Saturday, June 26, 2010

डॉक्टर साहेब,

हेही समजून घ्या थोडं...
अक्कलकोट येथील शिवपुरीत शुक्रवार दि. 25 जून ते 5 जुलै या कालावधीत कायरोप्रॅक्टिक उपचार शिबिर सुरू आहे. त्यानिमित्ताने...
मी काही वैद्यक क्षेत्रातला जाणकार नाही. डॉक्टर मंडळींना उपदेशाचे डोस द्यावेत असाही माझा विचार नाही. तरीही मला आलेल्या अनुभवामुळे हा लेख लिहित आहे.
चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दुपारी संपादकीय पानाचे काम आटोपले होते म्हणून कार्यालयातच वृत्तपत्रे चाळीत बसलो होतो. घरून लहान भावाचा फोन आला. तो घाबरलेला होता. "बाबाग्‌ यान्‌ अरे आग्याद्‌...' म्हणत तो सांगू लागला. माझ्या वडिलांना (वय साधारण 58) शेतात काम करताना अचानक पाठीत दुखायला लागले होते. तीव्र वेदना होत होत्या.
प्रकरण गंभीर असल्याचे ध्यानात आले. उपचारासाठी त्वरित शहरात आणणे आवश्यक होते. सोलापूरपासून केवळ 18 किलोमीटरवर शिर्पनहळ्ळी हे गाव असले तरी गाव आडवळणी आहे. त्यामुळे वाहनांची सोय नाही. मी वृत्तपत्रांत असलो तरी आजही माझ्या गावी रोजची वृत्तपत्रं येत नाहीत. थोडक्यात सांगायचे तर गावाकडून रुग्णाला शहरात आणणे अवघड होते. त्यामुळे सोलापुरातूनच रिक्षा केली.
घरी गेल्यानंतर ध्यानात आले की, वडिलांना काहीच हालचाल करता येत नाहीय. बसलेल्या स्थितीतून उठायचे म्हटले तरी पाठीत जीवघेणी कळ. पाठीच्या मणक्याला इजा झाली असावी, असे वाटले. त्यांना आहे त्या स्थितीतून हळूवारपणे उचलून रिक्षात बसविले. पाय थोडे जरी हलले तरी तीव्र वेदना होत होत्या. कसे -बसे सोलापुरात आणले.
शहरातील एका नामवंत अस्थिरोग तज्ज्ञाच्या दवाखान्यात ऍडमिट केले. उपचार सुरू झाले. "एक्स' -रे आणि अन्य तपासण्या झाल्या. औषधंही सुरू होती. विशिष्ट प्रकारच्या उपकरणाने पाठीच्या मणक्यांना स्टिम्युलेशनही देण्यात येत होते. 6 दिवस झाले तरी परिणाम काही जाणवत नव्हता. उपचार खर्चाचा आलेख मात्र प्रामाणिकपणे वाढत होता. कधीही दवाखान्याची पायरी न चढलेल्या माझ्या वडिलांनी धसकाच घेतला होता. जेवण केले की पुढील गोष्टींच्या कटकटी सुरू होतील, असा विचार करून वडील केवळ दोन-चार बिस्किटांवर दिवस ढकलत होते. मी पुन्हा पुन्हा डॉक्टरांना विचारित होतो की, आजार कमी व्हायला किती दिवस लागतील? नेमका कालावधी सांगण्यास डॉक्टरही असमर्थ होते. आणखी एक-दोन आठवडे तरी काही सांगू शकत नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे होते.
स्थिती गंभीर होत चालली होती. काय करावे सुचत नव्हते. आमचे ज्येष्ठ सहकारी नाना बसाटे यांनी याचवेळी अक्कलकोटच्या शिवपुरी येथे सुरू असलेल्या कायरोप्रॅक्टिक शिबिराची माहिती दिली आणि वडिलांना तिकडे नेण्यासाठी आग्रहही धरला. थोडे हायसे वाटले, परंतु दवाखान्यातून डिस्चार्ज घेण्याचे धाडस होत नव्हते. समजा शिवपुरीच्या शिबिरात नेले आणि काही उपयोग झाला नाही तर काय करायचे, अशी मनात भीती होती. हो नाही करत अखेर शिवपुरीला न्यायचे असा कौल मनाने दिला.
वडिलांना शिवपुरीच्या शिबिरात नेणार असल्याचे डॉक्टरांना सांगितले. हा शिकला सवरलेला मुलगा मूर्खासारखा का विचार करीत आहे, असा भाव डॉक्टरांच्या चेहऱ्यावर मला स्पष्टपणे वाचता आला. शिबिरात कमी झाले नाही तर पुन्हा आणा काही हरकत नाही, असे डॉक्टर म्हणाले. अक्कलकोटला कसे न्यावे असा प्रश्न होता. विवेकानंद केंद्राचे बसूदादा यांच्या कारने प्रश्न सोडवला. नाना यांना सोबत घेऊन वडिलांना शिवपुरीस नेले.
मी पहिल्यांदाच शिवपुरीत गेलेलो. 4 ते 5 हजार लोकांची रांग पाहिली. आता आमचा नंबर कधी येणार असा विचार करीत "कशाला आलो इकडे', असे क्षणभर वाटले. पत्रकारांसाठी असलेल्या सुविधेअंतर्गत आम्हाला बोलावण्यात आले. नाना, मी आणि आणखी दोघे असे मिळून मोटारीतून उचलून वडिलांना समोरच्या टेबलवर झोपवले. कायरोप्रॅक्टिक उपचार करणाऱ्या तिथल्या अमेरिकन व्यक्तीने रिपोर्ट पाहिले आणि काही जुजबी माहिती विचारली. वडिलांना पालथे झोपविले. कमरेजवळ एका विशिष्ट ठिकाणी हाताच्या दोन्ही अंगठ्यांनी जोरात दाब दिला. "कट्‌' असा आवाज झाला. त्यावेळी एकदम वडील विव्हळले. दुसऱ्याच क्षणी त्या व्यक्तीने वडिलांना उठायला सांगितले. काय आश्चर्य वडील उठून चालू लागले...
पाचच मिनिटांपूर्वी ज्या माणसाला उचलून आणले तो चालत येतोय हे पाहून तेथील सारेच अचंबित झाले. बघता-बघता आमच्या भोवताली दीड-दोनशे माणसं जमली. साऱ्यांनाच कौतुक वाटत होतं. माझ्या मनाची अवस्था मला शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही. मला असा आनंद याआधी कधी झाल्याचे आठवत नाही.
तिथून थोड्यावेळाने आम्ही निघालो. चप्पळगाव-धोत्री मार्गे माझं गाव 25 किलोमिटर आहे. घरी आलो. वडील जणु काही झाले नाही असेच चालत-फिरत होते. आनंदाने संध्याकाळी सोलापूरला परतलो आणि डॉक्टर साहेबांना फोन केला. वडिलांचे दुखणे शिवपुरीच्या शिबिरात बरे झाल्याचे त्यांना सांगून टाकले. डॉक्टर साहेब म्हणाले, "ठीक आहे'. त्यांनी फोन ठेवून दिला.
मला खूप वाईट वाटले. मी उत्साहात होतो. डॉक्टरांना किती सांगू असं झालं होतं, परंतु डॉक्टर साहेबांना काहीही जाणून घ्यावं वाटलं नाही. आज वडिला शेतातली कुळव, पेरणी, बैलांना चारा-पाणी सारी कामे करतात.
ज्या उपचारपद्धतीने रुग्णाला दोनच मिनिटांत बरे केले, ती पद्धती अन्य उपचारपद्धतीच्या डॉक्टरांनी का समजून घेऊ नये ? असे काय तंत्र आहे की, ज्यामुळे त्वरित रुग्णाला आराम मिळाला, हे समजून घेणे चुकीचे आहे की काय? यामुळे संबंधित डॉक्टरच्या ज्ञानात भरच पडेल की नाही? येथे अहंकार का आडवा यावा? आपल्याला माहीत नसलेल्या काही गोष्टी सत्य असू शकतात असे डाक्टर मंडळींना का वाटू नये ?
मध्यंतरी ज्येष्ठ पत्रकार श्री. अरुण रामतीर्थकर यांना नागीण या आजाराचा त्रास सुरू झाला होता. त्याचा प्रादुर्भाव डोळ्यात होऊन डोळ्यास दिसणे कमी होऊ लागले. शहरातील नामवंत डॉक्टरांकडून उपचार करूनही काही उपयोग झाला नाही. शेवटचा उपाय म्हणून सोलापूरजवळील कुरूल येथे जडीबुटी देणाऱ्या सामान्य शेतकऱ्याकडे सर गेले आणि आश्चर्य म्हणजे नागिणवर उतारा पडला. डोळाही पूर्ण बरा झाला.
आजही गावागावांत अनेक आजारांवर पारंपरिक पद्धतीने उपचार केले जातात. हे खरे आहे की, उपाचार करणारी मंडळी बऱ्याचदा अज्ञानी असतात. कधी कधी करण्यात येणारे उपचार चुकीचे असतात. परंतु म्हणून पारंपरिक ज्ञानात काहीच तथ्य नाही असे म्हणत उडवून लावणे हे काही मोकळ्या शास्त्रीय मनाचे लक्षण नाही. पारंपरिक उपचार पद्धतींचा आधुनिक डॉक्टर मंडळींनी अभ्यास केला पाहिजे. उपयुक्त असेल त्याचा मोकळ्या मनाने स्वीकारही केला पाहिजे. आपल्या सिलॅबसच्या बाहेरही काही मोलाचे ज्ञान असू शकते याचे भान असू द्यावे.
थोडक्यात सांगायचे तर ऍलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, कायरो आणि आणखी किती पद्धती असतील... त्याच्याशी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना फारसं देणं-घेणं नसतं. रुग्ण बरा व्हावा हाच एकमेव विचार असतो. आपल्या उपचार पद्धतीच्या बाहेरील एखादा उपचार रुग्णांवर प्रभावी ठरत असेल तर खास करून ऍलोपॅथीवाल्या डॉक्टरांनी जिज्ञासूपणाने आणि मोठ्या मनाने ती पद्धती समजून घेतली पाहिजे.
www.psiddharam.blogspot.com
mobile : 9325306283

आणि शिक्षणाचे बाजारीकरण

गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री. बराक ओबामा यांनी अमेरिकेतील शिक्षण संस्थांना आवाहन केले. अमेरिकेतील शिक्षण संस्थांनी भारतातील उच्च शिक्षण संस्थांशी स्पर्धा करण्यासाठी तयार राहावे, असे ओबामा म्हणाले. त्यांचे म्हणणे आहे की, भारतात शिक्षण घेतलेल्या तरुणांना त्यांच्या योग्यतेमुळे रोजगाराच्या साऱ्या संधी त्यांनाच मिळत आहेत आणि सर्वसामान्य अमेरिकी तरुण शिक्षणात मागासलेला असल्यामुळे व्यावसायिक स्पर्धेत तो मागे पडत आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांनी याच संदर्भामध्ये "बंगळूरला ना आणि बफेलोला हो' असे व्यक्तव्य केले होते. यावरून मोठा वादही निर्माण झाला होता, परंतु या वक्तव्यावर भारतात कोणीही आक्षेप घेतला नाही. भारतीय मीडिया आणि बुद्धीजीवी वर्ग कदाचित ओबामा यांच्या अज्ञानामुळे गोंधळून गेला असेल. आमच्या देशात तर शिक्षण क्षेत्रातील स्थितीमुळे सारे विचारवंत चिंतित आहेत. कोठेही वेळ मिळाला की, भारतीय शिक्षण व्यवस्था सुधारण्याच्या गोष्टी आपण करीत असतो.
बदललेल्या परिस्थितीमध्ये कोणीही व्यापक प्रयत्न केले नसतानाही काही बदल घडून येताना दिसत आहे. हे सर्व बदल सकारात्मक आणि योग्य आहेत असे मात्र म्हणता येणार नाही. परंतु देशाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत शिक्षणाचा प्रसार मात्र होताना दिसत आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात खाजगीकरणापेक्षा बाजारीकरण अधिक झाले आहे. परिणामी याचा नकारात्मक प्रभाव जाणवत आहे. संख्यात्मकदृष्ट्या प्रशिक्षित तरुणांची मात्रा प्रचंड वाढली आहे, परंतु त्यांच्या योग्यतेबद्दल चिंता करावी अशी स्थिती आहे. यावर उपाय म्हणून परदेशी संस्था तसेच तेथील पद्धती भारतात लागू करण्याच्या गोष्टीही आम्ही भारतीय करीत असतो. या विसंगतीचे कारण काय? विदेशी लोक आपल्या शिक्षणपद्धतीची स्तुती करीत आहेत. आपल्या शिक्षणपद्धतीचा त्यांनी धसकाच घेतला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण स्वतःच आपल्या शिक्षणपद्धतीवर असंतुष्ट आहोत.
आपण जेव्हा आपल्या स्वभावानुसार कार्य करतो तेव्हा थोडीशी सफलतादेखील समाधान देऊन जाते, परंतु जेव्हा आपण आपल्या स्वभावाच्या विपरित कार्य करू लागतो तेव्हा उच्चतम सफलता मिळाली तरीसुद्धा जीवनात एक पोकळी जाणवत राहते. हीच गोष्ट राष्ट्राच्या बाबतीतही सत्य असेल असे वाटते. या आधुनिक शिक्षणाने आम्हाला रोजगार, विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यापाराच्या क्षेत्रात मोठी सफलता प्रदान केली आहे. आज भारतीय प्रतिभा पाहून विश्व आश्चर्यचकित झाले आहे. आम्ही संधी मिळताच आमच्या देशातही प्रत्येक क्षेत्रात चमत्कार केले आहेत, परंतु तरीही शिक्षणतज्ज्ञ समाधानी नाहीत. याचे एक कारण असे आहे की, गुणवत्तेच्या स्तरावर भारतात प्रचंड विषमता दिसून येते. एकीकडे राष्ट्रीय संस्थान (आय.आय.टी., आय.आय.एम.) आहेत. येथे जगातील सर्वोच्च संस्थांच्या तोडीचे शिक्षण मिळते. दुसरीकडे सर्वत्र पावसाळ्यातील भूछत्राप्रमाणे उगवलेल्या खाजगी शिक्षणसंस्थांमध्ये शिकलेले अभियंते आणि अन्य पदव्या घेतलेले तरुण दिसतात. आपल्या विषयातील अगदी किरकोळ ज्ञानही यांच्यामध्ये नसल्याचे आढळून येते. योग्यतेतली ही दरी निराशेचे एक कारण आहे, परंतु अधिक सूक्ष्म स्तरावर जाऊन पाहिले तर या पोकळीमागील कारण आहे, आमचे आपल्या मुळांपासून उखडले जाणे. भारताचा स्वभावच ज्ञान-प्रदान आहे. आम्ही ज्ञानार्जन आणि ज्ञानदानाच्या अनेक वैज्ञानिक पद्धतींचा विकास केला. आध्यात्मिक ज्ञान-परा विद्येच्या सोबतच व्यावहारिक भौतिक ज्ञान-अपरा विद्येच्या प्रशिक्षणाच्या अत्यंत परिणामकारी पद्धतींचा विकास आणि प्रयोग भारतामध्ये 19व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत होत राहिले.
गांधीजींचे शिष्य आणि विख्यात संशोधक डॉ. धरमपाल यांनी आपल्या संशोधनाने सिद्ध केलेआहे की, हे शिक्षण वैज्ञानिक पद्धतीचे, चारित्र्य निर्माणात प्रखर आणि अत्यंत प्रभावी होते. साऱ्या देशात सुलभपणे उपलब्ध असणारे हे शिक्षण होते. त्यांनी 1823 मध्ये इंग्रजांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे सांगितले आहे की, (ज्यांना आज आपण वंचित किंवा दलित म्हणतो त्यांच्यासहित) शिक्षक आणि शिष्य लाखो शाळा आणि विद्यापीठांमधून शिकत होते. सारा देशच साक्षर होता. शिक्षणपद्धतीदेखील वैज्ञानिक होती, ज्ञानाला अंतःकरणापासून प्रकाशित करणारे प्रशिक्षण मिळत होते. आजच्या विकृत पद्धतीनुसार "माहितीची' देवाण-घेवाण एवढ्यापुरतेच ज्ञानदान मर्यादित नव्हते. आमच्या परंपरेनुसार गुरू म्हणजे असा की, जो आपल्या शिष्याची योग्य पद्धतीने जडणघडण होण्यासाठी आईप्रमाणे कष्ट करतो, शिष्याचे संपूर्ण दायित्व गुरू ग्रहण करतो. शिष्याच्या चित्ताच्या गुणधर्मितेनुसार प्राणाची प्रतिष्ठा करून गुरू त्याला मार्ग दाखवितो. इतकेच नाही तर गुरू त्याच्यासोबत त्या मार्गावरून चालतोदेखील. आवश्यकता पडली तर गुरू शिष्याचे बोट धरेल, कडेवरही उचलून घेईल. ठाकूर श्रीरामकृष्ण परमहंस यांनी आपल्या शिष्यांसोबत असेच केल्याचे दिसते. कुणाला केवळ मार्ग सांगून स्वतःच्या भरवशावर सोडून दिले. कुणाला बोट पकडून मार्ग दाखविला. गिरीश बाबूंचे संपूर्ण दायित्वच आपल्यावर घेतले. त्यांच्या शिष्यांनी देखील या परंपरेचे पालन केले.
आध्यात्मिक क्षेत्रात ही परंपरा दक्षिणामूर्तीला प्रारंभ करून व्यास महर्षींपर्यंत आणि तेथून वर्तमान आचार्यांपर्यंत जिवंत असल्याचे दिसते. काही अपवाद सोडले तर आज देखील अधिकांश पारंपरिक आचार्य शास्त्रीय विधीचा अवलंब करीत असल्याचे दिसतात, परंतु अपरा विद्येच्या क्षेत्रात ही परंपरा लोप पावली आहे. जीवनात आलेल्या पोकळीचे, निराशेचे हेच मुख्य कारण आहे. शिक्षणाची ही वैज्ञानिक पद्धती पुनजीर्वित करण्यात आली तर अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि अन्य गोष्टी बदलल्या नाहीत तरी चालू शकेल. मुख्य गोष्ट तर "गुरू'ची आहे. शिक्षणसेवकांना शिक्षक बनविल्यानंतर गुरू बनण्याचे प्रशिक्षण प्रदान करणे हाच यावरील एकमेव उपाय आहे. शिक्षणाला केवळ "रोजी-रोटी'चे साधन मानून शिक्षणाच्या बाजारीकरणाची स्पर्धा सुरू आहे. या "स्थितीत गुरु-शिष्य' ही वैज्ञानिक परंपरा पुनःस्थापित करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
केवळ दार्शनिक गोष्टी बोलण्याने काहीही होणार नाही. शिक्षणाच्या क्षेत्रात चारित्र्य निर्माणाची न्यूनता भरून काढण्यासाठी आपल्या स्तरावर विनम्र प्रयत्न सुरू करणे आवश्यक आहे.
-सिद्धाराम भै. पाटील.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी