Sunday, June 5, 2011

स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी



काळा पैसा भारतात आणण्यातला सर्वात मोठा अडसर सोनिया गांधी यांचा आहे, हे काही आता लपून राहिलेले नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वासार्ह आणि निपक्षपाती म्हणून मान्यता असलेल्या दोन स्त्रोतांनुसार सोनिया गांधी यांच्या कुटुंबाचा स्वीस बॅंकेत प्रचंड पैसा आहे. सोनिया गांधी यांचे आणि राहुलचे स्वीस बॅंकेत गुप्त खाते असल्याचे दोन विश्वासार्ह संस्थांनी जाहीर केले आहे. स्वीत्झर्लंडमधील सर्वाधिक खपाचे आणि लोकप्रिय असलेल्या "Schweizer Illustrierte या नियतकालिकेने 11 नोव्हेंबर 1991च्या अंकात याचे रहस्योद्‌घाटन केले होते. स्व. राजीव गांधी यांच्या गुप्त खात्यात 2.2 बिलियन डॉलर असल्याचे त्यात म्हटले आहे.

दुसरी विश्वासार्ह संस्था आहे केजीबी. ही रशियाची गुप्तचर संस्था आहे. केजीबीच्या कागदपत्रांवर आधारित संशोधन पुस्तिकेत रशियन पत्रकार युवेजिना अल्बटस्‌ यांनी म्हटले आहे की, जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते (1985) तेव्हा त्यांनी गांधी कुटुंबावर आर्थिक कृपा केल्याबद्दल केजीबीकडे कृतज्ञता व्यक्त केली होती.

विख्यात स्तंभलेखक ए.जी. नूरानी यांनी पहिल्यांदा 1988 मध्ये ही बाब समोर आणली होती. नंतर 2001 मध्ये जनता पार्टीच्या संकेतस्थळावर सुब्रमण्यम्‌ स्वामी यांनी या संदर्भातील पुरावे प्रसिद्ध केले. न्यू इंडियन एक्स्प्रेसमध्ये यावर 2009 मध्ये विस्तृतपणे छापून आले आहे. इंडिया टुडे या भारतातील प्रसिद्ध नियतकालिकेत राम जेठमलानी यांनी यावर विस्तृतपणे लिहिले आहे. आजवर भारतात आणि भारताबाहेर कुठेही गांधी कुटुंबाने लेखक, प्रकाशक यांना कोर्टात खेचले नाही किंवा बदनामीचा खटला दाखल केला नाही.

(मोरारजी देसाई यांनी वयाच्या 87व्या वर्षी 50 दशलक्ष डॉलर्सचा अब्रुनुकसानीचा दावा अमेरिकेत दाखल केला होता. ते सीआयए या अमेरिकी गुप्तचर खात्याचे एजंट असल्याचे सेमर हेर्ष या लेखकाने आपल्या पुस्तकात लिहिले होते. आरोप सिद्ध झाला नाही आणि त्यामुळे देशाची आणि मोरारजींची अब्रू वाचली.)

2008 साली सोनिया गांधी या अमेरिका भेटीला गेल्या होत्या. त्यावेळी द न्यूयॉर्क टाईम्स या अमेरिकेतील प्रतिष्ठित दैनिकात एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. अनिवासी भारतीयांनी दिलेल्या त्या जाहिरातीत सोनिया गांधी यांच्या कुटुंबाचे स्वीस बॅंकेत खाते असल्याचे नमूद केले होते. यामुळे व्यथित होऊन परदेशस्थ कॉंग्रेसप्रेमींनी 100 दशलक्ष डॉलर्सचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला, परंतु नंतर काही दिवसांनी खटला मागे घेण्यात आला. अशा स्थितीत कांग्रेसचा कुणी नेता सोनिया गांधींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे शक्यच नाही. कांग्रेसचे अस्तित्वच धोक्यात येईल अशी भीती कांग्रेसच्या नेत्यांना वाटणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. अन्य पक्षीय नेत्यांचा काहीच काळा पैसा नाही असे कोणी म्हणणार नाही, परंतु अन्य पक्षांनी उघडपणे काळ्या पैशाला राष्ट्रिय संपत्ती घोषित करायला पाठिंबा दर्शविला आहे.

4/5 जूनच्या मध्यरात्री रामलीला मैदानावर केंद्र सरकारने पोलीस बळाचा वापर केला. त्यामुळे स्वामी रामदेव यांनी सुरू केलेले काळा पैसाविरोधी आंदोलन चिघळले आहे. रामदेव बाबा यांनी आंदोलन चालूच राहील अशी घोषणा ऋषीकेष येथून केली आहे. या आंदोलनाला आणीबाणी विरोधी आंदोलनासारखे रूप येईल की आंदोलन विरून जाईल, या प्रश्नाचे उत्तर मिळणे कठीण आहे.

एक लाख 80 हजार कोटी रुपयांच्या टू जी भ्रष्टाचाराविरोधात एका अक्षरानेही लेखणी न झिजवणारे पत्रकार रामलीला मैदानावर आंदोलनाच्या तयारीसाठी 14 कोटी खर्चले म्हणून गळा काढताना दिसले. रामदेवबाबा यांच्यामागे आरएसएस आहे. ते महाठग आहेत. अशा आरोपांची मालिकाच कॉंग्रेसचे महासचिव आणि लादेनचा उल्लेख 'ओसामाजी' असे करणाऱ्या दिग्विजय सिंग यांनी केल्याचेही देशाने पाहिले. रामदेव बाबांच्या आंदोलनाला सक्रीय पाठिंबा द्यायचा किंवा नाही याबद्दल अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे आणि पोलीस कारवाईनंतर अण्णा हे बाबांच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसले. साध्वी ऋतंभरा यांच्या रामलीला मैदानावरील उपस्थितीला आक्षेप घेण्यात आला. सर्व पंथ संप्रादायाचे धार्मिक नेते रामदेव बाबांच्या समर्थनार्थ रामलीला मैदानावर आले. शाहरूख, सलमानसारखे नट उत्स्फूर्तपणे बाबांच्या विरोधात समोर आल्याचेही दिसले. कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मौन आणि शेवटी रामदेव बाबा यांनी त्यांच्यावर केलेला आरोप असा घटनाक्रम समोर आला.

स्वीस बँक आणि अन्य ठिकाणी भारतीय नेत्यांनी प्रचंड काळा पैसा दडवला आहे. त्या पैशाला राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावी यासाठी स्वामी रामदेव यांनी देशात सुमारे 1 लाख किलोमीटरचा प्रवास केला. गेल्या दोन वर्षात जागतिक स्तरावर निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती आणि स्वीस बँकेच्या नव्या भूमिकेमुळे भारतीयांचा काळा पैसा भारताला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अशा मोक्याच्या वेळी रामदेव बाबा यांनी आंदोलन हाती घेतल्याने लोकांच्या मनात एक आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे साधारण जनमानस रामदेव बाबा यांच्या मागे आहे. अशा वेळी आश्चर्यकारकपणे माध्यमांत प्रभावी असणारा एक गट रामदेव बाबा यांनी फक्त योगच शिकवावे, त्यांनी राजकारणात उतरू नये असा सूर लावताना दिसतो आहे. शेवटी सोनिया गांधी यांच्यावर बाबा यांनी आरोप केल्याने 'पहा बाबांच्या मागे संघ परिवार आहे' हे आतातरी सिद्ध झाले की नाही असाही सूर उमटत आहे.



गेल्या दोन तीन वर्षातील घटना पाहा. सुरूवातीला 2 जी स्पेक्ट्रममध्ये घोटाळा नाहीच, अशी भूमिका कांग्रेसने घेतली. सर्वोच्च न्यायालयाने फटकारून हस्तक्षेप केल्यानंतर मग कुठे कारवाई होताना दिसते. राष्ट्रकुल घोटाळ्याचेही असेच झाले. आता काळ्या पैशाचा मुद्दयावर सरकारने रामदेव बाबांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला. समिती वगैरे नेमून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. बाबा बधले नाहीत तेव्हा बलप्रयोग करण्याशिवाय कांग्रेसपुढे पर्यायच राहिला नाही. कपिल सिब्बल किंवा दिग्विजय सिंग हे प्यादे आहेत, याची रामदेव बाबांना पूर्ण कल्पना आहे. सोनिया गांधी यांचे नाव येते तेव्हा भले भले पत्रकारही मौन धारण करतात. भारताचे माजी गुप्तचर प्रमुख अजित दोवल यांच्या नेतृत्त्वाखालील टास्क फोर्सने काळ्या पैशावर प्रकाशित केलेल्या शोध अहवालात संशयाची सुई सोनिया गांधी यांच्याकडे जाताना दिसते. त्या अहवालाला रामदेव बाबांच्या ताज्या आरोपामुळे बळ मिळणार आहे. आता विषय सोनिया गांधींपर्यंत आल्यानंतर ते येथेच थांबेल, अशीच अधिक शक्यता आहे. रामदेव बाबांसारख्या केवळ 45 वर्षीय योग्याला राजकारणाची ही दलदल कितपत झेपेल, हे काळच ठरवेल. त्यासाठी काही काळ प्रतिक्षा मात्र करावी लागणार आहे.



राष्ट्रपुनरुत्थानाच्या युद्धात रामदेव बाबा विजयी योद्धा संन्याशी म्हणून आर्य चाणक्यासारखे उदय पावतील की हुतात्म्यांच्या मालिकेतील एक तेजस्वी योगी म्हणून इतिहासाच्या पुस्तकात राहतील हे आजच्या घडीला सांगणे खूप अवघड आहे. जनता जनार्धनाचा कल काय राहील यावरच हे अवलंबून असेल कारण लोकशाहीमध्ये जनतेच्या लायकीनुसारच त्यांना राज्यकर्ते मिळतात हे त्रिकालबाधित सत्य आहे. जनतेचे मन संस्कारित करण्याचे ऐतिहासिक कार्य केल्यासाठी मात्र ते सदैव लोकांच्या स्मरणात राहतील, हे निश्चित.



आपले मत

तुम्हाला काय वाटते... काळा पैसा देशात आणण्यात रामदेव बाबांना यश येईल ? आन्दोलन विरून जाईल की ...? तुमचे मत अवश्य मांडा.

1 comment:

  1. काळा पैसा देशात आणण्यात रामदेवबाबांना यश येईल की ...? हे आताच सांगता येणार नाही.

    पण आण्णा हजारेंच उपोषण आणि आता त्या पाठोपाठ रामदेवबाबांचं उपोषण. या दोन्ही उपोषणाला जनतेचा मिळालेला उस्फूर्त प्रतिसाद. हे सारं पहाता ही क्रांतीची नांदी आहे. एका उपोषण मागून लगेच दुसरं उपोषण उभं राहिलं म्हणुनच सरकारनं हा पायंडा मोडायला पाहिजे म्हणून हे उपोषण चिरडून टाकण्याचा प्रयत्न चालवला आहे.

    पण एक ना एक दिवस असा नक्की येईल कि जसा इंग्रजांना येथून पाल काढावा लागला तसा या पुढार्यांनाही सत्तेवरून पायउतार होऊन पळ काढावा लागेल.

    ReplyDelete

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी