Friday, November 4, 2011

चाणक्य नीती 12 : तुम्हाला जर घाणीत सोने दिसले तर...

चाणक्य नीती 12 : तुम्हाला जर घाणीत सोने दिसले तर...
दररोजच्या व्यवहारात आपण अनेकांना भेटत असतो, त्यात काही जण चांगल्या चरित्र आणि स्वभावाचे असतात तर काहींचा स्वभाव आणि वर्तणूक वाईट असते. चांगल्या लोकांकडून शिकण्यासारखे आणि घेण्यासारखे खूप काही असते. परंतु आपण वाईट लोकांकडूनही काही चांगल्या गोष्टी शिकू शकतो. या संबंधात आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की,
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-chanakya-niti--life-management-tips-of-chanakya-niti-2541831.html 

विषादप्यमृतं ग्राह्ममेध्यादपि कांचनम्।
नीचादप्युत्तमां विद्यां स्त्रीरत्नं दुष्कुलादपि।।
या श्लोकाचा अर्थ असा की, विषातूनही अमृत वेचले पाहिजे. घाणीतही सोने पडले असेल तर ते घेतले पाहिजे. कोणी नीच माणूस असेल आणि त्याच्याकडे एखादा चांगला गुण असेल तर तो आत्मसात करावा. एखाद्या दुष्ट कुलात किंवा संस्कारहीन कुटुंबात एखादी सुसंस्कारी स्त्री असेल आणि ती अविवाहित असेल तर त्या कन्येशी लग्न केले पाहिजे.
आचार्य चाणक्य म्हणतात की जर एखाद्या ठिकाणी वाईट काही असेल आणि तिथे चांगलेही असेल तर घेतले पाहिजे. एखाद्या ठिकाणी विष असेल आणि तिथेच अमृतही असेल तर आपण कौशल्याने अमृत मिळविले पाहिजे. अशाच प्रकारे घाणीतही सोन्याची आभुषणे किंवा अन्य मौल्यवान वस्तू पडल्या असतील तर त्या घेतल्या पाहिजेत. याशिवाय एखादा मनुष्य स्वभावाने नीच असेल, अधर्मी असेल आणि त्याच्याजवळ चांगली विद्या असेल तर ती प्राप्त केली पाहिजे.
चाणक्य यांच्यानुसार जर एखाद्या कुटुंबातील सदस्यांचे संस्कार आणि वागणे चांगले नसेल आणि तिथे सुसंस्कारी, शिक्षित, गुणवान स्त्री असेल तर तिचा स्वीकार केला पाहिजे किंवा तिला योग्य स्थळ पाहून विवाह करण्यासाठी मदत केली पाहिजे.
कोण आहे चाणक्य ?
असे मानले जाते की सर्वात आधी अखंड भारताची संकल्पना आचार्य चाणक्य यांनी मांडली होती. त्या काळात भारताला आर्यावर्त असे नाव होते. आर्य म्हणजे सुसंस्कृत. आर्यावर्त म्हणजे सुसंस्कृत लोकांचा देश. ( ब्रिटीशांनी आर्य बाहेरून आले असा चुकीचा तर्क मांडला. असे करून भारतीयांमध्ये फूट पाडायची त्यांची नीती होती. आता अलीकडच्या संशोधनातून ब्रिटीशांचा तो तर्क खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. आर्य नावाचे कुणी बाहेरून या देशात आलेच नव्हते. आर्य म्हणजे सुसंस्कृत. 'कृण्वन्तो विश्वम् आर्यं' साऱ्या जगाला सुसंस्कृत करू या.) तेव्हा भारताच्या सीमा खूप विस्तृत होत्या. त्या काळात म्हणजे सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी ख्रिश्चन, इस्लाम आदी धर्मांचा उदय झालेला नव्हता. भारतात छोटी छोटी गणराज्ये नांदत होती. अखंड भारतातील संस्कृती एक होती. भारत हे एक राष्ट्र होते, मात्र गणराज्ये अनेक होती. या सा-या गणराज्यांना जोडून राजकीय दृष्ट्या अखंड भारत निर्माण करण्याचे स्वप्न आचार्य चाणक्य यांनी पाहिले होते.
जेव्हा सम्राट सिकंदराने भारतावर आक्रमण केले तेव्हा आचार्य चाणक्य यांनी कूटनीतीने त्याला परत जाण्यास भाग पाडले. आचार्य चाणक्य यांच्यामुळेच सिकंदराला भारत जिंकता आले नाही. त्या काळी भारतातील सर्व गणराज्यांमध्ये सर्वाधिक शक्तीशाली गणराज्य होते मगध. मगधची राजधानी होती पाटलीपुत्र. या शहराला आता पाटना असे नाव आहे. ही नगरी आता बिहार या राज्याची राजधानी आहे. मगध गणराज्याच्या सम्राटाचे नाव धनानंद होते. तो राजा सदैव भोग विलासात लिप्त होता. प्रजेची त्याला काहीही काळजी नव्हती. तो अन्य छोट्या छोट्या गणराज्यांकडून मनमानी पद्धतीने कर वसूल करायचा. आचार्य चाणक्य यांनी मगध सम्राटाला सावध करण्याचा प्रयत्न केला मात्र काहीही उपयोग झाला नाही.
साधारण शिक्षक असलेल्या चाणक्य यांच्यासमोर संपूर्ण भारताच्या भवितव्याची चिंता होती. म्हणून त्यांनी एका सामान्य बालकास तक्षशीला विद्यापीठात शिक्षण दिले. तोच बालक पुढे महान योद्धा चंद्रगुप्त मौर्य बनला. चंद्रगुप्ताने धनानंद याचे कुशासन मोडून काढले आणि अखंड भारताची स्थापना केली.
काय आहे चाणक्य नीती ?
चाणक्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. जगभर आजही चाणक्यनीतीकडे कुतूहलाने आणि आदराने पाहिले जाते. आचार्य चाणक्य हे तक्षशीलेच्या गुरुकुलात अर्थशास्त्राचे आचार्य होते. राजनीती आणि कूटनीतीतही त्यांनी प्रचंड कार्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. त्यात नीतीशास्त्रावरील ग्रंथाचाही समावेश आहे. नीतीशास्त्रावरील ग्रंथ म्हणजेच चाणक्य नीती. जीवनात यशस्वी कसे व्हावे याविषयी खासकरून यात मार्गदर्शन आहे. याशिवाय चाणक्यांनी लिहिलेला अर्थशास्त्रावरील ग्रंथही प्रसिद्ध आहे. कौटिल्याचे अर्थशास्त्र हा ग्रंथ आजही अभ्यासला जातो.

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी