Saturday, June 5, 2010

डॉ. भूषणकुमार


...त्यांनी मन जिंकले !
सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून आपल्या अभिनव कार्यपद्धतीचा ठसा उमटविणारे डॉ. भूषणकुमार उपाध्याय. आता त्यांची पदोन्नतीवर बदली होत आहे. त्यानिमित्ताने...
बिहार विद्यापीठातून संस्कृत विषयात एम.ए. करणारे आणि सुवर्णपदक मिळविणारे, संस्कृत ध्वनीविज्ञान या विषयावर पीएच.डी. करणारे डॉ. भूषणकुमार उपाध्याय. ते मूळचे बेदीबन-मधुबन, चंपारण्य बिहार येथले. विद्यार्थी दशेत असताना त्यांच्या वडिलांना निष्कारण, अपराध नसताना पोलिसी त्रासाला सामोरे जावे लागले. परिणामी "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद आचरणातून साकारण्याचा संकल्प विद्यार्थी दशेतल्या भूषणकुमार यांनी केला आणि त्यांची पुढील वाटचाल सुरू झाली.
मानस व्यवस्थापक असलेल्या डॉ. भूषणकुमार यांच्या कार्यपद्धतीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा वेध केवळ वरवरच्या निकषांनी करणे अपुरे राहील. त्यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांची भाषणे आणि त्यांच्या कार्याची शैली या तीनही बाबींचा एकत्र विचार केला, तर त्यांच्या यशाचे रहस्य उलगडेल.
डॉ. भूषणकुमार हे केवळ संस्कृतचे पंडितच नाहीत, तर ते उर्दूचे चांगले जाणकारही आहेत. उर्दूवर त्यांचे चांगले प्रभुत्व आहे. हिंदुत्वावर श्रद्धा असणाऱ्या कार्यकर्त्यांना ते जेवढे जवळचे वाटतात, तेवढेच ते धर्मप्रेमी मुस्लिमांना देखील जवळचे वाटतात. दलित संघटनाच नव्हे तर इतरही छोट्या-मोठ्या संस्था, संघटनांना डॉ. भूषणकुमार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम राबविताना आनंद मिळतो. लोकांत इतका मिसळलेला, लोकांची मने जाणणारा व जिंकणारा हा सोलापुरातला पहिलाच पोलीस अधिकारी असावा.
डॉ. भूषणकुमार हे मनाच्या शक्तीचे मोठे अभ्यासक आहेत. जगातील मोठ्या जनसमुदायावर, जनमानसावर दीर्घकाळ अधिराज्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्ण, भगवान बुद्ध, भगवान महावीर, येशू ख्रिस्त, मुहम्मद पैगंबर, स्वामी विवेकानंद, अल्बर्ट आईन्स्टाईन, सिग्मंड फ्रॉईड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. गांधी या महापुरुषांच्या जीवनकार्यांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. "जगज्जेते ...त्यांनी मन जिंकले' हे त्यांचे पुस्तक अभ्यासले तर ध्यानात येते की, स्वत:च्या हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगूनही त्यांनी अन्य धर्मांतील मानवाला उपकारक मूल्यांबद्दल कशी श्रद्धा व्यक्त केलीय.
कुराण आणि बायबल या धर्मग्रंथांमधील सकारात्मक जीवनविचार प्रभावीपणे मांडण्याची डॉ. भूषणकुमार यांची हातोटी अद्‌भूत आहे. त्यामुळेच अन्य धर्मीयांमध्येही त्यांच्याप्रति आदराची भावना आहे, परंतु असे असले तरी धर्मांध प्रवृत्ती ठेचण्यासही ते हयगय करीत नाहीत. मुल्लाबाबा टेकडीसारख्या ठिकाणी प्रसंगी मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन करणे असू द्या किंवा सोन्या मारुतीसमोरील मशिदीचे रस्त्याच्या कडेने सुरू असलेले अनधिकृत बांधकाम थांबविणे असू द्या (3 एप्रिल 2009), समाजात अशांती उत्पन्न करणाऱ्या प्रवृत्ती उफाळूच नयेत, यासाठीचा त्यांचा प्रयत्न असतो, परंतु योग्य वेळी दंडुक्याचाही वापर ते आवर्जून करतात. गेल्याच महिन्यात एका दुकानदारावर हात उगारणाऱ्या एका मंडळाच्या मुजोर कार्यकर्त्यांची घटनास्थळीच धुलाई केली, हे सोलापूरकरांना स्मरत असेलच.
सोलापुरातील एका मदरशात कापण्यासाठी गायी आणल्या होत्या. त्यावेळी गायी खाटकांनाच द्याव्यात यासाठी एक आमदार महाशय प्रयत्नरत होते. तेव्हा न्यायालयीन प्रक्रियेतून गायी सोडविण्यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. (11 डिसें. 2008)
हिंदुत्व चळवळीचे कार्यकर्ते वेगवेगळ्या निमित्ताने त्यांना भेटायला जातात, तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असतो, "बाबारे, तू भगवद्‌गीता वाचलास का? वेद पाहिलेस का? उपनिषदे, जी आपल्याला शक्ती देतात, ते कधी समजून घेतलास का? स्वत: धर्माचरण करणे हे धर्मरक्षणच नाही का?'
खरे आहे त्यांचे. एकांतिक धर्माचे लोक धर्मांतरणासाठी विविध प्रयत्न करीत असतात. जिहादी मानसिकतेतून अनेक देशबाह्य शक्ती पद्धतशीरपणे काम करीत असतात. अशावेळी हिंदुत्वाचे हंगामी प्रेम अंगात संचारलेले तरुण मिरवणुकांच्या वेळी केवळ गुलाल उधळण्यात आणि विशिष्ट ठिकाणी, की जिथे आधीच पोलीस बंदोबस्त असतो, हुल्लडबाजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात; यातून काय साध्य होणार आहे? लक्षावधी रुपयांची वर्गणी गोळा होते, त्यातून भगवद्‌गीता, उपनिषदे लोकांपर्यंत पोचविता येणार नाहीत?दारिद्र्यात पिचलेल्यांना प्रेमाचा हात दिला तर ते धर्मांतराला का बळी पडतील बरे?
भारतीय विचारधारा, संस्कृती सर्वसमावेशक आहे. इतर धर्माप्रति सहिष्णुता हे केवळ हिंदू धर्माचेच वैशिष्ट्य आहे. आमचे पूर्वज खूप महान होते! भारत हा पूर्वी वैभवशाली होता. हे सारे खरे आहे, परंतु असे असूनही आम्ही दीड हजार वर्षे अन्य धर्मींयाच्या पायी का चिरडलो गेलो? असा मूळ प्रश्न ते करतात. आपण कुठे चुकलो, याची चिकित्सा करणारी पुस्तके निर्माण होत नाहीत, ही त्यांची व्यथा आहे. ते सांगतात की, आजवर भारत देशात केवळ दोनच महापुरुष होऊन गेले की, ज्यांनी आपण कुठे चुकलो, याची परखड आणि मूलगामी मीमांसा केली आहे. ते दोन महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर होत. या दोन्ही महापुरुषांचे विचार तरुणांनी अभ्यासून आत्मसात केले पाहिजेत. डॉ. भूषणकुमार यांच्याशी चर्चा केल्यानंतर ध्यानात येते की, त्यांचे समाजाच्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर चिंतन आहे, अभ्यास आहे, काही योजनाही आहेत. ते शासकीय पदावर असल्यामुळे काही विषयांवर बोलण्याला मर्यादा असल्याचे ते मान्यही करतात. त्यांच्या कार्यशैलीबद्दल कमी शब्दांत सांगायचे तर याठिकाणी ऑर्गनायझर या नियतकालिकात मध्यंतरी प्रकाशित झालेल्या बातमीचे उदाहरण देता येईल. उत्तर भारतातील एका राज्यात (बहुधा उत्तराखंड)30 हून अधिक पोलीस ठाणी अशी आहेत की, जिथे गेल्या 5 वर्षांत एकही गुन्हा नोंद झालेला नाही. तेथील समाजात असलेले सामंजस्य महत्त्वाचे आहे. असे सामंजस्य हे केवळ दंडुक्याच्या धाकाने नाही, तर लोकांची मने संस्कारित केल्याने आणि नाठाळांना दंडित करून गुंड प्रवृत्तीला धाकात ठेवल्याने येत असते. हेच आहे मनाचे व्यवस्थापन. भलेही सोलापुरातील घरफोडी आणि इतर गुन्हे शंभर टक्के कमी झाले नसतील... पण तसा प्रामाणिक प्रयत्न आपल्या साऱ्या क्षमता पणाला लावून डॉ. भूषणकुमार यांनी केल्याचे दिसते. त्यांच्या बदलीच्या वृत्ताने या प्रवृत्तीला आनंद झाल्याच्या वार्ताही येत आहेत. असे विचारी, अभ्यासू आणि समर्पित पोलीस अधिकारी आणखी मोठ्या स्थानी पोचले पाहिजेत. पोलीस दलाची ध्येय-धोरणे ठरविणारी चमू जेव्हा अशा अधिकाऱ्यांची असेल, तेव्हा त्याचा दूरगामी आणि सकारात्मक परिणाम होईलच होईल! डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना त्यांच्या उज्ज्वल कारर्कीदीसाठी "तरुण भारत' परिवाराकडून शुभेच्छा!

Tuesday, June 1, 2010

"शांतीदूत' येशूचे बंदूकधारी शिष्य

अरुणाचल प्रदेश हा भारताचा सौभाग्यालंकार आहे. सूर्यनारायणाची चाहूल भारतात पहिल्यांदा याच प्रदेशाला लागते. निसर्गरम्य असलेल्या या प्रदेशावर कपटी चीनचा डोळा आहे. सुमारे 55 हजार चौरस किलोमीटरची भारतभूमी गिळंकृत करूनही चीनची मुजोरी थांबलेली नाही. चीनमधल्या शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांतून अरुणाचल हा चीनचा भूप्रदेश असल्याचे व भारताने बळकवल्याचे शिकविले जाते. चीनच्या कुरापत्या कमी म्हणून की काय ख्रिस्ती मिशनऱ्यांनी गेल्या तीन दशकांपासून अरुणाचलात उच्छाद मांडला आहे.

Wednesday, May 26, 2010

बुद्धं शरणं गच्छामि।

विकासाचा दर वाढतोय. तसं पाहिलं तर महागाई, फुटिरता, दहशत आणि हिंसाही वाढत आहे. हे सारंं विकासाची देणगी असल्याचंही म्हटलं जातं आहे. मनाची समजूत घालण्यासाठी असं विचार करणं ठीक आहे, परंतु ज्या प्रक्रियेचे हे सर्व अनिवार्य परिणाम आहेत, त्याला विकास म्हणता येईल का? याला वित्तवृद्धीतून आलेली समृद्धीही म्हणता येणार नाही.
श्री आणि समृद्धी यांमध्ये साधनसामग्री आणि पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच संपूर्ण समाजाची सुख, शांती व निर्भयताही अंतर्भूत असते, परंतु आज तर समाजाची शकलं उडताना दिसत आहेत. माणूस हा विकासाचा आधार मानला गेला आहे. माणूस हा एकटा राहू शकत नाही, तो तर कुटुंब, समाज आणि राष्ट्राचे नैसर्गिक अंग आहे, याचे विस्मरण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. जोवर मन-वाचा-कर्माने ही भावना विस्तारित होणार नाही, तोवर खरा विकास होणे शक्य नाही! परंतु आज अर्थव्यवस्था असो वा न्यायव्यवस्था, ते समाज आणि कुटुंबव्यवस्था तोडण्याचे काम करीत असल्याचे दिसते. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावावर करण्यात येत असलेल्या तथाकथित सुधारणा या व्यक्तीलाच आतून पोखरून काढत आहेत.
राजकारणात तर स्वार्थासाठी समाजाचे तुकडे-तुकडे करण्यालाच सफलता मानण्यात येऊ लागले आहे. बहुपक्षीय निवडणूकप्रणालीत सर्वाधिक मते मिळवणे म्हणजेच विजयी होणे असल्यामुळे तेथे सर्व काही तोडण्या-फोडण्यावरच आधारलेले असते. 100 च्या लोकसंख्येत समजा आपला गट 20 चा आहे, तर इतरांना इतक्या छोट्या-छोट्या तुकड्यांत विभागून टाका की, 20 वालाच सर्वात मोठा गट राहील. परिणामी करण्यात आलेल्या मतदानापैकी 22 प्रतिशत मते घेऊन आमचे प्रतिनिधी संसदेत जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची धोरणं निर्धारित करतात. यात सुधारणा करणे सहज शक्य आहे. 50 प्रतिशतपेक्षा किमान 1 मत अधिक घेणाराच विजयी असेल, असा नियमच केला पाहिजे. असे झाले तर मग जाती, भाषा आणि अन्य गोष्टींवरून समाज तोडणारे हेच सारे स्वार्थी राजकीय नेते आपल्या विजयासाठी समाज जोडण्याचे काम करू लागतील.
आपली इतिहासाकडे पाहण्याची दृष्टीदेखील याच व्यक्तिवादी दृष्टिकोनाने ग्रासली गेली आहे. यामुळेच आपण आपल्या महापुरुषांचे वर्णन आणि मूल्यमापन दोन्हीही व्यक्तिगत उपलब्धंींच्या आधारेच करतो. भगवान गौतम बुद्ध यांना त्यांच्या त्याग, साधना, बोध आणि करुणा यासाठी स्मरले जाते, परंतु त्यांचा मुख्य विचार तर व्यक्तिकेंद्रित कर्मकांड आणि त्यामुळे समाजात आलेल्या अंध रूढींच्याप्रति विद्रोह होता. त्यांच्याच अनुयायांकडून सर्वाधिक अन्याय जर कोणत्या महापुरुषावर झाला असेल, तर तो बुद्धांवरच होय. ज्या बुद्धाने मूर्तिपूजेच्या अज्ञानाचा जीवनभर विरोध केला, आज मूर्तींच्या बाबतीत सारे विश्व-कीर्तिमान, बुद्ध मूर्तींच्या नावानेच आहेत. साक्षात करुणेची प्रतिमूर्ती भगवान बुद्धांचे अनुयायी त्यांच्या नावावर विद्वेषाचे समाजकारण करताना दिसत आहेत. राज्याचा त्याग करून ज्ञानाची साधना करणाऱ्या बुद्धाच्या नावावर नोटांचा हार घालून सत्तेचे राजकारण सुरू आहे. भगवान बुद्धांचा मुख्य संदेश त्यांच्या मंत्रात सामावला आहे -
बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि।
संघं शरणं गच्छामि।।
हाच चिरंतन विकासाचा मूलमंत्र आहे. माणसाने आपला अहं आणि स्वार्थ ज्ञानाच्या शरणात न्यावा. याचे व्यवस्थारूप माध्यम आहे- संघटनेला शरण जाणं आणि अशा संघटनशक्तीनेच संपूर्ण मानवता धर्माच्या सिद्धांताना शरण जाऊन खऱ्या अर्थाने विकास साधू शकेल. या त्रिसूत्रीय मंत्रावर आधारित गणतंत्र, राजतंत्र आणि समाज निर्माणातूनच मानवी समस्यांचे दूरगामी निदान आणि समाधान शक्य आहे. याच महिन्यात जयंती असलेल्या वि.दा. सावरकर आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनातूनही हाच संदेश ध्वनित होतो.
- सिद्धाराम भै. पाटील
9325306283

Sunday, May 9, 2010

"कसाब' निर्मिती कारखान्याचे काय ?


कसाबला शिक्षा म्हणजे दरोडेखोराच्या पोराला शिक्षा. खरा सूत्रधार तर पाकिस्तान आहे. कसाबला तयार करून, प्रशिक्षित करून आमच्या घरात अराजक माजविण्यासाठी धाडणारा दहशतवादी राक्षस तर पाकिस्तानच आहे. अर्थात कसाबला फासावर लटकवलेच पाहिजे, परंतु पाकिस्तानलाही धडा शिकविला पाहिजे.

अखेर कसाबला फाशीची शिक्षा झाली. एखाद्याने वाईट हेतूने दुसऱ्याचे घर जाळले तर त्या माणसाला शिक्षा होऊ नये. कारण काडीपेटीमुळे आग लागली. काडीपेटीला शिक्षा होणे महत्त्वाचे, अशीच भूमिका कसाबप्रकरणी भारतातील पाकप्रेमी मीडियाने जणु घेतली आहे. पाकिस्तानात 10 हजार "कसाब' मदरशांमधून प्रशिक्षण घेत आहेत, असे वृत्त नुकतेच अमेरिकेहून आल्याचे प्रसिद्ध झाले आहे.
भारतीयांची कत्तल करण्यासाठी अनेक कसाब पाकिस्तान पाठवीत असतानाही पाकप्रेमाने झपाटलेल्या भारतीय मीडियाचे हृदय मात्र भारत-पाक शांतीवार्तेसाठी तीळ-तीळ तुटत आहे. एकपात्री प्रयोग करावा तसे जणु कसाबने एकट्यानेच 26/11 ची योजना आखली आणि ही स्टोरी त्याच्यासोबत सुरू झाली अन्‌ त्याच्यासोबतच संपणार असे वातावरण तयार करण्यात येत आहे. असे करून आपण मूळ प्रश्नाकडेच दुर्लक्ष करीत आहोत किंवा असे करण्याची व्यवस्था भारतविरोधी कारस्थानाला बळी पडून आपली मीडिया आणि स्वार्थी राजकारणी करीत आहेत असे वाटते.
पुढील उदाहरणावरून ही बाब अधिक स्पष्ट होईल. सकाळची वेळ आहे. बंगळूरू महामार्गावर मोठे वडाचे झाड कोसळले आहे. रस्ताच बंद झाल्याने वाहतूक खोळंबली आहे. दोन्ही बाजूंनी 8-10 किलोमीटरपर्यंत वाहने थांबली आहेत. तिथे एकच चर्चा आहे - वारा नाही, पाऊस नाही तरी चांगले झाड कोसळले कसे? दुसऱ्या दिवशी छायाचित्रासहित प्रथम पृष्ठावर वृत्त झळकले आहे. काही दिवसांनी याविषयी एक चार ओळींचे वृत्त आतील पानात प्रसिद्ध झाले आहे. झाडाला खूप दिवसांपूर्वी वाळवी लागली होती, असा अहवाल वनस्पती शास्त्राच्या तज्ज्ञांनी दिल्याचे दुसऱ्या वृत्तात म्हटले आहे.
पहिल्या वृत्ताची खूप चर्चा झाली, पण दुसऱ्या वृत्ताची नाही. असेच असते. "परिणाम' मोठे असतात आणि "कारण' सूक्ष्म. परिणामांची चर्चा खूप होते, कारणांची नाही. कसाबची खूप चर्चा होईल, परंतु कसाब निर्माण झालाच कसा याची चर्चा होत नाही. पाकिस्तानातील ओकारा जिल्ह्यातील फरीदकोट या छोट्या गावातील एक पोर असं कृत्य करण्यास तयार होतंच कसं?
दहा हजार "कसाब' तयार होताहेत, त्यांची प्रेरणा काय?
इस्लाम हा शांततेचा धर्म आहे, असे विचारी लोक म्हणतात, परंतु पाकिस्तानातून भारतात येणारे अतिरेकी त्यांना शिकविलेल्या "इस्लाम'साठीच जीवावर उदार होऊन येतात, हे का समजून घेतले जात नाही. आजारच समजला नाही तर उपचार कसे करणार?
आजार समजला नाही तर स्वत:ला धर्मनिरपेक्षवादी समजणारे, अतिरेक्यांना धर्म नसतो म्हणणारे स्वार्थी राजकारणी अफजल गुरूसारख्या देशद्रोह्याला मुस्लिमांची मते जातील या भयाने फासावर लटकविण्यासाठी घाई करणार नाहीत. कसाबचा फासावर जाण्याचा क्रमांक 30 वा की 50 वा, यावर घोळ घालतील. कसाबची देखभाल करण्यावर 35 कोटी खर्च केल्याची लाजही वाटणार नाही. कसाबला भर चौकात फाशी झाली पाहिजे, असे म्हणत निवडणुकीत मात्र कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांना मतं द्यायला संकोच वाटणार नाही. केवळ चर्चा होत राहील. वृत्तपत्रांची पाने कसाबविषयीच्या वृत्ताने रंगत जातील. चर्चा... 24 तास बातम्या... अन्‌ केवळ शब्दांचे बुडबुडे...
मीडियातली चर्चा वांझ असते. आता येथेच पाहा ना. आयपीएल वरून केवढा हंगामा झाला. क्रिकेटच्या खेळाविषयी असलेल्या भारतीयांच्या वेडेपणाचे शोषण करीत अरबो रुपयांचा काळा धंदा. या धंद्यात सहभागी मोठे राजकीय नेते, उद्योगपती, चित्रपटातील अभिनेते, सट्टेबाज सारेच ग्लॅमर आणि मादक चिअरबालांचे आस्वाद घेत होते. क्रीडा राज्यमंत्री शशी थरूर आणि ललित मोदी यांचा बळी गेल्यानंतर शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे वस्त्रहरण होण्याची पाळी आली तेव्हा चर्चा एकाएकी थांबली. आता कोठे दिसतात का आयपीएल घोटाळ्याच्या बातम्या?
होय काही दिवसांत अफजल गुरूप्रमाणे कसाबही चर्चेतून मागे पडेल. पुन्हा एखादा हल्ला... पुन्हा नवीन कसाब... हे चक्र. हा प्रश्न गेल्या 1200 वर्षांपासून आपल्या देशाला छळत आहे. घौरी-अब्दालीसारख्यांनी हजारोंची कत्तल केली. बाबराने भारतीयांचे श्रद्धाकेंद्र उद्‌ध्वस्त केले. अफजल खानाने तुळजाभवानीवर आघात केला. 1920 साली केरळात मोपल्यांनी केलेल्या नरसंहाराने प्रेते कुजून विहिरी आणि तळ्यांना दुर्गंधी सुटली. मंदिरे चक्काचूर झाली. 1947 साली लाखो भारतीयांना आपल्याच भूमीतून परागंदा व्हावे लागले.
या देशाचे तुकडे पडले. हजारोंची कत्तल झाली. भारताच्याच भूमीवर उगवलेल्या बांगलादेशात गेल्या 60 वर्षांत 25 प्रतिशत असलेले हिंदू 5 प्रतिशतवर आले. संसदेवर हल्ला, अक्षरधामवर हल्ला, संकटमोचन हनुमान मंदिरावर हल्ला, दिल्ली बंगळूरू, पुणे, मुंबई... या प्रश्नाचे वास्तव स्वरूप आणि तो सुटण्याचा व्यावहारिक मार्ग याचे इतिहासाच्या प्रकाशात आम्ही चिंतन केलेच नाही.
दुसऱ्यांच्या धर्माचा, उपासनापद्धतीचा आदर केलाच पाहिजे, नव्हे तीच आपली संस्कृती आहे, परंतु इस्लामचे नाव घेत मानवतेवर घाला घातला जात असेल तर भारताने या स्वयंघोषित इस्लामी धर्मयोद्धयांना अल्लाच्या घरी (यमसदनी नव्हे) पाठविण्याची व्यापक रणनीती आखली पाहिजे. खऱ्या अर्थाने शांतताप्रिय असणाऱ्या मुस्लिमांना बळ दिले पाहिजे. अफजल गुरूसारख्याला फाशी दिल्याने मुसलमान दुखावतील असे येथील राज्यकर्ते समजत असतील तर तो इस्लामचा अपमान आहे. या अपमानाविरुद्ध त्याच त्वेषाने (जसे की पैगंबरांचे व्यंगचित्र काढल्यावरून गुरुवारी धुळ्यात दंगल घडवली गेली.) मुसलमानांनी समोर आले पाहिजे, परंतु हे सारे तेव्हाच वास्तवात येईल जेव्हा दहशतवादाची गटार असलेल्या पाकिस्तानविरोधात आणि आपल्या देशातही जिहादची विषवेल पोसणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलू.
पाकिस्तान जोवर आपली बिघडलेली पोरं प्रशिक्षित आणि शस्त्रसज्ज करून भारतात पाठविणे आणि प्रशिक्षण केंद्रे थांबत नाही तोवर भारताने सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार बंद केले पाहिजेत. चांगलं बोलता येणाऱ्या प्रवक्त्यांना प्रशिक्षण देऊन जागतिक स्तरावर पाकिस्तानला उघडं पाडलं पाहिजे. काश्मिरात आणि भारतात इतरत्र सुरू असलेले हिंसेचे थैमान पाकने कसे सुरू ठेवले आहे, हे योग्यप्रकारे जगासमोर आणले गेले पाहिजे. चित्रपट, मीडिया आणि इतर माध्यमांतून पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणला पाहिजे.
भारत आणि अमेरिकी जनतेसाठी पाकिस्तान धोकादायक कसा आहे हे अमेरिकी जनतेला तेथील माध्यमांतून प्रभावीपणे सांगत राहिले पाहिजे. नकली ओबामांपेक्षा त्या देशातील जनता हा धोका चांगल्यारीतीने समजू शकते. तेथील जनतेचा विरोध सुरू झाला की, व्हाईट हाऊसला धोरण ठरवताना दहादा विचार करावा लागेल.
भारतीय कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती करीत देशविरोधी कारवाया करणाऱ्यांसाठी स्वतंत्र न्याययंत्रणा निर्माण केली पाहिजे. रामदेवबाबा म्हणतात त्याप्रमाणे फाशी झालेल्यांवर दया दाखविण्याचा अधिकार राष्ट्रपतींनाही असता कामा नये.
भारतीय गुप्तचर खात्यात नव्याने प्राण फुंकले पाहिजे. पोलीस दलालाही अतिरेकी विरोधी कारवायांसाठी प्रभावी प्रशिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. अमेरिकी पोलिसांनी टाईम्स चौकातील बॉंबप्रकरणी काही सेकंदांत विमानतळावर पाकी अतिरेक्याला ताब्यात घेतले. कराचीत जाऊन मशिदीतून अतिरेक्याला जेरबंद केले. अमेरिकेकडून भारतीय पोलिसांनी शिकण्यासारखा हा बिंदू आहे.
अतिरेकीविरोधी जाळे भक्कम करण्यासाठी इस्त्राईलची मदतही घेता येईल. हे सर्व करण्याची जबाबदारी अर्थातच आपल्या राज्यकर्त्यांची आहे, परंतु कोणत्याही देशाला जे राज्यकर्ते मिळतात, ते त्या देशात राहणाऱ्या लोकांच्या लायकीनुसारच. म्हणूनच भारतीय लोकांमध्ये पातळ होत असलेली राष्ट्रनिष्ठा आणखी प्रबळ करण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील. अन्यथा लव्ह जिहादला बळी पडून माधुरी गुप्तासारखे महत्त्वाच्या स्थानावरील या देशाचे अधिकारीही भारताचा जन्मजात शत्रू असलेल्या पाकिस्तानला राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित महत्त्वाची माहिती देत राहतील आणि यातून भारतीयांचे मुडदे पडतील. भारतात दर सहा तासाला एक तरुणी लव्ह जिहादला बळी पडत असतानाही आपण डोळ्यांवर "सर्व धर्म समान'ची कातडी पांघरून बसू. "माय नेम इज खान'पासून स्लॅमडॉगमिलेनियर चित्रपटापर्यंत हिंदू तरुणी आणि मुस्लिम तरुणांच्या प्रेमकथा सजतील. याचे कोणाला काहीही वाटणार नाही.
थोडक्यात सांगायचे तर शत्रू विविध रूपाने, विविध माध्यमांतून या देशाचे लचके तोडू पाहतोय. एका कसाबला शिक्षा दिल्याने भारतात सुख-शांती नांदेल असे बिलकुल नाही. कसाबला फाशी म्हणजे "कसाब'च्या केसाला फाशी दिल्यासारखे आहे. पाकिस्तानातील आणि भारतातील "कसाब' निर्माण करणारे कारखाने बंद करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. अन्यथा असे अनेक कसाब पाकिस्तानच्या जिहादी डोक्यातून उगवतच राहतील. कसाबसारख्या देशद्रोह्यांना त्वरित फासावर लटकविण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी ठरवले तर एका दिवसात तसा विशेष नियम बनविता येईल, पण सर्वपक्षीय खासदार तसे करतील? तसे झाले तर ती समस्त भारतविरोधी शक्तींसाठी मृत्यूघंंटाच ठरेल.
www.psiddharam.blogspot.com
9325306283
kasab, islam, 26/11

Wednesday, March 31, 2010

डॉ. बाबासाहेब यांचे विचारधन

ज्या भूमीने व्यास, कपिल, कणाद, गौतम, चार्वाक, महावीर आणि बुद्ध यांच्यासारखे श्रेष्ठ तत्त्ववेत्ते निर्माण केले आणि बोैद्ध धर्मासारखी उदात्त देणगी जगाला दिली, त्या या थोर भूमीचा मी दूत आहे आणि तिचा तो श्रेष्ठ वारसा चालविण्याची जबाबदारी माझ्यावर आहे। मी महाराष्ट्रीय नाही किंवा महारही नाही. मी भारतीय आहे आणि माझ्या या जन्मभूमीचे पांग फेडण्यातच माझ्या जीवनाचे सार्थक आहे.

ब्राह्मणांशी माझे काही वैर नाही। माझा विरोध दुसऱ्यांना हीन समजण्याच्या द्‌ुष्प्रवृत्तीला आहे. भेदभाव मानणाऱ्या ब्राह्मणेतरांपेक्षा नि:पक्ष वृत्तीचे ब्राह्मण मला अधिक जवळचे वाटतात. आपल्या आंदोलनात सहकार्य देणाऱ्या अशा ब्राह्मणांना मी दूर लोटू शकत नाही.

आज जरी आम्ही राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या गटांत विभागले गेलो तरी मला खात्री आहे की, अनेक जाती-पंथ असूनदेखील आम्ही "एक राष्ट्र' म्हणून उभे राहू। एक दिवस असाही येईल की, फाळणीची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगला पण "अखंड हिंदस्थान'च आपल्या हिताचा वाटू लागेल.

माझे सामाजिक तत्त्वज्ञान हे निश्चितपणे तीन शब्दांत गुंफले जाण्याचा संभव आहे। ते शब्द म्हणजे स्वातंत्र्य, समता व बंधुभाव. तथापि, हे माझे तत्त्वज्ञान फें्रच राज्यक्रांतीपासून मी उसने घेतले असे कोणीही समजू नये. माझ्या तत्त्वज्ञानाची मुळे धर्मात आहेत, राज्यशास्त्रात नाहीत. माझा गुरू बुद्ध, याच्या शिकवणुकीपासून ते मी काढले आहे.

जगण्याचे अनेक मार्ग आहेत, पण ते सारेच सारख्या मान्यतेचे आहेत असे नाही। शत्रू आला असता, त्यावर चाल करून त्याचा पाडाव करणे हा जगण्याचा एक मार्ग आहे. तसेच त्याला शरण जाऊन तो घालील त्या अटींवर जगणे हा जगण्याचा दुसरा मार्ग आहे. दोहोंपैकी कोणत्याही मार्गाने गेले असता जगणे होतेच, पण एका परीचे जगणे हे दुसऱ्या परीच्या जगण्यापेक्षा फार निराळ्या तऱ्हेचे असते. एक मानवाचे जिणे आहे, तर दुसरे किड्याचे जिणे आहे.

देशाच्या राज्यकारभारात प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्षरीतीने भाग घेऊन तो आपल्या ध्येयास अनुकूल बनविल्याशिवाय कोणत्याही गांजलेल्या वर्गास आपली दु:खे दूर करता येणार नाहीत। दुसरा कोणी आपल्या हिताकरिता काही करील, या आशेवर जर गांजलेला व पिळला गेलेला वर्ग विसंबून राहील, तर तो तोंडघशी पडल्याशिवाय राहणार नाही.

आपल्याला ज्या मार्गाने जावयाचे आहे, तो मार्ग चिरस्थायी असावा। जो मार्ग अराजकतेकडे जातो, जो जंगलाकडे नेतो, असा मार्ग अनुसरण्यात काही अर्थ नसतो. जो मार्ग आपणास आपल्या इसिप्त ध्येयाप्रद सुरक्षित पोचवितो, जो आपले जीवन बदलवितो, असा मार्ग कितीही लांबचा असला तरी तो जवळच्या मार्गापेक्षा निश्चितच श्रेयस्कर असतो.

कार्ल मार्क्स अगर कम्युनिस्ट-कम्युनिझमचे ध्येय साध्य करण्याकरिता म्हणजेच गरिबी निवारण्यासाठी, खाजगी मालमत्ता नष्ट करण्यासाठी विरोधकांची हत्या करणे, त्यांना ठार मारणे हे साधन वापरू इच्छितात आणि येथेच बुद्धिझम आणि कम्युनिझममधील मूलभूत फरक आहे। भगवान बुद्धाचे मार्ग लोकांना हिंसेपासून परावृत्त करण्याचे, युक्तिवादाने पटवून देण्याचे, नैतिक शिकवण देण्याचे व ममतेचे आहेत. कम्युनिस्ट पद्धती ही पाशवी शक्तीवर आधारलेली आहे. कम्युनिस्ट पद्धती रशियन लोकांनी राजीखुषीने स्वीकारलेली नाही. त्यांनी ती भीतीमुळे स्वीकारलेली आहे. यादृष्टीने पाहिले तर बुद्धिझम शुद्ध लोकशाहीवादी आहे. अभ्यासू वृत्तीने बुद्धिझम व कम्युनिझमचा दीर्घकाळ अभ्यास करून मी या ठाम निर्णयास आलो आहे की, मनुष्यमात्राचे दु:ख निवारण्यासाठी जो बुद्धाने उपदेश केला आहे व जी पद्धती सांगितली आहे, ती अतिशय सुरक्षित व पक्की आहे.

शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे प्रत्यक्ष कारण जमिनीची लहान-लहान तुकड्यांनी होणारी विभागणी हे असून, त्यामुळे तिथे हे भांडवल गुंतवण्यास व सुधारलेल्या पद्धतीने शेती करण्यास वाव मिळत नाही। जमिनीचे तुकडे व त्यामुळे शेतकरीवर्गात वावरणारे दारिद्र्य याचे मुख्य कारण म्हणजे वाढत्या लोकसंख्येला केवळ जमिनीवरच अवलंबून राहावे लागते हे होय आणि जमिनीवर अवलंबून राहणाऱ्या जादा लोकसंख्येच्या पोषणाची शेतीव्यतिरिक्त इतर व्यवसायात तजवीज लावल्यावाचून शेतकऱ्यांचे दारिद्र्य हटणार नाही. म्हणून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व त्यांची उत्पादनशक्ती वाढविण्यासाठी उद्योगधंद्यांची वाढ करणे हे मुख्य साधन आहे. चालू उद्योगधंद्यांचे पुनरुज्जीवन आणि कच्च्या मालाच्या अनुरोधाने नव्या उद्योगांची निर्मिती या दोन्हींची आवश्यकता आहे.

हिंदी मुसलमानदेखील एक अजब चीज आहे। सर्व सामाजिक सुधारणेचे त्याला वावडे आहे. हिंदुस्थानाबाहेरील त्याचे धर्मबंधू समाजक्रांतीवादी बनले आहेत. राष्ट्राच्या व मानवी जीवनाच्या सामाजिक प्रगतीला अडथळा करणाऱ्या सर्व चालीरीतींचा मुस्ताफा केमाल पाशासारख्या मुसलमान देशभक्ताने धुव्वा उडवून दिला आहे, पण हिंदी मुसलमानांना मौ. शौकतअल्लीसारख्या देशभक्त व राष्ट्रीय हिंदी मुसलमानांनादेखील केमालपाशा व अमानुल्ला आवडत नाहीत. कारण ते सुधारक आहेत आणि हिंदी मुसलमानांच्या धार्मिक दृष्टीला सुधारणा हे तर महत्पाप वाटते.

पाश्चिमात्य राष्ट्रे पौर्वात्य राष्ट्रांकडे चढेल दृष्टीने पाहतात, ह्याचे कारण त्यांचे आर्थिक नि औद्योगिक बळ हेच होय. यास्तव माझे असे मत आहे की, भारताची जेव्हा आर्थिक नि औद्योगिक शक्ती वाढेल, तेव्हा साम्राज्यवाद नि काळ्या-गोऱ्यांचे वाद हे मिटतील.
माझी दैवते तीन आहेत। पहिले दैवत विद्या होय. विद्येशिवाय माणसाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. दुसरे दैवत विनय होय. मी कोणाची याचना केली नाही. माझे ध्येय असे आहे की, माझं पोट भरलं पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवा केली पाहिजे. माझे तिसरे दैवत म्हणजे शील होय. माझ्या आयुष्यात मी दगाबाजी, फसवणूक, आत्मसिद्धीकरिता पाप केलंं असं मला आठवत नाही. शीलसंवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे, हे सांगायला मला फार अभिमान वाटतो.

प्रस्तुतच्या लेखकाने समाजकार्याप्रीत्यर्थ जेवढा स्वार्थत्याग करणे त्यास शक्य होते, तेवढा स्वार्थत्याग त्याने केला। तो काही संस्थानिक नाही की जहागीरदारही नाही. काही झाले तरी द्रव्यानुकूलता नसता इंग्रज सरकारने देऊ केलेली दरमहा अडीच हजार रुपयापर्यंत वाढू शकणारी नोकरी त्याने नको म्हणून सांगितली. वकिलीसारख्या स्पृश्य लोकांवर अवलंबून असणाऱ्या धंद्यात विशेष किफायत मिळण्याची आशा नसताही केवळ समाजकार्य करण्यास मोकळीक असावी म्हणून त्याने तो मार्ग पत्करला आहे. रूढ धर्माचारातील आणि लोकाचारातील दोषांचे निर्भयपणे आविष्करण करण्याचे भयंकर कार्य हाती घेतले असल्यामुळे, देशाभिमानी व धर्माभिमानी म्हणविणाऱ्या पत्रांकडून होत असलेला शिव्यांचा व शापांचा भडिमार तो एकसारखा सोशित आहे. कवडीचा फायदा नसताना त्याने एक वर्षाच्या आत "बहिष्कृत भारता'चे बऱ्यावाईट रीतीने रकाने भरून काढून लोकजागृतीचे काम केेले व ते करताना त्याने आपल्या प्रकृतीकडे, सुखाकडे, चैनीकडे व ऐषारामाकडे न पाहता डोळ्यांच्या वाती केल्या.

मी प्रथम भारतीय आहे. मी तापट आहे. सत्ताधारी लोकांशी माझे अनेक खटके उडाले, राजकीय संघर्ष झाला, पण हे आमचे कौटुंबिक भांडण आहे. म्हणून मी परदेशात भारताबद्दल कडवट बोलणार नाही. देशहित प्रथम. मी माझ्या देशाशी कधीही द्रोह करणार नाही.
अस्पृश्यता ही मूर्तिमंत असमानता आहे। एवढी मोठी असमानतेची जागती ज्योत कोठेच दिसावयाची नाही. एका माणसाला दुसऱ्या माणसाने त्याला न शिवण्याइतका पतित लेखण्याची प्रथा हिंदू धर्माखेरीज व हिंदू समाजाखेरीज कोठेही सापडेल काय? ज्याच्या स्पर्शाने पाणी बाटते, ज्याच्या स्पर्शाने देव बाटतो, तो प्राणी मानवाच्या कोटीत गेला आहे असे कोणी म्हणेल काय? एवढा कलंक तुमच्या शब्दाला, तुमच्या शरीराला आहे.

धर्माची आवश्यकता गरिबांना आहे। पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे. गरीब मनुष्य जगतो तो आशेवर. जीवनाचे मूळ आशेत आहे. ही आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल? धर्म आशावादी बनवितो व पीडितांना, गरिबांना संदेश देतो- "काही घाबरू नकोस, जीवन आशावादी होईल.

ब्रिटिशसत्ता स्थिरावल्यापासून भारतात गेल्या शतकात एकंदर एकतीस दुष्काळ पडले व त्यात सुमारे अडीच ते तीन कोटी लोक भुकेने मेले. याचे कारण असे की, आपल्या देशात उद्योगधंदे व व्यापार यांची वाढ होऊ द्यायची नाही व हिंदुस्थानातील व्यापारी पेठा सदैव खुली राहावी, असे ब्रिटिश राज्यकारभाराचे बुद्धिपुरस्सर धोरण आहे. ब्रिटिशांनी सुधारलेली विधिपद्धती आणि सुव्यवस्था ह्यांची देणगी हिंदुस्थानास दिली ही गोष्ट खरी. तथापि मनुष्य केवळ विधीवर आणि सुव्यवस्थेवर जगत नाही, तर तो अन्नावरही जगतो.
तरुणांची धर्मविरोधी प्रवृत्ती पाहून मला दु:ख होते। काही लोक म्हणतात, धर्म ही अफूची गोळी आहे, परंतु ते खरे नाही. माझ्या ठायी जे चांगले गुण वसत आहेत, ते किंवा माझ्या शिक्षणामुळे, समाजाचे जे काही हित झाले असेल ते माझ्यासाठी असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय. मला धर्म हवा आहे. धर्माच्या नावाने चाललेला ढोंगीपणा नको.

राजकारण कोणास करावयाचे असेल, तर राजकारणाचा चांगला अभ्यास केला पाहिजे। आपल्या समाजातील प्रत्येक कार्यकत्यार्ंने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक या सर्व प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. ज्यांना पुढारी व्हायचे असेल, त्यांनी पुढाऱ्यांची कर्तव्यकर्मे व जबाबदारी काय आहे, याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे.

सत्तेचे राजकारण खेळण्यासाठी किंवा एखाद्या मंत्र्याची जागा रिकामी झाली असता ती आपणाकडे ओढून घेण्याची प्रधानमंडळातील सभासदात जी जिवापाड धडपड चालू होई, त्यापासून मी पूर्णपणे अलिप्त राहत असे। मूकावस्थेत राहून सेवा करणे हेच श्रेष्ठ कर्तव्य होय, असा माझा विश्वास आहे.

मार्क्स वाचून काही कामगार पुढारी असे गृहीत धरतात की, भारतात मालक आणि नोकर असे केवळ दोनच वर्ग आहेत आणि भांडवलशाही नष्ट करण्याची आपली मोहीम ते सुरू करतात। या दृष्टीत दोन ढोबळ चुका आहेत. जी बाब संभवनीय आहे किंवा आदर्श आहे, तिला वास्तविक म्हणण्याची पहिली चूक ते करतात. सर्व समाजातील माणसे अर्थ प्रवृत्तीचे, बुद्धिवादी किंवा न्यायप्रिय आसतात, हे म्हणणे जसे खोटे, तसेच सर्व समाजात केवळ दोनच वर्ग असतात, असे समजणेही खोटे आहे. भारतात असे सापेक्षपणे निश्चित असे दोन वर्ग अस्तित्वात नाहीत.

हिंसेच्या शक्तीला शरण जाऊन मिळविलेली शांतता ही खरी शांतता नव्हे, ती आत्महत्या होय। तसे करणे म्हणजे सुखी, सुंदर आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन जगण्यासाठी जे काही उदात्त आणि आवश्यक असते, त्याची होळी करून रानटीपणाला व अनाचारीपणाला शरण जाण्यासारखे आहे.

मला बोैद्धधर्म आवडतो, कारण कुठल्याही धर्मात जी तीन तत्त्वे सापडत नाहीत, ती बौद्धधर्मातच सापडतात. बौद्धधर्म मला प्रज्ञा शिकवतो. तो मला अंधश्रद्धा नि अद्‌भुतता शिकवीत नाही. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तीन तत्त्वे शिकवतो. देव किंवा आत्मा समाजाचा उद्धार करू शकत नाही. मार्क्सवाद आणि साम्यवाद यांनी जगाचे सर्व धर्म हादरून टाकले आहेत. बुद्ध हाच कार्ल मार्क्सला पूर्ण उत्तर आहे. रशियन साम्यवादाचा उद्देश रक्तरंजित क्रांती घडवून आणणे हा आहे. बुद्धप्रणित साम्यवाद हा रक्तहीन क्रांती घडवून आणतो.

Wednesday, March 3, 2010

सावरकर पुण्यतिथीनिमित्त

सोलापूर बार असोशिएशनच्या वतीने सावरकर पुण्यतिथीनिमित्त जिल्हा न्यायालयाच्या आवारातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात... तरुण भारतचे उपसंपादक सिद्धाराम भै। पाटील। व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश डी। एन। आदमने व बार असो।चे अध्यक्ष ऍड। डी। जी। चिवरी आदी मान्यवर उपस्थित होते। 2 march 10 , 2 pm

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी