Wednesday, June 29, 2022

ऋषी बंकिमचंद्र चरित्र ग्रंथाचे सुनील देवधर यांच्या हस्ते प्रकाशन

बंकिमचंद्रांनी वंदे मातरम् मंत्र दिला, त्यातूनच स्वातंत्र्याची उर्मी जागली

‘ऋषी बंकिमचंद्र' ग्रंथाचे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटर येथे प्रकाशन करताना जटायु अक्षरसेवा प्रकाशन संस्थेचे संतोष जाधव, डेक्कन एज्युकेश सोसायटीचे धनंजय कुलकर्णी, वक्ते सुनील देवधर, लेखक मिलिंद सबनीस आणि प्रकृती केअरचे डॉ. ज्ञानोबा मुंडे.


पुणे | कृतज्ञता हा भारताचा स्थायीभाव आहे. कुटुंबातील आई ही कृतज्ञतेचे मूर्तीमंत रूप आहे. ऋषी बंकिमचंद्र यांनी भारत देशाला मातेच्या, आदिशक्तीच्या रूपात पाहिले. ‘वंदे मातरम्‌‍' हा मंत्र दिला. या महामंत्रातूनच स्वातंत्र्याची उर्मी जागली. वंदे मातरम् हा वंगभंग आंदोलनाचा आत्मा होता. यातूनच लाल, बाल आणि पाल यांचे नेतृत्व पुढे आले. बंकिमचंद्रांचे चरित्र प्रेरक आणि स्फूर्तीदायी असल्याने ते घराघरात पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन ईशान्य भारतातील नेते व अभ्यासक सुनील देवधर यांनी केले.

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ऐतिहासिक अॅम्फी थिएटरमध्ये जटायु अक्षरसेवा प्रकाशन संस्थेने आयोजित केलेल्या ऋषी बंकिमचंद्र या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे धनंजय कुलकर्णी, प्रकृती केअर फाउंडेशनचे डाॅ. ज्ञानोबा मुंडे जटायुचे संतोष जाधव आणि वंदे मातरम््चे अभ्यासक व ग्रंथाचे लेखक मिलिंद सबनीय यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि बंकिमचंद्र जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी देवधर म्हणाले, आपल्या पूर्वजांनी शाश्वत विचारांची मांडणी केली आहे. या विचारांना आचरणात आणणाऱ्या समाजाची आज आवश्यकता आहे. राष्ट्रीय विचारांची प्रभावी मांडणी होण्यासाठी तरुणांनी सोशल मीडिया योद्धा बनण्याची गरज आहे. हिंदूंचे सैनिकीकरण झाले पाहिजे, यासाठी शस्त्र म्हणून कायद्याचे प्राथमिक ज्ञान करून घ्या, माहिती अधिकार कायदा जाणून घ्या. 

लेखक मिलिंद सबनीस यांनी ग्रंथलेखनामागील भूमिका सांगितली. संतोष जाधव यांनी प्रास्ताविक तर डॉ. रवींद्र मिणियार यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन सिद्धाराम पाटील तर आभार अश्विनी चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता हिमानी नांदे यांनी गायलेल्या वंदेमातरम्‌‍ने झाली.

पवारांना पगडीचा राग येतो म्हणून पगडी घालूनच बोलणार

प्रारंभी देवधर यांचा बह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी हा ग्रंथ आणि पुणेरी पगडी देऊन सत्कार झाला. हा धागा पकडून देवधर म्हणाले, शरद पवार यांना पुणेरी पगडी पाहिली की राग येतो, असे ऐकिवात आहे. ते समाज तोडणारे नेते आहेत. त्यांना खूप राग यावा म्हणून मी पूर्णवेळ पगडी घालूनच बोलणार आहे, असे सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 

पुस्तकाचे नाव - ऋषी बंकिमचंद्र
लेखक - मिलिंद सबनीस
प्रकाशक - जटायु अक्षरसेवा
मूल्य - ५९९
सवलतीत - ४९९ (टपाल खर्चासह)

पुस्तक मागवण्यासाठी jataau.com/shop/rishi-bankim

9767284038 व्हाटस् अॅप क्रमांकावर संपर्क करूनही पुस्तक मागवू शकता.

Tuesday, May 10, 2022

ओळख वंदे मातरम् रचेत्या ऋषी लेखकाच्या चरित्राची / ऋषी बंकिमचंद्र

 

ऋषी बंकिमचंद्र
पाच पिढ्या लोटल्या. बंकिमचंद्रांबद्दल दोन ओळींचीच माहिती पुढे आली. वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले. आनंदमठ या ऐतिहासिक कादंबरीतील हे गीत आहे.. या त्या दोन ओळी. गेल्या 128 वर्षांत मराठी भाषेत एकही चरित्र ग्रंथ प्रकाशित झाला नाही.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आत्मा - वंदे मातरम्च्या रचेत्याचे प्रेरक चरित्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित करायचे जटायु अक्षरसेवाने ठरवले. ऋषी बंकिमचंद्र या नावाने ते प्रकाशित होत आहे. वंदे मातरम् आणि बंकिमचंद्र यांच्यावर दोन तपाहून अधिक काळ अभ्यास करणारे तपस्वी लेखक मिलिंद सबनीस यांच्या सिद्धहस्त लेखणीतून हे चरित्रग्रंथ साकार झाले आहे. या चरित्रग्रंथाची ओळख करून देणारा लेख येथे सादर आहे.


ग्रंथाचे नाव    : ऋषी बंकिमचंद्र
लेखक    : मिलिंद सबनीस
प्रकाशक     : जटायु अक्षरसेवा
पृष्ठे    : सुमारे 240
मूल्य    : 599/-
सवलत मूल्यात घरपोच मागवा    : 499/-
संपर्क    : 9767284038
UPI    : jataa108@uboi


एका अलौकिक स्फुरणाचे स्मरण


सुमारे बाराशे वर्षांच्या चिवट संघर्षानंतर भारतीय स्वातंत्र्यवीरांनी प्राप्त केलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2022 रोजी आपण साजरा करत आहोत. यानिमित्ताने त्या हजार-बाराशे वर्षांमध्ये भारताच्या राष्ट्रीय स्वाभिमानाची ज्योत प्रखरतेने तेवत ठेवण्यासाठी आपल्या सर्वस्वाचे समर्पण करणार्‍या हजारो वीरांचे, योद्ध्यांचे कृतज्ञतापूर्वक पुण्यस्मरण करणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. या कर्तव्याच्या अनुषंगाने ‘जटायु अक्षरसेवा’ या प्रकाशन संस्थेतर्फे ज्येष्ठ लेखक, अभ्यासक मिलिंद सबनीस यांनी लिहिलेले वंदे मातरमचे उद्गाते, आनंदमठकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे चरित्र प्रकाशित केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला केलेले हे अनोखे अभिवादन आहे, असे म्हटले पाहिजे. याबद्दल  या चरित्रग्रंथाच्या निर्मितीत पुढाकार घेतलेले सिद्धाराम पाटील आणि मिलिंद सबनीस यांचे हार्दिक अभिनंदन.

या उपक्रमाला अनोखे अभिवादन म्हणण्याची अनेक कारणे आहेत. 
सर्वात पहिले म्हणजे बंकिमचंद्र यांचे मराठीत प्रसिद्ध होत असलेले हे पहिलेच चरित्र आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे या पुस्तकाच्या शीर्षकाद्वारे बंकिमचंद्रांना लेखकाने सहर्ष आणि साभिमान प्रदान केलेली ‘ऋषी’ ही श्रेष्ठ उपाधी! बंकिमचंद्रांना राष्ट्र निर्माता आणि ऋषी या दोन विशेषणांनी गौरव केला तो महर्षी अरविंद यांनी! त्यासंदर्भात योगी अरविंदांनी ऋषी या संज्ञेची केलेली मीमांसा सबनीस यांनी आवर्जून या पुस्तकात नमूद केली आहे. अनोखेपणाचे तिसरे आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अर्थातच या पुस्तकातील मांडणीचा आशय आणि त्याद्वारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या देखण्या चरित्राचे उलगडलेले विविध विलोभनीय पैलू!

वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी अत्यंत प्रत्ययकारी कविता लिहिणार्‍या शालेय वयातील बंकिमचे साहित्यगुण त्यांचे गुरू, ज्येष्ठ साहित्यिक आणि संपादक ईश्वरचंद्र गुप्त यांनी ओळखले आणि त्यांनीच त्याला पद्याबरोबरच गद्य लेखनही सुरू कर, असा सल्ला दिला. गुरूच्या संदेशाशी बंकिमचंद्रांच्या लेखणीने पूर्ण इमान राखले. इतके की, ‘आधुनिक कादंबरीचे जनक’ असे अजरामर स्थानच तिने बंकिमचंद्रांना प्राप्त करून दिले. कादंबरी शिवाय कथा, विनोदी लेख, विज्ञान, टीकात्मक लेख, निबंध, ललित लेख असे गद्य वाङ्मयाचे जवळजवळ सर्व प्रकार बंकिमचंद्र यांनी अत्यंत प्रभावीपणे हाताळले. दोन पृष्ठांच्या निबंधापासून ते 434 पृष्ठांच्या महाकादंबरीपर्यंत विविध आकाराच्या विस्ताराचे त्यांचे लेखन तितकेच प्रभावी आणि प्रत्ययकारी असे. ‘बंगदर्शन’सारखे साहित्यिक नियतकालिक अत्यंत समृद्ध स्वरूपात सादर करून त्यांनी आपले संपादकीय नैपुण्यही अधोरेखित केले.

सामान्यतः कथा, कादंबरी, ललितलेख यासारखे साहित्य रंजनप्रधान आणि लोकप्रियतेचा अनुनय करणारे आढळते. मात्र बंकिमचंद्र यांच्या कादंबर्‍या विविध साहित्य रसांचा उत्तम परिपोष करतात आणि त्याचबरोबर प्रबोधन, सामाजिकता आणि राष्ट्रीयता यांचे जागरण, पराक्रम-वीरता यांचे संवर्धन, धर्माचा आधुनिक विचार-प्रसार तसेच जेत्यांनी लिहिलेल्या भ्रामक इतिहासाचा पर्दाफाश... यासारख्या राष्ट्रप्रेमी सामाजिकतेचेही संवर्धन करतात.

दुर्गेश नंदिनी या पहिल्या कादंबरीपासून कपालकुंडला, मृणालिनी, विषवृक्ष आदी सर्व कादंबर्‍यांचे अत्यंत धावते परंतु समर्पक रसग्रहण करीत मिलिंद सबनीस यांनी बंकिमचंद्र यांच्या लेखणीचे हे विशेष सोदाहरण उलगडून दाखवले आहेत. आर्य चाणक्याने जागवलेल्या एकराष्ट्रीयतेच्या प्रेरणेशी साधर्म्य दर्शवणारे, जवळीक साधणारे लेखन बंकिमदांनी केले असल्याचे अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण मिलिंद सबनीस यांनी नोंदवले आहे.

बंकिमचंद्रांनी इंग्रजी प्रशासनाची चाकरी पत्करली हे खरे; परंतु आपल्या देशभक्ती आणि राष्ट्रभावना तसेच तिचा आपल्या साहित्यातून प्रसार यांच्याआड ती नोकरी येऊ दिली नाही. तसेच नोकरीच्या माध्यमातून आलेली न्यायदानाची जबाबदारी निष्ठेने पार पाडताना ब्रिटीश अधिकार्‍यांना दंड, शिक्षा फर्मावतानाही कोणत्याही दडपणाचा दबाव बाळगला नाही. यामुळे अधिकार्‍यांची नाराजी त्यांना पत्करावी लागली. परंतु त्यांच्या कठोर कर्तव्यदक्ष कारभारामुळे आणि प्रतिमेमुळे त्यांच्या नोकरीवर शासनाकडून कधीच गदा आली नाही. सतत बदल्यांच्या रूपाने काही प्रमाणात त्याची शिक्षा त्यांना अनुभवावी लागली. पण तीही त्यांनी विनातक्रार सहन केली. मात्र आपला न्यायनिष्ठेचा बाणा त्यांनी सोडला नाही. त्यांच्या या समतोलाचेही उत्कृष्ट वर्णन मिलिंद सबनीस यांनी केले आहे.

उपासकाच्या रूपात बंकिमचंद्र हे विष्णूभक्त-वैष्णव होते. परंतु विष्णूची आराधना करतानाही त्यांनी दुष्टांचे निर्दालन आणि पृथ्वीच्या उद्धारासाठी कर्मयोगाचा संदेश देणार्‍या विष्णू रूपाचाच पुरस्कार आपल्या साहित्यातून केला. ‘आनंदमठ’मधील संन्यासी संतान (संथाळ) वैष्णवधर्मीच आहेत. या संतांनांच्या उठावाचे नेतृत्व करणारे वृद्ध संन्यासी सत्यानंद यांच्या तोंडी बंकिमदांनी अर्थपूर्ण वक्तव्याद्वारे वैष्णव धर्माचे उत्तम विश्लेषण मांडले आहे. स्वामी सत्यानंद म्हणतात, “खर्‍या वैष्णव धर्माचे लक्षण म्हणजे दुष्टांचे निर्दालन आणि या धरणीमातेचा उद्धार! कारण जगाचा पालनकर्ता विष्णू आहे. त्याने दहा अवतार घेऊन या जगाचा उद्धार केला. केसरी, हिरण्यकश्यपू, मधुकैटभ इत्यादी दैत्यांचा नाश त्यानेच केला. रावण, कंस आदी राक्षसांना त्यांनीच मारले. तोच जेता आणि पृथ्वीचा उद्धारकर्ता आणि तोच आहे संतानांचे इष्टदेवता... संतानांचा विष्णू केवळ शक्तीरूपी आहे...”

‘आनंदमठ’च्या माध्यमातून बंकिमदांनी एका बाजूने शक्तीच्या उपासनेचा आणि त्या शक्तीच्या अधिष्ठानावर इंग्रजांचे वर्चस्व झुगारून देणार्‍या चळवळीची प्रेरणा जागविली, तर दुसर्‍या बाजूने त्या चळवळीला सात्विक सामर्थ्य प्रदान करणारा ‘वंदे मातरम्’ हा पंचाक्षरी मंत्र उजागर केला. स्वाभाविकपणे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या चरित्रकथेचा सर्वात मोठा भाग ‘वंदे मातरम्’ने व्यापला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीची सारी इमारतच मुळी वंदे मातरमच्या भक्कम पायावर उभी राहिली आणि यशस्वी फलनिष्पत्तीकडे गेली.

वंदे मातरम् या गीताने काय काय आणि कोणा कोणाला प्रेरित केले याची सूची फार मोठी आहे. राष्ट्रयोगी महर्षी अरविंद, गुरूदेव रवींद्रनाथ टागोर, भगिनी निवेदिता, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अनेकानेक क्रांतीकारक यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत वंदे मातरमने प्रज्वलित केली. 1902 साली रवींद्रनाथ टागोर यांच्या घरी झालेल्या एका देशभक्त समूहाच्या बैठकीत ‘अनुशीलन समिती’ या क्रांतिकारक संघटनेची स्थापना झाली. योगी अरविंद घोष या बैठकीला उपस्थित होते. या संघटनेच्या नावातील ‘अनुशीलन’ या शब्दाचा स्वीकार बंकिमचंद्र यांच्या लेखातल्या शीर्षकातूनच केला गेला होता.

दक्षिणेचे वासुदेव बळवंत फडके म्हणून ओळखले जाणारे अल्लुरी सीताराम राजू या आदिवासी लढवय्या क्रांतीकारकांनी आनंदमठ वाचूनच संन्यास ग्रहण केला आणि ब्रिटीशांचे राज्य उलथवण्यासाठी सशस्त्र चळवळ हाती घेतली. कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि कलकत्ता युनिवर्सिटीचे कुलगुरू गुरूदास बॅनर्जी यांनी बंकिमचंद्र यांचा उल्लेख ‘ऋषी बंकिम’ असा केला होता. अनुशीलन समितीतर्फे ‘युगांतर’ हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते. त्या वृत्तपत्राचे संपादक पद काही काळ स्वामी विवेकानंद यांचे बंधू भूपेंद्रनाथ दत्त यांनी भूषवले होते. 1905च्या डिसेंबरमध्ये बनारस येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात भगिनी निवेदिता यांनी भारताचा जो ध्वज फडकवला (या ध्वजाची रचना स्वतः निवेदितांनी केले होते), त्यावर मध्यभागी ‘वंदे मातरम्’ ही अक्षरे रेखांकित केली होती. त्याआधी ऑगस्ट 1905 मध्ये वंगभंग विरोधी उभ्या राहिलेल्या चळवळीची प्रचारसभा कलकत्त्यात झाली. त्यासोबत वंदे मातरमचा उद्घोष उच्च स्वराने केला गेला. वंगभंगविरोधी चळवळ भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातला एक सुवर्णाध्याय आहे. त्या चळवळीचा मंत्रच मुळी वंदे मातरम हा होता. 1906 मध्ये बारिसाल येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात वंदे मातरमचा गजर करणार्‍या कार्यकर्त्यांवर इंग्रज पोलिसांनी लाठीहल्ला केला. ब्रिटीश शासनाच्या उरात वंदे मातरम या घोषणेने जणू धडकीच भरली होती.

1906 मध्येच वंगभंगाच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या सभेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी वंदे मातरम् मधोमध अंकित केलेलाच ध्वज फडकवला. एक वर्षानंतर 1907 मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताच्या प्रतिनिधी या नात्याने मादाम भिकाजी रुस्तम कामा यांनी जो ध्वज फडकवला त्यावरही ‘वंदे मातरम’ हेच शब्द होते.

एकोणीस वर्षांचा तरणाबांड खुदीराम बोस, लंडनमध्ये कर्झन वायलीवर गोळ्या झाडणारा तेजस्वी युवक मदनलाल धिंग्रा, रामप्रसाद बिस्मिल, अश्फाक उल्ला खान, राजेंद्र लाहीडी आदी क्रांतिकारकांनी वंदे मातरम्चा उद्घोष करीतच हौतात्म्य पत्करले. तर चितगाव येथील शस्त्रागारावर हल्ला करणारा सूत्रधार मास्टर सूर्यसेन यांची कथा तर अधिकच रोमांचक आहे. सूर्यसेनदांना फाशी देण्याच्या आदल्या रात्री 12 जानेवारी 1934 रोजी त्यांच्या कोठडीत नेत असताना ते वंदे मातरम्च्या घोषणा देत राहिले. त्यासाठी त्यांना अमानुष मारहाण जेलच्या अधिकार्‍यांनी केली. तरीही त्यांनी गर्जना थांबवली नाही. लाठ्यांच्या प्रहाराचा इतका वर्षाव त्यांच्यावर करण्यात आला की, शेवटी ते बेशुद्ध पडले. त्याच बेशुद्धावस्थेत त्यांना फासावर चढवण्यात आले. मिलिंद सबनीस यांनी वंदे मातरम्च्या प्रेरणेबाबतचा हा सारा तपशील अतिशय उद्बोधक रीतीने पुस्तकात नमूद केला आहे. नंदुरबारचा कोवळा किशोर शिरीषकुमार, कनकलता बरुआ ही आसामची बाल वीरांगणा यांनीही वंदे मातरम्च्या गजरातच ब्रिटीशांच्या गोळ्या झेलल्या.

वंदे मातरम् या नावाने वृत्तपत्रसृष्टीला ही भुरळ घातली. या नावाचे पहिले साप्ताहिक बंगालमध्ये सुरू झाले. त्याचे पहिले संपादक बिपिनचंद्र पाल तर नंतरचे अरविंद घोष! 1908 मध्ये पुण्यातून, 1909 मध्ये जिनिव्हा येथून (मादाम कामा व श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्रजीत सुरू केले), 1914 मध्ये स्वित्झर्लंड येथून, 1920 मध्ये दिल्लीहून (लाला लजपतराय - हिंदीतून) वंदे मातरम् नावाची वृत्तपत्रे निघाली. वंदे मातरम् या शब्दसमुच्चयाचे आणि त्यातून व्यक्त होणार्‍या भावनेचे सामर्थ्य असे वेगवेगळ्या क्षेत्रात प्रकट होऊ लागले ते साधारण विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापासून-1902 पासून. मात्र त्या सुप्त आणि सशक्त सामर्थ्याची जाणीव स्वतः बंकिमदांना मात्र त्या आधी किमान पंधरा वर्षांपासूनच स्पष्ट होती. 1890 मध्ये बंकिमचंद्र यांनी आपली कन्या शारदा कुमारीशी बोलताना, ‘एक दिवस तू पाहशील, दहा -वीस वर्षांच्या आतच या गीतामुळे सारा बंगाल पेटून उठेल. एकटा बंगालच काय, सारा हिंदुस्थान या गीतापासून स्फूर्ती घेईल. सारा देश एका सुरात हे गीत गाऊ लागेल...!’ या भाकितानंतर पंधरा वर्षांनी बंकिमदांचे हे शब्द अक्षरशः खरे ठरले.


बंकिमचंद्रांचेे भाचे शचिंद्रनाथ यांना तर त्यांनी म्हटले होते की, ‘माझे बाकी सारे लिखाण गंगेत बुडवले तरी चालेल; परंतु हे गीत मात्र शाश्वत ठरेल आणि देशाचे हृदय जिंकेल.’ केवढा प्रचंड आत्मविश्वास हा द्रष्टा लेखक आपल्या साहित्यकृतीबद्दल व्यक्त करीत होता!

आपल्या जन्मभूमीच्या मातीला माता स्वरूप बहाल करून देशभक्तीला मातृभक्तीचे रूप प्रदान करणारी उदात्तम भावना केवळ आणि केवळ भारतातच सर्वात प्रथम जन्माला आली, हे ऐतिहासिक सत्य आहे. वंदे मातरम् हे त्याच उदात्त भावनेचे स्फुरण आहे. याच स्फुरणाची प्रक्रिया आणि इतिहास अत्यंत मनोवेधक आहे. 1762 ते 1774 या काळात झालेल्या इंग्रज विरोधी संन्यासी-उठावाची पार्श्वभूमी कलकत्त्याच्या जवळच असलेल्या नैहाटी कांटलपाडा या आपल्या जन्मगावीच कार्तिक शुद्ध नवमी  7 नोव्हेंबर 1875 रोजी बंकिमचंद्रांना झालेले या बंगाली-संस्कृत मिश्र भाषेतील गीताचे स्फुरण, 1882 मध्ये त्या संन्यासी उठावावरच आधारलेल्या आनंदमठ या दिव्य कादंबरीत त्या गीताचा केलेला समावेश आणि मुख्यतः 1905 पासून वंगभंगाच्या चळवळीपासून थेट आजतागायत या पंचाक्षरी मंत्राने देशभक्त भारतीयांच्या हृदयाचा घेतलेला ठाव... हा सारा रोमहर्षक प्रवास अतिशय सुलभ भाषेत मराठी वाचकांसमोर साकार करणारे मिलिंद सबनीस आणि तो इतिहास पुस्तकरूपाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या उंबरठ्यापाशी सादर करणारे जटायु अक्षरसेवा हे दोन्ही शतशः अभिनंदनास पात्र आहेत. त्यांच्या या राष्ट्रकार्यास खूप खूप शुभेच्छा!

( ग्रंथ मागवण्यासाठी संपर्क : 9767284038)

- अरुण करमरकर!!!!

jataau.com/shop

Monday, June 14, 2021

श्री रामजन्मभूमी ट्रस्ट, आरोप आणि वास्तव

 नेमके काय आहे प्रकरण

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर हे शक्य तितके भव्य दिव्य व्हावे, ही समस्त रामभक्तांची भावना आहे. यासाठी जन्मभूमीलगतचे काही भूखंड ट्रस्टने खरेदी केल्या आहेत. त्यातील १.२ एकर भूमीच्या खरेदीसंदर्भात आरोप झाला आहे. आरोपाची कथानक अशा रीतीने रचण्यात आली आहे की प्रथमदर्शनी घोटाळा झालेला असावा, असे वाटू शकते.

 आम आदमी पक्षाच्या संजय सिंह आणि समाजवादी पार्टीच्या पवन पांडेय यांनी आरोप केला की, “राम मंदिरासाठी जमीन खरेदीत घोटाळा झाला आहे. १८ मार्च २०२१ रोजी पाच मिनिटांपूर्वी जी जमीन दोन कोटीत विकली गेली तीच जमीन ट्रस्टने १८.५ कोटी रुपयांत खरेदी केली. पाचच मिनिटांत जमीन १६.५ कोटी रुपयांनी महाग झाली. या दोन्ही व्यवहारात डाॅ. अनिल मिश्रा हे साक्षीदार आहेत. इत्यादि.’’ परंतु, ही माहिती अर्धसत्य आहे. नितीन त्रिपाठी या अभ्यासकाने आरोप करणाऱ्यांची लबाडी नेमकेपणाने पकडली आहे.

 आरोप करणाऱ्यांनी १८ मार्च रोजी दोन व्यवहार झाल्याचे म्हटले आहे. तिसरा व्यवहार आरोप करणाऱ्यांनी लपवला आहे. वास्तविक पाहता तिसरा व्यवहार १८ मार्च रोजी सर्वात आधी झाला. या व्यवहारानुसार, कुसुम पाठक व हरीश पाठक यांचे सुल्तान अंसारी बिल्डर आणि पार्टनरसोबत दोन कोटी रुपयाला विक्रीचा जो करार होता तो निरस्त करण्यात आला.

 समाजायला सोपे व्हावे म्हणून क्रमाने विषय समजून घेऊया.

 1 - सन २०१९ मध्ये पाठक यांनी ही जमीन दोन कोटी रुपयांत सुल्तान अन्सारी बिल्डर व अन्य ८ भागीदारांना विकण्यासंबंधी करार रजिस्टर्ड केला. या प्रकरणी ५० लाख रुपये देण्यात आले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या वेळी अद्याप श्री रामजन्मभूमी संबंधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागलेला नव्हता. अर्थातच त्या वेळी अयोध्येतील जमीनाचे दर खूप कमी होते.

2 – दि. १८ मार्च २०२१ रोजी पाठक यांनी हा करारनामा रद्द केला. हा करार रद्द झाल्याशिवाय पाठक यांना ही जमीन विकता येणार नव्हती.

3 – मग त्याच दिवशी म्हणजे १८ मार्च रोजी त्यांनी ही जमीन सुल्तान अन्सारी बिल्डरला याच दराने म्हणजे २ कोटी रुपयांना विकली.

4 – मग सुल्तान अन्सारी यांच्याकडून ही जमीन ट्रस्टने १८.५ कोटी रुपयांत खरेदी केली.

 दोन वर्षांपूर्वीची गोष्ट निराळी होती. तेव्हा म्हणजे राममंदिर होईल की नाही याची काहीही खात्री नसताना त्या जमिनीचा दोन कोटी रुपयांत व्यवहार झाला. आता सर्वोच्च न्यायालयाने निसंदिग्धपणे श्री रामजन्मभूमीच्या बाजूने निकाल दिला आहे. त्या ठिकाणी जगातील सर्वात मोठे धार्मिक श्रद्धा केंद्र साकारले जाणार आहे. त्या भूमीशी जोडून असलेल्या १.२ एकर भूमीच्या दरात प्रचंड वाढ होणे नैसर्गिक आहे. ती भूमी १८.५ कोटी रुपयांत खरेदी करणे काहीही चुकीचे नाही. रियल इस्टेटमध्ये जमिनीच्या किंमती कशा रीतीने वाढतात किंवा कमी होतात याचे सामान्य ज्ञान असलेला कोणीही हा व्यवहार योग्य आहे असेच म्हणेल.

 जमिनीचे व्यवहार हे असेच होतात. ही काॅमन प्रॅक्टिस आहे. बिल्डर लोक २५ ते ३० टक्के रक्कम देऊन शेतकऱ्यांकडून दीर्घ काळासाठी लॅन्ड अॅग्रीमेंट करतात. मग ते ही जमीन खरेदी करू शकेल अशी पार्टी शोधत राहातात. शेतकऱ्याने करार करून ठेवला असल्याने बिल्डरला आधी ठरलेल्या दरातच विकण्यासाठी तो बांधील असतो. दरम्यान, जमिनीचे दर वाढतात. बिल्डरला योग्य पार्टी मिळताच तो सौदा करतो. खरेदीदार पार्टीची विवशता किंवा मजबुरी असते की त्याला बिल्डरकडूच खरेदी करावी लागते. कारण बिल्डरने शेतकऱ्याशी करार केलेला असतो. मग रजिस्ट्री करण्याच्या दिवशी बिल्डर हा आधीचा करार रद्द करतो आणि प्राॅपर्टी जुन्या दरानेच खरेदी करतो. आणि नव्या दराने पार्टीला विकून टाकतो.

 जमिनींच्या व्यवहारात प्राॅपर्टी डीलिंगची एक सामान्य प्रॅिक्टस आहे. शहरात बिल्डर लोक असेच अॅग्रीमेंट करतात आणि मग जमीन डेव्हलप करून दर वाढवून विकतात. ओरिजनल पार्टीला आधी ठरलेलाच दर मिळतो, बिल्डरला यात प्रचंड नफा असतो. ही त्यांच्या रिस्कची वसुली असते.

 हिंदु समाजाचा तेजोभंग करणे, हेच काम जे करत आले त्यांनी श्री रामजन्मभूमी मंदिर ट्रस्टवर आरोप केले आहेत. सर्वच आरोप सत्य नसतात. सेंट्रल विस्टा असो, लहान मुलांचे लस दुसऱ्या देशांना का पाठवले असे विचारणे असो वा राफेल आदी.. या सर्व विषयांवर आरोप असे केले गेले की क्षणभर शंका यावी. सत्य सर्वांसमोर आहे. आता रामजन्मभूमी ट्रस्टवर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रकार परिषद घेऊन आरोप करणे  टूलकिटचाच भाग आहे का, माहीत नाही. याची चौकशी झाली पाहिजे.

 क्षुद्र राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कोणी देशाच्या श्रद्धास्थानाशी संबंधीत ट्रस्टवर संशयाचे धुके आणत असेल तर हे गंभीर आहे. हिंदुत्वाला बदनाम करणाऱ्या शक्तींची आजवरची प्रचारशैली पाहा. नॅरेटिव्ह किंवा कथानक अशा रीतीने पुढे आणले जाते की सामान्य माणसाला प्रथमदर्शनी कथानक सत्य वाटू लागते. रामजन्मभूमी ट्रस्टवर झालेले आरोप केवळ बदनामी करण्यासाठी केले आहेत, यात काही संशय नाही. कोणीही कोठेही भ्रष्टाचार किंवा फसवणूक केली असेल तर संबंधितांवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु, हिंदुंचा तेजोभंग करणे एवढ्याच उद्देशाने पुन्हा पुन्हा खोटे आरोप होत असतील तर कायदेशीर मार्गाने स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त झाला पाहिजे.

 केदारनाथ ढगफुटीच्या वेळी नरेंद्र मोदी यांच्यासंबंधी अशीच खोटी बातमी चालवली गेली. नंतर संबंधीत मीडिया हाऊसने क्षमा मागितली. कठुआ प्रकरणीही असेच कथानक रचले गेले. अनेक महिने खोट्या बातम्यांचा रतीब घातला गेला. मुख्य आरोपी त्या दिवशी कठुआपासून शेकडो किलोमीटर दूर असल्याचे एटीएमच्या सीसीटीव्हीमुळे सिद्ध झाले. अशी शेकडो उदाहरणे आहेत. रामजन्मभूमीवर मंदिर होऊ नये यासाठी आकाशपाताळ एक करणाऱ्यांनी आता आणखी एक आघात केला आहे.

  ‘आरोप आम्हाला नवीन नाहीत, आम्ही त्याची चिंता करत नाही, तुम्हीही करू नका. आता काहीच सांगायचे नाही. या प्रकरणाचा अभ्यास करण्यात येईल.’, असे ठामपणे ट्रस्टचे महासचिव आणि ज्येष्ठ प्रचारक चंपत राय म्हणाले ते बरेच झाले. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या संस्कृतीसाठी, या राष्ट्रासाठी समर्पित केले आहे, असे त्यागी लोक लोक श्री रामजन्मभूमी ट्रस्टवर आहेत. तीन दशकांहून अधिक काळ समर्पित भावनेने रा. स्व. संघाच्या माध्यमातून कार्य करणारे डाॅ. अनिल मिश्रा यांनी ट्रस्टचे प्रतिनिधी म्हणून भूमी खरेदीचा व्यवहार केला आहे. ट्रस्टचे काम कोणा एका व्यक्तीच्या इच्छेने चालत नाही. निर्णय प्रक्रियेत सर्वांचा सहभाग असतो. संघाचे हे संस्कार आहेत. जन्मभूमीलगत मोकळी असलेली जेवढी भूमी बाजारभावाने घेता येईल, ती घ्यायची आणि होता होईल तेवढे भव्य दिव्य जन्मभूमी मंदिर उभारायचे, ही हिंदू समाजाची भावना आहे. ट्रस्टने तेच काम केले आहे. या गैरव्यवहार नाही किंवा घोटाळाही नाही.

-       -  सिद्धाराम भै. पाटील

----------

ही माहिती शेअर करण्यासाठी वा कापी पेस्ट करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही.

Sunday, December 20, 2020

धन्य ते जीवन...

मा. गो. वैद्य यांच्यासोबत त्यांच्या घरी सिद्धाराम.


स्थळ : नागपुरातील मा. गो. वैद्य यांचे घर.
११ सप्टेंबर २०१९. सायंकाळची वेळ.
ही त्यांची शेवटची भेट ठरली.

९६ वर्षांच्या ज्ञानाच्या क्षेत्रातील या ऋषींना ‘ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी’ या ग्रंथासाठी एक लेख लिहिण्याची विनंती केली. ते म्हणाले, ‘आता सध्या मी एका ग्रंथावर काम करत आहे. साधारण फेब्रुवारी २०२० ला लेख देऊ शकेन. चालणार आहे का?’.
ग्रंथाचे प्रकाशन १९ जानेवारी २०२० ठरलेले असल्याचे मी सांगितले. त्यामुळे या ग्रंथात त्यांचे योगदान घेता आले नाही.
९६ वर्षांची व्यक्ती याही वयात इतके नियोजनबद्ध काम करते, हे मा. गो. यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे असेच होते.
एखाद्या विषयावर लेख लिहून पाहिजे असल्यास त्यांचा पहिला प्रश्न असायचा की लेख कधीपर्यंत हवा?.
सांगतिलेल्या दिवसापर्यंत शक्य असल्यास ते हो म्हणत, अन्यथा त्यांच्या नियोजनानुसार अमूक दिनांकापर्यंत चालणार आहे का, असे विचारत. ठरलेल्या दिनांकाच्या एक दोन दिवस आधी त्यांचा दूरध्वनी येणार. तुम्ही मागीतलेला लेख थोड्या वेळापूर्वी इ मेल केलाय. पाहून घ्या.
शंभरीकडे वाटचाल सुरू असतानाही वेळेचे इतके काटेकोर नियोजन... धन्य ते जीवन. ज्या व्यक्तींचा माझ्या आयुष्यावर अमीट ठसा उमटला त्यापैकी एक श्री. मा. गो. वैद्य.
इतके ज्ञानवृद्ध व्यक्तिमत्व पण माझ्यासारख्या सामान्य तरुणाला त्यांनी खूपच सलगीने वागवलं. शेवटच्या भेटीत शेजारी बसवून फोटो काढण्यास लावले. त्यांचे आत्मचरित्र आपुलकीने भेट दिले.

विवेकानंद केंद्र कार्यकर्ता आणि पत्रकार असल्याचा मला व्यक्तिश: आजवर खूप लाभ झाला. एरव्ही जे अशक्य होते अशा अनेक महान व्यक्तित्वांना भेटु शकलो. त्यांच्या स्नेहास पात्र राहू शकलो. याची धन्यता वाटते. पूर्वजन्म पुण्याईमुळेच विवेकानंद केंद्र कार्यकर्ता अन् पत्रकारिततेची संधी मिळाली असावी. पत्रकारितेची सुरूवात सोलापूर तरुण भारतमधून होणे आणि तेथे रविवार पुरवणी संपादक अशी संधी मिळणे यामुळे मा. गो. यांच्याशी स्नेहबंध जुळू शकले.
विवेक विचार मासिकाच्या जानेवारीच्या अंकात थोडं विस्तृत लिहीन.
हिंदुत्वाचे समर्थ भाष्यकार मा. गो. वैद्य यांच्या आत्मास सद्गती मिळो.

Sunday, October 25, 2020

वीरशैव आणि लिंगायत हे समानार्थी शब्द

Veershaiv Lingayat Hindu

वीरशैव लिंगायत हिंदूच या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी डावीकडून प्रा. गजानन धरणे, सिद्धाराम पाटील, शरद गंजीवाले, डाॅ. मल्लिकार्जुन शिवाचार्य, धर्मराज काडादी, राजेंद्र काटवे.


वीरशैव लिंगायत हिंदूच या पुस्तकाचे प्रकाशन 

सोलापूर : एखाद्या इमारतीचे खांब कापण्यासाठी कोणी येत असेल तर आपण स्वस्थ बसू शकत नाही. अगदी त्याच पद्धतीने हिंदू धर्मात असलेली आपली मुळं कापण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तर आपण स्वस्थ बसू शकत नाही. वीरशैव आणि लिंगायत हे समानार्थी शब्द आहेत. वीरशैव लिंगायत समाज हा हिंदूच आहे आणि वीरशैव लिंगायत समाजात धर्मरक्षणाची परंपरा आदी जगद्गुरूंपासून चालत आलेली आहे, असे प्रतिपादन बृहन्मठ होटगी मठाचे डाॅ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी केले. सिद्धाराम पाटील आणि अप्पासाहेब हत्ताळे यांनी लिहिलेल्या ‘वीरशैव लिंगायत हिंदूच!’ या लघु ग्रंथाचे प्रकाशन अक्कलकोट रोड येथील महास्वामी यांच्या कार्यालयात झाले. यावे‌ळी ते बोलत होते. जटायु अक्षरसेवा संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. 

जातवेद शिवाचार्य मुनींकडून महात्मा बसवेश्वर यांनी लिंगदीक्षा घेतली होती. मी शैव होतो आता वीरशैव झालो, असे खुद्द महात्मा बसवेश्वर यांनी आपल्या वचनातून सांगितले आहे. त्यामुळे मतभेद सोडून वीरशैव लिंगायत समाजाने एकसंध झाले पाहिजे, असे आवाहन महास्वामी यांनी यावेळी केले. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, हिंदू वीरशैव लिंगायत मंचचे प्रांत प्रमुख शरद गंजीवाले, धर्मजागरण प्रमुख हेमंत हरहरे, डाॅ. राजेंद्र हिरेमठ, राजेंद्र काटवे जिल्हा प्रमुख प्रा. गजानन धरणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

 आरक्षणाच्या आशेने धर्म सोडणे मान्य नाही : काडादी 

 आरक्षण मिळेल म्हणून धर्म मोडून काढणे कधीच योग्य नाही. वीरशैव िलंगायत समाज हा हिंदू धर्माचाच भाग आहे. त्यामुळे येत्या जनगणनेच्या वेळी धर्माच्या ठिकाणी हिंदू धर्म अशीच नोंद समाजबांधवांनी करावी, असे आवाहन श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केली. श्री. काडादी म्हणाले, “हजार वर्षे देशावर आक्रमणे झाली. तरीही आपण आपली संस्कृती जपून वाटचाल करत आहोत. लिंगायत समाजात इतकी वर्षे पंचाचार्य आणि बसवेश्वर हा वाद पेटत राहील असा प्रयत्न सुरू होता. हा वाद आता मिटतोय असे दिसताच आरक्षणाच्या या काळात शब्दछल करून ‘वीरशैव वेगळे आणि लिंगायत वेगळे’ असे राजकारणातील मंडळींनी सांगायला सुरूवात केली आहे. वीरशैव लिंगायत हे हिंदूच नाहीत असे सांगण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न गेल्या काही वर्षांत सुरू झाला आहे. लहान मुलाला चाॅकलेट दाखवले की ते मूल काही वेळासाठी संभ्रमित होते, तीच गत आरक्षण मुद्द्यावरून झाली आहे. आरक्षण नसल्याने समाजात भेदाची भावना निर्माण झाली आहे. आरक्षणारूपी चाॅकलेटच्या जवळ जाण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत. परंतु, धर्म मोडून काढणे योग्य होणार नाही. वीरशैव लिंगायत हिंदूच या पुस्तकाने समाजाची दिशाभूल दूर करण्याचे काम केले आहे.’’ 

 काय आहे पुस्तकात ? 

 महात्मा बसवेश्वर यांच्याआधी ३ हजार वर्षांपासून वीरशैव लिंगायत परंपरा प्रचलित होती, यासंबंधीचे शिलालेख व अन्य पुराव्यांची माहिती या पुस्तकात आहे. हिंदू धर्मातील ब्रह्मा, विष्णू आणि महेश या प्रमुख त्रिदेवांपैकी महेश अर्थात शिव उपासना इष्टलिंग रूपात करणारा समाज हिंदू आहे. शिवयोगी सिद्धराम, महात्मा बसवण्णा यांच्या वचनांचा आधार घेत वीरशैव लिंगायत समाज हा हिंदूच असल्याचे ३७ मुद्दे या पुस्तकात साधार मांडले आहेत. बृहन्मठ होटगीचे धर्मरत्न डाॅ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे.
9767284038 या क्रमांकावर व्हाटस् अॅप / एसएमएस करून पुस्तक मागवू शकता.
पृष्ठे ३६, मूल्य ३०/ 
पुढील लिंकवरूनही पुस्तक मागवता येईल

  

Saturday, July 25, 2020

भाऊ तोरसेकर यांचे अभिनंदन !

श्री. भाऊ तोरसेकर यांचे अभिनंदन !
फक्त तीन ते चार महिन्यात
त्यांच्या प्रतिपक्ष या युट्यूब वाहिनीची सदस्यसंख्या एक लाखावर पोहोचली आहे.
दृश्य संख्या 1 कोटी 19 लाख.

एखाद्या वैचारिक विषयावरील
युट्युब वहिनीला
शंभर-सव्वाशे दिवसात
इतके सदस्य मिळणे
ही बाब साधारण नाही.

पाठीमागे कोणतीही माध्यम संस्था नसताना
एखाद्या पत्रकाराला
अशी जनमान्यता मिळणे
हे महाराष्ट्रातील
पहिलेच उदाहरण ठरावे.

येथे उल्लेखनीय बाब म्हणजे
भाऊ यांना आपल्या ब्लॉगसाठी,
आपल्या युट्यूब वाहिनीसाठी
एका रुपयाची सुद्धा जाहिरात
करावी लागली नाही.

भेदक विश्लेषण, साठ वर्षांचा पत्रकारितेतील दांडगा अनुभव, सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत मांडण्याची शैली, प्रांजळपणा, मांडणीतील सातत्य, साधेपणा, निस्पृहता, दांडगी स्मरणशक्ती, तटस्थता, नवीन शिकण्याची जिद्द, परिश्रम, प्रसिद्धीने हुरळून न जाणे, स्वतःच्या मर्यादांची जाणीव, अभ्यासोनी प्रकट व्हावे या उक्तीचे पालन, सूक्ष्म निरीक्षण बुद्धी, निर्भिड स्वभाव आणि निरागसता...

यामुळेच महाराष्ट्राने
भाऊंना डोक्यावर घेतलं आहे.
भाऊ ( Ganesh Torsekar )
यांचे प्रबोधन कार्य असेच चालू दे...
मनापासून शुभेच्छा...

विशेष नोंद :
कथित पुरोगामी मंडळींनी पोसलेला बुद्धीच्या क्षेत्रातील दहशतवाद
मोडीत काढण्याचा मार्ग
प्रशस्त करण्याचे ऐतिहासिक काम
जोखीम पत्करून करणे
हे एक मोठे धाडस आहे.
असे धाडस
निस्पृहतेमधूनच
येत असते.
कमालीची निस्पृहता
ही भाऊंची ठळक ओळख आहे.

(एक लाख सदस्य संख्या झाल्यानिमित्ताने भाऊंचे मनोगत...
https://youtu.be/z2vSdR7tv3c)

--------------------
नोंदी सिद्धारामच्या...
psiddharam.blogspot.com

Sunday, May 3, 2020

हमीद दाभोलकर, हमीद दलवाई आणि अंनिस


हमीद दलवाई यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने हमीद दाभोलकर यांनी स्वतःचा एक जुना लेख आपल्या fb वर शेअर केला आहे. (https://m.facebook.com/story.php?story_fbid=790338144829584&id=100015602171173) हा लेख खूप प्रभावी अन् विचार करायला लावणारा आहे.
त्यातील एका मुद्द्याने मला अस्वस्थ केले आहे. (तो मुद्दा येथे स्क्रीन शॉट ने जोडला आहे.)
नाव हमीद अन् आडनाव दाभोलकर यामुळे हमीद दाभोलकर यांना शाळेत मुले लांड्या म्हणून चिडवू लागली. का चिडवत असतील तर हमीद दा. यांना वाटतं की, "चौथीच्या इतिहास पुस्तकात शिवाजी व अफजल खान लढाई वर्णन आहे. त्यामुळेच हे घडले असावे."
हा गंभीर मुद्दा आहे. अनेक प्रश्न पुढे येतात..
१. शिवाजी - अफजल खान लढाई वर्णनात कोठेही लांड्या हा शब्द आलेला नाही. किंवा अफजल खानशी संबंधित हमीद नावाची व्यक्तिरेखा सुद्धा नाही. मग मुले चिडवण्याचे कारण शिवाजी - अफजल खान लढाई असेल का ?
२. शिवाजी - अफजल लढाई वर्णन हे कारण असेल तर मग हा धडा अभ्यासक्रमात असू नये असे सुचवायचे आहे का ?
३. रोज बातम्यांमध्ये कुठे हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर ये तोयबा, जैश ए मोहम्मद, तालिबान, लादेन, दानिश, इंडियन मुजाहिद्दीन, अल कायदा, कसाब, जिना, अफजल गुरू, याकुब वगैरे अतिरेकी, जिहादी यांचा उल्लेख येत असतो. मुलांच्या पाहण्यात, वाचनात या बाबी येतातच. मग केवळ चौथीचा धडा वगळल्याने भागेल का?
४. थोर नेते शरदचंद्र पवार सुचवतात त्याप्रमाणे तब्लीगी, जिहादी, अतिरेकी यांच्या बातम्याही प्रसिध्द करायच्या नाहीत, अशी मागणीही होऊ शकते. समजा ही मागणीसुद्धा मान्य झाली तर मूळ प्रश्न सुटणार आहे का ? (मूळ प्रश्न हिंदू - मुस्लीम एकता कशी नांदेल हा आहे.)
५. थोर शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती डॉ. APJ अब्दुल कलाम हे सर्व भारतीयांना वंदनीय आहेत. त्यांचे नाव उच्चारताना कोणीही विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही हमीद यांना चिडवल त्या शब्दाचा वापर करत नाहीत, हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे.

त्यामुळे शिवाजी - अफजल खान लढाई वर्णन ही अडचण असू शकत नाही. बातम्यांतून पुन्हा पुन्हा पुढे येणारी अतिरेक्यांची नावेही समस्या असणार नाहीत. समाजापुढे डॉ. APJ कलाम यांच्यासारखी चरित्रे आणावी लागतील आणि त्याच वेळी अफजल खान, अफजल गुरू अन् कसाब यासारख्या व्यक्तींची गत काय होते हेही पुढे आणावे लागेल.

वाईट काम करेल त्याला दंडित केले जाते आणि चांगले काम केल्यास गौरव होतो. लोक डोक्यावर घेतात. येथे त्याचे नाव कोणत्या धर्मातील आहे, तो कोणत्या धर्माचा आहे, याला काही किंमत नसते. हे विचार नव्या पिढीवर बिंबवले पाहिजे. यासाठी अंनिस मोठी भूमिका निभावू शकते. हमीद दलवाई यांना हेच अपेक्षित असावे.
परंतु, धार्मिक भेदाभेद वाढू नये म्हणून अफजल खान वध शिकवू नका, अतिरेकी काही केले तरी त्यावर बातम्या दाखवू नका... गप्प राहा.. डॉ. APJ यांच्या सारख्या महान व्यक्तीचा गौरव टाळा... अशी भूमिका अंनिस घेणार असेल तर पदरी फार काही पडणार नाही.

- सिद्धाराम

Wednesday, April 29, 2020

संन्यस्त जीवन जगणारी धाडसी गृहिणी

Aparna Ramtirthkar
चला नाती जपुया आणि आईच्या जबाबदार्‍या हे कौटुंबिक विषय घेऊन ज्यांनी महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यांत तीन हजारांहून अधिक व्याख्याने दिली, लव्ह जिहादच्या सापळ्यात अडकलेल्या शेकडो मुलींना अलगद बाहेर काढून त्यांच्या पालकांना सोपवलं, शेकडो कुटुंबे घटस्फोटापासून, उद्ध्वस्त होण्यापासून ज्यांनी वाचवली त्या अ‍ॅड. अपर्णा  अरुण रामतीर्थकर तथा अपर्णाताई यांचे मंगळवार, दि. 28 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11.45 वाजता सोलापूर येथील अश्विनी रुगणालयात उपचार सुरू असताना निधन झाले. यानिमित्त सिद्धाराम भै. पाटील यांचा लेख 

पक्षाघाताचा झटका आल्याने गुढी पाडव्याच्या दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. महिनाभर मृत्यूशी झुंज दिली अन् अखेर वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. त्यांच्या मागे मुलगा आशुतोष, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी.
पती, पत्नी दोघेही विचारांचे पक्के होते. आपण घेतलेल्या भूमिकेसाठी कोणतीही किंमत मोजण्याची त्यांची तयारी होती. किंबहुना आपण स्वीकारलेला मार्ग हा खडतर आहे, काट्याकुट्याचा आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. कटु असलेले सत्य मांडताना आडपडदा ठेवायचा नाही. सत्य कोणाच्या रागालोभाची पर्वा करत नाही. सत्य थोडेही डायल्यूट न करता, तीव्रता कमी न करता थेट मांडणे हेच त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान होते.


कटु सत्य भेदकपणे मांडण्याची रामतीर्थकर शैली महाराष्ट्रातील सामान्य माणसाने सहज स्वीकारली. आपली मानली. पण, काही मतलबी बुद्धीजीवींनी आपल्या मनातील संकुचितता अपर्णाताईंना चिटकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अपर्णाताई या मध्ययुगीन मानसिकतेच्या समर्थक आहेत येथपासून ते त्या स्त्री जातीच्या शत्रू आहेत, येथपर्यंत अनेक आरोप होत राहिले. पण याच वेळी समाजाने त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतलं.
महिन्यातील किमान 25 ते 28 दिवस प्रवास करणे ही त्यांची दिनचर्याच बनून गेली होती. पायात जणू भिंगरी. अफाट जनसंपर्क. महाराष्ट्रातील गावोगावी आणि बहुतेक शहरांमध्ये कार्यकर्त्यांचे मोहोळ तयार केले होते. त्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करणार्‍यांत शिवसेना, भाजपा, हिंदू जनजागरण समिती, विविध ज्ञाती संस्थांचे कार्यकर्त  होते. तसे काँग्रेस-राष्ट्रवादीचे पडद्यामागून आयोजन करणारे कार्यकर्तेही होते. मठ-मंदिरांचे विश्वस्त, महिला मंडळे, प्रगतशील शेतकरी असे विविध थरातील कार्यकर्त्यांसाठी अपर्णाताई दैवत बनल्या होत्या.  
सगळा प्रवास लाल डब्यातून (एसटीने). गडचिरोली आणि चंद्रपूर सोडल्यास संपूर्ण महाराष्ट्रात व्याख्यानांच्या माध्यमातून समाजकार्याचा आणि धर्मकार्याचा यज्ञ मांडला होता. बहुतांश सभांना तीन-चार हजार गर्दी ठरलेली. काही सभांना 30 ते 40 हजारांची उपस्थिती.
एखादी सामान्य स्त्री मनात जिद्द बाळगून पुढे आली तर ती असामान्य काम उभे करू शकते याचे अपर्णाताई या जीवंत उदाहरण. अपर्णाताई या मूळच्या सातारा येथील पूर्वाश्रमीच्या सुनीता यशवंत कुलकर्णी. पतीची नोकरी बदलल्याने पुण्याहून सोलापूरला आल्या. मुलाचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत फक्त घर सांभाळलं. मुलगा स्वावलंबी होताच 1996 मध्ये अपुरं शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचे वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरवलं. अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या. नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या.
रोज व्याख्यान म्हटलं की मानधनही मिळणारच. त्या मानधन स्वीकारत, पण आपल्या 75 लेकरांच्या उदरनिर्वाहासाठी. मोहोळ (जि. सोलापूर) येथे पारधी समाजाची मुलं त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणली. दरमहा 60 हजार रुपयांचा खर्च व्याख्यानाच्या मानधनातून उभा करत.
कामाची गरज ओळखून त्यांनी आपले जीवन अनेक अंगांनी फुलवले होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. त्यांच्या व्यक्तित्वाला त्याग आणि सेवा या शाश्वत मूल्यांचा पाया होता. जे काही करायचं ते समाजासाठी. आर्थिक स्थिती बेताची असतानाही जी निस्पृहता त्यांनी शेवटपर्यंत दाखवली त्याला तोड नाही. पैशाविषयीचा जो भाव श्री रामकृष्ण परमहंस यांच्या ठायी होता तोच भाव रामतीर्थकर दाम्पत्याने शेवटच्या श्वासापर्यंत जपला. त्यांच्या अंगी असलेले धाडस यातूनच आले असावे.
अपर्णाताई यांचा सहवास मिळालेला प्रत्येक जण त्यांच्या कुटुंबवत्सल आणि प्रेमळ स्वभावाने बांधला जात असे. खंबीर बोलणार्‍या अपर्णाताई मनाने खूपच हळव्या होत्या. सुलभ, सोप्या भाषेत लिहिणार्‍या अपर्णाताई सिद्धहस्त लेखिका होत्या. कुठे तरी चुकतंय हे दै. पुण्य नगरीतील साप्ताहिक सदर अनेक वर्षे महाराष्ट्रात गाजलं. दिल्लीतील दिग्गज नेत्यांच्या पत्नींशी हितगुज करणारे सदरही पत्रकारितेतील त्यांचा अधिकार सांगणारे ठरले. मराठी माध्यम जगताला टीव्ही पत्रकारिता नवी होती तेव्हा अपर्णाताई यांनी वृत्तदर्शन या स्थानिक वृत्तवाहिनीत मंथन नावाने प्रबोधन करणारी साप्हाहिक मालिका चालवली. प्रभावी वक्त्या म्हणून परिचित असलेल्या अपर्णाताई या हौशी कलावंत होत्या. नाट्य कलावंत म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला.
नाटक, समाजसेवा, कायदा,  समुपदेशन असे कोणतेही क्षेत्र त्यांच्यासाठी वर्ज्य नव्हते. सोलापुरात पाखर संकुल आणि उद्योगवर्धिनी या संस्था नावारूपास आणण्यात अपर्णाताई यांचा वाटा सिंहाचा होता. या संस्थांनी हजारोंच्या संख्येने महिलांना स्वावलंबी बनवले. अंगी संघटन कौशल्य होते. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पु. भा. भावे हा मानाचा पुरस्कार मिळाला. त्यांचे जीवन अनुकरणीय होते.  त्यांच्या व्याख्यानांवरून अनेकदा वादळ उठले तेव्हाही त्या अतिशय शांत होत्या. आपले संतुलन त्यांनी ढळू दिला नाही. सनातन संस्थेचे  संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्यावर अपर्णाताई यांची श्रद्धा होती. अपर्णाताई यांचे जीवन हे एका तपस्विनीचे जीवन होते.

संघ गीताच्या पुढील ओळी त्यांना तंतोतंत लागू पडतात...
पतझड के झंझावातों में
जग के घातों प्रतिघातों में
सुरभी लुटाता सुमन सिहरता
निर्जनता में भी खिलता है
दिव्य ध्येय की ओर तपस्वी
जीवनभर अविचल चलता है.


तीन जिस्म मगर एक जान

Shubhangi Buwa, Aparna Ramtirthkar & Chandrika Chauhan

अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर, चंद्रिका चौहान आणि शुभांगी बुवा ही तीन नावे सोलापूरच्या सामाजिक विश्वात एकत्रितरीत्या घेतली जातात. सुमारे दोन तप म्हणजे 24 वर्षांहून अधिक काळ या तिघींनी पाखर संकुल, शुभराय मठ आणि उद्योगवर्धिनी या तिन्ही संस्था एकदिलाने नावारुपास आणल्या. कुटुंबपद्धती टिकून राहावी. देशभक्ती आणि हिंदुत्वाची भावना लोकांमध्ये रुजावी, ही तळमळ तिघींची समान प्रेरणा. या बाबतीत अपर्णाताई अगदी कट्टर होत्या. याबद्दल चंद्रिका चौहान म्हणतात, आम्ही तिघी खूप भांडत होतो. नंतर रडतही होतो. पण बाहेर समाजासमोर येताना आम्ही तिघी एकत्रच. तीन जिस्म मगर एक जान है हम, असे आम्ही गंमतीने म्हणत असू. बाबा म्हणजे अपर्णाताईंचे पती अरुण रामतीर्थकर बुद्धीवादी. मोठे विचारवंत. मी बायको, मला काही येत नाही. मी तर सामान्य गृहिणी, अशी अपर्णाताईंची भावना. शिक्षणही अर्धवट होतं. पण पतीकडून शिकण्याची जिद्द मात्र होती. पतीकडून सर्वकाही शिकल्या. पतीच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पिंजून वैचारिक प्रबोधन करू लागल्या. बाबा गेले. ताई खचू लागल्या. मार्चच्या शेवटच्या दिवसांत पक्षाघाताने गाठलं. अपर्णाताई कालवश झाल्या. त्यामुळे तीन पैकी एक खांब निखळला.


अपर्णाताई यांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत
1. वृध्दाश्रमांमध्ये वाढ होतेय. घरगुती कलहामुळे कोर्टकचेर्‍या वाढताहेत. समाजाचं वास्तव चिंताजनक आहे. उच्च आणि प्रतिष्ठित पदावरील एका व्यक्तीची पत्नी (जी एम.एस्सी., बी.एड. शिकली आहे) घरी सासू-सासरे नको म्हणून माहेरी गेली. चार वर्षं परत आलीच नाही. शेवटी कुटुंब तुटलं. हे उदाहरण अपवाद नाही. किचन नका संस्कृती येऊ घातलीय. शीला की जवानी यासारख्या गाण्यावर आईच नाचते, अशी दृश्यंही पाहायला मिळताहेत. नात्यांमधला समजूतदारपणा, आदर कमी होतो आहे. त्यामुळेही घरं दुभंगताना दिसताहेत. तसंच, नाती जपताना संस्कार आणि धर्म याच्याशी फारकत घेतल्यास लव्ह जिहादला रोखणं अवघड आहे. त्यामुळे नाती जपत असताना स्वधर्माचं नेमकं ज्ञान, संस्कार याला पर्याय नाही.
2. लव्ह जिहादची वाढती विषवेल पाहता आणखी नियोजनबध्दरीत्या जागृती होण्याची गरज वाटते. हिंदू धर्मातून बाहेर जायला दरवाजे आहेत पण परतायला नाहीत, ही स्थितीही हळूहळू बदलतेय. लव्ह जिहादमधून सुटून आलेल्या मुलींशी लग्न करायला आम्ही तयार आहोत, असं सांगणारे तरुण पुढे येताहेत. अशा तीन मुलींची लग्ने करण्यात आली आणि ती यशस्वी झाली. हा शुभसंकेत वाटतो. याला चळवळीचे रूप यावं, असं वाटतं.


महत्वाचे लेख पुढील लिंकवर 
अपर्णा ताई यांनी स्वत:विषयी लिहिलेला लेख
 वादळाशी केला संसार 

लव जिहाद संबधी अपर्णा ताई यांची मुलाखत
लव्ह जिहादपासून वाचवणाऱ्या ताई 

Tuesday, April 28, 2020

अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन

सोलापूर । ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचे मंगळवारी सकाळी 11.45 वाजता अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.  पक्षाघाताचा झटका आल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्या 65 वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत.
मुलाचं शिक्षणपूर्ण होईपर्यंत फक्त घर सांभाळलं. मुलगा स्वावलंबी होताच 1996 मध्ये अपुरे शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचं वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरवलं. अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या. नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या. 2001पासून त्या सामाजिक कार्यात आहेत. 2008पासून ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदार्‍या’ या विषयांवर त्यांनी तीन हजाराहून अधिक भाषणं दिली आहेत. तुटणारी घरं वाचली पाहिजेत आणि लव्ह जिहादच्या आक्रमणापासून आपल्या मुलीबाळींना अन् स्त्रियांना वाचवलं पाहिजे, या भावनेने त्या कार्य करत होत्या.
महिन्यातून 26 ते 28 दिवस एसटी बसने प्रवास करून व्याख्याने देणार्‍या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांच्या भूमिकेवरून अनेकदा वादही झाले. सोलापुरातील पाखर संकुल, उद्योगवर्धिनी आदी संस्थांवर त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्रांसाठी महिला आणि इतर विषयावर त्यांनी पुष्कळ स्तंभलेखन केले. आपले संपूर्ण मानधन सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील पारधी मुलांच्या वसतीगृहासाठी देऊन अनेक वर्षे त्यांनी तेथील आश्रमशाळा उभी केली.

संन्यस्त जीवन जगणारी धाडसी गृहिणी


वादळाशी केला संसार 

लव्ह जिहादपासून वाचवणाऱ्या ताई 

Tuesday, January 14, 2020

विवेकानंदांनी शिकागोत सांगितलेला विचारच आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुळाशी

ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी ग्रंथ प्रकाशनात भाऊ तोरसेकर यांचे मत

ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी ग्रंथ प्रकाशन
ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी ग्रंथ प्रकाशन
पुणे । एकांतिक धर्मीयांच्या छळाला कंटाळून स्वत:चा धर्म आणि जीव वाचवण्यासाठी जगातील इतर देशातून पळून आलेल्या जीवांना ज्या देशाने सदैव आश्रय दिला त्या देशातून आल्याचे व त्या सहिष्णू हिंदू धर्माचा प्रतिनिधी असल्याचे स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या भाषणात ठासून सांगितले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्यातून तोच विचार नरेंद्र मोदी कृतीत आणत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी केले.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी