Sunday, September 4, 2011

शिक्षक दिन विशेष - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे तीन प्रश्न

आपण जेव्हा आपल्या स्वभावानुसार कार्य करतो तेव्हा थोडेसे यशदेखील समाधान देऊन जाते, परंतु जेव्हा आपण आपल्या स्वभावाच्या विपरित कार्य करू लागतो तेव्हा उच्चतम सफलता मिळाली तरीसुद्धा जीवनात एक पोकळी जाणवत राहते. हीच गोष्ट राष्ट्राच्या बाबतीतही सत्य आहे. आधुनिक शिक्षणाने आम्हाला रोजगार, विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यापाराच्या क्षेत्रात मोठी सफलता प्रदान केली आहे. परंतु  गुणवत्तेच्या स्तरावर भारतात प्रचंड विषमता दिसून येते. एकीकडे राष्ट्रीय संस्थान (आय.आय.टी., आय.आय.एम.) आहेत. येथे जगातील सर्वोच्च संस्थांच्या तोडीचे शिक्षण मिळते. दुसरीकडे सर्वत्र पावसाळ्यातील भूछत्राप्रमाणे उगवलेल्या खाजगी शिक्षणसंस्थांमध्ये शिकलेले अभियंते आणि अन्य पदव्या घेतलेले तरुण दिसतात. आपल्या विषयातील अगदी किरकोळ ज्ञानही यांच्यामध्ये नसल्याचे आढळून येते. योग्यतेतली ही दरी निराशेचे एक कारण आहे, परंतु अधिक सूक्ष्म स्तरावर जाऊन पाहिले तर या पोकळीमागील कारण आहे, आमचे आपल्या मुळांपासून उखडले जाणे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या तत्त्वाज्ञानातून याकडे लक्ष वेधल्याचे दिसते.
गांधीजींचे शिष्य आणि विख्यात संशोधक डॉ. धरमपाल यांनी आपल्या संशोधनाने सिद्ध केलेआहे की, ब्रिटीशपूर्व शिक्षण वैज्ञानिक पद्धतीचे, चारित्र्य निर्माणात प्रखर आणि अत्यंत प्रभावी होते. साऱ्या देशात सुलभपणे उपलब्ध असणारे हे शिक्षण होते. त्यांनी 1823 मध्ये इंग्रजांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे सांगितले आहे की, (ज्यांना आज आपण वंचित किंवा दलित म्हणतो त्यांच्यासहित) शिक्षक आणि शिष्य लाखो शाळा आणि विद्यापीठांमधून शिकत होते. सारा देशच साक्षर होता. शिक्षणपद्धतीदेखील वैज्ञानिक होती, ज्ञानाला अंतःकरणापासून प्रकाशित करणारे प्रशिक्षण मिळत होते. आजच्या पद्धतीनुसार "माहितीची' देवाण-घेवाण एवढ्यापुरतेच ज्ञानदान मर्यादित नव्हते.
आमच्या परंपरेनुसार गुरू म्हणजे असा की, जो आपल्या शिष्याची योग्य पद्धतीने जडणघडण होण्यासाठी आईप्रमाणे कष्ट करतो, शिष्याचे संपूर्ण दायित्व गुरू ग्रहण करतो. शिष्याच्या चित्ताच्या गुणधर्मितेनुसार प्राणाची प्रतिष्ठा करून गुरू त्याला मार्ग दाखवितो. इतकेच नाही तर गुरू त्याच्यासोबत त्या मार्गावरून चालतोदेखील. आवश्यकता पडली तर गुरू शिष्याचे बोट धरेल, कडेवरही उचलून घेईल. ठाकूर श्रीरामकृष्ण परमहंस यांनी आपल्या शिष्यांसोबत असेच केल्याचे दिसते. कुणाला केवळ मार्ग सांगून स्वतःच्या भरवशावर सोडून दिले. कुणाला बोट पकडून मार्ग दाखविला.
आध्यात्मिक क्षेत्रात ही परंपरा जिवंत असल्याचे दिसते. काही अपवाद सोडले तर आज देखील अधिकांश पारंपरिक आचार्य शास्त्रीय विधीचा अवलंब करीत असल्याचे दिसतात, परंतु अपरा विद्येच्या क्षेत्रात ही परंपरा लोप पावली आहे. जीवनात आलेल्या पोकळीचे, निराशेचे हेच मुख्य कारण आहे. शिक्षणाची ही वैज्ञानिक पद्धती पुनजीर्वित करण्यात आली तर अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि अन्य गोष्टी बदलल्या नाहीत तरी चालू शकेल. मुख्य गोष्ट तर "गुरू'ची आहे. शिक्षणसेवकांना शिक्षक बनविल्यानंतर गुरू बनण्याचे प्रशिक्षण प्रदान करणे हाच यावरील एकमेव उपाय आहे. शिक्षणाला केवळ "रोजी-रोटी'चे साधन मानून शिक्षणाच्या बाजारीकरणाची स्पर्धा सुरू आहे. या "स्थितीत गुरु-शिष्य' ही वैज्ञानिक परंपरा पुनःस्थापित करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे म्हणूनच कुणाशीही संवाद करताना पुढील तीन प्रश्नांच्या अनुरोधाने करत. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?
शिक्षणाच्या क्षेत्रात चारित्र्य निर्माणाची न्यूनता भरून काढण्यासाठी आपापल्या स्तरावर विनम्र प्रयत्न सुरू करणे, हीच शिक्षक दिनानिमित्ताने त्यांना आदरांजली ठरेल.

पूर्ण लेख वाचण्यासाठी क्लिक करा...
शिक्षक दिन विशेष - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे तीन प्रश्न

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी