Saturday, August 3, 2013

बाली हिंदू साम्राज्य

मध्यंतरीसर्व वर्तमानपत्रांत एक बातमी ठळकपणे झळकली, ती म्हणजे इंडोनेशियाने अमेरिकेला एक अतिभव्य सरस्वतीची मूर्ती दिली! सर्वांनाच आश्‍चर्य वाटले. एका इस्लामी देशाने ही मूर्ती कशी दिली? ही मूर्ती बालीला तयार करण्यात आली.खरंतर इंडोनेशियात सर्वत्र हिंदुसंस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. बाली हा इंडोनेशियातील एक प्रांत असून, पश्‍चिमेला जावा, तर पूर्वेला लोम्बोक ही बेटे आहेत. बालीला अनेक नावाने संबोधिले जाते जसे- ‘देवतांचे द्वीप’, ‘हिंदूंचे द्वीप’, ‘शांतिद्वीप’, ‘प्रणयद्वीप’ आणि ‘मॉर्निंग ऑफ द वल्डर्र्!’ आम्ही मे महिन्यात इंडोनेशियाला जाऊन आलो. बाली हे लहानसे बेट. एकंदर क्षेत्रफळ ५६२० चौरस किलोमीटर. पश्‍चिम-पूर्व १४० किलोमीटर, तर दक्षिण-उत्तर ८० किलोमीटर.

 बाली हे जकार्तापासून १२०० किलोमीटर. तेव्हा वेळेअभावी आम्ही विमानानेच जाण्याचे ठरविले. सकाळी साडेसहाच्या विमानाने निघून बालीच्या देनपसार (बालीची राजधानी) विमानतळावर साडेआठ वाजता उतरलो. विमानातूनच मला बालीचे दर्शन झाले अन् पहिला परिणाम झाला, तो थक्क होण्याचा! ते निसर्गनिर्मित शिल्प पाहून मी चकित झाले अन् वाटलं की, उगीच काही २०१० साली बालीला जगातील सर्वांत सुंदर व उत्कृष्ट बेटाचा पुरस्कार मिळाला नाही. आम्ही विमानतळाबाहेर येत असताना प्रत्येक ठिकाणी आम्हाला हिंदू देवतांच्या (राम, लक्ष्मण, सीता, सरस्वती, गणपती इत्यादी) दगडी व लाकडी- सुबक, रेखीव, अप्रतिम अशा मूर्ती दिसल्या. आम्ही विमानतळाबाहेर आलो. आमचे ज्या हॉटेलमध्ये रिझर्व्हेशन होते तेच आम्हाला बाली दाखवणार होते. त्यामुळे त्यांनी कार पाठविली होती. त्या गाडीचा चालक आमच्या नावाचा फलक घेऊन उभा होता. त्याच्यासोबत एक मार्गदर्शकही होता. मार्गदर्शकाने अंगरखा व लुंगी नेसली होती आणि डोक्यावर विशिष्ट पद्धतीची टोपी होती. त्याने, आम्ही हिंंदू असल्याचे ओळखले व पुढे येऊन आमचे स्वागत केले, तेही चक्क हात जोडून नमस्कार करून आणि म्हणाला, आम्हीपण हिंदू आहोत. तुम्ही आमच्या पूर्वजांच्या देशातून आलात. तो खूपच आनंदी आणि भारावून गेलेला दिसला.
 आम्ही कारमध्ये बसलो आणि आमच्या भ्रमंतीला सुरुवात झाली. आमचा मार्गदर्शक सतत बोलत होता. त्याची भाषा बाली होती. त्याला इंडोनेशियाची ‘बहासा’ ही भाषा येत होती. बालीला बरेच युरोपियन पर्यटक येत असल्यामुळे त्याला बर्‍यापैकी इंग्रजीसुद्धा येत होती. त्यामुळे आम्ही त्याच्याशी संवाद साधत होतो. बालीच्या पुढील सहलीत तर त्याने दुभाष्याचेही काम केले. तो सांगत होता, बाली हे हिंदूंचे बेट असून, येथे ९३ टक्के हिंदू, तर उरलेले मुसलमान, चिनी आणि ख्रिश्‍चन आहेत. विमानतळाबाहेर आल्यावर त्याने आम्हाला चौकातील अतिभव्य भीमाची मूर्ती दाखविली, तर तेथून ३ किलोमीटर अंतरावर घटोत्कचाची विशाल मूर्ती दाखविली आणि सांगितले की, हे दोघे बाली द्वीपाचे संरक्षण करतात, असा येथील लोकांचा समज आहे. पुढे त्याने, हातात धनुष्य-बाण असलेली अर्जुनाची सुंदर मूर्ती दाखविली. आमचा तेथील मुक्काम चार दिवस असल्यामुळे बरेच काही बघता आले.
 बाली हे खर्‍या अर्थाने देवतांचे द्वीप आहे. येथे भव्य अशी किमान दोन हजार हिंदू देवतांची मंदिरे आहेत. कुठल्याही पर्यटकाला ही सर्व मंदिरे बघणे शक्य नाही. आम्ही, वैश्‍विकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि सांस्कृतिक वारसा म्हणून युनेस्कोने मान्य केलेली नऊ मंदिरे बघण्याचे ठरविले. सर्वप्रथम आम्ही ‘पूरा तनाह लोत’ पाहण्यास निघालो. बाली भाषेत ‘पूरा’ म्हणजे मंदिर तर ‘तनाह लोत’चा अर्थ समुद्रातील भूमी. हे विश्‍वप्रसिद्ध हिंदू मंदिर बालीच्या दक्षिण-पश्‍चिम तटावर एका भव्य खडकावर असून, देनपसारपासून २० किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही येथे जाण्याकरिता निघालो. संपूर्ण रस्त्याने दोन्ही बाजूला घरे आणि घरामागे शेती अगदी आपल्या केरळप्रमाणे! रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर, कोरीव दगडाच्या, मातीच्या आणि लाकडाच्या विशाल, हिंदू देवतांच्या असंख्य मूर्ती विक्रीकरिता ठेवलेल्या दिसल्या. हे पाहत असताना २० किलोमीटर अंतर केव्हा संपले आणि ‘तनाह लोत’ आले हे कळलेसुद्धा नाही. या मंदिराची निर्मिती एका हिंदू पुजार्‍याने १५ व्या शतकात केली. हे मंदिर हिंदू आणि इंडोनेशियन वास्तुकलेचा अभूतपूर्व नमुना आहे. हे मंदिर समुद्रदेवतेचे असून, मंदिरात परवानगी काढून लुंगी नेसूनच जावे लागते. पुरुषांना डोक्यावर टोपी, तर स्त्रियांना डोक्यावर पदर घ्यावा लागतो. येथील पुजारी भाविकांच्या कपाळाला अक्षता व कानात चाफ्याची फुले खोचून आशीर्वाद देतात. हे मंदिर १९८० साली खचण्यास सुरुवात झाली होती. मात्र, जपानने ‘आठशे अब्ज इंडोनेशियन रुपय्या’ देऊन त्याची डागडुजी केली. आज मात्र हे मंदिर चांगल्या स्थितीत आहे. येथे सागरावर दिसणारा सूर्यास्त अप्रतिमच. रात्री आमच्या देनपसारच्या हॉटेलवर परत येताना एका भारतीय पद्धतीच्या हॉटेलमध्ये जेवणाकरिता गेलो. त्या हॉटेलचे नाव होते- ‘हॉटेल सिन्ता’ (सीता). हॉटेलसमोर सीतेची भव्य मूर्ती, तर संपूर्ण हॉटेलमध्ये भिंतीवर रामायणातील आणि महाभारतातील भव्य चित्रे होती. जेवण पूर्ण भारतीय पद्धतीचे आणि सुरेख होते. नंतर आम्ही कुटा बीचवरील आमच्या हॉटेलवर परत आलो. तेथेही रामायणातील भव्य चित्रे आणि हिंदू देवतांच्या सुरेख मूर्ती दिसल्या.
 दुसर्‍या दिवशी आम्ही पूरा बैसाकिह (बैसाकी) बघण्यास गेलो. हे मंदिर पूर्व बालीत अगुंग पर्वताच्या उतरणीवर असून, ते हजारो वर्षे जुने आहे. खरंतर येथे २२ मंदिरांचा समूह असून, ते एकमेकांना समांतर असे आहेत. यातील मुख्य मंदिर त्रिमूर्तीचे असून यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक म्हणून अर्धगोलाकार दगडी मूर्ती आहेत.एका मंदिरात कमळावर पद्मासनात अगुंग ऋषींची मूर्ती आहे.आम्ही मंदिरातून बाहेर आलो. तेथे आम्हाला एक अतिवृद्ध गृहस्थ भेटले. आम्हाला पाहून ते थांबले, आम्हाला पाहून त्यांना खूप आनंद झाला. ते हिंदू होते. ते बाली भाषेत बोलत होते त्याचा अर्थ आमचा मार्गदर्शक इंग्रजीत सांगत होता. त्यांनी प्रश्‍न केला, तुम्ही हिंदू ना? बहुधा आम्ही हिंदू असल्याचे त्यांनी ओळखले असावे. आम्ही आमच्या गाईडमार्फत त्यांना विचारले, अगुंग ऋषी कोण होते? ते म्हणाले, प्राचीन हिंदुस्थानात अंगीरस अथवा अंगिरा वज्रलोपन एक प्रसिद्ध हिंदू ऋषी होते. वैदिक साहित्यात त्यांचा उल्लेख मनु, ययाती, कण्व, अत्री इत्यादी ऋषींसोबत आढळतो. ते सप्तर्षी आणि १० प्रजापतींमध्ये गणले जातात. या बाबतचे त्यांनी दोन संस्कृत श्‍लोक म्हटले. त्यांना संस्कृत येत असल्याचे पाहून आम्हीतर अवाक्‌च झालो. जेव्हा आम्ही त्यांचा निरोप घेतला तेव्हा ते म्हणाले, माझी हिंदुस्थानला भेट देण्याची प्रबळ इच्छा आहे. मी ईश्‍वराला प्रार्थना केली की, यांची इच्छा पूर्ण होऊ दे.
 मग आम्ही अगुंग पर्वताजवळ असणारा जिवंत ज्वालामुखी बघण्यास गेलो. आता तो काहीसा शांत झालेला आहे. आम्ही तो ज्वालामुखी बघितला. १९९३ साली एका रात्री या ज्वालामुखीतून लाव्हा वाहू लागल्या. त्यात सतराशे लोक मृत्युमुखी पडले. त्या लाव्हा मंदिरापासून दहा मीटर अंतरावरून वाहत होत्या. पण, मंदिराला इजा पोहोचली नाही, हे आश्‍चर्यच आहे. केवळ येथील ईश्‍वरी अस्तित्वामुळेच मंदिराचे कुठलेही नुकसान झाले नाही, असा बालीवासीयांचा समज आहे. याची प्रचीती आम्हालासुद्धा परवाच्या उत्तराखंडमधील महाविनाशी पुराच्या वेळी आली. पूर्ण केदारनाथ मंदिराचा परिसर उद्ध्वस्त झाला, मात्र मंदिराची कुठलीही हानी झाली नाही. एक भव्य शिळा मंदिरामागे अडकते काय आणि संपूर्ण पुराचा प्रवाह मंदिराच्या दोन्ही बाजूने जातो! हे तेथील ईश्‍वरी अस्तित्वामुळेच घडले असावे, असा भाविकांचा समज आहे. आहे की नाही बालीवासी आणि आमची विचारसरणी सारखी! नंतर आम्ही कुटा बीचवर गेलो.
 तिसर्‍या दिवशी आम्ही ‘बटुबुलन’ या गावी गेलो. हे देनपसारपासून ८ किलोमीटरवर असून, कला आणि बाली नृत्याकरिता प्रसिद्ध आहे. तेथे रामायणातील विविध प्रसंग नृत्याद्वारे सादर केले जातात. कलाकारांचे पोषाख भारतीय पद्धतीचे असतात. बाली पर्यटनातील हे एक महत्त्वाचे स्थळ, ‘बरॉग’ नृत्याकरिता प्रसिद्ध आहे. हे नृत्य २५ ते ३० कलाकारांद्वारे रोज सकाळी ९ ते १०॥ तर संध्याकाळी ६ ते ७ सादर केले जाते. नंतर आम्ही ‘पूरा तामण सरस्वती’, ‘पूरा उलुवाटू’ आणि पूरा तीर्थ एमपूल बघितले. पूरा तीर्थ एमपूल हे १० व्या शतकातील असून, येथे कुंडात सतत चार झर्‍यांतून पवित्र पाणी पडत असते. बाली लोकांच्या मते हे पाणी भारतातील गंगा आणि यमुना नदीतून जमिनीखालून येते. येथे पवित्र स्नानाकरिता भाविकांची प्रचंड गर्दी असते- अगदी विदेशी पर्यटकांचीसुद्धा!
 बालीयन्स म्हणजे बालीवासी. मग तो कुठल्याही धर्माचा असो, त्यांच्या रोमारोमांतून हिंदू संस्कृती दिसून येते. जन्म, मृत्यू, मृतास अग्नी देणे, पुनर्जन्म, पूर्वजांचे स्मरण, वर्षभरातील अनेक सणवार- सारं काही आपल्याप्रमाणेच, मात्र थोड्याफार फरकाने आहे. तेथील हिंदू समाजाची रचना चातुर्वर्णीय, अगदी आपल्यासारखीच. कला, नाट्यकला, जीवननिष्ठा, जीवनाची मूल्ये आपल्याप्रमाणेच. सर्व घरे, हॉटेल्स, रेस्टॉरंट, दुकाने यांच्याबाहेर भव्य असा आकर्षक देव्हारा असतो, मात्र तो रिकामा असतो. त्यात फूल आणि नैवेद्य ठेवण्यात येतो. सर्व ठिकाणी दिवसात तीन वेळा पवित्र जल शिंपडून नैवेद्य बदलण्यात येतो. स्वच्छता आणि टापटीप सुंदरच असते.
 बालीतील महत्त्वाचे सण म्हणजे ‘गलुगन उत्सव’ व ‘नेपी’ हे फार मोठ्या प्रमाणात, निष्ठेने साजरे केले जातात. बालीयन्सचे वर्ष म्हणजे ‘शक’ हे २१० दिवसांचे असते. म्हणून आपल्या वर्षात त्यांचे हे सण सरासरी दोन वेळा येतात. मात्र, शासकीय आणि व्यापाराकरिता जॉर्जेरियन वर्षच पाळले जाते. ‘गलुगन’ हा उत्सव १० दिवस साजरा केला जातो. याचा उद्देश असतो- पूर्वजांचे स्मरण, त्यांच्यावरील प्रेम व निष्ठा. यात पूर्वजांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखविला जातो. म्हणजे आपल्याकडील ‘पितृपक्ष’ नाही का? दुसरा सण ‘नेपी’ म्हणजे हिंदूंच्या नवीन वर्षाची सुरुवात. या वर्षी १२ मार्चला नेपी आला. याचीही तुलना आपल्या गुढीपाडव्याशी होऊ शकते. याला शांतता दिन (‘डे ऑफ सायलेन्स’)सुद्धा म्हणतात. या दिवशी इंडोनेशियात राष्ट्रीय सुट्‌टी असते. या दिवशी सकाळी सहापासून दुसर्‍या दिवशी सकाळी सहापर्यंत मौन पाळले जाते. इतर धर्माचे लोकसुद्धा हा दिवस मौन पाळून साजरा करतात. या दिवशी कुणीही घराबाहेर पडत नाही. अगदी पर्यटनाकरिता आलेल्या प्रवाशांना सांगण्यात येते की, आज दिवसभर हॉटेलमध्येच राहा. दुसर्‍या दिवशी एकमेकांच्या भेटीगाठी घेतल्या जातात.
 बाली पर्यटनाकरिता प्रसिद्ध असल्यामुळे हॉटेल व्यवसाय, मूर्ती तयार करणे हे प्रमुख व्यवसाय. प्रमुख पीक म्हणजे तांदळाचे उत्पादन. याकरिता सुबक सिंचन पद्धतीचा वापर गेल्या एक हजार वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. या पद्धतीत ५०-६० किलोमीटर परिसरातील पाणी कृत्रिम तलावात एकत्र केले जाते आणि कालव्यामार्फत शेतीकरिता पुरविले जाते. मात्र, पाण्याचे व्यवस्थापन (वॉटर मॅनेजमेंट) हे तेथील मंदिरातील पुजारी करीत असतो. ही पद्धत ‘त्री हित करण’ या तत्त्वावर प्रचलित आहे. यात मानव, निसर्ग आणि ईश्‍वर यांचा आदर करा. ही पद्धत मुळची प्राचीन भारतातील. पूर्वीच्या काळी ऋषी, मुनी या पद्धतीचा वापर करीत असत. आता मात्र आपण ती विसरलो.
 बाली हे वस्त्रोद्योगाकरिताही प्रसिद्ध आहे. देनपसारजवळ सुलावेसी हे गाव वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध आहे. आम्ही तेथे एका दुकानात खरेदी केली. ते दुकान एका मुसलमानाचे होते. त्याच्याशी बोलताना जेव्हा त्याला त्याच्या व्यवसायाबद्दल, त्यातील स्पर्धा, बालीत कसे वाटते, याबाबत विचारले तेव्हा तो म्हणाला, वस्त्रोद्योग करण्याकरिता आमचे पूर्वज येमेनवरून, तर हिंदूंचे पूर्वज मध्यप्रदेशातून (भारत) आले. आम्ही सारे येथे सलोख्याने राहतो. आपापले धर्म आपापल्या घरी, बाहेर आम्ही सारे भाऊ-भाऊ. कुठल्याही समाजातील चांगल्या गोष्टी आम्ही घेतो. उदा. हिंदू समाजात मुलाचा जन्म झाला की, ‘मोचोपाट’ विधी करतात. तो विधी आम्हीही श्रद्धेने करतो. मी त्याला या विधीबाबत विचारले तर म्हणाला, या विधीचा उद्देश हाच आहे की, मुलगा झाला तर तो श्रीरामाप्रमाणे आणि मुलगी झाली तर ती सीतेप्रमाणे होवो. पुढे तो म्हणाला, आमच्या राष्ट्राच्या संस्कृतीतील ‘भिन्नेका तुंगल इका’ तत्त्वाप्रमाणे आम्ही सारे राहतो. याचाच अर्थ आहे- ‘आम्ही सारे भिन्न असलो तरी एक आहोत.’ म्हणजेच ‘विविधतेत एकता.’ नाहीतर आपल्याकडे नुकतेच वैष्णोदेवीचे नाणे काढले तरी त्याला विरोध होतो आणि इंडोनेशियात गणपतीच्या प्रतिमा असलेल्या नोटा चलनात चालतात किंवा त्यांनी सरस्वतीची मूर्ती भेट दिलेलीही चालते. असो.
 बालीच्या गोड आठवणी घेऊन परतीच्या प्रवासात मनात विचार आला की, बाली हेच एक सुरेख शिला आहे आणि अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांचे ग्रॅड कॅनियन या पर्यटन स्थळाबाबतचे म्हणणे आठवले ते म्हणाले होते, ‘‘निसर्गाने निर्मिलेल्या अप्रतिम शिल्पकृतीचा हा विस्मयकारक मनोहर चमत्कार आज आहे तसाच राहू द्या. तुम्ही यात कणभरसुद्धा भर घालू शकणार नाही. कालपुरुष स्वत:च ही कलाकृती घडवत आला आहे. माणूस तिचे स्वरूप फक्त बिघडवूच शकेल, तुम्ही फक्त एवढंच करू शकता की, ही निसर्गकृती पुढील पिढीकरिता जतन करू शकता.’’ आणि नेमकं बालीवासीयांनी हेच केलं. म्हणून आज बाली जगातील सर्वोत्कृष्ट बेट आहे.
 डॉ. प्रतिभा खिरे
 ९८२२८८१०६६
साभार - तरुण भारत 
03 Aug 2013 17:38:04

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी