Saturday, December 10, 2016

कन्याकुमारीहून गीता जयंती पत्र


कन्याकुमारीहून गीता जयंती पत्र

भगिनींनो आणि बंधूंनो,
सप्रेम नमस्कार

गीता जयंती जवळ येत आहे. साधारणपणे, आपण कुटुंबांचे एकत्रीकरण करून गीता जयंती साजरी करतो. गीता हा जीवनाच्या सरते शेवटी अभ्यासण्याचा ग्रंथ नाही. आपल्या जीवनाचे नेकमे उद्दिष्ट काय आणि ते जीवनात उतरवायचे कसे हे समजून घेण्यासाठी गीतेचा अभ्यास करायचा असतो. म्हणून अगदी लहानपणापासून गीतेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. गीता अभ्यासण्यासाठी घरापेक्षा दुसरे चांगले ठिकाण असू शकत नाही. गीतेमध्ये उपनिषदांचे सार आहे आणि गीतेतील अतिशय मूलगामी अशा विचारांनी केंद्र प्रार्थना बनलेली आहे. हे विचार लोकांपर्यंत न्यावे आणि या तत्त्वाच्या आधारे आपली जीवने घडावीत यासाठीच माननीय एकनाथजींनी विवेकानंद केंद्राची स्थापना केली आहे.
गीता माणसाला जीवनाचे संपूर्ण चित्र समजावून सांगते आणि जीवनात आपल्या वाट्याला जे काही येईल ते कर्तव्य म्हणून करायला शिकवते. गीता माणसाला त्याचे कर्तव्य करण्यासाठी प्रेरित करते. घरातील मोठ्यांकडे पाहून मुले शिकत असतात. कर्तव्य मनोभावे पूर्ण करण्याचे संस्कार घरातील वडीलधार्‍यांकडूनच होत असतात. परंतु, घरातील सदस्यांप्रती, समाज, राष्ट्र आणि संपूर्ण चराचर सृष्टीविषयी आपले कर्तव्य काय हे समजायचे असेल तर जीवनाविषयीचा आपला दृष्टीकोन पुरेसा स्पष्ट असणे आवश्यक असतो. भगवद्गीता आपल्याला ही दृष्टी देते.
गीतेत म्हटले आहे,
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योर्जुन । (6।32)
सर्व गोष्टींकडे स्वत:ची अभिव्यक्ती म्हणून पाहतो.
एकात्मतेची दृष्टी (व्हिजन ऑफ वननेस) ही माणसाला कुटुंब, समाज, राष्ट्र आणि सृष्टीकडे स्वत:चेच विस्तारित रूप म्हणून पाहण्यास शिकवते. त्यामुळे काय करावे आणि काय करू नये असा द्वंद्व निर्माण होतो तेव्हा माणूस आपल्या विस्तारीत रूपाच्या बाजूने कौल देतो. आपल्या केंद्र प्रार्थनेच्या सुरुवातीला हेच सांगितले आहे. जय जय परमात्मन्. (ईश्‍वराचा विजय असो.) म्हणजे विस्तारित ‘स्व’चा, उच्च स्वार्थाचा विजय असो; क्षुद्र ‘मी’चा नव्हे!
‘प्रजापती ब्रह्माने मानवजातीची आणि त्यासोबत यज्ञाचीही निर्मिती केली. जेणेकरून, मनुष्याच्या सार्‍या इच्छा पूर्ण होतील आणि तो सुखी होईल.’ (3।10)
मग, तो म्हणाला, ‘तुम्ही या यज्ञाद्वारे देवतांना उन्नत करा आणि त्या देवता तुम्हाला उन्नत करू दे. अशा प्रकारे निस्वार्थ भावनेने एकमेकांना उन्नत करत तुम्ही लोक परम् कल्याणाला प्राप्त व्हाल.’ (3।11)
यज्ञ म्हणजे काय ? यज्ञ म्हणजे निस्वार्थपणे, सर्वांच्या कल्याणासाठी आत्मसमर्पणाच्या भावनेने हाती घेतलेले कोणतेही काम. यज्ञ म्हणजे स्वत:, कुटुंब, जाती, समाज, राष्ट्र, सृष्टी यांच्यासाठी एखाद्या व्यक्तीने सेवा आणि समर्पणाच्या भावनेने झोकून देऊन केलेले कोणतेही काम. यज्ञ म्हणजे जीवनाच्या विस्तारत जाणार्‍या स्तरांचे (कुटुंब, जाती, समाज, राष्ट्र, संपूर्ण सृष्टी) पोषण करणे, त्यांना सामर्थ्य देणे.
व्यक्तीचे पोषण कुटुंबात होते; त्यामुळे तिच्या जाणीवांचा विस्तार सुरूवातीला कुटुंबात शक्य आहे. कुटुंब हे व्यक्तीच्या जीवनाचे विस्तारित आणि सहजरूप आहे. अशाच रीतीने, कुटुंबाचे विस्तारित रूप म्हणजे जात आणि त्यामुळे कुटुंब हे जातीशी एकोप्याने वागते. जातीचे विस्तारित रूप म्हणजे समाज. त्यामुळे जाती या समाजाचे पोषण करतात. समाजाचे अतिविस्तारित रूप म्हणजे राष्ट्र आणि त्यामुळे राष्ट्राचे पुनर्निर्माण आणि विकास करणे हे समाजाचे उद्दिष्ट बनते. राष्ट्राच्या अस्तित्वाचे उद्दिष्ट हे संपूर्ण सृष्टीच्या प्रगतीसाठी योगदान देणे हे आहे, कारण राष्ट्र हे जगाचाच एक भाग आहे.
संपूर्ण सृष्टी ही ‘स्व’ ची किंवा परमात्म्याची अभिव्यक्ती आहे. त्यामुळे परमात्मन् म्हणून आपल्या खर्‍या स्वरूपाची अनुभूती घेण्यातच एखाद्या व्यक्तीचा खरा विकास आणि विस्तार आहे. अनासक्त भावनेने आपल्यातील सारी उत्तमता वापरून कर्तव्य करण्यातूनच ही अनुभूती घेता येणे शक्य आहे. कोणतेही कर्तव्य प्रभावीपणे करण्यासाठी याहून वेगळी प्रेरणा असू शकत नाही. नाव नाही, प्रसिद्धी नाही; केवळ परमात्म्याची, आपल्या आतील अस्तित्वाची अनुभूती आणि कुटुंब, समाज, राष्ट्र व सृष्टी यासारख्या समूहातील समरसता, सुसंवाद हीच प्रेरणा. म्हणूनच, आपण आपल्या प्रार्थनेत म्हणतो, निजपरमहितार्थं कर्मयोगैकनिष्ठा:।
अशा प्रकारे मानवी जीवनाचे ध्येय हे या समूहांमध्ये व्यक्त झालेल्या आणि या सर्वांच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्त्वाशी एक होणे हे आहे. जीवन जगताना या सर्व व्यापक ईश्‍वरत्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच योग. हे आचरणात आणण्याचा मार्ग म्हणजे यज्ञ. एकात्मतेची दृष्टी (व्हिजन ऑफ वननेस) असणारी व्यक्ती ही सर्व प्रकारच्या विविधतांमध्ये अंतर्निहीत असलेल्या एकात्मतेचा गौरव करू शकते आणि त्यामुळे विविधतेला जपते, प्रोत्साहन देते; विविधता झिडकारून वा दाबून टाकत नाही. अशा प्रकारे केवळ यज्ञ किंवा योग जीवनशैलीतूनच सुसंवाद, समृद्धी नांदणे शक्य आहे. गीता आपल्याला हे शिकवते आणि म्हणूनच गीतेला जीवनात अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. जीवनातील एकात्मतेचा हा संदेश भारताने जगाला द्यायचा आहे. कुटुंब, जात, समाज, राष्ट्र आणि संपूर्ण सृष्टी यासारख्या स्वत:च्या विस्तारित अभिव्यक्तीचे पोषण आणि सहभाजन (शेअरिंग) यातून हे करावे लागेल. आज आपण पाहतोय की भारतासमोर अनेक बाहेरील आणि आतील धोके आहेत. दुर्दैवाने, आपण या आव्हानांशी तोंड देण्यात आणि ती ओळखण्यात एक राष्ट्र म्हणून कमी पडत आहोत. यासाठी राष्ट्रीयत्वाची भावना प्रबळ करणे आवश्यक आहे. आपल्या राष्ट्राचे उद्दिष्ट आणि राष्ट्रासमोरील आव्हाने याविषयी कुटुंबांमधून जागरूकता आणण्याची गरज आहे.
कुटुंबांमध्ये मुलांच्या शिक्षण आणि करिअरबाबत फार चांगली काळजी घेतली जाते. पण त्यांच्यामध्ये एकात्मतेची दृष्टी रूजवण्याचीही तेवढीच आवश्यकता आहे. मुलांना सांगण्याची गरज आहे की तुम्ही अमृताचे संतान आहात. सर्व शक्ती तुमच्यामध्ये विद्यमान आहे आणि तुमचा जन्म ईश्‍वरी कार्यासाठी झालेला आहे - वयं सुपुत्रा अमृतस्य नूनं तवैव कार्यार्थमिहोपजाता:।
हे विचार मुलांमध्ये  प्रयत्नपूर्वक रूजवले गेले, तर आपल्या दृष्टिकोनात प्रचंड सकारात्मक बदल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. जीवनात दृष्टीकोनाला फार महत्त्व आहे. कुटुंब म्हणजे केवळ माणसांचा समूह नव्हे; तो समाजाचा मूलभूत घटक आहे.
कुटुंबासमोर 3 उद्दिष्ट्ये आहेत.
1) धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यासाठी प्रयत्नशील राहणे हे कुटुंबाचे पहिले उद्दिष्ट.
2) सनातन धर्माची संस्थापना आणि संवर्धन करणे हे दुसरे उद्दिष्ट.
3) कुटुंबाच्या प्रयोजनामागे प्रजनन हेही एक उद्दिष्ट आहे. प्रजनन म्हणजे प्रकर्षेण जनन. अर्थात शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या आधीच्या पिढीपेक्षा सक्षम पिढी पुढे आणणे. थोडक्यात, जिथे माणसाची घडण आणि आणि राष्ट्र उभारणी शक्य आहे असे मूलभूत घटक म्हणजे कुटुंब.

गृहस्थाश्रम ही जीवनाची अशी पायरी आहे की जिथे माणूस वरील तीनही हेतु साध्य करण्यासाठी जोर लावू शकतो. आपण आपल्या कुटुंबाकडे योग्य पद्धतीने लक्ष दिले तर सांस्कृतिक आक्रमणाला तोंड देणे सहज शक्य आहे. वृद्धाश्रम, अनाथाश्रम आदी गोष्टी स्वार्थी कुटुंब, पराभूत समाज आणि कृतघ्न पिढीची लक्षणे आहेत.
आदर्श कुटुंबाचे पाच आयाम आहेत, असे आपण म्हणू शकतो.
1) सुखी : आनंदी आणि संतुष्ट.
2) स्वस्थ : आरोग्यदायी.
3) संपन्न : आर्थिक ओढग्रस्तता नसलेले आणि गरजा सहज पूर्ण होणारे.
4) संस्कारक्षम : योग्य जीवनमूल्यांद्वारे मुलांना घडवण्यासाठी सक्षम.
5) समाज धारणा : राष्ट्रीय जाणीवेने कार्यरत.

आम्ही कुटुंबाचा विचार केवळ सुखी, संपन्न या दोन आयामांपुरतेच करतो, इतर आयामांचा विचार करत नाही असे म्हणून चालणार नाही. हे सर्व आयाम परस्परपूरक आहेत. कुटुंबाने राष्ट्रीय सुरक्षेकडे दुर्लक्ष केले तर कुटुंबाचे सुख, आरोग्य आणि संपत्ती धोक्यात येऊ शकते. गीता जयंती कार्यक्रमाचे आयोजन करताना आपण या सर्वच आयामांवर लक्ष दिले पाहिजे. बहुतेक घरांमध्ये नियमित पूजा केली जाते. पण आता स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या जीवंत ईश्‍वराचीही पूजा करावी लागेल. हेच आपल्या केंद्र प्रार्थनेत सांगितले आहे...
निष्कामबुद्ध्यार्त विपन्नसेवा,
विभो ! तवाराधनमस्मदीयम् ।

हे व्यक्तीला लागू आहे तसे कुटुंबालाही लागू आहे. आपण आपल्या पोषणासाठी समाजाकडून घेतो, त्याहून अधिक समाजाला परत केले पाहिजे...
जीवने यावदादानं स्यात् प्रदानं ततोधिकम्... 

आदर्श कुटुंबासाठी काही कार्यबिंदू पुढीलप्रमाणे असू शकतात...
१. कुलदेवतेची नियमित पूजा, उपासना.
२. कुटुंबातील प्रत्येकाने नियमित ध्यान, स्नान आणि व्यायाम केले पाहिजे.
३. आठवड्यातून एकदा कुटुंबातील प्रत्येकास तैलस्नान. तसेच भजन, नामजप. कधीकधी मोकळे वातावरण राहण्यासाठी काही चांगल्या पुस्तकांचे एकत्रित वाचन. काही गोष्टी आणि पूर्वजांविषयी काही चांगले किस्सेही सांगता येतील. या सर्वांमुळे कुटुंबाचे शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक पोषण होते.
४. पंधरवड्यातून एका दिवशी एकवेळ उपास करता येईल. हा दिवस एकादशी किंवा पौर्णिमा आणि अमावस्येचा निवडता येईल. हे अमृत सुरभीसारख्या उपक्रमांशीही जोडता येते. गरीबांसाठी रोज मूठभर धान्य/पीठ बाजूला काढून ठेवणे हा चांगला संस्कार आहे.
५. सर्व सांस्कृतिक उत्सव अर्थपूर्ण पद्धतीने आणि काळाची गरज ओळखून साजरे करणे - यामुळे सणांचे औचित्य राहते.
६. वर्षातून एकदा आई - बाबा, आजी - आजोबा यांच्यासह मुलांना घेऊन एखाद्या तीर्थस्थानी किंवा आध्यात्मिक ठिकाणी, आश्रम आदी ठिकाणी जाऊन राहणे.
७. समाजात चालणार्‍या चांगल्या कार्याशी कुटुंब जोडलेले असले पाहिजे; समाजातील इतरांसोबत मिळून काम करण्याचा अनुभव मुलांना मिळाला पाहिजे. समाजाच्या भल्यासाठी हे आवश्यक आहे.
८. मुलांना केवळ माहिती आणि कर्मकांड शिकवून चालणार नाही. त्यांची दृष्टी विकसित झाली पाहिजे. भावनांचा विकास झाला पाहिजे. चालू घडामोडी आणि आव्हानांविषयी त्यांना जागरूक बनवले पाहिजे. यासाठी खोट्या प्रतिष्ठेच्या मागे न लागता आपल्या घरी येणारी पुस्तके, नियतकालिके यांची काळजीपूर्वक निवड केली पाहिजे.

अशा प्रकारे, गीता जयंतीनिमित्त होणार्‍या कुटुंब एकत्रीकरणाच्या कार्यक्रमात व्याख्याने, चर्चा, खेळ, गीतेतील श्‍लोक आणि विचारांवर आधारित स्पर्धा आदींचे आयोजन करता येईल. कुटुंबात राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांना महत्त्व मिळू लागल्याने कुटुंबातील इतर किरकोळ समस्याही आपापल्या ठिकाणी राहतात आणि कुटुंबात एकोपा नांदण्यास मदत होते. केंद्राशी संबंधित सर्व कुटुंबांचे खेळीमेळीच्या वातावरणात एकत्रीकरण करून तिथे सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जागरुकतेवर भर देता येईल. मनुष्य निर्माण आणि राष्ट्र पुनरुत्थानाच्या दिशेने टाकलेले हे मोठे पाऊल असेल. यातून अशा समाजाच्या विकासाला हातभार लागेल की जिथे सर्व प्रकारची विविधता आपली भिन्न भिन्न वैशिष्ट्ये आणि समृद्धीसह एकत्र येईल.
एकात्मतेची विशाल दृष्टी (ग्रँड व्हिजन ऑफ वननेस) येथे साकार झालेली असेल. स्वामी विवेकानंदांचे विचार सत्यात येतील.
स्वामी विवेकानंद म्हणतात,
मी भविष्यकाळात डोकावून पाहात नाही. तसे करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण एक चित्र माझ्या दृष्टीपुढे साक्षात् उभे राहते : ही प्राचीन माता पुन्हा एकदा जागी झाली आहे. सर्व वैभवासह पुनश्‍च आपल्या सिंहासनावर आरुढ झाली आहे.
शांतिमंत्राने आणि आशीर्वचनांनी तिचे आगमन जगापुढे प्रकट करू या!


बी. निवेदिता
राष्ट्रीय उपाध्यक्ष, विवेकानंद केंद्र, कुन्याकुमारी

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी