Sunday, June 27, 2010

कायरोप्रॅक्टीक

अक्कलकोट- अक्कलकोट नगरीतील शिवपुरी आश्रमातर्फे दि. 25 जून ते 5 जुलै दरम्यान कायरोप्रॅक्टीक व आयुर्वेदिक सर्वरोग निदान, नेत्रचिकित्सा ई शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी अमेरिकेत कार्यरत असलेली थर्ड वर्ल्ड बेनिफिट ऑर्गनायझेशन शिवपुरी आश्रमाशी संलग्न असलेली ही संस्था आपले कायरोप्रॅक्टीक तज्ञ शिवपुरीमध्ये पाठवत आहेत. या सर्व थर्ड वर्ल्ड बेनिफिट ऑर्गनायझेशन व शिवपुरी आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच भूकंपग्रस्त देश हैती, डोमीनिकल रिपब्लिकन घाना या सारख्या देशामध्ये कायरोप्रॅक्टीक कॅम्पस घेतले आहेत.
कायरोप्रॅक्टिक म्हणजे हाताने केला जाणारी उपचार पद्धती होय. अपघात व चुकीच्या पद्धतीने बसणे, उठणे, चालणे इत्यादीमुळे पाठीच्या मणक्यांचे संतुलन बिघडून त्यातून विविध अवयवांकडे जाणाऱ्या मज्जांततुवर दाब पडून तेथे वेदना व व्याधी निर्माण होतात. कायरोप्रॅक्टीकच्या तंत्राने कोणत्याही प्रकारचे औषध व शस्त्रक्रियेविना केवळ हाताने विशिष्ट प्रकारे दाब देऊन मणके पूर्वस्थितीत आणले जातात. अमेरिकेत या पद्धतीचा शास्त्रीय अभ्यासक्रम विकसीत झाला असून या उपचार पद्धतीने तिथे फार मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण दिले जाते.
शिवपुरी येथे यापूर्वी घेतलेल्या कायरोप्रॅक्टीक शिबिरामध्ये 25000 पेक्षा जास्त रुग्णांनी या चिकित्सा पद्धतीचा लाभ घेतलेला आहे. अर्धांगवायू, संधीवात, पाठीचे व मणक्याचे विकार, फ्रोझन शोल्डर्स, कंबर दुखी, मान दुखी व शरीराचे अवयव पांगळे झालेल्या अशा रुग्णांना मुख्यत: या शिबिराचा लाभ यापूर्वी झालेला आहे. अक्कलकोट परिसरातून सोलापूर, विजापूर, बीदर, लातूर, तसेच थेट हैदराबाद,मुंबई, नागपूरहून देखील रुग्ण आले होते.
यावर्षीच्या शिबिराचे वेगळेपण असे आहे की, शिवपुरीमध्ये 25 जून ते 5 जुलै या कालावधीत होणाऱ्या शिबिरामध्ये एकाच ठिकाणी कायरोप्रॅक्टीक चिकित्सा, आयुर्वेद चिकित्सा व नेत्रचिकित्सा या सर्व चिकित्सा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या शिबिरामध्ये आलेल्या रुग्णांना व नातेवाईकांना न्युट्रीशन, व्यायाम, आहार व स्वच्छता, पोषक तत्वे, पर्यावरण याविषयी विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.
या शिबिरादरम्यान आलेल्या रुग्णांना व नातेवाईकांना अन्नदानाची मोफत सोय शिवपुरी आश्रमाद्वारे करण्यात आली आहे. या शिबिरासाठीची नावनोंदणी फोनवर करण्याची सुविधा यावर्षी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. गरजू व रुग्णांनी 8806699388 फोनवर दि. 18 जूनपासून सकाळी 10 ते सायं. 5 या कालावधीतच फोन करावा व आपले नाव नोंदवावे, असे आवाहन शिवपुरी आश्रमातर्फे करण्यात आले आहे.

Saturday, June 26, 2010

डॉक्टर साहेब,

हेही समजून घ्या थोडं...
अक्कलकोट येथील शिवपुरीत शुक्रवार दि. 25 जून ते 5 जुलै या कालावधीत कायरोप्रॅक्टिक उपचार शिबिर सुरू आहे. त्यानिमित्ताने...
मी काही वैद्यक क्षेत्रातला जाणकार नाही. डॉक्टर मंडळींना उपदेशाचे डोस द्यावेत असाही माझा विचार नाही. तरीही मला आलेल्या अनुभवामुळे हा लेख लिहित आहे.
चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दुपारी संपादकीय पानाचे काम आटोपले होते म्हणून कार्यालयातच वृत्तपत्रे चाळीत बसलो होतो. घरून लहान भावाचा फोन आला. तो घाबरलेला होता. "बाबाग्‌ यान्‌ अरे आग्याद्‌...' म्हणत तो सांगू लागला. माझ्या वडिलांना (वय साधारण 58) शेतात काम करताना अचानक पाठीत दुखायला लागले होते. तीव्र वेदना होत होत्या.
प्रकरण गंभीर असल्याचे ध्यानात आले. उपचारासाठी त्वरित शहरात आणणे आवश्यक होते. सोलापूरपासून केवळ 18 किलोमीटरवर शिर्पनहळ्ळी हे गाव असले तरी गाव आडवळणी आहे. त्यामुळे वाहनांची सोय नाही. मी वृत्तपत्रांत असलो तरी आजही माझ्या गावी रोजची वृत्तपत्रं येत नाहीत. थोडक्यात सांगायचे तर गावाकडून रुग्णाला शहरात आणणे अवघड होते. त्यामुळे सोलापुरातूनच रिक्षा केली.
घरी गेल्यानंतर ध्यानात आले की, वडिलांना काहीच हालचाल करता येत नाहीय. बसलेल्या स्थितीतून उठायचे म्हटले तरी पाठीत जीवघेणी कळ. पाठीच्या मणक्याला इजा झाली असावी, असे वाटले. त्यांना आहे त्या स्थितीतून हळूवारपणे उचलून रिक्षात बसविले. पाय थोडे जरी हलले तरी तीव्र वेदना होत होत्या. कसे -बसे सोलापुरात आणले.
शहरातील एका नामवंत अस्थिरोग तज्ज्ञाच्या दवाखान्यात ऍडमिट केले. उपचार सुरू झाले. "एक्स' -रे आणि अन्य तपासण्या झाल्या. औषधंही सुरू होती. विशिष्ट प्रकारच्या उपकरणाने पाठीच्या मणक्यांना स्टिम्युलेशनही देण्यात येत होते. 6 दिवस झाले तरी परिणाम काही जाणवत नव्हता. उपचार खर्चाचा आलेख मात्र प्रामाणिकपणे वाढत होता. कधीही दवाखान्याची पायरी न चढलेल्या माझ्या वडिलांनी धसकाच घेतला होता. जेवण केले की पुढील गोष्टींच्या कटकटी सुरू होतील, असा विचार करून वडील केवळ दोन-चार बिस्किटांवर दिवस ढकलत होते. मी पुन्हा पुन्हा डॉक्टरांना विचारित होतो की, आजार कमी व्हायला किती दिवस लागतील? नेमका कालावधी सांगण्यास डॉक्टरही असमर्थ होते. आणखी एक-दोन आठवडे तरी काही सांगू शकत नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे होते.
स्थिती गंभीर होत चालली होती. काय करावे सुचत नव्हते. आमचे ज्येष्ठ सहकारी नाना बसाटे यांनी याचवेळी अक्कलकोटच्या शिवपुरी येथे सुरू असलेल्या कायरोप्रॅक्टिक शिबिराची माहिती दिली आणि वडिलांना तिकडे नेण्यासाठी आग्रहही धरला. थोडे हायसे वाटले, परंतु दवाखान्यातून डिस्चार्ज घेण्याचे धाडस होत नव्हते. समजा शिवपुरीच्या शिबिरात नेले आणि काही उपयोग झाला नाही तर काय करायचे, अशी मनात भीती होती. हो नाही करत अखेर शिवपुरीला न्यायचे असा कौल मनाने दिला.
वडिलांना शिवपुरीच्या शिबिरात नेणार असल्याचे डॉक्टरांना सांगितले. हा शिकला सवरलेला मुलगा मूर्खासारखा का विचार करीत आहे, असा भाव डॉक्टरांच्या चेहऱ्यावर मला स्पष्टपणे वाचता आला. शिबिरात कमी झाले नाही तर पुन्हा आणा काही हरकत नाही, असे डॉक्टर म्हणाले. अक्कलकोटला कसे न्यावे असा प्रश्न होता. विवेकानंद केंद्राचे बसूदादा यांच्या कारने प्रश्न सोडवला. नाना यांना सोबत घेऊन वडिलांना शिवपुरीस नेले.
मी पहिल्यांदाच शिवपुरीत गेलेलो. 4 ते 5 हजार लोकांची रांग पाहिली. आता आमचा नंबर कधी येणार असा विचार करीत "कशाला आलो इकडे', असे क्षणभर वाटले. पत्रकारांसाठी असलेल्या सुविधेअंतर्गत आम्हाला बोलावण्यात आले. नाना, मी आणि आणखी दोघे असे मिळून मोटारीतून उचलून वडिलांना समोरच्या टेबलवर झोपवले. कायरोप्रॅक्टिक उपचार करणाऱ्या तिथल्या अमेरिकन व्यक्तीने रिपोर्ट पाहिले आणि काही जुजबी माहिती विचारली. वडिलांना पालथे झोपविले. कमरेजवळ एका विशिष्ट ठिकाणी हाताच्या दोन्ही अंगठ्यांनी जोरात दाब दिला. "कट्‌' असा आवाज झाला. त्यावेळी एकदम वडील विव्हळले. दुसऱ्याच क्षणी त्या व्यक्तीने वडिलांना उठायला सांगितले. काय आश्चर्य वडील उठून चालू लागले...
पाचच मिनिटांपूर्वी ज्या माणसाला उचलून आणले तो चालत येतोय हे पाहून तेथील सारेच अचंबित झाले. बघता-बघता आमच्या भोवताली दीड-दोनशे माणसं जमली. साऱ्यांनाच कौतुक वाटत होतं. माझ्या मनाची अवस्था मला शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही. मला असा आनंद याआधी कधी झाल्याचे आठवत नाही.
तिथून थोड्यावेळाने आम्ही निघालो. चप्पळगाव-धोत्री मार्गे माझं गाव 25 किलोमिटर आहे. घरी आलो. वडील जणु काही झाले नाही असेच चालत-फिरत होते. आनंदाने संध्याकाळी सोलापूरला परतलो आणि डॉक्टर साहेबांना फोन केला. वडिलांचे दुखणे शिवपुरीच्या शिबिरात बरे झाल्याचे त्यांना सांगून टाकले. डॉक्टर साहेब म्हणाले, "ठीक आहे'. त्यांनी फोन ठेवून दिला.
मला खूप वाईट वाटले. मी उत्साहात होतो. डॉक्टरांना किती सांगू असं झालं होतं, परंतु डॉक्टर साहेबांना काहीही जाणून घ्यावं वाटलं नाही. आज वडिला शेतातली कुळव, पेरणी, बैलांना चारा-पाणी सारी कामे करतात.
ज्या उपचारपद्धतीने रुग्णाला दोनच मिनिटांत बरे केले, ती पद्धती अन्य उपचारपद्धतीच्या डॉक्टरांनी का समजून घेऊ नये ? असे काय तंत्र आहे की, ज्यामुळे त्वरित रुग्णाला आराम मिळाला, हे समजून घेणे चुकीचे आहे की काय? यामुळे संबंधित डॉक्टरच्या ज्ञानात भरच पडेल की नाही? येथे अहंकार का आडवा यावा? आपल्याला माहीत नसलेल्या काही गोष्टी सत्य असू शकतात असे डाक्टर मंडळींना का वाटू नये ?
मध्यंतरी ज्येष्ठ पत्रकार श्री. अरुण रामतीर्थकर यांना नागीण या आजाराचा त्रास सुरू झाला होता. त्याचा प्रादुर्भाव डोळ्यात होऊन डोळ्यास दिसणे कमी होऊ लागले. शहरातील नामवंत डॉक्टरांकडून उपचार करूनही काही उपयोग झाला नाही. शेवटचा उपाय म्हणून सोलापूरजवळील कुरूल येथे जडीबुटी देणाऱ्या सामान्य शेतकऱ्याकडे सर गेले आणि आश्चर्य म्हणजे नागिणवर उतारा पडला. डोळाही पूर्ण बरा झाला.
आजही गावागावांत अनेक आजारांवर पारंपरिक पद्धतीने उपचार केले जातात. हे खरे आहे की, उपाचार करणारी मंडळी बऱ्याचदा अज्ञानी असतात. कधी कधी करण्यात येणारे उपचार चुकीचे असतात. परंतु म्हणून पारंपरिक ज्ञानात काहीच तथ्य नाही असे म्हणत उडवून लावणे हे काही मोकळ्या शास्त्रीय मनाचे लक्षण नाही. पारंपरिक उपचार पद्धतींचा आधुनिक डॉक्टर मंडळींनी अभ्यास केला पाहिजे. उपयुक्त असेल त्याचा मोकळ्या मनाने स्वीकारही केला पाहिजे. आपल्या सिलॅबसच्या बाहेरही काही मोलाचे ज्ञान असू शकते याचे भान असू द्यावे.
थोडक्यात सांगायचे तर ऍलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, कायरो आणि आणखी किती पद्धती असतील... त्याच्याशी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना फारसं देणं-घेणं नसतं. रुग्ण बरा व्हावा हाच एकमेव विचार असतो. आपल्या उपचार पद्धतीच्या बाहेरील एखादा उपचार रुग्णांवर प्रभावी ठरत असेल तर खास करून ऍलोपॅथीवाल्या डॉक्टरांनी जिज्ञासूपणाने आणि मोठ्या मनाने ती पद्धती समजून घेतली पाहिजे.
www.psiddharam.blogspot.com
mobile : 9325306283

आणि शिक्षणाचे बाजारीकरण

गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री. बराक ओबामा यांनी अमेरिकेतील शिक्षण संस्थांना आवाहन केले. अमेरिकेतील शिक्षण संस्थांनी भारतातील उच्च शिक्षण संस्थांशी स्पर्धा करण्यासाठी तयार राहावे, असे ओबामा म्हणाले. त्यांचे म्हणणे आहे की, भारतात शिक्षण घेतलेल्या तरुणांना त्यांच्या योग्यतेमुळे रोजगाराच्या साऱ्या संधी त्यांनाच मिळत आहेत आणि सर्वसामान्य अमेरिकी तरुण शिक्षणात मागासलेला असल्यामुळे व्यावसायिक स्पर्धेत तो मागे पडत आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांनी याच संदर्भामध्ये "बंगळूरला ना आणि बफेलोला हो' असे व्यक्तव्य केले होते. यावरून मोठा वादही निर्माण झाला होता, परंतु या वक्तव्यावर भारतात कोणीही आक्षेप घेतला नाही. भारतीय मीडिया आणि बुद्धीजीवी वर्ग कदाचित ओबामा यांच्या अज्ञानामुळे गोंधळून गेला असेल. आमच्या देशात तर शिक्षण क्षेत्रातील स्थितीमुळे सारे विचारवंत चिंतित आहेत. कोठेही वेळ मिळाला की, भारतीय शिक्षण व्यवस्था सुधारण्याच्या गोष्टी आपण करीत असतो.
बदललेल्या परिस्थितीमध्ये कोणीही व्यापक प्रयत्न केले नसतानाही काही बदल घडून येताना दिसत आहे. हे सर्व बदल सकारात्मक आणि योग्य आहेत असे मात्र म्हणता येणार नाही. परंतु देशाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत शिक्षणाचा प्रसार मात्र होताना दिसत आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात खाजगीकरणापेक्षा बाजारीकरण अधिक झाले आहे. परिणामी याचा नकारात्मक प्रभाव जाणवत आहे. संख्यात्मकदृष्ट्या प्रशिक्षित तरुणांची मात्रा प्रचंड वाढली आहे, परंतु त्यांच्या योग्यतेबद्दल चिंता करावी अशी स्थिती आहे. यावर उपाय म्हणून परदेशी संस्था तसेच तेथील पद्धती भारतात लागू करण्याच्या गोष्टीही आम्ही भारतीय करीत असतो. या विसंगतीचे कारण काय? विदेशी लोक आपल्या शिक्षणपद्धतीची स्तुती करीत आहेत. आपल्या शिक्षणपद्धतीचा त्यांनी धसकाच घेतला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण स्वतःच आपल्या शिक्षणपद्धतीवर असंतुष्ट आहोत.
आपण जेव्हा आपल्या स्वभावानुसार कार्य करतो तेव्हा थोडीशी सफलतादेखील समाधान देऊन जाते, परंतु जेव्हा आपण आपल्या स्वभावाच्या विपरित कार्य करू लागतो तेव्हा उच्चतम सफलता मिळाली तरीसुद्धा जीवनात एक पोकळी जाणवत राहते. हीच गोष्ट राष्ट्राच्या बाबतीतही सत्य असेल असे वाटते. या आधुनिक शिक्षणाने आम्हाला रोजगार, विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यापाराच्या क्षेत्रात मोठी सफलता प्रदान केली आहे. आज भारतीय प्रतिभा पाहून विश्व आश्चर्यचकित झाले आहे. आम्ही संधी मिळताच आमच्या देशातही प्रत्येक क्षेत्रात चमत्कार केले आहेत, परंतु तरीही शिक्षणतज्ज्ञ समाधानी नाहीत. याचे एक कारण असे आहे की, गुणवत्तेच्या स्तरावर भारतात प्रचंड विषमता दिसून येते. एकीकडे राष्ट्रीय संस्थान (आय.आय.टी., आय.आय.एम.) आहेत. येथे जगातील सर्वोच्च संस्थांच्या तोडीचे शिक्षण मिळते. दुसरीकडे सर्वत्र पावसाळ्यातील भूछत्राप्रमाणे उगवलेल्या खाजगी शिक्षणसंस्थांमध्ये शिकलेले अभियंते आणि अन्य पदव्या घेतलेले तरुण दिसतात. आपल्या विषयातील अगदी किरकोळ ज्ञानही यांच्यामध्ये नसल्याचे आढळून येते. योग्यतेतली ही दरी निराशेचे एक कारण आहे, परंतु अधिक सूक्ष्म स्तरावर जाऊन पाहिले तर या पोकळीमागील कारण आहे, आमचे आपल्या मुळांपासून उखडले जाणे. भारताचा स्वभावच ज्ञान-प्रदान आहे. आम्ही ज्ञानार्जन आणि ज्ञानदानाच्या अनेक वैज्ञानिक पद्धतींचा विकास केला. आध्यात्मिक ज्ञान-परा विद्येच्या सोबतच व्यावहारिक भौतिक ज्ञान-अपरा विद्येच्या प्रशिक्षणाच्या अत्यंत परिणामकारी पद्धतींचा विकास आणि प्रयोग भारतामध्ये 19व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत होत राहिले.
गांधीजींचे शिष्य आणि विख्यात संशोधक डॉ. धरमपाल यांनी आपल्या संशोधनाने सिद्ध केलेआहे की, हे शिक्षण वैज्ञानिक पद्धतीचे, चारित्र्य निर्माणात प्रखर आणि अत्यंत प्रभावी होते. साऱ्या देशात सुलभपणे उपलब्ध असणारे हे शिक्षण होते. त्यांनी 1823 मध्ये इंग्रजांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे सांगितले आहे की, (ज्यांना आज आपण वंचित किंवा दलित म्हणतो त्यांच्यासहित) शिक्षक आणि शिष्य लाखो शाळा आणि विद्यापीठांमधून शिकत होते. सारा देशच साक्षर होता. शिक्षणपद्धतीदेखील वैज्ञानिक होती, ज्ञानाला अंतःकरणापासून प्रकाशित करणारे प्रशिक्षण मिळत होते. आजच्या विकृत पद्धतीनुसार "माहितीची' देवाण-घेवाण एवढ्यापुरतेच ज्ञानदान मर्यादित नव्हते. आमच्या परंपरेनुसार गुरू म्हणजे असा की, जो आपल्या शिष्याची योग्य पद्धतीने जडणघडण होण्यासाठी आईप्रमाणे कष्ट करतो, शिष्याचे संपूर्ण दायित्व गुरू ग्रहण करतो. शिष्याच्या चित्ताच्या गुणधर्मितेनुसार प्राणाची प्रतिष्ठा करून गुरू त्याला मार्ग दाखवितो. इतकेच नाही तर गुरू त्याच्यासोबत त्या मार्गावरून चालतोदेखील. आवश्यकता पडली तर गुरू शिष्याचे बोट धरेल, कडेवरही उचलून घेईल. ठाकूर श्रीरामकृष्ण परमहंस यांनी आपल्या शिष्यांसोबत असेच केल्याचे दिसते. कुणाला केवळ मार्ग सांगून स्वतःच्या भरवशावर सोडून दिले. कुणाला बोट पकडून मार्ग दाखविला. गिरीश बाबूंचे संपूर्ण दायित्वच आपल्यावर घेतले. त्यांच्या शिष्यांनी देखील या परंपरेचे पालन केले.
आध्यात्मिक क्षेत्रात ही परंपरा दक्षिणामूर्तीला प्रारंभ करून व्यास महर्षींपर्यंत आणि तेथून वर्तमान आचार्यांपर्यंत जिवंत असल्याचे दिसते. काही अपवाद सोडले तर आज देखील अधिकांश पारंपरिक आचार्य शास्त्रीय विधीचा अवलंब करीत असल्याचे दिसतात, परंतु अपरा विद्येच्या क्षेत्रात ही परंपरा लोप पावली आहे. जीवनात आलेल्या पोकळीचे, निराशेचे हेच मुख्य कारण आहे. शिक्षणाची ही वैज्ञानिक पद्धती पुनजीर्वित करण्यात आली तर अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि अन्य गोष्टी बदलल्या नाहीत तरी चालू शकेल. मुख्य गोष्ट तर "गुरू'ची आहे. शिक्षणसेवकांना शिक्षक बनविल्यानंतर गुरू बनण्याचे प्रशिक्षण प्रदान करणे हाच यावरील एकमेव उपाय आहे. शिक्षणाला केवळ "रोजी-रोटी'चे साधन मानून शिक्षणाच्या बाजारीकरणाची स्पर्धा सुरू आहे. या "स्थितीत गुरु-शिष्य' ही वैज्ञानिक परंपरा पुनःस्थापित करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
केवळ दार्शनिक गोष्टी बोलण्याने काहीही होणार नाही. शिक्षणाच्या क्षेत्रात चारित्र्य निर्माणाची न्यूनता भरून काढण्यासाठी आपल्या स्तरावर विनम्र प्रयत्न सुरू करणे आवश्यक आहे.
-सिद्धाराम भै. पाटील.

Monday, June 21, 2010

सच्चर


क्ष- किरण टाकणारे पुस्तक

पुस्तकाचे नाव : सच्चर समितीचा अहवाल अर्थात धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेलाच सुरुंग
लेखक : समीर दरेकर
प्रकाशक : अभिनव निर्माण प्रकाशन, पुणे.
पृष्ठे : 168 मूल्य : 100/- सवलतमूल्य : 50/-

या देशासमोर अनेक समस्या आहेत. काही समस्या या अतिशय गंभीर आहेत. अतिशय गंभीर समस्यांपैकी एक आहे हिंदू-मुस्लिम यांच्यातील सामंजस्याची समस्या. ही समस्या या देशाला गेल्या हजार-बाराशे वर्षांपासून छळते आहे. असे असूनही दुर्दैवाने या देशात या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रामाणिक आणि तटस्थ प्रयत्न फारच कमी लोकांनी केल्याचे दिसते. काही लोक (त्यातल्या त्यात पत्रकार आणि लेखक मंडळी) या प्रश्नाचा अभ्यास न करताच लेखणी झिजवताना दिसतात. समस्या समजून न घेता राजकीय नेतृत्त्वाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे ही समस्या सुटण्याऐवजी आणखीन गंभीर रूप धारण करीत आहे.
9 डिसेंबर 2006 ला राष्ट्रीय विकास परिषदेत पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले होते, "भारताच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा पाहिजे.' पंतप्रधानांच्या या एकाच वाक्यावरून हिंदू-मुस्लिम ऐक्यावर ही मंडळी कोणत्या प्रकारचे उपाय योजत आहेत याची कल्पना येते. अशा नेभळट पुढाऱ्यांमुळेच 1947 साली 23 प्रतिशत मुस्लिमांसाठी या देशाची 30 प्रतिशत भूमी पाकिस्तानच्या स्वरूपात तोडून देण्यात आली होती, हे इथे ध्यानात घेणे आवश्यक आहे.
पाकिस्तानविरुद्ध सैन्य लढेल... कसाबविरुद्ध पोलीस लढतील... पण आपल्याच लोकांनी मतांच्या राजकारणासाठी केलेल्या राष्ट्रद्रोही कृत्यांविरुद्ध कोण लढणार? अशी कृत्ये सुरू आहेत याची तरी जनतेला माहिती व्हायला नको काय? अशा प्रश्नांनी अस्वस्थ झालेल्या एका तरुण अभियंत्याने - समीर दरेकर यांनी उपरोक्त पुस्तक लिहिले आहे.
वृत्तपत्रांतून, वरवरच्या चर्चेतून सच्चर अहवालाची भीषणता ध्यानी येत नाही. सच्चर समितीचा विषय हा केवळ हिंदू-मुस्लिम विषय म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा विषय नाही. या देशाच्या राज्यघटनेलाच सुरुंग लावणारा, या देशावर आघात करणारा विषय आहे, हे उपरोक्त पुस्तकातून साधार सांगितले आहे. लेखक स्वत: अभियंता असल्यामुळे पुस्तकात फापटपसारा नाही. छायाचित्रे, विविध राष्ट्रीय वृत्तपत्रांतील कात्रणांचा आवश्यक तो वापर, नेमक्या ठिकाणी नेमके संदर्भ यांमुळे पुस्तक एकदा वाचायला घेतले की, पूर्ण वाचल्याशिवाय सोडवत नाही. लेखकाने कष्टपूर्वक सारे संदर्भ एकत्रित करून प्रवाही मांडणी केल्याचे प्रत्येक पान वाचताना जाणवल्याशिवाय राहात नाही.
स्वत: काहीही अभ्यास न करता राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे विषय "अरे यात राजकारण असते' असे म्हणून दुर्लक्ष करणाऱ्या पढतमूर्खांची एक जमात असते. या पुस्तकाची मांडणी, त्यातील पुरावे इतक्या बिनतोड आणि प्रभावीपणे सादर केले आहेत की, पढतमूर्खांच्याही डोळ्यांत अंजन पडेल.
न्या. सच्चर यांचा भूतकाळ पुस्तकाच्या सुरुवातीलाच पुराव्यासह मांडला आहे. सच्चरांचा देशविरोधी शक्तींशी असलेला लळा पाहिला की, मती गुंग होऊन जाते. सच्चर महाराजांच्या कुंडलीवरून सच्चर समितीचे मनसुबे सहज ध्यानात येतात. थोडक्यात सांगायचे तर हिंदू-मुस्लिम प्रश्नावरील मराठी भाषेतील माझ्या वाचनात आलेल्या पुस्तकांत सर्वात प्रभावी असे हे पुस्तक आहे.
भारतीय राज्यघटना, खरी धर्मनिरपेक्षता, देशाचे हित यांना नख लावणारे एक राष्ट्रद्रोही कृत्य सच्चर समितीच्या माध्यमातून झाले आहे. सच्चर समितीच्या अहवालातील देशघातक विषयांवर क्ष- किरण टाकणारे हे पुस्तक सतत चर्चेत येणाऱ्या हिंदू-मुस्लिम प्रश्नावरील संदर्भग्रंथ म्हणूनही मोलाचे वाटते. त्यामुळेच पत्रकार, पोलीस अधिकारी, न्यायाधीश, वकील, लोकप्रतिनिधी, दलित चळवळीतील नेते, सक्रिय कार्यकर्ते, सैन्याचे अधिकारी, विचारवंत, लेखक, कवी, हिंदू-मुस्लिम समस्या कायमस्वरूपी सुटावी असे वाटणारे समाजहितैषी आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना अशा पक्षांतील तसेच मुस्लिम समाजातील देशप्रेमी कार्यकर्ते या साऱ्यांनी आवर्जून वाचलेच पाहिजे, असे हे पुस्तक आहे.
हे पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत पोचले पाहिजे यासाठी अभिनव निर्माण प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते स्वखर्चाने प्रयत्न करीत आहेत. केवळ 35 दिवसांत 5 हजार पुस्तकांची आवृत्ती संपली. दुसरी आवृत्तीही संपण्याच्या मार्गावर आहे.
लेखक - समीर दरेकर हे स्वत: या विषयावर महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये व्याख्याने देत आहेत. आपल्या शहरातही अशा व्याख्यानांच्या आयोजनासाठी आणि पुस्तकासाठी संपर्क : 9822971079, 9922131889
-सिद्धाराम भै. पाटील

वन्दे मातरम १

वन्दे मातरम २

Saturday, June 5, 2010

डॉ. भूषण कुमार उपाध्याय


डॉ. भूषणकुमार


...त्यांनी मन जिंकले !
सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून आपल्या अभिनव कार्यपद्धतीचा ठसा उमटविणारे डॉ. भूषणकुमार उपाध्याय. आता त्यांची पदोन्नतीवर बदली होत आहे. त्यानिमित्ताने...
बिहार विद्यापीठातून संस्कृत विषयात एम.ए. करणारे आणि सुवर्णपदक मिळविणारे, संस्कृत ध्वनीविज्ञान या विषयावर पीएच.डी. करणारे डॉ. भूषणकुमार उपाध्याय. ते मूळचे बेदीबन-मधुबन, चंपारण्य बिहार येथले. विद्यार्थी दशेत असताना त्यांच्या वडिलांना निष्कारण, अपराध नसताना पोलिसी त्रासाला सामोरे जावे लागले. परिणामी "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद आचरणातून साकारण्याचा संकल्प विद्यार्थी दशेतल्या भूषणकुमार यांनी केला आणि त्यांची पुढील वाटचाल सुरू झाली.
मानस व्यवस्थापक असलेल्या डॉ. भूषणकुमार यांच्या कार्यपद्धतीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा वेध केवळ वरवरच्या निकषांनी करणे अपुरे राहील. त्यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांची भाषणे आणि त्यांच्या कार्याची शैली या तीनही बाबींचा एकत्र विचार केला, तर त्यांच्या यशाचे रहस्य उलगडेल.
डॉ. भूषणकुमार हे केवळ संस्कृतचे पंडितच नाहीत, तर ते उर्दूचे चांगले जाणकारही आहेत. उर्दूवर त्यांचे चांगले प्रभुत्व आहे. हिंदुत्वावर श्रद्धा असणाऱ्या कार्यकर्त्यांना ते जेवढे जवळचे वाटतात, तेवढेच ते धर्मप्रेमी मुस्लिमांना देखील जवळचे वाटतात. दलित संघटनाच नव्हे तर इतरही छोट्या-मोठ्या संस्था, संघटनांना डॉ. भूषणकुमार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम राबविताना आनंद मिळतो. लोकांत इतका मिसळलेला, लोकांची मने जाणणारा व जिंकणारा हा सोलापुरातला पहिलाच पोलीस अधिकारी असावा.
डॉ. भूषणकुमार हे मनाच्या शक्तीचे मोठे अभ्यासक आहेत. जगातील मोठ्या जनसमुदायावर, जनमानसावर दीर्घकाळ अधिराज्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्ण, भगवान बुद्ध, भगवान महावीर, येशू ख्रिस्त, मुहम्मद पैगंबर, स्वामी विवेकानंद, अल्बर्ट आईन्स्टाईन, सिग्मंड फ्रॉईड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. गांधी या महापुरुषांच्या जीवनकार्यांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. "जगज्जेते ...त्यांनी मन जिंकले' हे त्यांचे पुस्तक अभ्यासले तर ध्यानात येते की, स्वत:च्या हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगूनही त्यांनी अन्य धर्मांतील मानवाला उपकारक मूल्यांबद्दल कशी श्रद्धा व्यक्त केलीय.
कुराण आणि बायबल या धर्मग्रंथांमधील सकारात्मक जीवनविचार प्रभावीपणे मांडण्याची डॉ. भूषणकुमार यांची हातोटी अद्‌भूत आहे. त्यामुळेच अन्य धर्मीयांमध्येही त्यांच्याप्रति आदराची भावना आहे, परंतु असे असले तरी धर्मांध प्रवृत्ती ठेचण्यासही ते हयगय करीत नाहीत. मुल्लाबाबा टेकडीसारख्या ठिकाणी प्रसंगी मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन करणे असू द्या किंवा सोन्या मारुतीसमोरील मशिदीचे रस्त्याच्या कडेने सुरू असलेले अनधिकृत बांधकाम थांबविणे असू द्या (3 एप्रिल 2009), समाजात अशांती उत्पन्न करणाऱ्या प्रवृत्ती उफाळूच नयेत, यासाठीचा त्यांचा प्रयत्न असतो, परंतु योग्य वेळी दंडुक्याचाही वापर ते आवर्जून करतात. गेल्याच महिन्यात एका दुकानदारावर हात उगारणाऱ्या एका मंडळाच्या मुजोर कार्यकर्त्यांची घटनास्थळीच धुलाई केली, हे सोलापूरकरांना स्मरत असेलच.
सोलापुरातील एका मदरशात कापण्यासाठी गायी आणल्या होत्या. त्यावेळी गायी खाटकांनाच द्याव्यात यासाठी एक आमदार महाशय प्रयत्नरत होते. तेव्हा न्यायालयीन प्रक्रियेतून गायी सोडविण्यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. (11 डिसें. 2008)
हिंदुत्व चळवळीचे कार्यकर्ते वेगवेगळ्या निमित्ताने त्यांना भेटायला जातात, तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असतो, "बाबारे, तू भगवद्‌गीता वाचलास का? वेद पाहिलेस का? उपनिषदे, जी आपल्याला शक्ती देतात, ते कधी समजून घेतलास का? स्वत: धर्माचरण करणे हे धर्मरक्षणच नाही का?'
खरे आहे त्यांचे. एकांतिक धर्माचे लोक धर्मांतरणासाठी विविध प्रयत्न करीत असतात. जिहादी मानसिकतेतून अनेक देशबाह्य शक्ती पद्धतशीरपणे काम करीत असतात. अशावेळी हिंदुत्वाचे हंगामी प्रेम अंगात संचारलेले तरुण मिरवणुकांच्या वेळी केवळ गुलाल उधळण्यात आणि विशिष्ट ठिकाणी, की जिथे आधीच पोलीस बंदोबस्त असतो, हुल्लडबाजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात; यातून काय साध्य होणार आहे? लक्षावधी रुपयांची वर्गणी गोळा होते, त्यातून भगवद्‌गीता, उपनिषदे लोकांपर्यंत पोचविता येणार नाहीत?दारिद्र्यात पिचलेल्यांना प्रेमाचा हात दिला तर ते धर्मांतराला का बळी पडतील बरे?
भारतीय विचारधारा, संस्कृती सर्वसमावेशक आहे. इतर धर्माप्रति सहिष्णुता हे केवळ हिंदू धर्माचेच वैशिष्ट्य आहे. आमचे पूर्वज खूप महान होते! भारत हा पूर्वी वैभवशाली होता. हे सारे खरे आहे, परंतु असे असूनही आम्ही दीड हजार वर्षे अन्य धर्मींयाच्या पायी का चिरडलो गेलो? असा मूळ प्रश्न ते करतात. आपण कुठे चुकलो, याची चिकित्सा करणारी पुस्तके निर्माण होत नाहीत, ही त्यांची व्यथा आहे. ते सांगतात की, आजवर भारत देशात केवळ दोनच महापुरुष होऊन गेले की, ज्यांनी आपण कुठे चुकलो, याची परखड आणि मूलगामी मीमांसा केली आहे. ते दोन महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर होत. या दोन्ही महापुरुषांचे विचार तरुणांनी अभ्यासून आत्मसात केले पाहिजेत. डॉ. भूषणकुमार यांच्याशी चर्चा केल्यानंतर ध्यानात येते की, त्यांचे समाजाच्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर चिंतन आहे, अभ्यास आहे, काही योजनाही आहेत. ते शासकीय पदावर असल्यामुळे काही विषयांवर बोलण्याला मर्यादा असल्याचे ते मान्यही करतात. त्यांच्या कार्यशैलीबद्दल कमी शब्दांत सांगायचे तर याठिकाणी ऑर्गनायझर या नियतकालिकात मध्यंतरी प्रकाशित झालेल्या बातमीचे उदाहरण देता येईल. उत्तर भारतातील एका राज्यात (बहुधा उत्तराखंड)30 हून अधिक पोलीस ठाणी अशी आहेत की, जिथे गेल्या 5 वर्षांत एकही गुन्हा नोंद झालेला नाही. तेथील समाजात असलेले सामंजस्य महत्त्वाचे आहे. असे सामंजस्य हे केवळ दंडुक्याच्या धाकाने नाही, तर लोकांची मने संस्कारित केल्याने आणि नाठाळांना दंडित करून गुंड प्रवृत्तीला धाकात ठेवल्याने येत असते. हेच आहे मनाचे व्यवस्थापन. भलेही सोलापुरातील घरफोडी आणि इतर गुन्हे शंभर टक्के कमी झाले नसतील... पण तसा प्रामाणिक प्रयत्न आपल्या साऱ्या क्षमता पणाला लावून डॉ. भूषणकुमार यांनी केल्याचे दिसते. त्यांच्या बदलीच्या वृत्ताने या प्रवृत्तीला आनंद झाल्याच्या वार्ताही येत आहेत. असे विचारी, अभ्यासू आणि समर्पित पोलीस अधिकारी आणखी मोठ्या स्थानी पोचले पाहिजेत. पोलीस दलाची ध्येय-धोरणे ठरविणारी चमू जेव्हा अशा अधिकाऱ्यांची असेल, तेव्हा त्याचा दूरगामी आणि सकारात्मक परिणाम होईलच होईल! डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना त्यांच्या उज्ज्वल कारर्कीदीसाठी "तरुण भारत' परिवाराकडून शुभेच्छा!

Tuesday, June 1, 2010

"शांतीदूत' येशूचे बंदूकधारी शिष्य

अरुणाचल प्रदेश हा भारताचा सौभाग्यालंकार आहे. सूर्यनारायणाची चाहूल भारतात पहिल्यांदा याच प्रदेशाला लागते. निसर्गरम्य असलेल्या या प्रदेशावर कपटी चीनचा डोळा आहे. सुमारे 55 हजार चौरस किलोमीटरची भारतभूमी गिळंकृत करूनही चीनची मुजोरी थांबलेली नाही. चीनमधल्या शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांतून अरुणाचल हा चीनचा भूप्रदेश असल्याचे व भारताने बळकवल्याचे शिकविले जाते. चीनच्या कुरापत्या कमी म्हणून की काय ख्रिस्ती मिशनऱ्यांनी गेल्या तीन दशकांपासून अरुणाचलात उच्छाद मांडला आहे.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी