेत. देशाने याचा अनुभव घेतला आहे. त्याची फार मोठी किंमत दिली आहे.

आपण सावरकर विचाराने चाललो तर एक दिवस सांस्कृतिक गुलामीत गेलेले आपले बांधवही पुन्हा आपल्या पूर्वजांची संस्कृती अभिमानाने अंगीकार करतील. राष्ट्रांच्या इतिहासात शे - पाचशे वर्षे फार नाहीत. शक्ती आणि संघटन याची कास धरू तर एक दिवस पवित्र सिंधू नदी पुन्हा या भूमीचा भाग होईल.

सुदैवाने आज देशाचे नेतृत्व अशा लोकांच्या हाती आहे की जे या देशाच्या महापुरुषांच्या मध्ये भेदभाव करत नाहीत. त्यांच्यासाठी कोणीच अस्पृश्य नाहीत.

त्यांच्यासाठी महात्मा गांधी वंदनीय आहेत.
नेहरू महापुरुष आहेत.
आंबेडकर, सावरकर प्रत: स्मरणीय आहेत.

गांधींची कोणती मूल्ये आज घ्यायची
अन् सावरकर, आंबेडकरांची कोणते विचार अमलात आणायचे याची योग्य जाण या नेत्यांमध्ये आहे.

चीन, पाकिस्तानसाठी गांधी नव्हे सावरकर, आंबेडकर नीती हवी याची जाण आजच्या नेतृत्वात आहे.
हा नवा भारत आहे.
देशासाठी जे जे उपयुक्त ते ते अंगीकार करणे अन् जे जे घातक ते विषवत.
कोणीही महापुरुष देशापेक्षा मोठा नाही.
देश आहे म्हणून आपण आहोत.
हा सावरकर विचार आहे.
हा शाश्वत विचार आहे.
तारणारा आहे. 
सर्व समावेशक आहे; पण भोंगळ नाही.

भारत यापुढे
सावरकरांच्या मार्गानेच चालेल...
सावरकर हे
काळाच्या पुढे शंभर वर्षे असतात...
सावरकरांनी जे १०० वर्षांपूर्वी सांगितले ते या देशातील लोकांना आता पूर्णपणे समजले आहे.
तसे नसते तर या देशातील लकांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या सरकारला इतक्या तगड्या बहुमताने सत्ता दिली नसती.

तगड्या बहुमतमुळे आणि सावरकर नितीमुळेच तर ३७० हटले. काश्मीर खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाले. सैन्यात आत्मविश्वास वाढला. सर्जिकल स्ट्राईक होऊ लागले.

असो. सर्वांना स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंतीनिमित्त शुभेच्छा. सावरकर अभ्यास करण्यासाठी अनेक तरुणांनी पुढे यावे हे नम्र आवाहन.

- सिद्धाराम भै. पाटील

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी