Sunday, September 9, 2012

  भाऊ तोरसेकर

रविवार 9 सप्टेंबर 2012

मौलाना वहिउद्दीन खान काय सांगतात?


   "बांगलादेशियांचे बेकायदा स्थलांतर रोखण्यात प्रशासनालाही अपयश आले आहे. पण आता त्यांना परत पाठविणे हा उपाय नाही. स्थलांतरितांनी स्थानिक लोकांशी जुळवून घेतले पाहिजे. मुस्लिम जातात तेथे त्यांना सांस्कृतिक ओळख कायम ठेवायची असते. हे काही योग्य नाही. युरोपातही ते बुरख्याचा आग्रह धरतात. माझ्या मते स्थलांतरित मुस्लिमांपुढे दोन पर्याय आहेत. एकतर त्यांनी पुन्हा आपल्या मूळ प्रदेशात परतावे. अन्यथा आसामातील स्थानिक जनतेशी जुळवून घ्यावे. सतत आपल्या सांस्कृतिक ओळखीवर भर देणे, हा काही इस्लाम नाही. स्थलांतरितांना याची जाणीव करून न देणे हा तिथल्या मुस्लिम नेत्यांचा दोष आहे. बोडोंचे काही चुकले असे मला वाटत नाही. स्थलांतरितांना सन्मानाने जगायचे असेल तर त्यांनी स्थानिक संस्कृती स्वीकारली पाहिजे. आणि आपल्या सांस्कृतिक ओळखीवर सातत्याने भर देणे टाळावे. बांगलादेश आणि पाकिस्तानात हेच घडले. बांगलादेशात ऊर्दू भाषिक मुस्लिमांनी सांस्कृतिक ओळख कायम ठेवण्याचा आग्रह धरला, तेव्हा बंगाली मुस्लिमांना ते सहन झाले नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांनी (मोहाजीर) कराची आणि सिंध प्रांतात आपल्या संस्कृतीचा आग्रह धरला, तो सिंधी मुस्लिमांना मान्य झाला नाही. त्याचीच पुनरावृत्ती आसामात घडत आहे. संस्कृती ही भौगोलिक परिस्थितीशी निगडीत असून ती काही धार्मिक प्रक्रिया नाही. इस्लाम हा धर्म आहे', असे सांगून यांची गल्लत होता कामा नये."

   हे माझे मत नाही. मुंबईतील आझाद मैदानच्या हिंसेनंतर मौलाना वहिउद्दीन खान या मुस्लिम धर्मपंडीताने व्यक्त केलेले हे मत आहे. तेव्हा त्याच्यावर तरी कोणी हिंदूत्ववादी असा निदान आरोप करू शकणार आही अशी आशा आहे. त्यात कुठेतरी त्यांनी संघ परिवार किंवा त्यांच्या हिंदूत्वाचा उल्लेख तरी केला आहे काय? मुस्लिमांना भेडसावणार्‍या समस्येचा विचार करताना आपल्याकडे नेहमी सेक्युलर लोक कारण नसताना हिंदूत्व हा विषय मध्ये घुसडतात. पण वहिउद्दीन हे सेक्युलर नाहीत तर धर्मनिष्ठ तेवढेच वस्तुनिष्ठ मुस्लिम आहेत. आणि म्हणूनच त्यांना सत्य बोलायची सेक्युलर भिती भेडसावू शकलेली नाही. कुणी हिंदूत्ववादी जेवढा नेमकेपणाने मुस्लिमातील दोष सांगू व दाखवू शकणार नाही; तेवढे वहिउद्दीन यांनी नेमक्या दुखण्यावर बोट ठेवले आहे. आसामच्या विषयावर किंवा बांगलएशी घुसखोरांच्या प्रश्नावर बोलतांना त्यात मुळातच हिंदू-मुस्लिम असे वळण देण्याचे कारण नसते. पण कुठल्याही सेक्युलर पुढारी वा बुद्धीमंताच्या वक्तव्याकडे बघा; तो हटकून त्यात चर्चेला हिंदू-मुस्लिम असे वळण देतो. वहिउद्दीन यांनी तसे केलेले नाही. शिवाय त्यांनी बांगलादेशी मुस्लिम किंवा जगातले स्थलांतरीत मुस्लिम कसे आपल्या सांस्कृतिक ( धार्मिक म्हणुन) ओळखीचा अट्टाहास करतात आणि समस्या निर्माण करतात, त्यावरच बोट ठेवाले आहे. समस्या तिथून सुरु होते. पण जेव्हा आपण त्याच दुखण्यावर बोलायचे टाळतो, तेव्हा मग उपाय शोधणेच अशक्य होऊन जाते. वहिउद्दीन काय म्हणतात?

‘मुस्लिम जातात तिथे त्यांना आपली सांस्कृतिक ओळख कायम ठेवायची असते, ते योग्य नाही.’ म्हणजे जिथे तुम्ही जाल तिथे तुम्ही तिथल्या स्थानिक संस्कृतीशी जुळवून घेतले पाहिजे. आणि तेच होत नाही. कुठल्याही समाजाची सांस्कृतिक ओळख भौगोलिक इतिहासातून तयार झालेली असते. त्यात शेकडो हजारो वर्षे खर्ची पडलेली असतात. शेकडो पिढ्यांनी केलेल्या अनुकरण व जगण्यातून ती ओळख तयार झालेली असते. त्याला कोणी स्वाभिमान म्हणतात तर कोणी अस्मिता असे नाव देतात. तिथे नंतर कोणी येऊन वसले तर त्यांनाही तिथला समाज सामावून घेत असतो. पण त्या स्थानिक संस्कृती वा समाजात सामावून न जाता कोणी त्या संस्कृतीलाच धक्का देण्याचा प्रयत्न करू लागला, मग अस्मितेची लढाई सुरू होते. आणि ती कोण सुरू करतो? कशामुळे सुरू होते? वहिउद्दीन नेमके तेच सांगतात. मुस्लिम जातात तिथे त्यांना आपली सांस्कृतिक ओळख कायम ठेवायची असते, म्हणजे काय तर स्थानिक समाज व संस्कृतीशी जुळवून घ्यायचे नसते. आणि हीच खरी समस्या आहे. जिथे तसा अट्टाहास केला जात नाही, तिथे मुस्लिम व अन्य बिगर मुस्लिम गुण्यागोविंदाने नांदताना दिसतील. पण हे बोलणे सुद्धा सेक्युलर लोकांना पाप वाटते. हा मुस्लिमांचा दोष आहे आणि तोसुद्धा समस्त मुस्लिम समाजातला दोष नाही, तर अगदी मुठभर हटवादी मुस्लिमांमध्ये तो आढळून येतो. (हे मुठभर हटवादी मुस्लिम नेमके कोन व त्यांचा पंथ व ओळख काय ते सविस्तरपणे मी पुढे मांडणार आहे.) पण त्यामुळेच तमाम मुस्लिमांकडे मग त्याच हटवादी स्वभावाचे म्हणुन बघितले जाते.

   ‘सतत आपल्या सांस्कृतिक ओळखीवर भर देणे, हा काही इस्लाम नाही. स्थलांतरितांना याची जाणीव करून न देणे हा तिथल्या मुस्लिम नेत्यांचा दोष आहे. बोडोंचे काही चुकले असे मला वाटत नाही.’ असेही वहिउद्दीन म्हणतात. याचा अर्थ काय होतो? आसाममध्ये आज जी हिंसा भडकली आहे त्याला बोडो हे मुळचे स्थानि्क जबाबदार नाहीत तर तिथे नंतर येऊन वसलेल्या मुस्लिमांच्या चुका हिंसेला कारण झालेल्या आहेत. आणि त्या चुका कोणत्या आहेत? तर त्यांचा आपली सांस्कृतीक ओळख कायम ठेवायचा अट्टाहास. आणि ती फ़क्त आसामची समस्या नाही. ती संपुर्ण जगातील समस्या आहे. त्याचा दाखला मौलानांनी युरोपमधील बुरख्याचा आग्रही भूमिकेतून दिला आहे. एक मुस्लिम धर्मपंडीत ठामपणे हे मुस्लिमांचे दोष दाखवतो आहे. पण ज्यांना धर्माशी कर्तव्य नाही ते सेक्युलर मात्र यातला एकही दोश मांडायला तयार नसतात. पण तेच सेक्युलर हिंदूंच्या दोष व चुकांवर बोट ठेवायला कायम उतावळे झालेले दिसतात. तेव्हा बहुसंख्य समाजाची काय भावना होते? इथे सेक्युलर म्हणुन मुस्लिमांच्या धर्मांधतेचे लाड केले जातात आणि हिंदूच्या भावना पायदळी तुडवल्या जातात. ही समजूत खरी समस्या आहे आणि तिचे जनक कोणी मुस्लिम धर्मवेडे वा हिंदूत्ववादी नसून सेक्युलरच आहेत. कारण हे सेक्युलर लोक हिंदू-मुस्लिम यांच्यात पक्षपात करत असतात. एक बारीकशी गोष्ट घ्या. आता गणेशोत्सव येतो आहे. त्यावेळी रस्त्यावर वर्दळीच्या जागी उत्सवाचे मंडप घातल्याने वाहतुक व नागरिकांचे हाल कसे होतात, त्याच्या मोठमोठ्या बातम्या झळकतील. पण तसाच काहीसा प्रकार शुक्रवारच्या नमाजाच्या निमित्ताने होत असतो. पण सेक्युलर माध्यमात त्यावर कधी अवाक्षर बोलले जात नाही.

   अशावेळी हिंदूंवर टिका करणारे सुधारणावादी मुद्दाम पुढे आणले जातात, ते हिंदूंच्या वागण्यावर टिका करतात. पण तसेच सुधारणावादी मुस्लिमातही आहेत. त्यांनीही अशा मुस्लिम आक्रमकतेवर अनेकदा टिका केलेली आहे. पण माध्यमे त्या शांतताप्रिय मुस्लिम विचारवंत किंवा नेत्यांना कधीच व्यासपीठ देत नाही. उलट जे आक्रस्ताळेपणा करतील व धर्मासाठी आत्मसमर्पण करायला सज्ज आहोत अशी भडक भाषा बोलतील, अशाच नेत्यांना माध्यमे पुढे आणतात. त्यात हैद्राबादचे ओवाइसी किंवा पाटण्याचे सय्यद शहाबुद्दीन वा मुंबईतले अबु आझमी असतात. पण संयमाची भाषा बोलणार्‍या वहिउद्दीन यांना कितीदा वाचक प्रेक्षकासमोर आणले जाते? यातून माध्यमे सेक्युलर विचार म्हणुन मुस्लिम धर्मांधतेला खतपाणी घालतात आणि हिंदूंच्या भावना पायदळी तु्डवतात अशी धारणा निर्माण होण्यास हातभार लागता असतो. शिवाय अनेक प्रश्न अनुत्तरीत रहातात, तेवढेच नाही. असे अनुत्तरीत प्रश्न शिल्लक रहातात ते गैरसमजूतीची जोपासना करू शकत असतात. जेवढ्या या गैरसमजूती वाढत जातात, तेवढा संशय व परस्पर विश्वास वाढीस लागत असतो. मुद्दा तिथेच संपत नाही. जेव्हा माध्यमे अशा रितीने मुस्लिमातील आक्रमकतेला प्रोत्साहन देतात व त्यातल्या समंजस प्रवृत्तीची गळचेपी करतात, तेव्हा सर्वसामान्य मुस्लिमही त्याच आक्रमकतेच्या प्रभावाखाली येत असतो. बहुसंख्येने जे शांततावादी मुस्लिम आहेत, त्यांना त्याच भडक माथ्याच्या नेत्यांच्या मागे फ़रफ़टत जावे लागत असते. कारण त्यांचा समंजस आवाजच उठत नसतो.

   मौलाना वहिउद्दीन युरोपातील बुरख्याच्या आग्रहाबद्दल बोलत आहेत तो आग्रह किती लोकांचा आहे? युरोपिय देशात स्थलांतरीत झालेल्या मुस्लिमांपैकी एक टक्का देखिल अशा आग्रही भूमिकेचे नाहीत. पण तिथल्याही सेक्युलर उदारमतवादाने चिथावणीखोर मुस्लिमांना सतत प्रसिद्धी देऊन मोठे केले आहे आणि उर्वरित मुस्लिम लोकसंख्येला त्याच माथेफ़िरूंच्या मागे फ़रफ़टावे लागते आहे. कारण वहिउद्दीन म्हणतात व दाखवतात, त्या समस्येवर बोलायचे नाही असा सेक्युलर हट्ट असतो. त्यामुळे समस्येचे उत्तर शोधलेच जाऊ शकत नाही. मग उत्तर नाही म्हणून उपाय नाही आणि उपायच नाही म्हणुन संशयाचे धुके वाढलेले आहे. आणि इथे जसे समजले जाते वा दाखवले जाते, तशी ही हिंदू मुस्लिम समस्या अजिबात नाही. ती मुस्लिम व बिगर मुस्लिम अशी जागतिक समस्या आहे. आणि त्याचा आरंभ वहिउद्दीन यांनी सांगितला आहे. ती समस्या आहे आपल्या सांस्कृतिक ओळखीचा मुस्लिमांकडून होणारा अट्टाहास. त्यामुळे काय होते? ती समस्या का आहे? ते उद्या बघू.      ( क्रमश:)
भाग  ( २५ )   ९/९/१२

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी