Monday, August 14, 2017

देशभक्तीचे दुसरे नाव : स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांचे वर्णन अनेक विद्वानांनी घनीभूत देशभक्ती या शब्दावलीत केले आहे. अतिशय सार्थ असे हे वर्णन आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे गाढे अभ्यासक आणि इतिहासकार संकरी प्रसाद बसू म्हणतात की, 'फ्रान्सच्या क्रांतीवर रूसोचा जेवढा प्रभाव होता किंवा रशिया आणि चीन या देशात घडलेल्या क्रांतीवर मार्क्सचा जेवढा प्रभाव होता, तेवढाच प्रभाव भारतीय चळवळीवर विवेकानंदांचा होता.' भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातील जवळजवळ सर्वच नेत्यांवर स्वामी विवेकानंदांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव होता याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यांच्या पाश्चात्य शिष्या भगिनी निवेदिता यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगादान सुवर्णाक्षरांनी नोंदवावे असेच आहे. 

विशेष लेख - सिद्धाराम भै. पाटील
विवेक विचार । ऑगस्ट २०१७ मधून...  

स्वामी विवेकानंदांच्या काळापासून आपल्या देशात खूप मोठे परिवर्तन झाले. त्या काळी तमोगुण, अकर्मण्यता तसेच निष्क्रियता लोकांच्या रोमारोमांत भिनली होती. नाही म्हणायला असंतोष आणि परिवर्तनाची मंद मानसिकता तयार होत होती. परंतु, स्वातंत्र्याविषयी विचार करावे इतके साहसी लोक तेव्हा नव्हते. त्या काळातील अत्यंत प्रबुद्ध व्यक्तीसुद्धा इंग्रजांसमोर सीमित प्रतिनिधित्वाची विनंती, आर्जव करीत होते. ते लोक इंग्रजांची राजवट म्हणजे भारताच्या हितासाठी ईश्वरी संकेत समजायचे. अशा मानसिकतेच्या लोकांमुळे स्वामी विवेकानंद व्यथित झाले होते. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी यामध्ये मोठे परिवर्तन झाले. ब्रिटिशांच्या गुलामीतील भारतात स्वाभिमान जागवण्याचे काम स्वामी विवेकानंद यांनी केले. 

प्रा. धरमपाल
थोर चिंतक प्रा. धरमपाल यांच्या शब्दांत सांगायचे तर स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहायला शिकवलं. त्यांनी निद्रित अवस्थेतील भारताचा आत्मा जागवला. आणि यातून देशात जागृतीचे एक लाट उसळली. विवेकानंदांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन अनेक जण स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्व करू लागले. देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे या मागणीमागची प्रेरणाही विवेकानंदच होते. याची परिणिती पुढे जाऊन भारताला स्वातंत्र्य मिळण्यात झाली.
लोकमान्य टिळक यांच्या शब्दांत स्वामी विवेकानंद हे राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे पिता होते. कोट्यवधी देशबांधव, शेकडो क्रांतिकारक आणि नेत्यांमधे देशभक्तीची भावना जागवली. यातून भारत स्वतंत्र झाला. स्वामी विवेकानंदांनी केवळ इतकेच कार्य केले असते तरी त्यांचे वर्णन घनीभूत देशभक्ती किंवा देशभक्तीचे दुसरे नाव - स्वामी विवेकानंद या शब्दावलींनी करता आले असते. परंतु, स्वामी विवेकानंदांच्या कार्याचे महत्त्व केवळ येवढ्यापुरते मर्यादित नाही. त्यांच्या कार्याचे इतरही अतिशय महत्त्वाचे आयाम आहेत.

स्वातंत्र्य आंदोलनातील नेते स्वामी विवेकानंदांच्या विचारांशी घनिष्ट बांधलेले होते तेव्हा म्हणजे १९०५ मध्ये कर्झनने देशाची हिंदू-मुस्लिम आधारावर फाळणी केली; त्याविरुद्ध प्रचंड आंदोलन उभे राहिले. ब्रिटिशांना फाळणी रद्द करावी लागली. परंतु, १९४७ च्या सुमारास जेव्हा प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळण्याची वेळ आली तेव्हा घात झाला. स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या तत्कालीन धुरीणांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांना सोडचिठ्ठी दिली. भ्रामक विचार आणि स्वार्थ प्रबळ झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाले पण ते खंडित होते. देशाचे तुकडे झाले. आपल्या देशाची भूमी आज जिहादी इस्लामच्या गुलामीत आहे. जग त्या भूमीला आज पाकिस्तान आणि बांगलादेश म्हणून ओळखते. स्वामी विवेकानंदांच्या विचारांपासून दूर गेल्याचा, एकांतिक धर्मांचा धोका न ओळखल्याचा हा परिणाम होता.
साऱ्या जगाला सर्वधर्मसमभावाचा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी जिहादी इस्लाम आणि धर्मांतरणाला चटावलेल्या ख्रिस्ती मिशनऱ्यांचा या देशाला असलेला धोका अतिशय स्पष्टपणे सांगितला होता. त्याकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम आज आपला देश भोगत आहे. खंडित भारतातही एकांतिक धर्मीय धर्मांतराच्या माध्यमातून देशाच्या एकतेला नख लावण्याचे काम करत आहेत. 
काश्मीर, नागालॅन्ड, त्रिपुरा, केरळ आदी राज्यातील धर्मांतरे आणि फुटीर चळवळीचे लोण इतर भागातही पोहोचत आहेत. स्वामी विवेकानंदांच्या वाङमयात या धोक्यावरील उपाय अतिशय नि:संदिग्ध शब्दांत सांगितलेले आहेत. आज या आव्हानाला थोपवण्यासाठी देशात ज्या संस्था आणि व्यक्ती कार्य करत आहेत त्या साऱ्यांची प्रेरणा स्वामी विवेकानंद आहेत. स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा हा अतिशय महत्त्वाचा आयाम आहे.
स्वामी विवेकानंद हे एक बहुआयामी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व होते. ते बुद्धिमान होते. त्यांचे भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते आणि ते उत्कट अंत:करणाचे होते. या सर्वात भर म्हणजे त्यांना एक साक्षेपी गुरू लाभलेले होते, ज्यांच्या सान्निध्यात त्यांना सत्याचा साक्षात्कार झाला होता. त्यामुळे त्यांच्या शब्दांना सामर्थ्य प्राप्त झाले होते आणि त्यांच्यात अंतरंग दृष्टी विकसित झाली होती.
स्वामी विवेकानंदांनी पूर्ण भारतभर भ्रमण केलेले होते आणि भारताच्या बाहेरही त्यांनी बऱ्याच देशांतून भ्रमंती केलेली होती. त्यामुळे त्यांना जगाचे दर्शन अगदी जवळून घेण्याची संधी प्राप्त झाली होती. माणसांच्या कमतरता आणि शक्तिस्थाने, विविध संस्कृती तसेच मानवाच्या जीवनावर प्रभाव गाजविण्याची त्यांची शक्ती यांचेही दर्शन त्यांना घडलेले होते. या संबंधात शतकभरात जगभर झालेले विचारमंथन स्वामी विवेकानंद यांनी समजून घेतले होते.
स्वामी विवेकानंदांनी अनेक प्रकारच्या श्रोत्यांपुढे भाषणे केलेली होती. अतिशय गरीब आणि अतिशय श्रीमंत, अशिक्षित आणि सुशिक्षित, तंत्रकुशल आणि तंत्रज्ञान वंचित, जेते असल्याचा गर्व बाळगणारे उन्मत्त राज्यकर्ते आणि त्यांच्या जुलमी राजवटीखाली दबले जाणारे गुलाम, आस्तिक आणि नास्तिक अशा सर्व प्रकारच्या श्रोत्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेले होते. 
त्यांनी संबोधित केलेल्या श्रोत्यांमध्ये हे विश्व म्हणजे एका सत्याचाच विस्तार आहे असे मानणारे लोकही होते आणि त्याच्या विपरीत जगाला सश्रद्ध आणि अश्रद्ध अशा दोनच गटात वाटणारे कट्टर धर्मपंथीसुद्धा होते. सर्वांच्या कल्याणासाठी परमेश्वराची प्रार्थना करणारे लोकही त्यांच्या श्रोत्यांत होते आणि आमची देवाची व्याख्या मान्य करतील त्यांचेच फक्त कल्याण होईल असे मानणारे अभिनिवेशी लोकही होते. त्यांना अशा प्रकारे विविध प्रकारच्या श्रोत्यांपुढे भाषणे करावी लागली. त्यांचे भाषण हे त्यांच्या वक्तृत्वाचे प्रदर्शन घडविण्यासाठी होत नसे, तर त्यांचे भाषण म्हणजे त्यांच्या उत्कट अंत:करणाचा सहज आविष्कार असे. त्यांनी लोकांना आध्यात्मिकदृष्ट्या आहे त्या स्तरावरून वरच्या स्तरावर नेण्यासाठीच सातत्याने भाषणे केली. 
भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय तरुणांसाठी व्याख्यानांची एक मालिका गुंफली. कोलंबो ते अल्मोडा किंवा भारतीय व्याख्याने या ग्रंथात ही संकलित करण्यात आली आहेत. 
स्वामी विवेकानंद हे विश्व दिग्विजय करून भारताच्या भूमीवर पाऊल ठेवले ते कोलंबो (श्रीलंका) येथे. श्रीलंकेतील जनता तेव्हा स्वत:ला भारतीयच समजत होती हे आपल्या कोलंबोवासीयांनी स्वामी विवेकानंदांना दिलेल्या मानपत्रावरून दिसून येते. कोलंबो येथे स्वामी विवेकानंदांनी दिलेले पहिले व्याख्यान म्हणजे महान राष्ट्रद्रष्टा संन्याशाने दिलेला राष्ट्रमंत्रच होय. या देशाचे पुनरुत्थान कसे करता येईल, यासाठीच्या कार्याची दिशा काय असेल यासंबंधीची स्पष्टता आणि दूरदृष्टी त्यांच्या व्याख्यानातून दिसून येते. भारताच्या पुनरुत्थानाची महान योजना त्यात मांडली आहे. (जिज्ञासूंनी अधिक जाणून घेण्यासाठी भारतीय व्याख्याने हे पुस्तक वाचावे.)
 भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर स्वामी विवेकानंदांचा मोठा प्रभाव होता, हे खरे असले तरी केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरताच तो मर्यादित नव्हता. पुढील हजारो वर्षे भारत परतंत्र होणार नाही याची पायाभरणी त्यांनी केली आणि जगद्गुरू भारताची संकल्पना मांडली आणि त्यासाठीचे तत्त्वज्ञानही उभे केले. 
वेदांत हा भावी जगाचा धर्म असेल असेही त्यांनी सांगितले. भारताने जगाकडून शिकले पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत हे खरेच आहे; पण त्या बदल्यात भारताने जगाला अध्यात्माचे ज्ञान दिले पाहिजे. ही भारताची नियती आहे असे ठाम प्रतिपादन स्वामीजींनी केले.
स्वामी विवेकानंद आपल्याला इशारा देतात की, अध्यात्माचा संदेश देणे म्हणजे तत्त्वज्ञान देणे आहे. आपण वर्षानुवर्षे छातीशी कवटाळून बसलो आहेत त्या अंधश्रद्धा आणि रूढी देणे नाही. त्या आपल्याला या आपल्या देशातही नष्ट करायच्या आहेत, फेकून द्यायच्या आहेत. त्या कायमच्या संपाव्यात यासाठी त्यागायच्या आहेत. (खंड ३ पृष्ठ २७७-२७८) 
मानवी जातीचे हे आध्यात्मीकरण कसे होणार आहे? हे सांगताना स्वामीजींनी शत्रूंपासून सावधही केले होते.
प्रतीकात्मक चित्र 
स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते, ''शूर लोकच जगाचा उपभोग घेऊ शकतात. तुमचे शौर्य दाखवून द्या, त्याचा कालानुरूप आविष्कार घडवा, तुमच्या शत्रूत फूट पाडा, भेद निर्माण करा, वेळ पडल्यास लाच द्या, त्यांच्यात बंडखोरीची पेरणी करा आणि तुमच्या शत्रूविरुद्ध उघड युद्ध पुकारा, त्याला जिंका आणि जगाचा आनंद लुटा. तरच तुम्ही खरे धार्मिक राहाल, अन्यथा इतरांनी तुम्हाला लाथाडले, सतत अपमानित केले आणि तरी तुम्ही ते अपमान गिळून अध:पतित जीवन जगत राहाल, तर तुमचे आयुष्य म्हणजे एक नरकवास ठरेल! नंतर तर तुम्हाला नरकात जावे लागेलच, हेच शास्त्राने सांगितले आहे.''
विजयासाठी वाट्टेल ते करण्याचा संदेश देणारे स्वामी विवेकानंद दुसऱ्या ठिकाणी म्हणतात, ''माझ्या आयुष्यात मी एक मोठा धडा शिकलो आहे की, आपण जे साध्य करतो, ते साध्य तर पवित्र असले पाहिजेच, परंतु त्यासाठी वापरलले साधनसुद्धा शुद्ध असले पाहिजे. किंबहुना मी तर असे म्हणेन की, आपण जे साध्य करतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ते कोणत्या मार्गाने साध्य करतो, यावर जास्त लक्ष देणे हेच यशाचे रहस्य आहे.''
या दोन्ही गोष्टी वरवर पाहता परस्परविरोधी वाटू शकतील. परंतु, स्वामी विवेकानंद यांचे समग्र जीवन अभ्यासले तर ध्यानात येईल की, स्वामीजींनी उदात्त विचारांच्या नावाखाली भारतासमोरील धोक्यांकडे दुर्लक्ष केलेले नाही. सर्व धर्म सत्य आहेत.
सर्व धर्मांचा आम्ही आदर करतो असे सांगणारे स्वामीजी एकांतिक धर्मीयांच्या धर्मांतरण आणि विस्तारवादाकडे दुर्लक्ष करत नाहीत. एका हिंदूंने धर्मांतर केल्यास आपली संख्या एकाने कमी होते, इतकेच नाही तर शत्रूची एकाने वाढते हे सांगायलाही स्वामीजी विसरत नाहीत. स्वामीजींनी समर्थ भारतासंबंधी वास्तववादी विचार केला आहे, असे दिसते. 
भारत जगला तर जगाला मार्गदर्शन करेल. भारत जगायचा असेल तर येथील आध्यात्मिक शक्तींचे ऐक्य घडवून आणले पाहिजे. भारताचे ऐक्य म्हणजे भारतातील आध्यात्मिक शक्तींचे ऐक्य होय, असे स्वामीजी सांगतात. स्वामी विवेकानंदांचे विचार हे शाश्वत विचार आहेत. 
बलशाली भारतासाठी स्वामीजी सांगतात, 
''तुमच्या धमन्या बळकट करा. आपल्याला हवे आहेत पोलादी स्नायू आणि पोलादी धमन्या. आपण खूप रडलो आहोत. आता हे रुदन थांबवा. आता आपल्या पायावर उभे राहा आणि 'पुरुष' व्हा. आपल्याला असे पुरुष निर्माण करणारा धर्म हवा आहे. आपल्या मनुष्य-निर्माणाचे सिद्धांत हवे आहेत. आपल्याला सर्वांगीण मनुष्य-निर्माण करणारे शिक्षण हवे आहे. इथेच सत्याची पारख होणार आहे. जे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या दुबळे करते, बौद्धिक दास्यात टाकते आणि आध्यात्मिक संभ्रमात लोटते त्याला विषसमान मानून अव्हेरा. त्यात काही जीव नाही. ते सत्य नव्हेच. जे आपल्याला सामर्थ्यशाली बनवते तेच सत्य होय. उपनिषदांकडे चला. देदीप्यमान, सामर्थ्य प्रदान करणारे झळाळते तत्त्वज्ञान त्यात आहे. आपल्याला दुबळे करणार्या सर्व गोष्टींपासून दूर राहा. वेगळे व्हा. उपनिषदातली सत्ये आपल्या समोर आहेत. त्यांचा स्वीकार करा. त्यांच्यासह जगायला शिका. भारत भूमीच्या मुक्तीचा मार्ग तुम्हाला गवसेल.'' (खंड ३ पृष्ठ २२४-२२५)
स्वामी विवेकानंदांनी जगाला जागृत करण्याबाबत खूप काही सांगितले आहे पण त्यांनी आपल्यालाही आठवण करून दिली आहे. 
''आम्ही कधी हातात तलवारी घेऊन आमच्या विचारांचा प्रसार केलेला नाही. आमचे काम सावकाश पण मूक, शुभ प्रभाती पडणार्या दंवासारखे न दिसणारे, न ऐकू येणारे, तरीही खूप मोठे ङ्गलदायी, शांत, संयत आहे. सर्व सहन करणार्या आध्यात्मिक स्वभावाच्या जातीचे हे कार्य विचार विश्वात झिरपणारे आहे.''
(खंड ३ पृष्ठ ११०).

----
लोकमान्य टिळक यांच्या मते स्वामी विवेकानंद हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आध्यात्मिक जनक होते. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातील जहाल, मवाळ, क्रांतिकारी अशा सर्वच प्रवाहांवर स्वामीजींचा अमिट प्रभाव होता. गोपाळ कृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, ऍनी बेझंट, नेताजी सुभाषचंद्र बोस, वि. दा. सावरकर, महात्मा गांधी, योगी अरविंद, जवाहरलाल नेहरू ते विनोबा भावे यांच्यापर्यंत साऱ्या देशभक्तांवर स्वामी विवेकानंदांचा थेट प्रभाव होता. लोकमान्य टिळक हे स्वामी विवेकानंदांना राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे पिता मानत होते.
----
 स्वामीजी हे मातृभूमीचे उत्कट भक्त होते. ते भारताशी तादात्म्य पावलेले देशभक्त होते. भारतभक्ती त्यांच्या नसानसांत होती. भारताचे उत्थान म्हणजे येथील सामान्य माणसाचे उत्थान ही त्यांची धारणा होती. भारतातील एक कुत्राही जोवर उपाशी आहे, तोवर मला मुक्ती नको, असे म्हणण्याचे धाडस करणारा संन्याशी म्हणून त्यांची ओळख आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल तर आधी विवेकानंद वाचा.
----
ज्यांच्या मनात भारताविषयी प्रेमआणि आस्था नव्हती त्यांनी भारतीयांमधील स्वाभिमान मारला. आपल्या देशातील बुद्धिजीवी भारतावर टीका करण्यात धन्यता मानू लागले. भारतात सुधारणा करायच्या असतील तर भारतावर टीका केली पाहिजे. येथील परंपरांवर आघात केले पाहिजे, अशी एक चळवळ त्याकाळी उदयास आली. स्वामीजींनी ती आत्मवंचना थांबवली. 
भारतासाठी काही चांगले करता येत नसेल तर किमान शिव्याशाप देणे तरी करू नका. आधी भारतावर प्रेमकरा. आपल्या देशबांधवांमध्ये तुम्हाला शेकडो दोष दिसतील, पण ते दोष येथील रक्ताचे आहेत हे विसरू नका. येथील सर्वसामान्यांसंबंधीच्या उत्कटतेतून तुमच्या हृदयात प्रेमस्फुरू द्या. भारतातील दीन दलित आणि गरिबांची सेवा ही मोक्षप्राप्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. देशबांधवांप्रतीच्या आत्यंतिक प्रेमातून आपल्या क्षमता विकसित होतात. भारतीय तरुणांच्या क्षमता विकसित होण्यातूनच भारत उभा राहणार आहे. या सर्वसामान्य तरुणांमधूनच माझे कार्यकर्ते पुढे येतील. त्याग आणि सेवा या महान आदर्शांच्या आधारेच भारताचे पुनरुत्थान घडून येईल. माझ्या मृत्यूनंतरही माझे विचार कार्य करत राहतील. तरुणांना जागे करत राहतील, असा विश्वास स्वामी विवेकानंदांनी व्यक्त केला होता. आज शेकडो, हजारो तरुण स्वामीजींच्या विचारांने प्रेरित होऊन भारताच्या कानाकोपर्यांत भारताच्या पुनरुत्थानासाठी कार्य करत आहेत, यातून स्वामीजींचे द्रष्टेपण स्पष्ट होते.
-----------
देशभक्तीसंबंधीची माझी स्वत:ची अशी खास कल्पना आहे. प्रथम तुमच्या अंत:करणात भावना जागृत होऊ द्या. आज तुमचे लक्षावधी देशबांधव उपाशी आहेत, याची तुम्हाला जाणीव आहे का? आपल्या देशावर अज्ञानाच्या अंधाराचे सावट पडले आहे, याची खंत तुम्हाला वाटते का? यामुळे तुम्ही कधी अस्वस्थ होता का? लोकांच्या दु:खामुळे तुम्ही जवळजवळ वेडे होऊन जाता का?... देशभक्तहोण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे.
 ----------
तुमच्या भावना जागृत होतील, परंतु लोकांना या जीवन्मृत अवस्थेतून वर काढण्याचा व्यावहारिक मार्ग तुम्हाला सापडला आहे का? लोकांना त्यांच्या दैन्यावस्थेत कशी मदत करावी, हे तुम्हाला समजले आहे का? पण असे ज्ञान तुम्हाला झालेतरी पुरेसे नाही. तुमच्या मार्गातील अडचणींचे डोंगर ओलांडण्याचा निर्धार तुमच्याजवळ आहे का? उत्कट भावना, समस्यांची सोडवणूक करण्याचा व्यावहारिक मार्ग आणि दुर्दम्य इच्छाशक्ती या तीन गोष्टी जर तुमच्याजवळ असतील, तर तुमच्यापैकी प्रत्येकजण परमेश्वराची कृपा लाभलेल्या या आपल्या देशात अपूर्व चमत्कार घडवून आणू शकेल. देशभक्तीची माझी कल्पना ही अशी आहे. राष्ट्रभक्तीचा महामंत्रच स्वामी विवेकानंदांनी वरील ओळींतून दिला आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ऋषी बंकीमचंद्र यांच्या आनंदमठ या ऐतिहासिक कादंबरीचे एक वेगळे स्थान आहे. कादंबरीच्या शेवटी दिलेला संदेश सामान्य वाचकाला गोंधळात पाडतो. परंतु, स्वामी विवेकानंदांचे जीवनकार्य पाहिले की त्या संदेशाचा अर्थबोध होतो.

तात्कालिक राजकीय संदर्भाने शत्रूशी दिलेला लढा हा आवश्यक असला तरी त्याचा दीर्घकाळ उपयोग नाही. या राष्ट्राच्या शाश्वत मूल्यांसाठी लढा उभारणे, मनुष्य निर्माण करणे हे खरे कार्य आहे. स्वामी विवेकानंदांनी या कार्याची पायाभरणी केली. वर्षामागून वर्षे, शतकामागून शतके जातील तसे हे कार्य वाढत जाणारे आहे. स्वामी विवेकानंदांची काळावर पडलेली सावली ही वाढत जाणारी आहे. मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान हा संदेश स्वामी विवेकानंदांनी दिला. त्याग आणि सेवा या शाश्वत मूल्यांचे महत्त्व सांगितले. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रासाठी जीवन समर्पित करणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शेकडो युवक पुढे येत आहेत. विवेकानंद विचारांच्या मुशीतून घडलेले अनेक जण आज देशाच्या नेतृत्वस्थानी येत आहेत, हा योगायोग नाही; ही या देशाची नियती आहे. 

स्वामी विवेकानंद म्हणतात, 
स्वदेशासाठी सर्वस्व अर्पण करणारे आणि पूर्णपणे निष्कपट असे लोक जेव्हा तुमच्यामधये निपजतील तेव्हा हिंदुस्थानही सर्व दृष्टींनी महान होईल. माणसांनीच तर देश महान बनत असतो. नुसत्या जमिनीच्या तुकड्यात काय आहे.


राष्ट्रभक्तीच्या भावनेचे सर्वोच्च पुरस्कर्ते काय म्हणतात पाहा...  

लोकमान्य टिळक 
दोघे जेव्हा बेलूरला भेटले तेव्हा त्या भेटीत विवेकानंदांनी शत्रूशी मुकाबला करताना अधिक विध्वंसक मार्ग चोखाळण्याचा आग्रह टिळकांपाशी धरला. टिळक हे स्वामी विवेकानंदांना राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे, पिता मानित होते.

सुरेंद्रनाथ बॅनर्जी
सुरेंद्रनाथांनी आपल्या बंगाली वृत्तपत्रात विवेकानंद चरित्राचे परीक्षण करताना, कार्लाइलच्या ‘देशाचा इतिहास हा त्याच्या महापुरुषांचा इतिहास असतो’ या वाक्याचा संदर्भ देऊन रामकृष्ण व विवेकानंद यांचे समकालीन महामानव म्हणून उदाहरण दिले.

बिपिनचंद्र पाल
बिपिनचंद्र पाल लिहितात, आपल्या राष्ट्रभक्तीच्या भावनेचे सर्वोच्च पुरस्कर्ते व महापुरुष होण्याचा मान विवेकानंदांचाच आहे. आपल्या देशाबद्दलच्या व संस्कृतीबद्दलच्या ज्वलंत भावनेची तार त्यांनीच प्रथम छेडली.

गोपाळकृष्ण गोखले
गोपाळ कृष्ण गोखलेंच्या धर्मासंबंधी कल्पनांमध्ये विवेकानंदांच्या प्रभावामुळे बदल घडल्याचे दिसून येते. त्यांच्या सामाजिक कल्पना, बहुजन समाजाच्या उद्धारावरील त्यांचा भर याचे स्फूर्तिस्थान विवेकानंद होते हे म्हणणे साधार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भगवान बुद्ध यांच्यानंतर कोणी महापुरुष या भारतवर्षात अवतरीत झाला असेल तर ते स्वामी विवेकानंद होत.
(संदर्भ : रिमेन्सेस ऑफ नेहरू एज, लेखक : एम. ओ. मथाई)

वि. दा. सावरकर
क्रांतिकारकांचे मुकुटमणी वि. दा. सावरकर लिहितात, 1898च्या सुमारास उभा हिंदुस्थान विवेकानंदांच्या पुस्तकांनी भारला होता. ती पुस्तके आणि व्याख्याने माझ्या बंधूंनी आणि त्यांच्या नादाने मीही वाचली. राष्ट्रासाठी जीवनाचे बलिदान करण्याची प्रेरणा यातूनच मिळत होती.

महात्मा गांधी
आपली देशभक्तीची भावना प्रचंडतेने प्रखर होण्याचे कारण सांगताना महात्मा गांधी म्हणतात, मी विवेकानंदांच्या समग्र वाङमयाचे अध्ययन केले आहे. त्याचमुळे माझ्या ठायी असलेले मातृभूमीवरील प्रेमहजारोपटीने वाढले आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस
सुभाषचंद्र बोस वारंवार हेच लिहित की, त्यांचे जीवन विवेकानंद यांच्या प्रभावाखाली घडवले गेले; आणि युवकांनीही विवेकानंदांचा आदर्श समोर ठेवावा असाच त्यांचा आग्रह असे. त्यांच्या मते, चारित्र्य निर्माणाचा सर्वोच्च आदर्श देशापुढे जर कुणी ठेवला असेल तर तो विवेकानंदांनी. 

रवींद्रनाथ टागोर
रवींद्रनाथ टागोर लिहितात, तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल, तर स्वामी विवेकानंदांचा अभ्यास करा. स्वामी विवेकानंदांनी मानवाच्या संपूर्ण विकासाचा मूलमंत्र दिला व त्यातून देशाच्या उद्धारासाठी अनेक तरुण कार्यप्रवृत्त झाले व अनेकांनी सर्वोच्च त्यागही केला.

जवाहरलाल नेहरू
चिनी आक्रमण होत असताना तरुणांपुढे आदर्श म्हणून ठेवण्यास नेहरुंनी सामर्थ्याची व तेजाची मूर्तिमंत प्रतिमा असलेल्या विवेकानंदांची निवड केली.विवेकानंदांबद्दल ते म्हणतात : ते कोणी राजकारणी नव्हते... आणि तरीही भारतातील राष्ट्रीय आधुनिक चळवळ सुरू करणारे ते एक थोर संस्थापक होते.

इंदिरा गांधी
इंदिरा गांधी यांचा स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठाशी घनिष्ट संबंध होता. भारतीय तरुणांसमोर स्वामी विवेकानंदांचा आदर्श असला पाहिजे, अशी त्यांची भावना होती. १२ जानेवारी हा विवेकानंद जयंतीचा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित करण्याचे त्यांनीच ठरवले. राजीव गांधी यांनी या निर्णयाला मूर्त रूप दिले.

सर्वपल्ली राधाकृष्णन
डॉ. राधाकृष्णन म्हणतात, मातृभूमीच्या चैतन्याची विवेकानंद प्रत्यक्षमूर्ती होते. तिच्या आध्यात्मिक आशा आकांक्षा व त्यांची परिपूर्ती याचे ते प्रतीक होते. आणि हेच ते चैतन्य की जे आमच्या भक्तजनांच्या काव्यातून, द्रष्ट्यांंच्या तत्त्वज्ञानातून, पूजा प्रार्थनांतून व्यक्त झाले.

डॉ. एपीजे कलाम
डॉ. एपीजे कलाम म्हणतात, लोकांमध्ये विवेकानंदांच्या संदेशाचा प्रचार आणि प्रसार करणे खूप महत्त्वाचे आहे. मानव सेवा आणि मनुष्य निर्माण या संबंधात स्वामीजींची किमान १० बोधवाक्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि चमकणार्या बोर्डाद्वारे जागोजागी प्रचारित केली पाहिजेत. आणि लोकांना आवाहन केले पाहिजे की त्यांनी यातील किमान एका संदेशाचे जीवनभर पालन करावे.

नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. श्री. मोदी हे १७ वर्षांचे असताना स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांमुळे अतिशय प्रभावित होऊन सत्याच्या शोधासाठी घराबाहेर पडले होते. संन्याशी बनण्यासाठी राजकोट येथील रामकृष्ण मठात गेले होते. त्यांच्यावरील विवेकानंदांच्या प्रभावामुळेच द गार्डियनने आपल्या संपादकीयात लिहिले, १६ मे २०१४ पर्यंत भारतात ब्रिटिशांचेच राज्य होते आणि नरेंद्र मोदी यांच्या निवडीमुळे भारत खर्या अर्थाने स्वतंत्र झाला.

-------

स्वामी विवेकानंदांनी आधुनिक काळामध्ये जगद्गुरू भारताची संकल्पना मांडली. समर्थ भारताशिवाय जगद्गुरू भारत ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही, याची जाण स्वामीजींना होती.

स्वामी विवेकानंदांनी स्वातंत्र्य आंदोलनाला गती दिली, इतकेच नाही तर पुढील काळात भारत कधीच परतंत्र बनणार नाही यासाठीची पायाभरणीही केली. जे कार्य त्यांच्या पश्चातही हजारो वर्षे चालू राहणार आहे. आणि वृद्धिंगत होत राहणार आहे.

स्वामी विवेकानंद म्हणतात,
मी भविष्यकाळात डोकावून पाहात नाही. तसे करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण एक चित्र माझ्या दृष्टीपुढे साक्षात् उभे राहते : ही प्राचीन माता पुन्हा एकदा जागी झाली आहे. सर्व वैभवांसह पुनश्च आपल्या सिंहासनावर आरूढ झाली आहे. शांतिमंत्रांनी आणि आशीर्वचनांनी तिचे आगमन जगापुढे प्रकट करू या !

विवेकानंद केंद्राचे मासिक - विवेक विचार । ऑगस्ट २०१७ मधून साभार vivekvichar.vkendra.org

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी