Saturday, June 11, 2011

दलित राजकारण आणि शरद पवार

महाराष्ट्रात कधी नव्हे एवढे महत्त्व आज दलित राजकारणाला आले आहे. दलित नेते रामदास आठवले यांनी भीमशक्ती शिवशक्तीच्या मागे उभी केली आहे. यामुळे शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेत राजकारण करणा-यांच्या मक्तेदारीला मोठा हादरा बसला आहे. आणि स्वाभाविक गोचीही झालीय.

9 जून रोजी मुंबईत भीमशक्ती शिवशक्तीचा महामेळावा झाला. दुस-या दिवशी मुंबईतच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाचे निमित्त करून समता हक्क परिवर्तन परिषदेच्या नावाने कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. रामदास आठवले यांनी शिवसेनेसोबत गेल्याने राष्ट्रवादी पूर्णत: गडबडून गेल्याचे मेळाव्यातील राष्ट्रवादी नेत्यांच्या देहबोलीतून दिसून आले.

स्वार्थाच्या साठमारीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत समाजात जातीभेदाचे विष आणखी जहरी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. बाबासाहेबांचे विचार समाजात दरी निर्माण करण्यासाठी आपल्या सोयीने सांगीतले जात आहे. बुद्धीभेद केला जातोय. रामदास आठवले यांनी शिवसेना भाजपशी जवळीक साधून बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केल्याचे सांगण्याचा प्रयत्न होतोय. वस्तुस्थिती अशी आहे काय? डॉ. बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रकाशात या विषयाचा वेध घेण्याचा प्रयत्न येथे केला आहे.

महापुरुषांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या विचारांचा कधीही तुकड्या-तुकड्यांत विचार करायचा नसतो. तसे केल्याने नुकसानच होण्याची अधिक शक्यता असते. महापुरुषांचे जीवनविचार समग्रतेने समजून घ्यावे लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर समाजसुधारक होते. संपूर्ण समाज एकसंध व्हावा यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन वेचले. स्पृश्यास्पृश किंवा दलित सवर्ण भेद मिटावा यासाठी बाबासाहेबांनी सतत प्रयत्न केला. त्यावेळच्या सवर्णांच्या हेकटपणामुळे आणि अविचारामुळे बाबासाहेबांनी याच मातीत जन्मलेल्या बुद्ध धर्माचा स्वीकार केला. दलित समाजात परिवर्तन येण्यासाठी विष्णू, शिव, राम, कृष्ण आदी देवतांना आता स्थान नको असे सांगितले. अंध रुढींच्या जोखडातून बाहेर काढण्याच्या दृष्टीनेही अनेक नियम सांगीतले. या कृतीमागे वर्षानुवर्षे गावकुसाबाहेर राहिलेल्या समाजाला सन्मान मिळवून देण्याचा बाबासाहेबांचा उद्देश होता, समाजातील दरी अधिक रूंद करणे नव्हे.
बाबासाहेब म्हणतात, '' ज्या भूमीने व्यास, कपिल, कणाद, गौतम, चार्वाक, महावीर आणि बुद्ध यांच्यासारखे श्रेष्ठ तत्त्ववेत्ते निर्माण केले आणि बौद्ध धर्मासारखी उदात्त देणगी जगाला दिली, त्या या थोर भूमीचा मी दूत आहे आणि तिचा तो श्रेष्ठ वारसा चालविण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी महाराष्ट्रीय नाही किंवा महारही नाही. मी भारतीय आहे आणि माझ्या या जन्मभूमीचे पांग फेडण्यातच माझ्या जीवनाचे सार्थक आहे. ''
या उद्गारातून बाबासाहेबांचे एकसंध समाजाबद्दलचे विचार समोर येतात. बाबासाहेब म्हणतात, '' ब्राह्मणांशी माझे काही वैर नाही. माझा विरोध दुसऱ्यांना हीन समजण्याच्या दुवृत्तीला आहे. भेदभाव मानणाऱ्या ब्राह्मणेतरांपेक्षा नि:पक्ष वृत्तीचे ब्राह्मण मला अधिक जवळचे वाटतात. आपल्या आंदोलनात सहकार्य देणाऱ्या अशा ब्राह्मणांना मी दूर लोटू शकत नाही. ''
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांचे वक्तव्य पाहा. दलितांनी शिव, गणेश, देवी, राम, कृष्ण यांची पूजा अर्चा करू नये, असे बाबासाहेबांनी म्हटल्याचा दाखला पवारांनी दिला. शिवसेनेशी अनेकदा जवलिक करण्याचा प्रयत्न केलेल्या पवार यांनी केवळ राजकारणासाठी समाजातील दरी वाढविण्याचा प्रयत्न करवा, हे दुर्दैवी आहे. ब्राह्मण ब्राह्मणेतर हा गाढला गेलेला वादही वाढविण्याचा प्रयत्न पवारांनी केला.
गेल्या 60 वर्षात कॉंग्रेसने दलितांच्या भौतिक उन्नत्तीसाठी काय केले ? या प्रश्नाचे उत्तर निराशाजनक आहे. अलीकडच्या 25/30 वर्षांत भाजप शिवसेनेसारख्या पक्षांना जातीयवादी ठरवून दलित समाजाचा केवळ स्वार्थासाठी उपयोग करून घेण्यात आला नाही काय ?
हिंदुत्ववादी हे जातीयवादी आहेत, हे गृहितकृत्यही फोल ठरले आहे. आकडेवारी काढून पाहा... दलितांवर जेवढे अत्याचार झाले आहेत त्यामागे बहुतेक वेळा कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक असणारेच गावगुंड असल्याचे दिसून येते. जातीभेद पाळणारे बहुतेक रुढीवादी लोक कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक असणारे असतात, अशी कबुली अनेक दलित कार्यकर्ते खासखीत देतात. मुस्लिमांविषयी देशाचे काय धोरण असावे, याबद्दलचे डॉ. बाबासाहेबांची विचारसूत्रे काढून पाहा. कसाब-अफजल गुरूसारख्या प्रवृत्तींना पाठिशी घालणा-या प्रवृत्तींबद्दल बाबासाहेबांनी कधीच सावध करून ठेवल्याचे दिसेल.

बाबासाहेब म्हणतात, '' हिंदी मुसलमानदेखील एक अजब चीज आहे. सर्व सामाजिक सुधारणेचे त्याला वावडे आहे. हिंदुस्थानाबाहेरील त्याचे धर्मबंधू समाजक्रांतीवादी बनले आहेत. राष्ट्राच्या व मानवी जीवनाच्या सामाजिक प्रगतीला अडथळा करणाऱ्या सर्व चालीरीतींचा मुस्ताफा केमाल पाशासारख्या मुसलमान देशभक्ताने धुव्वा उडवून दिला आहे, पण हिंदी मुसलमानांना मौ. शौकतअल्लीसारख्या देशभक्त व राष्ट्रीय हिंदी मुसलमानांनादेखील केमालपाशा व अमानुल्ला आवडत नाहीत. कारण ते सुधारक आहेत आणि हिंदी मुसलमानांच्या धार्मिक दृष्टीला सुधारणा हे तर महत्पाप वाटते. ''

बाबासाहेबांनी दलितांना सावध करून ठेवले आहे. बाबासाहेब म्हणतात, '' कॉंग्रेस जळते घर आहे, त्यात जाऊ नका. '' या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांच्या निर्णयाकडे पाहिले पाहिजे. हिंदुत्व विचाराच्या पक्षांना त्यांच्या पाकिस्तान आणि मुस्लिम लांगुलचालनविरोधी भूमिकेबद्दलच जातीयवादी संबोधण्याची फॅशन आहे. या संदर्भात आंबेडकरप्रेमींची अडचण असण्याचे काहीही कारण दिसत नाही. शिवसेना भाजपला भीमशक्तीसोबत यायला संकोच नसेल तर हे सामाजिक बदलाचे सुचिन्ह मानून स्वागत करावे की विरोध हे सर्वस्वी ६० वर्षे 'दलितच' राहिलेल्या समाजाला ठरवायचे आहे.

आपले मत

तुम्हाला काय वाटतं ? रामदास आठवले यांनी चूक केली आहे ? सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावरून बाहेर पडून पुन्हा त्यांच्या आश्रयाला जाणार्या पवारांनी आठवले यांना सल्ला देणे योग्य वाटते ? या विषयावरील तुमची मते पुढील चौकटीत अवश्य लिहा.

3 comments:

  1. Anonymous12.6.11

    मायावतींच्या सोशल इंजिनियरिंगची लाट थोपविण्याचा हा प्रयत्न आहे. फक्त आठवल्याना परतविण्याचा नाही.

    ReplyDelete
  2. Anonymous20.6.11

    हे सगळे सत्ताकारण आहे. कॉंग्रेस, राष्ठ्रवादी, शिवसेना, भाजप यांपैकी कुणाचीच कुठल्याच विचारसरणीशी वा तत्वांशी बांधिलकी नाही. रामदास आठवल्यांचा तर या शब्दांशी कधी संबंधच आलेला नाही, त्यामुळे त्यांच्याविषयी काय बोलणार?

    हे सगळे निव्वळ स्वार्थप्रेरित आहे. जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही.

    - सागर विद्वांस (sagarvidwans@hotmail.com)

    ReplyDelete
  3. abhinandan!
    all the best!
    blog waril mahiti vastvikta darshvite
    apala blog wachniya ahe!
    blog prekshniya hi kara\
    wish you all the success!

    Apala mitra,
    NARESH AGRAWAL

    ReplyDelete

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी