Friday, March 29, 2013

पाकिस्तानात चढला होळीचा राजकीय रंग

 मुझफ्फर हुसेन
पाकिस्तान हे कट्टरपंथी इस्लामी राष्ट्र आहे. असे असूनही यंदा तेेथे होळीच्या सणाचा प्रभाव पाहायला मिळाला. आतापर्यंत तेथील मुल्लांनी भारतीय सणांचा तीव्र विरोधच केला आहे. वेळप्रसंगी फतवे काढून अशा सणांवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, पाकिस्तान हा भारतीय उपखंडातील देश असल्यामुळे आजही तेथे भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे.
पाकिस्तानात कोणताही सण किंवा उत्सव साजरा होताना तेथे भारतीयत्वाचे दर्शन होतेच. दिवाळीला दीप प्रज्वलित करून त्यातून आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करणे असे आपण साधारणपणे म्हणतो. देवी-देवतांच्या मंदिरात बेलफूल आणि फळांनी पूजा केली जाते, तशीच पूजा फाकमध्ये सूफी संतांच्या मजारीवर फुलांची चादर चढवून केली जाते. लग्नसमारंभ असो वा स्वागतसमारंभ असोत, तेथे फुलं आणि कळ्यांना जे महत्त्व दिले जाते, त्याला कोणताही प्रतिबंध नाही. अनेक खाजगी कार्यक्रमांतही रंगांचाही उत्स्फूर्तपणे वापर केला जातो. म्हणूनच होळीचा प्रभाव पंजाबपासून तर सिंध प्रांतापर्यंत आपणास दिसतो. पण, यावेळी मात्र पाकिस्तानात निवडणुकांचा धुराळा उडत असताना, सरकारला होळीची आठवण होणे, हे सिद्ध करते की, भारतीय उपखंडातील देश स्वत:ला भारतीयतेपासून अलिप्त ठेवू शकत नाही. यावेळी जेव्हा संपूर्ण भारतात होळी आणि धुळवड साजरी केली जात होती, त्याच वेळी पाकिस्तानात निवडणुकीचा माहोल बनविण्यासाठी होळीचे रंग राजकारणाला प्रभावित केल्याविना राहिले नाहीत.
पाकिस्तानचे मुलतान शहर होळीच्या सणाशी कित्येक वर्षांपासून जुळले आहे. मुलतान शहराचे मूळ नाव एके काळी ‘मूल स्थान’ असे होते. तेथे आजही भक्त प्रल्हाद यांच्या मंदिराचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. अशी आख्यायिका आहे की, याच स्थळी भक्त प्रल्हाद यांची परीक्षा झाली होती. जेव्हा अग्नीचाही त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही, तेव्हा याच स्थळी लोकांनी भक्त प्रल्हाद यांचे मंदिर बांधले. तेच अवशेष आजही तेथे आहेत. काही दिवसांपूर्वी एका नेत्याने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे आश्‍वासन दिले असता, त्याला तीव्र विरोध करण्यात आला. शेवटी पाकिस्तानी सरकारने हे मंदिरच उद्ध्वस्त करून टाकले. होळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे धुळवडीच्या दिवशीही होळी खेळण्याची परंपरा येथे कित्येक वर्षांपासून सुरूच होती. त्यामुळे होळी आणि भक्त प्रल्हाद या दोन्ही बाबी पाकिस्तानपासून विभक्त नाहीत. पण, काही कट्टरपंथी मुल्ला-मौलवींनी त्याची महती नष्ट करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
यंदाच्या होळीत एक आगळीवेगळी घटना घडली. या घटनेची खास दखल पाकिस्तानच्या ‘दि नेशन’ या दैनिकाने आवर्जून घेतली आहे. पाकिस्तानी संसदेच्या अध्यक्षा डॉ. फेहमिदा मिर्जा यांनी, सर्व हिंदू खासदारांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. मिर्जा यांच्या या शुभेच्छांमुळे हिंदू जनतेलाही आनंद झाला असणार. डॉ. मिर्जा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, ‘‘होळीचा हा सण समाजाच्या प्रत्येक वर्गासाठी आनंद, उत्सवाचे उधाण, स्वातंत्र्य, प्रेम आणि सन्मानाचा संदेश घेऊन येत असतो. आमच्या जीवनात एक आपुलकीची लाट घेऊन येतो. समाजाचे सर्व वर्ग परस्परांच्या अधिकच जवळ येतात, ज्यामुळे बंधुभाव वृद्धिंगत होतो. होळीचा हा सण पाकिस्तानसाठी एक वरदान आहे. कारण, आमचे धर्म भलेही वेगवेगळे असोत, त्यात मानवतेचा संदेश दडला आहे. आमचे सण हे ती अभिव्यक्ती आहे, ज्यामुळे समाज परस्परांच्या जवळ येतो.’’ पाकिस्तानच्या इतिहासात हा पहिलाच प्रसंग आहे, जेव्हा संसदेच्या अध्यक्षाने अतिशय मोकळ्या मनाने भारतीय सणांची प्रशंसा केली असेल. डॉ. मिर्जा यांनी केवळ खासदारांनाच नव्हे, तर एक निवेदन जारी करून पाकिस्तानातील समस्त हिंदू जनतेलाही होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, ‘‘आपण सर्व जण अशी आशा करू या की, यंदाच्या वर्षी हा रंगोत्सवाचा सण तमाम लोकांसाठी मस्ती, उल्हास आणि भरभराट घेऊन यावा. यामागील मूळ भावना ही आहे की, आमच्या जीवनात मानवी मूल्ये आणि विचारांना आत्मसात करण्याची भावना यामुळे अधिकच वृद्धिंगत होईल. पाकिस्तानच्या वर्तमान सरकारने देशातील सर्वच अल्पसंख्य समुदायाला सर्व समान हक्क प्रदान केले आहेत. पाकिस्तानच्या संविधानाने सर्वच धर्माच्या लोकांना जगण्याचा समान हक्क प्रदान केला आहे.’’
‘दि नेशन’ने म्हटले आहे की, डॉ. मिर्जा यांचे निवदेन पाहता, अल्पसंख्यकांच्या सर्व सण-उत्सवांना संरक्षण देणे आमच्यासाठी सर्वांत मोठे आणि सच्चे नैतिक मूल्य आहे. पाकिस्तानी सरकारने सर्वांनाच समान आर्थिक आणि सामाजिक अधिकार देण्यात कोणतीही कसर सोडू नये. देशातील विभिन्न वर्गांच्या लोकांमध्ये बंधुभाव कायम ठेवणे, हीच आमची प्राथमिकता असली पाहिजे. अल्पसंख्य समुदायाने शिक्षण, आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक अशा सर्वच क्षेत्रांमध्ये दिलेल्या बहुमूल्य सेवेचा गौरवपूर्ण उल्लेख ‘दि नेशन’ने केला आहे. पाकिस्तानातील हिंदूंनी अनेक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल चर्चा तर होतच असते, पण डॉ. मिर्जा यांनी संसदेत सर्व हिंदू सदस्यांची प्रशंसा करून, त्यांनी गेल्या चार वर्षांत दिलेल्या योगदानाबद्दलही उल्लेख केल्याबद्दल दैनिकाने त्यांचेही कौतुक केले आहे.
‘दि नेशन’ने डॉ. मिर्जा यांचे जे निवेदन प्रकाशित केले आहे, ते पाहू जाता, पाकिस्तानातील हिंदू समुदायाला सरकारकडून मिळालेले असे प्रमाणपत्र आहे, ज्याची प्रशंसा झाली पाहिजे. पण, प्रश्‍न असा आहे की, डॉ. मिर्जा या गेल्या चार वर्षांत हिंंदूंबद्दल संसदेत काहीच का बोलल्या नाहीत? त्यांना कुणी मनाई केली होती? गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानात हिंदूची जी कत्तल झाली आणि अजूनही होत आहे, तेथील हिंदू मंदिरांचा ज्या अमानुष पद्धतीने विध्वंस करण्यात आला त्यावर त्या का बोलल्या नाहीत? एवढेच नव्हे, तर पाक संसदेत जे निर्वाचित आणि मनोनित हिंदू सदस्य आहेत, त्यांनाही या जिव्हाळ्याच्या विषयांवर बोलण्याची संधी का दिली गेली नाही? पाकिस्तानात हिंदूंना बळजबरीने मुसलमान बनविले जात आहे, हिंदू मुलींचा जबरीने अतिरेक्यांसोबत विवाह लावला जात आहे, हिंदूंची संपत्ती दिवसाढवळ्या लुटली जात आहे, त्यांना पळवून लावले जात आहे. या सर्व घटनांवर डॉ. फेहमिदा मिर्जा यांनी संसदेत कधीही ब्र काढला नाही, कोणत्याही सदस्याला बोलू दिले नाही. या अशा हिंदूविरोधी घटनांवर सरकारने संसदेत साधे निवेदन करण्याचेही आदेश दिले नाहीत. प्रश्‍न हा निर्माण होतो की, अगदी निवडणुकीच्या तोेंडावर डॉ. मिर्जा यांना हिंदूंचा एवढा पुळका कसा काय आला? केवळ यासाठी की, आगामी निवडणुकीत हिंदूंनी डॉ. मिर्जा यांच्या पक्षाला मत द्यावे म्हणून? पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि मुख्य विरोधी पक्ष नवाज शरीफ यांचा मुस्लिम लीग यांनीही हिंदूंच्या रक्षणार्थ तर सोडाच, समर्थनार्थसुद्धा चकार शब्द कधी संसदेत काढला नाही. पाकिस्तानच्या न्यायालयांनी तिथल्या हिंदू मंदिरांना पाडण्यास प्रतिबंध केला असतानासुद्धा त्याचे पालन या सरकारने केले नाही. एवढेच नव्हे, तर हिंदू कोर्टात गेला हे माहीत होताच, न्यायालयाचा निर्णय येण्याआधीच सरकारकडूनच मंदिरे पाडून टाकण्यात आली! ही मंदिरे पाडणार्‍या नापाक गुंडांना सरकारने संरक्षण दिले. या सर्व घटनांवरून हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे की, डॉ. मिर्जा यांनी होळीच्या निमित्ताने जे काही निवेदन केले ते केवळ मगरीचे अश्रू आहेत. आगामी निवडणुकीत हिंदूंची मते आपल्या पक्षाला मिळावीत, यासाठी रचलेला हा कट आहे. कारस्थान आहे. पाकिस्तानात आज हिंदू उरलेच किती? हा आकडाही सरकारने कधीच सांगितला नाही. ज्या होळीच्या शुभेच्छा संसदेत देण्यात आल्या, त्या दिवशी हिंदू बांधवांना सुटी घोषित केली का? पाकिस्तानात तिथलाही, कोणताही राष्ट्रीय दिवस असो, हिंदूंना कधीही सुटी दिली जात नाही. सिंध प्रांतात हिंदूंना वर्षभरात केवळ दोन सुट्या आणि पंजाबात गुरुनानक जयंतीची केवळ एक दिवसाची सुटी देण्यात येते.
पाकिस्तानातील हिंदू आज आपला जीव मुठीत घेऊन जगत आहेत. भयानक असुरक्षिततेमुळे अनेक हिंदू भारताकडे पलायन करीत आहेत. पाकिस्तानातील हिंदूंवर होणार्‍या या अत्याचारांची अनेकदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात आली, पण, पाकिस्तानाच्या स्थायी सदस्याच्या दबावामुळे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ‘दि नेशन’ने डॉ. मिर्जा यांचे बयाण छापून हिंदूंना चुचकारण्यासाठी भलेही मतांसाठी पाखंड रचले असो, पाकिस्तानात होळीच्या रंगापेक्षा हिंदूंच्या रक्ताचा रंग अधिक स्वस्त आणि हलका आहे, हे आजच्या पाकिस्तानचे वास्तव आहे.
साभार - तरुण भारत 

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी