Friday, February 25, 2011

अडवाणींच्या कथित माफिनाम्याची कथा

लालकृष्ण अडवाणी यांनी मागितली सोनियांची माफी, "लोहपुरुष' बनला मेणाचा पुतळा, अडवाणींचा माफीचा डाव, संघपरिवाराच्या अंतर्गत चाललेल्या साठमारीला छेद, अशा विविध मथळ्यांखाली गेल्या आठवड्यात बातम्या आणि लेख प्रसिद्ध झाले आहेत. सोनिया आणि राहुलची तळी उचलणाऱ्या आणि मराठीतील सर्वात अधिक खपाचा दावा करणाऱ्या एका वृत्तपत्राने क्षमा मागणे हे शूरांचे लक्षण आहे वगैरे तत्त्वज्ञान सांगत अडवाणींनी क्षमा मागितली हे बरे झाले; अन्य हिंदुत्ववाद्यांनाही तशी बुद्धी यावी असे म्हटले आहे, परंतु या सर्व बातम्या आणि लेखांत या प्रकरणाचे मूळ काय? अडवाणींनी खरीच क्षमा मागितली का किंवा क्षमा मागितली तर कशाबद्दल? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. त्या निमित्ताने या प्रकरणाचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.
गुपित फोडणं म्हणजे बातमी. गुपित जेवढे संवेदनशील तेवढी बातमी शॉकिंग. स्वीस बॅंकेतील काळ्या पैशासंदर्भात टास्क फोर्सने दिलेल्या अहवालाबद्दल अडवाणी यांनी मागितलेल्या तथाकथित माफीची बातमी अर्थातच ब्रेकिंग न्यूज होती. ही कथित माफी भाजपासाठी धक्कादायक, तर कॉंग्रेससाठी आनंददायक आणि मीडियासाठी पर्वणीच होती. अडवाणींनी सोनियांना लिहिलेले पत्र वाचले की ध्यानात येते की, टास्क फोर्सने आपल्या अहवालात सोनिया गांधी यांच्या नावाचा समावेश केल्याबद्दल माफी मागितलेली नाही. मीडियाच्या लबाडीला सलाम केला पाहिजे.
अडवाणींच्या कथित माफिनाम्याची कथा अशी आहे. स्वीस बॅंकेतील काळा पैसा पुन्हा भारतात आणण्याचा विषय गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ऐरणीवर आला. त्यावेळी या विषयाच्या संशोधन अभ्यासासाठी एक कृतिदल तयार केले. या कृतिदलातील पहिले नाव - अजित दोवल. भारतीय गुप्तहेर खात्याचे माजी प्रमुख असलेल्या दोवल यांचे चारित्र्य निष्कलंक आहे. आपल्या कर्तृत्वाने कीर्ती चक्र पटकवणारा भारताच्या इतिहासातील हा पहिला पोलीस अधिकारी आहे. आजवरच्या गुप्तचर विभागातील सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. पाकिस्तानात 6 वर्षे भारताचे नेतृत्त्व केलेले अजित दोवल हे पंजाबातून अतिरेक्यांना पळवून लावण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडलेले आहेत. परराष्ट्र संबंध आणि लष्करी धोरण या विषयांतील अधिकारी व्यक्ती म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांची ख्याती आहे.
आपल्या भेदक आणि अभ्यासपूर्ण लेखणीसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ पत्रकार आणि अर्थतज्ज्ञ एस गुरुमूर्ती हे दुसरे नाव. कॉर्पोरेट क्षेत्रात दबदबा असलेल्या गुरुमूर्ती यांनी बोफोर्स, क्वात्रोची या विषयावर लेखन करून सोनिया गांधींचा "परिचय' देशाला करून दिला आहे. याशिवाय कायदेतज्ज्ञ महेश जेठमलानी आणि आर्थिक विषयातील जाणकार प्रा. वैद्यनाथन हे दिग्गज त्या कृतिदलात होते.
या टास्क फोर्सने दिलेला काळ्या पैशासंदर्भातला 100 पानी अहवाल मीडियाने जनतेपासून लपवून ठेवला. आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वासार्ह आणि निपक्षपाती म्हणून मान्यता असलेल्या दोन स्त्रोतांनुसार सोनिया गांधी यांच्या कुटुंबाचा स्वीस बॅंकेत प्रचंड पैसा आहे. वास्तविक पहाता ही खूप मोठी बातमी व्हायला पाहिजे होती. परंतु झाली नाही. का?
देशाच्या राजधानीत सर्व "मोठ्या' पत्रकारांसमक्ष टास्क फोर्सचा हा अहवाल 1 फेब्रुवारी 2011 रोजी जाहीर करण्यात आला होता, परंतु वाचक बंधूंनो तुम्हाला या अहवालाविषयीची बातमी वाचायला किंवा पाहायला मिळाली होती का आठवा. त्या अहवालाबद्दल अडवाणींनी तथाकथित माफी मागितली अशा बातम्या मात्र सुपारी घेतल्यागत प्रसिद्ध झाल्या. जणु सेन्सॉर केल्यागत सर्वच माध्यमांनी सोनिया गांधी यांचे नाव वगळून टास्क फोर्सच्या अहवालाची बातमी दिली होती आणि गम्मत म्हणजे टास्क फोर्सच्या अहवालाने जे साध्य केले नाही ते तथाकथित माफिनाम्याच्या पत्राने साध्य केले आहे. स्वीस बॅंकेत सोनियांचे खाते असल्याची माहिती दडवून ठेवण्याचा जो प्रयत्न झाला तो आता तथाकथित माफिनाम्यावरील चर्चेमुळे समोर येतो आहे. "टास्क फोर्समध्ये काळ्या पैशासंदर्भात सोनियाचे नाव आहे म्हणून माफी' असा संदर्भ मीडियाला द्यावा लागतोय.
सोनिया गांधी यांचे आणि राहुलचे स्वीस बॅंकेत गुप्त खाते असल्याचे दोन विश्वासार्ह संस्थांनी जाहीर केले आहे. स्वीत्झर्लंडमधील सर्वाधिक खपाचे आणि लोकप्रिय असलेल्या "Schweizer Illustrierte या नियतकालिकेने 11 नोव्हेंबर 1991च्या अंकात याचे रहस्योद्‌घाटन केले होते. स्व. राजीव गांधी यांच्या गुप्त खात्यात 2.2 बिलियन डॉलर असल्याचे त्यात म्हटले आहे.
दुसरी विश्वासार्ह संस्था आहे केजीबी. ही रशियाची गुप्तचर संस्था आहे. केजीबीच्या कागदपत्रांवर आधारित संशोधन पुस्तिकेत रशियन पत्रकार युवेजिना अल्बटस्‌ यांनी म्हटले आहे की, जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते (1985) तेव्हा त्यांनी गांधी कुटुंबावर आर्थिक कृपा केल्याबद्दल केजीबीकडे कृतज्ञता व्यक्त केली होती.
विख्यात स्तंभलेखक ए.जी. नूरानी यांनी पहिल्यांदा 1988 मध्ये ही बाब समोर आणली होती. नंतर 2001 मध्ये जनता पार्टीच्या संकेतस्थळावर सुब्रमण्यम्‌ स्वामी यांनी या संदर्भातील पुरावे प्रसिद्ध केले. न्यू इंडियन एक्स्प्रेसमध्ये यावर 2009 मध्ये विस्तृतपणे छापून आले आहे. इंडिया टुडे या भारतातील प्रसिद्ध नियतकालिकेत राम जेठमलानी यांनी यावर विस्तृतपणे लिहिले आहे. आजवर भारतात आणि भारताबाहेर कुठेही गांधी कुटुंबाने लेखक, प्रकाशक यांना कोर्टात खेचले नाही किंवा बदनामीचा खटला दाखल केला नाही.
(मोरारजी देसाई यांनी वयाच्या 87व्या वर्षी 50 दशलक्ष डॉलर्सचा अब्रुनुकसानीचा दावा अमेरिकेत दाखल केला होता. ते सीआयए या अमेरिकी गुप्तचर खात्याचे एजंट असल्याचे सेमर हेर्ष या लेखकाने आपल्या पुस्तकात लिहिले होते. आरोप सिद्ध झाला नाही आणि त्यामुळे देशाची आणि मोरारजींची अब्रू वाचली.)
टास्क फोर्सने अहवालात विचारले आहे की, राजीव गांधी आणि देशाची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी मोरारजींचे अनुकरण का करण्यात आले नाही. टास्क फोर्सने अहवालात आणखीन एक गोष्ट नमूद केले आहे. 2008 साली सोनिया गांधी या अमेरिका भेटीला गेल्या होत्या. त्यावेळी द न्यूयॉर्क टाईम्स या अमेरिकेतील प्रतिष्ठित दैनिकात एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. अनिवासी भारतीयांनी दिलेल्या त्या जाहिरातीत सोनिया गांधी यांच्या कुटुंबाचे स्वीस बॅंकेत खाते असल्याचे नमूद केले होते. यामुळे व्यथित होऊन परदेशस्थ कॉंग्रेसप्रेमींनी 100 दशलक्ष डॉलर्सचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला, परंतु नंतर काही दिवसांनी खटला मागे घेण्यात आला.
टास्क फोर्सचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी सोनिया गांधी यांनी गुप्त (खुले नाही) पत्र अडवाणींना लिहिले. त्यात टास्क फोर्सच्या अहवालाने आपल्याला दु:ख झाल्याचे व बदनामी झाल्याचे म्हटले. आपल्यावरील आरोप अभद्र असल्याचे म्हटले. (स्वीत्झर्लंडमधील मासिकातील व अल्बटस्‌च्या शोध ग्रंथातील आरोप अभद्र नव्हते काय?)
16 फेब्रुवारी रोजी अडवाणी यांनी सोनियांना पत्र लिहिले. सोनियांनी आरोप नाकारल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आधीच आरोपांचे खंडन झाले असते, तर कदाचित टास्क फोर्सने याची दखल घेतली असती. शेवटी त्यांनी लिहिले की, तरीही आपल्याला जो मनस्ताप झाला त्याबद्दल मी मनापासून खेद व्यक्त करतो. या शेवटच्या वाक्याकडेच कॉंग्रेसाळलेली मीडिया आनंदाने पाहते आहे. यावरून स्पष्ट होते की, टास्क फोर्सने सोनिया कुटुंबाचे काळ्या पैशाच्या बाबतीत अहवालात उल्लेख केल्याबद्दलचा हा खेद नाही. वैयक्तिक मनस्तापाबद्दल मोठ्या मनाने व्यक्त केलेला खेद ही अशारीतीने राजकीय क्षमायाचना झाली. मीडियाच्या लबाडीला तोड नाही हेच खरे!
टास्क फोर्सच्या लेखकांनी जबाबदारीने अहवाल लिहिला असून, त्यातील प्रत्येक शब्दावर ठाम असल्याचे म्हटले आहे. अहवाल स्वीकारणे अथवा नाकारणे याचे स्वातंत्र्य भाजपाला असल्याचे म्हटले आहे. भाजपाने हा अहवाल स्वीकारून प्रकाशित केला आहे. टास्क फोर्स ही देशहित जपणाऱ्या तज्ज्ञांची स्वतंत्र समिती आहे. या टास्क फोर्सवर स्वार्थी राजकारणासाठी भाजपा किंवा इतरांचा शिक्का मारण्याचे कारणच नाही. गोपनीय पत्र समोर आल्याने टास्क फोर्सचे स्वतंत्र अस्तित्वही समोर आले आणि मीडियाने दडवून ठेवलेली सोनिया गांधी यांचे स्वीस बॅंकेत खाते असल्याबद्दलची माहितीही समाजासमोर आली.

सिद्धाराम भै. पाटील,
संपर्क: 9325306283
लेखासाठी आधार :
1. विकिपिडिया संकेतस्थळ, 2. टास्क फोर्सचा अहवाल, 3. एस. गुरुमूर्ती यांचे द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या संकेतस्थळावरील लेख

Sunday, February 20, 2011

लज्जास्पदच..

माघी वारीसाठी गावातील भाविकांसमवेत एक आठरा वर्षीय तरुणी पंढरीला जाते. तिथे गावतीलच उनाड पोरं तिची छेड काढतात, इतकेच नाही तर वारीतून गावी परतल्यानंतर ही पोरं त्या घटनेची वाच्यता करतात आणि त्यामुळे घडल्या घटनेची गावात कुजबूज सुरू होते. यामुळे होणारा मनस्ताप सहन न होऊन ती तरुणी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करते, ही मोहोळ तालुक्यातील एका छोट्या खेड्यातील दुर्घटना समाजासाठी लज्जास्पदच आहे. ही तरुणी त्या कामांधांचा डटून मुकाबला करते यासाठी तिचा गौरव करून गावकर्‍यांनी त्या उनाड पोरांना दंडित केले पाहिजे होते. परंतु तसे काहीच झाले नाही. उलट त्या कन्येवर आत्महत्या करण्याची नामुष्की आली. आपला समाज आतून तुटत चालल्याचे हे लक्षण आहे. असा आतून तुटलेला समाज पंढरीच्या कितीही वार्‍या केल्या तरी पदरी पुण्य पडणे कसे शक्य आहे? आज आमच्या ग्रामीण समाजाला संकुचिततेचा रोग जडला आहे. त्याचे कान खूपच हलके झाले आहेत. पूर्वी गावांमध्ये असलेला एकोपा आता राहिलेला नाही. 'मी आणि माझं घर' या पलिकडे त्याला दिसेनासे झाले आहे. माणूस जेवढा स्वार्थी तेवढा तो अनीतीमान बनतो. तो ऐकीव गोष्टींची चर्चामिटक्या मारून करू लागतो आणि त्यातून असे प्रकार घडतात. त्यामुळे वारीला जाऊनही गावातील दुष्ट शक्तींना दंडित करण्याची धमक ग्रामस्थांत येत नसेल तर ही वारी, चंद्रभागास्नान, भजन-पूजन काय कामाचे? 

दुसरी कडे स्वत:ला सुशिक्षित समजणारा शहरी समाज मात्र स्वैर आणि कोडगा झाल्याचे दिसत आहे. देशातील एका नामवंत इंग्रजी दैनिकाच्या कालच्या रविवार पुरवणीच्या मुखपृष्ठावर तीन उच्चभ्रू आणि प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या मध्यमवयीन महिलांची छायाचित्रे आहेत. त्या म्हणतात, 'माझा मुलगा समलिंगी आहे, याचा मला अभिमान आहे.' आणि हे मुखपृष्ठावर मोठ्या अक्षरांत छापले आहे. आतील पानांत यावर विस्तृत लेख आहे. जे अनैसर्गिक आहे, जे विकृत आहे, जे लज्जास्पद आहे ते मिरविण्याची ही घातक पद्धत आहे. याने समाजाचे काहीही भले होणार नाही. ठळकपणे समोर आलेले हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. समाजप्रबोधनाची बाब दूर राहिली, या विकृत 'बाळां'चा अभिमान बाळगणार्‍या माता या 'धाडसी आणि समजूतदार' असल्याचे प्रशस्तीपत्रक प्रस्तुत संपादकाने दिले आहे. ही अधोगती रोखलीच पाहिजे, त्यासाठी समाजातील विचारी लोक सक्रिय होतील ?

-सिद्धाराम भै. पाटील
... तर मग पती-पत्नी बनून राहू लागतील दोन महिला !

Thursday, February 10, 2011

कोत्या मनोबुद्धीचा राज्यपाल

राज्यपाल हे पद खरे तर आदराचे आहे, परंतु उंच ठिकाणी जाऊन बसल्यामुळे
कावळा काही गरूड बनत नाही, तशी कर्नाटकातील राज्यपाल भारद्वाज यांची
अवस्था आहे. कर्नाटकातील विख्यात कन्नड साहित्यिक आणि इतिहास तज्ञ
चिदानंद मूर्ती यांना बंगळूर विद्यापीठाने मानद पदवी देण्याचे ठरविले
होते. निसार अहमद, बीकेएस वर्मा आणि चिदानंद मूर्ती या तिघांना ही पदवी
देण्यात येणार होती, परंतु कुलपती असलेल्या राज्यपाल एच.आर. भारद्वाज
यांनी चिदानंद मूर्ती यांचे नाव रोखून ठेवले. चिदानंद मूर्ती हे भारद्वाज
यांच्या विचारधारेतील नाहीत, हे यामागचे कारण. आपल्या विचारधारेहून वेगळी
विचारधारा असणार्‍यांचा दुस्वास करणे, वैचारिक अस्पृश्यता पाळणे आणि
परधर्मीयांच्या धर्मांधतेबद्दल चकार न बोलणे म्हणजे धर्मनिरपेक्षता अशी
आत्मघातकी वृत्ती काही परकीयांच्या उष्ट्या विचारांवर पोसलेल्या पक्षांत
दिसून येते. हुजरेगिरी करणार्‍यांनाच पुरस्कार देण्याची त्यांची परंपरा
आहे.ख्रिश्‍चन मिशनरी हे फसवून धर्मांतर करतात, त्याला चिदानंद मूर्ती
यांनी विरोध दर्शवून चूक केली आहे. त्या चुकीची शिक्षा म्हणून राज्यपाल
महोदयांनी त्यांची पदवी रोखून धरली आहे. महात्मा गांधी म्हणाले होते की,
''देशाचा कारभार माझ्या हाती आला, तर पहिले काम मी ख्रिस्ती मिशनर्‍यांना
देशाबाहेर काढीन. मिशनर्‍यांनी धर्मांतराचे धंदे थांबविले पाहिजेत.'' बरे
झाले त्या काळात भारद्वाजसारखे पुढारी नव्हते अन्यथा लोकांनी दिलेली
'महात्मा' ही पदवी त्यांनी गांधीजींकडून काढूनच घेतली असती.राज्यपालांची
कोती वृती पाहून कर्नाटकातील अनेक संघटना निषेधासाठी पुढे सरसावल्या
आहेत. 'मी चिदानंद मूर्ती यांच्या नावाला विरोध केला नाही; नाव केवळ मागे
ठेवले', अशी बालिश सारवासारव करीत भारद्वाज यांनी आता मूर्ती यांना पदवी
देण्याची सिद्धता दर्शविली आहे. 'बूंद से गयी, हौद से नही आती' या
उक्तीप्रमाणे भारद्वाज यांची कूपमंडुक वृत्ती जगासमोर आल्याने ते चांगलेच
अडचणीत आले आहेत. उशीरा का होईना त्यांना शहाणपण सुचले हेही काही कमी
नाही. सिद्धाराम भै. पाटील

--
visit @
www.psiddharam.blogspot.com

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी