Friday, August 27, 2010

... अन्‌ मी पुन्हा चालू लागलो

जीबीएस'च्या विळख्यात भाग -3
महिन्याभराने माझं मला स्वत:ला बेडवरून उठता येऊ लागलं होतं. पाय बेडवरून खाली सोडून बसता येत होतं, पण जमिनीवर अजून बसता येत नव्हतं. पाठीवर झोपून झोपून डोक्याचे मागील केस उडाले होते. सेरेना मॅडम चिकाटीने आवश्यक ते व्यायाम प्रकार करवून घेत होत्या. महिन्याभराने मला मोबाईलवर दोन-चार अक्षरं दाबायला येऊ लागलं होतं. हातात अजूनही पेन धरता येत नव्हतं. स्वत:च्या हाताने जेवताही यायचं नाही.

Sunday, August 22, 2010

@ post Yashodhara Hospital


"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने   (जीबीएस'च्या विळख्यात भाग -1)

मु. पो. यशोधरा हॉस्पिटल  (जीबीएस'च्या विळख्यात भाग - 2)

... अन्‌ मी पुन्हा चालू लागलो  (जीबीएस'च्या विळख्यात भाग -3 )

मु. पो. यशोधरा हॉस्पिटल


"जीबीएस'च्या विळख्यात भाग - 2

रोगापासून मनुष्याला वाचविण्याचे उपाय शोधण्याच्या कामापेक्षा मनुष्याचे जीवन नष्ट करणारी असंख्य निमित्ते जगात असूनही "मनुष्य जगतो कसा?' याचे अध्ययन जास्त गुंतागुंतीचे आणि चित्तवेधक आहे.- स्टीफन बॉईड (शरीरविकृती शास्त्रज्ञ)

प्लाजमा शरीरात घालण्याची क्रिया सुरू झाली आणि मी घाबरून गेलो। डोळे उघडे ठेवणेही अशक्य झाले. त्रास होतोय हे सांगण्यासाठी तोंड उघडणेही कठीण होतं. संपूर्ण शरीरात जणू भूकंप सुरू होता. शरीर जोरजोरात हलू लागले आहे, शरीराचे सारे अवयव तुटून हृदयात घुसण्याच्या प्रयत्नात आहेत. शरीर कागदाप्रमाणे "टू डायमेन्शनल' बनत आहे, असं प्रकर्षाने वाटू लागलं. डोळे किलकिले करून पाहतो तर बाहेरून सारं शरीर शांत आहे, हे ध्यानात आलं, परंतु संपूर्ण शरीरात तांडव सुरू होतं...


सहा-सात वर्षांपूर्वी मी बी.एस्सी.च्या शेवटच्या वर्षाला शिकत होतो तेव्हाची गोष्ट आहे. घरचा दुधाचा व्यवसाय तोट्यात गेला होता. मी सोलापुरात खोली करून शिक्षण घेत होतो. वडील नेहमीप्रमाणे भेटायला आले होते. नेहमी परत जाताना वडील माझ्या हातावर दोन-चारशे रुपये टेकवायचे; आज त्यांनी खिशात हात घातला, परंतु खिसा रिकामा होता. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्या पोटात कालवाकालव झाली. केवळ 20-25 रुपयांसाठी वडील आता दिवसभर राबत होते. जवळच्याच लोकांनी फसवल्यामुळे दुधाचा व्यवसाय पार निकालात निघाला होता. नागपंचमीला बहिणीला घरी आणायचे तरी प्रवासासाठीचे शंभर-दोनशे रुपये उसने घ्यावे लागत होते. अशा स्थितीत घरचा भार आता आपण घ्यायचा असे मी ठरविले आणि मिळेल ती नोकरी करू लागलो होतो.
सावकाराचे कर्ज फेडून शेत आमच्या नावे करून घेतले. बहिणींच्या लग्नाचे कर्ज फेडले. चारही बाजूंनी पडलेले घर बांधून घेतले. शेतातल्या विहिरींचे पाईपलाईन्स केले. दरम्यान पत्रकारिता पदवीचे शिक्षण घेतले. भावकीच्या जीवघेण्या छळाशी दोन हात केले. सहा-सात वर्षे यातच गेली. आता कुठे मोकळा श्वास घेतोय असे वाटेपर्यंत "जीबीएस'ने घेरले होते. आता माझ्या खात्यात 761 रुपये शिल्लक होते आणि तरुण भारत-विवेकानंद केंद्रातील जीवभावाचे सहकारी साथीला होते.
चार-पाच हजार रुपये खर्च येईल असा सुरुवातीचा अंदाज होता, तो आता तीन-चार लाखांपर्यंत जाईल असे समजले होते. एकीकडे पैशांची जुळवाजुळव आणि दुसरीकडे क्षणाक्षणाला गंभीर होत असलेली स्थिती असे हे दुहेरी आव्हान होते. मोकळेपणाने सांगायचे तर रुग्ण आता वाचणे अवघड आहे याची बहुतेकांना कल्पना आली होती. त्यामुळे निकराचे प्रयत्न सुरू होते.
"जीबीएस' हा आजार कोणालाही, कधीही, कोणत्याही वयात होऊ शकतो. या आजारात रोगप्रतिकारक शक्तीच आपल्यावर हल्ला करते. या हल्ल्याचा सर्व रोख मज्जासंस्थेवर असतो. हा आजार मज्जासंस्थेवर चढत्या क्रमाने हल्ला करतो. त्यामुळे मज्जातंतू मेंदूकडून येणाऱ्या कोणत्याही हालचालीसंबंधी आज्ञा मानण्यास असमर्थ ठरतात. स्वत:चीच रोगप्रतिकारक शक्ती बंड करीत असल्याने त्यासाठी रोगनिवारण करणारी कोणतीही प्रतिजैविकं असणारी औषधोपचार यंत्रणा नाही.
आणखी सोप्या भाषेत सांगायचे तर आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी सुरक्षा रक्षक आहे. रात्री घरात दरोडेखोर शिरले आहेत म्हणून रक्षक गोळ्या झाडतोय, परंतु घरातल्याच लोकांचा बळी जातोय असाच काहीसा प्रकार इथे आहे.
आपल्या शरीरात बाहेरून एखादा विषाणू आला तर आपल्या रक्तातील पांढऱ्या पेशी सैनिक तयार करतात, म्हणजे प्रतिजैविके (ऍंटिबॉडीज्‌) तयार करतात. ही प्रतिजैविके बाहेरून आलेल्या विषाणूंवर हल्ला करून त्यांचा नाश करतात, परंतु जीबीएस या आजारात मात्र प्रतिजैविके विषाणूंवर हल्ला करण्याऐवजी आपल्या मज्जातंतूंवर हल्ला करतात. मज्जातंतूंवर मायलीन नावाचा एक थर असतो. तो या हल्ल्याने विरघळू लागतो म्हणजेच हा आजार.
सुरुवातीला इम्युनोग्लोब्युलीन थेरपी देणार असल्याची चर्चा होती. यामध्ये देण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सचीच किंमत दीड-दोन लाखांपर्यंत असते. पहिल्याच दिवशी किशोरजींनी गुजरात राज्याच्या व्हायरोलॉजी संस्थेचे प्रमुख डॉ. उपाध्याय यांच्याशी बोलणी केली होती. (किशोरजी हे जीवनव्रती कार्यकर्ते असून, ते विवेकानंद केंद्राचे अखिल भारतीय सहमहासचिव आहेत.) तिकडून इंजेक्शन्स पाठविण्याची व्यवस्था झाली होती. मज्जातंतूंवर होणारा हल्ला त्वरित रोखण्यासाठी ही थेरपी वापरली जाते, परंतु याचे "साईड इफेक्टस्‌' असतात. त्यामुळे कदाचित "प्लाजमा फेरसिस' उपचार करायचे ठरले असावे.
प्लाजमा फेरसिस या उपचार पद्धतीमध्ये रक्तातून प्लाजमा बाजूला केला जातो आणि नवीन प्लाजमा दिला जातो. दोन-तीन दिवसांच्या अंतराने तीन ते सातवेळा प्लाजमा फेरसिस केला जातो. मला एकूण सात वेळा प्लाजमा फेरसिसला सामोरं जावं लागलं. ही प्लाजमा फेरसिस म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू पाहणंच असतं, असा माझा अनुभव आहे.
15 ऑगस्टची संध्याकाळ. शेवटंचं पाहून घ्यावं, म्हणून गावाकडचे परिचित, नातेवाईक आणि इतर लोक येऊन पाहून जाताहेत. अतिदक्षता विभाग असल्याने सुरक्षा रक्षक दोन मिनिटांपेक्षा अधिक वेळ कुणाला थांबू द्यायला तयार नाही. माझी केवळ विचार करण्याची क्षमताच शाबूत आहे; उर्वरित शरीर प्राण असूनही निपचित होतं. अचानक भेटायला येणाऱ्यांना थांबविण्यात आलं. डॉक्टर शस्त्रसज्ज होऊन आले. "गळ्याच्या इथे थोडं काम आहे. थोडा त्रास होईल, काही नाही', असे ते म्हणाले. आता येईल त्या स्थितीला सामोरे जाण्यासाठी मनाची तयारी मी कधीच केली होती. थोडा अधिक त्रास व्हायचा तेव्हा मी श्वासासोबत मनातल्या मनात ओम्‌कार उच्चारण करीत असे. माझ्या गळ्यातून एक वीतभर लांब नळी हृदयाच्या दिशेने घालण्यात आली. याला डॉक्टरी भाषेत "सेंट्रल लाईन' टाकणे म्हणतात. हृदयाकडे रक्त घेऊन येणाऱ्या मुख्य वाहिनीमध्ये या नळीचे दुसरे टोक होते, हे मला नंतर एक-दोन महिन्यांनी एक्स रे पाहिल्यानंतर समजले. परंतु तेव्हा मला नळी "इन्सर्ट' करताना तेवढा त्रास झाला नाही. कदाचित तेवढ्याच भागाला भूल दिली असण्याची शक्यता आहे.
"सेंट्रल लाईन' टाकल्यानंतर माझ्या बेडजवळ एक मशिनरी आणण्यात आली. हीच ती प्लाजमा फेरसिसची मशीन. डायलेसिस करण्यासाठीही याच मशीनचा वापर करण्यात येतो, हे मला नंतर समजलं. वैद्यकीय क्षेत्राशी माझा तसा फारसा संबंध याआधी आलाच नव्हता. कुणी आजारी असेल आणि भेटायला गेलो की, पंधरा मिनिटे-अर्धा तास इतकाच तो संबंध. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची ही माझी पहिलीच वेळ. याआधी कधी सलाईन लावल्याचंही आठवत नाही. त्यामुळे आता पडल्या पडल्या वैद्यकीय परिभाषा, हॉस्पिटलमधली यंत्रणा समजावून घेण्याचा प्रयत्न करीत होतो.
गळ्यातून जी नलिका खुपसण्यात आली होती, तिला दोन नलिका जोडण्यात आल्या. एक त्या मशिनरीकडे जाणारी आणि दुसरी परतणारी. मशिनरी सुरू झाली. एका नळीतून वेगाने रक्त मशिनरीत जात आहे आणि दुसरीतून पुन्हा शरीरात. याचवेळी सलाईनही सुरू आहे. साधारण अर्ध्या तासाने काही क्षण ही प्रक्रिया थांबली आणि प्लाजमाच्या तपकिरी रंगाच्या पिशव्या एकामागोमाग एक अशा जोडण्यात येऊ लागल्या. त्रास होऊ लागला की सांगा, असं सांगण्यात आलं. प्लाजमा शरीरात घालण्याची क्रिया सुरू झाली आणि मी घाबरून गेलो. डोळे उघडे ठेवणेही अशक्य झाले. त्रास होतोय हे सांगण्यासाठी तोंड उघडणेही कठीण होतं. संपूर्ण शरीरात जणू भूकंप सुरू होता. शरीर जोरजोरात हलू लागले आहे, शरीराचे सारे अवयव तुटून हृदयात घुसण्याच्या प्रयत्नात आहेत. शरीर कागदाप्रमाणे "टू डायमेन्शनल' बनत आहे, असं प्रकर्षाने वाटू लागलं. डोळे किलकिले करून पाहतो तर बाहेरून सारं शरीर शांत आहे, हे ध्यानात आलं, परंतु संपूर्ण शरीरात तांडव सुरू होतं. ही स्थिती मी सहनच करू शकत नव्हतो. परंतु यातून सुटण्याचाही काही मार्ग नव्हता. तेव्हा ते सहन करण्याशिवाय काहीच करता येत नव्हतं. ही स्थिती आता संपेल मग संपेल म्हणून वाट पाहू लागलो. शेवटचे ब्रह्मास्त्र काढले- शरीराकडे त्रयस्थपणे पाहायचे. श्वास घेताना आणि सोडताना मनातल्या मनात ओम्‌ म्हणायचे. साधारण पाऊण तासापर्यंत ही स्थिती होती. देव करो अशी स्थिती अनुभवण्याची वेळ कुणावर येऊ नये, परंतु ही स्थिती किती वेदनादायी आणि मृत्यूची तोंडओळख करून देणारी आहे हे त्या स्थितीत गेल्याशिवाय इतरांना कळणे शक्य नाही.
यात नेमकं काय होतं की, शरीरातून रक्त जेव्हा त्या मशिनरीत जाते तेव्हा तिथे रक्तातून केवळ प्लाजमा की ज्यात अँटीबॉडीज आहेत ते रक्तापासून वेगळं केलं जातं आणि उर्वरित द्रव शरीरात पाठविला जातो. मग नवीन प्लाजमा शरीरात सोडला जातो. नवीन प्लाजमा कमी तापमानात साठविलेलं असतं. ते शरीरात पाठवताना रुग्णाला खूप थंडी वाजू लागते. प्रचंड त्रास होतो. हे खरं असलं तरी तिथल्या टेक्निशियनसाठीही हा युद्धाचाच प्रसंग असतो. मिनिटामिनिटाला रुग्णाचा रक्तदाब तपासावा लागतो. कारण या स्थितीत रक्तदाब स्थिर ठेवणंही एक आव्हान असतं. रक्तदाब कमी होऊ लागला की सलाईनचं प्रमाण अधिक केलं जातं. याचवेळी 25 हजार युनिट्‌स हिपॅरिन नावाचं अँटीकोऍग्युलंट शरीरात सोडलं जातं. रक्ताच्या गाठी होऊ नयेत यासाठी याचा उपयोग होतो.
अशा रीतीने प्लाजमा फेरसिसचे पहिले दिव्य यथासांग पार पडले. प्लाजमाचे पाच पॅक पहिल्या दिवशी कामी आले. पूर्ण सात वेळा फेरसिस करेपर्यंत 34 पॅक लागले. प्लाजमा वेळेत उपलब्ध होणं सर्वात महत्त्वाची निकड होती. डॉ. हेडगेवार रक्तपेढी यावेळी धावून आली. आमचे मित्र राजेश तोळबंदे, डॉ. संजय देशपांडे आणि रक्तपेढी व्यवस्थापन यांची मोलाची मदत यावेळी झाली.
आता प्लाजमा फेरसिसचा पहिला राऊंड पार पडला होता. "जीबीएस' हल्ला रोखून धरण्यात आता यश येत होतं, परंतु अजून खूप मोठा पल्ला पार करायचा होता. डॉ. बसवराज कोलूर दररोज येऊन भेटून विचारपूस करायचे. डॉ. शिवपुजे दिवसातून दोनदा भेटायचे. त्यांच्या भेटण्याने थोडा आधार वाटायचा. धीर यायचा. ज्यांचे जीवन पाहून आम्हाला योग्य मार्गावर चालायची प्रेरणा मिळत आलीय ते आदरणीय किशोरजी आणि भानुदासजी (विवेकानंद केंद्राचे महासचिव) यांची भेट या काळात मानसिक आधार देणारी ठरली.
धावून आले मदतीचे हात
उपचार खर्चाचा फुगणारा आकडा सर्वसामान्य कुटुंबाला न पेलणाराच होता. यावेळी मदतीचे अनेक हात धावून आले. आजाराच्या विळख्यातून बाहेर आल्यानंतर थोडा मागोवा घेतला तेव्हा ध्यानात आले की, मदतीला धावून आलेल्यांमध्ये परिचित आहेत तसे अपरिचितही आहेत. ज्या व्यक्तीचा मासिक पगार 3 हजार रुपयेही नाही तिने तीन हजारांची मदत आपले नाव कुठेही येणार नाही या रीतीने केली होती.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून अनेकांनी यथाशक्ती मदत पाठविली होती. राष्ट्रीय विचारासाठी काम करणाऱ्या एका तरुणाला मदत करावी हीच त्यामागची त्यांची भावना होती. मुंबईच्या एका सद्‌गृहस्थाने पदरचे 30 हजार रुपये देऊन नंतर आपल्या परिचितांकडून मदत एकत्र केल्याचेही कळले. मदतीला धावून आलेल्या या संघ परिवारातील व विवेकानंद केंद्र परिवारातील कार्यकर्त्यांची नावे येथे देऊन त्यांना मी अपमानीत करू इच्छित नाही, परंतु ते ऋण कसे विसरू?
राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यास-नवी दिल्ली, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, प्रिसिजन उद्योग आदी संस्थाही मदतीला धावून आल्या. विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते आणि तरुण भारतच्या संपादक-संचालकांसह सहकारी पत्रकार बंधू सतत 12 महिने साथीला होते म्हणूनच माझा हा पुनर्जन्म सुखकर झाला.
या 12 महिन्यांतल्या आठवणींनी मनात गर्दी केली आहे. त्या साऱ्याच कागदावर उतविणे योग्यही होणार नाही, म्हणून काही निवडक आठवणी सांगून पुढील आसमंतमध्ये या लेखमालेला पूर्णविराम देणार आहे.
(क्रमश:)

"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने   (जीबीएस'च्या विळख्यात भाग -1)

मु. पो. यशोधरा हॉस्पिटल  (जीबीएस'च्या विळख्यात भाग - 2)

... अन्‌ मी पुन्हा चालू लागलो  (जीबीएस'च्या विळख्यात भाग -3 )

Friday, August 13, 2010

"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने


हा जीबीएसचा आजारच मोठा चमत्कारिक आहे. सगळे आजार रोगप्रतिकार शक्तीच्या कमतरतेमुळे होतात, तर म्हणे हा आजार रोगप्रतिकारक शक्तीने केलेल्या हल्ल्यामुळे होतो. मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात आणि हळूहळू फुफ्फुसं आणि श्वसननलिकेवरही हल्ला करतो. लाखात केवळ दोन-चारजणांना होणारा हा आजार! या आजारानं मला पछाडलं होतं. त्या गोष्टीला आज 15 ऑगस्ट 2010 ला बरोबर 1 वर्ष झालं. हा भयंकर आजार पूर्णपणे बरा व्हायलाही काही महिन्यांपासून ते दीड-दोन वर्षांचा कालावधी लागतो. गेल्या वर्षभरात मी ज्या स्थितीतून गेलो. त्याबद्दल काही सांगावं म्हणून हा लेखन प्रपंच.ऑक्टोबर 2009 चा महिना असावा. सकाळी 8 ची वेळ. समोरच्या खिडकीत वृत्तपत्र खोचल्याचं दिसलं. एकटाच होतो. समोरच्या खुर्चीच्या आधाराने खाटेवरून तोल सांभाळत उभा राहिलो, पण त्यासाठी सर्व शक्ती एकवटावी लागली. डोंबाऱ्याच्या मुलीने दोरीवरून तोल सांभाळत चालावे तसे सर्व लक्ष केंद्रित करून 5 फुटांचं अंतर दहा पावलांत कापलं. तरुण भारतचा अंक हाती घेतला. एक खोली ओलांडून पलीकडच्या कार्यालयाच्या खुर्चीत बसून वाचावं म्हणून चालू लागलो. कार्यालयाच्या दरवाजाच्या आधी कॉम्प्युटर ठेवलेला आहे. तिथे आल्याबरोबर मी कॉम्प्युटरच्या स्टॅबिलायझरवर कोसळल्याचं ध्यानात आलं. डोक्याला लागलं नाही, पण त्या टेबलाच्या खालच्या भागात अडकलो होतो. हळूहळू अंग काढून घेतलं. बसण्याचा प्रयत्न करू लागलो, पण बसता आले नाही. उभे राहण्याचा तर प्रश्नच नव्हता. पलंगावरून आधार घेऊन उठता येऊ लागलं होतं, पण जमिनीवर नाही. आता कार्यालयात निम्मं आणि कॉम्प्युटर रूममध्ये निम्मं शरीर टाकून पालथं पडून राहिलो, शेजारी पडलेल्या वृत्तपत्रावरून नजर टाकत. या स्थितीचं राहून राहून मलाच हसू येत होतं. कुणी कार्यकर्ता येईपर्यंत मला असंच पडून राहावं लागणार होतं. पंधराएक मिनिटांनी श्रीनिवास दादा आला. त्याने उचलून उभं केलं. जीबीएसचा आजार होऊन आता मला दोन-अडीच महिने होत आले होते.
हा जीबीएसचा आजार मोठाच चमत्कारिक आहे! सगळे आजार रोगप्रतिकार शक्तीच्या कमतरतेमुळे होतात, तर म्हणे हा आजार रोगप्रतिकारक शक्तीने केलेल्या हल्ल्यामुळे होतो. मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात आणि हळूहळू फुफ्फुसं आणि श्वसननलिकेवरही हल्ला करतो. लाखात केवळ दोन-चारजणांना होणारा हा आजार! या आजारानं मला पछाडलं होतं. त्या गोष्टीला आज 15 ऑगस्ट 2010 ला बरोबर 1 वर्ष झालं. हा भयंकर आजार पूर्णपणे बरा व्हायलाही काही महिन्यांपासून ते दीड-दोन वर्षांचा कालावधी लागतो. गेल्या वर्षभरात मी ज्या स्थितीतून गेलो. त्याबद्दल काही सांगावं म्हणून हा लेखन प्रपंच.
दिल्लीची राष्ट्रीय पत्रकार कल्याण न्यास नावाची संस्था आहे. राष्ट्रीय विचारधारेच्या प्रेरणेने पत्रकारितेत समर्पित वृत्तीने कार्य करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी न्यासतर्फे पुरस्कार दिला जातो. 8 ऑगस्ट रोजी सोलापुरात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाची तयारी, स्मरणिकेची तयारी, निमंत्रण पत्रं, स्थानिक संयोजन समितीतील मान्यवरांच्या भेटीगाठी... एकूणच धावपळ सुरू होती.
रविवार पुरवणी "आसमंत' आणि रोजचं संपादकीय पान हे कामही होतंच. विवेक विचार मासिकाचंही काम. अशातच 7 ऑगस्टला ताप भरला. आजारी पडून थोडंच चालणार होतं. त्यामुळे आजार पुढे ढकलला. कार्यक्रम थाटात पार पडला. त्यानंतर दोन दिवसांनी 11 ऑगस्ट रोजी पहाटे समजलं की, जवळचा मित्र मदगोंडा पुजारीचे वडील हृदयविकाराने गेलेत. मदगोंडा सांगलीत होता नोकरीसाठी. तो निघाला होता. 12 वाजेपर्यंत सोलापुरात पोहोचल्यानंतर त्याला सोलापूरपासून 25 कि.मी.वर असलेल्या गंगाधर कणबस गावी न्यायचं होतं. म्हणून सकाळी 7.30 वाजताच तरुण भारतमध्ये पोहोचलो. 12 पर्यंत पान 4 ओके केलं. मदगोंडाला घेऊन बाईकवरून गावी पोचलो. अंत्यसंस्कार व्हायला रात्र झाली. सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही, अशा वातावरणात ते शक्य तरी होतं का? रात्री थोडा थकवा जाणवला. दुसऱ्या दिवशी हातापायातून थोडी शक्ती कमी झाल्यासारखं वाटलं. कालच्या दगदगीमुळे असेल कदाचित म्हणून दुर्लक्ष केलं.
गुरुवार, दि. 13 ऑगस्ट. सकाळी 11 ची वेळ. "अरे सुनील, पायातून शक्ती कमी झाल्यासारखी वाटतेय. गाडी चालवता येईल असं वाटत नाही. चल डॉ. रायतेंकडे जाऊ', मी म्हणालो. तो "चल' म्हणाला. पुन्हा मीच म्हटले, "थांब, मी पाहतो गाडी चालवायला येते का' म्हणून मी गाडी चालू केली अन्‌ एकटाच डॉ. रायतेंकडे पोचलो. पायऱ्या चढणं त्रासदायक वाटत होतं. डॉक्टरांनी तपासणी केली. जुलाब लागले होते का? असे विचारले. हातपाय ढकलायला सांगितले. काही नाही कमी होईल. "इलेक्ट्रॉल' घ्या दोन दिवस, कमी होईल म्हणाले. क्षार कमी झालेत असं त्यांना वाटलं असावं. दरम्यान, ताप आला, तर फोन करा म्हणाले. आज मला "मुस्लिम जगत' स्तंभाचं अनुवाद करून सर्व आवृत्त्यांना पाठवायचं असल्यानं कार्यालयात पोहोचलो. 3 वाजेपर्यंत अनुवाद करून झाला. आता मात्र चालायला आणखी त्रास होत होता. संपादक साहेबांना फोन करून सांगितलं की, बहुधा चिकन गुनिया झालाय. निवास ठिकाणी केंद्रात पोहोचलो. सुनील मुंबईला बैठकीला जाणार होता, पण न जाता तो थांबला होता. रात्री इलेक्ट्रॉल घेऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी दिवसभर इलेक्ट्रॉल घ्यायचं, लघुशंकेला जायचं सुरू. दिवसभरात अधिकच परिणाम झाला होता. रात्री 10 च्या सुमारास बसुदादा (विवेकानंद केंद्राचे ज्येष्ठ कार्यकर्ते) व शोभाताई (स्त्रीरोगतज्ज्ञ) आले. डॉ. किरण पाटीलकडे ऍडमिट करू म्हणाले. स्वाईन फ्ल्यूची शहरात हवा होती. म्हणून दोघेही मास्क लाऊन आले होते. मी म्हणालो, "सकाळपर्यंत बघूया.' ते गेले. रात्री मात्र जास्तच झालं. आता मला हातात पेलासुद्धा धरता येईनासे झाले. उठून उभे राहायलाही येईनासे झाले. क्षार वाढावेत म्हणून पुन्हा पुन्हा इलेक्ट्रॉल पीत राहिलो आणि बिचारा सुनील अर्ध्या-अर्ध्या तासाला उचलून बाथरूममध्ये नेऊ लागला. प्रकरण गंभीर असल्याचं आता त्याच्या ध्यानात आलं होतं.
सकाळी झाली. बसुदादा, शोभाताई, श्रीकांत हजर झाले. आता दवाखान्याला पर्याय नव्हताच. रिक्षा मागविली गेली. सुनीलनं पाठीवर उचलून घेतलं अन्‌ पायऱ्या उतरू लागला. शेवटच्या पायरीवर अडखळून तो पडला अन्‌ त्याच्यावर मी. मी काहीच करू शकत नव्हतो. रिक्षात दोन्ही बाजूला श्रीकांत-सुनील. रिक्षा धावू लागली. 15 ऑगस्ट- स्वातंत्र्यदिनाची सकाळ असल्याने देशभक्तीचे वातावरण रस्त्यावरून दिसत होते. रिक्षा युनिक्‌ हॉस्पिटलसमोर थांबली. तोवर संपादक श्री. अनिल कुलकर्णी, दशरथ वडतिले, शांतवीरदादा तिथे पोहोचले होते. चाक असलेल्या खुर्चीवर मला उचलून बसविण्यात आलं. एका खाटेवर तात्पुरतं डॉक्टर येईपर्यंत झोपवण्यात आलं. शोभाताईंनी संपर्क केल्यानं पाचच मिनिटांत डॉक्टर करकमकर पोहोचले. त्यांनी जुजबी चाचणी केली अन्‌ सांगितलं, हा गियाबारी सिंड्रोम आहे. तत्काळ यशोधरा किंवा वळसंगकर हॉस्पिटलला हलवा. डॉ. वळसंगकर गोव्यात होते. म्हणून "यशोधरा'ला न्यायचं ठरलं. मला आताही ताप नव्हता. आवाजही खणखणीत होता. लुळं शरीर सोडलं तर आजाराची कोणतीच लक्षणं नव्हती. त्यामुळेच मलाच काय इतरांनाही आधीचे दोन दिवस आजाराचं गांभीर्य समजलं नव्हतं.
आता मात्र सगळेच गंभीर झाल्याचं दिसत होतं. रुग्णवाहिका आली आणि यशोधरात पोहोचलो. काही दिवसांपूर्वीच मी डॉ. बसवराज कोलूर आणि डॉ. शिवपुजे यांची मुलाखत घेऊन गेलो होतो. त्यानंतर आज. सुरुवातीला तपासणी करतात तिथे समोर डॉ. शिवपुजे दिसले. "तुम्ही 25% खाता आणि त्याच्या दुप्पट काम. असं चालणार नाही', हे त्यांचे शब्द त्याक्षणी आठवले, पण त्याक्षणी समोर "आपला' डॉक्टर आहे याचा आधारही वाटला. तातडीने अतिदक्षता विभागाकडे चारचाकी टेबलवरून नेण्यात येऊ लागलं. मला फक्त बोलताच येत होतं, हालचाल नाही, पण वातावरण गंभीर झालं होतं. अतिदक्षता विभागात नेताना पाहात होतो, आई-बाबा शेतातली कामं तशीच टाकून धावत पळत आलेत. मातीने माखलेले कपडे तसेच आहेत.
अतिदक्षता विभागात विविध चाचण्या सुरू झाल्या होत्या. जीबीएस आजाराची लक्षणे दिसत असली, तरी डॉक्टरांना तशी खात्री करून घेण्यासाठी काही चाचण्या करायच्या होत्या. "एम.आर.आय.'द्वारे पाठीचा मणका स्कॅन केला जातो. तिथल्या डॉक्टरांच्या चर्चेवरून मला समजलं होतं की, पाठीच्या मणक्याला काही इजा झालेली नसेल, तर "जीबीएस'चे उपचार सुरू करायचे. दरम्यान एक दीर्घ श्वास घेऊन मला 1, 2, 3... असे अंक मोजायला सांगण्यात आले. मी 45 पर्यंत म्हटले. हे चांगलं लक्षण होतं, पण समजा पाठीच्या मणक्यात काही दोष निर्माण झाला असेल, तर मात्र कायमचं पंगुत्व येणं शक्य होतं. कायमस्वरूपी आपल्या हाता-पायात शक्ती नसणार? ही कल्पनाच खूप धक्कादायक होती. सतत फिरणाऱ्या माझ्यासारख्यावर असा विचार करणंही आघात होता. माझ्या मनाची स्थिती मी नेमकेपणाने सांगू शकणार नाही, पण मी पुरता हादरून गेलो होतो. "वैरी न चिंती ते मन चिंती' असं म्हणतात ते खरंच आहे. मनात वेगाने विचार येऊ लागले... समजा आपले पाय कायमस्वरूपी निकामी झाले तर.... आपल्याला संगणकाच्या आधारे वाचन, लिखाण आदी करता येईलच, त्यामुळे काही अडचण नाही. परंतु समजा हात आणि पाय दोन्ही निकामी झाले, तर जीवन कसं जगायचं? हा विचार छळत होता. मला उत्तर मिळालं.... प्रायोपवेषन्‌. होय, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याचा अवलंब केला होता. आपलं शरीर जेव्हा स्वत:च्या आणि समाजाच्या उपयोगाचं राहात नाही तेव्हा अन्न, पाणी, औषधं त्यागून मृत्यूला अलिंगन द्यायचं. असं करणं इथे लिहिलंय इतकं निश्चितच सोपं नाहीय; परंतु त्याक्षणी मला या विचाराने बळ दिलं आणि मी चिंतामुक्त झालो. तोपर्यंत एमआरआय स्कॅनिंगसाठी मला अश्विनी रुग्णालयात नेलं होतं. स्कॅनिंगच्या त्या कराल जबड्यात बंद करण्यात आलं. प्रक्रिया सुरू झाली. आश्चर्य म्हणजे मला झोप लागली. स्कॅनिंगनंतर पुन्हा "यशोधरा'त आणलं गेलं. दरम्यान भेटायला येणाऱ्यांची वर्दळ सुरू झाली होती. रामतीर्थकर पती-पत्नी पायऱ्या चढतच दाखल झाले होते. (रामतीर्थकर सरांना संधीवातामुळे चालताना अडचण येते.) बहिणी, भाऊ परमेश्वर बघताक्षणी रडू लागले. आई-बाबांची अवस्था तर कशी सांगू.
नंतर बहीण सांगत होती, "सुनील काळवंडला होता. सतत फोनवरून विविध लोकांना माहिती देत होता. चेहऱ्यावर सन्नाटा. धनंजय दादा, संपादक, नाना, शांतवीरदादा, भावजी या साऱ्यांची स्थिती अशीच होती. डॉ. प्रार्थना भावजी आणि नातेवाईकांना कमी होईल म्हणून धीर देत होती. सगळं विवेकानंद केंद्रच यशोधरात गोळा झालं होतं.'
संध्याकाळी श्वास घेऊन आकडे मोजायला सांगण्यात आले. आता मी 23-24 पर्यंतच एका श्वासात आकडे मोजू शकत होतो. आजाराने श्वसनसंस्थेवर ताबा मिळवायला सुरुवात केली होती. दरम्यान "एमआरआय'चा रिपोर्ट आला. नॉर्मल. मात्र ध्यानात आलं की, आता उशिराने का होईना आपण पुन्हा चालू-फिरू शकणार आहे, पण मला वाटलं तेवढं सोपं नव्हतं हे माझ्या ध्यानात नंतरनं आलं.
"जीबीएस'चा आजार आहे हे आता निश्चित झालं होतं. "जीबीएस' या आजारात बोटं, पाय, हात अशा क्रमाने परिणाम होतो. शेवटी श्वसनसंस्थेवर हल्ला होतो. श्वसनसंस्थेवर हल्ला होणं गंभीर असतं. रुग्ण कधीकधी यात दगावू सुद्धा शकतो. आता माझ्या श्वसनसंस्थेवर परिणाम व्हायला सुरुवात झाली होती. आता जीबीएसच्या व्हायरसचा प्रभाव रोखणं अत्यंत गरजेचं होतं.
(पूर्वार्ध)

मु. पो. यशोधरा हॉस्पिटल  (जीबीएस'च्या विळख्यात भाग - 2)

... अन्‌ मी पुन्हा चालू लागलो  (जीबीएस'च्या विळख्यात भाग -3 )

‘जीबीएस’च्या विळख्यात दोन वर्षे   दिव्य मराठीत प्रकाशित

हाणामारी-दंगली टाळता येऊ शकतील

सोलापुरातील दत्त चौक भागात मंगळवारी रात्री दोन गटांत हाणामारी झाली. लागलीच सगळीकडे दंगल पेटल्याची "अफवा' पसरली. रात्री सव्वा दहाच्या सुमारास हैदराबादेत राहणाऱ्या एका मित्राचा फोन आला. दत्त चौकात काही गडबड आहे पाहा, असे त्याने सुचविले. चौकशी करून मी सिव्हिल हॉस्पिटलला पोचलो. जखमी असलेल्या कुरेशी गटातील तरुणांवर उपचार सुरू होते. बाहेरील बाजूला कुरेशी नावाचे एक साठीतले दाढीधारी गृहस्थ पत्रकारांना माहिती देत होते.
"खाटीक मशीद भागात आमच्या (मुस्लिम) समाजाची फक्त 50 घरे आहेत. (5-10 घरॉं हंई, दुसरा म्हणतो.) त्यांनी अल्पसंख्याकांवर अन्यायाची सीमा ओलांडून अन्याय केला आहे. अल्पसंख्याकांवर दहशत बसविण्यासाठीच आम्ही पुरुष मंडळी घरात नसताना ठरवून हा हल्ला केला गेला. अल्लाताला त्यांना धडा शिकवीलच. आम्हीही कायदेशीररीत्या त्यांना सोडणार नाही... भारी पडू... आमदार आमच्याकडे फिरकलेही नाहीत पण "भाऊ' मात्र आमच्या मोहल्ल्यात घरी येऊन धीर देऊन गेले...' वगैरे माहिती कुरेशी महोदय देत होते.
दत्त चौक-सोन्या मारुती भागात त्यांच्या समाजाची कमी घरे आहेत म्हणून त्यांच्यावर दहशत बसविण्यासाठी हल्ला झाल्याचे कुरेशी म्हणत आहेत. या भागात गेल्या काही वर्षांत मुस्लिमांची संख्या अचानक कृत्रिमरीत्या वाढल्याची या भागातील हिंदू समाजाची भावना आहे. काही बांगलादेशी घुसखोर या भागात बस्तान थाटत असल्याचीही चर्चा आहे. नेमका काय प्रकार आहे हे पोलिसांनीच खोलात जाऊन चौकशी केली तर ध्यानात येऊ शकेल, पण कालच्या हाणामारीचा मूळ मुद्दा वेगळाच आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी झाली आहे. म्हणजेच त्या दोन्ही गटांतील ठराविक मंडळींचा या हाणामारीत सहभाग आहे, परंतु कुरेशी गट मात्र याला हिंदू-मुस्लिम असे रूप देण्याचा प्रयत्न करीत आहे काय, हे तपासले पाहिजे. तसे असेल तर ही बाब हाणामारीपेक्षाही अधिक गंभीर आहे.
त्या भागात केवळ पन्नासच घरे मुस्लिमांची आहेत म्हणून त्यांच्यावर दुसऱ्या समाजाने म्हणजे हिंदूंनी दहशत बसविण्याचा प्रयत्न केला, असे म्हणणे अपरिपक्वपणाचे आहे. तसे पाहिले तर कितीतरी खेड्यांमध्ये 2-4 घरे मुस्लिमांची आणि बाकी सर्व हिंदूंची, असे असूनही कधी हिंदूंनी त्यांच्यावर दहशत बसविल्याच्या वार्ता नाहीत. उलट खेड्यातील मुस्लिमांचे सण हिंदूच पुढाकार घेऊन साजरे करताना दिसतात. शहरातही हिंदुबहुल भागातील मुस्लिम दहशतीत राहतात असे दिसत नाही. मात्र याउलट अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. दोन वर्षांपूर्वी (2 ऑक्टो. 2008) लक्ष्मी मंडईजवळील मुस्लिमबहुल भागात शिलाई दुकान मुस्लिमांच्या सणाच्या दिवशी का चालू ठेवला असे विचारत काहींनी लोखंडी सळयांनी गंभीर हल्ला केला होता.
2002 साली अमेरिकेतील कोण एक ख्रिस्ती पाद्री मोहम्मद पैगंबर यांचा अपमान केला म्हणून सोलापुरातील मुस्लिमबहुल भागात देवीची मूर्ती फोडून दंगल घडविण्यात आली होती. गेल्यावर्षी आसरा चौकाजवळ रिक्षावाल्याने मागून मोटरसायकलीला धडक दिली. चूक रिक्षावाल्याची असूनही रिक्षावाल्याने "मॉं की ---' शिवी हासडली. वाद वाढतोय असे दिसताच, दोन-चार मिनिटांत 10-12 जण रिक्षावाल्याच्या बाजूने धावून आले आणि त्या मोटरसायकलवाल्या दोन्ही मुलांना बदडले. रिक्षावाला त्या परिसरातील नसताना आणि त्याची चूक असतानाही त्याच्या बाजूने त्याचे समाजबांधव धावून आले.
हिम्मतराव देशभ्रतार यांनी आयुक्तपदाची सूत्रे घेऊन चार दिवस होत नाहीत तोपर्यंत विजापूर वेस येथील घड्याळाच्या दुकानावर 100-125 जणांच्या जमावाने हल्ला केला. एक दारू प्यालेला मुस्लिम गृहस्थ घड्याळाचे पैसे कमी घे असे दुकानदाराला दरडावतो. दुकानदार ऐकत नाही म्हटल्यावर बाहेर येऊन गोंधळ करतो. 5-10 मिनिटांत 100-125 समाजबांधव त्याची कड घेऊन दुकानावर हल्ला करतात, हे काय दर्शविते?
या आणि अशा गोष्टींचा कुरेशी साहेब तुम्ही विचार करणार आहात काय? पूर्ववैमनस्यातून जर हाणामारी झाली असेल, तर त्याला हिंदू-मुस्लिम वादाचे रूप देणे चुकीचे आहे. अशा अफवांमधूनच दंगली होतात असे आम्हास वाटते. समजा या दोन गटांतील हाणामारी पूर्ववैमनस्यातून नसेल तर ती का झाली याचा शोध घेण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.
दत्त चौक परिसरात एक शाळा आहे. या भागात हिंदू तरुणींची नेहमीच छेड काढली जाते. कुणी जाब विचारायला गेले की, झुंडशाही निर्माण करून तरुणींच्या पालकांनाच गप्प केले जाते. या प्रकारातूनच असंतोष वाढत जाऊन कालची हाणामारी झाली असे म्हटले जात आहे. मध्यंतरी "लव्ह जिहाद'ची चर्चा होती. तसा प्रकार तर येथे नाही ना, याचीही शहानिशा झाली पाहिजे. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे.
हा विषय फक्त सोलापुरपुरता मर्यादित नाही. संदर्भ सोलापूरचा असला तरी कमी-अधिक फरकाने सगळीकडे अशा घटना घडत असतात. सर्वसामान्य हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाला दंगल, हाणामारी नकोच असते, परंतु काही मंडळी वैयक्तिक वैमनस्याला हिंदू-मुस्लिम वादाचे रूप देत असतील तर संबंधित समाजातील विचारी लोकांनी असे प्रकार थांबविले पाहिजे. मुलींची छेडछाड करून हिंदू समाजाला डिवचण्याचे प्रकारही थांबले पाहिजेत. महाविद्यालये, मोहल्ले यांमधून असे प्रकार होणार नाहीत यासाठी पोलिसांची स्वतंत्र यंत्रणा किंवा पथकच असले पाहिजेत. असे झाले तर वेळ हाणामारीपर्यंत येणारच नाही. याचबरोबर दोन्ही समाजांत सुसंवाद निर्माण होण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत. असे झाले तर हाणामारी-दंगली टाळता येतील.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी