Tuesday, March 26, 2013

बाराशे वर्षांनंतर व्हॅटिकनमध्ये किंचितसा बदल

मुक्ती तत्वज्ञानाच्या मुद्यावरून जेस्युट आणि लाल बावटा खांद्यावर मिरविणार्‍या गोदाताई परुळेकर यांच्यात संघर्ष आणि हातापायी झाली होती. महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील तलासरी येथे गरीब आणि आदिवासींमध्ये पाय पसरविण्याचा जेस्युटांचा इरादा होता. पण, गोदाताईंनी वर्षानुवर्षे त्या भागाची श्रमपूर्वक मशागत केली होती. ग्रामीण लोकांच्या अधिकारांसाठी गोदाताईंनी प्रामाणिकपणे उभारलेल्या आंदोलनामुळे चर्चला येथे आपले जाळे पसरविताना प्रचंड त्रास झाला. गोदाताई हयात होत्या तोवर जेस्युटांना वारली, धोडिया, कोंकणा, काथौडी आदी समाजांमध्ये घुसखोरी करता आली नाही. तथापि,...
रोमन कॅथॉलिकांच्या इतिहासात पहिल्यांदाच युरोपबाहेरील कुणा व्यक्तीची पोप पदावर नियुक्ती केली गेली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी एखाद्या श्‍वेतवर्णीय व्यक्तीची निवड करण्यासाठी जी महान उदारता दाखविली गेली, ती परिपक्वता येण्यासाठी समानतावादाचा पुरस्कार करणार्‍या या देशाला चारशे वर्षे वाट बघावी लागली. त्याचप्रमाणे व्हॅटिकनमध्ये कुणा गैरयुरोपीय व्यक्तीची पोप पदावर निवड करण्याची मानसिकता तयार करण्यासाठी बाराशे वर्षे लागली! गेल्या आठवड्यात, अर्जेंटिनाचे ७६ वर्षीय जॉर्ज मारियो बर्बोगलिओ यांची, जगातील सर्वांत जास्त आस्था असलेल्या समुदायाचे नियंत्रण करणार्‍या कॅथॉलिक चर्चच्या २६६ व्या पोपपदी नियुक्ती करण्यात आली.
कॅथलिक चर्चमध्ये त्याची रूढिवादी परंपरा, कट्टरता आणि आपण म्हणू ती पूर्व दिशा यामुळे इतका अतिरेक झाला की, त्याने जोन ऑफ आर्कची दोनदा राखरांगोळी करून, ती राख फ्रान्सच्या सीएन नदीत विसर्जित करून टाकली. त्या कृत्यासाठी व्हॅटिकनने अडीचशे वर्षांनंतर जाहीरपणे जगाची माफी मागितली. याच व्हॅटिकनच्या राजकीय व्यवहारामुळे नाराज झालेल्या मार्टिन ल्युथर किंग प्रथम यांनी प्रोटेस्टंट पंथाची मते प्रतिपादित केली. त्याच चर्चने आज डाव्या विचारांच्या म्हणून ओळखल्या जाणार्‍या लॅटिन अमेरिकेतून पोपची नियुक्ती करून, त्यांचा गरिबाभिमुख आणि सौहार्दपूर्ण प्रतिमेचा प्रचार करीत येणार्‍या काळात आपली कार्यशैली आणि लक्ष्य कोणते राहील, याचे संकेत दिले आहेत. बर्बोगलिया त्यांच्यासोबत ख्रिश्‍चन मतावलंबींचे परंपरागत ओळख असलेले प्रेम, करुणा आणि इतर धर्मियांसोबत समन्वयाचा भाव सोबत घेऊन आले आहेत, असे सांगितले जात आहे.
गेल्या पोपचा कार्यकाळ- व्हॅटिकन बँकांचे घोटाळे, पोपच्या स्वयंपाक्याने व्हॅटिकनमध्ये सुरू असलेल्या अनैतिक कृत्यांचे उघड पाडलेले पितळ, सर्वोच्च पदी बसलेल्या कार्डिनल्सचे लहान मुलांसोबत असलेले कामुक संबंध, पोपचा राजीनामा तसेच भारतातील केरळ राज्यात नन्सनी चर्चच्या पाद्रींवर केलेले शारीरिक शोषणाचे आरोप व त्यावर आधारित पुस्तके प्रकाशित करण्यामुळे गाजला होता.
बर्बोगलिया यांच्याबाबत सांगायचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, पोपच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचणारे ते पहिले जेस्युट आहेत. आपली बौद्धिक क्षमता आणि जिजसच्या बाबतीत आत्यंतिक समर्पित भावनेसाठी खिश्‍चनांमधील ज्येसुट पंथाचे लोक ओळखले जातात. चर्चच्या कामासाठी मोठ्यात मोठ्या कामावर आणि पदावर पाणी सोडण्याची त्यांची तयारी असते. थोडीबहुत तुलनाच करायची झाली, तर जेस्युटांची तुलना इस्लाममधील कट्टरपंथी तबलिगी वहाबी जमातींशी करता येईल.
भारतात ख्रिश्‍चॅनिटीचा आक्रमक प्रचार तसेच सुप्रसिद्ध आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांचे संचालन करण्यात जेस्युट अग्रक्रमावर आहेत. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात जेस्युटांनी भारतातील गरीब आणि मागास भागांमध्ये ख्रिश्‍चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मुक्ती तत्त्वज्ञानाच्या सिद्धांताचा आधार घेतला होता. अनेकवार झालेले वादविवाद आणि विश्‍लेषणानंतर वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चने आशिया खंडातील गरीब भागांमध्ये या तत्त्वज्ञानाचा वापर योग्य राहील, असा अभिप्राय दिला होता. या प्रक्रियेत मुक्ती तत्वज्ञानाच्या मुद्यावरून जेस्युट आणि लाल बावटा खांद्यावर मिरविणार्‍या गोदाताई परुळेकर यांच्यात संघर्ष आणि हातापायी झाली होती. महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील तलासरी येथे गरीब आणि आदिवासींमध्ये पाय पसरविण्याचा जेस्युटांचा इरादा होता. पण, गोदाताईंनी वर्षानुवर्षे त्या भागाची श्रमपूर्वक मशागत केली होती. ग्रामीण लोकांच्या अधिकारांसाठी गोदाताईंनी प्रामाणिकपणे उभारलेल्या आंदोलनामुळे चर्चला येथे आपले जाळे पसरविताना प्रचंड त्रास झाला. गोदाताई हयात होत्या तोवर जेस्युटांना वारली, धोडिया, कोंकणा, काथौडी आदी समाजांमध्ये घुसखोरी करता आली नाही. तथापि, नंतर भारतातील नवे डावे; ज्यात तेथील एमएल म्हणजेच मार्क्सवादी लेनिनवादी घटकसुद्धा सामील होेते, त्यांनी केलेला समझोतासुद्धा डोईजड होऊ लागला होता.
त्यासंदर्भात नव्या पोपकडे लॅटिन अमेरिकेला नव्या डाव्यांच्या विचारातून मुक्त करून, तेथे रोमन कॅथलिक ख्रिश्‍चनांचे एकछत्री साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी साहाय्यक म्हणून पाहिले जात आहे. त्याच वेळी ख्रिश्‍चनांनी गेल्या सहस्रकात आफ्रिकेत आपला पाया मजबूत केला, आता पुढील सहस्रकात आशिया खंडावर आणि विशेषतः भारतावर ते आपले लक्ष केंद्रित करणार आहेत, ही जी भविष्यवाणी गेल्या पोपने केली होती, त्यानुसरून भारतातातील गरिबी आणि मागासलेल्या भागात ख्रिश्‍चन धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी नवे पोप साहाय्यभूत ठरतील, असाही एक कयास आहे.
संपूर्ण आशिया खंडात भारतातच असा संस्कृतिकेंद्रित समाज उरला आहे, जो शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या आक्रमण आणि विध्वंसानंतरही आपली सनातन वैदिक परंपरा मूळ रूपात टिकवून आहे. युरोप आणि आशियामध्ये आपण वर्चस्व निर्माण करण्यास यशस्वी ठरलो असलो, तरी भारतात आपल्याला म्हणावे तसे यश मिळालेले नाही, हीच चर्चसाठी अतिशय चिंतेची बाब आहे.
चीनमध्ये माओत्से तुंग यांच्या नेतृत्वाखालील सांस्कृतिक क्रांतीमुळे आणि त्यानंतरच्या कम्युनिस्ट राजवटीने ख्रिश्‍चॅनिटीच्या प्रसाराला आळा घातला होता. चीन सरकारने व्हॅटिकनशी आजवर राजनयिक संबंधदेखील प्रस्थापित केलेले नसून, चीनचे पोप कधीच व्हॅटिकनला जात नाहीत. चीनमध्ये पॅट्रिऑटिक चर्चचा सिद्धांत म्हणजेच राष्ट्रवादी, देशभक्त चर्चची चर्चा होते. याचाच अर्थ, चीनच्या अंतर्गत राजकीय, सामाजिक आणि धार्मिक बाबीत व्हॅटिकनची लुडबुड पसंत केली जात नाही. चीन असे मानतो की, व्हॅटिकन अमेरिकेच्या हितासाठी सीआयएलासुद्धा मदत करते. पोलंडमध्ये झालेले सत्तापरिवर्तन आणि सोव्हिएत संघाचे विघटन यात चर्चचा हात स्पष्टच दिसत होता आणि त्यामागे अमेरिकेची फूस असल्याचेही जगजाहीर झालेले आहे. चर्च आणि अमेरिका तसेच युरोप यांच्यात झालेल्या संधीमुळे चीन संतप्त आहे किंवा थोडा भेदरलाही आहे. त्यामुळेच तो जनतेला अमेरिकाप्रेरित ख्रिश्‍चॅनिटीकडे न जाता बुद्धाला शरण जाण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे.
प्रश्‍न हा उपस्थित होतो की, भारत हे सारे आघात सहन करू शकेल? भारताच्या पूर्वांचल भागात आणि जनजातीय क्षेत्रात ख्रिस्ती धर्मांतरणाचे कार्य प्रचंड गतीने वाढत आहे. साधारण जनजातीचे लोक अतिशय भोळे, पापभिरू, निसर्गाचे पूजक, मूर्ती उपासक आणि राम व शिवामध्ये भक्ती दाखवणारे आहेत. ख्रिस्ती धर्मप्रसारक सेवा करण्याच्या नावाखाली छळ, बळ आणि कपटाने त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांना आमिषे दाखवून धर्मप्रसार करतात. गांधीजी म्हणत- सेवा करा, पण सेवेच्या बदल्यात धर्मपरिवर्तनाचा व्यापार होत असेल, तो अपराध असून ईसा मसीहाचा अनादर आहे, त्याच्यावर अन्याय आहे.
ठक्कर बाप्पा हाच उद्देश समोर ठेवून महाकौशलमध्ये कार्य करण्यासाठी गेले. तेथे आदिम जातिसेवक संघाची स्थापना केली. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पंडित रविशंकर शुक्ल यांनी ख्रिश्‍चनांच्या कारवायांबद्दल नियोगी आयोगाचे गठन केले. त्या आयोगाने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शासनकाळात चौकशी पूर्ण केली. खिश्‍चन धर्माच्या प्रचारात आणि उद्देशात त्यांना अतिशय आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या. पण, या अहवालावर कुठलीही कारवाई झाली नाही.
हिंदू समाज आपल्याच मस्तीत मशगूल आहे. त्याची आत्मदैन्याने ग्रस्त अशी कुंठित अवस्था झालेली आहे. त्याला ईर्षेचा रोग लागला आहे. संकुचिततेच्या भिंतीत त्याने स्वतःला बांधून घेतले आहे. तो केवळ आपल्या बबार्र्दीचे वहीखाते लिहीत आहे. प्रत्येक महंत आणि बैरागी लाऊडस्पीकर होऊन बोलत आहे, व्यक्त होत आहे. तो संपत्ती, जमीन आणि आंतरराष्ट्रीय प्रवासात अडकून पडला आहे. ज्यांची निवडणुकीच्या प्रपंचापासून स्वतःला दूर ठेवण्याची मानसिकता झालेली आहे, त्यांनी नव्या पोपचा भारतीय समाजावर आणि जीवनपद्धतीवर कोणता प्रभाव पडेल, याची चिंता करावी. जे राजकारणाच्या सारिपाटावर बुद्धिबळाच्या सोंगट्या खेळण्यात व्यस्त असतील, त्यांना या सार्‍या प्रकाराशी कोणतेही घेणे-देणे नसावे. जो बदल बाराशे वर्षांनंतर इटलीच्या पोटात वसलेल्या व्हॅटिकनच्या धरतीवर झाला, त्यापासून भारत अस्पर्शित कसा काय राहू शकेल?
 तरुण विजय
(लेखक राज्यसभा सदस्य आहेत)
 अनुवाद : चारुदत्त कहू

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी