Tuesday, September 18, 2012

चर्चचे वास्तव

चर्चचे वास्तव-१

सेवाभावाच्या नावाने धर्मपरिवर्तनाचा कावेबाजपणा

येशूच्या मागे निघालेलो आम्ही, पोपच्या मागे कधी लागलो कळलंच नाही...
अशी लोकनाथ यशवंत यांची कविता आहे.प्रभू येशूची दृष्टी आभाळाच्या बापाची होती. तो म्हणाला, ‘सेवा हाच धर्म’. पोपला मात्र आपलं साम्राज्य वाढवायचं होतं.धर्म म्हणून सेवा नव्हे तर धर्म वाढविण्याचं शस्त्र म्हणून सेवा... हे नवं सूत्र आलं. पोपने आणि त्यांच्या छत्रछायेखाली कार्य करणार्‍या चर्च आणि चर्चशी संलग्न विभिन्न संस्था-संघटनांनी आपली सत्ता वाढविण्यासाठी सत्तेचा कसा कावेबाज वापर चालवलाय् याचं दाहक वास्तव मांडणारी वृत्तमालिका तभात आजपासून...

http://www.tarunbharat.net/Encyc/2012/9/10/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5-1.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=&PageType=N

चारुदत्त कहू
नागपूर, १ सप्टेंबर
ख्रिश्‍चन धर्म म्हंटला की सेवाभाव, त्यागी वृत्ती, समाजसेवा आणि दीनदुबळे, अपंग, दलित, पीडित, मागासवर्गीयांप्रति, तसेच समाजातील दबलेल्या, पिचल्या गेलेल्या सर्व प्रकारच्या लोकांबद्दल सहानुभूतीची, कनवाळूपणाची भावना असलेली व्यक्ती, समूह किंवा एखादी संघटना एकमद डोळ्यापुढे उभी झाल्याशिवाय राहात नाही. मात्र, या सेवाभावामागे समर्पण, त्याग आणि सेवा करण्याची वृत्ती कमी आणि निरनिराळ्या धर्मातील, पंथातील आणि अठरापगड जातींच्या लोकांचे धर्मपरिवर्तन करणे हा प्रमुख उद्देश असल्याचा निष्कर्ष नुकताच एका अध्ययनात काढण्यात आला आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मिलिंद ओक यांनी ख्रिश्‍चन धर्म, या धर्मातील पंथ-उपपंथ, त्यांची जगातील आणि भारतातील लोकसंख्या, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था-संघटना, ख्रिश्‍चनांचे धार्मिक कार्य, त्याचा प्रचार-प्रसार, त्यांना मिळणार्‍या देशी आणि विदेशी देणग्या, या संस्थांमार्फत होणारे जमिनीच्या खेरदी-विक्रीचे व्यवहार, धर्मांतरणासाठी अवलंबिल्या जाणार्‍या पद्धती आदींचा सखोल अभ्यास करून काढलेले निष्कर्ष तमाम भारतीयांच्या डोळ्यात अंजन घालणारे आणि धमनिनरपेक्षतेचा टेंभा मिरवणार्‍या देशापुढे अनेक बिनीचे प्रश्‍न उपस्थित करणारे आहेत.
ख्रिश्‍चन धर्माच्या संदर्भात प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा तसेच देशात आणि देशाबाहेर सुरू असलेल्या घडामोडींचा अभ्यास करून तभानेही एक वस्तुनिष्ठ दस्तावेज तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. या अभ्यासाच्या निमित्ताने लोकांच्या मनात निरनिराळे प्रश्‍न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाहीत.
आश्‍चर्याची बाब म्हणजे गेल्या दीडशे वर्षांतील राजकीय संभाषणांमध्ये संघटित धर्म आणि मानवी जीवनातील त्याच्या भूमिकेवरून समीक्षात्मक चर्चा झाल्याचे कुठेच आढळत नाही. मार्क्सवादी विचारसरणी आणि राजकीय चळवळीने नेहेमीच धर्म ही अफूची गोळी असल्याची संभावना केलेली आहे. धर्मामध्ये व्यक्ती अथवा समूहाच्या मनावर आणि वर्तनावर प्रभाव टाकण्याची ताकद असते हा निर्हेतुक निष्कर्षदेखील या तुलनात्मकतेमुळे निश्‍चितपणे नाकारला गेला. धर्माचा मानवी जीवनावर कसा प्रभाव पडतो, या संदर्भातील ऐतिहासिक पुरावे बरेच देता येऊ शकतात. १९४७ मधेे धर्माच्या आधारावर झालेले भारताचे विभाजन, पूर्व तिमोरमधील राजकीय अस्थिरता, शीतयुद्धापूर्वीचा नागरी संघर्ष, युगोस्लाव्हियाचे विभाजन आणि नुकतेच धार्मिक आधारावर झालेले सुदानचे विभाजन, अशा समकालीन घटनांची आधुनिक जगाच्या इतिहासात वानवा नाही. त्यामुळेच ऐतिहासिक आणि समकालीन घटनांचा अभ्यास केल्यास धर्माचे केवळ सामाजिक आणि राजकीय परिणामच झालेले जाणवत नाहीत, तर धर्म हा भौगोलिक बदल घडवून आणणारा महत्वाचा घटकही ठरतो, हेदेखील सिद्ध होते.
पाश्‍चिमात्त्य जगात विशेषतः अमेरिका, युरोप, ओशियाना आणि आफ्रिकेच्या बर्‍याच मोठ्या भागात ख्रिश्‍चन धर्माचे पालन केले जाते. या धर्माचा इतिहास नेहेमीच पाश्‍चिमात्य साम्राज्यवादाशी आणि वसाहतवादाशी जोडला जातो. वसाहतवादानंतरच्या काळात अनेक राष्ट्रांनी आणि समुदायांनी स्वतःच्या विकासासाठी, भविष्यासाठी संघर्ष केला. त्याचवेळी ख्रिश्‍चन धर्म तेथे आपली पावले बळकट करण्याच्या कामात व्यस्त होता. मानवसेवा, रुग्णसेवा, समाजसेवेच्या नावाखाली गरजू व्यक्ती, समूह आणि संघटनांच्या गळी क्रूसनीती उतरविली जात होती. पण खेदाची बाब म्हणजे धर्मपरिवर्तनवाद्यांना त्यांचा कावेबाज अजेंडा कधीच राबवता आला नाही. आणि हीच खंत त्यांच्या पूर्वाश्रमीच्या वसाहतवादी हृदयात कायमची कोरली गेली आहे. (क्रमशः)

  

धर्ममार्तंडांना डावलू न शकणारी धर्माची घट्ट वीण

चारुदत्त कहू
नागपूर, २ सप्टेंबर
अगदी जवळून ख्रिश्‍चन धर्माचा अभ्यास केला असता या धर्माची वीण अतिशय घट्ट असल्याचे जाणवते. इस्लाममध्ये जसे शुक्रवारच्या नमाजाचे महत्त्व आहे,अगदी त्याच धर्तीवर ख्रिश्‍चन समाजात रविवारचे महत्त्व आहे. शुक्रवारच्या दिवशी नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव काळ-वेळेची चिंता न करता चादर अंथरून अगदी कार्यालयात आणि सार्वजनिक जागांवरही नमाज अदा केल्याशिवाय राहात नाहीत,त्याचप्रमाणे कुठलाही कडवा ख्रिश्‍चन अनुयायी रविवारच्या दिवशी चर्चमध्ये जाऊन माता मेरी आणि येशू ख्रिस्तापुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. भारतीय समाजात, राष्ट्रात बाहेरून आलेल्या, तेथेच विकसित झालेल्या ख्रिस्ती धार्मिक शक्तींचा प्रभाव आणि ज्या ठिकाणी हा धर्म रुजला तेथील संस्कृती जाणून घेणे आणि त्याचा ऊहापोह करणे म्हणूनच आवश्यक ठरते.
पोप जॉन पॉल द्वितीय १९९९ मध्ये भारतात आले असता त्यांनी दिलेला संदेश, त्यांची प्रार्थना आणि त्यांनी व्यक्त केलेली आशा, यांचा गर्भितार्थ अगदी स्पष्ट होता.काय म्हणाले होते पोप जॉन पॉल द्वितीय? ते म्हणाले, आपण पहिल्या सहस्रकात युरोपच्या धरतीवर क्रूस रोवला.त्यानंतरच्या सहस्रकात आपण अमेरिका आणि आफ्रिकेत क्रूस पोहोचवला. आता तिसर्‍या ख्रिश्‍चन सहस्रकात विश्‍वासाचे मोठे पीक या विस्तारित आणि महत्त्वाच्या आशिया खंडात, विशेषत: भारतात उगवेल, अशी प्रार्थना आपण नक्कीच करू शकतो. आपल्या अनुयायांपुढे पोप यांनी केलेल्या कळकळीच्या आवाहनावर, हा राजरोस धर्मांतराचा प्रकार असल्याची टीका झाली. मात्र, आश्‍चर्याची बाब म्हणजे त्यांच्या आवाहनाचा मथितार्थ,येत्या सहस्रकात आशिया खंडावर धार्मिक हल्ला करण्याची योजना असल्याचे फारच थोड्यांच्या ध्यानात आले.
ख्रिश्‍चन धर्मगुरूंच्या गादीला २००० वर्षांचा इतिहास आहे. हिंदुत्वात मात्र हजारो वर्षांपासून देव-देवता अथवा अवतारी पुरुष जनमानसाला आंदोलित करत आले आहेत, त्यांच्यावर प्रभाव टाकत आले आहेत, संस्कारांची गंगा प्रवाहित करत आले आहेत. तथापि, ख्रिश्‍चन धर्मगुरूंचे साम्राज्य ही एक संस्था आहे. ख्रिश्‍चन धर्मगुरू स्वधर्माचा विकास आणि स्वजातीयांचे पुनरुत्थान तर करतातच, पण संस्थात्मक पद्धतीने परधर्मीयांचे (हिंदू, इस्लाम, बौद्ध, जैन, शीख, पारशी) ख्रिश्‍चन धर्मात परिवर्तन करण्याचे कामही हिरिरीने करतात. हिंदू धर्मातही धर्मोपदेशक ही संकल्पना आहे. तथापि, या धर्मातील पुजारी, पंडित अथा ब्राह्मण, भक्त आणि ईश्‍वर यांच्यातील दूवा म्हणूनच कार्य करीत असतो. त्यांच्या माध्यमातून ३३ कोटी देवतांपैकी विशिष्ट देवतेला प्रसन्न करण्यासाठी भक्त निरनिराळ्या पूजा पद्धतींचा अवलंब करीत असतात. त्यात धर्मपरिवर्तनाचा छुपा हेतू नसतो. प्रत्येक भक्त आपापल्या मर्जीप्रमाणे योग्य ती दक्षिणा देऊ शकतो किंवा पुजारी, पंडित अथवा ब्राह्मणाला हवी ती दक्षिणा मागण्याचा अधिकार आहे. पण, या दोन्ही गोष्टी परस्परांच्या संमतीशिवाय शक्य नसतात. एखादी व्यक्ती पुजारी, पंडित अथवा ब्राह्मणाला नकार देऊन स्वत:च पूजा-अर्चा करून देवदेवतांना प्रसन्न करून घेऊ शकते. पण, विशिष्ट दिवशी अथवा विशिष्ट वारी एखाद्या मंदिरात उपस्थिती दर्शविलीच पाहिजे, असे कुठलेही बंधन हिंदू धर्मातील ना आस्तिक व्यक्तींवर आहे ना नास्तिक अनुयायांवर. ख्रिश्‍चन धर्माचे काम मात्र एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे चालते. बिशपच्या अधिपत्त्यात अनेक सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील संस्था कार्य करतात. खरोखरीच या संस्थांचे संचालक, प्राचार्य, व्यवस्थापकीय संचालक, अधीक्षक अथवा इतर कुठले पदाधिकारी बिशपला डावलून महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेऊ शकतात का, हा प्रश्‍न त्यांनीच आपल्या मनाला विचारून पाहावा. धर्मगुरूंमार्फत मोठ्या प्रमाणात या संस्थांना देशी-विदेशी देणग्या मिळत असल्याने, या संस्थांच्या पदाधिकार्‍यांना प्रशासकीय निर्णयात काही स्थान आहे का, हा देखील शोधाचाच विषय आहे. या संस्थांना मिळणार्‍या मोठ्या निधीचा रियल इस्टेटच्या माध्यमातून होणारा दुरुपयोग थांबवण्यात हे पदाधिकारी सक्षम आहेत का, हा देखील कळीचा मुद्दा आहे. या सार्‍यांची चर्चा या वृत्तमालिकेत करण्यात येणार आहे.
(क्रमश:)

क्रिप्टो ख्रिश्‍चनांची लोकसंख्या वेगाने वाढतेय्

चर्चचे वास्तव-३

चारुदत्त कहू
नागपूर, ३ सप्टेंबर
भारतीय लोकसंख्येतील कुठल्याही धर्माचे, पंथाचे, जातींचे अथवा उपजातींचे प्रमाण जाणून घ्यायचे असेल, तर जनगणनेतील आकडेवारीचा आधार अधिकृत समजला जातो. पण, ख्रिश्‍चनांची त्यांची लोकसंख्या जाणून घेण्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक स्वतंत्र यंत्रणा आहे. त्या आकडेवारीनुसार ख्रिश्‍चनांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिप्टो ख्रिश्‍चनांचा समावेश आहे. ख्रिश्‍चन धर्माचे जे अनुयायी स्वतःला अधिकृत रीत्या ख्रिश्‍चन म्हणून घोषित करीत नाहीत किंवा स्वतःचा सरकारी दस्तावेजांमध्ये ख्रिश्‍चन म्हणून उल्लेख करीत नाहीत, अशा लोकांना क्रिप्टो ख्रिश्‍चन म्हणून संबोधले जाते. अशा लोकांची भारतातील लोकसंख्या किमान ४० लाखांच्या घरात असून ही लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. याच लोकांच्या मदतीने धर्मांतराचे काम वेगाने पुढे जात आहे.
जनगणनेनुसार लोकसंख्येचे चित्र
२००१ च्या जनगणनेनुसार भारतात २४.१ दशलक्ष ख्रिश्‍चन बांधव असून, हे प्रमाण भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत २.३ टक्के आहे. केरळमध्ये ख्रिश्‍चनांची लोकसंख्या २५.१५ टक्के, तामिळनाडूत १५.७१, कर्नाटकात ४.१९ तर आंध्रप्रदेशातील ४.९ टक्के नागरिक ख्रिश्‍चन आहेत. या चार राज्यांतील ख्रिश्‍चनांची गोळाबेरीज देशातील एकूण ख्रिश्‍चन लोकसंख्येच्या ५४.३४ टक्के येते. ईशान्येकडील आसाम, नागालॅण्ड, मिझोराम आणि मणिपूर या राज्यांमधील ख्रिश्‍चनांची एकूण लोकसंख्या २९.०९ टक्के आहे. गोव्यातील ख्रिश्‍चनांची लोकसंख्या २६.६८ आहे. इतर राज्यांमध्ये ख्रिश्‍चनांचे प्रणाम या तुलनेत फार कमी आहे. गुजरातमध्ये फक्त ०.५६ टक्के ख्रिश्‍चन असून हरयाणा आणि हिमाचल प्रदेशात प्रत्येकी ०.१३ टक्के लोक ख्रिश्‍चन आहेत. प्रत्यक्षात आकड्यांचा विचार करता ख्रिश्‍चनांची लोकसंख्या फार मोठी आहे. पश्‍चिम बंगालमध्ये ०.६४ टक्के नागरिक ख्रिश्‍चन आहेत. ही लोकसंख्या ५ लाखांच्या घरात जाते. या आकडेवारीकडे पाहता दक्षिण भारत, ईशान्य भारत आणि मध्य भारतातील छोटा नागपूर आदी परिसरातील वनवासी पट्‌ट्यात भारतातील ख्रिश्‍चन समाज एकवटलेला दिसतो. भारतातील ४० टक्के लोक उत्तरेतील हिंदी भाषिक प्रदेशात रहिवासाला असून, या प्रदेशात भारतातील एकूण ख्रिश्‍चन लोकसंख्येच्या १० टक्के ख्रिश्‍चन रहिवासाला आहेत.
जागतिक ख्रिश्‍चन संस्थांचे अंदाज
ऑपरेशन वर्ल्ड या संस्थेनुसार भारतातील ख्रिश्‍चनांचे कॅथॉलिक, प्रोटेस्टंट, ऑर्थोडॉक्स आणि स्वतंत्र असे चार गट करता येतात. २००१ मध्ये भारतात २९.२ टक्के कॅथॉलिक्स, ३९ टक्के प्रोटेस्टंट, ३.८ ऑर्थोडॉक्स आणि २७.६ टक्के स्वतंत्र ख्रिश्‍चन नागरिक होते. कॅथॉलिक चर्च हा लॅटिन, सायरो मालाबार आणि सायरो मालानकारा या तीन चर्चेसचा समूह आहे. प्रोटेस्टंटांमध्ये दोन प्राथमिक प्रवाह आढळतात. मुख्य प्रवाहातील चर्च (चर्च ऑफ नॉर्थ इंडिया, द चर्च ऑफ साऊथ इंडिया, द युनायटेड इव्हेंजेलिकल चर्च आणि द मेथॉडिस्ट चर्च ऑफ इंडिया) आणि द इव्हँजेलिकल किंवा करिश्मॅटिक चर्च हे ते दोन प्रवाह आहेत. बॅप्टिस्ट, सेवन्थ डे ऍडव्हेंटिस्ट, मेथॉडिस्ट, इव्हँजेलिकल लुथरान आणि विविध भारतीय संदर्भ असलेल्या चर्चना तीनपैकी कुठल्यातरी एका वर्गवारीत टाकता येत असले, तरी ही सारी चर्चेस स्वतंत्रपणे काम करणारी आहेत. त्यांच्या अनुयायांची ते स्वतंत्रपणे गणनादेखील करीत असतात. २००१ च्या जनगणनेनुसार ख्रिश्‍चनांची लोकसंख्या २.३ टक्के असली, तरी अनेक ख्रिश्‍चन नेते त्यांची लोकसख्या ४ टक्के अथवा त्यापेक्षाही अधिक असल्याचा दावा करतात. धर्म जाहीर न करण्याची गुप्तता पाळणार्‍या खिश्‍चनांसह एकूण खिश्‍चनांची गोळाबेरीज केली असता भारतातील ख्रिस्तानुयायांचा आकडा ४.५ कोटींवर जातो.
ख्रिश्‍चन उपपंथांचे दावे
ख्रिश्‍चनांमध्ये अतिशय सूत्रबद्ध आणि संघटित पद्धतीने काम करणारे चर्च म्हणून सर्वात प्राचीन अशा रोमन कॅथॉलिक चर्चची ओळख आहे. या चर्चच्या ऍनिरिओ पॉन्टिफिशिओ या वार्षिक पुस्तिकेनुसार २०१२ पर्यंत भारतातील कॅथॉलिक मतानुयांची संख्या १ कोटी ६५ लाख ५७ हजार ६२७ आहे. अनेक चर्चेस दोन-दोन जागतिक चर्चेशशी संलग्न असल्याने अनेकदा ख्रिश्‍चन संघटनांतर्फे लोकसंख्येबाबत केलेल्या दाव्यात तफावत आढळते, हा अनुभव आहे. बॅप्टिस्ट वर्ल्ड अलायन्सचा भारतात त्यांचे २.५ दशलक्ष समर्थक असल्याचा दावा आहे. या अलायन्सशी भारतातील २३ बॅप्टिस्ट संघटना संलग्न आहेत. सेवन्थ डे ऍडव्हेंटिस्टचा २०१० पर्यंत त्यांचे १.५ दशलक्ष सदस्य असल्याचा दावा आहे. युनायटेड इव्हेंजेलिकल लुथरान चर्च त्यांची ४.५ दशलक्ष सदस्यसंख्या असल्याचा दावा करते. असोसिएशन ऑफ इंटरडिपेंडंट चर्चेस या संघटनेचा त्यांचे २० हजार चर्चेस सदस्य असल्याचा दावा आहे. याचा विचार करता ऑपरेशन वर्ल्डने काढलेल्या आकडेवारीनुसार भारतातील २७ टक्के ख्रिश्‍चन स्वतंत्र असून त्यांची लोकसंख्या १ कोटी ५२ लाख आहे. ख्रिश्‍चनांच्या लोकसंख्येतील टक्केवारीबद्दल निरनिराळी आकडेवारी पुढे येत आहे, याचे मूळ कारण क्रिप्टो ख्रिश्‍चनांची उपस्थिती हे आहे. (क्रमशः) (उद्याच्या अंकात गरिबांना हेरून त्यांचे क्रूसीकरण करणार्‍या वर्ल्ड व्हिजनबाबत)
---

चर्चचे वास्तव-४

गरिबांच्या क्रूसीकरणाचा वर्ल्ड व्हिजनचा घाट

चारुदत्त कहू
नागपूर, ४ सप्टेंबर
ख्रिश्‍चन धार्मिक संघटनांची वर्गवारी चार प्रकारात केली जाऊ शकते. पहिल्या वर्गवारीत प्रत्यक्ष चर्च, त्याचे पदाधिकारी आणि चर्चचे कर्मचारी यांचा समावेश करता येईल. दुसर्‍या वर्गवारीनुसार चर्चद्वारे चालविल्या जाणार्‍या धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक संस्था आणि त्या कामासाठी आवश्यक असलेल्या संस्थांची निर्मिती. या वर्गवारीत बिशपच्या अधिकारक्षेत्रातील सेवा मंडळे तसेच शैक्षणिक आणि आरोग्यसंस्थांचा समावेश केला जाऊ शकतो. विभिन्न सामाजिक कामांसाठी स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलेल्या संस्थांचा तिसर्‍या वर्गवारीत समावेश केला जाऊ शकतो. प्रत्यक्षात या संस्था कुठल्या ना कुठल्या मतावलंबींच्या निर्देशानुसार काम करीत असतात. कासा (kasa) आणि कॅरिटास इंडिया
(CARITAS INDIA) या दोन संस्थांचा त्या वर्गवारीत समावेश केला जाऊ शकतो. चवथ्या वर्गवारीत ख्रिश्‍चन लोकांनी स्वतंत्रपणे स्थापन केलेल्या संस्था, संघटनांचा समावेश करता येईल. यात वर्ल्ड व्हिजन आणि ऍक्शन एड यासारख्या संस्थांचा समावेश करता येईल.
चर्चचे जाळे इतके घट्टपणे विणले गेले आहे की, या नेटवर्कच्या माध्यमातून या सार्‍या संस्था—संघटनांचा एकमेकांशी नियमित आणि सूत्रबद्ध पद्धतीने संवाद सुरू असतो. क्रिप्टो ख्रिश्‍चनांचे योगदानही यात महत्त्वाचे असते.
वर्ल्ड व्हिजन काय आहे?
वर्ल्ड व्हिजन या संस्थेची स्थापना १९७७ साली वॉल्टर मुन्याहेम यांनी केली. ख्रिश्‍चनांची ही सर्वधर्म परिवर्तन करणार्‍या संस्थांची शिखर संस्था असून शिक्षण, दान आणि प्रगतीच्या माध्यमातून या संस्थेचे धर्मांतराचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. २००८ मध्ये या संस्थेला अडीच बिलियन डॉलर्सच्या देणग्या मिळाल्या. बायबल हा जगात एकमेव महत्त्वाचा ग्रंथ असून आमचा केवळ त्यावरच विश्‍वास आहे, असे या संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांमधील प्रमुख तत्त्व आहे.
समाजातील नेतृत्वगुण असलेले लोक शोधून काढणे आणि त्यांना ख्रिस्ती नेतृत्व म्हणून पुढे आणण्यासाठी ही संस्था झटते. त्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, कार्यशाळा आदींचा अवलंब केला जातो. त्यासाठी या व्यक्तींना संस्थेच्या खर्चाने विदेशवार्‍यादेखील घडविल्या जातात. सध्या भारतातील २ लाख २७ हजार १०८ मुलांना ही संस्था ख्रिस्ती तत्त्वज्ञानानुसार प्रशिक्षण देत आहे.
वर्ल्ड व्हिजनवर वेळोवेळी निरनिराळे आरोपही झाले आहेत. वर्ल्ड व्हिजन ही ख्रिस्ती मिशनरी कार्यासाठी जगभरातून सर्वांत जास्त पैसा भारतात आणणारी संस्था आहे. सेवेच्या नावाखाली निरनिराळ्या सरकारी, गैरसरकारी संस्था-संघटनांकडूनही ही संस्था मोठमोठ्या देणग्या गोळा करते. जे मूल वर्ल्ड व्हिजनच्या जाहिरातीत दाखवतात, त्या मुलाला तुम्ही दिलेल्या देणगीचे पैसे दिले जातीलच असे नाही. कारण त्यामुळे समाजात असंतुष्टता माजते असे ते मानतात. त्या ऐवजी सर्व पैसे एकत्र केले जातात व त्यातले काही योग्य त्या कारणासाठी योग्य त्याठिकाणी वापरल्याचे सांगितले जाते. मात्र या निधीत मोठे घोटाळे झाल्याचे नेहमीच कानावर येते.
स्वामी लक्षमणानंद यांची हत्या
वर्ल्ड व्हिजन ही संस्था हिंसक कार्यात गुंतल्याचेही आरोप झाले आहेत. ओरिसातील हिंदूंचे नेते स्वामी लक्ष्मणानंद यांची हत्या याच संस्थेच्या पुढाकारातून झाल्याचा आरोप केला गेला. स्वामी लक्ष्मणानंद यांनी, वर्ल्ड व्हिजन गोडीगुलाबीने, गरिबीचा गैरफायदा घेऊन तसेच पैशाच्या आमिषाने ख्रिस्ती धर्मांतर करते, असा आरोप केला होता. हे प्रकार थांबावे म्हणून ते प्रयत्नशील होते, मात्र त्यातच त्यांची हत्या झाली. ओडिशा राज्यातील कंधमाल येथे झालेली ख्रिस्ती-हिंदू वांशिक दंगल घडवल्याचाही या संस्थेवर आरोप केला जातो. २००४ मध्ये आलेल्या त्सुनामीच्या काळात पैसे आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी हिंदूंना मोठ्या प्रमाणात धर्मांतर करायला भाग पाडल्याचा आरोपही या संस्थेवर केला गेला. तसेच या काळात आलेल्या मोठमोठ्या देणग्या या संस्थेने गुलदस्त्यात ठेवल्या असाही आरोप या संस्थेवर आहे.
भारतात सुमारे ४० ख्रिस्ती संस्थांना वर्ल्ड व्हिजन धर्मांतराच्या कार्यात मदत करते. भारतातील हजारो विद्यार्थ्यांना ही संस्था शिक्षण देत असली, तरी त्यांचे शिक्षण येशूच्या तत्त्वावर आधारित असते हे सांगण्याची गरज नाही. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात द विदर्भ लाईव्हलीहूड प्रमोशन प्रकल्प सुरू करण्यात आला होता. यानुसार अतिगरीब शेतकरी शोधून त्यांना योग्य ती मदत संस्थेच्या धर्मांतर तत्त्वांनुसार दिली जात होती. पण, हिंदू संघटनांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी उभारलेल्या योजनांमुळे या संस्थेला हे काम तीन वर्षांतच गुंडाळावे लागले. (क्रमशः) (उद्याच्या अंकात ख्रिस्ती संघटनांना मिळणार्‍या विदेशी देणग्यांबाबतची डोळे विस्फारून टाकणारी कोट्यवधींची आकडेवारी)
---

चर्चचे वास्तव-५

५ वर्षांत १६ हजार २१४ कोटींच्या विदेशी देणग्या

११३४ ख्रिस्ती संघटना मालामाल

कोट्यवधींच्या विदेशी देणग्या मिळणार्‍या वैदर्भीय संस्था
जनरल बोर्ड ऑफ चर्च ऑफ नाझरीन मिशन (अकोला) अमरावती रोमन कॅथॉलिक डायोसिझन ट्रस्ट (अमरावती) डायोसीस ऑफ चांदा सोसायटी (चंद्रपूर) दी नागपूर पॅलोटाईन सोसायटी (नागपूर) ईशकृपा सोसायटी ऑफ द पूअर सर्व्हंट (नागपूर) नागपूर आरसी डी कॉर्पोेरेशन प्रायव्हेट लिमिटेड (नागपूर) डॉमिनिशियन फादर्स नागपूर सोसायटी (नागपूर) नागपूर फ्रान्सालीयन कॉर्पोरेशन (नागपूर) इक्युमेनकल संगम (नागपूर)दीन सेवा सभा (नागपूर) मेडिकल सिस्टर्स ऑफ सेंट फ्रान्सिस ऑफ ऍस्सीसी (नागपूर) जीवनधारा सोसायटी ऑफ सेंट जोसेफ (नागपूर) एज्युकेशनल सोसायटी ऑफ द सिस्टर्स ऑफ पूअर सर्व्हंट्स ऑफ डिव्हाईन प्रॉव्हिडन्स (नागपूर) रुरल अपलिफ्ट सर्व्हिस असोसिएशन ऑफ इंडिया (नागपूर) भारतीय सेवक संगती (नागपूर) सेंट चार्ल्स एज्युकेशन सोसायटी (नागपूर) फ्री मेथॉडिस्ट मिशन इन इंडिया (यवतमाळ)
चारुदत्त कहू
नागपूर, ५ सप्टेंबर
जीवघेण्या स्पर्धेच्या युगात हिंदूंनी अथवा ख्रिश्‍चनेतरांनी स्थापन केलेल्या शंभरी गाठलेल्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक संस्थांना वर्षानुवर्षे कार्य करूनही अस्तित्वाचा लढा द्यावा लागत असताना ख्रिश्‍चनांच्या संस्था, संघटनांची मात्र वेगाने भरभराट झाल्याचे चित्र आहे. खिश्‍चन संस्थांच्या ‘वाढता वाढता वाढे...’ या समीकरणामागचे गौडबंगाल काय, याचा शोध घेतला असता विदेशातून मदतीच्या नावाने मिळत असलेला कोट्यवधींचा निधीच या संस्थांच्या गुटगुटीतपणाचे रहस्य असल्याचे स्पष्ट झाल्याशिवाय राहत नाही. कारगिलमध्ये थंडीने कुडकुडत देशासाठी रक्त सांडणार्‍या जवानांना लोकरी वस्त्र आणि साधे चामडी जोडे पुरवण्यासाठी देशाच्या संरक्षण मंत्रालयाला निधी अपुरा पडतो. स्वातंत्र्य मिळून ६४ वर्षे झाली, पण अजून देशातील प्रत्येक खेड्यात पाणीपुरवठा करणे शक्य झालेले नाही. अजूनही अनेक गावांमध्ये शौचालये नसल्याने उघड्यावर शौचास बसावे लागते. देशासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सेवा-सुविधांच्या क्षेत्रात काम करणार्‍या सरकारी संस्थांनाही निधीची कायम चणचण भासते, मात्र ख्रिश्‍चन स्वयंसेवी संस्था आणि त्या संघटनांचे पदाधिकारी सदासर्वकाळ शानशौकीत जीवन जगताना दिसतात. कोट्यवधी रुपयांच्या मिळणार्‍या विदेशी निधीच्या ठाकुरकीवर, भारतातीलच नव्हे, तर जगभरातील सर्वच गरजू देशांमधील कुठल्याही नैसर्गिक अथवा मानवनिर्मित संकटाचा ख्रिश्‍चन धर्मप्रसार आणि प्रचारासाठी कसा उपयोग होईल, याचीच त्यांना चिंता पडलेली असते.
भारतातील एकूण एक ख्रिश्‍चन संघटनांची विदेशी चर्चशी नाळ जुळलेली असून, आंतरराष्ट्रीय ख्रिश्‍चन संस्थांसोबत त्यांचे कार्य एखाद्या व्यावसायिक कंपनीसारखे भागीदारीतून चालते. भारतातील विभिन्न ख्रिश्‍चन संघटनांना विदेशी देणगी नियमन कायद्यांतर्गत (एफसीआरए- फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ऍक्ट) मिळणारे देणग्यांचे आकडे पाहिले तर सामान्यांचेच नव्हे, तर कोट्यधीश उद्योगपतींचे डोळेही गरगरल्याशिवाय राहणार नाहीत! वर्षाकाठी एक कोटीहून अधिक विदेशी निधी मिळणार्‍या ख्रिश्‍चन संघटनांची केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेली यादीच तभाच्या हाती लागली आहे. त्यानुसार वर्ष २००६ ते २०११ या पाच वर्षांच्या काळात भारतातील ११३४ ख्रिस्ती संघटनांना तब्बल १६ हजार २१४ कोटींच्या विदेशी देणग्या मिळाल्या आहेत. एफसीआरए अंतर्गत भारतातील एकूण ३ हजार १४ संघटनांना २००६ ते २०११ या कालावधीत एक कोटींहून अधिक रुपयांच्या विदेशी देणग्या मिळाल्या आहेत. फॉर्म एफसी-३ अंतर्गत धार्मिक कार्य करणार्‍या संस्थांना अशा देणग्या जाहीर कराव्या लागतात. यातील १००६ संस्थांनी त्यांची ख्रिस्ती धर्माशी संलग्नता जाहीर केलेली आहे. तथापि, वर्ल्ड व्हिजनसारख्या काही संघटना, ज्या ख्रिस्ती मानवतावादी संघटना म्हणून काम करतात, पण त्यांनी त्यांची संलग्नता ख्रिस्ती धर्माशी असल्याचे कुठेही नमूद केलेले नाही.
स्वतःला ख्रिस्ती संघटना म्हणून घोषित न केलेल्या, परंतु ख्रिस्ती असलेल्या एकूण १२८ संघटना भारतात कार्यरत आहेत. उदाहराणादाखल कॅरिटास इंडिया (CARITAS INDIA) आणि नागालॅण्ड जेस्युट एज्युकेशनल ऍण्ड चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांना ख्रिश्‍चन संघटना म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विदेशी देणग्यांचा हा आकडा आणखी वाढू शकतो. कारण अनेक संघटनांची, त्या ख्रिस्ती संघटना आहेत की नाहीत, याची ओळख पटू शकत नाही. एक कोटींहून अधिक रुपयांच्या विदेशी देणग्या मिळणार्‍या महाराष्ट्रातील ७२ ख्रिस्ती स्वयंसेवी संस्थांची यादी तभाजवळ उपलब्ध आहे. या सर्व संघटनांना वर्ष २००६ ते २०११ या कालावधीत प्रत्येक वर्षी किती कोटींचा निधी मिळाला हेदेखील त्यात नमूद केलेले आहे. (क्रमशः)
उद्याच्या अंकात : एकीकडे बेरोजगारी अन् दुसरीकडे देणग्यांचा पाऊस

चर्चचे वास्तव - ६

एकीकडे बेरोजगारांचे तांडे अन् दुसरीकडे देणग्यांचा महापूर

चारुदत्त कहू
नागपूर, ६ सप्टेंबर
एकीकडे माहिती तंत्रज्ञानाचा गाजावाजा सुरू असताना भारतातील कोट्यवधी लोकांना आजही दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. अनेक बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत दारोदार भटकताना दिसताताहेत. अनेकांना अत्यल्प वेतनात अथवा मजुरीत कामाची ओझी ओढावी लागत आहेत; तर दुसरीकडे शेकडो ख्रिस्ती संघटनांना फारसे प्रयत्न न करताही कोट्यवधींच्या देणग्या मिळत आहेत.
वर्षाकाठी १०० कोटींहून अधिक रुपयांच्या विदेशी देणग्या मिळणार्‍या भारतात २० ख्रिस्ती स्वयंसेवा संस्था कार्यरत आहेत. २० ख्रिस्ती संस्थांना ५० ते १०० कोटींच्या देणग्या मिळतात. ६७ संस्थांना २५ ते ५० कोटींपर्यंतच्या, २८० संस्थांना १० ते २५ कोटींचा विदेशी निधी मिळतो. २४३ संघटनांना ५ त १० कोटी तर ५०४ संघटनांना १ ते ५ कोटींच्या विदेशी देणग्या मिळतात.
वर्ष २००६ ते २०११ या कालावधीत १०० कोटींहून अधिकच्या विदेशी देणग्या मिळालेल्या संस्था पुढीलप्रमाणे- १) कॅरिटास इंडिया (दिल्ली) - ३१८ कोटी, २) चर्च ऑक्झिलिअरी फॉर सोशल ऍक्शन (दिल्ली) - २५६ कोटी, ३) द लेपरसी मिशन ट्रस्ट इंडिया (दिल्ली) - २०४ कोटी, ४) इमॅन्युएल हॉस्पिटल असोसिएशन (दिल्ली) - १२० कोटी, ५) इंडियन सोसायटी ऑफ चर्च ऑफ जिझस क्राईस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स (दिल्ली) - ११४ कोटी, ६) हॅण्डमेड्स ऑफ सॅक्रिड हार्टस् (महाराष्ट्र) - १५० कोटी, ७) नॉर्थ कर्नाटका ज्येस्युट एज्युकेशनल ऍण्ड चॅरिटेबल सोसायटी (कर्नाटक) - २३६ कोटी, ८) ऍक्शन एड (कर्नाटक) - ४१० कोटी, ९) ख्रिश्‍चन चिल्ड्रेन ऑफ आयएसी (कर्नाटक) - १७४ कोटी, १०) द चर्च ऑफ कौन्सिल फॉर चाईल्ड ऍण्ड युुथ केअर (कर्नाटक) - १७४ कोटी, ११) बिलिव्हर्स चर्च इंडिया (केरळ) - ६०० कोटी, १२) गॉस्पेल फॉर एशिया (केरळ) - ३१२ कोटी, १३) लव्ह इंडिया मिनिस्ट्रिज (केरळ) - १४३ कोटी, १४) लास्ट हवर मिनिस्ट्रिज (केरळ) - ९० कोटी, १५) मिशनरीज ऑफ चॅरिटी (पश्‍चिम बंगाल) - २५८ कोटी, १६) कम्पॅॅशन ईस्ट इंडिया (पश्‍चिम बंगाल) - २०१ कोटी, १७) ए.एम.जी. इंडिया इंटरनॅशनल (आंध्रप्रदेश) - १९४ कोटी, १८) लाईफ इन द वर्ड जॉयसी मेयर मिनिस्ट्रिज (आंध्रप्रदेश) - ११८ कोटी, १९) वर्ल्ड व्हिजन इंडिया (तामिळनाडू) - ११०२ कोटी, २०) सर्व्हिस असोसिएशन ऑफ एसडीए प्रायव्हेट लिमिटेड (तामिळनाडू) - २४४ कोटी
ख्रिश्‍चन स्वयंसेवी संस्थांना मिळणार्‍या या कोट्यवधींच्या विदेशी देणग्यांकडे पाहता, त्यांची परदेशी संस्थांशी असलेली कायमस्वरूपी आणि सशक्त भागीदारी स्पष्ट होते. त्यामुळे या संस्था चालविण्यासाठी, त्यांच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी, निधीच्या नियोजनासाठी तसेच या संस्थांच्या मालकीच्या जमिनींचे व्यवहार हाताळता येणार्‍या सक्षम, तज्ज्ञ आणि निपुण व्यक्ती आणि मनुष्यबळाची गरज भासणारच. अनेक उद्योग आणि व्यावसायिक संस्थांना उत्कृष्ट उत्पादन निर्मिती करूनदेखील कोट्यवधींचा व्यवसाय करणे शक्य होत नाही. मात्र, ख्रिश्‍चन संघटनांच्या पदरात विनासायास कोट्यवधींच्या रकमा पडतात. हाच, कुठलेही श्रम न करता खिशात खुळखुळणारा पैसा गैरव्यवहारांना चालना देतो, त्यामुळेच या संस्थांमध्ये घोटाळे होतात आणि प्रसंगी न्यायालयाच्या पायर्‍यादेखील संबंधितांना चढाव्या लागतात.
२००६ ते २०११ या कालावधीत वर्षाकाठी किमान एकदा, एक कोटीहून अधिकच्या विदेशी देणग्या मिळालेल्या ख्रिश्‍चन स्वयंसेवी संस्था. (आकडे कोटीत)
राज्य -              स्वयंसेवी संस्थांची संख्या            विदेशी देणगी
जम्मू  काश्मीर               ३                                        ७
उत्तरांचल                    ११                                        ४०
उत्तरप्रदेश                   ३४                                       १८२
अरुणाचल प्रदेश            ४                                        ३२
बिहार                         २४                                       २६८
आसाम                       २२                                       २७४
नागालॅण्ड                      ६                                        ९६
मणिपूर                        ८                                         ७५
मिझोराम                     २                                            ४
मेघालय                     १८                                        १६५
त्रिपुरा                          २                                         १३
पश्‍चिम बंगाल             ६५                                     ११३१
झारखंड                      ३३                                      ३०१
ओरिसा                      २२                                      २४५
अंदमान निकोबार           ३                                     ४५
आंध्रप्रदेश                  १५८                                    १७०३
तामिळनाडू                १८१                                   ३३९५
केरळ                       १८१                                   २५७२
कर्नाटक                   १५०                                   २१८५
महाराष्ट्र                    ७१                                     ७७७
छत्तीसगढ                १८                                      १६५
मध्यप्रदेश                 २८                                      २६९
गुजरात                   १५                                       १३४
राजस्थान                  ८                                        ३६
दिल्ली                     ४६                                    १७५५
हरयाणा                     ३                                       ३६
पंजाब                       ८                                      २२०

पाचपेक्षा अधिक स्वयंसेवी संस्था असलेल्या शहरांमधील देणग्यांची विभागणी
शहराचे नाव स्वयंसेवी संस्था देणगी (कोटीत)
दमोह (मध्यप्रदेश)       ७                                      ८३
मुंबई (महाराष्ट्र)         ३९                                    ५५५
नागपूर (महाराष्ट्र)      १३                                      ४२
पुणे (महाराष्ट्र)          १२                                    १४९
बंगलोर (कर्नाटक)     १०४                                  १६२२
मंगलोर (कर्नाटक)       ९                                     ६५
म्हैसूर (कर्नाटक)       १०                                     ५७
कोझीकोड (केरळ)       ९                                     ६९
अलापुझा (केरळ)       ७                                     ८६
एर्नाकुलम् (केरळ)    ५०                                   २९५
इडुक्की (केरळ)         ६                                    २५
कोट्यायम (केरळ)    ३५                                 २६८
त्रिचूर (केरळ)          १६                                 १००
त्रिवेंद्रम (केरळ)       २२                                 २७०
कन्नूर (केरळ)         ७                                   ४८
पठानमिठित्ता (केरळ) १३                           १२८३
देहरादून (उत्तरांचल)     ८                             २८
लखनौ (उत्तरप्रदेश)      ६                            २०
वाराणसी (उत्तरप्रदेश)   ६                            २४
पाटणा (बिहार)          १०                         ११७
रांची (झारखंड)          २१                         १६३
शिलॉंग (मेघालय)      ८                            ९३
२४ परगणा (पश्‍चिम बंगाल) ६                   ५१
दार्जिलिंग (पश्‍चिम बंगाल) ८                     ५७
कोलकाता (पश्‍चिम बंगाल) ३१                 ९०६
गुंटूर (आंध्रप्रदेश)              १५                 २९९
हैदराबाद (आंध्रप्रदेश)         ३७                ५३७
क्रिश्‍ना (आंध्रप्रदेश)           २२               १९८
प्रकासम (आंध्रप्रदेश)          ६                 ४४
विशाखापट्टनम (आंध्रप्रदेश) ८                ३७
वेस्ट गोदावरी (आंध्रप्रदेश) १३             १०२
इस्ट गोदावरी (आंध्रप्रदेश) १०              ५१
चेन्नई (तामिळनाडू)          ६२          १७५६
कोईम्बतूर (तामिळनाडू)      ९             ६७
मदुराई (तामिळनाडू)         १६           १५६
सालेम (तामिळनाडू)         १०            ११८
तिरुचिरापल्ली (तामिळनाडू) १३         ९२
वॅल्लोर (तामिळनाडू)              ८        १५४
कन्याकुमारी (तामिळनाडू)      ७          ८०
तिरुनवेल्ली (तामिळनाडू)       ७        १०७
(क्रमशः) (उद्याच्या अंकात विदेशी देणगी नियमन कायद्याच्या उल्लंघनाबद्दल हजारो स्वयंसेवी संघटनांवर झालेली कारवाई)

चर्चचे वास्तव - ७

हजारो देशविरोधी स्वयंसेवी संस्थांवर कारवाईचा बडगा

२० संघटनांची खाती सील,६० संघटनांवर विदेशी देणग्या स्वीकारण्याची बंदी
चारुदत्त कहू
नागपूर, ७ सप्टेंबर
अनेक स्वयंसेवी संस्था त्यांना मिळणार्‍या विदेशी देणग्यांचा वापर धर्मांतरण, देशविरोधी कारवाया, अतिरेकी कृत्ये, हिंसाचार, घातक शस्त्रास्त्रांचा व्यापार, मानवी तस्करी, भारतीय संस्कृतीची नालस्ती, रुढी-परंपरांची निंदा, देवी-देवतांची निर्भत्सना, निरनिराळ्या विकास कामांमध्ये अडथळे आदी भारत विरोधी कारवायांसाठी करीत असल्याचे निदर्शनास आल्याने, राजकीय पक्षांसह अनेक राष्ट्रवादी संघटना वारंवार या संघटनांना मिळणार्‍या विदेशी देणग्यांवर बंदी घालण्याची मागणी करीत असतात. पण सरकारला त्यांच्या मागण्यांची दखल घ्यावीशी वाटत नाही. मात्र, आता दस्तुरखुद्द पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनाच तामिळनाडूतील कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला निरनिराळ्या स्वयंसेवी संस्थांकडून होत असलेल्या टोकाच्या विरोधाच्या निमित्ताने, त्यांच्या देशविरोधी कारवायांची प्रचीती आली आहे. यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने हजारो देशविरोधी स्वयंसेवी संस्थांवर, विदेशी देणगी नियमन कायद्याच्या (एफसीआरए) उल्लंघनाबद्दल कठोर कारवाई केली आहे.
गृह मंत्रालयाने विदेशी देणग्या मिळणार्‍या नोंदणीकृत ३९ हजार २३६ पैकी ४ हजार १४१ स्वयंसेवी संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यातील बहुतांशी संघटनांची एफसीआरए अंतर्गत झालेली नोंदणी रद्द करण्यात आली आहे. २० संघटनांची खाती सील करण्यात आली असून, ६० संघटनांना विदेशी देणग्या स्वीकारण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
सरकारने कारवाई केलेल्या बहुतांशी संघटना तामिळनाडूतील आहेत. या संघटना त्यांना मिळणार्‍या मोठ्या प्रमाणातील विदेशी देणग्यांच्या आधारे तामिळनाडूतील महत्वाकांक्षी कुडानकुलम् अणु ऊर्जा प्रकल्पाला साम-दाम-दंड-भेदाचा उपयोग करून विरोध करीत असल्याचे सरकारच्या ध्यानात आल्यानंतर पंतप्रधानांनीच त्यांना मिळणार्‍या विदेशी देणग्यांबाबत आक्षेप नोंदवला होता. पंतप्रधानांच्या वक्तव्याची दखल घेऊन गृहमंत्रालयामार्फत संबंधित स्वयंसेवी संस्थांवर तडकाफडकी कारवाई करण्यात आली आहे.
कुडानकुलम् अणु ऊर्जा प्रकल्पाला होणारा विरोध आणि विदेशी देणग्या मिळणार्‍या स्वयंसेवी संस्थांचा त्यातील सहभाग, यातून भारत विरोधी कारवायांसाठी विदेशी देणग्यांचा वापर होत असल्याची टीका होऊ लागली होती. मार्च २०१२ मध्ये सरकारने तामिळनाडूच्या तिरुनवेल्ली जिल्ह्यातील कुडानकुलम् प्रकल्पाचे काम रोखून धरणे आणि आंदोलकांना आर्थिक सहकार्य करण्याचा ठपका ठेवून चार स्वयंसेवी संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यावेळी त्यांची खातीही सील करण्यात आली होती.
ख्रिश्‍चन स्वयंसेवी संस्थांची निदर्शकांना आर्थिक मदत
फेब्रुवारी २०१२ मध्ये गृहमंत्रालयाने कन्याकुमारी येथील तुतिकोरीन डायोसिझन असोसिएशन आणि तुतिकोरीन मल्टीपरपज सोशल सर्व्हीस सोसायटी या ख्रिस्ती संघटनांविरुद्ध कुडानकुलम् प्रकल्पाला विरोध केल्याबद्दल तक्रार दाखल केली होती. बिशप यवॉन ऍब्रॉईज हे या दोन्ही संघटनांचे प्रमुख आहेत.
तुतिकोरिन डायोसिझन असोसिएशनला २००६ ते २०११ या काळात २०.६० कोटींच्या तर तुतिकोरीन मल्टीपरपज सोशल सर्व्हीस सोसायटीला ४४.१४ कोटींच्या विदेशी देणग्या प्राप्त झालेल्या आहेत. एफसीआरएच्या नोंदीनुसार तुतिकोरिन डायोसिझन असोसिएशनला बहुतांश देणग्या फ्रान्समधून प्राप्त झालेल्या आहेत. या संस्थेला मिळालेल्या देणग्यांचा अर्धा वाटा फ्रान्सचा आहे. फ्रान्समधील एका संघटनेने या संस्थेला १०.३० कोटींचा निधी दिला असून इटलीहून या संस्थेला ५.१५ कोटींची रक्कम मिळाली आहे. याच संस्थेला ३.२२ कोटी जर्मनीकडून तर ८३ लाख अमेरिकेकडून मिळाले आहेत.
या स्वयंसेवी संस्थेने बहुतांश निधी प्रिस्ट आणि प्रिचर्सची देखभाल, अनाथ बालकांचे कल्याण आणि निःशुल्क लस टोचणी शिबिरांसाठी खर्च केल्याचा दावा केला आहे.
तामिळनाडूतील बिशप्सनी सरकारकडे आर्जव करून ख्रिश्‍चनांना त्रास देणे थांबवा, अशी विनंती केली आहे. कुडानकुलम् अणु ऊर्जा प्रकल्पाच्या वादामुळे केंद्र सरकारने डायोसिस ऑफ तुतिकोरिन आणि इतर ख्रिस्ती स्वयंसेवी संघटनांविरुद्ध कारवाईला प्रारंभ केला असल्याचा आरोप मद्रास-मायलापोरचे आर्चबिशप आणि टीएनबीसीचे अध्यक्ष एएम चिन्नाप्पा यांनी जारी केलेल्या एका निवेदनाद्वारे केला आहे.
विदेशी देणग्या मिळणार्‍या या संस्थांनी भारतातील विविध विकास प्रकल्पांबद्दल निर्माण केलेल्या संशयकल्लोळाबद्दल पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, ‘भारतात अशा स्वयंसेवी संस्था आहेत, ज्यांना नेहेमी अमेरिका आणि स्कँडेन्व्हियन देशांकडून आर्थिक मदत मिळते. मात्र या संस्थांना भारताच्या विकास कामापुढील आव्हानांची मुळीच कल्पना नाही. देशाचा अणुऊर्जा कार्यक्रम अशा स्वयंसेवी संघटनांच्या आडमुठ्या धोरणांमुळेच रखडला आहे. या सार्‍या संस्था अमेरिकेत वसल्या असून त्यांना भारताला ऊर्जा निर्मिती वाढविणे किती आवश्यक आहे, याची जाणीव नाही.’
केंद्रीय गृहमंत्रालयाने यावर एक निवेदन जारी करून, अशा स्वयंसेवी संस्थांचे व्यवहार एफसीआरए आणि एफसीआरआर या कायद्यांशिवाय बेकायदेशीर जमावबंदी कायदा, सावकारी प्रतिबंधक कायदा व भारतीय दंड विधान आणि राज्याच्या स्थानिक कायद्यानुसार तपासले जातील, अशी घोषणा केली आहे.

चर्चचे वास्तव - ८

यवतमाळच्या कुख्यात सरदार बंधूंविरुद्ध सर्वपक्षीय आक्रोश

चारुदत्त कहू
नागपूर, ८ सप्टेंबर
विदेशी देणग्यांमुळे केवळ ख्रिश्‍चन संघटनाच मालामाल होत आहेत असे नसून, भणंग व्यक्तीदेखील नवश्रीमंत होऊन या पैशाच्या आधारावर मनमानी आणि दंडेली करू शकतात, याचेच उदाहरण बघायचे झाल्यास यवतमाळातील दीनबंधू शिक्षण व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन सरदार आणि त्यांचे थोरले बंधू सुनील सरदार यांचे घेता येईल. सरदार बंधूंनी गेल्या २५ वर्षात धर्मांतरणाच्या माध्यमातून प्रचंड मोठे साम्राज्य उभे केले असून, विदेशी पैसा खुळखुळू लागल्याने राजकीय पक्षांची अनेक नेतेमंडळी त्यांच्या नादी लागलेली आहेत. यांनाच हाताशी धरून अनेकदा सरदार बंधू त्यांच्या कारवाया सरकारी माध्यमातून सुखेनैव करीत आहेत.
तभाच्या हाती आलेल्या अधिकृत महितीनुसार यवतमाळातील फ्री मेथॉडिस्ट मिशन इन इंडिया या मिशनरी स्वयंसेवी संस्थेला २००७ ते २०११ या पाच वर्षांच्या कालावधीत १३ कोटी ५५ लाख ५३ हजार ५०६ रुपयांच्या विदेशी देणग्या मिळाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर सरदार बंधू आणि या विदेशी निधीचा प्रत्यक्षात काय संबंध असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
सरदार बंधू हे क्रिप्टो ख्रिश्‍चन या प्रकारात मोडतात. नावामुळे त्यांना एकीकडे भारतीय असल्याचाही फायदा मिळतो आणि ख्रिश्‍चन धर्माशी संबंध असल्याने विदेशातही मिरवता येते. छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री स्व. वायएसआर रेड्डी आणि स्वतः कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी क्रिप्टो ख्रिश्‍चन प्रकारात मोडतात. ख्रिश्‍चन असूनही कुठल्याही सरकारी दस्तावेजात मूळ नावात बदल न करता आपला धर्म जाहीर न करणार्‍या व्यक्तींना क्रिप्टो ख्रिश्‍चन म्हटले जाते.
यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण विदर्भात धर्मांतराच्या कारवायांमध्ये सुनील व नितीन या सरदार बंधूंचा सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या कारवायांविरुद्धचा जनआआक्रोश नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय यवतमाळ बंदमधून प्रकट झाला. त्यांना मिळणार्‍या अफाट विदेशी देणग्यांमधून ते केवळ असामाजिकच नव्हे, तर अनेक प्रकारची देशद्रोही कामे करीत असल्याचा आरोप करून माजी खासदार भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गणमान्य नेत्यांनी सरदार बंधूंची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. सरदार बंधूंवर राज्य व केंद्र सरकारने कारवाई करावी, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने त्यांचा बंदोबस्त करू, असा इशाराही नुकताच यवतमाळच्या विश्रामभवनात या संदर्भात झालेल्या सर्वपक्षीय पत्रपरिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्राचार्य शंकरलाल कोठारी, माजी खासदार राजाभाऊ ठाकरे, माजी आमदार दिवाकर पांडे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र डांगे, शिवसेनेचे यवतमाळ शहर प्रमुख राजेंद्र गायकवाड, किशोर इंगळे, बजरंग दलाचे अजय चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुमित बाजोरिया, सागर राऊत, क्रांती राऊत, शाहेद सिद्दिकी, सीताराम कौशिक, गुलाब सोळंकी, वासुदेव महल्ले, शेख जाकीर, प्रभाकर काळे, प्रदीप खराटे यांनी दिला.
सरदार बंधूंच्या धर्मांतरणासाठीच्या क्लृप्त्या
१) चर्च आणि शाळांच्या माध्यमातून बायबल आणि ख्रिस्ती साहित्याचे वितरण करणे.
२) शासकीय योजनांच्या माध्यमातून गरीब, दलित, पीडितांवर प्रभाव पाडणे.
३) हिंदुत्वविरोधी साहित्याचे मोठ्या प्रमाणात वितरण करणे.
४) हिंदुत्वविरोधी संघटनांमध्ये समन्वय साधण्याची भूमिका बजावणे.
५)भारतीय समाजातील विशिष्ट जातींना लक्ष्य करून त्यांचे ख्रिस्तीकरण करणे.
नितीन व सुनील सरदार सर्वधर्मसमभावाचा बुरखा घालून आणि भारतीय राज्यघटनेचा गवगवा करून अनेक बेकायदेशीर कामे करीत आहेत. या दोन व्यक्ती नसून संस्थाच आहेत. त्यांना अमेरिकन ख्रिश्‍चन संघटनांकडून अमाप पैसा येतो. त्यांना मिळणार्‍या या पैशांच्या मोबदल्यात ते येथील असहाय, गरीब लोकांना आमिषे दाखवून तसेच साम, दाम, दंड, भेदाने ख्रिश्‍चन धर्मात आणण्याचा उपद्‌व्याप करीत असतात. यवतमाळ ही कर्मभूमी असलेल्या नितीन सरदार यांचा स्वतःचा म्हणून कुठलाच कामधंदा वा उद्योग नाही. तरीसुद्धा त्यांच्याजवळ यवतमाळ, नागपूर, वर्धा, दिल्ली, मुंबई अशा अनेक ठिकाणी कोट्यवधींची मालमत्ता कशी जमा झाली, त्यासाठी कोणी पैसा दिला, याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी बंद समर्थकांनी केली आहे. सरदार बंधू अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयएचे दलाल असून, ते भारताची गुपिते, संरक्षणविषयक माहिती त्यांना पुरवितात, असाही त्यांच्यावर आरोप आहे.
सरदार बंधूंचा थेट संबंध कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी, विशेषत: ख्रिश्‍चन धर्मीय नेत्यांशी, असल्याचे बोलले जाते. त्यात स्वत: सोनिया गांधीही असल्याचे सरदार बंधू स्वत: सांगतात. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या गाजलेल्या अणुकरार मतदान प्रकरणाने हे संबंध जगजाहीर झाले होते. कारण, या प्रकरणात सरदार बंधूंनीच मध्यस्थी केली होती. अमेरिकेतील राजकारण्यांशी संबंध असल्याचाही त्यांचा दावा आहे. महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांशी विशेषतः प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे यांच्याशी असलेली त्यांची जवळीक लपून राहिलेली नाही.
विद्यमान कॉंग्रेस नेते, माजी खासदार हरिभाऊ राठोड हे नेहमीच सरदार बंधूंच्या पाठीशी उभे असतात, असा अनुभव आहे. सुनील सरदार यांची पत्नी पामेला, अमेरिकन वंशाची असून, नितीन सरदार यांची पत्नी कॅनेडियन आहे. पामेला सुनील सरदार यांच्या भारतीय व्हिसावरून वाद निर्माण झाला असताना आणि त्यांना देशाबाहेर हाकलण्याचे आदेश सरकारने काढले असताना हरिभाऊ राठोड यांनीच त्यांची मदत करून त्यांना कारवाईपासून वाचविले होते, असा आरोप आहे. चर्चचे काम करताना प्रामुख्याने भाषेची अडचण येत असल्याचे लक्षात आल्यावर पामेलाने यवतमाळातच मराठी भाषेचे प्रारंभिक धडे घेतले. (क्रमशः)
उद्याच्या अंकात सरदार बंधूंची वादग्रस्त प्रकरणे

चर्चचे वास्तव -  ९

सरदार बंधूंचे वादाचे आणि संपत्तीचेही इमले

चारुदत्त कहू
नागपूर, ९ सप्टेंबर

undefinedसुनील आणि नितीन सरदार यांचे वडील भीमराव यांची परिस्थिती अतिशय हलाकीची होती. गिट्टी क्रशरचा त्यांचा धंदाही बुडाला होता.मात्र त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि सरदार कुटुंबियांच्या भरभराटीला सुरुवात झाली. १९९७ मध्ये उदरनिर्वाहासाठी धडपडणार्‍या सरदार कुंटंबाची मालमत्ता २०१२ मध्ये अब्जावधींच्या घरात गेली. याच पैशाच्या बळावर सरदार बंधूंनी झरी-जामनी, केळापूर तालुक्यांसह यवतमाळ जिल्ह्यातीलच नव्हे तर देशभरातील निरनिराळ्या शहरांमध्ये ख्रिस्तीकरणाचा सपाटाच लावला. गरिबीने पिचलेले शेकडो कोलाम, बंजारा, आंध, गोंड, मारगी, वाल्मीकी,माळी आदी समाजबांधव त्यांच्या आमिषांना बळी पडून आपला मूळ धर्म सोडून गळ्यात क्रूस अडकवू लागले.एकीकडे सरदार बंधूंची पैशांची आणि संपत्तीची ताकद वाढत असतानाच ते अनेक वादविवादात अडकू लागले. परिसरातील अनेक ठाण्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध निरनिराळ्या कारणांसाठी गुन्हे दाखल आहेत.

undefinedनितीन सरदार यांनी नुकतेच यवतमाळ जिल्ह्यातील कामनदेव व पिंपरी या दोन गावांमध्ये एक शेत घेतले आहे. या शेतात त्यांनी बेकायदेशीर बांधकाम सुरू केले असून, त्या ठिकाणी बंजारा, आदिवासी, बौद्ध, मुसलमान, शीख अशा लोकांना ख्रिश्‍चन करण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरातील विहिरीत तरोडा येथील कोलाम युवक लक्ष्मण अनंता मानकर याचा मृतदेह आढळून आला होता. हा मृत्यू संशयास्पद असून, त्यामागे नितीन सरदारचा काही संबंध आहे का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
नितीन सरदार यांच्या शेताच्या आजूबाजूला असलेल्या कामनदेव, चिंचबर्डी, पिंपरी, घुई, लासीना या सर्व गावांनी २ ऑक्टोबर २०११ च्या ग्रामसभेत त्यांच्या कारवायांवर आक्षेप घेणारे आणि कारवाईची मागणी करणारे ठराव घेतले. ६ जानेवारी २०१२ रोजी या ग्रामपंचायतींनी या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनही दिले.
नितीन सरदार यांनी शाळांमधून खेळणी,वह्या-पुस्तके आणि बायबलचे वाटप करून ख्रिश्‍चन धर्मप्रचाराचे उद्योग अनेकदा केले आहेत. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य महादेव सुपारे यांनी यांसदर्भात प्रशासनाकडे तक्रारही केली होती. या तक्रारीमुळे तत्कालीन उपशिक्षणाधिकारी वाल्मीक इंगोले यांचे स्थानांतरणही झाले होते.माजी शिक्षक आमदार दिवाकर पांडे यांनी सरदार बंधूंच्या धर्मपरिवर्तनाच्या कारवायांबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेत तारांकित प्रश्‍नाद्वारे चर्चा उपस्थित केली होती. परंतु, त्याबाबत योग्य चौकशी झाली नाही.

लक्ष्मण मानकरचा संशयास्पद मृत्यू

नितीन सरदार यांच्या शेतातील विहिरीत ३५ वर्षीय लक्ष्मण मानकर या आदिवासी कोलाम युवकाचा मृतदेह आढळून आला होता. लक्ष्मणची पत्नी निरंजना हिने पतीच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली आहे. कळंब तालुक्यातील तरोडा येथील लक्ष्मण मानकरला तुला ख्रिश्‍चन करतो, नोकरी देतो, पैसा देतो असे सांगून नितीन सरदार यांनी आपल्या शेतात राहायला नेले होते. ज्या दिवशी लक्ष्मणचा मृत्यू झाला त्या दिवशी निरंजनाला काहीच कळविण्यातच आले नाही. तिला माहिती मिळाली तोवर लक्ष्मणवर परस्पर अंत्यसंस्कार करून टाकण्यात आले होते. पतीवर अंत्यसंस्कार केला ती जागा आणि राख निरंजनाला दाखविण्यात आली.

शेतीचा एनए अवैध

नितीन सरदार यांच्या शेताची अकृषक परवानगी अवैध असल्याचा आरोप आहे. ही परवानगी देण्याचे अधिकार असलेल्या उपविभागीय महसूल कार्यालयात सरदारचा बिनतारखेचा व बिनसहीचा अर्ज दाखल आहे. कामिनदेव पिंपरी ग्रामपंचायतने या एनएसाठी २२ मार्च २०१० रोजी ठराव केला आहे. प्रत्यक्षात या शेताची खरेदी, त्यानंतर म्हणजे १२ मे २०१० ला झालेली आहे. त्यानंतर २२ मार्चचा ठरावही नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे २ ऑक्टोबर २०१० च्या ग्रामसभेने या एनएला आक्षेप घेणारा ठराव केला आहे.या ठरावाचा किंवा सरदार यांच्या प्रस्तावात अनेक त्रुटी असूनही त्यांची दखलही न घेता उपविभागीय अधिकार्‍यांनी अकृषक परवानगी दिलेली असल्याचा आरोप, ग्रामपंचायतच्या सदस्य क्रांती राऊत यांनी पुराव्यांनिशी केला. ही संपूर्ण प्रक्रिया जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी तपासून रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे.

दादाराव मेश्रामचे ‘धर्मांतरण’

नाकापार्डी येथील कलावंत, कीर्तन, प्रवचनकार दादाराव मारुती मेश्राम, त्यांची पत्नी लीला आणि अनेकांना नितीन सरदार यांनी दहाबारा वर्षांपूर्वी ख्रिश्‍चन करून घेतले होते. या मेश्राम दाम्पत्याने पत्रपरिषदेत आपबीती सांगितली. ते म्हणाले, नितीन सरदारने आम्हाला भूलथापा देऊन, आमिष दाखवून ख्रिश्‍चन धर्माचा बाप्तिस्मा दिला होता. यवतमाळजवळच असलेल्या निळोणा येथे हा कार्यक्रम पार पडला होता. सुरुवातीला त्याने थोडीफार मदत केली, पण पुढे हात वर केले. त्याचवेळी आमच्या बारावी झालेल्या संतोष या मुलाला ख्रिश्‍चन धर्माचे शिक्षण देण्याकरिता नितीन सरदार औरंगाबादला घेऊन गेले. तीनच महिन्यांनी आमचा मुलगा तिथून पागल होऊनच परत आला. त्यानंतर नितीन सरदार यांनी ना उपचारासाठी मदत केली ना आमच्याकडे ढुंकून पाहिले. काही दिवसांनी प्रकृती खालावल्याने संतोषचा मृत्यू झाला. तेव्हाही ते चौकशीसाठी आले नाही. त्यांच्या भूलथापांना बळी पडल्याने आम्ही आज अक्षरश: देशोधडीला लागलो आहोत.
२३ मे २०१० रोजी आमच्या आरती या मुलीचे लग्न झाले. त्यावेळी नितीन सरदार यांनी जबरदस्तीने तिच्या लग्नाच्या पत्रिका छापून वाटल्या. त्यावर येशूचा संदेश, क्रूसचे चित्र छापले होते. तिच्या लग्नात त्यांनी कोणतीच मदत केली नाही, पण आमचे हिंदू मित्र दिनेश पाटील हे धावून आले आणि त्यांनी दहा हजारांची मदत केली, असेही दादाराव व लीला मेश्राम यांनी यावेळी सांगितले.

सुनील सरदार यांना ५०० काडतुसांसह अटक

ख्रिस्त धर्मगुरू सुनील सरदार यांना २९ फेब्रुवारी २०१२ रोजी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५०० जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली होती.ही बातमी एशियन एजसह दिल्लीच्या अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली होती. ख्रिस्ती धर्मगुरू आणि काडतुसे या समिकरणाने अनेक जण बुचकळ्यात पडले होते. महाराष्ट्राकडे जाणार्‍या विमानात बसण्यासाठी ते काडतुसे घेऊन जात असताना त्यांना अटक झाली.आपण लॉस एंजेलिसहून २२ बोअर पिस्तुलीचे ५०० काडतुसे आणली असून,ती एका मित्राला भेट द्यायची आहेत अशी कबुली त्यांनी त्यावेळी दिली.

चर्चचे वास्तव -  १०

चर्च कसले? हा तर नफेखोर व्यावसायिक

कंपन्यांचा अवाढव्य पसाराच

चारुदत्त कहू
नागपूर, १० सप्टेंबर
$img_titleख्रिश्‍चन मिशनार्‍यांचे काम कसे चालते, ते धर्मांतरण कसे करतात, गरजूंना मदत करण्याची त्यांची पद्धत कोणती, बुद्धिबळाच्या डावाप्रमाणे त्यांच्यात राजा कोण, वजीर कोण, घोड्यासारखा अडीच घरे चालणारा कोण, उंटासारखा तिरकस कोण चालतो आणि थेट युद्धभूमीवर लढणारा सैनिक कोण हे जाणून घेण्यासाठी प्रत्यक्षात चर्चच्या कार्यपद्धतीचे अध्ययन करणे गरजेचे आहे. चर्चच्या कार्यपद्धतीवर नजर टाकली असता, चर्च हे एखादे धार्मिक प्रतिष्ठान अथवा धर्मकार्य करणारी संस्था-संघटना असल्याचा भास होतो. मात्र, खोलात शिरून त्यांचे बायलॉज पाहिले, त्यांच्या नोंदींची कागदपत्रे पाहिली, त्यांची उद्दिष्टे जाणून घेतली तर चर्च हे दुसरे तिसरे काही नसून लहान लहान नफेखोर व्यावसायिक कंपन्यांचा एकत्रित अवाढव्य पसाराच आहे, हे ध्यानात यायला वेळ लागत नाही. कंपन्या जशा नफेखोरीसाठी कुठलीही पातळी गाठतात अगदी त्याच धर्तीवर चर्चने साम-दाम-दंड-भेदाने जगभरात धर्मप्रसाराचा खेळ मांडून अशांतता पसरविली आहे.
यापूर्वीच नमूद केल्याप्रमाणे भारतातील कॅथॉलिक चर्च हा लॅटिन, सायरो मालाबार आणि सायरो मालानकारा या तीन सुई ज्युरिस चर्चेसचा समूह आहे. सुई ज्युरिस ही कायदेशीर परिभाषा असून याचा अर्थ न्यायालयीन सक्षमता असा होतो. यालाच वेगळ्या अर्थाने स्वतःचे व्यवहार सांभाळण्यास समर्थ अशा संस्था असे संबोधले जाऊ शकते. या अर्थानुसार लॅटिन, सायरो मालाबार आणि सायरो मालानकारा ही चर्चेस स्वतंत्रपणे कार्य करणारी आहेत. ऍनिरिओ पॉण्टिफिशियो -२०१२ नुसार कॅथॉलिक चर्च संघटितपणे ३० आर्चबिशपच्या (लॅटिन -२३, सायरो मालाबारा -५, सायरो मालानकारा २) आणि १६५ बिशपच्या (लॅटिन -१२८, सायरो मालाबारा -२९, सायरो मालानकारा ८) अधिकारक्षेत्रात कार्य करते. बिशपच्या अधिकारक्षेत्रात १२,७९९ डायोशिसन प्रिस्ट, ९ हजार ९७७ रिलिजिअस प्रिस्ट, ३ हजार ३१ रिलिजियस ब्रदर्स, ७७ हजार ४४४ रिलिजियस सिस्टर्स, ३ हजार ७६१ ले मिशनरी आणि ४३ हजार ४१७ धर्मशिक्षकांचा समावेश असतो.
मुख्य प्रवाहातील पोटेस्टंट चर्चअंतर्गत येणार्‍या चर्च ऑफ साऊथ इंडियाच्या (सीएसआय) अधिकारक्षेत्रात २२ बिशप आणि १५ हजार परिषदांचा (ख्रिस्ताच्या प्रार्थनेसाठी विशिष्ट दिवशी एकत्र येणार्‍या अनुयायांचा समूह) समावेश आहे. यांची सदस्यसंख्या ४० लाखांच्या घरात जाते. वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेसच्या (डब्ल्यूडब्ल्यूसी) २००६ च्या आकडेवारीनुसार सीएसआयचे २२ बिशप, १ हजार २१४ प्रिस्ट आणि २ हजार पास्टर्स असून चर्च ऑफ नॉर्दन इंडिया सीएनआय जवळ बिशपच्या अधिकारक्षेत्रातील २६ क्षेत्र, ४ हजार ५०० परिषदा आणि २ हजार पास्टर्स आहेत. सीएनआयला धर्मोपदेशकांची नियुक्ती करण्याचेही अधिकार आहेत.
बॅप्टीस्ट वर्ल्ड अलायन्सच्या बेरजेनुसार भारतात १४ हजार ९६९ बॅप्टीस्ट चर्च असून त्यातील ११ हजार ३९९ चर्चेस पूर्वोत्तर राज्ये - ओरिसा, बंगाल, बिहार, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आहेत. सेवन्थ डे ऍडव्हेंटिस्टची भारतातील चर्चची संख्या ३ हजार ९८७ आहे. याशिवाय ९१० धार्मिक समित्याही त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करतात. यातील २ हजार २७७ चर्चेस एकट्या आंध्रप्रदेशात आहेत. द युनायटेड इव्हँजेलीकल लुथरान चर्च ही संघटना भारतातील १२ मोठ्या चर्चेसची संघटना असून त्यांचे जास्तीत जास्त अनुयायी आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि झारखंडमधील आहेत. ही संघटना १ हजार ८२४ पास्टर्सच्या अधिकारक्षेत्रातील ३ हजार ३ हजार ३२१ केंद्रांना संचालित करते. द इंडियन मिशन्स असोसिएशनशी २३० मिशनरी संस्था संलग्न असून, त्यांनी ५० हजारांहून अधिक लोकांच्या निरनिराळ्या कामांसाठी पगारी नियुक्त्या केलेल्या आहेत. याशिवाय गॉस्पेल फॉर एशिया या एकट्या संघटनेचे भारतात सुमारे १० हजार धर्मोपदेशक ठिकठिकाणी काम करीत आहेत. वरीलपैकी कुठल्याही उपपंथामधे सामील न होता स्वतंत्र काम करणारे भारतात सुमारे २० हजार चर्च असून त्यांनीदेखील मोठ्या संख्येत धर्मप्रसाराच्या कामासाठी अनेक व्यक्तींच्या पगारी नियुक्त्या केलेल्या आहेत. प्रत्येक स्वतंत्र चर्चमागे किमान एक प्रिस्ट असा जरी विचार केला तरी निरनिराळ्या कामांसाठी या चर्चने भारतात नियुक्त केलेल्या पगारी लोकांची एकूण संख्या २ लाख ४६ हजारांच्या घरात जाते. (क्रमशः)
(दुहेरी नोकर्‍यांद्वारे सरकार आणि कंपन्यांची फसवणूक)

 चर्चचे वास्तव-११

दुहेरी नोकर्‍यांद्वारे सरकार आणि कंपन्यांची फसवणूक

चारुदत्त कहू
नागपूर, ११ सप्टेंबर
पत्रकारितेत एखादा पत्रकार विशिष्ट व्यक्तीच्या पे रोलवर असल्याचे वाईट अर्थाने बोलले जाते. या कन्सेप्टचा जर आधार घेतला तर अनेक ख्रिस्ती बांधव चर्चच्या पे रोलवर आहेत, असे छातीठोकपणे म्हणायला काहीच हरकत नाही. यातून अनेक ख्रिश्‍चन नागरिक एकाच वेळी दोन ठिकाणी नोकर्‍या करून आपापल्या कंपन्यांच्या, संस्थांच्या अथवा सरकारच्या डोळ्यात धूळ फेकत असल्याचे स्पष्ट होते. कुठलीही व्यावसायिक कंपनी अथवा सरकार आपल्या कर्मचार्‍याला दुसरी नोकरी करण्याची परवानगी देत नाही. मात्र, धर्मकार्याच्या गोंडस नावाखाली ख्रिश्‍चन व्यक्ती एकाचवेळी दोन-दोन संस्थांकडून पगार घेऊन मालामाल होत आहेत आणि पर्यायाने देशवासीयांची फसवणूक करीत आहेत. त्यांचा या दुहेरी फसवणुकीचा गुन्हा राष्ट्रद्रोहाच्याच मापदंडाने मोजला जायला हवा.
इतक्या मोठ्या संख्येतील चर्चद्वारे होणारे धर्मपरिवर्तनाचे कार्य आणि या संस्थांद्वारे संचालित शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणार्‍या संस्थांची आकडवारीसुद्धा या देशातील आम आदमीच्या ध्यानात यायला हवी. कॅथॉलिक चर्च भारतातील ७ हजार ६५० प्राथमिक शाळा, ४ हजार ५९६ उच्च प्राथमिक शाळा, १ हजार ४९४ उच्च माध्यमिक शाळा, ३२१ महाविद्यालये आणि वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी व्यावसायिक प्रशिक्षण देणार्‍या ८६५ शैक्षणिक संस्थांचे संचालन करतात. यावरून त्यांच्या कार्यपद्धतीची थोडक्यात कल्पना आल्याशिवाय राहात नाही.
चर्च ऑफ साऊथ इंडियातर्फे (सीएसआय) २ हजार शाळा, १३० महाविद्यालये, १०४ रुग्णालये आणि ५० ग्रामीण विकासाचे प्रकल्प चालविले जातात. याशिवाय भारताच्या विभिन्न भागांमध्ये युवकांसाठी ५० प्रशिक्षण केंद्रे आणि सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांसाठी ५०० निवासी वसतिगृहे चालविली जातात.
सिनोडिकल चर्च फॉर सोशल सर्व्हिसेस या सामाजिक संस्थेच्या छत्रछायेखाली चर्च ऑफ नॉर्थ इंडिया, सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करते. सीएनआयने प्रत्येक बिशपच्या अधिकारक्षेत्रात स्वतंत्रपणे समाजकार्य मंडळे स्थापन केली असून यामार्फत निरनिराळी कामे पार पाडण्यासाठी लोकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सीएनआयमार्फत ९ नर्सिंग महाविद्यालये, २५० शैक्षणिक संस्था, ३ तांत्रिक प्रशिक्षण संस्था संचालित केल्या जातात. सीएनआयने भारताच्या ८ निरनिराळ्या विभागांमध्ये स्थापन केलेल्या ६५ इस्पितळांचे संचालन सिनोडिकल बोर्ड फॉर मेडिकल सर्व्हिसेसमार्फत केले जाते. सेवन्थ डे ऍडव्हेंटिस्ट या संस्थेद्वारे २२६ शाळा आणि ५ महाविद्यालये चालविली जातात. पुण्याची सुप्रसिद्ध स्पायसर मेमोरियल ही त्यांचीच एक महत्त्वाची संस्था आहे. निरनिराळ्या चर्चचे संचालन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बिशप आणि प्रिस्टची गरज भासते. ती पूर्ण करण्यासाठी भारतभरात ख्रिश्‍चन धर्मशास्त्राचे शिक्षण देणारे अनेक उपक्रमही या संस्था-संघटनांमार्फत राबविले जातात.
चर्चची इतकी सारी कामे सांभाळण्यासाठी एका मजबूत संस्थात्मक जाळ्याची गरज असते. प्रत्येक बिशपच्या अधिकार क्षेत्रात येणार्‍या इतक्या मोठ्या संस्थांच्या संचालनासाठी चर्चची इमारत, मोठ्या जमिनी आणि त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मोठ्या निधीची गरज भासते. ही सारी कामे डायोशियन ट्रस्ट सोसायटीमार्फत (प्रतिष्ठान) केली जातात. प्रतिष्ठान म्हणजे एखादे सामाजिक काम करणारी संस्था अशी फसवणूक होण्याची शक्यता आहे. तथापि, ही संस्था कंपनी कायद्याच्या सेक्शन २५ अंतर्गत नोंदणी केलेली एक कंपनी असू शकते. उदाहरणच घ्यायचे झाले तर द नागपूर रोमन कॅथॉलिक डायोशियन कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे घेता येईल. एकीकडे १९१३च्या इंडियन कंपनीज ऍक्ट अंतर्गत कंपनी म्हणून नोंदणी करणार्‍या या संस्थेने १९५०च्या बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट अंतर्गतही नोंदणी केलेली आहे. या कंपनीचे मुख्य विश्‍वस्त आणि महासंचालक म्हणून आर्चबिशप हेच काम पाहतात. या दोन्ही ठिकाणी नोंदणी असल्यामुळे चर्चसाठी ते फायदेशीर ठरते. कारण त्यांना कुठल्याही व्यक्तीला अथवा समूहाला नोकर्‍या देता येतात, निधी गोळा करता येतो आणि तो निरनिराळ्या ठिकाणी गुंतवण्याचेही स्वातंत्र्य मिळते. (क्रमशः) उद्याच्या अंकात दुहेरी वेतन घेणारे मिशनरी

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी