Tuesday, November 8, 2011

चाणक्य नीती 13 : मूर्खपणा आणि जवानीपेक्षाही घातक आहे ही गोष्ट

कष्ट, दु:ख, अडचणी या सतत येत असतात. या प्रकारच्या काही गोष्टींवर आपले काहीही नियंत्रण नसते तर काही गोष्टी मात्र आपल्या कर्मानेच उत्पन्न होत असतात. आपण जाणते-अजाणतेपणी अशी काही कामे करतो की भविष्यात ती कामे आपल्यासमोर अडचणी बनून येतात. यासंदर्भात आचार्य चाणक्य म्हणतात...

कष्टं च खलु मूर्खत्वं कष्टं च खलु यौवनम्।
कष्टात् कष्टतरं चैव परगेहे निवासनम्।।
श्लोकाचा अर्थ : पहिले कष्ट किंवा अडचण आहे मूर्ख असणे, दुसरी अडचण आहे जवानी किंवा तारुण्य. आणि या दोन्ही अडचणींपेक्षा अधिक गंभीर अडचण आहे दुस-यांच्या घरी राहाणे.
आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वात मोठी दु:खाची गोष्ट आहे मूर्ख असणे. एखादा माणूस मूर्ख असेल तर त्याला जीवनात कधीही सुख मिळणे शक्य नाही. त्याला जीवनात पावलो पावली दु:ख आणि अपमान सहन करत जगावे लागते. बुद्धीअभावी माणूस कधीही उन्नती करू शकत नाही.
दुसरी अडचण आहे जवानी किंवा तारुण्य. तारुण्यही दु:खदायी होऊ शकते. कारण या वयात माणसात अत्याधिक जोश असते आणि क्रोधही असतो. तारुण्यात हा जोश योग्य मार्गी लागला तर जीवनात उत्तुंग शिखर गाठता येते. मात्र दिशा चुकली तर जीवन दु:खमय बनते.
मूर्खपणा आणि तारुण्य या दोन्हीही अवस्थांहून अधिक घातक अवस्था कोणती असेल तर ती दुस-यांच्या घरी राहाणे ही होय असे आचार्य सांगतात. एखादा माणूस परक्या घरात राहात असेल तर त्याच्यासमोर अडचणीच अडचणी असतात. दुस-यांच्या घरी राहिल्याने आपले स्वातंत्र्य नष्ट होते. अशा वेळी मनुष्य आपल्या मर्जीने काहीही करू शकत नाही. स्वातंत्र्य हरवून बसणे ही गोष्ट अधिक घातक असल्याचे आचार्यांना वाटते.
कोण आहे चाणक्य ?
असे मानले जाते की सर्वात आधी अखंड भारताची संकल्पना आचार्य चाणक्य यांनी मांडली होती. त्या काळात भारताला आर्यावर्त असे नाव होते. आर्य म्हणजे सुसंस्कृत. आर्यावर्त म्हणजे सुसंस्कृत लोकांचा देश. ( ब्रिटीशांनी आर्य बाहेरून आले असा चुकीचा तर्क मांडला. असे करून भारतीयांमध्ये फूट पाडायची त्यांची नीती होती. आता अलीकडच्या संशोधनातून ब्रिटीशांचा तो तर्क खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. आर्य नावाचे कुणी बाहेरून या देशात आलेच नव्हते. आर्य म्हणजे सुसंस्कृत. 'कृण्वन्तो विश्वम् आर्यं' साऱ्या जगाला सुसंस्कृत करू या.) तेव्हा भारताच्या सीमा खूप विस्तृत होत्या. त्या काळात म्हणजे सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी ख्रिश्चन, इस्लाम आदी धर्मांचा उदय झालेला नव्हता. भारतात छोटी छोटी गणराज्ये नांदत होती. अखंड भारतातील संस्कृती एक होती. भारत हे एक राष्ट्र होते, मात्र गणराज्ये अनेक होती. या सा-या गणराज्यांना जोडून राजकीय दृष्ट्या अखंड भारत निर्माण करण्याचे स्वप्न आचार्य चाणक्य यांनी पाहिले होते.
जेव्हा सम्राट सिकंदराने भारतावर आक्रमण केले तेव्हा आचार्य चाणक्य यांनी कूटनीतीने त्याला परत जाण्यास भाग पाडले. आचार्य चाणक्य यांच्यामुळेच सिकंदराला भारत जिंकता आले नाही. त्या काळी भारतातील सर्व गणराज्यांमध्ये सर्वाधिक शक्तीशाली गणराज्य होते मगध. मगधची राजधानी होती पाटलीपुत्र. या शहराला आता पाटना असे नाव आहे. ही नगरी आता बिहार या राज्याची राजधानी आहे. मगध गणराज्याच्या सम्राटाचे नाव धनानंद होते. तो राजा सदैव भोग विलासात लिप्त होता. प्रजेची त्याला काहीही काळजी नव्हती. तो अन्य छोट्या छोट्या गणराज्यांकडून मनमानी पद्धतीने कर वसूल करायचा. आचार्य चाणक्य यांनी मगध सम्राटाला सावध करण्याचा प्रयत्न केला मात्र काहीही उपयोग झाला नाही.
साधारण शिक्षक असलेल्या चाणक्य यांच्यासमोर संपूर्ण भारताच्या भवितव्याची चिंता होती. म्हणून त्यांनी एका सामान्य बालकास तक्षशीला विद्यापीठात शिक्षण दिले. तोच बालक पुढे महान योद्धा चंद्रगुप्त मौर्य बनला. चंद्रगुप्ताने धनानंद याचे कुशासन मोडून काढले आणि अखंड भारताची स्थापना केली.
काय आहे चाणक्य नीती ?
चाणक्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. जगभर आजही चाणक्यनीतीकडे कुतूहलाने आणि आदराने पाहिले जाते. आचार्य चाणक्य हे तक्षशीलेच्या गुरुकुलात अर्थशास्त्राचे आचार्य होते. राजनीती आणि कूटनीतीतही त्यांनी प्रचंड कार्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. त्यात नीतीशास्त्रावरील ग्रंथाचाही समावेश आहे. नीतीशास्त्रावरील ग्रंथ म्हणजेच चाणक्य नीती. जीवनात यशस्वी कसे व्हावे याविषयी खासकरून यात मार्गदर्शन आहे. याशिवाय चाणक्यांनी लिहिलेला अर्थशास्त्रावरील ग्रंथही प्रसिद्ध आहे. कौटिल्याचे अर्थशास्त्र हा ग्रंथ आजही अभ्यासला जातो.

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी