Sunday, December 28, 2008

सारखी लायकी


सारखी लायकी नको बढायकी
कुणी कुणासंग भांडायचं न्हाय
गावकीत अमुच्या ठरलच हाय ।।धृ।।

जमीन जुमला अन्‌ गोठ्यातली गाय
कर्जापाण्यापायी इकायची न्हाय
मौजेत पुख्खा ताडीन्‌ माडी
आल्यागेल्याबरूबर प्यायाचं न्हाय ।।1।।

इठुरखुमाईच्या भक्तीशिवाय
गावून डोलून त्या भजनात काय
सरसी करायला तालासुरांची
डोस्क्यात टाळ कुणी घालायची न्हाय ।।2।।

गावोगावी वर्ग सुरूच हाय
केंद्राबिगर गाव सोभायचं न्हाय
आपल्याच गावात ऱ्हायाचं थाटात
भिवूनशान्‌ आता भागायचं न्हाय ।।3।।

Tuesday, December 23, 2008

समर्थ भारत


जगात सर्वात कार्यक्षम आणि सर्वात वजनाने हलकी, लहान लढाऊ विमान भारताने विकसित केले आहे।
कांची पीठातर्फे चालवली जाणारी चेन्नई येथील शंकर नेत्रालय हे आधुनिकता आणि सेवा यात आशिया खंडात सर्वप्रथम आहे।
मुंबई उपनगरीय रेल्वे दररोज 59 लाख प्रवाशांची वाहतूक करते। जगातली ही सर्वाधिक संख्या आहे.
1077 उपनगरीय रेल्वे केवळ 288 ट्रॅकवर धावतात, ही आश्चर्यजनक किमया आहे।
जगातली पहिली 4 stroke gear scooter बजाज कंपनीने 25 जुलै 1991 रोजी बाजारात आणली।
जय हिंद! जय हिंद की सेना॥ भारताची भूदल सेना (1 कोटी 10 लाख) जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे।
जय हिंद! जय हिंद की सेना॥ भारताची भूदल सेना (1 कोटी 10 लाख) जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे।
"जयपूर फुट' artificial limbs of Jaipur जगात प्रसिद्ध आहे।
भारतात 5195 औद्योगिक कंपन्या असून जगात भारत यात दुसऱ्या क्रमांकावर आहे।
संस्कृत ही प्राचीन भारतीय भाषा संगणकासाठी सर्वाधिक उपयुक्त असल्याचे जगाने मान्य केले आहे।
पाणिनी व्याकरणाची तत्वे सांकेतिक भाषेतून आज software निर्मितीत वापरली जातात।
अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही संस्था जगातील अग्रगण्य संस्थांत गणली जाते।
जगातील सर्वात मोठे टपाल खाते भारतात आहे।
सोलापूर वालचंद कॉलेजमधील प्रा। सयाजीराव गायकवाड (वय 35) यांनी विज्ञानाला अज्ञात असलेल्या 10 वनस्पती शोधल्या आहेत.
कॅन्सरवर effective painkiller चा शोध भारतातील प्रा। अश्रु सिन्हा व त्यांच्या सहकाऱ्यांनी लावला.
अभिनव बिंद्रा यांनी 600 पैकी 600 गुण मिळवून नेमबाजीत जागतिक विक्रम केला आहे।
रेल्वे नेटवर्किंग आणि अधिक सुरक्षित प्रवास यातही भारत सर्वप्रथम आहे।
जगात 8 व्या नंबरची लोकप्रिय व्यक्ती नारायणमूर्ती (Infosys चे अध्यक्ष) असून ते जनसेवेसाठी उत्पन्नातील 12 कोटी रुपये दरवर्षी राखून ठेवतात।
लता मंगेशकर यांनी 1991 पर्यंत 20 भारतीय भाषांतून 30 हजार गाणी ध्वनिमुद्रित केली होती।
जगात सर्वाधिक सिमेंट उत्पादन करणारा देश भारत आहे।
जपान, अमेरिकेनंतर super computer बनवणारा भारत हा एकमेव देश आहे।
स्वत:ची उपग्रह प्रक्षेपण क्षमता असणाऱ्या जगातल्या 6 देशांत भारताचा समावेश आहे। इतर देशांचे उपग्रह भारत भाडेतत्वावर प्रक्षेपित करतो.
जगातली सगळ्यात मोठी चित्रपट सृष्टी भारतात असून सर्वात जास्त चित्रपट भारतात बनविले जातात।
UNESCO कडून पुस्तकांची राजधानी म्हणून 2003 साली दिल्लीची निवड करण्यात आली।
विनोद धाम हे Hardware (pentium) चे पिता म्हणविले जातात।
Hotmail चे निर्माते साबिर भाटिया हे भारतीयच।
जगातली पहिली महिला विमानचालक भारतीय आहे।
जगात सर्वाधिक सायकली भारतात निर्माण केल्या जातात। हीरो सायकली दरवर्षी 60 लाख या संख्येत तयार केल्या जातात.
जगात सर्वश्रेष्ठ हातपंप India Mark 2 भारताने विकसित केले आहे।
India Mark 2 ची दरवर्षी 1 लाख पंपनिर्मिती केली जाते। जगातील अनेक देशांना निर्यातही केल्या जातात.
जर येथील लोक संगठित, प्रशिक्षित आणि मोठ्या ध्येयाने प्ररित केले तर लोकसंख्या ही समस्या नव्हे आपले बलस्थान बनेल।
भारतात प्रति हेक्टर कृषि भूमीवर 5।5 लोक अशी स्थिती आहे. जपानमध्ये हे प्रमाण 30.2, युरोपात 5.9 आहे.
आम्ही भारताचे ऋणी आहोत, कारण त्यांनीच आम्हाला गणित शिकवलं, नसता आजचे वैज्ञानिक शोध लागलेच नसते। - -अल्बर्ट आईन्स्टाइन
जगातल्या कोणत्याही देशापेक्षा भारतातली भूमी दुपटीहून अधिक उपजाऊ आहे।वर्षातून तीन पिके घेण्यासाठी आवश्यक वातावरणही भारतातच आहे.
यज्ञवेदी तयार करणाऱ्या प्राचीन ऋषींनी भूमितीतील अनेक प्रमेये शोधून काढली।
शून्याचा शोध भारताने लावला।

Monday, December 22, 2008

राष्ट्रभक्ती ले हृदय में


राष्ट्रभक्ती ले हृदय में हो खडा यदी देश सारा
संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा ।।धृ।।

क्या कभी किसने सुना है, सूर्य छिपता तिमीर भय से
क्या कभी सरिता रूकी है, बांध से वन पर्वतोंसे
जो न रूकते मार्ग चलते, चीर कर सब संकटोंको
वरण करती कीर्ती उनका, तोडकर सब असूर दल को
ध्येय मंदीर के पथीक को, कंटकों का ही सहारा ।।1।।

हम न रूकने को चले है, सूर्य के यदि पुत्र है तो
हम न हटने को बढे है, सरित की यदी प्रेरणा तो
चरण अंगद ने रखा है, आ उसे कोई हटा दे
दहकता ज्वालामुखी यह आ उसे कोई बुझा दे
मृत्यू की पीकर सुधा हम चल पडेंगे ले दुधारा ।।2।।

ज्ञान के विज्ञान के भी, क्षेत्र में हम बढ पडेंगे
नील नभ के रूप के नव, अर्थ भी हम कर सकेंगे
भोग के वातावरण में, त्याग का संदेश देंगे
त्रास के घन बादलोंसे, सौख्यकी वर्षा करेंगे
स्वप्न यह साकार करने, संघटित हो हिंदू सारा ।।3।।

विजय की यदि प्रेरणा ले, चल पडेंगे हम सभी
संकटोंके दल यहां से, भाग जाएंगे सभी
संघटन के सूत्र मे हम, हृदय जोडेंगे तभी
मातृभूको हम सजाएँ, वैभवोंसे हम सभी
परम वैभव प्राप्त करने, संचरित हो केंद्र धारा ।।4।।

Monday, December 15, 2008

कसाबचे कैवारी


कसाबचे कैवारी
काय संतापजनक अवस्था आली आहे पाहा, पाकिस्तानातून 25 अतिरेकी बॉंब, बंदुका घेऊन थेट मुंबईत शिरतात. 10 मारले जातात 15 गायब होतात. मुंबईतच काय देशातील कोणत्याही शहरात त्यांना प्रेमाने आश्रय देणारे कमी नाहीत. एकजण जिवंत सापडला त्याचे कबुलीजबाब सविस्तर प्रसिद्ध होत आहेत. मेलेल्या 10 अतिरेक्यांचे दफन करण्यास मुस्लिमांनी नकार दिला तर कसाब नावाच्या मानवी कसायाचे वकीलपत्र घेण्यास मुंबईच्या वकिलांनी नकार दिला. या दोन्ही घटना देशप्रेमाचे दर्शन घडवत असताना काहीजणांच्या पोटांत कायद्याच्या राज्याचा मुरडा झाला आहे. या मुरडा झालेल्यात एकेकाळी पाकिस्तानातून जीव वाचवण्यासाठी भारतात निर्वासित म्हणून आलेल्या राम जेठमलानींसारखा माणूसही कसाबला कायद्याची मदत मिळाली पाहिजे, असे ठासून सांगतो तेव्हा 1947 साली सिंध प्रांतात जे हजारो हिंदू कापले गेले त्यात हे का नव्हते, असा विचार येतो. निर्वासित म्हणून आलेल्या या इसमास दुजाभाव न दाखवता देशाचा कायदामंत्री केले, त्याचे चांगले पांग या इसमाने फेडले. आधी देश महत्त्वाचा; तो शिल्लक राहिला तर देशाचा कायदा राहतो. देशाच्या मुळावर आलेल्यांना कसला कायदा? या कसाबला गेट वे ऑफ इंडिया समोरच हजारोंच्या उपस्थितीत जाहीरपणे फाशी द्यावी, अशी सामान्य नागरिकांची इच्छा आहे. हा प्रकार रानटी वाटला तरी शठम्‌ प्रति शाठ्यम्‌ या न्यायाने दहशतवाद अणि दहशतवादी यांचा रानटीपणानेच नि:पात केला पाहिजे. कायद्याने जाऊन महंमद अफजल हा फाशी न जाता तिहार तुरुंगात रोज मटन-बिर्याणी खातोय आणि त्याच्या हातून मारल्या गेलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना अद्याप पुरेसा आधार मिळालेला नाही. कायद्याचे पालन केल्यानंतर कायद्याचेच असे धिंडवडे निघतात. त्यापेक्षा रानटीपणाने प्रकरण संपवण्यात काय गैर आहे?
कॉंग्रेसच्या कृपेने एक अफझल रोज बिर्याणी खायला घालून गेली 5 वर्षे आपण पोसतच आहोेत. आता त्यात कसाबची भर पडेल की काय, असे वाटते. कायद्याने जाऊन त्याला फाशी झाली तरी तो अफझलच्या शेजारच्या कोठडीत जाऊन बसेल. असे आणखी हल्ले होतील. निर्वासित जेठमलानींच्या म्हणण्यानुसार खटले होतील. फाशी होईल. असे फाशीचे 4-5 कैदी झाले की एखादे विमान पळवले जाईल किंवा 200-250 मुलांच्या बालवाडीवर हल्ला करून 250 बालकांना ओलीस ठेवून या 4-5 जणांची मुक्तता होईल. तो अफझल हा कसाब, हे सर्व मसूद अझहरसारखे भारतीय तुरुंगातून सुटून थेट पाकव्याप्त काश्मीरमधील अड्ड्यावर जातील. नव्या हल्ल्याची योजना आखू लागतील. पाकिस्तानातून निर्वासित म्हणून आलेल्या जेठमलानी यांना हेच हवे आहे का? कायद्याचे राज्य आणि न्यायव्यवस्था यांच्यावर जेठमलानी यांचा विश्वास आहे, ही गोष्टच विनोदी आहे. कायदामंत्री असताना सर्वोच्च न्यायालयाशी खालच्या पातळीवर जाऊन भांडणे आणि या अक्षम्य अपराधाबद्दल वाजपेयींकडून मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणे असा प्रकार जेठमलानींच्या बाबत घडला. तेच जेठमलानी आज कसाबचा कळवळा येऊन बोलतात यात त्यांचा बुद्धीभ्रम झाला आहे. मुंबई बार असोसिएशनला "रबिश' अशी शिवी देणाऱ्या जेठमलानी यांचे कायद्याचे ज्ञान उतु जात असेल तर त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा. ते स्वत: आणि त्यांच्यासारख्या लाखो सिंधी लोकांची घरे, वहाने, शेतवाडी, दुकाने, बॅंकेतील पैसे पाकिस्तानातच आहे. पाकिस्तानकडून प्रत्येक सिंधी निर्वासिताला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी जेठमलानी यांनी प्रयत्न करावेत. कसाबचा कळवळा येणे ही गोष्ट सवंग प्रसिद्धीसाठी आहे. जेठमलानीच काय मुंबईतील आणखी एका वकिलाने असेच भंपक विधान केले. कसाबचे वकीलपत्र घेऊन मिळणारी प्रसिद्धी हा त्यामागचा हेतू आहे. असले दळभद्री लोक आपल्यात आहेत हे दुर्दैव.
कसाब हा पाकिस्तानी नागरिक असून, त्याचा अपराध असा आहे की, भारतीय कायद्याचा त्याला उपयोग होऊच शकत नाही। त्याचा खटला विशेष न्यायालयात चालवून फार तर पाकिस्तानी वकिलाकडून त्याचा बचाव व्हावा. कोणी पाकिस्तानी वकील तयार होतो का हेही दिसेल. सद्दाम हुसेन याच्यावरील खटल्याचे जसे जगभर प्रक्षेपण होत होते तसे या खटल्याचेही जगभर प्रक्षेपण व्हावे. त्यातून दहशतवादाचे मूळ पाकिस्तानच आहे हे साऱ्या जगाला कळाले पाहिजे. पाकिस्तानच्या संदर्भात सौहार्दता, सुसंस्कृतपणा दाखवणे आता बास करावे. त्या 10 अतिरेक्यांची मढी जे.जे. शवागारात दोन आठवडे पडून आहेत. मढं सांभाळायाचे म्हणजेही खर्च आहे. त्यांना पाकिस्तान घ्यायला तयार नाही, देशातील मुस्लिम दफनाला तयार नाहीत. दफन झाल्याशिवाय त्यांना जन्नत मिळणार नाही. त्यांचा गुपचुप कोठेतरी दफनविधी उरकला जाण्याची दाट शक्यता आहे. देशाच्या या शत्रूंना 80 गज काय अर्धा गजही जमीन मिळता कामानये. एक तर त्यांचे दहन करावे किंवा ज्या गेट वे मधून ते आले त्याच गेट वे मधून त्यांचे मृतदेह बाहेर काढून खोल समुद्रात फेकून द्यावेत. मानवाधिकार कायदा या गोष्टी येथे उपस्थित न करता कसाब प्रकरण हाताळावे. तथाकथित कायदे पंडितांनी कसाबचा कैवार न घेता थोबाड बंद ठेवावे. हा कसाब म्हणजे दुसरा अफझल होऊ नये याची आतापासूनच काळजी घ्यायला हवी.

अग्रलेख , १६ दिसम्बर २००८, तरुण भारत सोलापुर

Saturday, December 13, 2008

गायी गोपालक संघास

मदरशातून जप्त केलेल्या गायी

गोपालक संघास देण्याचा आदेश

सोलापूर : जोडभावी पेठेतील चिराग अली तकियाजवळील मदरशातून जप्त केलेले 58 बैल आणि 11 गायी सांभाळ करण्यासाठी गोपालक संघाकडे देण्याचा आदेश न्याय दंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिला.
सोलापूर जिल्ह्यातील अशाप्रकारचा हा पहिलाच निकाल आहे. 58 बैल खाटकांना देण्याची मागणी न्यायालयाने गुरुवारी फेटाळली होती. 9 डिसें.ला बकरी ईददिवशी बेकायदा कत्तलींसाठी आलेल्या या जनावरांची हिंदुत्ववादी संघटनांनी सुटका केली. नंतर पोलिसांनी ही जनावरे कोंडवाड्यात ठेवली होती. आज न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. त्याचबरोबर 8 जनावरांची कत्तल ही टळली.
मदरशातून मुक्त करण्यात आलेल्या गायी-बैलांचा सांभाळ करण्याची तयारी गोपालक संघाने अर्जाद्वारे न्यायालयासमोर दाखवली होती. न्यायालयाने गुरुवारी यावरील निर्णय राखून ठेवला होता. शुक्रवारी संध्याकाळच्या सत्रात न्यायाधीश डागा यांनी हा निकाल दिला. गोपालक संघाच्या वतीने ऍड. कणबसकर, ऍड. म्हाळस व रमा कणबसकर यांनी काम पाहिले, तर विरोधी बाजूने ऍड. कोथिंबिरे यांनी काम पाहिले.
पोलीस निरीक्षक काणे यांनी गोपालक संघाच्या गोशाळेस भेट देऊन पाहणी केली. गायी-बैलांचा सांभाळ करण्याची व्यवस्था गोपालक संघाकडे असल्याची खात्री काणे यांनी करून घेतली. तसा अहवाल न्यायालयाकडे सादर केला. त्यानंतर न्यायालयाने निकाल दिला. गोपालक संघ गायी-बैलांचा मालक नाही, असा युक्तिवाद ऍड. कोथिंबिरे यांनी केला. गोपालक संघ ही सामाजिक संस्था आहे. संस्थेकडे गायी-बैलांना सांभाळण्यासाठी पुरेशी जागा आहे. गायी-बैलांच्या संरक्षणाची व्यवस्था आहे, अशी बाजू न्यायालयापुढे मांडण्यात आली.
कायदेशीर तरतुदी
प्राणीरक्षण कायदा अधिनियम 6 नुसार गायी-बैल आणि म्हशींच्या कत्तलींवर पूर्णपणे बंदी आहे. 15 वर्षे वयापर्यंतचा बैल शेतीसाठी उपयुक्त असल्याने, त्याच्या कत्तलीवरही बंदी आहे. काही कारणाने बैल शेतीकामासाठी उपयुक्त नसेल तरच बैलांची कत्तल करण्यास परवानगी आहे. (गायीच्या नव्हे); परंतु अशा बैलांची कत्तल करण्याआधी पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. कत्तल करण्यासाठी परवानगी दिलेल्या बैलाच्या शरीरावर खूण करून कोणत्या कत्तलखान्यात कत्तल करण्यात येणार आहे. याची निश्चितीही संबंधित अधिकारी करतात. या कायद्याचा भंग करणाऱ्यास 1 हजार रुपये दंड किंवा 1 वर्षे कारावास किंवा दोन्ही शिक्षा एकाच वेळी होऊ शकतात।

दै। तरुण भारत, पान ५, १३ दिसम्बर २००८

Friday, December 12, 2008

खाटीक कड़े गायी देण्यास नकार


खाटकांच्या ताब्यात

58 बैल देण्यास

कोर्टाचा साफ नकार

सोलापूर, (विशेष प्रतिनिधी) :- जोडभावी पेठेतील चिराग अली तकिया जवळील मदरश्यातून जप्त केलेल्या 58 बैलांना खाटकांच्या पुन्हा ताब्यात देण्याची मागणी दंडाधिकाऱ्यांनी गुरूवारी फेटाळून लावली. दरम्यान 58 बैल आणि 11 गायींचा सांभाळ करण्याची तयारी गोपालक संघाने दाखविली असून त्यांच्या अर्जावर आज निर्णय अपेक्षित आहे.
मंगळवारी 9 डिसेंबर रोजी बकरी ईद निमित्त कत्तल करण्यासाठी आणलेल्या 11 गायी व 58 बैलांची सुटका सोलापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी केली. दरम्यान चिरागअली तकिया जवळील मदरश्यात गायींच्या कत्तली झाल्या. या संदर्भात अखेर संतप्त तरुणांच्या दबावानंतर पोलिसांनी या मदरश्यातून गायी व बैल ताब्यात घेऊन त्यांची कोंडवाड्यात रवानगी केली. तसेच काल आ. आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजातील मंडळींनी कोंडवाड्यातील जप्त गायी व बैलांची मागणी केली. पण आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी फेटाळून तुम्हाला हवे असेल तर न्यायालयात जा असे सुनावले. यासंदर्भात गुरुवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्र. 3 चे न्यायाधिश डागा यांच्या समोर सुनावली झाली. तसेच पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मोहोळकर यांनी , जप्त केलेल्या 58 पैकी 42 बैल शेती आणि प्रजोत्पादनास उपयुक्त असल्याचा अहवाल पोलिसांना दिला होता. तो न्यायालयाकडे सादर करण्यात आला.
तसेच संबंधित मुस्लिम बांधवांनी आमचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून सबब जप्त केलेली जनावरे ताब्यात देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. पण न्या. डागा यांनी त्यांचा अर्ज फेटाळून लावला. ऍड. कोतींबिरे यांनी यावेळी बाजू मांडली. तर गोपालक संघाच्या वतीने ऍड. कणबसकर यांनी बाजू मांडली असून सर्व 58 बैल, आणि 11 गायींचा गोपालक संघ सांभाळणार असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. पण न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून शुक्रवारी निर्णय अपेक्षित आहे।

आरोपींना अटक नाही

मंगळवारी पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल केला। त्यास 48 तास उलटून गेल्यानंतरही अद्याप एकासही अटक झालेली नाही. संबंधित आरोपी न्यायालयातून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्नशील आहेत.

दै। तरुण भारत, पान ५, १२ दिसम्बर २००८

मदरसा आणि गाय


मदरसा आणि गाय


"मदरसा' हा शब्द वर्तमानपत्रे आणि वाहिन्या यांच्यामधून नेहमी ऐकायला मिळतो. मुस्लिम पंथाच्या मुलांना धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळेला "मदरसा' म्हटले जाते. मदरशांमध्ये काय शिक्षण दिले जाते, याबद्दल मात्र मतमतांतरे आहेत. मदरशांमधून केवळ नैतिकतेचे, धार्मिकतेचे शिक्षण देण्यात येते असे सांगण्यात येते. मदरसा म्हणजे कडवे आणि धर्मांध मुसलमान बनविण्याचा कारखाना असतो, असाही आरोप होत आला आहे. या आरोपाला पुष्टी देणाऱ्या बऱ्याच गोष्टी वारंवार जगासमोर आल्या आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांसारख्या देशांमध्ये मदरशांमधून अतिरेकी निर्माणाचे काम घाऊक प्रमाणात सुरू असते, याबद्दल संशय घेण्याचे कारण नाही. अफगाणिस्तानातील तालिबान आणि पाकिस्तानच्या लाल मशिदीतील गाजलेला मदरसा ही त्याची ठळक उदाहरणे होत.
भारतातील सर्वच मदरशांमधून असे शिक्षण देण्यात येत नसले तरी काही मदरशांमधून धर्मांध पिढी निर्माणाचे काम सुरू असते, हे काही लपून राहिलेले नाही. हैदराबादेतील मदरशांमध्ये देण्यात येणाऱ्या आक्षेपार्ह प्रशिक्षणाचा विस्तृत अहवाल एका हिंदी वृत्तवाहिनीने काही महिन्यांपूर्वी ठळकपणाने दाखविला होता. मदरशांवरील हा कलंक पुसला जावा, असे सर्वसामान्य मुस्लिम बांधवांना वाटणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे, परंतु मंगळवारी बकरी ईदच्या दिवशी सोलापुरातील एका मदरशाच्या आवारात झालेल्या गायींच्या कत्तलीमुळे सोलापुरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र मानले गेले आहे. गायीला 33 कोटी देवतांचे वसतीस्थान मानले गेले आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात गायींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्या आधीपासूनच गोहत्या बंदीची मागणी संपूर्ण भारतभरातून होत आलेली आहे. महात्मा गांधी म्हणतात, "माझ्या हाती सत्ता आली तर सर्वप्रथम मी गोहत्या बंदीचा कायदा करेन.' थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, भारतातील बहुसंख्य असलेल्या समाजाची गोहत्या बंद व्हावी, ही तळमळीची मागणी आहे. हा हिंदूंच्या भावनेचा आणि श्रद्धेचा मुद्दा तर आहेच, शिवाय आर्थिक, पर्यावरणाच्या दृष्टीनेही गोहत्येवर बंदी आली पाहिजे, ही सर्वमान्य झालेली बाब आहे. या स्थितीत मुसलमानांनी उत्स्फूर्तपणे गोहत्या न करण्याची शपथ घेतली आणि तशी कृती केली तर हिंदू-मुस्लिम ऐक्य खऱ्याअर्थाने साध्य होणार आहे.
थोर विचारवंत आणि स्तंभलेखक पद्मश्री मुजफ्फर हुसैन आणि अन्य अनेक मुस्लिम विचारवंतांनी गोहत्या मुस्लिमांनी स्वयंस्फूर्तीने बंद केली पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. भारतभूमीतील संस्कृतीच अशी आहे की, मुस्लिमांनी गोहत्या आणि गोमांसभक्षण बंद केले तर नैसर्गिकपणे भारतातील मुस्लिम समुदाय येथील जनमनाशी एकरूप होऊन जाईल. केवळ गोहत्या आणि गोमांसभक्षण यामुळेच येथील मुस्लिम आणि हिंदू समुदायात खोल दरी निर्माण झाली आहे. मुस्लिमांनी समजुतदारपणा दाखविला तर शेकडो वर्षांचा दुरावा नष्ट होऊन एकोपा निर्माण होऊ शकतो, परंतु ज्यांना हिंदू-मुस्लिम एकोपा नको आहे, असे तत्त्व सदैव गोहत्येचा आग्रह धरतात.
सोलापुरातील मदरशाच्या आवारात गायींची कत्तल होणे किती गंभीर बाब आहे, हे सोलापुरातील मुस्लिम समुदायाने समजून घेतले पाहिजे. मदरशांमध्ये बेकायदा कत्तलखाना चालविणे, या गोष्टीला मुस्लिमांनीच आक्षेप घेणे गरजेचे आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या जागरुकतेमुळे 69 गायी आणि बैलांचे प्राण वाचले, ही अभिनंदनीय गोष्ट आहे! सोलापुरातील मुस्लिम संस्था, नेते आणि अन्य सामाजिक संघटनांनी या कार्यकर्त्यांचे सार्वजनिक कार्यक्रम करून अभिनंदन केले पाहिजे.
मुक्त करण्यात आलेल्या 58 बैलांना खाटकांच्या ताब्यात देण्याला कोर्टाने साफ नकार दिला आहे. तसेच पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मोहोळकर यांनी जप्त केलेले 58 पैकी 42 बैल शेती आणि प्रजोत्पादनास उपयुक्त असल्याचा अहवाल दिला होता, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, परंतु आमदार नरसय्या आडम यांनी गुरुवारी काही मुस्लिम नेत्यांना सोबत घेऊन कोंडवाड्यातील गायी-बैलांची पोलीस आयुक्तांकडे मागणी करणे निषेधार्ह आहे. आडम मास्तर हे आता "ऍडम' मास्तर झाले आहेत. गेल्याच महिन्यात त्यांनी आपल्या कन्येचा ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये विवाह लावून दिला आहे. आडम मास्तर यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याची शहरात जोरदार चर्चा आहे. इथपर्यंत सहन करण्यासारखे आहे, परंतु आता "ऍडम' मास्तर यांचे नाव पुढे करीत कोणी ख्रिस्ती धर्मप्रसार करीत असेल तर मात्र हिंदूंना विचार करावाच लागेल. "ऍडम' मास्तर यांनी गायींना खाटकांच्या ताब्यात द्या, अशी मागणी करून स्वत:ची "खरी' ओळख करून दिली आहे. अशा मतलबी राजकारण्यांपासून हिंदू आणि मुस्लिमांनी सावध झाले पाहिजे.
मदरशांचे पावित्र्य जपत तेथे केवळ नैतिक आणि धार्मिक शिक्षणच दिले जाईल. तसेच हिंदूंसाठी श्रद्धास्थान असलेल्या गोमातेचा आदर राखला जाईल, यासाठी मुस्लिम बांधवांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे आम्हास वाटते. शहरात शांतता आणि सुव्यवस्था नांदण्यासाठी हाच राजमार्ग आहे. अन्यथा शांतता रॅली, शांतता कमिटीच्या बैठका आणि सर्वधर्मसमभावाच्या घोषणा या तकलादू आणि दिखावू ठरतील, याबद्दल आमच्या मनात शंका नाही.

दै। तरुण भारत, अग्रलेख , १३ दिसम्बर 2008

Wednesday, December 10, 2008

मदरशात 8 गायींच्या कत्तली


हिंदुत्ववाद्यांच्या जागरुकतेमुळे

69 गायींचे प्राण वाचले

सोलापूर : बकरी ईदचे निमित्त करून मंगळवारी जोडभावी पेठेतील चिरागअली तकीया मदरशात आठ गायींच्या कत्तली करण्यात आल्या. दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांच्या जागरुकतेमुळे 69 गायींचे प्राण वाचले. मुस्लिम तरुणांच्या हटवादी भूमिकेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, जेलरोड पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याखाली बापू मोतीवाला, महंमद इसाक अब्दुल सत्तार खडके, अब्दुल समद इसाक माडी, सिकंदर उस्मान अलमेलकर, अब्दुल रसिद अली शेख व इतर 3 ते 4 खाटीक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात नरेंद्र काळे यांनी फिर्याद दिली आहे. घटनास्थळावरून 11 जिवंत गाई व 58 बैल तसेच 125 किलो जनावरांचे मांस मिळून आल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे. जोडभावी पेठ येथे चिराग अली रोशन मशिदीच्या समोर मदरशाचे मोठे आवार आहे. या आवारात जनावरांचा बेकायदा कत्तलखाना आहे. येथे मोठ्या संख्येने गायी बांधून ठेवण्यात आल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यावरून मंगळवारी सकाळी 40-45 कार्यकर्ते या ठिकाणी गेले असता आठ गायींची कत्तल झाल्याचे आढळून आले. कार्यकर्त्यांनी तात्काळ या घटनेची पोलिसांना खबर दिली आणि तेथे बांधलेल्या गायी ताब्यात घेतल्या. यावेळी मदरसा कम्‌ कत्तलखान्यातील लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोन्ही बाजूने गर्दी झाली होती. दरम्यान कत्तल झालेल्या गायींचे मांस पोत्यात भरून दुसरीकडे हलविण्यात आले. हिंदुत्ववादी संघटनांनी गायी गोशाळेत सांभाळण्यासाठी देण्याची मागणी केली, तर कत्तलखान्याच्या लोकांनी गायी आमच्या आहेत, त्या देणार नाही! असे सांगितले. यावरून दोन्ही गटात वादावादी सुरू झाली, तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप केला. मदरशात बेकायदा बांधून ठेवण्यात आलेल्या 69 गायी ताब्यात घेऊन पालिकेच्या कोंडवाड्यात पाठवून दिल्या. बकरी ईदच्या दिवशी बकरीशिवाय अन्य जनावरांची कत्तल करू नये आणि गोहत्या करू नये असा कायदा आहे, तरीही बिनबोभाट गोहत्या करण्याचा प्रकार घडल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले होते. गोहत्याबंदीचा शासकीय आदेश कार्यकर्त्यांनी पोलिसांना दाखविला तेव्हा पोलिसांनी सर्व गायी ताब्यात घेऊन कोंडवाड्यात पाठवून दिल्या. गोहत्याबंदीच्या कायद्याविषयी पोलीस अज्ञानी असल्याचे आढळून आल्याने घटनास्थळी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सर्व जनावरांची सोडवणूक झाल्यानंतर त्यांना कोंडवाड्यात सोडताना अज्ञात लोकांनी किरकोळ दगडफेक केली. त्यामध्ये चंदुभाई देढीया यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनाचे सुमारे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले. तर काहीजणांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काणे करीत आहेत.

मदरशाच्या आवारात
बेकायदा कत्तलखाना

हिंदुत्ववादी संघटनांच्या सतर्कतेमुळे 69 गायींचे प्राण वाचले तरी काही प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले आहेत. जोडभावी पेठेतील चिराग अली तकिया मशिदीसमोरील मदरशाच्या आवारात बेकायदा कत्तलखाना किती दिवसांपासून सुरू आहे? महापालिकेने परवानगी दिली का? तसे असेल तर कोणत्या आणि कशा गायींची कत्तल केली जाते? त्या गायींची तपासणी होते का? ज्या मदरशाचा कत्तलखाना म्हणून वापर होतो ती जागा कोणाच्या मालकीची आहे? रोज किती जनावरांची कत्तल होते, याची नोंद आहे का? मशीद आणि मदरसा यासमोरील सार्वजनिक रस्ताच मोठे लोखंडी फाटक बसवून नियंत्रित करण्यात आला आहे. हे अतिक्रमण महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटले कसे? गोहत्याबंदी असताना धाडसाने जनावरांची, गायींची कत्तल होते. हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने चालतो? असे अनेक प्रश्न गोहत्येच्या निंद्य प्रकाराने उपस्थित झाले आहेत.

दै। तरुण भारत, पान १

१० दिसम्बर २००८

Monday, December 8, 2008

बापूसाहेब नावाचा दीपस्तंभ



अरुण करमरकर, मुंबई, हिंदुस्थान समाचार

पूर्णवेळ समाजकार्य करणाऱ्या प्रचारक कार्यकर्त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील परंपरा अत्यंत समृद्ध आहे। ऐन उमेदीच्या वयात व्यक्तिगत आकांक्षा आणि निजी जीवनाची उभारणी (आजच्या परिभाषेत करिअर) पूर्णपणे बाजूला सारून नि:संगपणाच्या वाटेवर काही पावले चालण्याची प्रेरणा आजवर हजारो तरुणांंच्या मनात जागविण्यात ही संघ परंपरा यशस्वी ठरली आहे. अगदी प्रारंभीच्या काळात अनेकांनी याच वाटेवर आपली मार्गक्रमणा अखंडितपणे करून आपली जीवनयात्रा संपन्न केली. तर अन्य अनेकांनी काही वर्षांनंतर प्रचारकी दिनक्रम थांबवून व्यक्तिगत जीवनाचा मार्ग पत्करला. मात्र व्यक्तिगत जीवनाकडेही त्यांनी साधना म्हणूनच पाहिले. प्रचारकी जीवनाच्या काळात प्राप्त केलेल्या जीवनदृष्टीच्या प्रकाशातच प्रत्येक पाऊल टाकण्यात आणि आपल्या कौटुंबिक जीवनाचा प्रत्येक पैलू घडविण्यात इतिकर्तव्यता मानली. चं.प. तथा बापूराव भिशीकर हे अशा तपस्वी व्यक्तिमत्त्वांपैकीच एक.

एकूण 93 वर्षांच्या आयुष्यातील 5-6 वर्षे बापूसाहेब संघाचे प्रचारक राहिले। त्यानंतरच्या 65 वर्षांमध्येही प्रचारकी मानसिकतेचा एक क्षणासाठीही त्यांनी कधी विसर पडू दिला नाही. सामूहिकता, अनामिकता, साधनसुचिता, गुणग्राहकता, मूल्यांबाबतच्या निष्ठा, प्रथमपुरुषी एकवचनी वृत्तीतून स्वत:प्रती कठोर आणि अन्यांप्रति क्षमाशीलतेचे औदार्य या साऱ्या बाबींचा विकटस्पर्श त्यांच्या वृत्तीप्रवृत्तींनी सतत जोपासून ठेवला. संघाच्या वाट्याला आलेल्या संघर्षात साहस, संयम आणि दृढनिष्ठेने सामोरे जाणाऱ्या आघाडीच्या फळीतले स्वयंसेवक ही भूमिकाही कधी सोडली नाही. विभाजनपूर्व कराची- सिंध भागात त्यांनी संघप्रचारक म्हणून काम केले, तो काळ तर सतत संघर्षाचा आणि जोखमीचा. नंतरही पत्रकार- संपादक या नात्याने ज्या तरुण भारतच्या उभारणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली त्यालाही (तरुण भारतला) सतत संकटांनी घेरलेल्या वातावरणातच वाटचाल करावी लागत आली. तशाही स्थितीत सत्य जपत आणि स्वत्वाशी तडजोड न करता त्यांनी तरुण भारत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला आणि लौकिकप्राप्त बनवला. पुढे ज्यांनी पत्रकार-स्तंभलेखक-लेखक म्हणून मानमान्यता मिळविली, अशा अनेकांना लिहिते करण्याचे श्रेय बापूसाहेबांच्याच नावावर लिहिले जाते. आणीबाणी आली, हुकुमशाहीचा बेजुमान वरवंटा लोकशाही मूल्यांना चिरडत निघाला, वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या चिंधड्या उडवल्या गेल्या. सुमार बुद्धीचे आणि कर्तृत्वाचे सरकारी अधिकारी सेन्सॉरशिपच्या नावाखाली वृत्तपत्राच्या कार्यालयात बसून मुजोर हडेलहप्पी करू लागले. अशा अत्यंत विपरित परिस्थितीत मोठ्या कुशलतेने पण खंबीरपणे मोजक्याच पत्रकारांनी वृत्तपत्रस्वातंत्र्याची नौका हाकत ठेवली. बापूसाहेबांचे नाव अशा पत्रकार/ संपादकांच्या यादीत अग्रभागी तळपले. संघविचारावरील अतूट, अविचल निष्ठा आणि अस्सल पत्रकाराची तटस्थता यांच्यातील समतोल सांभाळण्याचे कौशल्य त्यांच्या ठायी होते. अनिष्ट, अनौचित्यावर कठोर प्रहार करताना त्यांची लेखणी कधीच थरथरली नाही, पण भाषेचे साधन, सौष्ठव, सभ्यता, शालीनता, यांच्या मार्यादांचाही त्यांनी कधी अतिक्रम केला नाही.

शाश्वत नीतिमूल्ये, सुसंस्कार यांचा पाझर तर त्यांच्या लेखणीतून अखंड स्त्रवत असे. संपादकीय आणि विविध विषयांवर विविध नियतकालिकांमधून त्यांनी दीर्घकाळ केलेले स्तंभलेखन असो. साध्या, सोप्या, सुगम आणि नेमक्या शब्दांमध्ये अर्थगर्भ लिखाण कसे करावे याचा आदर्श वस्तुपाठच बापूसाहेबांचे लेखन साकार करीत आले. म्हणूनच सध्याच्या काळात पत्रकारितेत फोफावलेल्या सवंगपणाने आणि उथळपणाने ते व्यथित होत असत. दोनच वर्षांपूर्वी राष्ट्रीय पत्रकारिता न्यासातर्फे देण्यात येणारा ज्येष्ठ पत्रकाराचा नामवंत पुरस्कार त्यांना सांगली येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्या ज्येष्ठ पत्रकार बापूराव लेलेंचे सहकारी, समकालीन या नात्यानेच बापूसाहेब भिशीकर संपादक म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरले. त्यामुळे बापूराव लेलेंच्या नावाचा पुरस्कार बापूसाहेब भिशीकर यांना हा एक अपूर्व समसमा संयोग होता. त्या समारंभात बापूसाहेबांनी केलेल्या भाषणामधून त्यांनी आजच्या पत्रकारितेवर केलेले भाष्य अतिशय मोलाचे होते. नव्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाने प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात केलेल्या क्रांतीचे त्यांनी आपल्या भाषणातून मुक्तपणे स्वागत केले, पण त्याचबरोबर यांत्रिक झगमगाटाने दीपून न जाण्याचा, पत्रकारितेच्या मूलमंत्रांचा विसर पडू न देण्याचा संदेशही आजच्या पत्रकारांना देण्यास ते विसरले नाहीत. एखाद्या मोठ्या समारंभात बापूसाहेबांनी केलेले बहुधा ते शेवटचेेच मोठे भाषण असावे. व्यक्तिगत संवादातून आजच्या साऱ्या ज्वलंत विषयांवर मनोज्ञ चर्चा करण्याचा क्रम आणि उत्साह मात्र त्यांनी अखेरच्या क्षणांपर्यंत टिकविला हे विशेष. त्यांच्यापाशी बसून ही उत्साही उद्‌बोधक चर्चा करण्याचे भाग्य मला अगदी अलीकडच्या दिवसांपर्यंत लाभत राहिले.
सध्याच्या राजकीय, सामाजिक वातावरणाबाबतची त्यांच्या मनात दाटून राहिलेली खंत त्यांच्या गप्पांमधून जाणवत असे, पण तरीही त्यांचा सूर आणि त्यांच्या वृत्ती कधीही निराशावादाकडे झुकल्या नाहीत हे विशेष। कार्यकर्त्यांमधील अभ्यासूवृत्ती, व्यासंग कमी होत चालल्याबद्दल जशी त्यांच्या मनात व्यथा होती, तशीच अनौपचारिक स्नेहसंबंध, परस्परसंवाद, संपर्क आणि त्यातून परस्परांबद्दल निर्माण होणारा विश्वास यांना ओहोटी तर लागली नाही ना ही शंका त्यांना भेडसावत असे. अडवाणी- अटलजी यांच्याविषयी सरसंघचालकांनी दिलेल्या मुलाखतीवरून प्रसारमाध्यमांनी माजवलेला गदारोळ, अडवाणी यांनी जिनांविषयी, पाकिस्तान दौऱ्यात, काढलेल्या उद्‌गारांच्या विषयावरून स्वयंसेवकांच्या वर्तुळात निर्माण झालेले अस्वस्थतेचे वातावरण, अन्यान्य राजकीय पक्षांबरोबरच भारतीय जनता पक्षातही प्रसंगी अनुभवाला येणारे निराशाजनक प्रसंग अशा अतिशय नाजूक विषयांबाबत त्यांनी प्रत्यक्ष चर्चेत तेसच पत्रांच्या द्वारे केलेले मार्गदर्शन माझ्यासाठी सदैव पथदर्शक राहील.

नव्वदी उलटल्यानंतरही शरीर मनाची सर्व गात्रे बऱ्यापैकी सक्षम स्थितीत राहिली हा अर्थातच त्यांच्या सात्विक आणि तपस्वी जीवनशैलीचा परिणाम होता। शेवटपर्यंत त्यांची लेखणी लिहिती होती हे विशेष. पत्रकार या नात्याने राजकारणावर जितक्या अधिकारवाणीने ते बोलू- लिहू शकत, तितक्याच किंबहुना त्यापेक्षा कांकणभर जास्तच अधिकाराने ते अध्यात्म सांगत- लिहित राहिले. हा अधिकार त्यांना अर्थातच व्यासंगाने आणि तपश्चर्येने प्राप्त झाला होता.

सर्वार्थाने बापूसाहेब "एक दीपस्तंभ' या विशेषणाला पात्र ठरतात. पत्रकार म्हणून स्वयंसेवक म्हणून आणि माणूस म्हणूनही त्यांचे जीवन सदैव दीपस्तंभासारखेच मार्गदर्शन करीत राहील, यात शंका नाही.


ऋषी संपादक : बापूसाहेब भिशीकर


ऋषी संपादक :
बापूसाहेब भिशीकर

पत्रकाराचे लेखन कसे असावे, याबाबत लोकमान्य टिळक यानी एके ठिकाणी लिहून ठेवले आहे की, पत्रकाराची लेखणी ही धीरगंभीर नदीच्या प्रवाहासारखी असावी. तिच्या प्रवाहाला खळखळीचा वेग नसावा पण कोठे तुंबूनही राहता कामा नये. थोडक्यात तिला कोठेतरी पोहोचण्याची घाई नसावी आणि वाया घालवायला वेळही नसावा. या साऱ्या वर्णनाची प्रचीती बापूराव यांच्या लेखनातून नेहेमी येते.

रात्रंदिवस आपण रहात असलेली जमीन आपल्याला केवळ वजनापुरताच आधार देत असते असे नव्हे तर पावलोपावली आपल्याला सांभाळून घेत असते. "अतिपरिचयात अवज्ञा' असल्याने आपल्याला त्या आधाराची किंमत कळत नाही. ऋषीमुनी जेंव्हा त्या पायाखालच्या जमिनीबाबत बोलतात, तेंव्हा "पादस्पर्शम्‌ क्षमस्व मे' असे उद्‌गार काढूनच पुढचे बोलायला सुरुवात करतात. आज या पायाखालच्या जमिनीची आठवण येण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात गेली सत्तर वर्षे ज्यांनी आपल्या राष्ट्रवादी चिंतन, पत्रकारितेतून प्रखर लेखन आणि संतवाङ्‌मयातून महाराष्ट्रातील फार मोठ्या वर्गाला जमिनीचा आधार वाटावा, अशी जीवनमूल्यांची बैठक दिली, त्या श्री.बापूराव भिशीकर यांचे सोमवारी वयाच्या 93 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
ज्या वेळी सिंधमध्ये पाकिस्तान निर्मितीच्या प्रक्रियेची धग सामान्य हिंदूला बसण्यास सुरुवात झाली होती, त्या काळात तेथे जावून संघाचे प्रचारक म्हणून काम केलेले बापूराव, महाराष्ट्रात तरुण भारत वाढावा व त्याच्या अधिकाधिक आवृत्त्या निघाव्या म्हणून आणिबाणीसारख्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संपादक म्हणून काम करणारे बापूराव आणि गेली तीस वर्षे संतवाङ्‌मयाच्या माध्यमातून संस्कार बांधणीचा एक नवा अध्याय रचणारे बापूराव असा त्यांचा बहुआयामी परिचय महाराष्ट्रातील तीन पिढ्यांना आहे.गेली तीस वर्षे बापूराव प्रामुख्याने संतवाङ्‌यावर व जीवनमूल्ये मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संस्कारप्रक्रियेवर लिहित आहेत. पण त्यांचा हा एकमेव परिचय नाही. आपल्या समाजाची आणि देशाची उभारणी ही प्रखर राष्ट्रवादाच्या आधारे व्हावी, यावर ते जवळजवळ सत्तर वर्षे लिहीत आहेत. 1948साली महात्मा गांधी यांची हत्या झाल्यावर संघावर बंदी आली, त्यामुळे ती उठवण्यासाठी भूमिगत राहून आपले म्हणणे प्रखरपणे मांडत राहणे हे काम त्यानी केले व त्यासाठी आवश्यक ती किंमतही मोजली. ते सहा महिने कारावसातही होते. बापूराव हे एम ए होते, येवढाच परिचय करून दिला तर तो उल्लेख "बायोडाटा' सारखा वाटेल पण सत्तर वर्षापूर्वीच्या नागपूरच्या डॉ. केशव बळिराम हेडगेवार हे संघ कामाची आधार शीला रचत असतानाच्या वातावरणात "जे करू ते अत्युत्कृष्ट करू' असे म्हणून जीवन देण्यास तयार झालेली जी तरुळमंडळी होती, त्यात बापूराव यांचा समावेश होता, त्यामुळे त्या काळात सायकलवरून दररोज काही मैल जावून शाखा घेणे हा त्यांचा दिनक्रम होता, त्याच प्रमाणे एम ए परीक्षा द्यायची असेल तर तेथे असलेले सुवर्णपदक हे आपल्या अभ्यासाने आपल्याकडेच आले पाहिजे, असे ठरविणाऱ्या तरुणांच्यापैकी ते होते, त्यामुळे त्यांच्या सुवर्णपदक मिळवण्यास राष्ट्रउभारणीच्या कामात पायाभूत होण्याची उंची आहे. त्याच वेळी त्यांच्या कामाच्या विरोधकांनी त्यांच्यावर जेंव्हा हल्ला करून त्यांचे काम बंद पाडण्याचा जेंव्हा प्रयत्न झाला, तेंव्हा हल्ला करण्यासाठी आलेल्या पन्नास जणांशी दोन होत करून सर्व शक्तिनिशी त्यातून निसटण्याचे कौशल्यही त्यानी दाखवले आहे. पण मराठी मनावर त्यांच्या लेखनाची जी छाप आहे ती प्रखर पण संयमित लेखकाची.
दैनिक वृत्तपत्रांच्या विषयांची व्याप्ती ही मोठी असते. तेथे धारदार टीकेचीही आवश्यकता असते पण हळुवार संवादाचीही आवश्यकता असते. या दोन्ही कसोट्यांचा बापूराव यांचे लेखक हे वस्तुपाठ आहेत, याची प्रचीती कालपर्यंत त्यांचे लेखन वाचताना येते. अलिकडे त्यानी राजकीय संदर्भ असलेले लेखन कमी केले होते. तरीही अतिरेक्यांचे देशात व सीमावर्ती प्रदेशात होणारे हल्ले, ईशान्य भारतातील पंचमस्तंभीयांचा प्रश्र्न, सत्तेवर असणाऱ्या त्या त्या वेळच्या राज्यकत्यार्ंची "कच खाऊ भूमिका' ही त्याना अस्वस्थ करायची आणि नव्वदी ओलांडल्यानंतरच्या वयातही ते धारदार लेखन करीत. असे असले तरी त्याना टीका करताना "आपल्या विचाराच्या विरोधकाचा कोठेही संबंध आला तर लगेच कर टीका' सरधोपट मार्ग स्वीकारण्याची वेळ त्यांच्यावर कधी येत नाही. त्यांचे लेखन येवढे संयमित असते की, कोणत्याही कारणाने अस्वस्थ झालेल्या कोणालाही मन शांत करून घ्यायचे असेल तर त्यानी बापूराव भिशीकर यांचा कोणताही लेख वाचावा.
अडतीस साली म्हणजे अवघ्या तेविसाव्या वर्षी बापूराव सिंधमध्ये प्रचारक म्हणून गेले. त्या काळी पाकिस्ताननिर्मितीची धग सामान्य माणसास जाणवण्यास सुरुवात झाली होती. त्या काळात त्यानी पाच वर्षे काम केले. त्यांच्या त्या वेेळच्या कामाचा त्यानी संघात आणलेले माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी अतिशय गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. 1943 मध्ये सिंधमधून आले आणि संघाच्या कार्यकर्त्यामंडळींनी सुरु केलेल्या नवयुग विद्यालयाचे मुख्याध्यापक झाले. या काळात बापूराव यानी संघाच्या कामावर बरेच लेखन केले. काही काळ ते एका साप्ताहिकाचे संपादकही होते. 1949 मध्ये त्यावेळचे संघाचे वरीष्ठ पदाधिकारी श्री बाळासाहेब देवरस यांच्या पुढाकाराने श्री.ग.त्र्यं.माडखोलकर यांचा तरुणभारत हा नरकेसरी या संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आला. त्यात संपादक म्हणून काम करत असलेले श्री.माडखोलकर यांचे सहकारी म्हणून बापूराव काम करू लागले. वृत्तपत्राच्या संपादक विभागाच्या कामाचे सर्व प्रकारचे अनुभव त्याना येथे घेता आले. 1957 मध्ये तरुणभारतची पुण्यात आवृत्ती काढण्यात आली व त्याचे संपादक म्हणून श्री ग वि केतकर यांनी जबाबदारी स्वीकारली. 1963 मध्ये त्यानी पुणे तरुणभारतची संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकालात पुणे तरुणभारत हे संपूर्ण मराठवाडा, नाशिक विभाग, कोल्हापूर, सोलापूर, कोकण या भागात सर्वात अधिक गावी जाणारे दैनिक म्हणून पसरू शकले. त्याकाळी दैनिकांचे कमाल खप हे एक ते दीड लाख या घरात असत आणि बापूराव यांनी निवृत्तीच्या वेळी जेंव्हा तरुणभारतची जबाबदारी हस्तांतरीत केली, तेंव्हा त्यात तरुण भारतचा समावेश असे. त्या अतिशय प्रतिकूल काळात तरुणभारतची प्रगती कशी झाली किंवा कोणत्या समस्या उभ्या राहिल्या हा स्वतंत्र अध्याय आहे. पण एक गोष्ट खरी की, महाराष्ट्रात फार मोठा जनसंपर्क, नवनवीन विषय हाताळण्यासाठी परिश्रमी सहकारी मंडळींनी केलेले सहकार्य आणि प्रतिकूल परिस्थितीला न डगमगण्याची संघभावना हे तरुणभारतच्या यशाचे रहस्य आहे. त्यात आणिबाणीतील दहशतवादाचे वातावरण आणि वृत्तपत्रावरील प्रसिद्धिपूर्वतपासणीची बंधने हा सारा वेदनाकर विषय असायचा.
रस्त्यावर सायकलला दिवा नसणे किंवा डबलसीट नेणे अशा स्वरुपाच्या गुन्ह्यावर कारवाई करणाऱ्या पोलीस मंडळीवर अचानक वृत्तपत्रावर प्रसिद्धीपूर्व बंधने हाताळण्याची वेळ आली होती, त्यामुळे रात्रीअपरात्री बापूराव यांच्या घरी जावून दरडवायलाही ही मंडळी मागेपुढे बघत नसत. त्याकाळात त्यावेळच्या सरकारची अशी इच्छा असायची की, कोणत्याही कारणाने का होईना तरुण भारत बंद पडावा, त्यासाठी अधिकाधिक अपमामित करण्याचा सपाटा सरकारने लावला होता. हा हेतू लक्षात आल्यावर अपमानाची पर्वा न करता तरुण भारत चालू ठेवण्याचा चंग त्यावेळच्या जबाबदार मंडळींनी बांधला आणि त्याला यशही मिळाले. पुण्याच्या एका आवृत्तीतून नंतर महाराष्ट्रात सुरु झालेल्या चार आवृत्त्या आजही आपल्या संकल्पसिद्धिसाठी जिद्दीने उभ्या आहेत.

त्या काळातील सरकारी बंधनामुळे राजकीय विरोध करणारा एखादा जरी शब्द कच्च्या प्रुफात दिसला तरी कार्यालयावर हत्यारी पोलीसांचा बंदोबस्त वाढायचा. पण या प्रतिकूलतेतून मार्ग काढण्यासाठी बापूराव यानी तरुणांशी संवाद करून त्यावर लेखन करण्याचा एक निराळाच मार्ग स्वीकारला आणि त्यातून एका नव्या लेखन प्रकारालाच सुुरुवात झाली. आणिबाणीचा एक सर्वात मोठा परिणाम म्हणजे तरुणांमध्ये अशाश्र्वततेची भावना निर्माण झाली होती. भारतासारख्या खंडप्राय देशात कोणी एक हुकुमशहा उभा राहतो आणि देशातील कोट्यवधी तरुणांपुढे अनिश्र्चिततेचे प्रश्र्न चिन्ह निर्माण करतो,असे वातावरण तयार झाले होते.यातून सावरण्यासाठी त्यानी भक्कम जीवनमूल्यांच्या आधारे आणि त्यांच्याच घरच्यांशी संवाद करून त्याना आत्मविश्र्वास निर्माण करण्यावर त्यानी भर दिला.दर आठवड्याला या विषयावर एक लेख साप्ताहिक अंकात असे आणि त्याला महाराष्ट्रात फार मोठा वाचक वर्ग असे. आजूबाजूच्या परिस्थितीने अस्वस्थ झालेल्या प्रत्येकाला काही तरी म्हणायचे असायचे आणि बापूराव त्यांची वेदना व्यक्त करत. प्रत्येकाची वेदना निराळी असली तरीही त्याचे स्वरुप प्रातिनिधिक असे. त्याला कधी जीवनातील उदाहरणाचा दृष्टांत दे तर कधी संत वाङमयाचा आधार दे, यातून सुरु झालेला तो संवाद आजही सुरु आहे.
1978साली बापूराव निवृत्त झाले.त्यांच्या निरोपसमारंभाच्या अध्यक्षपदी त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार होते. गेल्या पन्नास वर्षात जे फार थोडे लक्षात राहण्यासारखे निरोप समारंभ झाले, त्यात त्या कार्यक्रमाचा समावेश करावा लागेल. बापूराव यांच्या वृतस्थ जीवनावर शरदराव यानी केलेले विवेचन हे आजही अनेकांच्या स्मरणात असेल.
बापूराव निवृत्त झाले म्हणजे वृत्तपत्राच्या दररोजच्या धबडग्याच्या कामातून बाजूला झाले येवढेचे काय ते. पण दररोजचे लेखन, ग्रंथनिर्मिती, नव्या नव्या लोकांशी संवाद आणि कूट वाटणाऱ्या समस्या त्याच्यावरील उपायासह सोप्या भाषेत मांडणे हे त्यांचे काम कालपर्यंत अविरतपणे सुरु होतेे. त्यानी त्यांचे बरेच व्याप कमी केल्यावरही पंचवीस गं्र्रथांची निर्मिती झाली आहे. त्यांच्या गं्रथांच्या यादीत सर्वात वरचा क्रमांक लागतो तो म्हणजे संघजीवनावरील वाङ्‌मयाचा. डॉ.हेडगेवार आणि श्रीगुरुजी यांच्या जीवनावर लिहिण्याचा अधिकार फार थोड्याना प्राप्त झाला आहे आणि तो अधिकार त्यागाने प्राप्त झाला आहे. बापूराव यांचे लेखन लक्ष लक्ष संघस्वयंसेवकांच्या दररोजच्या वाचनात आहे. संघटना जीवनात अनेक प्रसंग असे असतात की, जेथे संघटना वाढणाऱ्या, काम वाढणाऱ्या आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणाऱ्या परामर्षाची आवश्यकता असते, अशावेळी बापूराव हे आधारवड वाटतात. गेली तीस वर्षे संतवाङमयांचा वेध घेत त्यानी राष्ट्रबांधणीच्या आपल्या ध्येयाच्या कामात भर टाकली आहे. भारतातील संतांनी ईश्र्वरी आराधनेच्या माध्यमातून राष्ट्रउभारणीचे काम केले आहे आणि तेच काम आपल्याला पुढे न्यायचे आहे हा श्री गुरुजींचा विचार बापूराव यानी कदाचित काही हजार लेखातून पुढे नेला. सकाळ, पुढारी, तरुण भारत अशा दैनिकातून कधी साप्ताहिक सदर तर कधी दैनंदिनी सदर यातून तो मांडला. बापूराव यांच्या आजपर्यंतच्या लेखांची सर्व प्रकाराच्या लेखाचे संकलन करणे हा कदाचित स्वतंत्र कामाचा विषय होईल. अर्थात त्यांच्या या कामात प्रामुख्याने सौ. कुसुमताई आणि मुले, सूनबाई, नातवंडे या साऱ्यांचा त्यांच्या त्यांच्या परीने सहभाग आहे.
बापूराव यांचे मार्गदर्शन हे कार्यकर्त्यांना ईश्र्वरीप्रसादाची अनुभूती देऊन जात असे. बातूसाहेबांनी निर्माण केलेल्या वाङमयातूनही ही अनुभूती येऊ शकते.
कै. बापूसाहेब भिशीकर यांना तरुण भारत परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

मोरेश्वर जोशी, पुणे प्रतिनिधी

चं. प. भिशीकर यांचे निधन


तरुण भारतचे माजी संपादक

चं. प. भिशीकर यांचे निधन
सोलापूर: पुणे तरुण भारतचे माजी संपादक आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक चंद्रशेखर परमानंद तथा बापूसाहेब भिशीकर यांचे सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील हराळी ज्ञानप्रबोधिनी केंद्रात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात कन्या डॉ. स्वर्णलता भिशीकर आणि पुत्र आनंद हे आहेत.
सोमवार दि. 8 डिसेंबर रोजी पुणे येथे सायंकाळी त्यांच्यावर अंत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यंसंस्कारासाठी पुण्याकडे रवाना करण्यात आले आहे.
अल्प परिचय: बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. एम.ए. पर्यंतचे शिक्षण नागपूरमध्ये झाले. 1938 ते 1943 या कालावधीत विभाजनपूर्व सिंध प्रांतात- कराची येथे संघ प्रचारक म्हणून कार्य केले. संघबंदी काळात कारावास. नागपूर तरुण भारतमध्ये सहसंपादक, पुणे तरुण भारतचे प्रारंभी कार्यकारी संपादक व नंतर प्रमुख संपादक. आणीबाणीच्या काळात उमेद वाढविणारे लेखन. प्रारंभापासून 1979 पर्यंत पुणे तरुण भारतमध्ये 15 वर्षे "हितगुज' हे अत्यंत लोकप्रिय सदर. संतवाङमयावर प्रवचने. पू. स्वामी माधवनाथ यांचा अनुग्रह. दै. सकाळमध्ये दोन वर्षे भक्तीरंग आणि भक्तिगंगा ही दैनिक सदरे. वरील दोन्हीचीही पुस्तके भारतीय विचार साधनेतर्फे प्रकाशित. लेखन व सामाजिक-राष्ट्रीय जागरण कार्याबद्दल अनेक पुरस्कार. विश्व हिंदू परिषद, ज्ञान प्रबोधिनी-सोलापूर, विवेक विचार (विवेकानंद केंद्राचे मराठी मासिक) इ. कार्यांना वैचारिक मार्गदर्शन. समर्थांच्या स्फूट रचनांवर अलीकडेच 700 पानी ग्रंथ प्रकाशित.

Monday, December 1, 2008

मोदी जिंकले...


मोदी जिंकले,

मीडिया हरली !


गेल्या वर्षी याच डिसेंबर महिन्यात मीडियाने मोदीविरोधी वातावरण निर्माण केले होते। परंतु मोदी जिंकले... त्यावेळी लिहिलेला हा लेख...


गुजरातेत भारतीय जनता पक्षाला खणखणीत बहुमत मिळाले आहे. त्यामुळे ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांना सणसणीत चपराक बसली आहे, परंतु नाक कापले तरी *** शिल्लक आहे! अशा वृत्तीने सेक्युलर मुखंड वागताना दिसत आहेत.
नरेंद्र मोदी हे निष्कलंक आहेत. प्रामाणिक आहेत. क्षमतावान आहेत. कुशल संघटक आहेत. प्रखर देशभक्त आहेत. भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ आहेत. प्रशासनावर त्यांची भारी पकड आहे. इस्लामी अतिरेक्यांचे ते यमदूत आहेत. हिंदुत्वावर त्यांची श्रद्धा आहे. ते अष्टावधानी आहेत. ते उत्तम वक्ते आहेत. ते तत्त्वज्ञ आणि विचारवंत आहेत. नरेंद्र मोदी हे उत्तम लेखक आणि कवी आहेत... ही यादी आणखीही लांबविता येईल, परंतु असे असतानाही केवळ हिंदुत्व द्वेषावर पोषण झालेल्या मीडियातल्या स्वयंघोषित विचारवंतांनी मोदींचा दुस्वास केला आणि करीत आहेत. अशा कावळ्यांच्या शापाने काहीही फरक पडत नाही हेच खरे.
भारतीय जनता पक्ष जेव्हा केव्हा सत्तेत येईल तेव्हा नरेंद्र मोदी हे निश्चित पंतप्रधान बनतील. बनू शकतील असे माझे म्हणणे नाही - ते पंतप्रधान बनतीलच! कारण ती क्षमता त्यांच्यात आहे. हा निष्कर्ष कदाचित अनेकांना रुचणारा नसेलही, परंतु सत्याकडे आपण किती काळ दुर्लक्ष करू शकतो? तुमच्या आमच्या म्हणण्याने विदूषक लालूप्रसाद तत्त्वज्ञ बनणार नाही आणि अब्दुल करीम तेलगी काही धर्मराज बनणार नाही.
खूप कमी लोकांना माहीत असेल की, दिल्ली येथील भाजपाचे मुख्यालय 11, अशोका रोडच्या मागे एका छोट्या खोलीत नरेंद्र मोदी कितीतरी वर्षे राहात होते. त्यांच्यासोबत होते भाजपाचे दुसरे महासचिव गोविंदाचार्य. त्यांच्या खोलीत एकच फोन होता. त्यांचे अंथरूण जमिनीवरच असायचे. नरेंद्र मोदींच्या कार्यालयाचा दरवाजा सताड उघडा असायचा...
नरेंद्र मोदी हे विद्यार्थी दशेत असताना नवनिर्माण आंदोलनात त्यांनी केलेले युवा संघटन पाहून लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी त्यांची पाठ थोपटली होती. हा तरुण पुढे देशाचे नेतृत्व करेल असे संकेतही त्यांनी दिले होते. साधेपणा, नम्रता, प्रामाणिकपणा यांचे संस्कार त्यांच्यावर स्वयंसेवक आणि प्रचारक राहिल्याने आहेतच, परंतु मीडियाने त्यांची प्रतिमा मग्रूर आणि सहकाऱ्यांशी फटकून वागणारा, कोणालाही दाद न देणारा अशी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. गुजरातेतील विजय हा भाजपाचा विजय नसून तो नरेंद्र मोदींचा आहे, हिंदुत्वाचा विजय नसून तो मोदित्वाचा विजय आहे, असे तारे तोडण्याचाही प्रयत्न जोरकसपणे सरू आहे. काहीही करून उलट्या बोंबा मारण्याचाच हा प्रयत्न आहे.
नरेंद्र मोदी यांचे पाय जमिनीवर असतात. भगवद्‌गीतेत भगवंताने सांगितलेली स्थितप्रज्ञ पुरुषाची सर्व लक्षणे त्यांच्यात दिसतात. संघटित कार्याला ते प्राधान्य देतात. गुजरातेत मतदान होण्यापूर्वी दोन महिने नरेंद्र मोदी यांनी एक लाख 30 हजार भाजपा कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेतली होती. प्रत्येक बूथचे नियोजन होते. स्वत: नरेंद्र मोदी यांच्याकडेही एका बूथची जबाबदारी होती. कार्यकर्त्यांच्या स्तरावर वावरणारा हा नेता व्यक्तिकेंद्री आहे, असा अपप्रचार करणे हा अपप्रचार करणाऱ्या बुद्धिजीवींचा खुजेपणाच म्हटला पाहिजे.
खूप कमी राजकीय नेते असे असतात की, जे केंद्रीय राजकारणाच्या मुख्य धारेत नसतात, मात्र केंद्रीय राजकारण त्यांच्याभोवती घुटमळत असते. अशा नेत्यांत नरेंद्र मोदी यांचे नाव अग्रस्थानी आहे. 57 वषार्र्ंचा हा ताठ कण्याचा नेता देशाच्या पंतप्रधानपदी यावा, असे भारतातील कोट्यवधी लोकांना वाटते. संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे नरेंद्र मोदी हे विचार आणि तत्त्वांशी प्रामाणिक असतात, मग बहुमत काहीही असो. हा कणखरपणाच त्यांच्या यशाचे गमक आहे.
नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी आले तर साऱ्या मुसलमानांचा ते सफाया करतील, असा गैरसमज पसरवण्यात येतो, मात्र त्यात तथ्य नाही. एक खरे की नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आले तर ते मुस्लिमांचा पर्सनल लॉ रद्द करतील, काश्मिरात अनिश्चित काळासाठी आणीबाणी आणतील, 370 कलम रद्द करतील, आयोध्येत भव्य राममंदिराचे निर्माण करतील. दररोज सकाळी 8 वाजल्यापासूनच लॅपटॉवर बसून प्रशासन हाकणारा हा नेता भारताला वैभवावर नेईल.
विचारांसाठी, आदर्शांसाठी कार्य करा- कोणा व्यक्तीसाठी नव्हे, या स्वामी विवेकानंदांच्या संकेतानुसार वाटचाल करणारा हा नेता आहे. आपण ओबीसी आहोत, असा बाऊ त्यांनी कधी केला नाही. सोनियाबेनप्रमाणे नरेंद्र मोदी हे टपकलेले नेते नाहीत. लोकशाही पद्धतीने त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे.
""मी 7 ऑक्टोबर 2001 रोजी सी.एम. बनलो नाही. मी मूलत: सी.एम.च आहे. मी आज सी.एम. आहे. पुढेही सदैव सी.एम. राहीन. माझ्या दृष्टीने सी.एम. म्हणजे कॉमन मॅन.'' नरेंद्र मोदींच्या या मोजक्या शब्दांत खूप अर्थ भरलेला आहे.
अत्यंत कठीण समयी धीराने आणि संयमाने वागणारा हा नेता आज विजयश्री गळ्यात पडलेली असतानाही तेवढाच शांत आणि संयमी आहे. विजयश्री खेचून आणणारा योद्धा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे त्रिवार अभिनंदन!
-सिद्धाराम भै. पाटील
दि. 24 डिसेंबर 2007, दै. तरुण भारत पान 4

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी