Saturday, September 18, 2010

अयोध्या निकाल आणि गणेशोत्सवाचा संदेश

आता येत्या 24 सप्टेंबरला अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीबाबत लखनौ उच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे. या निकालानंतर हिंदू-मुस्लिमांतील स्नेहबंध टिकून राहतील काय?
यंदा हिंदूंची गणेशचतुर्थी आणि मुस्लिमांची रमजान ईद एकाच दिवशी आले. मुस्लिमांनी आपल्या हिंदू मित्र-परिचितांना शिरखुर्म्यासाठी प्रेमाने घरी बोलावले. आजच्या भारतीय समाजाला एकत्र आणणारे असे सोनेरी क्षण मोलाचे आहेत. स्नेहाचे बंध दृढ करणारे हे अनुबंध दोन्ही समाजाने जपले पाहिजेत.
आता येत्या 24 सप्टेंबरला अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीबाबत लखनौ उच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे. या निकालानंतर हिंदू-मुस्लिमांतील स्नेहबंध टिकून राहतील काय? किंवा ते टिकून राहण्यासाठी काय करता येईल, हा हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांतील धुरिण आणि सर्वसामान्यांच्या चिंतनाचा विषय असला पाहिजे.
मुस्लिमांबद्दल हिंदू कशा रीतीने विचार करतात हे विख्यात साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी अतिशय मार्मिक शब्दांत नोंदविले आहे. ते म्हणतात, ""...मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्याशी नातं जोडून "आपण त्यांचेच वारसदार' या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.''
बाबर, औरंगजेब, टिपू सुलतान, अकबर हे परकीय आक्रांता आहेत. त्यांनी येथील शेकडो मंदिरे उद्‌ध्वस्त केली. हजारो लोकांना तलवारीच्या जोरावर बाटविले. मुस्लिम व्हायला नकार दिला म्हणून कित्येकांची अतिशय क्रूरपणे कत्तल केली. महिलांची अब्रू लुटली. हा इतिहास आहे. याची ढिगाने पुरावे उपलब्ध आहेत. असे असताना भारतातील आजच्या मुसलमानांनी बाबराशी नातं सांगावं का, हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नाचे विवेकाने उत्तर शोधल्यास रामजन्मभूमी हा वादाचा विषय ठरणारच नाही.

भारतातील हिंदूंना अपमानित करण्यासाठी अयोध्या, मथुरा आणि काशीची मंदिरे पायदळी तुडविणाऱ्या धर्मांधांची बाजू घेणारे मुसलमान काही प्रमाणात का होईना या देशात आजही आहेत, हे सत्य आहे. तसे नसते तर बाबरीचा ढांचा पाडायची वेळच कशाला आली असती?
बहुतांश मुस्लिम समाज गुण्यागोविंदाने राहत असला तरी जिहादच्या धर्मवेडाने भारलेल्यांची संख्याही प्रभावी आहे, हे विसरून चालणार नाही. याकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच खिलापतच्या दंगलीत हजारो हिंदूंना आपल्या प्राणास मुकावे लागले होते. देशाची फाळणी व्हावी म्हणून, पाकिस्तान हवे म्हणून दंगली घडविण्यात आल्या होत्या. दुर्दैवाने इतिहास असा सांगतो की, हिंदू गाफील राहतात आणि धर्मांध मुस्लिम अचानक हल्लाबोल करतात. गाफील असणे आणि दुर्बल असणे हा अन्याय करण्याएवढाच अपराध आहे.
सन 1883 मध्ये मुसलमानांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी निष्कारण दंगे करून हिंदूंना सळो की पळो केलं होतं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उन्मादाचा सफलतापूर्ण सामना करण्यासाठी आणि हिंदू समाजाला समर्थ बनविण्यासाठी गणेशोत्सवाचा आधार घेतला. लोकमान्य टिळक हे द्रष्टे महापुरुष होते. हिंदू समाजासमोरील संघटित आव्हानाला संघटित प्रतिसाद देणे हा गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देण्यामागचा उद्देश होताच; पण केवळ प्रतिक्रयेच्या भावनेतून त्यांनी या उत्सवाला सार्वजनिक रूप दिलेलं नाही, हे त्यावेळच्या त्यांच्या चिंतनावरून दिसून येतं.
गणेशोत्सवाला टिळकांनी राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनाचं प्रेरणास्त्रोत बनविलं. हा उत्सव पुढील काही दशकांमध्ये महाराष्ट्राच्या सीमा पार करून देशभरातच नव्हे तर विदेशांमध्ये स्थायिक हिंदूंमध्येही जनोत्सवाच्या स्वरूपात प्रतिष्ठित होईल, हे त्यांच्या द्रष्ट्या मनाने हेरलं असावं.
गणपती हा गणांचा नायक आहे. गणतंत्रामध्ये नायकाची भूमिका ही महत्त्वपूर्ण असते. जर गणच असंघटित, उद्देशहीन आणि अशक्त असेल तर गणनायकाकडे हात जोडून करुणा भाकल्याने काहीही साध्य व्हावयाचे नाही. राष्ट्राला गौरव, स्वातंत्र्य आणि अभ्युदय प्राप्त करून देणारा एक शक्तिशाली गण (संघटित समाजशक्ती) गणेशोत्सवाच्या माध्यमातून निर्माण करणे हा लोकमान्यांचा उद्देश होता. आपल्या आतील गणनायकाला सबल, सशक्त करत अजेय गणशक्ती संघटित करणे हा गणेशोत्सवामागील मूळ भाव आहे; कर्मकांड नव्हे.
अंथरुणातून बाहेर न पडताच मोठमोठे उपदेशाचे डोस पाजणारी, फुकटचे सल्ले देणारी मंडळी सर्वच काळात असतात. सुरुवातीच्या काळातच लोकमान्यांनी त्यांना खणखणीत उत्तर देऊन ठेवलं आहे. 22 सप्टेंबर 1896 रोजी पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात लोकमान्य म्हणतात, ""आपले राष्ट्र म्हणजे काही गुलामांचे राष्ट्र नाही. मानवी प्राण्याला कैद्याच्या राहणीने राहा असे सांगणे म्हणजे महामूर्खपणा आहे. समारंभ व थाटमाट ही प्रत्येक उत्सवाची आवश्यक अंगे होत. कोणतेही काम पैशावाचून होत नसते. इतर वाईट गोष्टींत पैसे खर्च होण्यापेक्षा गणेशोत्सवात थोडेबहुत खर्च झाल्यास पुण्यच आहे. या उत्सवात प्रत्येकजण आपापल्या हौसेने खर्च करीत असतो. कोणाची कोणावर सक्ती नाही. आठ-दहा दिवस जर उत्साहाने काढता येत नाहीत व त्या उत्सवाप्रीत्यर्थ थोडेसे द्रव्य खर्चण्याचे जर सामर्थ्य नाही, तर ते राष्ट्र जिवंत असून मेल्यासारखेच आहे. या गोष्टीला उधळपट्टी म्हणणारे म्हणोत, पण कष्टमय संसाराची यात्रा सुखाची व शांतीची होण्यास असले खर्च आवश्यकच आहेत.''
लो. टिळक यांनी गणेशोत्सवासंबंधी व्यक्त केलेली मते वाचली तर ध्यानात येईल की, भारतीय तरुणांना जल्लोष करण्याची, रस्त्यावर नाचण्याची व्यवस्था करणे हाही गणेशोत्सव सार्वजनिक करण्यामागे एक उद्देश होताच. त्यामुळे गणेशोत्सवावर टीका करणाऱ्यांना टीका करू द्या. परंतु धर्मांध शक्तींशी संघटितरीत्या मुकाबला करणे हा गणेशोत्सवामागील एक प्रमुख उद्देश होता हे विसारता येणार नाही.
आता 24 सप्टेंबर या दिवशी योगायोगाने शुक्रवार (जुम्मा) आहे. याआधीच्या दंगलींचा अभ्यास केला तर ध्यानात येईल की, हा दिवस दंगल घडविणाऱ्यांसाठी सोयीचा असतो. ज्या भागात मुस्लिम अधिक संख्येने राहतात त्या भागाला "संवेदनशील' भाग म्हणण्याची आपल्या देशात प्रथा आहे. कारण आपला देश सेक्युलर आहे. हिंदूबहुल भाग हा संवेदनशील नसतो. आता हिंदूंनाही एका वेगळ्या अर्थाने संवेदनशील व्हावे लागेल.
अयोध्येतील उत्खननात सापडलेली मंदिराची खांबं आणि इतर रचना पाहता निकालाचा अंदाज येऊ शकतो. समजा निकाल हिंदूंच्या विरोधात गेला तर हिंदू आपल्या स्वभावानुसार पुढच्या कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढाई करतील. परंतु निकाल मंदिर पाडणाऱ्या बाबराच्या विरोधात गेला तर मात्र स्वत:ला बाबराचे कैवारी मानणारे ठिकठिकाणी दंगली घडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतील. "संवेदनशील' ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणारच आहे, परंतु कोणत्याही क्षणी खात्रीने होणारी मदत म्हणजे आपण स्वत:च असतो हे विसरून चालणार नाही.
यावेळी तुम्ही शांत असता किंवा नाही हा प्रश्न नसतो, तर तुम्ही शक्तीशाली आणि संघटित असता किंवा नाही हे महत्त्वाचे असते. यावेळी गणेश मंडळांना सुरक्षा मंडळांचे काम करावे लागेल. देशभक्त मुस्लिमांच्या मुहल्ला कमिट्यांनाही आपल्या शक्तीप्रमाणे धर्मांधांना रोखण्यासाठी पुढे यावे लागेल.
गणेश मंडळं आणि मुहल्ला कमिट्यांनी आतापासूनच कठीण समयी आवश्यक ती तयारी करण्याच्या दृष्टीने पावलं उचलावीत. आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, खासदार, पोलीस चौकी यांच्या संपर्क क्रमांकांची यादीही आपल्याकडे असणे सोयीचे ठरेल. पाकिस्तानच्या प्रेरणेने देशभरात जिहादी शक्ती सक्रीय झाल्याचे रोजच्या बातम्यांतून समोर येतच आहे. मराठवाडा, सोलापूरसारखा भागही याला अपवाद नाही. त्यामुळे गणेशोत्सव काळातली गणेश मंडळं वर्षभरासाठी आपल्या गल्लीत सुरक्षा मंडळं बनली तर दंगलींना आळा घालणे शक्य होईल.
आपला समाज शांतताप्रिय आहे. आपण शेळीप्रमाणे राहिलोत तर लांडग्यांना चेव येऊ शकते. म्हणून वाघासारखे राहा. हाच गणेशोत्सवाचा आजच्या काळासाठीचा संदेश आहे.

Tuesday, September 7, 2010

... ,,,,

सोलापूर, (खास प्रतिनिधी) :- कृषिक्षेत्रात आता काही राहिले नाही. तरुणांनी शेतीकडे न वळता इंडस्ट्रीकडे वळावे, असा सल्ला खुद्द कृषिमंत्रीच देत असतील, तर अशा कृषिमंत्र्यांना जोड्याने मारा! असे उद्‌गार पर्यावरणतज्ज्ञ डॉ. प्रवीण सप्तर्षी यांनी काढले. सोलापूर विद्यापीठात सामाजिक शास्त्रे संकुलात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
"सर्वसमावेशक विकासातून शाश्वत विकास' या विषयावर त्यांनी याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. यावेळी डॉ. आर. आर. पाटील, डॉ. अशोककुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणजे भिकाऱ्याला भीक वाढण्यासारखे झाले. हे काम वाईट नाही, परंतु चांगलेही नाही! मोठ-मोठ्या कंपन्या, उद्योग यांना सरकारकडून कोट्यवधी रुपये पुरवले जातात आणि शेतकऱ्यांसाठी मात्र त्याच्या एक टक्काही दिले जात नाही. कर्ज बुडविण्यात मोठे उद्योग आघाडीवर असूनही बदनामी मात्र शेतकऱ्यांची करण्यात येते. कृषिक्षेत्र मागास असल्याचे सांगितले जाते, यातून शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास कसा शक्य आहे, असा प्रश्नही डॉ. सप्तर्षी यांनी उपस्थित केला.
समाजातील सर्व घटकांना विकासाची संधी मिळाली पाहिजे, असे सांगून डॉ. सप्तर्षी यांनी यावेळी विविध सोपी उदाहरणे दिली. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक शास्त्रांशिवाय पर्यावरणशास्त्र परिपूर्ण होऊ शकत नाही. जैन इरिगेशनने सोलार वॉटर हीटरच्या विक्रीतून कोट्यवधी रुपये कमवले, पण ते वर्षभरातच बंद पडले. पुण्याच्या आरती संस्थेने आरती कुकर बनविले, पण एकाही घरी ते चालू नाहीत. निर्धूर चुलींचेही तसेच आहे. लोकांची गरज भागवणे महत्त्वाचे आहे. शाश्वत दृष्टी असल्याशिवाय सर्वसमावेशक विकास शक्य नाही. शाश्वत विकासासाठी मूळ पाया सुधारणे आवश्यक आहे. खेड्यातलं पारंपरिक तत्त्वज्ञान यादृष्टीने मोलाचे आहे, असेही ते म्हणाले.

Friday, August 27, 2010

... अन्‌ मी पुन्हा चालू लागलो

जीबीएस'च्या विळख्यात भाग -3
महिन्याभराने माझं मला स्वत:ला बेडवरून उठता येऊ लागलं होतं. पाय बेडवरून खाली सोडून बसता येत होतं, पण जमिनीवर अजून बसता येत नव्हतं. पाठीवर झोपून झोपून डोक्याचे मागील केस उडाले होते. सेरेना मॅडम चिकाटीने आवश्यक ते व्यायाम प्रकार करवून घेत होत्या. महिन्याभराने मला मोबाईलवर दोन-चार अक्षरं दाबायला येऊ लागलं होतं. हातात अजूनही पेन धरता येत नव्हतं. स्वत:च्या हाताने जेवताही यायचं नाही.

Sunday, August 22, 2010

@ post Yashodhara Hospital


"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने   (जीबीएस'च्या विळख्यात भाग -1)

मु. पो. यशोधरा हॉस्पिटल  (जीबीएस'च्या विळख्यात भाग - 2)

... अन्‌ मी पुन्हा चालू लागलो  (जीबीएस'च्या विळख्यात भाग -3 )

मु. पो. यशोधरा हॉस्पिटल


"जीबीएस'च्या विळख्यात भाग - 2

रोगापासून मनुष्याला वाचविण्याचे उपाय शोधण्याच्या कामापेक्षा मनुष्याचे जीवन नष्ट करणारी असंख्य निमित्ते जगात असूनही "मनुष्य जगतो कसा?' याचे अध्ययन जास्त गुंतागुंतीचे आणि चित्तवेधक आहे.- स्टीफन बॉईड (शरीरविकृती शास्त्रज्ञ)

प्लाजमा शरीरात घालण्याची क्रिया सुरू झाली आणि मी घाबरून गेलो। डोळे उघडे ठेवणेही अशक्य झाले. त्रास होतोय हे सांगण्यासाठी तोंड उघडणेही कठीण होतं. संपूर्ण शरीरात जणू भूकंप सुरू होता. शरीर जोरजोरात हलू लागले आहे, शरीराचे सारे अवयव तुटून हृदयात घुसण्याच्या प्रयत्नात आहेत. शरीर कागदाप्रमाणे "टू डायमेन्शनल' बनत आहे, असं प्रकर्षाने वाटू लागलं. डोळे किलकिले करून पाहतो तर बाहेरून सारं शरीर शांत आहे, हे ध्यानात आलं, परंतु संपूर्ण शरीरात तांडव सुरू होतं...


सहा-सात वर्षांपूर्वी मी बी.एस्सी.च्या शेवटच्या वर्षाला शिकत होतो तेव्हाची गोष्ट आहे. घरचा दुधाचा व्यवसाय तोट्यात गेला होता. मी सोलापुरात खोली करून शिक्षण घेत होतो. वडील नेहमीप्रमाणे भेटायला आले होते. नेहमी परत जाताना वडील माझ्या हातावर दोन-चारशे रुपये टेकवायचे; आज त्यांनी खिशात हात घातला, परंतु खिसा रिकामा होता. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्या पोटात कालवाकालव झाली. केवळ 20-25 रुपयांसाठी वडील आता दिवसभर राबत होते. जवळच्याच लोकांनी फसवल्यामुळे दुधाचा व्यवसाय पार निकालात निघाला होता. नागपंचमीला बहिणीला घरी आणायचे तरी प्रवासासाठीचे शंभर-दोनशे रुपये उसने घ्यावे लागत होते. अशा स्थितीत घरचा भार आता आपण घ्यायचा असे मी ठरविले आणि मिळेल ती नोकरी करू लागलो होतो.
सावकाराचे कर्ज फेडून शेत आमच्या नावे करून घेतले. बहिणींच्या लग्नाचे कर्ज फेडले. चारही बाजूंनी पडलेले घर बांधून घेतले. शेतातल्या विहिरींचे पाईपलाईन्स केले. दरम्यान पत्रकारिता पदवीचे शिक्षण घेतले. भावकीच्या जीवघेण्या छळाशी दोन हात केले. सहा-सात वर्षे यातच गेली. आता कुठे मोकळा श्वास घेतोय असे वाटेपर्यंत "जीबीएस'ने घेरले होते. आता माझ्या खात्यात 761 रुपये शिल्लक होते आणि तरुण भारत-विवेकानंद केंद्रातील जीवभावाचे सहकारी साथीला होते.
चार-पाच हजार रुपये खर्च येईल असा सुरुवातीचा अंदाज होता, तो आता तीन-चार लाखांपर्यंत जाईल असे समजले होते. एकीकडे पैशांची जुळवाजुळव आणि दुसरीकडे क्षणाक्षणाला गंभीर होत असलेली स्थिती असे हे दुहेरी आव्हान होते. मोकळेपणाने सांगायचे तर रुग्ण आता वाचणे अवघड आहे याची बहुतेकांना कल्पना आली होती. त्यामुळे निकराचे प्रयत्न सुरू होते.
"जीबीएस' हा आजार कोणालाही, कधीही, कोणत्याही वयात होऊ शकतो. या आजारात रोगप्रतिकारक शक्तीच आपल्यावर हल्ला करते. या हल्ल्याचा सर्व रोख मज्जासंस्थेवर असतो. हा आजार मज्जासंस्थेवर चढत्या क्रमाने हल्ला करतो. त्यामुळे मज्जातंतू मेंदूकडून येणाऱ्या कोणत्याही हालचालीसंबंधी आज्ञा मानण्यास असमर्थ ठरतात. स्वत:चीच रोगप्रतिकारक शक्ती बंड करीत असल्याने त्यासाठी रोगनिवारण करणारी कोणतीही प्रतिजैविकं असणारी औषधोपचार यंत्रणा नाही.
आणखी सोप्या भाषेत सांगायचे तर आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी सुरक्षा रक्षक आहे. रात्री घरात दरोडेखोर शिरले आहेत म्हणून रक्षक गोळ्या झाडतोय, परंतु घरातल्याच लोकांचा बळी जातोय असाच काहीसा प्रकार इथे आहे.
आपल्या शरीरात बाहेरून एखादा विषाणू आला तर आपल्या रक्तातील पांढऱ्या पेशी सैनिक तयार करतात, म्हणजे प्रतिजैविके (ऍंटिबॉडीज्‌) तयार करतात. ही प्रतिजैविके बाहेरून आलेल्या विषाणूंवर हल्ला करून त्यांचा नाश करतात, परंतु जीबीएस या आजारात मात्र प्रतिजैविके विषाणूंवर हल्ला करण्याऐवजी आपल्या मज्जातंतूंवर हल्ला करतात. मज्जातंतूंवर मायलीन नावाचा एक थर असतो. तो या हल्ल्याने विरघळू लागतो म्हणजेच हा आजार.
सुरुवातीला इम्युनोग्लोब्युलीन थेरपी देणार असल्याची चर्चा होती. यामध्ये देण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सचीच किंमत दीड-दोन लाखांपर्यंत असते. पहिल्याच दिवशी किशोरजींनी गुजरात राज्याच्या व्हायरोलॉजी संस्थेचे प्रमुख डॉ. उपाध्याय यांच्याशी बोलणी केली होती. (किशोरजी हे जीवनव्रती कार्यकर्ते असून, ते विवेकानंद केंद्राचे अखिल भारतीय सहमहासचिव आहेत.) तिकडून इंजेक्शन्स पाठविण्याची व्यवस्था झाली होती. मज्जातंतूंवर होणारा हल्ला त्वरित रोखण्यासाठी ही थेरपी वापरली जाते, परंतु याचे "साईड इफेक्टस्‌' असतात. त्यामुळे कदाचित "प्लाजमा फेरसिस' उपचार करायचे ठरले असावे.
प्लाजमा फेरसिस या उपचार पद्धतीमध्ये रक्तातून प्लाजमा बाजूला केला जातो आणि नवीन प्लाजमा दिला जातो. दोन-तीन दिवसांच्या अंतराने तीन ते सातवेळा प्लाजमा फेरसिस केला जातो. मला एकूण सात वेळा प्लाजमा फेरसिसला सामोरं जावं लागलं. ही प्लाजमा फेरसिस म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू पाहणंच असतं, असा माझा अनुभव आहे.
15 ऑगस्टची संध्याकाळ. शेवटंचं पाहून घ्यावं, म्हणून गावाकडचे परिचित, नातेवाईक आणि इतर लोक येऊन पाहून जाताहेत. अतिदक्षता विभाग असल्याने सुरक्षा रक्षक दोन मिनिटांपेक्षा अधिक वेळ कुणाला थांबू द्यायला तयार नाही. माझी केवळ विचार करण्याची क्षमताच शाबूत आहे; उर्वरित शरीर प्राण असूनही निपचित होतं. अचानक भेटायला येणाऱ्यांना थांबविण्यात आलं. डॉक्टर शस्त्रसज्ज होऊन आले. "गळ्याच्या इथे थोडं काम आहे. थोडा त्रास होईल, काही नाही', असे ते म्हणाले. आता येईल त्या स्थितीला सामोरे जाण्यासाठी मनाची तयारी मी कधीच केली होती. थोडा अधिक त्रास व्हायचा तेव्हा मी श्वासासोबत मनातल्या मनात ओम्‌कार उच्चारण करीत असे. माझ्या गळ्यातून एक वीतभर लांब नळी हृदयाच्या दिशेने घालण्यात आली. याला डॉक्टरी भाषेत "सेंट्रल लाईन' टाकणे म्हणतात. हृदयाकडे रक्त घेऊन येणाऱ्या मुख्य वाहिनीमध्ये या नळीचे दुसरे टोक होते, हे मला नंतर एक-दोन महिन्यांनी एक्स रे पाहिल्यानंतर समजले. परंतु तेव्हा मला नळी "इन्सर्ट' करताना तेवढा त्रास झाला नाही. कदाचित तेवढ्याच भागाला भूल दिली असण्याची शक्यता आहे.
"सेंट्रल लाईन' टाकल्यानंतर माझ्या बेडजवळ एक मशिनरी आणण्यात आली. हीच ती प्लाजमा फेरसिसची मशीन. डायलेसिस करण्यासाठीही याच मशीनचा वापर करण्यात येतो, हे मला नंतर समजलं. वैद्यकीय क्षेत्राशी माझा तसा फारसा संबंध याआधी आलाच नव्हता. कुणी आजारी असेल आणि भेटायला गेलो की, पंधरा मिनिटे-अर्धा तास इतकाच तो संबंध. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची ही माझी पहिलीच वेळ. याआधी कधी सलाईन लावल्याचंही आठवत नाही. त्यामुळे आता पडल्या पडल्या वैद्यकीय परिभाषा, हॉस्पिटलमधली यंत्रणा समजावून घेण्याचा प्रयत्न करीत होतो.
गळ्यातून जी नलिका खुपसण्यात आली होती, तिला दोन नलिका जोडण्यात आल्या. एक त्या मशिनरीकडे जाणारी आणि दुसरी परतणारी. मशिनरी सुरू झाली. एका नळीतून वेगाने रक्त मशिनरीत जात आहे आणि दुसरीतून पुन्हा शरीरात. याचवेळी सलाईनही सुरू आहे. साधारण अर्ध्या तासाने काही क्षण ही प्रक्रिया थांबली आणि प्लाजमाच्या तपकिरी रंगाच्या पिशव्या एकामागोमाग एक अशा जोडण्यात येऊ लागल्या. त्रास होऊ लागला की सांगा, असं सांगण्यात आलं. प्लाजमा शरीरात घालण्याची क्रिया सुरू झाली आणि मी घाबरून गेलो. डोळे उघडे ठेवणेही अशक्य झाले. त्रास होतोय हे सांगण्यासाठी तोंड उघडणेही कठीण होतं. संपूर्ण शरीरात जणू भूकंप सुरू होता. शरीर जोरजोरात हलू लागले आहे, शरीराचे सारे अवयव तुटून हृदयात घुसण्याच्या प्रयत्नात आहेत. शरीर कागदाप्रमाणे "टू डायमेन्शनल' बनत आहे, असं प्रकर्षाने वाटू लागलं. डोळे किलकिले करून पाहतो तर बाहेरून सारं शरीर शांत आहे, हे ध्यानात आलं, परंतु संपूर्ण शरीरात तांडव सुरू होतं. ही स्थिती मी सहनच करू शकत नव्हतो. परंतु यातून सुटण्याचाही काही मार्ग नव्हता. तेव्हा ते सहन करण्याशिवाय काहीच करता येत नव्हतं. ही स्थिती आता संपेल मग संपेल म्हणून वाट पाहू लागलो. शेवटचे ब्रह्मास्त्र काढले- शरीराकडे त्रयस्थपणे पाहायचे. श्वास घेताना आणि सोडताना मनातल्या मनात ओम्‌ म्हणायचे. साधारण पाऊण तासापर्यंत ही स्थिती होती. देव करो अशी स्थिती अनुभवण्याची वेळ कुणावर येऊ नये, परंतु ही स्थिती किती वेदनादायी आणि मृत्यूची तोंडओळख करून देणारी आहे हे त्या स्थितीत गेल्याशिवाय इतरांना कळणे शक्य नाही.
यात नेमकं काय होतं की, शरीरातून रक्त जेव्हा त्या मशिनरीत जाते तेव्हा तिथे रक्तातून केवळ प्लाजमा की ज्यात अँटीबॉडीज आहेत ते रक्तापासून वेगळं केलं जातं आणि उर्वरित द्रव शरीरात पाठविला जातो. मग नवीन प्लाजमा शरीरात सोडला जातो. नवीन प्लाजमा कमी तापमानात साठविलेलं असतं. ते शरीरात पाठवताना रुग्णाला खूप थंडी वाजू लागते. प्रचंड त्रास होतो. हे खरं असलं तरी तिथल्या टेक्निशियनसाठीही हा युद्धाचाच प्रसंग असतो. मिनिटामिनिटाला रुग्णाचा रक्तदाब तपासावा लागतो. कारण या स्थितीत रक्तदाब स्थिर ठेवणंही एक आव्हान असतं. रक्तदाब कमी होऊ लागला की सलाईनचं प्रमाण अधिक केलं जातं. याचवेळी 25 हजार युनिट्‌स हिपॅरिन नावाचं अँटीकोऍग्युलंट शरीरात सोडलं जातं. रक्ताच्या गाठी होऊ नयेत यासाठी याचा उपयोग होतो.
अशा रीतीने प्लाजमा फेरसिसचे पहिले दिव्य यथासांग पार पडले. प्लाजमाचे पाच पॅक पहिल्या दिवशी कामी आले. पूर्ण सात वेळा फेरसिस करेपर्यंत 34 पॅक लागले. प्लाजमा वेळेत उपलब्ध होणं सर्वात महत्त्वाची निकड होती. डॉ. हेडगेवार रक्तपेढी यावेळी धावून आली. आमचे मित्र राजेश तोळबंदे, डॉ. संजय देशपांडे आणि रक्तपेढी व्यवस्थापन यांची मोलाची मदत यावेळी झाली.
आता प्लाजमा फेरसिसचा पहिला राऊंड पार पडला होता. "जीबीएस' हल्ला रोखून धरण्यात आता यश येत होतं, परंतु अजून खूप मोठा पल्ला पार करायचा होता. डॉ. बसवराज कोलूर दररोज येऊन भेटून विचारपूस करायचे. डॉ. शिवपुजे दिवसातून दोनदा भेटायचे. त्यांच्या भेटण्याने थोडा आधार वाटायचा. धीर यायचा. ज्यांचे जीवन पाहून आम्हाला योग्य मार्गावर चालायची प्रेरणा मिळत आलीय ते आदरणीय किशोरजी आणि भानुदासजी (विवेकानंद केंद्राचे महासचिव) यांची भेट या काळात मानसिक आधार देणारी ठरली.
धावून आले मदतीचे हात
उपचार खर्चाचा फुगणारा आकडा सर्वसामान्य कुटुंबाला न पेलणाराच होता. यावेळी मदतीचे अनेक हात धावून आले. आजाराच्या विळख्यातून बाहेर आल्यानंतर थोडा मागोवा घेतला तेव्हा ध्यानात आले की, मदतीला धावून आलेल्यांमध्ये परिचित आहेत तसे अपरिचितही आहेत. ज्या व्यक्तीचा मासिक पगार 3 हजार रुपयेही नाही तिने तीन हजारांची मदत आपले नाव कुठेही येणार नाही या रीतीने केली होती.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून अनेकांनी यथाशक्ती मदत पाठविली होती. राष्ट्रीय विचारासाठी काम करणाऱ्या एका तरुणाला मदत करावी हीच त्यामागची त्यांची भावना होती. मुंबईच्या एका सद्‌गृहस्थाने पदरचे 30 हजार रुपये देऊन नंतर आपल्या परिचितांकडून मदत एकत्र केल्याचेही कळले. मदतीला धावून आलेल्या या संघ परिवारातील व विवेकानंद केंद्र परिवारातील कार्यकर्त्यांची नावे येथे देऊन त्यांना मी अपमानीत करू इच्छित नाही, परंतु ते ऋण कसे विसरू?
राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यास-नवी दिल्ली, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, प्रिसिजन उद्योग आदी संस्थाही मदतीला धावून आल्या. विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते आणि तरुण भारतच्या संपादक-संचालकांसह सहकारी पत्रकार बंधू सतत 12 महिने साथीला होते म्हणूनच माझा हा पुनर्जन्म सुखकर झाला.
या 12 महिन्यांतल्या आठवणींनी मनात गर्दी केली आहे. त्या साऱ्याच कागदावर उतविणे योग्यही होणार नाही, म्हणून काही निवडक आठवणी सांगून पुढील आसमंतमध्ये या लेखमालेला पूर्णविराम देणार आहे.
(क्रमश:)

"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने   (जीबीएस'च्या विळख्यात भाग -1)

मु. पो. यशोधरा हॉस्पिटल  (जीबीएस'च्या विळख्यात भाग - 2)

... अन्‌ मी पुन्हा चालू लागलो  (जीबीएस'च्या विळख्यात भाग -3 )

Friday, August 13, 2010

"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने


हा जीबीएसचा आजारच मोठा चमत्कारिक आहे. सगळे आजार रोगप्रतिकार शक्तीच्या कमतरतेमुळे होतात, तर म्हणे हा आजार रोगप्रतिकारक शक्तीने केलेल्या हल्ल्यामुळे होतो. मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात आणि हळूहळू फुफ्फुसं आणि श्वसननलिकेवरही हल्ला करतो. लाखात केवळ दोन-चारजणांना होणारा हा आजार! या आजारानं मला पछाडलं होतं. त्या गोष्टीला आज 15 ऑगस्ट 2010 ला बरोबर 1 वर्ष झालं. हा भयंकर आजार पूर्णपणे बरा व्हायलाही काही महिन्यांपासून ते दीड-दोन वर्षांचा कालावधी लागतो. गेल्या वर्षभरात मी ज्या स्थितीतून गेलो. त्याबद्दल काही सांगावं म्हणून हा लेखन प्रपंच.ऑक्टोबर 2009 चा महिना असावा. सकाळी 8 ची वेळ. समोरच्या खिडकीत वृत्तपत्र खोचल्याचं दिसलं. एकटाच होतो. समोरच्या खुर्चीच्या आधाराने खाटेवरून तोल सांभाळत उभा राहिलो, पण त्यासाठी सर्व शक्ती एकवटावी लागली. डोंबाऱ्याच्या मुलीने दोरीवरून तोल सांभाळत चालावे तसे सर्व लक्ष केंद्रित करून 5 फुटांचं अंतर दहा पावलांत कापलं. तरुण भारतचा अंक हाती घेतला. एक खोली ओलांडून पलीकडच्या कार्यालयाच्या खुर्चीत बसून वाचावं म्हणून चालू लागलो. कार्यालयाच्या दरवाजाच्या आधी कॉम्प्युटर ठेवलेला आहे. तिथे आल्याबरोबर मी कॉम्प्युटरच्या स्टॅबिलायझरवर कोसळल्याचं ध्यानात आलं. डोक्याला लागलं नाही, पण त्या टेबलाच्या खालच्या भागात अडकलो होतो. हळूहळू अंग काढून घेतलं. बसण्याचा प्रयत्न करू लागलो, पण बसता आले नाही. उभे राहण्याचा तर प्रश्नच नव्हता. पलंगावरून आधार घेऊन उठता येऊ लागलं होतं, पण जमिनीवर नाही. आता कार्यालयात निम्मं आणि कॉम्प्युटर रूममध्ये निम्मं शरीर टाकून पालथं पडून राहिलो, शेजारी पडलेल्या वृत्तपत्रावरून नजर टाकत. या स्थितीचं राहून राहून मलाच हसू येत होतं. कुणी कार्यकर्ता येईपर्यंत मला असंच पडून राहावं लागणार होतं. पंधराएक मिनिटांनी श्रीनिवास दादा आला. त्याने उचलून उभं केलं. जीबीएसचा आजार होऊन आता मला दोन-अडीच महिने होत आले होते.
हा जीबीएसचा आजार मोठाच चमत्कारिक आहे! सगळे आजार रोगप्रतिकार शक्तीच्या कमतरतेमुळे होतात, तर म्हणे हा आजार रोगप्रतिकारक शक्तीने केलेल्या हल्ल्यामुळे होतो. मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात आणि हळूहळू फुफ्फुसं आणि श्वसननलिकेवरही हल्ला करतो. लाखात केवळ दोन-चारजणांना होणारा हा आजार! या आजारानं मला पछाडलं होतं. त्या गोष्टीला आज 15 ऑगस्ट 2010 ला बरोबर 1 वर्ष झालं. हा भयंकर आजार पूर्णपणे बरा व्हायलाही काही महिन्यांपासून ते दीड-दोन वर्षांचा कालावधी लागतो. गेल्या वर्षभरात मी ज्या स्थितीतून गेलो. त्याबद्दल काही सांगावं म्हणून हा लेखन प्रपंच.
दिल्लीची राष्ट्रीय पत्रकार कल्याण न्यास नावाची संस्था आहे. राष्ट्रीय विचारधारेच्या प्रेरणेने पत्रकारितेत समर्पित वृत्तीने कार्य करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी न्यासतर्फे पुरस्कार दिला जातो. 8 ऑगस्ट रोजी सोलापुरात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाची तयारी, स्मरणिकेची तयारी, निमंत्रण पत्रं, स्थानिक संयोजन समितीतील मान्यवरांच्या भेटीगाठी... एकूणच धावपळ सुरू होती.
रविवार पुरवणी "आसमंत' आणि रोजचं संपादकीय पान हे कामही होतंच. विवेक विचार मासिकाचंही काम. अशातच 7 ऑगस्टला ताप भरला. आजारी पडून थोडंच चालणार होतं. त्यामुळे आजार पुढे ढकलला. कार्यक्रम थाटात पार पडला. त्यानंतर दोन दिवसांनी 11 ऑगस्ट रोजी पहाटे समजलं की, जवळचा मित्र मदगोंडा पुजारीचे वडील हृदयविकाराने गेलेत. मदगोंडा सांगलीत होता नोकरीसाठी. तो निघाला होता. 12 वाजेपर्यंत सोलापुरात पोहोचल्यानंतर त्याला सोलापूरपासून 25 कि.मी.वर असलेल्या गंगाधर कणबस गावी न्यायचं होतं. म्हणून सकाळी 7.30 वाजताच तरुण भारतमध्ये पोहोचलो. 12 पर्यंत पान 4 ओके केलं. मदगोंडाला घेऊन बाईकवरून गावी पोचलो. अंत्यसंस्कार व्हायला रात्र झाली. सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही, अशा वातावरणात ते शक्य तरी होतं का? रात्री थोडा थकवा जाणवला. दुसऱ्या दिवशी हातापायातून थोडी शक्ती कमी झाल्यासारखं वाटलं. कालच्या दगदगीमुळे असेल कदाचित म्हणून दुर्लक्ष केलं.
गुरुवार, दि. 13 ऑगस्ट. सकाळी 11 ची वेळ. "अरे सुनील, पायातून शक्ती कमी झाल्यासारखी वाटतेय. गाडी चालवता येईल असं वाटत नाही. चल डॉ. रायतेंकडे जाऊ', मी म्हणालो. तो "चल' म्हणाला. पुन्हा मीच म्हटले, "थांब, मी पाहतो गाडी चालवायला येते का' म्हणून मी गाडी चालू केली अन्‌ एकटाच डॉ. रायतेंकडे पोचलो. पायऱ्या चढणं त्रासदायक वाटत होतं. डॉक्टरांनी तपासणी केली. जुलाब लागले होते का? असे विचारले. हातपाय ढकलायला सांगितले. काही नाही कमी होईल. "इलेक्ट्रॉल' घ्या दोन दिवस, कमी होईल म्हणाले. क्षार कमी झालेत असं त्यांना वाटलं असावं. दरम्यान, ताप आला, तर फोन करा म्हणाले. आज मला "मुस्लिम जगत' स्तंभाचं अनुवाद करून सर्व आवृत्त्यांना पाठवायचं असल्यानं कार्यालयात पोहोचलो. 3 वाजेपर्यंत अनुवाद करून झाला. आता मात्र चालायला आणखी त्रास होत होता. संपादक साहेबांना फोन करून सांगितलं की, बहुधा चिकन गुनिया झालाय. निवास ठिकाणी केंद्रात पोहोचलो. सुनील मुंबईला बैठकीला जाणार होता, पण न जाता तो थांबला होता. रात्री इलेक्ट्रॉल घेऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी दिवसभर इलेक्ट्रॉल घ्यायचं, लघुशंकेला जायचं सुरू. दिवसभरात अधिकच परिणाम झाला होता. रात्री 10 च्या सुमारास बसुदादा (विवेकानंद केंद्राचे ज्येष्ठ कार्यकर्ते) व शोभाताई (स्त्रीरोगतज्ज्ञ) आले. डॉ. किरण पाटीलकडे ऍडमिट करू म्हणाले. स्वाईन फ्ल्यूची शहरात हवा होती. म्हणून दोघेही मास्क लाऊन आले होते. मी म्हणालो, "सकाळपर्यंत बघूया.' ते गेले. रात्री मात्र जास्तच झालं. आता मला हातात पेलासुद्धा धरता येईनासे झाले. उठून उभे राहायलाही येईनासे झाले. क्षार वाढावेत म्हणून पुन्हा पुन्हा इलेक्ट्रॉल पीत राहिलो आणि बिचारा सुनील अर्ध्या-अर्ध्या तासाला उचलून बाथरूममध्ये नेऊ लागला. प्रकरण गंभीर असल्याचं आता त्याच्या ध्यानात आलं होतं.
सकाळी झाली. बसुदादा, शोभाताई, श्रीकांत हजर झाले. आता दवाखान्याला पर्याय नव्हताच. रिक्षा मागविली गेली. सुनीलनं पाठीवर उचलून घेतलं अन्‌ पायऱ्या उतरू लागला. शेवटच्या पायरीवर अडखळून तो पडला अन्‌ त्याच्यावर मी. मी काहीच करू शकत नव्हतो. रिक्षात दोन्ही बाजूला श्रीकांत-सुनील. रिक्षा धावू लागली. 15 ऑगस्ट- स्वातंत्र्यदिनाची सकाळ असल्याने देशभक्तीचे वातावरण रस्त्यावरून दिसत होते. रिक्षा युनिक्‌ हॉस्पिटलसमोर थांबली. तोवर संपादक श्री. अनिल कुलकर्णी, दशरथ वडतिले, शांतवीरदादा तिथे पोहोचले होते. चाक असलेल्या खुर्चीवर मला उचलून बसविण्यात आलं. एका खाटेवर तात्पुरतं डॉक्टर येईपर्यंत झोपवण्यात आलं. शोभाताईंनी संपर्क केल्यानं पाचच मिनिटांत डॉक्टर करकमकर पोहोचले. त्यांनी जुजबी चाचणी केली अन्‌ सांगितलं, हा गियाबारी सिंड्रोम आहे. तत्काळ यशोधरा किंवा वळसंगकर हॉस्पिटलला हलवा. डॉ. वळसंगकर गोव्यात होते. म्हणून "यशोधरा'ला न्यायचं ठरलं. मला आताही ताप नव्हता. आवाजही खणखणीत होता. लुळं शरीर सोडलं तर आजाराची कोणतीच लक्षणं नव्हती. त्यामुळेच मलाच काय इतरांनाही आधीचे दोन दिवस आजाराचं गांभीर्य समजलं नव्हतं.
आता मात्र सगळेच गंभीर झाल्याचं दिसत होतं. रुग्णवाहिका आली आणि यशोधरात पोहोचलो. काही दिवसांपूर्वीच मी डॉ. बसवराज कोलूर आणि डॉ. शिवपुजे यांची मुलाखत घेऊन गेलो होतो. त्यानंतर आज. सुरुवातीला तपासणी करतात तिथे समोर डॉ. शिवपुजे दिसले. "तुम्ही 25% खाता आणि त्याच्या दुप्पट काम. असं चालणार नाही', हे त्यांचे शब्द त्याक्षणी आठवले, पण त्याक्षणी समोर "आपला' डॉक्टर आहे याचा आधारही वाटला. तातडीने अतिदक्षता विभागाकडे चारचाकी टेबलवरून नेण्यात येऊ लागलं. मला फक्त बोलताच येत होतं, हालचाल नाही, पण वातावरण गंभीर झालं होतं. अतिदक्षता विभागात नेताना पाहात होतो, आई-बाबा शेतातली कामं तशीच टाकून धावत पळत आलेत. मातीने माखलेले कपडे तसेच आहेत.
अतिदक्षता विभागात विविध चाचण्या सुरू झाल्या होत्या. जीबीएस आजाराची लक्षणे दिसत असली, तरी डॉक्टरांना तशी खात्री करून घेण्यासाठी काही चाचण्या करायच्या होत्या. "एम.आर.आय.'द्वारे पाठीचा मणका स्कॅन केला जातो. तिथल्या डॉक्टरांच्या चर्चेवरून मला समजलं होतं की, पाठीच्या मणक्याला काही इजा झालेली नसेल, तर "जीबीएस'चे उपचार सुरू करायचे. दरम्यान एक दीर्घ श्वास घेऊन मला 1, 2, 3... असे अंक मोजायला सांगण्यात आले. मी 45 पर्यंत म्हटले. हे चांगलं लक्षण होतं, पण समजा पाठीच्या मणक्यात काही दोष निर्माण झाला असेल, तर मात्र कायमचं पंगुत्व येणं शक्य होतं. कायमस्वरूपी आपल्या हाता-पायात शक्ती नसणार? ही कल्पनाच खूप धक्कादायक होती. सतत फिरणाऱ्या माझ्यासारख्यावर असा विचार करणंही आघात होता. माझ्या मनाची स्थिती मी नेमकेपणाने सांगू शकणार नाही, पण मी पुरता हादरून गेलो होतो. "वैरी न चिंती ते मन चिंती' असं म्हणतात ते खरंच आहे. मनात वेगाने विचार येऊ लागले... समजा आपले पाय कायमस्वरूपी निकामी झाले तर.... आपल्याला संगणकाच्या आधारे वाचन, लिखाण आदी करता येईलच, त्यामुळे काही अडचण नाही. परंतु समजा हात आणि पाय दोन्ही निकामी झाले, तर जीवन कसं जगायचं? हा विचार छळत होता. मला उत्तर मिळालं.... प्रायोपवेषन्‌. होय, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याचा अवलंब केला होता. आपलं शरीर जेव्हा स्वत:च्या आणि समाजाच्या उपयोगाचं राहात नाही तेव्हा अन्न, पाणी, औषधं त्यागून मृत्यूला अलिंगन द्यायचं. असं करणं इथे लिहिलंय इतकं निश्चितच सोपं नाहीय; परंतु त्याक्षणी मला या विचाराने बळ दिलं आणि मी चिंतामुक्त झालो. तोपर्यंत एमआरआय स्कॅनिंगसाठी मला अश्विनी रुग्णालयात नेलं होतं. स्कॅनिंगच्या त्या कराल जबड्यात बंद करण्यात आलं. प्रक्रिया सुरू झाली. आश्चर्य म्हणजे मला झोप लागली. स्कॅनिंगनंतर पुन्हा "यशोधरा'त आणलं गेलं. दरम्यान भेटायला येणाऱ्यांची वर्दळ सुरू झाली होती. रामतीर्थकर पती-पत्नी पायऱ्या चढतच दाखल झाले होते. (रामतीर्थकर सरांना संधीवातामुळे चालताना अडचण येते.) बहिणी, भाऊ परमेश्वर बघताक्षणी रडू लागले. आई-बाबांची अवस्था तर कशी सांगू.
नंतर बहीण सांगत होती, "सुनील काळवंडला होता. सतत फोनवरून विविध लोकांना माहिती देत होता. चेहऱ्यावर सन्नाटा. धनंजय दादा, संपादक, नाना, शांतवीरदादा, भावजी या साऱ्यांची स्थिती अशीच होती. डॉ. प्रार्थना भावजी आणि नातेवाईकांना कमी होईल म्हणून धीर देत होती. सगळं विवेकानंद केंद्रच यशोधरात गोळा झालं होतं.'
संध्याकाळी श्वास घेऊन आकडे मोजायला सांगण्यात आले. आता मी 23-24 पर्यंतच एका श्वासात आकडे मोजू शकत होतो. आजाराने श्वसनसंस्थेवर ताबा मिळवायला सुरुवात केली होती. दरम्यान "एमआरआय'चा रिपोर्ट आला. नॉर्मल. मात्र ध्यानात आलं की, आता उशिराने का होईना आपण पुन्हा चालू-फिरू शकणार आहे, पण मला वाटलं तेवढं सोपं नव्हतं हे माझ्या ध्यानात नंतरनं आलं.
"जीबीएस'चा आजार आहे हे आता निश्चित झालं होतं. "जीबीएस' या आजारात बोटं, पाय, हात अशा क्रमाने परिणाम होतो. शेवटी श्वसनसंस्थेवर हल्ला होतो. श्वसनसंस्थेवर हल्ला होणं गंभीर असतं. रुग्ण कधीकधी यात दगावू सुद्धा शकतो. आता माझ्या श्वसनसंस्थेवर परिणाम व्हायला सुरुवात झाली होती. आता जीबीएसच्या व्हायरसचा प्रभाव रोखणं अत्यंत गरजेचं होतं.
(पूर्वार्ध)

मु. पो. यशोधरा हॉस्पिटल  (जीबीएस'च्या विळख्यात भाग - 2)

... अन्‌ मी पुन्हा चालू लागलो  (जीबीएस'च्या विळख्यात भाग -3 )

‘जीबीएस’च्या विळख्यात दोन वर्षे   दिव्य मराठीत प्रकाशित

हाणामारी-दंगली टाळता येऊ शकतील

सोलापुरातील दत्त चौक भागात मंगळवारी रात्री दोन गटांत हाणामारी झाली. लागलीच सगळीकडे दंगल पेटल्याची "अफवा' पसरली. रात्री सव्वा दहाच्या सुमारास हैदराबादेत राहणाऱ्या एका मित्राचा फोन आला. दत्त चौकात काही गडबड आहे पाहा, असे त्याने सुचविले. चौकशी करून मी सिव्हिल हॉस्पिटलला पोचलो. जखमी असलेल्या कुरेशी गटातील तरुणांवर उपचार सुरू होते. बाहेरील बाजूला कुरेशी नावाचे एक साठीतले दाढीधारी गृहस्थ पत्रकारांना माहिती देत होते.
"खाटीक मशीद भागात आमच्या (मुस्लिम) समाजाची फक्त 50 घरे आहेत. (5-10 घरॉं हंई, दुसरा म्हणतो.) त्यांनी अल्पसंख्याकांवर अन्यायाची सीमा ओलांडून अन्याय केला आहे. अल्पसंख्याकांवर दहशत बसविण्यासाठीच आम्ही पुरुष मंडळी घरात नसताना ठरवून हा हल्ला केला गेला. अल्लाताला त्यांना धडा शिकवीलच. आम्हीही कायदेशीररीत्या त्यांना सोडणार नाही... भारी पडू... आमदार आमच्याकडे फिरकलेही नाहीत पण "भाऊ' मात्र आमच्या मोहल्ल्यात घरी येऊन धीर देऊन गेले...' वगैरे माहिती कुरेशी महोदय देत होते.
दत्त चौक-सोन्या मारुती भागात त्यांच्या समाजाची कमी घरे आहेत म्हणून त्यांच्यावर दहशत बसविण्यासाठी हल्ला झाल्याचे कुरेशी म्हणत आहेत. या भागात गेल्या काही वर्षांत मुस्लिमांची संख्या अचानक कृत्रिमरीत्या वाढल्याची या भागातील हिंदू समाजाची भावना आहे. काही बांगलादेशी घुसखोर या भागात बस्तान थाटत असल्याचीही चर्चा आहे. नेमका काय प्रकार आहे हे पोलिसांनीच खोलात जाऊन चौकशी केली तर ध्यानात येऊ शकेल, पण कालच्या हाणामारीचा मूळ मुद्दा वेगळाच आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी झाली आहे. म्हणजेच त्या दोन्ही गटांतील ठराविक मंडळींचा या हाणामारीत सहभाग आहे, परंतु कुरेशी गट मात्र याला हिंदू-मुस्लिम असे रूप देण्याचा प्रयत्न करीत आहे काय, हे तपासले पाहिजे. तसे असेल तर ही बाब हाणामारीपेक्षाही अधिक गंभीर आहे.
त्या भागात केवळ पन्नासच घरे मुस्लिमांची आहेत म्हणून त्यांच्यावर दुसऱ्या समाजाने म्हणजे हिंदूंनी दहशत बसविण्याचा प्रयत्न केला, असे म्हणणे अपरिपक्वपणाचे आहे. तसे पाहिले तर कितीतरी खेड्यांमध्ये 2-4 घरे मुस्लिमांची आणि बाकी सर्व हिंदूंची, असे असूनही कधी हिंदूंनी त्यांच्यावर दहशत बसविल्याच्या वार्ता नाहीत. उलट खेड्यातील मुस्लिमांचे सण हिंदूच पुढाकार घेऊन साजरे करताना दिसतात. शहरातही हिंदुबहुल भागातील मुस्लिम दहशतीत राहतात असे दिसत नाही. मात्र याउलट अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. दोन वर्षांपूर्वी (2 ऑक्टो. 2008) लक्ष्मी मंडईजवळील मुस्लिमबहुल भागात शिलाई दुकान मुस्लिमांच्या सणाच्या दिवशी का चालू ठेवला असे विचारत काहींनी लोखंडी सळयांनी गंभीर हल्ला केला होता.
2002 साली अमेरिकेतील कोण एक ख्रिस्ती पाद्री मोहम्मद पैगंबर यांचा अपमान केला म्हणून सोलापुरातील मुस्लिमबहुल भागात देवीची मूर्ती फोडून दंगल घडविण्यात आली होती. गेल्यावर्षी आसरा चौकाजवळ रिक्षावाल्याने मागून मोटरसायकलीला धडक दिली. चूक रिक्षावाल्याची असूनही रिक्षावाल्याने "मॉं की ---' शिवी हासडली. वाद वाढतोय असे दिसताच, दोन-चार मिनिटांत 10-12 जण रिक्षावाल्याच्या बाजूने धावून आले आणि त्या मोटरसायकलवाल्या दोन्ही मुलांना बदडले. रिक्षावाला त्या परिसरातील नसताना आणि त्याची चूक असतानाही त्याच्या बाजूने त्याचे समाजबांधव धावून आले.
हिम्मतराव देशभ्रतार यांनी आयुक्तपदाची सूत्रे घेऊन चार दिवस होत नाहीत तोपर्यंत विजापूर वेस येथील घड्याळाच्या दुकानावर 100-125 जणांच्या जमावाने हल्ला केला. एक दारू प्यालेला मुस्लिम गृहस्थ घड्याळाचे पैसे कमी घे असे दुकानदाराला दरडावतो. दुकानदार ऐकत नाही म्हटल्यावर बाहेर येऊन गोंधळ करतो. 5-10 मिनिटांत 100-125 समाजबांधव त्याची कड घेऊन दुकानावर हल्ला करतात, हे काय दर्शविते?
या आणि अशा गोष्टींचा कुरेशी साहेब तुम्ही विचार करणार आहात काय? पूर्ववैमनस्यातून जर हाणामारी झाली असेल, तर त्याला हिंदू-मुस्लिम वादाचे रूप देणे चुकीचे आहे. अशा अफवांमधूनच दंगली होतात असे आम्हास वाटते. समजा या दोन गटांतील हाणामारी पूर्ववैमनस्यातून नसेल तर ती का झाली याचा शोध घेण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.
दत्त चौक परिसरात एक शाळा आहे. या भागात हिंदू तरुणींची नेहमीच छेड काढली जाते. कुणी जाब विचारायला गेले की, झुंडशाही निर्माण करून तरुणींच्या पालकांनाच गप्प केले जाते. या प्रकारातूनच असंतोष वाढत जाऊन कालची हाणामारी झाली असे म्हटले जात आहे. मध्यंतरी "लव्ह जिहाद'ची चर्चा होती. तसा प्रकार तर येथे नाही ना, याचीही शहानिशा झाली पाहिजे. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे.
हा विषय फक्त सोलापुरपुरता मर्यादित नाही. संदर्भ सोलापूरचा असला तरी कमी-अधिक फरकाने सगळीकडे अशा घटना घडत असतात. सर्वसामान्य हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाला दंगल, हाणामारी नकोच असते, परंतु काही मंडळी वैयक्तिक वैमनस्याला हिंदू-मुस्लिम वादाचे रूप देत असतील तर संबंधित समाजातील विचारी लोकांनी असे प्रकार थांबविले पाहिजे. मुलींची छेडछाड करून हिंदू समाजाला डिवचण्याचे प्रकारही थांबले पाहिजेत. महाविद्यालये, मोहल्ले यांमधून असे प्रकार होणार नाहीत यासाठी पोलिसांची स्वतंत्र यंत्रणा किंवा पथकच असले पाहिजेत. असे झाले तर वेळ हाणामारीपर्यंत येणारच नाही. याचबरोबर दोन्ही समाजांत सुसंवाद निर्माण होण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत. असे झाले तर हाणामारी-दंगली टाळता येतील.

Sunday, June 27, 2010

कायरोप्रॅक्टीक

अक्कलकोट- अक्कलकोट नगरीतील शिवपुरी आश्रमातर्फे दि. 25 जून ते 5 जुलै दरम्यान कायरोप्रॅक्टीक व आयुर्वेदिक सर्वरोग निदान, नेत्रचिकित्सा ई शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी अमेरिकेत कार्यरत असलेली थर्ड वर्ल्ड बेनिफिट ऑर्गनायझेशन शिवपुरी आश्रमाशी संलग्न असलेली ही संस्था आपले कायरोप्रॅक्टीक तज्ञ शिवपुरीमध्ये पाठवत आहेत. या सर्व थर्ड वर्ल्ड बेनिफिट ऑर्गनायझेशन व शिवपुरी आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच भूकंपग्रस्त देश हैती, डोमीनिकल रिपब्लिकन घाना या सारख्या देशामध्ये कायरोप्रॅक्टीक कॅम्पस घेतले आहेत.
कायरोप्रॅक्टिक म्हणजे हाताने केला जाणारी उपचार पद्धती होय. अपघात व चुकीच्या पद्धतीने बसणे, उठणे, चालणे इत्यादीमुळे पाठीच्या मणक्यांचे संतुलन बिघडून त्यातून विविध अवयवांकडे जाणाऱ्या मज्जांततुवर दाब पडून तेथे वेदना व व्याधी निर्माण होतात. कायरोप्रॅक्टीकच्या तंत्राने कोणत्याही प्रकारचे औषध व शस्त्रक्रियेविना केवळ हाताने विशिष्ट प्रकारे दाब देऊन मणके पूर्वस्थितीत आणले जातात. अमेरिकेत या पद्धतीचा शास्त्रीय अभ्यासक्रम विकसीत झाला असून या उपचार पद्धतीने तिथे फार मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण दिले जाते.
शिवपुरी येथे यापूर्वी घेतलेल्या कायरोप्रॅक्टीक शिबिरामध्ये 25000 पेक्षा जास्त रुग्णांनी या चिकित्सा पद्धतीचा लाभ घेतलेला आहे. अर्धांगवायू, संधीवात, पाठीचे व मणक्याचे विकार, फ्रोझन शोल्डर्स, कंबर दुखी, मान दुखी व शरीराचे अवयव पांगळे झालेल्या अशा रुग्णांना मुख्यत: या शिबिराचा लाभ यापूर्वी झालेला आहे. अक्कलकोट परिसरातून सोलापूर, विजापूर, बीदर, लातूर, तसेच थेट हैदराबाद,मुंबई, नागपूरहून देखील रुग्ण आले होते.
यावर्षीच्या शिबिराचे वेगळेपण असे आहे की, शिवपुरीमध्ये 25 जून ते 5 जुलै या कालावधीत होणाऱ्या शिबिरामध्ये एकाच ठिकाणी कायरोप्रॅक्टीक चिकित्सा, आयुर्वेद चिकित्सा व नेत्रचिकित्सा या सर्व चिकित्सा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या शिबिरामध्ये आलेल्या रुग्णांना व नातेवाईकांना न्युट्रीशन, व्यायाम, आहार व स्वच्छता, पोषक तत्वे, पर्यावरण याविषयी विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.
या शिबिरादरम्यान आलेल्या रुग्णांना व नातेवाईकांना अन्नदानाची मोफत सोय शिवपुरी आश्रमाद्वारे करण्यात आली आहे. या शिबिरासाठीची नावनोंदणी फोनवर करण्याची सुविधा यावर्षी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. गरजू व रुग्णांनी 8806699388 फोनवर दि. 18 जूनपासून सकाळी 10 ते सायं. 5 या कालावधीतच फोन करावा व आपले नाव नोंदवावे, असे आवाहन शिवपुरी आश्रमातर्फे करण्यात आले आहे.

Saturday, June 26, 2010

डॉक्टर साहेब,

हेही समजून घ्या थोडं...
अक्कलकोट येथील शिवपुरीत शुक्रवार दि. 25 जून ते 5 जुलै या कालावधीत कायरोप्रॅक्टिक उपचार शिबिर सुरू आहे. त्यानिमित्ताने...
मी काही वैद्यक क्षेत्रातला जाणकार नाही. डॉक्टर मंडळींना उपदेशाचे डोस द्यावेत असाही माझा विचार नाही. तरीही मला आलेल्या अनुभवामुळे हा लेख लिहित आहे.
चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दुपारी संपादकीय पानाचे काम आटोपले होते म्हणून कार्यालयातच वृत्तपत्रे चाळीत बसलो होतो. घरून लहान भावाचा फोन आला. तो घाबरलेला होता. "बाबाग्‌ यान्‌ अरे आग्याद्‌...' म्हणत तो सांगू लागला. माझ्या वडिलांना (वय साधारण 58) शेतात काम करताना अचानक पाठीत दुखायला लागले होते. तीव्र वेदना होत होत्या.
प्रकरण गंभीर असल्याचे ध्यानात आले. उपचारासाठी त्वरित शहरात आणणे आवश्यक होते. सोलापूरपासून केवळ 18 किलोमीटरवर शिर्पनहळ्ळी हे गाव असले तरी गाव आडवळणी आहे. त्यामुळे वाहनांची सोय नाही. मी वृत्तपत्रांत असलो तरी आजही माझ्या गावी रोजची वृत्तपत्रं येत नाहीत. थोडक्यात सांगायचे तर गावाकडून रुग्णाला शहरात आणणे अवघड होते. त्यामुळे सोलापुरातूनच रिक्षा केली.
घरी गेल्यानंतर ध्यानात आले की, वडिलांना काहीच हालचाल करता येत नाहीय. बसलेल्या स्थितीतून उठायचे म्हटले तरी पाठीत जीवघेणी कळ. पाठीच्या मणक्याला इजा झाली असावी, असे वाटले. त्यांना आहे त्या स्थितीतून हळूवारपणे उचलून रिक्षात बसविले. पाय थोडे जरी हलले तरी तीव्र वेदना होत होत्या. कसे -बसे सोलापुरात आणले.
शहरातील एका नामवंत अस्थिरोग तज्ज्ञाच्या दवाखान्यात ऍडमिट केले. उपचार सुरू झाले. "एक्स' -रे आणि अन्य तपासण्या झाल्या. औषधंही सुरू होती. विशिष्ट प्रकारच्या उपकरणाने पाठीच्या मणक्यांना स्टिम्युलेशनही देण्यात येत होते. 6 दिवस झाले तरी परिणाम काही जाणवत नव्हता. उपचार खर्चाचा आलेख मात्र प्रामाणिकपणे वाढत होता. कधीही दवाखान्याची पायरी न चढलेल्या माझ्या वडिलांनी धसकाच घेतला होता. जेवण केले की पुढील गोष्टींच्या कटकटी सुरू होतील, असा विचार करून वडील केवळ दोन-चार बिस्किटांवर दिवस ढकलत होते. मी पुन्हा पुन्हा डॉक्टरांना विचारित होतो की, आजार कमी व्हायला किती दिवस लागतील? नेमका कालावधी सांगण्यास डॉक्टरही असमर्थ होते. आणखी एक-दोन आठवडे तरी काही सांगू शकत नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे होते.
स्थिती गंभीर होत चालली होती. काय करावे सुचत नव्हते. आमचे ज्येष्ठ सहकारी नाना बसाटे यांनी याचवेळी अक्कलकोटच्या शिवपुरी येथे सुरू असलेल्या कायरोप्रॅक्टिक शिबिराची माहिती दिली आणि वडिलांना तिकडे नेण्यासाठी आग्रहही धरला. थोडे हायसे वाटले, परंतु दवाखान्यातून डिस्चार्ज घेण्याचे धाडस होत नव्हते. समजा शिवपुरीच्या शिबिरात नेले आणि काही उपयोग झाला नाही तर काय करायचे, अशी मनात भीती होती. हो नाही करत अखेर शिवपुरीला न्यायचे असा कौल मनाने दिला.
वडिलांना शिवपुरीच्या शिबिरात नेणार असल्याचे डॉक्टरांना सांगितले. हा शिकला सवरलेला मुलगा मूर्खासारखा का विचार करीत आहे, असा भाव डॉक्टरांच्या चेहऱ्यावर मला स्पष्टपणे वाचता आला. शिबिरात कमी झाले नाही तर पुन्हा आणा काही हरकत नाही, असे डॉक्टर म्हणाले. अक्कलकोटला कसे न्यावे असा प्रश्न होता. विवेकानंद केंद्राचे बसूदादा यांच्या कारने प्रश्न सोडवला. नाना यांना सोबत घेऊन वडिलांना शिवपुरीस नेले.
मी पहिल्यांदाच शिवपुरीत गेलेलो. 4 ते 5 हजार लोकांची रांग पाहिली. आता आमचा नंबर कधी येणार असा विचार करीत "कशाला आलो इकडे', असे क्षणभर वाटले. पत्रकारांसाठी असलेल्या सुविधेअंतर्गत आम्हाला बोलावण्यात आले. नाना, मी आणि आणखी दोघे असे मिळून मोटारीतून उचलून वडिलांना समोरच्या टेबलवर झोपवले. कायरोप्रॅक्टिक उपचार करणाऱ्या तिथल्या अमेरिकन व्यक्तीने रिपोर्ट पाहिले आणि काही जुजबी माहिती विचारली. वडिलांना पालथे झोपविले. कमरेजवळ एका विशिष्ट ठिकाणी हाताच्या दोन्ही अंगठ्यांनी जोरात दाब दिला. "कट्‌' असा आवाज झाला. त्यावेळी एकदम वडील विव्हळले. दुसऱ्याच क्षणी त्या व्यक्तीने वडिलांना उठायला सांगितले. काय आश्चर्य वडील उठून चालू लागले...
पाचच मिनिटांपूर्वी ज्या माणसाला उचलून आणले तो चालत येतोय हे पाहून तेथील सारेच अचंबित झाले. बघता-बघता आमच्या भोवताली दीड-दोनशे माणसं जमली. साऱ्यांनाच कौतुक वाटत होतं. माझ्या मनाची अवस्था मला शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही. मला असा आनंद याआधी कधी झाल्याचे आठवत नाही.
तिथून थोड्यावेळाने आम्ही निघालो. चप्पळगाव-धोत्री मार्गे माझं गाव 25 किलोमिटर आहे. घरी आलो. वडील जणु काही झाले नाही असेच चालत-फिरत होते. आनंदाने संध्याकाळी सोलापूरला परतलो आणि डॉक्टर साहेबांना फोन केला. वडिलांचे दुखणे शिवपुरीच्या शिबिरात बरे झाल्याचे त्यांना सांगून टाकले. डॉक्टर साहेब म्हणाले, "ठीक आहे'. त्यांनी फोन ठेवून दिला.
मला खूप वाईट वाटले. मी उत्साहात होतो. डॉक्टरांना किती सांगू असं झालं होतं, परंतु डॉक्टर साहेबांना काहीही जाणून घ्यावं वाटलं नाही. आज वडिला शेतातली कुळव, पेरणी, बैलांना चारा-पाणी सारी कामे करतात.
ज्या उपचारपद्धतीने रुग्णाला दोनच मिनिटांत बरे केले, ती पद्धती अन्य उपचारपद्धतीच्या डॉक्टरांनी का समजून घेऊ नये ? असे काय तंत्र आहे की, ज्यामुळे त्वरित रुग्णाला आराम मिळाला, हे समजून घेणे चुकीचे आहे की काय? यामुळे संबंधित डॉक्टरच्या ज्ञानात भरच पडेल की नाही? येथे अहंकार का आडवा यावा? आपल्याला माहीत नसलेल्या काही गोष्टी सत्य असू शकतात असे डाक्टर मंडळींना का वाटू नये ?
मध्यंतरी ज्येष्ठ पत्रकार श्री. अरुण रामतीर्थकर यांना नागीण या आजाराचा त्रास सुरू झाला होता. त्याचा प्रादुर्भाव डोळ्यात होऊन डोळ्यास दिसणे कमी होऊ लागले. शहरातील नामवंत डॉक्टरांकडून उपचार करूनही काही उपयोग झाला नाही. शेवटचा उपाय म्हणून सोलापूरजवळील कुरूल येथे जडीबुटी देणाऱ्या सामान्य शेतकऱ्याकडे सर गेले आणि आश्चर्य म्हणजे नागिणवर उतारा पडला. डोळाही पूर्ण बरा झाला.
आजही गावागावांत अनेक आजारांवर पारंपरिक पद्धतीने उपचार केले जातात. हे खरे आहे की, उपाचार करणारी मंडळी बऱ्याचदा अज्ञानी असतात. कधी कधी करण्यात येणारे उपचार चुकीचे असतात. परंतु म्हणून पारंपरिक ज्ञानात काहीच तथ्य नाही असे म्हणत उडवून लावणे हे काही मोकळ्या शास्त्रीय मनाचे लक्षण नाही. पारंपरिक उपचार पद्धतींचा आधुनिक डॉक्टर मंडळींनी अभ्यास केला पाहिजे. उपयुक्त असेल त्याचा मोकळ्या मनाने स्वीकारही केला पाहिजे. आपल्या सिलॅबसच्या बाहेरही काही मोलाचे ज्ञान असू शकते याचे भान असू द्यावे.
थोडक्यात सांगायचे तर ऍलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, कायरो आणि आणखी किती पद्धती असतील... त्याच्याशी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना फारसं देणं-घेणं नसतं. रुग्ण बरा व्हावा हाच एकमेव विचार असतो. आपल्या उपचार पद्धतीच्या बाहेरील एखादा उपचार रुग्णांवर प्रभावी ठरत असेल तर खास करून ऍलोपॅथीवाल्या डॉक्टरांनी जिज्ञासूपणाने आणि मोठ्या मनाने ती पद्धती समजून घेतली पाहिजे.
www.psiddharam.blogspot.com
mobile : 9325306283

आणि शिक्षणाचे बाजारीकरण

गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री. बराक ओबामा यांनी अमेरिकेतील शिक्षण संस्थांना आवाहन केले. अमेरिकेतील शिक्षण संस्थांनी भारतातील उच्च शिक्षण संस्थांशी स्पर्धा करण्यासाठी तयार राहावे, असे ओबामा म्हणाले. त्यांचे म्हणणे आहे की, भारतात शिक्षण घेतलेल्या तरुणांना त्यांच्या योग्यतेमुळे रोजगाराच्या साऱ्या संधी त्यांनाच मिळत आहेत आणि सर्वसामान्य अमेरिकी तरुण शिक्षणात मागासलेला असल्यामुळे व्यावसायिक स्पर्धेत तो मागे पडत आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांनी याच संदर्भामध्ये "बंगळूरला ना आणि बफेलोला हो' असे व्यक्तव्य केले होते. यावरून मोठा वादही निर्माण झाला होता, परंतु या वक्तव्यावर भारतात कोणीही आक्षेप घेतला नाही. भारतीय मीडिया आणि बुद्धीजीवी वर्ग कदाचित ओबामा यांच्या अज्ञानामुळे गोंधळून गेला असेल. आमच्या देशात तर शिक्षण क्षेत्रातील स्थितीमुळे सारे विचारवंत चिंतित आहेत. कोठेही वेळ मिळाला की, भारतीय शिक्षण व्यवस्था सुधारण्याच्या गोष्टी आपण करीत असतो.
बदललेल्या परिस्थितीमध्ये कोणीही व्यापक प्रयत्न केले नसतानाही काही बदल घडून येताना दिसत आहे. हे सर्व बदल सकारात्मक आणि योग्य आहेत असे मात्र म्हणता येणार नाही. परंतु देशाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत शिक्षणाचा प्रसार मात्र होताना दिसत आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात खाजगीकरणापेक्षा बाजारीकरण अधिक झाले आहे. परिणामी याचा नकारात्मक प्रभाव जाणवत आहे. संख्यात्मकदृष्ट्या प्रशिक्षित तरुणांची मात्रा प्रचंड वाढली आहे, परंतु त्यांच्या योग्यतेबद्दल चिंता करावी अशी स्थिती आहे. यावर उपाय म्हणून परदेशी संस्था तसेच तेथील पद्धती भारतात लागू करण्याच्या गोष्टीही आम्ही भारतीय करीत असतो. या विसंगतीचे कारण काय? विदेशी लोक आपल्या शिक्षणपद्धतीची स्तुती करीत आहेत. आपल्या शिक्षणपद्धतीचा त्यांनी धसकाच घेतला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण स्वतःच आपल्या शिक्षणपद्धतीवर असंतुष्ट आहोत.
आपण जेव्हा आपल्या स्वभावानुसार कार्य करतो तेव्हा थोडीशी सफलतादेखील समाधान देऊन जाते, परंतु जेव्हा आपण आपल्या स्वभावाच्या विपरित कार्य करू लागतो तेव्हा उच्चतम सफलता मिळाली तरीसुद्धा जीवनात एक पोकळी जाणवत राहते. हीच गोष्ट राष्ट्राच्या बाबतीतही सत्य असेल असे वाटते. या आधुनिक शिक्षणाने आम्हाला रोजगार, विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यापाराच्या क्षेत्रात मोठी सफलता प्रदान केली आहे. आज भारतीय प्रतिभा पाहून विश्व आश्चर्यचकित झाले आहे. आम्ही संधी मिळताच आमच्या देशातही प्रत्येक क्षेत्रात चमत्कार केले आहेत, परंतु तरीही शिक्षणतज्ज्ञ समाधानी नाहीत. याचे एक कारण असे आहे की, गुणवत्तेच्या स्तरावर भारतात प्रचंड विषमता दिसून येते. एकीकडे राष्ट्रीय संस्थान (आय.आय.टी., आय.आय.एम.) आहेत. येथे जगातील सर्वोच्च संस्थांच्या तोडीचे शिक्षण मिळते. दुसरीकडे सर्वत्र पावसाळ्यातील भूछत्राप्रमाणे उगवलेल्या खाजगी शिक्षणसंस्थांमध्ये शिकलेले अभियंते आणि अन्य पदव्या घेतलेले तरुण दिसतात. आपल्या विषयातील अगदी किरकोळ ज्ञानही यांच्यामध्ये नसल्याचे आढळून येते. योग्यतेतली ही दरी निराशेचे एक कारण आहे, परंतु अधिक सूक्ष्म स्तरावर जाऊन पाहिले तर या पोकळीमागील कारण आहे, आमचे आपल्या मुळांपासून उखडले जाणे. भारताचा स्वभावच ज्ञान-प्रदान आहे. आम्ही ज्ञानार्जन आणि ज्ञानदानाच्या अनेक वैज्ञानिक पद्धतींचा विकास केला. आध्यात्मिक ज्ञान-परा विद्येच्या सोबतच व्यावहारिक भौतिक ज्ञान-अपरा विद्येच्या प्रशिक्षणाच्या अत्यंत परिणामकारी पद्धतींचा विकास आणि प्रयोग भारतामध्ये 19व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत होत राहिले.
गांधीजींचे शिष्य आणि विख्यात संशोधक डॉ. धरमपाल यांनी आपल्या संशोधनाने सिद्ध केलेआहे की, हे शिक्षण वैज्ञानिक पद्धतीचे, चारित्र्य निर्माणात प्रखर आणि अत्यंत प्रभावी होते. साऱ्या देशात सुलभपणे उपलब्ध असणारे हे शिक्षण होते. त्यांनी 1823 मध्ये इंग्रजांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे सांगितले आहे की, (ज्यांना आज आपण वंचित किंवा दलित म्हणतो त्यांच्यासहित) शिक्षक आणि शिष्य लाखो शाळा आणि विद्यापीठांमधून शिकत होते. सारा देशच साक्षर होता. शिक्षणपद्धतीदेखील वैज्ञानिक होती, ज्ञानाला अंतःकरणापासून प्रकाशित करणारे प्रशिक्षण मिळत होते. आजच्या विकृत पद्धतीनुसार "माहितीची' देवाण-घेवाण एवढ्यापुरतेच ज्ञानदान मर्यादित नव्हते. आमच्या परंपरेनुसार गुरू म्हणजे असा की, जो आपल्या शिष्याची योग्य पद्धतीने जडणघडण होण्यासाठी आईप्रमाणे कष्ट करतो, शिष्याचे संपूर्ण दायित्व गुरू ग्रहण करतो. शिष्याच्या चित्ताच्या गुणधर्मितेनुसार प्राणाची प्रतिष्ठा करून गुरू त्याला मार्ग दाखवितो. इतकेच नाही तर गुरू त्याच्यासोबत त्या मार्गावरून चालतोदेखील. आवश्यकता पडली तर गुरू शिष्याचे बोट धरेल, कडेवरही उचलून घेईल. ठाकूर श्रीरामकृष्ण परमहंस यांनी आपल्या शिष्यांसोबत असेच केल्याचे दिसते. कुणाला केवळ मार्ग सांगून स्वतःच्या भरवशावर सोडून दिले. कुणाला बोट पकडून मार्ग दाखविला. गिरीश बाबूंचे संपूर्ण दायित्वच आपल्यावर घेतले. त्यांच्या शिष्यांनी देखील या परंपरेचे पालन केले.
आध्यात्मिक क्षेत्रात ही परंपरा दक्षिणामूर्तीला प्रारंभ करून व्यास महर्षींपर्यंत आणि तेथून वर्तमान आचार्यांपर्यंत जिवंत असल्याचे दिसते. काही अपवाद सोडले तर आज देखील अधिकांश पारंपरिक आचार्य शास्त्रीय विधीचा अवलंब करीत असल्याचे दिसतात, परंतु अपरा विद्येच्या क्षेत्रात ही परंपरा लोप पावली आहे. जीवनात आलेल्या पोकळीचे, निराशेचे हेच मुख्य कारण आहे. शिक्षणाची ही वैज्ञानिक पद्धती पुनजीर्वित करण्यात आली तर अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि अन्य गोष्टी बदलल्या नाहीत तरी चालू शकेल. मुख्य गोष्ट तर "गुरू'ची आहे. शिक्षणसेवकांना शिक्षक बनविल्यानंतर गुरू बनण्याचे प्रशिक्षण प्रदान करणे हाच यावरील एकमेव उपाय आहे. शिक्षणाला केवळ "रोजी-रोटी'चे साधन मानून शिक्षणाच्या बाजारीकरणाची स्पर्धा सुरू आहे. या "स्थितीत गुरु-शिष्य' ही वैज्ञानिक परंपरा पुनःस्थापित करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
केवळ दार्शनिक गोष्टी बोलण्याने काहीही होणार नाही. शिक्षणाच्या क्षेत्रात चारित्र्य निर्माणाची न्यूनता भरून काढण्यासाठी आपल्या स्तरावर विनम्र प्रयत्न सुरू करणे आवश्यक आहे.
-सिद्धाराम भै. पाटील.

Monday, June 21, 2010

सच्चर


क्ष- किरण टाकणारे पुस्तक

पुस्तकाचे नाव : सच्चर समितीचा अहवाल अर्थात धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेलाच सुरुंग
लेखक : समीर दरेकर
प्रकाशक : अभिनव निर्माण प्रकाशन, पुणे.
पृष्ठे : 168 मूल्य : 100/- सवलतमूल्य : 50/-

या देशासमोर अनेक समस्या आहेत. काही समस्या या अतिशय गंभीर आहेत. अतिशय गंभीर समस्यांपैकी एक आहे हिंदू-मुस्लिम यांच्यातील सामंजस्याची समस्या. ही समस्या या देशाला गेल्या हजार-बाराशे वर्षांपासून छळते आहे. असे असूनही दुर्दैवाने या देशात या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रामाणिक आणि तटस्थ प्रयत्न फारच कमी लोकांनी केल्याचे दिसते. काही लोक (त्यातल्या त्यात पत्रकार आणि लेखक मंडळी) या प्रश्नाचा अभ्यास न करताच लेखणी झिजवताना दिसतात. समस्या समजून न घेता राजकीय नेतृत्त्वाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे ही समस्या सुटण्याऐवजी आणखीन गंभीर रूप धारण करीत आहे.
9 डिसेंबर 2006 ला राष्ट्रीय विकास परिषदेत पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले होते, "भारताच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा पाहिजे.' पंतप्रधानांच्या या एकाच वाक्यावरून हिंदू-मुस्लिम ऐक्यावर ही मंडळी कोणत्या प्रकारचे उपाय योजत आहेत याची कल्पना येते. अशा नेभळट पुढाऱ्यांमुळेच 1947 साली 23 प्रतिशत मुस्लिमांसाठी या देशाची 30 प्रतिशत भूमी पाकिस्तानच्या स्वरूपात तोडून देण्यात आली होती, हे इथे ध्यानात घेणे आवश्यक आहे.
पाकिस्तानविरुद्ध सैन्य लढेल... कसाबविरुद्ध पोलीस लढतील... पण आपल्याच लोकांनी मतांच्या राजकारणासाठी केलेल्या राष्ट्रद्रोही कृत्यांविरुद्ध कोण लढणार? अशी कृत्ये सुरू आहेत याची तरी जनतेला माहिती व्हायला नको काय? अशा प्रश्नांनी अस्वस्थ झालेल्या एका तरुण अभियंत्याने - समीर दरेकर यांनी उपरोक्त पुस्तक लिहिले आहे.
वृत्तपत्रांतून, वरवरच्या चर्चेतून सच्चर अहवालाची भीषणता ध्यानी येत नाही. सच्चर समितीचा विषय हा केवळ हिंदू-मुस्लिम विषय म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा विषय नाही. या देशाच्या राज्यघटनेलाच सुरुंग लावणारा, या देशावर आघात करणारा विषय आहे, हे उपरोक्त पुस्तकातून साधार सांगितले आहे. लेखक स्वत: अभियंता असल्यामुळे पुस्तकात फापटपसारा नाही. छायाचित्रे, विविध राष्ट्रीय वृत्तपत्रांतील कात्रणांचा आवश्यक तो वापर, नेमक्या ठिकाणी नेमके संदर्भ यांमुळे पुस्तक एकदा वाचायला घेतले की, पूर्ण वाचल्याशिवाय सोडवत नाही. लेखकाने कष्टपूर्वक सारे संदर्भ एकत्रित करून प्रवाही मांडणी केल्याचे प्रत्येक पान वाचताना जाणवल्याशिवाय राहात नाही.
स्वत: काहीही अभ्यास न करता राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे विषय "अरे यात राजकारण असते' असे म्हणून दुर्लक्ष करणाऱ्या पढतमूर्खांची एक जमात असते. या पुस्तकाची मांडणी, त्यातील पुरावे इतक्या बिनतोड आणि प्रभावीपणे सादर केले आहेत की, पढतमूर्खांच्याही डोळ्यांत अंजन पडेल.
न्या. सच्चर यांचा भूतकाळ पुस्तकाच्या सुरुवातीलाच पुराव्यासह मांडला आहे. सच्चरांचा देशविरोधी शक्तींशी असलेला लळा पाहिला की, मती गुंग होऊन जाते. सच्चर महाराजांच्या कुंडलीवरून सच्चर समितीचे मनसुबे सहज ध्यानात येतात. थोडक्यात सांगायचे तर हिंदू-मुस्लिम प्रश्नावरील मराठी भाषेतील माझ्या वाचनात आलेल्या पुस्तकांत सर्वात प्रभावी असे हे पुस्तक आहे.
भारतीय राज्यघटना, खरी धर्मनिरपेक्षता, देशाचे हित यांना नख लावणारे एक राष्ट्रद्रोही कृत्य सच्चर समितीच्या माध्यमातून झाले आहे. सच्चर समितीच्या अहवालातील देशघातक विषयांवर क्ष- किरण टाकणारे हे पुस्तक सतत चर्चेत येणाऱ्या हिंदू-मुस्लिम प्रश्नावरील संदर्भग्रंथ म्हणूनही मोलाचे वाटते. त्यामुळेच पत्रकार, पोलीस अधिकारी, न्यायाधीश, वकील, लोकप्रतिनिधी, दलित चळवळीतील नेते, सक्रिय कार्यकर्ते, सैन्याचे अधिकारी, विचारवंत, लेखक, कवी, हिंदू-मुस्लिम समस्या कायमस्वरूपी सुटावी असे वाटणारे समाजहितैषी आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना अशा पक्षांतील तसेच मुस्लिम समाजातील देशप्रेमी कार्यकर्ते या साऱ्यांनी आवर्जून वाचलेच पाहिजे, असे हे पुस्तक आहे.
हे पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत पोचले पाहिजे यासाठी अभिनव निर्माण प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते स्वखर्चाने प्रयत्न करीत आहेत. केवळ 35 दिवसांत 5 हजार पुस्तकांची आवृत्ती संपली. दुसरी आवृत्तीही संपण्याच्या मार्गावर आहे.
लेखक - समीर दरेकर हे स्वत: या विषयावर महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये व्याख्याने देत आहेत. आपल्या शहरातही अशा व्याख्यानांच्या आयोजनासाठी आणि पुस्तकासाठी संपर्क : 9822971079, 9922131889
-सिद्धाराम भै. पाटील

वन्दे मातरम १

वन्दे मातरम २

Saturday, June 5, 2010

डॉ. भूषण कुमार उपाध्याय


डॉ. भूषणकुमार


...त्यांनी मन जिंकले !
सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून आपल्या अभिनव कार्यपद्धतीचा ठसा उमटविणारे डॉ. भूषणकुमार उपाध्याय. आता त्यांची पदोन्नतीवर बदली होत आहे. त्यानिमित्ताने...
बिहार विद्यापीठातून संस्कृत विषयात एम.ए. करणारे आणि सुवर्णपदक मिळविणारे, संस्कृत ध्वनीविज्ञान या विषयावर पीएच.डी. करणारे डॉ. भूषणकुमार उपाध्याय. ते मूळचे बेदीबन-मधुबन, चंपारण्य बिहार येथले. विद्यार्थी दशेत असताना त्यांच्या वडिलांना निष्कारण, अपराध नसताना पोलिसी त्रासाला सामोरे जावे लागले. परिणामी "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद आचरणातून साकारण्याचा संकल्प विद्यार्थी दशेतल्या भूषणकुमार यांनी केला आणि त्यांची पुढील वाटचाल सुरू झाली.
मानस व्यवस्थापक असलेल्या डॉ. भूषणकुमार यांच्या कार्यपद्धतीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा वेध केवळ वरवरच्या निकषांनी करणे अपुरे राहील. त्यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांची भाषणे आणि त्यांच्या कार्याची शैली या तीनही बाबींचा एकत्र विचार केला, तर त्यांच्या यशाचे रहस्य उलगडेल.
डॉ. भूषणकुमार हे केवळ संस्कृतचे पंडितच नाहीत, तर ते उर्दूचे चांगले जाणकारही आहेत. उर्दूवर त्यांचे चांगले प्रभुत्व आहे. हिंदुत्वावर श्रद्धा असणाऱ्या कार्यकर्त्यांना ते जेवढे जवळचे वाटतात, तेवढेच ते धर्मप्रेमी मुस्लिमांना देखील जवळचे वाटतात. दलित संघटनाच नव्हे तर इतरही छोट्या-मोठ्या संस्था, संघटनांना डॉ. भूषणकुमार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम राबविताना आनंद मिळतो. लोकांत इतका मिसळलेला, लोकांची मने जाणणारा व जिंकणारा हा सोलापुरातला पहिलाच पोलीस अधिकारी असावा.
डॉ. भूषणकुमार हे मनाच्या शक्तीचे मोठे अभ्यासक आहेत. जगातील मोठ्या जनसमुदायावर, जनमानसावर दीर्घकाळ अधिराज्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्ण, भगवान बुद्ध, भगवान महावीर, येशू ख्रिस्त, मुहम्मद पैगंबर, स्वामी विवेकानंद, अल्बर्ट आईन्स्टाईन, सिग्मंड फ्रॉईड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. गांधी या महापुरुषांच्या जीवनकार्यांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. "जगज्जेते ...त्यांनी मन जिंकले' हे त्यांचे पुस्तक अभ्यासले तर ध्यानात येते की, स्वत:च्या हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगूनही त्यांनी अन्य धर्मांतील मानवाला उपकारक मूल्यांबद्दल कशी श्रद्धा व्यक्त केलीय.
कुराण आणि बायबल या धर्मग्रंथांमधील सकारात्मक जीवनविचार प्रभावीपणे मांडण्याची डॉ. भूषणकुमार यांची हातोटी अद्‌भूत आहे. त्यामुळेच अन्य धर्मीयांमध्येही त्यांच्याप्रति आदराची भावना आहे, परंतु असे असले तरी धर्मांध प्रवृत्ती ठेचण्यासही ते हयगय करीत नाहीत. मुल्लाबाबा टेकडीसारख्या ठिकाणी प्रसंगी मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन करणे असू द्या किंवा सोन्या मारुतीसमोरील मशिदीचे रस्त्याच्या कडेने सुरू असलेले अनधिकृत बांधकाम थांबविणे असू द्या (3 एप्रिल 2009), समाजात अशांती उत्पन्न करणाऱ्या प्रवृत्ती उफाळूच नयेत, यासाठीचा त्यांचा प्रयत्न असतो, परंतु योग्य वेळी दंडुक्याचाही वापर ते आवर्जून करतात. गेल्याच महिन्यात एका दुकानदारावर हात उगारणाऱ्या एका मंडळाच्या मुजोर कार्यकर्त्यांची घटनास्थळीच धुलाई केली, हे सोलापूरकरांना स्मरत असेलच.
सोलापुरातील एका मदरशात कापण्यासाठी गायी आणल्या होत्या. त्यावेळी गायी खाटकांनाच द्याव्यात यासाठी एक आमदार महाशय प्रयत्नरत होते. तेव्हा न्यायालयीन प्रक्रियेतून गायी सोडविण्यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. (11 डिसें. 2008)
हिंदुत्व चळवळीचे कार्यकर्ते वेगवेगळ्या निमित्ताने त्यांना भेटायला जातात, तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असतो, "बाबारे, तू भगवद्‌गीता वाचलास का? वेद पाहिलेस का? उपनिषदे, जी आपल्याला शक्ती देतात, ते कधी समजून घेतलास का? स्वत: धर्माचरण करणे हे धर्मरक्षणच नाही का?'
खरे आहे त्यांचे. एकांतिक धर्माचे लोक धर्मांतरणासाठी विविध प्रयत्न करीत असतात. जिहादी मानसिकतेतून अनेक देशबाह्य शक्ती पद्धतशीरपणे काम करीत असतात. अशावेळी हिंदुत्वाचे हंगामी प्रेम अंगात संचारलेले तरुण मिरवणुकांच्या वेळी केवळ गुलाल उधळण्यात आणि विशिष्ट ठिकाणी, की जिथे आधीच पोलीस बंदोबस्त असतो, हुल्लडबाजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात; यातून काय साध्य होणार आहे? लक्षावधी रुपयांची वर्गणी गोळा होते, त्यातून भगवद्‌गीता, उपनिषदे लोकांपर्यंत पोचविता येणार नाहीत?दारिद्र्यात पिचलेल्यांना प्रेमाचा हात दिला तर ते धर्मांतराला का बळी पडतील बरे?
भारतीय विचारधारा, संस्कृती सर्वसमावेशक आहे. इतर धर्माप्रति सहिष्णुता हे केवळ हिंदू धर्माचेच वैशिष्ट्य आहे. आमचे पूर्वज खूप महान होते! भारत हा पूर्वी वैभवशाली होता. हे सारे खरे आहे, परंतु असे असूनही आम्ही दीड हजार वर्षे अन्य धर्मींयाच्या पायी का चिरडलो गेलो? असा मूळ प्रश्न ते करतात. आपण कुठे चुकलो, याची चिकित्सा करणारी पुस्तके निर्माण होत नाहीत, ही त्यांची व्यथा आहे. ते सांगतात की, आजवर भारत देशात केवळ दोनच महापुरुष होऊन गेले की, ज्यांनी आपण कुठे चुकलो, याची परखड आणि मूलगामी मीमांसा केली आहे. ते दोन महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर होत. या दोन्ही महापुरुषांचे विचार तरुणांनी अभ्यासून आत्मसात केले पाहिजेत. डॉ. भूषणकुमार यांच्याशी चर्चा केल्यानंतर ध्यानात येते की, त्यांचे समाजाच्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर चिंतन आहे, अभ्यास आहे, काही योजनाही आहेत. ते शासकीय पदावर असल्यामुळे काही विषयांवर बोलण्याला मर्यादा असल्याचे ते मान्यही करतात. त्यांच्या कार्यशैलीबद्दल कमी शब्दांत सांगायचे तर याठिकाणी ऑर्गनायझर या नियतकालिकात मध्यंतरी प्रकाशित झालेल्या बातमीचे उदाहरण देता येईल. उत्तर भारतातील एका राज्यात (बहुधा उत्तराखंड)30 हून अधिक पोलीस ठाणी अशी आहेत की, जिथे गेल्या 5 वर्षांत एकही गुन्हा नोंद झालेला नाही. तेथील समाजात असलेले सामंजस्य महत्त्वाचे आहे. असे सामंजस्य हे केवळ दंडुक्याच्या धाकाने नाही, तर लोकांची मने संस्कारित केल्याने आणि नाठाळांना दंडित करून गुंड प्रवृत्तीला धाकात ठेवल्याने येत असते. हेच आहे मनाचे व्यवस्थापन. भलेही सोलापुरातील घरफोडी आणि इतर गुन्हे शंभर टक्के कमी झाले नसतील... पण तसा प्रामाणिक प्रयत्न आपल्या साऱ्या क्षमता पणाला लावून डॉ. भूषणकुमार यांनी केल्याचे दिसते. त्यांच्या बदलीच्या वृत्ताने या प्रवृत्तीला आनंद झाल्याच्या वार्ताही येत आहेत. असे विचारी, अभ्यासू आणि समर्पित पोलीस अधिकारी आणखी मोठ्या स्थानी पोचले पाहिजेत. पोलीस दलाची ध्येय-धोरणे ठरविणारी चमू जेव्हा अशा अधिकाऱ्यांची असेल, तेव्हा त्याचा दूरगामी आणि सकारात्मक परिणाम होईलच होईल! डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना त्यांच्या उज्ज्वल कारर्कीदीसाठी "तरुण भारत' परिवाराकडून शुभेच्छा!

Tuesday, June 1, 2010

"शांतीदूत' येशूचे बंदूकधारी शिष्य

अरुणाचल प्रदेश हा भारताचा सौभाग्यालंकार आहे. सूर्यनारायणाची चाहूल भारतात पहिल्यांदा याच प्रदेशाला लागते. निसर्गरम्य असलेल्या या प्रदेशावर कपटी चीनचा डोळा आहे. सुमारे 55 हजार चौरस किलोमीटरची भारतभूमी गिळंकृत करूनही चीनची मुजोरी थांबलेली नाही. चीनमधल्या शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांतून अरुणाचल हा चीनचा भूप्रदेश असल्याचे व भारताने बळकवल्याचे शिकविले जाते. चीनच्या कुरापत्या कमी म्हणून की काय ख्रिस्ती मिशनऱ्यांनी गेल्या तीन दशकांपासून अरुणाचलात उच्छाद मांडला आहे.

Wednesday, May 26, 2010

बुद्धं शरणं गच्छामि।

विकासाचा दर वाढतोय. तसं पाहिलं तर महागाई, फुटिरता, दहशत आणि हिंसाही वाढत आहे. हे सारंं विकासाची देणगी असल्याचंही म्हटलं जातं आहे. मनाची समजूत घालण्यासाठी असं विचार करणं ठीक आहे, परंतु ज्या प्रक्रियेचे हे सर्व अनिवार्य परिणाम आहेत, त्याला विकास म्हणता येईल का? याला वित्तवृद्धीतून आलेली समृद्धीही म्हणता येणार नाही.
श्री आणि समृद्धी यांमध्ये साधनसामग्री आणि पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच संपूर्ण समाजाची सुख, शांती व निर्भयताही अंतर्भूत असते, परंतु आज तर समाजाची शकलं उडताना दिसत आहेत. माणूस हा विकासाचा आधार मानला गेला आहे. माणूस हा एकटा राहू शकत नाही, तो तर कुटुंब, समाज आणि राष्ट्राचे नैसर्गिक अंग आहे, याचे विस्मरण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. जोवर मन-वाचा-कर्माने ही भावना विस्तारित होणार नाही, तोवर खरा विकास होणे शक्य नाही! परंतु आज अर्थव्यवस्था असो वा न्यायव्यवस्था, ते समाज आणि कुटुंबव्यवस्था तोडण्याचे काम करीत असल्याचे दिसते. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावावर करण्यात येत असलेल्या तथाकथित सुधारणा या व्यक्तीलाच आतून पोखरून काढत आहेत.
राजकारणात तर स्वार्थासाठी समाजाचे तुकडे-तुकडे करण्यालाच सफलता मानण्यात येऊ लागले आहे. बहुपक्षीय निवडणूकप्रणालीत सर्वाधिक मते मिळवणे म्हणजेच विजयी होणे असल्यामुळे तेथे सर्व काही तोडण्या-फोडण्यावरच आधारलेले असते. 100 च्या लोकसंख्येत समजा आपला गट 20 चा आहे, तर इतरांना इतक्या छोट्या-छोट्या तुकड्यांत विभागून टाका की, 20 वालाच सर्वात मोठा गट राहील. परिणामी करण्यात आलेल्या मतदानापैकी 22 प्रतिशत मते घेऊन आमचे प्रतिनिधी संसदेत जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची धोरणं निर्धारित करतात. यात सुधारणा करणे सहज शक्य आहे. 50 प्रतिशतपेक्षा किमान 1 मत अधिक घेणाराच विजयी असेल, असा नियमच केला पाहिजे. असे झाले तर मग जाती, भाषा आणि अन्य गोष्टींवरून समाज तोडणारे हेच सारे स्वार्थी राजकीय नेते आपल्या विजयासाठी समाज जोडण्याचे काम करू लागतील.
आपली इतिहासाकडे पाहण्याची दृष्टीदेखील याच व्यक्तिवादी दृष्टिकोनाने ग्रासली गेली आहे. यामुळेच आपण आपल्या महापुरुषांचे वर्णन आणि मूल्यमापन दोन्हीही व्यक्तिगत उपलब्धंींच्या आधारेच करतो. भगवान गौतम बुद्ध यांना त्यांच्या त्याग, साधना, बोध आणि करुणा यासाठी स्मरले जाते, परंतु त्यांचा मुख्य विचार तर व्यक्तिकेंद्रित कर्मकांड आणि त्यामुळे समाजात आलेल्या अंध रूढींच्याप्रति विद्रोह होता. त्यांच्याच अनुयायांकडून सर्वाधिक अन्याय जर कोणत्या महापुरुषावर झाला असेल, तर तो बुद्धांवरच होय. ज्या बुद्धाने मूर्तिपूजेच्या अज्ञानाचा जीवनभर विरोध केला, आज मूर्तींच्या बाबतीत सारे विश्व-कीर्तिमान, बुद्ध मूर्तींच्या नावानेच आहेत. साक्षात करुणेची प्रतिमूर्ती भगवान बुद्धांचे अनुयायी त्यांच्या नावावर विद्वेषाचे समाजकारण करताना दिसत आहेत. राज्याचा त्याग करून ज्ञानाची साधना करणाऱ्या बुद्धाच्या नावावर नोटांचा हार घालून सत्तेचे राजकारण सुरू आहे. भगवान बुद्धांचा मुख्य संदेश त्यांच्या मंत्रात सामावला आहे -
बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि।
संघं शरणं गच्छामि।।
हाच चिरंतन विकासाचा मूलमंत्र आहे. माणसाने आपला अहं आणि स्वार्थ ज्ञानाच्या शरणात न्यावा. याचे व्यवस्थारूप माध्यम आहे- संघटनेला शरण जाणं आणि अशा संघटनशक्तीनेच संपूर्ण मानवता धर्माच्या सिद्धांताना शरण जाऊन खऱ्या अर्थाने विकास साधू शकेल. या त्रिसूत्रीय मंत्रावर आधारित गणतंत्र, राजतंत्र आणि समाज निर्माणातूनच मानवी समस्यांचे दूरगामी निदान आणि समाधान शक्य आहे. याच महिन्यात जयंती असलेल्या वि.दा. सावरकर आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनातूनही हाच संदेश ध्वनित होतो.
- सिद्धाराम भै. पाटील
9325306283

Sunday, May 9, 2010

"कसाब' निर्मिती कारखान्याचे काय ?


कसाबला शिक्षा म्हणजे दरोडेखोराच्या पोराला शिक्षा. खरा सूत्रधार तर पाकिस्तान आहे. कसाबला तयार करून, प्रशिक्षित करून आमच्या घरात अराजक माजविण्यासाठी धाडणारा दहशतवादी राक्षस तर पाकिस्तानच आहे. अर्थात कसाबला फासावर लटकवलेच पाहिजे, परंतु पाकिस्तानलाही धडा शिकविला पाहिजे.

अखेर कसाबला फाशीची शिक्षा झाली. एखाद्याने वाईट हेतूने दुसऱ्याचे घर जाळले तर त्या माणसाला शिक्षा होऊ नये. कारण काडीपेटीमुळे आग लागली. काडीपेटीला शिक्षा होणे महत्त्वाचे, अशीच भूमिका कसाबप्रकरणी भारतातील पाकप्रेमी मीडियाने जणु घेतली आहे. पाकिस्तानात 10 हजार "कसाब' मदरशांमधून प्रशिक्षण घेत आहेत, असे वृत्त नुकतेच अमेरिकेहून आल्याचे प्रसिद्ध झाले आहे.
भारतीयांची कत्तल करण्यासाठी अनेक कसाब पाकिस्तान पाठवीत असतानाही पाकप्रेमाने झपाटलेल्या भारतीय मीडियाचे हृदय मात्र भारत-पाक शांतीवार्तेसाठी तीळ-तीळ तुटत आहे. एकपात्री प्रयोग करावा तसे जणु कसाबने एकट्यानेच 26/11 ची योजना आखली आणि ही स्टोरी त्याच्यासोबत सुरू झाली अन्‌ त्याच्यासोबतच संपणार असे वातावरण तयार करण्यात येत आहे. असे करून आपण मूळ प्रश्नाकडेच दुर्लक्ष करीत आहोत किंवा असे करण्याची व्यवस्था भारतविरोधी कारस्थानाला बळी पडून आपली मीडिया आणि स्वार्थी राजकारणी करीत आहेत असे वाटते.
पुढील उदाहरणावरून ही बाब अधिक स्पष्ट होईल. सकाळची वेळ आहे. बंगळूरू महामार्गावर मोठे वडाचे झाड कोसळले आहे. रस्ताच बंद झाल्याने वाहतूक खोळंबली आहे. दोन्ही बाजूंनी 8-10 किलोमीटरपर्यंत वाहने थांबली आहेत. तिथे एकच चर्चा आहे - वारा नाही, पाऊस नाही तरी चांगले झाड कोसळले कसे? दुसऱ्या दिवशी छायाचित्रासहित प्रथम पृष्ठावर वृत्त झळकले आहे. काही दिवसांनी याविषयी एक चार ओळींचे वृत्त आतील पानात प्रसिद्ध झाले आहे. झाडाला खूप दिवसांपूर्वी वाळवी लागली होती, असा अहवाल वनस्पती शास्त्राच्या तज्ज्ञांनी दिल्याचे दुसऱ्या वृत्तात म्हटले आहे.
पहिल्या वृत्ताची खूप चर्चा झाली, पण दुसऱ्या वृत्ताची नाही. असेच असते. "परिणाम' मोठे असतात आणि "कारण' सूक्ष्म. परिणामांची चर्चा खूप होते, कारणांची नाही. कसाबची खूप चर्चा होईल, परंतु कसाब निर्माण झालाच कसा याची चर्चा होत नाही. पाकिस्तानातील ओकारा जिल्ह्यातील फरीदकोट या छोट्या गावातील एक पोर असं कृत्य करण्यास तयार होतंच कसं?
दहा हजार "कसाब' तयार होताहेत, त्यांची प्रेरणा काय?
इस्लाम हा शांततेचा धर्म आहे, असे विचारी लोक म्हणतात, परंतु पाकिस्तानातून भारतात येणारे अतिरेकी त्यांना शिकविलेल्या "इस्लाम'साठीच जीवावर उदार होऊन येतात, हे का समजून घेतले जात नाही. आजारच समजला नाही तर उपचार कसे करणार?
आजार समजला नाही तर स्वत:ला धर्मनिरपेक्षवादी समजणारे, अतिरेक्यांना धर्म नसतो म्हणणारे स्वार्थी राजकारणी अफजल गुरूसारख्या देशद्रोह्याला मुस्लिमांची मते जातील या भयाने फासावर लटकविण्यासाठी घाई करणार नाहीत. कसाबचा फासावर जाण्याचा क्रमांक 30 वा की 50 वा, यावर घोळ घालतील. कसाबची देखभाल करण्यावर 35 कोटी खर्च केल्याची लाजही वाटणार नाही. कसाबला भर चौकात फाशी झाली पाहिजे, असे म्हणत निवडणुकीत मात्र कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांना मतं द्यायला संकोच वाटणार नाही. केवळ चर्चा होत राहील. वृत्तपत्रांची पाने कसाबविषयीच्या वृत्ताने रंगत जातील. चर्चा... 24 तास बातम्या... अन्‌ केवळ शब्दांचे बुडबुडे...
मीडियातली चर्चा वांझ असते. आता येथेच पाहा ना. आयपीएल वरून केवढा हंगामा झाला. क्रिकेटच्या खेळाविषयी असलेल्या भारतीयांच्या वेडेपणाचे शोषण करीत अरबो रुपयांचा काळा धंदा. या धंद्यात सहभागी मोठे राजकीय नेते, उद्योगपती, चित्रपटातील अभिनेते, सट्टेबाज सारेच ग्लॅमर आणि मादक चिअरबालांचे आस्वाद घेत होते. क्रीडा राज्यमंत्री शशी थरूर आणि ललित मोदी यांचा बळी गेल्यानंतर शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे वस्त्रहरण होण्याची पाळी आली तेव्हा चर्चा एकाएकी थांबली. आता कोठे दिसतात का आयपीएल घोटाळ्याच्या बातम्या?
होय काही दिवसांत अफजल गुरूप्रमाणे कसाबही चर्चेतून मागे पडेल. पुन्हा एखादा हल्ला... पुन्हा नवीन कसाब... हे चक्र. हा प्रश्न गेल्या 1200 वर्षांपासून आपल्या देशाला छळत आहे. घौरी-अब्दालीसारख्यांनी हजारोंची कत्तल केली. बाबराने भारतीयांचे श्रद्धाकेंद्र उद्‌ध्वस्त केले. अफजल खानाने तुळजाभवानीवर आघात केला. 1920 साली केरळात मोपल्यांनी केलेल्या नरसंहाराने प्रेते कुजून विहिरी आणि तळ्यांना दुर्गंधी सुटली. मंदिरे चक्काचूर झाली. 1947 साली लाखो भारतीयांना आपल्याच भूमीतून परागंदा व्हावे लागले.
या देशाचे तुकडे पडले. हजारोंची कत्तल झाली. भारताच्याच भूमीवर उगवलेल्या बांगलादेशात गेल्या 60 वर्षांत 25 प्रतिशत असलेले हिंदू 5 प्रतिशतवर आले. संसदेवर हल्ला, अक्षरधामवर हल्ला, संकटमोचन हनुमान मंदिरावर हल्ला, दिल्ली बंगळूरू, पुणे, मुंबई... या प्रश्नाचे वास्तव स्वरूप आणि तो सुटण्याचा व्यावहारिक मार्ग याचे इतिहासाच्या प्रकाशात आम्ही चिंतन केलेच नाही.
दुसऱ्यांच्या धर्माचा, उपासनापद्धतीचा आदर केलाच पाहिजे, नव्हे तीच आपली संस्कृती आहे, परंतु इस्लामचे नाव घेत मानवतेवर घाला घातला जात असेल तर भारताने या स्वयंघोषित इस्लामी धर्मयोद्धयांना अल्लाच्या घरी (यमसदनी नव्हे) पाठविण्याची व्यापक रणनीती आखली पाहिजे. खऱ्या अर्थाने शांतताप्रिय असणाऱ्या मुस्लिमांना बळ दिले पाहिजे. अफजल गुरूसारख्याला फाशी दिल्याने मुसलमान दुखावतील असे येथील राज्यकर्ते समजत असतील तर तो इस्लामचा अपमान आहे. या अपमानाविरुद्ध त्याच त्वेषाने (जसे की पैगंबरांचे व्यंगचित्र काढल्यावरून गुरुवारी धुळ्यात दंगल घडवली गेली.) मुसलमानांनी समोर आले पाहिजे, परंतु हे सारे तेव्हाच वास्तवात येईल जेव्हा दहशतवादाची गटार असलेल्या पाकिस्तानविरोधात आणि आपल्या देशातही जिहादची विषवेल पोसणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलू.
पाकिस्तान जोवर आपली बिघडलेली पोरं प्रशिक्षित आणि शस्त्रसज्ज करून भारतात पाठविणे आणि प्रशिक्षण केंद्रे थांबत नाही तोवर भारताने सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार बंद केले पाहिजेत. चांगलं बोलता येणाऱ्या प्रवक्त्यांना प्रशिक्षण देऊन जागतिक स्तरावर पाकिस्तानला उघडं पाडलं पाहिजे. काश्मिरात आणि भारतात इतरत्र सुरू असलेले हिंसेचे थैमान पाकने कसे सुरू ठेवले आहे, हे योग्यप्रकारे जगासमोर आणले गेले पाहिजे. चित्रपट, मीडिया आणि इतर माध्यमांतून पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणला पाहिजे.
भारत आणि अमेरिकी जनतेसाठी पाकिस्तान धोकादायक कसा आहे हे अमेरिकी जनतेला तेथील माध्यमांतून प्रभावीपणे सांगत राहिले पाहिजे. नकली ओबामांपेक्षा त्या देशातील जनता हा धोका चांगल्यारीतीने समजू शकते. तेथील जनतेचा विरोध सुरू झाला की, व्हाईट हाऊसला धोरण ठरवताना दहादा विचार करावा लागेल.
भारतीय कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती करीत देशविरोधी कारवाया करणाऱ्यांसाठी स्वतंत्र न्याययंत्रणा निर्माण केली पाहिजे. रामदेवबाबा म्हणतात त्याप्रमाणे फाशी झालेल्यांवर दया दाखविण्याचा अधिकार राष्ट्रपतींनाही असता कामा नये.
भारतीय गुप्तचर खात्यात नव्याने प्राण फुंकले पाहिजे. पोलीस दलालाही अतिरेकी विरोधी कारवायांसाठी प्रभावी प्रशिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. अमेरिकी पोलिसांनी टाईम्स चौकातील बॉंबप्रकरणी काही सेकंदांत विमानतळावर पाकी अतिरेक्याला ताब्यात घेतले. कराचीत जाऊन मशिदीतून अतिरेक्याला जेरबंद केले. अमेरिकेकडून भारतीय पोलिसांनी शिकण्यासारखा हा बिंदू आहे.
अतिरेकीविरोधी जाळे भक्कम करण्यासाठी इस्त्राईलची मदतही घेता येईल. हे सर्व करण्याची जबाबदारी अर्थातच आपल्या राज्यकर्त्यांची आहे, परंतु कोणत्याही देशाला जे राज्यकर्ते मिळतात, ते त्या देशात राहणाऱ्या लोकांच्या लायकीनुसारच. म्हणूनच भारतीय लोकांमध्ये पातळ होत असलेली राष्ट्रनिष्ठा आणखी प्रबळ करण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील. अन्यथा लव्ह जिहादला बळी पडून माधुरी गुप्तासारखे महत्त्वाच्या स्थानावरील या देशाचे अधिकारीही भारताचा जन्मजात शत्रू असलेल्या पाकिस्तानला राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित महत्त्वाची माहिती देत राहतील आणि यातून भारतीयांचे मुडदे पडतील. भारतात दर सहा तासाला एक तरुणी लव्ह जिहादला बळी पडत असतानाही आपण डोळ्यांवर "सर्व धर्म समान'ची कातडी पांघरून बसू. "माय नेम इज खान'पासून स्लॅमडॉगमिलेनियर चित्रपटापर्यंत हिंदू तरुणी आणि मुस्लिम तरुणांच्या प्रेमकथा सजतील. याचे कोणाला काहीही वाटणार नाही.
थोडक्यात सांगायचे तर शत्रू विविध रूपाने, विविध माध्यमांतून या देशाचे लचके तोडू पाहतोय. एका कसाबला शिक्षा दिल्याने भारतात सुख-शांती नांदेल असे बिलकुल नाही. कसाबला फाशी म्हणजे "कसाब'च्या केसाला फाशी दिल्यासारखे आहे. पाकिस्तानातील आणि भारतातील "कसाब' निर्माण करणारे कारखाने बंद करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. अन्यथा असे अनेक कसाब पाकिस्तानच्या जिहादी डोक्यातून उगवतच राहतील. कसाबसारख्या देशद्रोह्यांना त्वरित फासावर लटकविण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी ठरवले तर एका दिवसात तसा विशेष नियम बनविता येईल, पण सर्वपक्षीय खासदार तसे करतील? तसे झाले तर ती समस्त भारतविरोधी शक्तींसाठी मृत्यूघंंटाच ठरेल.
www.psiddharam.blogspot.com
9325306283
kasab, islam, 26/11

Wednesday, March 31, 2010

डॉ. बाबासाहेब यांचे विचारधन

ज्या भूमीने व्यास, कपिल, कणाद, गौतम, चार्वाक, महावीर आणि बुद्ध यांच्यासारखे श्रेष्ठ तत्त्ववेत्ते निर्माण केले आणि बोैद्ध धर्मासारखी उदात्त देणगी जगाला दिली, त्या या थोर भूमीचा मी दूत आहे आणि तिचा तो श्रेष्ठ वारसा चालविण्याची जबाबदारी माझ्यावर आहे। मी महाराष्ट्रीय नाही किंवा महारही नाही. मी भारतीय आहे आणि माझ्या या जन्मभूमीचे पांग फेडण्यातच माझ्या जीवनाचे सार्थक आहे.

ब्राह्मणांशी माझे काही वैर नाही। माझा विरोध दुसऱ्यांना हीन समजण्याच्या द्‌ुष्प्रवृत्तीला आहे. भेदभाव मानणाऱ्या ब्राह्मणेतरांपेक्षा नि:पक्ष वृत्तीचे ब्राह्मण मला अधिक जवळचे वाटतात. आपल्या आंदोलनात सहकार्य देणाऱ्या अशा ब्राह्मणांना मी दूर लोटू शकत नाही.

आज जरी आम्ही राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या गटांत विभागले गेलो तरी मला खात्री आहे की, अनेक जाती-पंथ असूनदेखील आम्ही "एक राष्ट्र' म्हणून उभे राहू। एक दिवस असाही येईल की, फाळणीची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगला पण "अखंड हिंदस्थान'च आपल्या हिताचा वाटू लागेल.

माझे सामाजिक तत्त्वज्ञान हे निश्चितपणे तीन शब्दांत गुंफले जाण्याचा संभव आहे। ते शब्द म्हणजे स्वातंत्र्य, समता व बंधुभाव. तथापि, हे माझे तत्त्वज्ञान फें्रच राज्यक्रांतीपासून मी उसने घेतले असे कोणीही समजू नये. माझ्या तत्त्वज्ञानाची मुळे धर्मात आहेत, राज्यशास्त्रात नाहीत. माझा गुरू बुद्ध, याच्या शिकवणुकीपासून ते मी काढले आहे.

जगण्याचे अनेक मार्ग आहेत, पण ते सारेच सारख्या मान्यतेचे आहेत असे नाही। शत्रू आला असता, त्यावर चाल करून त्याचा पाडाव करणे हा जगण्याचा एक मार्ग आहे. तसेच त्याला शरण जाऊन तो घालील त्या अटींवर जगणे हा जगण्याचा दुसरा मार्ग आहे. दोहोंपैकी कोणत्याही मार्गाने गेले असता जगणे होतेच, पण एका परीचे जगणे हे दुसऱ्या परीच्या जगण्यापेक्षा फार निराळ्या तऱ्हेचे असते. एक मानवाचे जिणे आहे, तर दुसरे किड्याचे जिणे आहे.

देशाच्या राज्यकारभारात प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्षरीतीने भाग घेऊन तो आपल्या ध्येयास अनुकूल बनविल्याशिवाय कोणत्याही गांजलेल्या वर्गास आपली दु:खे दूर करता येणार नाहीत। दुसरा कोणी आपल्या हिताकरिता काही करील, या आशेवर जर गांजलेला व पिळला गेलेला वर्ग विसंबून राहील, तर तो तोंडघशी पडल्याशिवाय राहणार नाही.

आपल्याला ज्या मार्गाने जावयाचे आहे, तो मार्ग चिरस्थायी असावा। जो मार्ग अराजकतेकडे जातो, जो जंगलाकडे नेतो, असा मार्ग अनुसरण्यात काही अर्थ नसतो. जो मार्ग आपणास आपल्या इसिप्त ध्येयाप्रद सुरक्षित पोचवितो, जो आपले जीवन बदलवितो, असा मार्ग कितीही लांबचा असला तरी तो जवळच्या मार्गापेक्षा निश्चितच श्रेयस्कर असतो.

कार्ल मार्क्स अगर कम्युनिस्ट-कम्युनिझमचे ध्येय साध्य करण्याकरिता म्हणजेच गरिबी निवारण्यासाठी, खाजगी मालमत्ता नष्ट करण्यासाठी विरोधकांची हत्या करणे, त्यांना ठार मारणे हे साधन वापरू इच्छितात आणि येथेच बुद्धिझम आणि कम्युनिझममधील मूलभूत फरक आहे। भगवान बुद्धाचे मार्ग लोकांना हिंसेपासून परावृत्त करण्याचे, युक्तिवादाने पटवून देण्याचे, नैतिक शिकवण देण्याचे व ममतेचे आहेत. कम्युनिस्ट पद्धती ही पाशवी शक्तीवर आधारलेली आहे. कम्युनिस्ट पद्धती रशियन लोकांनी राजीखुषीने स्वीकारलेली नाही. त्यांनी ती भीतीमुळे स्वीकारलेली आहे. यादृष्टीने पाहिले तर बुद्धिझम शुद्ध लोकशाहीवादी आहे. अभ्यासू वृत्तीने बुद्धिझम व कम्युनिझमचा दीर्घकाळ अभ्यास करून मी या ठाम निर्णयास आलो आहे की, मनुष्यमात्राचे दु:ख निवारण्यासाठी जो बुद्धाने उपदेश केला आहे व जी पद्धती सांगितली आहे, ती अतिशय सुरक्षित व पक्की आहे.

शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे प्रत्यक्ष कारण जमिनीची लहान-लहान तुकड्यांनी होणारी विभागणी हे असून, त्यामुळे तिथे हे भांडवल गुंतवण्यास व सुधारलेल्या पद्धतीने शेती करण्यास वाव मिळत नाही। जमिनीचे तुकडे व त्यामुळे शेतकरीवर्गात वावरणारे दारिद्र्य याचे मुख्य कारण म्हणजे वाढत्या लोकसंख्येला केवळ जमिनीवरच अवलंबून राहावे लागते हे होय आणि जमिनीवर अवलंबून राहणाऱ्या जादा लोकसंख्येच्या पोषणाची शेतीव्यतिरिक्त इतर व्यवसायात तजवीज लावल्यावाचून शेतकऱ्यांचे दारिद्र्य हटणार नाही. म्हणून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व त्यांची उत्पादनशक्ती वाढविण्यासाठी उद्योगधंद्यांची वाढ करणे हे मुख्य साधन आहे. चालू उद्योगधंद्यांचे पुनरुज्जीवन आणि कच्च्या मालाच्या अनुरोधाने नव्या उद्योगांची निर्मिती या दोन्हींची आवश्यकता आहे.

हिंदी मुसलमानदेखील एक अजब चीज आहे। सर्व सामाजिक सुधारणेचे त्याला वावडे आहे. हिंदुस्थानाबाहेरील त्याचे धर्मबंधू समाजक्रांतीवादी बनले आहेत. राष्ट्राच्या व मानवी जीवनाच्या सामाजिक प्रगतीला अडथळा करणाऱ्या सर्व चालीरीतींचा मुस्ताफा केमाल पाशासारख्या मुसलमान देशभक्ताने धुव्वा उडवून दिला आहे, पण हिंदी मुसलमानांना मौ. शौकतअल्लीसारख्या देशभक्त व राष्ट्रीय हिंदी मुसलमानांनादेखील केमालपाशा व अमानुल्ला आवडत नाहीत. कारण ते सुधारक आहेत आणि हिंदी मुसलमानांच्या धार्मिक दृष्टीला सुधारणा हे तर महत्पाप वाटते.

पाश्चिमात्य राष्ट्रे पौर्वात्य राष्ट्रांकडे चढेल दृष्टीने पाहतात, ह्याचे कारण त्यांचे आर्थिक नि औद्योगिक बळ हेच होय. यास्तव माझे असे मत आहे की, भारताची जेव्हा आर्थिक नि औद्योगिक शक्ती वाढेल, तेव्हा साम्राज्यवाद नि काळ्या-गोऱ्यांचे वाद हे मिटतील.
माझी दैवते तीन आहेत। पहिले दैवत विद्या होय. विद्येशिवाय माणसाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. दुसरे दैवत विनय होय. मी कोणाची याचना केली नाही. माझे ध्येय असे आहे की, माझं पोट भरलं पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवा केली पाहिजे. माझे तिसरे दैवत म्हणजे शील होय. माझ्या आयुष्यात मी दगाबाजी, फसवणूक, आत्मसिद्धीकरिता पाप केलंं असं मला आठवत नाही. शीलसंवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे, हे सांगायला मला फार अभिमान वाटतो.

प्रस्तुतच्या लेखकाने समाजकार्याप्रीत्यर्थ जेवढा स्वार्थत्याग करणे त्यास शक्य होते, तेवढा स्वार्थत्याग त्याने केला। तो काही संस्थानिक नाही की जहागीरदारही नाही. काही झाले तरी द्रव्यानुकूलता नसता इंग्रज सरकारने देऊ केलेली दरमहा अडीच हजार रुपयापर्यंत वाढू शकणारी नोकरी त्याने नको म्हणून सांगितली. वकिलीसारख्या स्पृश्य लोकांवर अवलंबून असणाऱ्या धंद्यात विशेष किफायत मिळण्याची आशा नसताही केवळ समाजकार्य करण्यास मोकळीक असावी म्हणून त्याने तो मार्ग पत्करला आहे. रूढ धर्माचारातील आणि लोकाचारातील दोषांचे निर्भयपणे आविष्करण करण्याचे भयंकर कार्य हाती घेतले असल्यामुळे, देशाभिमानी व धर्माभिमानी म्हणविणाऱ्या पत्रांकडून होत असलेला शिव्यांचा व शापांचा भडिमार तो एकसारखा सोशित आहे. कवडीचा फायदा नसताना त्याने एक वर्षाच्या आत "बहिष्कृत भारता'चे बऱ्यावाईट रीतीने रकाने भरून काढून लोकजागृतीचे काम केेले व ते करताना त्याने आपल्या प्रकृतीकडे, सुखाकडे, चैनीकडे व ऐषारामाकडे न पाहता डोळ्यांच्या वाती केल्या.

मी प्रथम भारतीय आहे. मी तापट आहे. सत्ताधारी लोकांशी माझे अनेक खटके उडाले, राजकीय संघर्ष झाला, पण हे आमचे कौटुंबिक भांडण आहे. म्हणून मी परदेशात भारताबद्दल कडवट बोलणार नाही. देशहित प्रथम. मी माझ्या देशाशी कधीही द्रोह करणार नाही.
अस्पृश्यता ही मूर्तिमंत असमानता आहे। एवढी मोठी असमानतेची जागती ज्योत कोठेच दिसावयाची नाही. एका माणसाला दुसऱ्या माणसाने त्याला न शिवण्याइतका पतित लेखण्याची प्रथा हिंदू धर्माखेरीज व हिंदू समाजाखेरीज कोठेही सापडेल काय? ज्याच्या स्पर्शाने पाणी बाटते, ज्याच्या स्पर्शाने देव बाटतो, तो प्राणी मानवाच्या कोटीत गेला आहे असे कोणी म्हणेल काय? एवढा कलंक तुमच्या शब्दाला, तुमच्या शरीराला आहे.

धर्माची आवश्यकता गरिबांना आहे। पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे. गरीब मनुष्य जगतो तो आशेवर. जीवनाचे मूळ आशेत आहे. ही आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल? धर्म आशावादी बनवितो व पीडितांना, गरिबांना संदेश देतो- "काही घाबरू नकोस, जीवन आशावादी होईल.

ब्रिटिशसत्ता स्थिरावल्यापासून भारतात गेल्या शतकात एकंदर एकतीस दुष्काळ पडले व त्यात सुमारे अडीच ते तीन कोटी लोक भुकेने मेले. याचे कारण असे की, आपल्या देशात उद्योगधंदे व व्यापार यांची वाढ होऊ द्यायची नाही व हिंदुस्थानातील व्यापारी पेठा सदैव खुली राहावी, असे ब्रिटिश राज्यकारभाराचे बुद्धिपुरस्सर धोरण आहे. ब्रिटिशांनी सुधारलेली विधिपद्धती आणि सुव्यवस्था ह्यांची देणगी हिंदुस्थानास दिली ही गोष्ट खरी. तथापि मनुष्य केवळ विधीवर आणि सुव्यवस्थेवर जगत नाही, तर तो अन्नावरही जगतो.
तरुणांची धर्मविरोधी प्रवृत्ती पाहून मला दु:ख होते। काही लोक म्हणतात, धर्म ही अफूची गोळी आहे, परंतु ते खरे नाही. माझ्या ठायी जे चांगले गुण वसत आहेत, ते किंवा माझ्या शिक्षणामुळे, समाजाचे जे काही हित झाले असेल ते माझ्यासाठी असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय. मला धर्म हवा आहे. धर्माच्या नावाने चाललेला ढोंगीपणा नको.

राजकारण कोणास करावयाचे असेल, तर राजकारणाचा चांगला अभ्यास केला पाहिजे। आपल्या समाजातील प्रत्येक कार्यकत्यार्ंने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक या सर्व प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. ज्यांना पुढारी व्हायचे असेल, त्यांनी पुढाऱ्यांची कर्तव्यकर्मे व जबाबदारी काय आहे, याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे.

सत्तेचे राजकारण खेळण्यासाठी किंवा एखाद्या मंत्र्याची जागा रिकामी झाली असता ती आपणाकडे ओढून घेण्याची प्रधानमंडळातील सभासदात जी जिवापाड धडपड चालू होई, त्यापासून मी पूर्णपणे अलिप्त राहत असे। मूकावस्थेत राहून सेवा करणे हेच श्रेष्ठ कर्तव्य होय, असा माझा विश्वास आहे.

मार्क्स वाचून काही कामगार पुढारी असे गृहीत धरतात की, भारतात मालक आणि नोकर असे केवळ दोनच वर्ग आहेत आणि भांडवलशाही नष्ट करण्याची आपली मोहीम ते सुरू करतात। या दृष्टीत दोन ढोबळ चुका आहेत. जी बाब संभवनीय आहे किंवा आदर्श आहे, तिला वास्तविक म्हणण्याची पहिली चूक ते करतात. सर्व समाजातील माणसे अर्थ प्रवृत्तीचे, बुद्धिवादी किंवा न्यायप्रिय आसतात, हे म्हणणे जसे खोटे, तसेच सर्व समाजात केवळ दोनच वर्ग असतात, असे समजणेही खोटे आहे. भारतात असे सापेक्षपणे निश्चित असे दोन वर्ग अस्तित्वात नाहीत.

हिंसेच्या शक्तीला शरण जाऊन मिळविलेली शांतता ही खरी शांतता नव्हे, ती आत्महत्या होय। तसे करणे म्हणजे सुखी, सुंदर आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन जगण्यासाठी जे काही उदात्त आणि आवश्यक असते, त्याची होळी करून रानटीपणाला व अनाचारीपणाला शरण जाण्यासारखे आहे.

मला बोैद्धधर्म आवडतो, कारण कुठल्याही धर्मात जी तीन तत्त्वे सापडत नाहीत, ती बौद्धधर्मातच सापडतात. बौद्धधर्म मला प्रज्ञा शिकवतो. तो मला अंधश्रद्धा नि अद्‌भुतता शिकवीत नाही. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तीन तत्त्वे शिकवतो. देव किंवा आत्मा समाजाचा उद्धार करू शकत नाही. मार्क्सवाद आणि साम्यवाद यांनी जगाचे सर्व धर्म हादरून टाकले आहेत. बुद्ध हाच कार्ल मार्क्सला पूर्ण उत्तर आहे. रशियन साम्यवादाचा उद्देश रक्तरंजित क्रांती घडवून आणणे हा आहे. बुद्धप्रणित साम्यवाद हा रक्तहीन क्रांती घडवून आणतो.

Wednesday, March 3, 2010

सावरकर पुण्यतिथीनिमित्त

सोलापूर बार असोशिएशनच्या वतीने सावरकर पुण्यतिथीनिमित्त जिल्हा न्यायालयाच्या आवारातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात... तरुण भारतचे उपसंपादक सिद्धाराम भै। पाटील। व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश डी। एन। आदमने व बार असो।चे अध्यक्ष ऍड। डी। जी। चिवरी आदी मान्यवर उपस्थित होते। 2 march 10 , 2 pm

Tuesday, March 2, 2010

सावरकर पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान



विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्याची शक्ती
सावरकरांच्या विचारात - सिद्धाराम पाटील

सोलापूर : सामरिक आणि अन्य सामाजिक विषयांवरील सावरकरांचे विचार भारताला शक्ती देणारे आहेत. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्याचे सामर्थ्यही सावरकरांच्या विचारात आहे, असे विचार तरुण भारतचे उपसंपादक सिद्धाराम भै. पाटील यांनी व्यक्त केेले.

Monday, February 15, 2010

शेर सिवराज है

इन्द्र जिमि जंभपर ,
वाडव सुअंभपर
रावन सदंभपर ,
रघुकुल राज है 1
पौन बरिबाहपर ,
संभु रतिनाहपर
ज्यो सहसबाहपर ,
राम द्विजराज है 2
दावा द्रुमदंडपर ,
चीता मृगझुंडपर
भूषण वितुण्डपर ,
जैसे मृगराज है 3
तेजतम अंसपर ,
कन्हजिमि कंसपर
तो म्लेंच्छ बंसपर ,
शेर सिवराज है ४

Indra jimi jambha par,badav su-ambha par,ravana sadambha par raghu-kul-raj hai;paun baribaha par,Sambhu rati-nath par,jyaun sahasrabahu par ram dwijaraj hai;dava drum-danda par,cheeta mrig-jhunda par,bhusan vitunda par jaise mrigraj hai;tej tam ansa par,kanha jimi kansa par,tyon malechchha-vansha par Sher Shivaraj hai!!!-

Meaning :Like Indra on demons,like lord of the raghus on boastful ravana,like vamana on bali,like lord Siva on rati's husband,and like parasurama, the lord of brahmana-s, on sahasrabahu,like fire acts upon woods,and a Cheetha on a herd of deers ,like lion on hogs,says Bhusana, like a ray of light upon darkness,or like boy Krishna upon kansa,like that, upon the clan of mlechchha's, has descended king Shivaji ,the Tiger।


Bhushan's verse has immense historical value because the Kashi Vishwanath temple was razed in 1669 and thus lost its splendour, and the Krishna Janmabhoomi temple was destroyed and converted into a mosque in 1670. Bhushan came to Shivaji's kingdom from the Mughal capital in 1671, and within two years composed Shiv Bhooshan, a biography of Shivaji. It clearly states that Shivaji wanted to set up a Hindu Pad Padshahi.

शिवाजी न होते...



राखी हिन्दुवानी, हिन्दुवनको तिलक राख्यो
अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं

आपल्या तलावारीने हिंदुत्वाचे संरक्षण केले.हिन्दुंचा तिलक राखला आहे. श्रुति, स्मृति व पुराणातील आचारधर्माचे संरक्षण केले.

राखी रजपुती , रजधानी राखी राजन की
धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं

राजपुतांचा क्षात्र धर्म व राजांच्या राजधान्यांना आपणच स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. पृथ्वीवर धर्म आपणच राखला आहे. गुणिजनांमधील श्रेष्ठ गुणांचे अस्तित्व आपल्यामुळेच राहिले आहे.

भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की
देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं

आपण महाराष्ट्राची महानता वाढवली आहे व महाराष्ट्राला श्रेष्ठता प्राप्त करून दिली आहे. आपली किर्ती दिगंतात पसरलेली आहे.

साही के सपूत , सिवराज समशेर तेरी
दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं
हे! शहाजींचे वीर पुत्र शिवाजी महाराज! आपल्या दिव्या तलवारीने दिल्लीपतीच्या सेनेचा पराभव करून, जगात हिंदुंच्या मान मर्यादांचे संरक्षण केले आहे.

वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत
रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं
वेदांचे आणि पुराणांचे सामर्थ्य आपल्यामुळेच टिकून राहिले आहे. आपल्यामुळेच भाविकांच्या जिभेवर रामनाम अस्तित्व शिल्लक आहे.

हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की
कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं

हिंदुंच्या पवित्र शिखेला व सैनिकांच्या भाकरीला आपल्यामुळेच संरक्षण मिळाले आहे. यज्ञोपवितांना व पवित्र जपमाळांना आपण वाचाविले आहे.

मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह
बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं

मोगलांच्या सामंतांचाच नव्हे, तर बादशाहचाही आपण धुव्वा उडविलात. निग्रहानुग्रहाचे सामर्थ्य आपण प्रकट केले आहे. देवळातील देव व घरामधील धर्म केवळ आपल्यामुळेच शिल्लक राहिला आहे.
राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज
देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं

सभोवाताली सर्व यवनांचे कार्य अक्षुण्णपणे चालू असता व यवन सैनिकांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला असता, राजे महाराजे भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते.
देवल गिराविते , फिराविते निसान अली
ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी
गौर गणपती आप , औरनको देत ताप
आपनी ही बार सब , मारी गये दबकी

थोडेसे पुजविधन चुकले तर भक्तांनाच ताप देणाय्रा देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून ते लपून बसले होते.

पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत
सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की
सिद्धांची सिद्धि समाप्त होवून जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते.
कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती
सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी

अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर काशी कलाहीन झाली असती,मथुरेला मशीद उभा राहीली असती अणि हिन्दुंची सुन्ता झाली असती.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी