Sunday, June 2, 2013

पुन्हा तोच प्रश्न : आंबेडकर की मार्क्‍स?

मधु कांबळे
आंबेडकरी चळवळीतील लढाऊ कार्यकर्ते किंवा तरुण नक्षलवादाकडे आकर्षित होत आहेत का, अशी एक गंभीर चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. या निमित्ताने दलित चळवळीमध्ये मार्क्‍सवाद की आंबेडकरवाद हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. विद्रोह हा आंबेडकरी चळवळीचा स्थायिभाव आहे. परंतु या चळवळीने कधीच उग्रवादाचे समर्थन केलेले नाही. दुसरीकडे  छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी नुकताच केलेला हल्ला या प्रश्नावर कायम गुळमुळीत भूमिका घेणाऱ्या काँग्रेससारख्या बडय़ा राजकीय पक्षाला आत्मचिंतन करायला भाग पाडणारा आहे.  नेत्यांवर हल्ला करण्याचे धाडस नक्षलवाद्यांना राजकीय कुरघोडीतूनच आल्याचे दिसत आहे. हिंसाचार कुठलाही असो, त्याविरुद्ध कणखर भूमिका घेणे गरजेचे आहे. केवळ काँग्रेसच नाही तर सर्वच राजकीय पक्षांनी अशी भूमिका घेतली तरच अशा चळवळी मोडून काढता येणे शक्य आहे..

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या क्रूर हल्ल्यात ३० हून अधिक जणांचा बळी गेला. नक्षलवाद्यांच्या विरोधात आदिवासी तरुणांची सलवा जुडूम नावाने सशस्त्र फौज उभी करणारा महेंद्र कर्माही हल्ल्यात ठार झाला. युद्धाने युद्ध संपत नाही, हिंसेने हिंसा मरत नाही, त्याचे हे ढळढळीत उदाहरण म्हणावे लागेल. क्रूरतेकडून क्रूरता आणि हिंसेकडून हिंसा हा न संपणारा प्रवास आहे. त्यावर योग्य उत्तर शोधण्याऐवजी त्या सरकारनेही बेकायदा सशस्त्र टोळीला पाठिंबा द्यावा, हा नक्षलवादापेक्षा महाभयंकर आणि आत्मघातकी प्रकार म्हणावा लागेल.
महाराष्ट्रात सध्या एका वेगळ्या संदर्भात नक्षलवादाची चर्चा सुरू आहे. आंबेडकरी चळवळीतील लढाऊ कार्यकर्ते किंवा तरुण नक्षलवादाकडे आकर्षित होत आहेत का, अशी एक गंभीर चर्चा सुरू आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन चालविल्या जाणाऱ्या कबीर कला मंच या सांस्कृतिक संघटनेच्या चार कलाकारांना त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपवरून अटक करण्यात आली आहे. कबीरचे कार्यकर्ते हे स्वत:ला विद्रोही कलाकार म्हणवून घेतात. अशा सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या विद्रोही संघटना नवीन नाहीत. त्यांची पूर्वी आंबेडकरवादी व मार्क्‍सवादी अशी थेट विभागणी केली जात होती. परंतु कबीर कला मंचचे कलावंत नाव आंबेडकरांचं घेतात आणि त्यांच्याच लोकशाहीविरोधी, अहिंसक मार्गाने परिवर्तन घडवून आणण्याच्या तत्त्वज्ञानाच्या विरोधात मार्क्‍सवादी क्रांतीचे विचार मांडले जात आहेत. ही फुले-आंबेडकर विचारांशी प्रतारणा आहे काय किंवा नव्हे काय?
महाराष्ट्रात मार्क्‍सवाद की आंबेडकरवाद हा काही नवीन वाद नाही. किंबहुना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कम्युनिस्ट का झाले नाहीत किंवा त्यांचा कम्युनिझमला विरोध का होता, असा प्रश्न भारतातील मार्क्‍सवाद्यांना पडला होता. परंतु आंबेडकरांची मार्क्‍सवादाबाबत नेमकी काय भूमिका होती, हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे कधी प्रयत्न केला का, हाही एक अद्यापपर्यंतचा अनुत्तरित राहिलेला प्रश्न आहे.
बाबासाहेबांनी १९१६ मध्ये मार्क्‍सवादासंबंधी केलेल्या वास्तववादी विवेचनानंतर एका वर्षांने रशियन राज्यक्रांती झाली. त्यानंतर भारतात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. हा क्रम लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे. बाबासाहेब हे भारतातील दलित-अस्पृश्य वर्गाचे नेतृत्व करीत होते. काय होती त्या वेळी भारतातील अस्पृश्यांची अवस्था? अस्पृश्य गरीब नव्हते का, ते भूमिहीन, शेतमजूर नव्हते का, त्यांचे शोषण-पिळवणूक होत नव्हती का, मग त्यांच्या मुक्तीसाठी आंबेडकरांनी मार्क्‍सवादी क्रांतीचा मार्ग का स्वीकारला नाही? त्याऐवजी ते संसदीय लोकशाहीच्या विचारांकडे का वळले?
रशियन कम्युनिस्ट राज्यक्रांतीने सारे जग भारावले असताना आणि जगात मार्क्‍सवादाशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना डॉ. आंबेडकरांनी मार्क्‍सला बुद्धाचा पर्याय देण्याचा प्रयत्न केला. मार्क्‍स म्हणतो, जगात पिळवणूक आहे, बुद्ध म्हणतो, जगात दु:ख आहे. बाबासाहेबांचे त्यांच्या आयुष्यातील २० नोव्हेंबर १९५६ चे बुद्ध की कार्ल मार्क्‍स हे अखेरचे भाषण आहे. बुद्धाने दु:ख हा शब्द दारिद्रय़, गरिबी या अर्थाने उपयोगात आणल्याचे बाबासाहेबांनी म्हटले आहे. म्हणजे शोषण किंवा दु:ख हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. मोह, हव्यास, लालसा, लोभ या प्रवृत्तींतून नफेखोरी आणि नफेखोरीतून भांडवलदारी आणि भांडवलदारीतून सर्वसामान्यांचे शोषण-पिळवणूक हे दुष्टचक्र सुरू होते. मार्क्‍सवादाच्या पिळवणुकीचे किंवा शोषणाचे मूळ मोहात किंवा लोभात आहे आणि बुद्धाच्या दु:खाचे मूळ तृष्णेत आहे. तृष्णा म्हणजेच हव्यास, लालसा, मोह, लोभ वगैरे. इथपर्यंत बुद्ध आणि मार्क्‍स समान किंवा समांतर वाटेवरून प्रवास करतात. मात्र शोषणमुक्तीचा किंवा दु:खमुक्तीचा मार्ग कोणता, या प्रश्नावर त्यांच्या वाटा वेगवेगळ्या होतात. शोषणमुक्त समाजासाठी मार्क्‍सला रक्तरंजित क्रांती हवी आहे, तर बुद्धाला समाजमन बदलून परिवर्तन घडवायचे होते. माणसांसाठी माणसे मारणे ही कसली क्रांती? प्रसिद्ध ग्रीक राजकीय तत्त्ववेत्ता प्लेटोने न्यायाची व्याख्या फार सुंदर केली आहे. माणसातील सद्गुण किंवा माणसाचे सद्वर्तन म्हणजे न्याय. असा न्यायी, सद्वर्तनी माणूस बनविणे ही खरी क्रांती. म्हणूनच हिंसेचा मार्ग अव्हेरून बाबासाहेब सामाजिक क्रांतीसाठी बुद्धाचा आणि लोकशाहीचा मार्ग स्वीकारतात. कोणत्याही शासनव्यवस्थेची एक मूलभूत विचारसरणी असते- राजेशाही, हुकूमशाही, लोकशाही आणि साम्यवादाचीही. मात्र अशी व्यवस्था निर्माण करण्याचे मार्ग भिन्न असतात किंवा आहेत. मार्क्‍सवाद समता प्रस्थापित करण्यासाठी हिंसेचे समर्थन करतो. त्याउलट शांततेच्या व अंहिसेच्या मार्गाने समाजबदल घडवून आणणाऱ्या विचारधारेतून लोकशाही शासनव्यवस्थेचा जन्म होतो. म्हणून आंबेडकरांनी प्रचलित साऱ्या लोकशाहीच्या व्याख्या नाकारून त्यांनी केलेली लोकशाहीची व्याख्या अधिक समर्पक आहे. लोकांच्या सामाजिक व आर्थिक जीवनात रक्तविहिन असा क्रांतिकारी बदल घडवून आणणारी शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही, ही त्यांची व्याख्या मार्क्‍सवादाच्या रक्तरंजित क्रांतीच्या नेमकी विरोधी आहे. बरे, त्यांनी स्वीकारलेल्या लोकशाही विचारप्रणालीतून या देशात काही बदल झाला आहे की नाही? कालच्या अस्पृश्यांच्या जीवनात काही परिवर्तन घडले आहे की नाही? अजून दारिद्रय़, शोषण, पिळवणूक पूर्णपणे संपली नसेल, परंतु ती संपण्याची प्रक्रिया चालू आहे की नाही? लेनिन व माओच्या क्रांतीनंतर रशिया व चीनमधील कामगार सुखी झाले का?
भारतीय राज्यघटनेने कामगारांना संरक्षण दिले आहे की नाही, असंघटित वर्गाचे अजूनही शोषण होत आहे, त्यासाठी कठोर कायदे करण्यासाठी मार्क्‍सवाद्यांचा लढा इतका ढिला का पडतो आहे? आणि जागतिकीकरण म्हणजे काय आहे, तर कामगार कायदे रद्द करणे. त्यासाठी लढून कामगारांना कायद्याने संरक्षण मिळवून देता येते, त्यासाठी क्रांतीची भाषा करून देशात केवळ अराजकता माजविण्यात कुणाचे हित आहे? रशियातील साम्यवाद संपला. चीनने मार्क्‍सला दूर लोटून मार्केटला कवटाळले. आता कोणता मार्क्‍सवाद शिल्लक राहिला आहे?
बाबासाहेबांच्या वेळी बुद्ध की मार्क्‍स हा वाद होता. आंबेडकरोत्तर कालखंडात दलित साहित्य, दलित चळवळ यांमध्ये हा वाद शिरला. आंबेडकरी साहित्यिक व कार्यकर्ते मार्क्‍सवादाचे समर्थक बनल्याने १९६०च्या दशकात प्रथम साहित्याच्या प्रांतात हा वाद चर्चेला आला. या वादात दलित साहित्यिकांमध्ये उघड-उघड दोन तट पडले. आंबेडकरवादी गटाचे राजा ढाले यांनी नेतृत्व केले. त्यांच्याविरोधात बाबुराव बागुलांपासून ते नामदेव ढसाळापर्यंत दिग्गज साहित्यिक होते. विशेष म्हणजे ढाले सुरुवातीला दलित साहित्याच्या संरक्षणासाठी धावले, मात्र त्यांनी नंतर त्याच साहित्याच्या विरोधात तलवार चालविली. दरम्यानच्या काळात आंबेडकरवाद की मार्क्‍सवाद यावरून दलित पँथर या लढाऊ संघटनेलाही फुटीने ग्रासले होते. साम्यवादी विचाराच्या काही लोकांपासून दलित पँथरला वाचविण्यासाठी ढालेंनी आंबेडकरी विचारांची ढाल पुढे केली. मात्र शेवटी पँथर फुटली आणि बरखास्तही झाली. परंतु दलित चळवळीत विशेषत: साहित्याच्या चळवळीत मार्क्‍स की आंबेडकर हा वाद कायम धुमसत राहिला. जे जे शोषित ते ते दलित असा दलित साहित्याच्या समर्थकांनी मार्क्‍सवादी दृष्टिकोनातून दलित साहित्याला व्यापक रूप देण्याचा प्रयत्न केला. परंतु दलित साहित्याच्या प्रेरणा कोणत्या, हा प्रश्न १९७६ मध्ये राजा ढाले यांनी दलित साहित्यिकांना विचारला आणि या साहित्याची आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य अशी मांडणी केली. मार्क्‍सवादी साहित्य ही संकल्पना सिद्धांतामधून उगम पावते, तर दलित साहित्य ही संकल्पना प्रत्यक्ष जीवनातून उगम पावते. दलित जीवनाची ही सामाजिक जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व त्यांच्या लढय़ांनी घडवलेली आहे. म्हणून दलित साहित्यातील सामाजिक आशय आंबेडकरी असतो. त्यांची ही भूमिका नंतर बऱ्याच लोकांनी उचलून धरली. आता त्यांनी फुले-आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य अशी मांडणी केली आहे. ढाले यांच्या या सुस्पष्ट आणि कणखर मांडणीनंतर साहित्यातील आंबेडकर की मार्क्‍स हा वाद काही प्रमाणात निवळला. परंतु विद्रोही साहित्य किंवा सांस्कृतिक कला मंच या नावाने सामाजिक -सांस्कृतिक क्षेत्रात पुन्हा मार्क्‍सवाद घुसू पाहतो आहे; तर कम्युनिस्टांप्रमाणेच राजकीय क्षेत्रात जात कायम ठेवून बहुजनवाद ही एक मार्क्‍सवाद्यांचीच नवी आवृत्ती पुढे आली आहे. म्हणजे आम्ही कम्युनिस्ट असतो म्हणजे कोण असतो, याचे सुप्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी त्यांच्या 'द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स' या कादंबरीत मार्मिक वर्णन केले आहे. त्यांनी म्हणजे कम्युनिस्टांनी सामाजिक-राजकीय क्रांतीचा एक कॉकटेल फॉम्र्युला तयार केला आहे. पौर्वात्य मार्क्‍सवाद आणि कडवा हिंदुत्ववाद यांचे एक मादक, कैफ आणणारे मिश्रण. शिवाय वरून चिमूटभर लोकशाहीची फोडणी. स्वत:ला केरळचे माओ म्हणवून घेणारे कम्युनिस्ट नेते नंबुद्रीपाद यांनी शेवटपर्यंत आपल्या गळ्यातील उपरणे खाली पडू दिले नाही. रॉय यांचे हे वर्णन अचूक नाही असे कोण म्हणेल?
आता याच परंपरेतील महाराष्ट्रातील काही कम्युनिस्टांनी मार्क्‍सला फुले-आंबेडकरांची जोड देऊन सत्य शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यात त्यांना अजून काही सत्य सापडलेले दिसत नाही, म्हणून त्यांनी आता आंबेडकरांनी राज्यघटनेत जातीअंताबद्दल काय उपाययोजना केली नाही, किंवा सामाजिक क्रांती कुणी करावी या प्रश्नावरच आंबेडकर थांबतात, आणि शूद्र पूर्वी कोण होते, या त्यांच्या संशोधनावर टीका करणाऱ्यांची तळी उचलून धरतात वगैरे. आणि ब्राह्मणी-अब्राह्मणी किंवा त्याचे सुधारित स्वरूप अभिजन-बहुजन अशी राजकीय मांडणी केली जात आहे. डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या पहिल्याच 'भारतातील जाती' या शोधनिबंधात भारतातील वर्ग हे जातीच्या पोलादी भिंतींमध्ये बंदिस्त आहेत, म्हणजे वर्गच कैदेत बंदिस्त आहे, तर वर्ग लढाई कोण करणार याची जाणीव करून दिली होती. आज तरी त्या वास्तवात काही बदल झाला आहे का? मार्क्‍सला तरी भारतातील जातिव्यवस्थेबद्दल काही देणे होते का? म्हणून अगदी मार्क्‍सवादाची फुटपट्टी लावून मोजायचा प्रयत्न केला तरी मार्क्‍सच्या दृष्टिकोनातून ब्राह्मणी-अब्राह्मणी हा वादच उद्भवू शकत नाही. म्हणजे ब्राह्मणी-अब्राह्मणी वादाचे नेतृत्व मार्क्‍सवर जबरदस्तीने लादले जात आहे. जोतिबा फुल्यांच्या नावाने ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळ चालविली जाते. मग फुले यांनी जातीविरहित समाजनिर्मितीसाठी सत्यशोधक समाजाची स्थापना का केली किंवा त्यांनी त्याला ब्राह्मणेतर समाज असे का म्हटले नाही? जोतिबांना जाती-पाती मोडून एकजिनसी समाजाची निर्मिती करायची होती. असे असताना जातींनी लडबडलेला ब्राह्मण-ब्राह्मणेतर असा वाद पेटविण्याचा आणि तो फुल्यांच्या नावावर खपविण्याचा प्रयत्न का केला जात आहे? बहुजन विरुद्ध अभिजन या वादाचे नेतृत्वही मार्क्‍स व फुले यांच्याप्रमाणे बाबासाहेबांकडे दिले जात आहे. ज्या संकल्पनेतून जाती नष्ट होत नाहीत, अशी संकल्पना बाबासाहेब कशी मांडू शकतील? बुद्धाकडे जाण्याचा त्यांचा काय हेतू होता? त्यांनी बुद्धाच्या विचारात जातीअंत आणि समता पाहिली, म्हणून अनेक जातींचे कडबोळे असलेला बहुजनवाद हा आंबेडकरवाद कसा काय असू शकतो? म्हणजे जे फुले-आंबेडकर-मार्क्‍सच्या नावाने ब्राह्मण-ब्राह्मणेतर, ब्राह्मणी-अब्राह्मणी किंवा बहुजन-अभिजन अशी जी मांडणी करतात ती मुळातच तकलादू, भंपक आणि बुद्धिभेद करणारी आहे हे सिद्ध होते. कारण असे की, अभिजन म्हणजे ब्राह्मण आणि बहुजन म्हणजे इतर सुमारे दहा हजार जातींचे लोक. जसे की, कम्युनिस्ट असणे म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा दहा हजार जातींपैकी कुणी नसणे असे आहे का, की त्यापैकी सारेच असणे असे आहे? त्याचप्रमाणे जात सोडून किंवा तोडून बहुजन आहेत का? तसे ते नसतील तर जाती घेऊन जातीअंताची लढाई कशी लढणार आणि अशी लढाई डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत होती का, तसेच जातीबद्ध बहुजनवाद हा आंबेडकरी विचारांच्या विरोधी नाही का, यावर चर्चा झाली पाहिजे.
विद्रोह हा आंबेडकरी चळवळीचा स्थायिभाव आहे. परंतु या चळवळीने कधीच उग्रवादाचे समर्थन केलेले नाही. आपल्या काव्यातून-गायनातून आंबेडकरी विद्रोह मांडणारे अनेक कलावंत होऊन गेले आणि आजही अनेक जण आहेत.
याच परंपरेतील प्रतिभावंत कवी-गायक वामनदादा कर्डक म्हणतात-
माणसा मी इथे तुझे गीत गावे,
असे गीत गावे तुझे हित व्हावे,
तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे,
तुझे दु:ख सारे गळुनी पडावे,
एकाने हसावे लाखाने रडावे,
जुने सारे सारे असे ना उरावे.
आणि कबीर कला मंचाचे व्यवस्थेविरुद्धचे हे एक गीत पाहा-
तुला गाडाया जनता उठलिया
लाल रंगाने ती नटलिया
हा आंबेडकरवाद आहे की मार्क्‍सवाद?
Published: Sunday, June 2, 2013 Loksatta

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी